Tuesday, December 28, 2010

अनुभूती

जय जय सर्व विसांवया । सोsहं भाव सुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।।

अनुभवाशिवाय बोलू नये असे म्हटले जाते. नोकरीमध्ये सुद्धा अनुभव पाहिला जातो व त्यानुसार तुमची पात्रता ठरविली जाते. आत्मज्ञानी संतांकडे गेल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय त्यांच्या विषयी बोलणे हे व्यर्थ आहे. अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच येथे प्रगती साधता येते. आत्मज्ञानी सद्‌गुरू शिष्यांना अनुभव देतात. ते मनकवडे असतात. ते भक्तांच्या मनातील इच्छा, आकांछा जाणतात. त्यांना भूत- भविष्याचे ज्ञान असते. ते शांतीचे सागर आहेत. त्यांच्या दर्शनानेही मनाला शांती, समाधान वाटते. ते समाधिस्थ झाले, तरीही ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. अनुभव देत असतात. भक्तांचे दुःख ते दूर करत असतात. संकटकाळी मनाला त्यांचाच आधार असतो. पुरात सापडलेल्या व्यक्तीला एखादा लाकडी ओंडका मिळाला तर तो तरू शकतो. तो बुडण्यापासून वाचू शकतो. तसे सद्‌गुरू संकटकाळात लाकडी ओंडका होतात. शिष्याला संकटकाळात आधार देतात. त्यांचे जीवन तारतात. संकटात तरलेले भविष्यात फार मोठी कामगिरी करू शकतात. कारण त्यांनी दुःख पचवायला शिकलेले असते. दुःखावर मात करायला ते अनुभवलेले असतात. अनुभवामुळे भविष्यात चुका होत नाहीत. प्रगती होत राहते. वाट सापडते. वेगवेगळे मार्ग सुचतात. सद्‌गुरू शिष्याला योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशा दाखवतात. प्रगतीच्या वाटा सांगतात. आध्यात्मिक अनुभव देतात. असे हे सद्‌गुरू जगासाठीही विश्रांतीचे स्थान असतात. त्यांच्याजवळ आनंद ओसंडून वाहत असतो. खचलेल्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ या आनंदात आहे. सद्‌गुरू शिष्याला त्याची खरी ओळख करून देतात. मी ब्रह्म आहे याचा अनुभव ते सतत शिष्याला देत राहतात. यासाठी त्यांच्या संगतीत जाऊन तो अनुभव घ्यायला हवा. संकटकाळीच लोक देवाकडे जातात पण जे नियमित जातात त्यांना अनुभवाने देवपण प्राप्त हो
ते.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Sunday, December 26, 2010

रसज्ञ

तेथ सुगरणी उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।
मिळती मग अवतरे । हातु जैंसा ।।

सिंहगडावर मिळणारी झुणका भाकरी कधी खाल्ली आहे का? लोट्यातून दहीही मिळते. त्याची चव चाखली आहे का? याची गोडी काही औरच असते. एखाद्याच्या हातचा गुणच वेगळा असतो. प्रत्येकाला ते जमत नाही. एखाद्या ठिकाणचे पदार्थही वेगळ्याच गोडीचे असतात. सध्या धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याची चवही कशी सुधारता येईल हेही पाहिले जात आहे. पण या संकरित जाती फार काळ टिकत नाहीत. पारंपरिक जातीमध्ये जे गुण होते ते गुण या संकरित जातीत आढळत नाहीत. यासाठी धान्याच्या पारंपरिक जाती जतन करण्याची गरज आहे. पण या जातींचे उत्पादन कमी असते. यामुळे काळाच्या ओघात या जाती नष्ट होत आहेत. सध्या नव्याने अनेक संकरित जाती येत आहेत. जैवतंत्रज्ञानाने तर यामध्ये मोठी क्रांतीच केली आहे. उत्पादन वाढीचा उच्चांक गाठणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. पण या जाती खाण्यास योग्य आहेत का? याचे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात. याबाबत संशोधकातही एकमत नाही. बीटी वांगे यामुळेच चर्चेत आहे. वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी उत्पादन वाढीची गरज आहे. 2050 पर्यंत देशाच्या कृषी उत्पादनात 70 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे, म्हणून कशाही प्रकारे उत्पादन घेऊन चालणारे नाही. आरोग्याचीही काळजी घेणे आवश्‍यक आहे. उत्पादन वाढीबरोबरच त्याची उत्तमता, प्रत, गोडी तसेच आरोग्यास लाभदायक असे गुण टिकवणे हे आव्हान संशोधकांसमोर आहे. नुसतेच भरघोस उत्पन्न घेऊन चालणार नाही. त्याने समाधान होणार नाही. त्याला गोडीही असेल तरच मागणी राहते. भरघोस उगवते, गोडीही आहे आणि शिजवलेही उत्तम जाते, मग याच्या ग्रहणाने तृप्ती ही निश्‍चितच येणार. मनाला तृप्ती आली की चेहराही तजेलदार होतो. साधनेलाही गोडी लागते. कीर्तनकारास प्रेक्षकांची साथ मिळाली तर कीर्तन सांगणाऱ्यासही जोर चढतो. गोडीने ऐकणारे असल्यावर सांगणाऱ्यासही गोडी वाटते. संगीताचेही तसेच आहे. गायकास रसिकांची दाद मिळाली तर त्यालाही स्फुरण चढते. तसे आत्मज्ञानी सद्‌गुरूंकडे ओसंडून वाहणाऱ्या या ज्ञानरसात मनमुराद डुंबणारे शिष्य भेटले तर ते ही तृप्त होऊन जातात. सद्‌गुरुंच्या ज्ञानरसाने शिष्यही तृप्त होऊन जातो. मनाची तृप्ती अनुभवतो. खाणारा आवडीने खात असेल तर भरवणाराही आवडीने भरवतो. शिष्य आवडीने खात असेल तर सद्‌गुरूही आवडी भरवतात. मग अशा शिष्याला तृप्ती का येणार नाही? मनाची स्थिरता का साधता येणार नाही? स्थिरता आली की मन आपोआप साधनेत लागते. फक्त आवड पाहिजे.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Friday, December 24, 2010

राजहंस

तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ।।

दुधात पाणी मिसळले तर दूध पातळ होते. पण राजहंस हा असा पक्षी आहे जो त्यातील फक्त दूधच पितो व पाणी शिल्लक ठेवतो. इतके चातुर्य त्याच्याकडे आहे. आपणास आवश्‍यक ती गोष्टच तो घेतो. राजहंसाप्रमाणे आपणही या मोहमयी जगातील केवळ चांगल्या गोष्टींचे ग्रहण करायला शिकले पाहिजे. या मोहजालात न अडकता यातून योग्य काय व अयोग्य काय हे ओळखायला शिकले पाहिजे. यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. मनाच्या स्थिरतेसाठी अशी दृष्टी गरजेची आहे. साधनेत मन रमण्यासाठी स्थिरता ही आवश्‍यक आहे. चांगल्या गोष्टीतून मनाला आनंद होतो. त्या गोष्टीच सतत ग्रहण करत राहिले तर स्थिरता आपोआप येते. दुष्ट विचारांनी मन चलबिचल होते. मनाची चलबिचलता दूर करण्यासाठी सन्मार्गाची सवय लावायला हवी. वाईट आणि चांगले यातील केवळ चांगल्या गोष्टी उचलायला हव्यात. आत्मा व देह वेगवेगळे आहेत. दुधात जसे पाणी मिसळले आहे तसे देहात आत्मा आला आहे. देहापासून आत्मा वेगळा आहे. हे जाणण्यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. देहाचा क्षणभंगूरपणा ओळखायला हवा. आत्म्याचे अमरत्व अनुभवायला हवे. आत्म्याची अनुभूती यायला हवी. सद्‌गुरू त्यांच्या अनुभवातून ही अनुभूती शिष्याला देत असतात. शिष्याने फक्त जागरूक असायला हवे. राजहंसासारखे ओळखायला व टिपायला शिकले पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक, देह आणि आत्मा यातील फरक ओळखायला हवा. हे ज्ञानदृष्टीने जे जाणतात तेच खरे राजहंस. तेच आत्मज्ञानाचे लाभार्थी होतात. तेच त्या परमपदाला पोहोचतात.

राजेंद्र घोरपडे,
संपर्क क्र. 9011087406

Thursday, December 16, 2010

देह आणि आत्मा

या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ।।

देहात आत्मा आला आहे. पण तो देहापासून अलिप्त आहे. देह हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. यामुळे तो क्षणात नाश ही पावणारा आहे. मृत्यूनंतर देहाला अग्नी दिला तर त्याची राख होते आणि उघड्यावर पडला तर तो सडून जाईल किंवा कुत्री, मांजरे, गिधाडे यांचे भक्ष्य होईल. किड्यांचा ढीगही साचेल. इतकी वाईट अवस्था या देहाची आहे. यासाठी या देहाचा मोह नको. सौंदर्य सुद्धा टिकून राहात नाही. तारूण्यातले सौंदर्य म्हातारपणापर्यंत तसेच टिकून राहात नाही. यासाठी या सौंदर्याचा गर्व असणेही योग्य नाही. जे टिकत नाही ते टिकवून ठेवण्यात सध्या माणसाची खटपट सुरू आहे. सौंदर्यप्रसादनावर किती मोठा खर्च होतो हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. साबणाच्याच किती जाहिराती दूरदर्शनवर झळकतात. अमूक एक साबण वापरला तर तुमचा चेहरा अधिक उजळेल. तजेलदार होईल. अशा या जाहिराती प्रचार सुरू असतो. साबणाचा वापर शरीरावरील कीटक, घाण घालवण्यासाठी होतो ही सांगणारी अपवादाने एखादीच जाहिरात असते. अशा साबणाला मागणीही तितकी कमी असते. खरे तर साबणाचा वापर हा स्वच्छतेसाठी केला जातो. त्याने सौंदर्य क्षणिकच वाढवले जाते. पण आपण त्याच्याकडेच आकर्षित होतो. क्षणिक सुखाच्या मागे माणसे धावत आहेत. देहाचा मोह त्यांना असतो. अशा या देहाचा नाश व्हायला क्षणही लागत नाही. पण या देहात आलेला आत्मा हा अमर आहे. त्याचा नाश होत नाही. त्याला देहाप्रमाणे आकार नाही. त्याचे देहाप्रमाणे प्रकारही नाहीत. काळा, गोरा असा भेदभाव त्यामध्ये नाही. देहात आल्यामुळे तो युक्त नाही. पण तो बद्धही नाही. सृष्टीच्या निर्मितीमुळे तो तयार झाला असेही नाही किंवा सृष्टीचा विनाश झाला तर तो नाश पावणाराही नाही. त्याचे मोजमाप ही करता येत नाही. इतका मोठा, इतका लहान असे वर्णनही करता येत नाही. देहाच्या ठिकाणी असून तो देहापासून अलिप्त आहे. अशा या आत्माला ओळखणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, December 13, 2010

ब्रह्मसंपन्नता

एऱ्हवी तैचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना ।
जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ।।

अग्नीतून निघणारी प्रत्येक ठिणगी जरी वेगळी दिसत असली तरी त्या सर्व ठिणग्या एकच असतात. सूर्यापासून निघणारी किरणे कधी सोनेरी, कवडशातून कधी लख्ख पांढरी अशी वेगवेगळी वाटत असली तरी ती सर्व किरणे ही एकच असतात. ही किरणे प्रिझममधून गेली तर ती सप्तरंगी होऊन बाहेर पडतात. पण ही सप्तरंगी किरणे ही एकाच किरणांपासून तयार होतात. या सातही रंगात एकच किरण सामावलेला आहे. प्रत्येक देहात असणारा आत्मा हा वेगवेगळा वाटत असला तरी तो एकच आहे. हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी. हे जाणणे हेच खरे ज्ञान. आत्माला जाणणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. हे जो जाणतो तोच ब्रह्मज्ञानी होतो. ब्रह्मसंपन्न होतो. सद्‌गुरू ब्रह्मत्वास स्वरूपाच्या ठायी स्थिर करून, धारण करून, स्वात्मबोधी व ब्रह्मबोधी होतात. ते ब्रह्म बोधाचे सुख, सद्‌गुरू स्वतः आपल्या शिष्याच्या ठायी ओतत असतात. या क्रियेने स्वाभाविकच शिष्य हा गुरूरुप होतो. गुरूचे गुरूत्व हे त्यांच्या आकाराने विसर्जित होऊन शिष्याच्या आकाराने मंडित होते. ब्रह्मसंपन्नता आल्यावर गुरू- शिष्य हा भेद राहात नाही. त्या शिष्यातून ती ब्रह्मसंपन्नता, ते ज्ञान ओसंडून वाहू लागते. यासाठी गुरूंकडून मिळत असलेल्या ज्ञानात, आनंदात डुंबायला शिकले पाहिजे. ते सतत ओतत असलेल्या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. प्रत्येकजण ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. येथे ना जातीची अट आहे, ना गरीब श्रीमंतीचे बंधन आहे. प्रत्येक जीव ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाला सारखाच हक्क आहे. कोणताही भेदभाव नाही. यासाठी आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. ते ज्ञान आत्मसात करायला शिकले पाहिजे. मी एक आत्मा आहे याचा बोध यायला हवा. ज्याने यावर विजय मिळवला तोच आत्मज्ञानी. मनाचा तसा निग्रह करायला हवा. मन यावर स्थिर करायला हवे. जो हे करतो तोच खरा गुरूंचा शिष्य असतो. गुरूकृपेनेच तो ब्रह्मसंपन्न होतो.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, December 9, 2010

महाशुन्य

नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन ।
ते शून्यतें महाशून्य । श्रुतिवचन संमत ।।

गणितात शुन्याला महत्त्व आहे. आलेखात शून्य हा केंद्रस्थानी असतो. शुन्यापासूनच चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाची सुरवात होते. शून्य समही नाही विषमही नाही. जीवनात चढ उतार असतात. पण स्थिरतेला महत्त्व आहे. अध्यात्मात शून्य अवस्थेला खूप महत्त्व आहे. विचार शून्य व्हायला हवेत. सध्याच्या युगात हे कसे शक्‍य आहे. पण प्रत्यक्षात शब्दशः असा अर्थ नाही. अध्यात्मातील अर्थ समजून घ्यायला हवेत. विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे मन "सो s हम' वर स्थिर व्हायला हवे. असा याचा खरा अर्थ आहे. साधनेचा खरा आनंद घ्यायचा असेल तर विचार शून्य व्हायलाच हवेत. विचार शून्य कसे होतात? विचार कसे थांबतात? खर तर विचार हे येतच राहतात. त्यांना थांबवणे अशक्‍य असते. आज यावर विजय मिळवला तर उद्या काय त्याच्याकडून पराभूत झालो. यातून सुख-दुःखे उत्पन्न होत असतात. विजयाने आनंद तर पराभवाने दुःख होते. पण विजय मिळाला म्हणून हुरळून जायचे नाही व दुःखाने खचून जायचे नाही. यासाठी मन उदास व्हायला हवे. मी कोण आहे? हे जाणणे हाच खरा विजय आहे. आत्मज्ञान प्राप्ती हेच ध्येय असावे. त्यानंतर सर्व आनंदी आनंद आहे. दुःख नाहीच. मनाला या खऱ्या आनंदाची ओढ लावायला हवी. आपल्याकडे अमाप गोष्ट असते तेव्हाच आपण त्यातील थोडी दुसऱ्याला वाटू शकतो. आपल्याकडे अमाप आनंद असेल तरच आपण दुसऱ्याला आनंदी करू शकू. आत्मज्ञानी व्यक्तीकडे आनंद ओसंडून वाहत असतो. त्याच्या ज्ञानातून वाहणाऱ्या या आनंदात डुंबायला शिकायला हवे. मनाला या आनंदाची गोडी लागली की आपोआप स्थिरता येते. मनात मग तोच विचार घोळत राहतो. साधनेत आपोआप मन लागते. विचार शून्य होतात. शुन्याची बेरीज व वजाबाकी शून्यच येते. शुन्याला भागच नाहीत त्यामुळे त्याचा भागाकार होत नाही. आणि गुणाकार केला तर उत्तर शून्यच येते. विचारांचा गुणाकार केला तर विचार पटीत वाढतात. पण विचाराला शुन्याने गुणले तर विचार शून्यच होईल. शुन्याची ही अवस्था जाणून घ्यायला हवी. त्याची व्यापकता जाणून घ्यायला हवी. आकाशाची पोकळी किती मोठी आहे. अनंत विस्तार असणाऱ्या या आकाशाचे मोजमाप अद्याप कोणालाही करता आले नाही. कारण ते एक शून्य आहे. शुन्याचे मोजमापच होत नाही. शुन्याचे मोजमाप शून्यच आहे. हे महाशुन्य जाणून घ्यायला हवे. मग विचार आपोआपच शून्य होतील.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, December 6, 2010

अज्ञानवेली

तया शरीर जे जालें । तें अज्ञानाचें बी विरूढलें ।
तयाचें वित्पत्तित्त्व गेलें । अज्ञानवेली ।।

ज्वारीचे बी पेरले की ज्वारीचेच पीक येते. आंब्याचे बी पेरले की आंब्याचे रोपच उगवते. तसे अज्ञानाचे बी रुचले की तेथे अज्ञानाचाच वेल उगवतो. ज्याचे आपण बी पेरतो त्याचेच रोपटे उगवते. अफूचे बी पेरल्यावर अफूच उगवणार. यासाठी शेती कशाची करायची हे आपण ठरवायचे असते. पेरणी ही आपणालाच करावी लागते. ज्ञानाची पेरणी केली की निश्‍चितच तेथे ज्ञानाचे रोपटे उगवेल. तणाचे बी पेरावे लागत नाही ते आपोआपच उगवते. तणांचा नाश केला तरी शेतात तण हे उगवतेच. असेच अज्ञानाचे आहे. अज्ञानाचे बी एकदा शेतात पडले तर त्याचा फैलाव जोरदार होतो. त्याचा समूळ नाश करावा लागतो. शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तणांचा नाश करावा लागतो. शेतातील तणे काढून टाकावी लागतात. तरच पिकाची वाढ जोमदार होते. तणे शेतीतील अन्नद्रव्ये शोषतात. तणांची वाढ जोरात होते. पण ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच जमिनीत गाढली तर ती कुजल्यानंतर त्याचे खत होते. याचा उपयोग पिकाच्या वाढीला होतो. यासाठी अज्ञान फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच गाढावे. म्हणजे ते कुजून त्याचे खत होऊन ज्ञानाचे रोप जोमात वाढेल. अज्ञान वाढू न देण्यातच ज्ञानाची प्रगती आहे. काही तणे ही परोपजीवी असतात. यामुळे मुख्य पिकाची वाढ खुंटते. अज्ञान सुद्धा एक परोपजीवी तणच आहे. यामुळे ज्ञानाची वाढ खुंटते. ज्ञानाची वाढ जोमाने होण्यासाठी अज्ञानाच्या तणाची खुरपणी ही व्हायलाच हवी. अज्ञानाचे तण न काढताच खते टाकली तर ज्ञानाच्या पिकापेक्षा अज्ञानाच्या तणांची वाढ जोमाने होईल. पुन्हा त्या शेतात ज्ञानाच्या पिकाची पेरणीही करणे शक्‍य होणार नाही. यासाठी अज्ञानाच्या तणांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, December 2, 2010

संस्कार

चित्त आराधीं स्त्रियेचें । स्त्रियेचेनि छंदे नाचे ।
माकड गारूडियाचे । जैसे होय ।।

सध्या सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष असा भेदभावही जवळपास संपला आहे. पुरुष प्रधान संस्कृती आता मागे पडत आहे. आर्थिक संपन्नतेमुळे सामाजिक बदलही झाला आहे. चंगळवादी संस्कृती सध्या पाय रोवू लागली आहे. याचा कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका पोहोचू शकतो. संपन्नतेने शांती येतेच असे नाही. उलट शांती कमी होताना दिसते. एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत असे अनेक प्रश्‍न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल तर कुटुंब व्यवस्थाही टिकायलाच हवी. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्री- पुरुष नाते संबंधात बदलत होत आहे. किरकोळ कारणांनी मोठे वाद होतात, लगेचच घटस्फोट. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. तू नाही तर लगेच दुसरा किंवा दुसरी अशी अवस्था आज संसाराची झाली आहे. चंगळवादाने अशा समस्या उद्‌भवत आहेत. तसे पाहता पूर्वीच्या काळीही असे प्रश्‍न होते, पण त्यांचे प्रमाण कमी होते. समाजाच्या चौकटीत अशांना मान नव्हता. त्यामुळे असे प्रकार कमी घडत असत. स्त्रियांच्या प्रश्‍नावर चर्चाही केली जाते. पण स्त्री स्वातंत्र्यामुळे उलट त्याच्या सुरक्षेचाच प्रश्‍नच मोठा झाला आहे. बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक प्रकार डोके वर काढत आहेत. अशाने सामाजिक शांती नष्ट झाली आहे. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा तरच हे प्रश्‍न सुटतील. सामाजिक संस्कारांचे महत्त्व जनतेला पटवून द्यायला हवे. धर्मामध्ये स्त्रियांवर टीका केली आहे. म्हणून तो सोडून देणे योग्य नाही. टीका ही का गेली आहे याचा प्रथम विचार करायला हवा. टिके मागचा हेतू जाणून घ्यायला हवा. संस्कृतीला नावे ठेवण्याऐवजी टीकेवर चिंतन, मनन करायला हवे. भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. समाजात स्त्री- पुरुषांनी वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत हे त्यामध्ये सांगितले गेले आहे. हे सर्व सामाजिक शांती, समृद्धीसाठी सांगितले गेले आहे. चंगळवादी संस्कृतीवर मात करण्याचे सामर्थ या विचारात आहे. यासाठी याचा अभ्यास करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, November 29, 2010

सन्मार्गाची कास

तरि वाघाचिये अडवे । चरोनि एकवेळ आला दैवें ।
तेणें विश्‍वासें पुढती धांवे । वसू जैसा ।।

जंगलात गेलेला बैल वाघासमोरून एकदा चरून आला. पण दैवयोगाने वाघाने त्याला कोणतीही हानी पोचविली नाही. यामुळे त्या बैलाचा विश्‍वास बळावला. वाघाबाबतची भीती त्याच्या मनातून गेली व तो बैल पुन्हा तेथेच चरायला गेला. काय झाले असेल? वाघाने त्यांच्या फरशा पाडला. चोराची एक चोरी यशस्वी झाली की तो लगेचच दुसरी चोरी करण्याचा विचार करतो. त्याला चोरी करण्याचे व्यसन लागते. माणसाचे मनावर नियंत्रण नसते. सतत ते विषयांच्या मागे धावत असते. दहशतवादी कृत्येही अशाच अज्ञानातून वाढत आहेत. एखादे गैरकृत्य पचले की पुढे दुसरा गैर प्रकार करण्याची वृत्ती होते. यातून गैर कारभार करण्याची सवयच लागते. माणूस त्याच्या आहारी जातो. त्याचे मनावर नियंत्रण राहात नाही. सध्या अनेक राजकारण्यांना सुद्धा हीच सवय लागली आहे. एखादा गैर कारभार केला. तो पचला, की लगेच दुसरा करायचा. अशाने भ्रष्टाचार वाढला आहे. लोकांना तो आता शिष्टाचार वाटू लागला आहे. नियंत्रण सुटलेले आहे. पण आपण एकदा सापडलो तर कायमचे बाद हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ठेच लावल्याशिवाय भान येत नाही म्हणतात ना ते हेच. राजकारणात अशी बाद झालेली अनेक घराणी आहेत. चुकांची सुद्धा एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यावर सुधारण्यासाठीही संधी मिळत नाही. एकदा चुकल्यानंतर ती लगेच सुधारणे व पुन्हा अशी चूक न करणे यातच खरा शहाणपणा आहे. पण तसे होत नाही. ऊस गोड लागला म्हणून तो मुळा सकट खायचा नसतो. वाईट सवयीचे व्यसन लगेचच लागते. पण ते जडू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवा. तरच खरे यश संपादन करता येईल. वाईट मार्गाने कमविलेली संपत्ती फार काळ टिकत नाही. तेव्हा वाईट गोष्टींचा मोह धरू नये. तो टाळणे यातच खरे हित आहे. मोह माणसाला आवरता यायला हवा. यासाठी सन्मार्गाची कास धरायला हवी. व्यसन असावे पण ते चांगल्या गोष्टीचे असावे. वाईटाचे व्यसन हे आपणासाच खाऊन टाकते. हे विसरता कामा नये.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, November 28, 2010

मनोरथ

मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ।।

मनोरथ, संकल्प कशाचा करायचा हे सुद्धा महत्त्वाचे आहे. संकल्पाशिवाय प्रगती होत नाही. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. रात्रंदिवस झटतो. मन त्यातच गुंतते. कधीतरी तो पूर्ण होतो. कधी पूर्ण ही होत नाही. पण आपण पूर्ण होईल या आशेने त्यामध्ये कार्यरत असतो. मनोरथ पूर्ण झाला नाही तरी मन समाधानी असावे. आशा सोडायची नाही. अपयशी ही यशाची पहिली पायरी आहे. असे समजून त्यामध्ये प्रयत्न करत राहायचे. वादळे ही होतच राहतात. जीवनात चढ उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर अडवा येतो तर कधी खोल दरी येते. पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात ही करावीच लागते. वादळ आले तर सुरक्षित जागा शोधावी लागते. यासाठी संकल्प करतात. योग्य ते नियोजनही आवश्‍यक आहे. म्हणजे येणाऱ्या अडचणीवर सहजपणे मात करता येईल. उद्दिष्ठ गाठता येईल. कामात नियोजनाचा अभाव असेल तर अपयश येण्याची शक्‍यता असते. यासाठी योग्य ती तयारी करणे आवश्‍यक आहे. नुसते प्रयत्न करून चालत नाहीत. नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत राहिल्यास प्रगती होत राहते. निराशा येत नाही. काळजी, भीती वाटत नाही. दूरगामी विचार करून नियोजन करावे म्हणजे संकल्पात येणारे अडथळे कमी होतील. मनाचा दृढ संकल्प हा उद्दिष्ठ गाठण्यात यशस्वी ठरतो हे विसरता कामा नये. लक्ष साधताना मनाची स्थिरता ही आवश्‍यक आहे. मन भरकटता कामा नये. पुरात पडलेला भोपळा प्रवाहात वाहत जातो. तसे मन भरकटते पण ते संकल्पावर स्थिर करणे आवश्‍यक आहे. आलेल्या अडथळ्यांवर मात करीत पुढे चालत राहावे. नियोजनबद्ध कार्यक्रम कधीही अपयशी ठरत नाही.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, November 25, 2010

गुरूभक्त

आतां गुरूभक्तांचे नांव घेणे । तेणे वाचे प्रायश्‍चित्त देवो ।
गुरूसेवका नांव पहा हो । सूर्य जैसा ।.

मानवाच्या स्वभावानुसार भक्तांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काहींचा स्वभाव सज्जन असतो. काहींचा कपटी असतो. मानवाचा स्वभाव केव्हा बदलेल. त्यांच्या मनात कोणता विचार येईल, हे काही सांगता येत नाही. सद्‌गुरूंना मात्र त्यांच्या भक्तांचे सर्व गुण माहीत असतात. ते सर्व जाणत असतात. ते मनकवडे असतात. भक्तांच्या चुकांकडे ते काणाडोळा करत असतात. असेच काही भक्त सद्‌गुरूंचा वापर चुकीच्या पद्धतीने करून घेत असतात. सद्‌गुरूंच्या अशा स्वभावाचा ते फायदा करून घेत असतात. विद्या घेऊन त्यांच्यावरच उलटतात. असा माज त्या भक्तांना असतो. अशा अज्ञानी भक्तांची लक्षणेही जाणून घेणे गरजेचे आहे. तसे अशा भक्ता विषयी बोलणे म्हणजे वाचेस प्रायचित्त करण्यासारखे आहे. आंबलेले, नासलेले पदार्थ खाल्ल्यानंतर जसे तोंडाची चव जाते तशी या अज्ञानी भक्तांच्या विचारांनी स्थिती होते. पण याचाही अनुभव, माहिती असणे गरजेचे आहे. कारण अज्ञानी लक्षणे जाणता आली तर आपल्या होणाऱ्या चुका आपल्या लक्षात येतील. चुका जाणून घेणे व त्या सुधारणे हा सुद्धा ज्ञानी होण्याचा मार्गच आहे.चुकातूनच प्रगती साधली जात असते. यासाठी आपल्या चुकांकडे सद्‌गुरू काणाडोळा करत असतात. एक दिवस हा सुधारेल ही भावना त्यांच्या मनात असते. असेच समजून ते आपणाला मदत करत असतात. प्रेम देत असतात. ज्ञानाचा वर्षाव करत असतात. काही चुका या मानवी स्वभावामुळे होत असतात. या चुका सुधारण्यासाठी मानवी स्वभावात योग्य ते बदल आणण्याची गरज आहे. स्वभाव बदलायला हवा. सद्‌गुरू सुद्धा गुरूभक्तच आहेत. तेही या त्यांच्या गुरूंची साधना करत असतात. खरा गुरूभक्त हा सुर्यासारखा असतो. तेजस्वी असतो. त्यांच्यातून तेज ओसंडून वाहत असते. यामुळेच अनेकांच्या जीवनात प्रकाश पडतो. तेजस्वी गुरूभक्ताचा तेजाने आपल्याही जीवन प्रकाशमान करून घ्यायला शिकलं पाहिजे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, November 21, 2010

डोळसपणा

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तैसा ज्ञाननिश्‍चयो आघवा । वायां जाय ।।

जगात भौतिक प्रगतीचा वेग प्रचंड आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. शहरात प्रचंड प्रगती होत आहे. ग्रामीण भाग आजही अंधारात आहे. प्रगतीच्या वाटा आहेत पण त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांची प्रगती साधणारा असा जिवाभावाचा कोणी साथीदार त्यांच्याकडे नाही. यामुळे विकासात अडथळे येत आहेत. विकासामुळे शहरातील जीवन हे धकाधकीचे झाले आहे. हे ही तितकेच खरे आहे. आठवड्याची सुटी आता सुटी वाटत नाही. निवांतपणा हा राहिलेलाच नाही. अनेक कामे बाकी राहिलेलीच असतात. अशाने शांती ही नाहीच. देहाच्या सुखासाठी सारीही धडपड सुरूच आहे. पण हे सुख क्षणभंगुर आहे, हे लक्षातही घ्यायला वेळ नाही. क्षणिक सुखाच्या मागे धावणारा हा वर्ग आता कायमस्वरूपी सुखापासून दुरावत चालला आहे. अशाने आगामी काळात शांती शोध घेऊनही मिळणे कठीण होईल असे वाटू लागले आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. ते चुकणार नाही. टाळताही येणार नाही. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतून प्रगती होते हे ही खरे आहे. पण ही स्पर्धा कोणाशी करायची व कशाची करायची हे समजून घेणे आवश्‍यक आहे. जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याची हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे. म्हणजे योग्य मार्ग सापडतील. तरच खरी प्रगती साधता येईल. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे पण त्याचा वापर कसा करायचा हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. उपलब्ध प्रत्येक साधनाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. दुरपयोगात स्वतःचेच नुकसान आहे. यासाठी व्यवहारात डोळसपणा हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Saturday, November 20, 2010

परमात्मा

तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें तया दिसे । ज्ञानास्तव ।।

अध्यात्मज्ञान हे नित्य आहे. बाकीची जी ज्ञाने आहेत, ते सर्व अज्ञान आहे. आत्मा हा अमर आहे. हे जाणणे हेच खरे ज्ञान आहे. आत्मा कायमस्वरूपी आहे. तो कधीही नष्ट होत नाही. नष्ट केला जाऊ शकत नाही. हा नित्य अनुभव ज्याला असतो तो खरा आत्मज्ञानी. संसारात अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. पण आत्मज्ञानी व्यक्ती या प्रश्‍नांनी व्यथित होत नाही. संसारातील सुखाने ती कधीही हुरळून जात नाही किंवा दुःखाने ती कधीही निराश होत नाही. इतकी स्थिरता त्याच्या मनामध्ये असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे येतच असतात. या सर्वांपासून जो विचलित होत नाही तो खरा ज्ञानी. आत्मा आणि देह हे वेगवेगळे आहेत. आत्मा हा देहात आला आहे. पण तो देहापासून मुक्त आहे. देह नाशवंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मज्ञान प्राप्ती नंतरच आत्मा तृप्त होतो. तोपर्यंत त्याची धडपड सुरू असते. देहात येणे आणि जाणे हे चक्र सुरू असते. जन्म-मृत्यूच्या या चक्रात तो अडकलेला असतो. आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याला या चक्रातून मुक्ती मिळते. देह आणि आत्मा वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो खरा ज्ञानी. आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. आत्माचे येणे आणि जाणे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. या ज्ञानाच्या अनुभवासाठी जो धडपडतो तो खरा ज्ञानी. सद्‌गुरू कृपेने, भक्तीने जो हे ज्ञान हस्तगत करतो तो आत्मज्ञानी. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म-मरण नाही. म्हणूनच संतांची समाधी ही संजीवन आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, November 17, 2010

कर्माचा त्याग

परि हें मिया केलें । कीं हे माझेनि जालें ।
ऐसे नाहीं ठेविलें । वासनेंमाजीं ।।

कर्माचा त्याग करायचा म्हणजे नेमके काय करायचे हेच अनेकांना समजत नाही. याचा अर्थ अनेकजण कर्मच करायचे नाही असा चुकीचा लावतात. सध्याच्या काळात तर असे करणे शक्‍यच नाही. दिवस बदलले आहेत. काम केले नाही तर जगणेही मुश्‍कील होईल. अध्यात्मात कर्माचा त्याग म्हणजे नेमेके काय याचा खरा अर्थ समजून घेणे आवश्‍यक आहे. चुकीचा अर्थ काढून अध्यात्माची टिंगल करू नये. सध्या हेच तर केले जात आहे. दैनंदिन जीवनात कर्म हे करावेच लागते. कर्माचा त्याग म्हणजे जे काही कर्म तुम्ही करता ते सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण करणे. हे कर्म त्यांच्या कृपार्शिवादाने झाले असे मानणे. तसा भाव मनात प्रकट करणे. हाच कर्म त्याग आहे. यामध्ये स्वतःचा मी पणा, अहंकार नष्ट होतो. ही यामागची भूमिका आहे. हे जाणून घ्यायला हवे. कारण सध्याच्या नव्या पिढीला हे विचार पटणे कठीण आहे. कर्म स्वतः करायचे आणि ते त्यांच्या कृपेने झाले असे म्हणायचे. आपण परिश्रम घ्यायचे आणि ते त्यांना अर्पण करायचे हे कसे शक्‍य आहे? हा विचार सध्याच्या युगात मनाला पटणेही शक्‍य नाही. अशामुळेच मुळी अहंकार, मी पणा नव्या पिढीत वाढला आहे. पूर्वीचे लोक देवाच्या कृपेला महत्त्व देत. देव कोपल्यानेच यंदा ओला दुष्काळ पडला व त्यामुळे शेतीचे नुकसान झाले असे लोक म्हणत. एखाद्या वर्षी भरघोस उत्पन्न मिळाले तर ते त्याच्याच कृपेने मिळाले असे म्हणत. तसे पाहता निसर्गावरच शेतकऱ्याचे जीवन अवलंबून असते त्यामुळे त्यांच्याबाबत हे विचार योग्य वाटतात. ही श्रद्धा योग्य वाटते. पण इतर व्यवहारात ते शक्‍य वाटत नाही. मनाला पटत नाही. प्रत्यक्षात राबायचे आपण आणि ते देवाला अर्पण करायचे हे कसे काय शक्‍य होईल? पण नेमके या मागचा हेतू जाणून घेणे गरजेचे आहे. यश मिळाले तर अहंकार वाढू नये व अपयश पदरी आले म्हणून नैराश्‍य येऊ नये ही यामागची खरी भूमिका आहे. नैराश्‍यामुळे मन खचते. आणि यशाचा अहंकार कधीकधी माणुसकीच विसरतो. कर्मत्यागामागची ही भूमिका जाणून घ्यायला हवी. तसे पाहता आपला सर्व व्यवहार हा देवाच्या कृपेनेच सुरू आहे. कारण श्‍वास थांबला तर सर्व थांबते. श्‍वास सुरू ठेवण्याची शक्ती आपल्यात नाही. ते चालविणारे दुसरे कोणीतरी आहे हे विसरता कामा नये. सद्‌गुरू त्यावरच तर नियंत्रण मिळवायला शिकवतात. तेच आत्मज्ञान हस्तगत करायला सांगतात. आत्मज्ञानी व्हायला सांगतात.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, November 15, 2010

क्षमा

हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।
जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ।।

दुष्टाला शासन हे व्हायलाच हवे. नाहीतर जगात शांतीच नांदणे कठीण होऊन बसेल. दुष्ट कृत्य करणाऱ्यावर वचक हा असायला हवा. पण दुष्टांच्या मनातील दुष्टपणाच काढून टाकता आला तर ! माणसांची मने बदलता आली पाहिजेत. कायद्याचा वचक हा हवाच पण दुष्टांना सुधारण्याची संधी देऊन क्षमाही करायला हवे. अनेक लोक लोभाने, लालसेने भरकटतात. वाट चुकतात. मनावर नियंत्रण न राहिल्यानेही चुका होतात. चुकीचे मार्ग पकडले जातात. पण त्यांच्या चुकांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. प्रत्येक गोष्ट ही कायद्याने सुटतेच असे नाही. काही गोष्टी तडजोडीने सोडविल्या जाऊ शकतात. चुकीला शासन हे व्हायलाच हवे. पण त्यांच्याकडून चूक का झाली, याचाही विचार व्हायला हवा. पुन्हा अशा चुका होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कारण या चुका इतरांकडूनही होऊ शकतात. यासाठी दुसऱ्यांकडून ही चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. असे प्रयत्न झाले तर, निश्‍चितच समाजात सुख शांती नांदेल. नुसते कायदे कडक करून किंवा त्यांच्या कडक अंमलबजावणीने सुख शांती नांदते असे नाही. एखाद्याने जर स्वतःवर हल्ला केला तर त्याच्यावर प्रती हल्ला करून प्रश्‍न सुटत नाही. तो हल्ला त्याने का केला याचा विचार व्हायला हवा. समाजातील आर्थिक असमानतेमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. नुसते कायदे करून हे प्रकार कमी होणार नाहीत. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा. ही आर्थिक असमानता कशामुळे निर्माण होते, यावर विचार व्हायला हवा. सर्वांना समान अधिकार कसे देता येईल हे पहायला हवे. सूर्य प्रकाशाचे वाटप करताना याला कमी, त्याला जास्त असा भेदभाव करत नाही. परिस्थितीनुसार प्रत्येकाला असा भेदभाव झाल्याचे वाटते. सद्‌गुरूही प्रत्येक भक्तावर असेच ज्ञाना
चा अखंड वर्षाव करत असतात. पण भक्ताला त्याच्या स्थितीनुसार भेदभाव वाटतो. सद्‌गुरू सर्वांना समान लेखतात. दुष्टांनाही ते क्षमा करतात. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा कसा काढता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. सुधारला तर तोही आत्मज्ञानी होऊ शकतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, November 12, 2010

अहिंसा

कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचंबैल केंसर । इया शंका ।।

माणसांच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते. नव्या पिढीत अस्थिर मनामुळे हिंसेचे प्रमाण वाढत आहे. दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या हिंसक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. समाजातील असमानताही यासाठी तितकीच कारणीभूत आहे. असमातेतून होणारे शोषणाने हिंसकवृत्ती बळावत आहे. पण या हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात करता येते. सात्त्विक विचारांची बैठक मनातील हिंसक प्रवृत्ती शांत करू शकते. यासाठी समाजात सात्त्विक वृत्ती वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे. पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली आहे असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्‍यक आहे. रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही इतक्‍या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये? यासाठी प्रयत्नच केला नाही तर कसे शक्‍य होईल ? भरकटलेली मने बदलायला हवीत. मने बदलूनच हिंसेवर विजय मिळवता येईल. भ्रष्टाचारी, गुंड वृत्तीच्या लोकांना शासन हे व्हायलाच हवे पण त्याबरोबर त्यांच्यातील दुष्टप्रवृत्तीही नष्ट करायला हवी. मनातील दुष्ट विचार नाहीसे झाले तर हिंसक घटना निश्‍चितच कमी होतील. समाजात सुख शांती नांदेल. साधनेसाठीही मन स्थिर असणे आवश्‍यक असते. अस्थिर मनाला अहिंसेच्या विचारांनी स्थिर करायला हवे.


राजेंद्र घोरपडे, पुणे.

Thursday, November 11, 2010

सात्त्विक भाव

परोपकारू न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।
न शके विकूं जोडले । स्फीतीसाठी ।।

प्रत्येकाला स्वतःची प्रगती व्हावी ही मनोमन इच्छा असते. प्रगती झाली तर त्याचा नावलौकिक वाढतो. पत वाढते. समाजात मान मिळतो. पण स्वतःच्या प्रगतीचा डांगोरा पिटणे योग्य नाही. दुसऱ्याला यातून चिडविणे योग्य नाही. दुसऱ्याची यातून निंदा नालस्ती होईल असे करणेही योग्य नाही. झालेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त करणे. त्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येणे शक्‍य आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. प्रगतीतून समाधान मिळते. शांती मिळते. ते समाधान, ती शांती कायमस्वरूपी टिकवून कशी ठेवता येईल हे पाहणे आवश्‍यक आहे. स्वतःच्या प्रगतीतून दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचीही वाच्यता करणे योग्य नाही. यामुळे दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. दुसऱ्याला दुःख होणार नाही याची काळची घ्यायला हवी. अनेक संतांच्या अशाच शिकवणी असतात. संतांच्या या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो. यासाठी संतांच्या उपदेशाचे आचरण करणे गरजेचे आहे. संतांच्या शिकवणीचा अभ्यास, चिंतन, मनन केले जावे. ज्ञानाचा गर्वही नसावा. सध्याच्या युगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. यामुळे तुमचे ज्ञान यामध्ये छुल्लक ठरू शकते. यासाठी शाश्‍वत ज्ञानाची ओढ मनाला लागायला हवी. त्याचा अभ्यास करायला हवा. या अभ्यासाचाही डांगोरा पिटाळणे योग्य नाही. डांगोरा पिटाळून मनाला समाधान मिळत नाही उलट यातून दुःखच मिळत राहते. साधनेसाठी मन समाधानी राहणे आवश्‍यक आहे. संतांच्या शिकवणीतून समाधान टिकवून कसे ठेवता येते याचा विचार करायला हवा. यातून सात्त्विक विचारांची बैठक उभी राहू शकते. समाधानी चित्तच साधनेत रमते. साधनेत बाधा येणार नाही यासाठी अंगात सात्त्विक भाव कसा जागृत होतो याचा अभ्यास करायला हवा. त्याचे आचरण करायला हवे. संतांच्या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे.

Wednesday, November 3, 2010

गुरुसेवा

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।।

प्रत्येक भक्त आत्मज्ञानी व्हावा, हीच सद्‌गुरुंची इच्छा असते. यादृष्टीने ते सतत भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. भक्तांच्या साधनेत येणारे अडथळे ते दूर करत असतात. अनेक समस्यांत गुरफटलेल्या भक्ताला ते आत्मज्ञानाची गोडी लावतात. भक्ताचीही तशी दृढ भक्ती असते. अनेक भक्त गुरूकृपेसाठी सतत सद्‌गुरुंची सेवा करत असतात. गुरूंनी दिलेल्या नियमांचे पालन करून दिलेल्या गुरूमंत्राची साधना ते करत असतात. काही भक्त तर यासाठी संसाराचाही त्याग करतात. सतत त्यांना सद्‌गुरू सेवेचाच ध्यास असतो. ते ज्ञान गुरुकृपेने प्राप्त होते असा त्यांचा दृढ विश्‍वास असतो. यासाठी गुरूसेवेत ते त्यांचा जन्म ओवाळून टाकतात. जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते. बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र नाहीसे करते अशा या आत्मज्ञानाची ओढ त्यांना सतत लागलेली असते. काहीजण संसारात राहूनही गुरुसेवा हीच खरी सेवा मानून आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. संसारातील प्रत्येक गोष्ट ही गुरूंच्या कृपेने मिळते अशी त्यांची धारणा असते. इतकी दृढ श्रद्धा, भक्ती त्यांची गुरुप्रती असते. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुसेवा हाच सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहून गुरूंची सर्व कामे करून त्यांची सेवा केली जात होती. गुरूंच्या घरी राहूनच ज्ञान प्राप्त केले जात होते. सध्याच्या आधुनिक युगात असे आश्रम आणि असे गुरू फारच क्वचित पाहायला मिळतात. अशी गुरुसेवा आता दुर्मिळ झाली आहे. कारण तसे योग्य आत्मज्ञानी गुरूही भेटणे आवश्‍यक आहे. पण यामुळे नाराज होण्याचे काही कारण नाही. आयुष्यातील प्रत्येकक्षणी गुरूंचे स्मरण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे. कारण चराचरांत गुरूंचे अस्तित्व आहे. त्यांच्या नित्य स्मरणानेही, नित्य भक्तीनेही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरुंचे नित्य स्मरण हीच खरी गुरुसेवा आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे.

Saturday, October 23, 2010

मनाची चंचलता

एहींचि पांचे द्वारी । ज्ञानासिं धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारी । भांबावे पशु ।।

मनाला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर राहिले तरच साधना होते. मन नेमके भरकटते कशामुळे ? आपणास जेवताना अनेक पदार्थ समोर ठेवले तर हे खाऊ का ते खाऊ असे होते. मन चलबिचल होते. एकदम सगळे पदार्थ पाहून काही वेळेला खाण्याची इच्छाच राहात नाही. असे आपणास कित्येकदा होते. कुरणातील हिरवागार चारा पाहून जनावरेही भांबावतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या ज्ञानेंद्रियावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. साधनेच्या काळात आपल्यामध्ये सूक्ष्म विचार करण्याची वृत्ती निर्माण होते. अति खोलवर एखाद्या गोष्टीचा विचार होतो. दूरचे आवाच स्पष्ट ऐकू येतात. दूरचे वासही स्पष्ट समजतात. इतकी ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. दूरच्या वासाने मन विचलित होऊ नये यासाठी काही जण साधना करण्यापूर्वी उदबत्ती लावतात किंवा काही जण सुगंधी अत्तर फवारतात. सुगंधामुळे मनाला मोहकता येते. मन प्रसन्न राहते. असे अनेक उपाय साधना करताना योजले जातात. हेतू एकच असतो की मन स्थिर राहावे. मन चंचल होऊ नये. पण मन भरकटते म्हणून साधना सोडून देणे योग्य नाही. आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले असे म्हटले जाते. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. हे विचारात घेऊन मनात विचारच उत्पन्न होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा. गुरूमंत्रावर मन स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा. हळूहळू साधनेने हे शक्‍य होते. फक्त यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, October 20, 2010

आत्मज्ञानाचे फळ

नातरी विधीचिये वाफे । सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मविजे ।।

शेतात कोणती पिके घ्यायची हे शेतकऱ्याला आधी ठरवावे लागते. योग्यवेळी योग्य पिके घेतली तरच भरपूर उत्पादन मिळते. बाजारभावानुसारही पिकांचे नियोजन करावे लागते. तरच नफा मिळतो. पुढील काळातील गरजा ओळखून पिकांची निवड करावी लागते. सध्या शेतीचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्राने शेती केली जात आहे. अधिक उत्पादनासाठी नव्या सुधारित जातींची निवड केली जात आहे. पण योग्य जमिनीत योग्य तीच पिके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. हे जे ठरले आहेत त्यानुसारच शेती केली तर ती फायदेशीर ठरते. अन्यथा शेतीत मोठा फटका बसू शकतो. मेहनत करूनही ती व्यर्थ जाते. अध्यात्मातही तसेच आहे. येथेही नियमांचे पालन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची म्हटले की त्यासाठी असणारे नियम हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरूमंत्राची) पेरणी होणे आवश्‍यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील. पेरलेल्या गुरूमंत्राला साधनेचे खत पाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Saturday, October 16, 2010

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञु

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जें निरूतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ।।

शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. म्हणजे देहाला क्षेत्र म्हटले जाते. या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे, त्याला ज्ञान असे समजावे. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात आत्मा आला आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा देह हा पंचमहाभूतापासून बनला आहे. फक्त प्रत्येकाच्या देहाची रचना वेगवेगळी आहे. कुणाचा देह गोरा आहे तर कुणाचा काळा आहे. कोण दिसायला कुरूप आहे. तर कोण दिसायला अति सुंदर असते. हे सर्व बाह्य रंग आहेत. पण या देहात असणारा आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. तो एक आहे. आत्मा हा अमर आहे. देह नाशवंत आहे. वयोमानानुसार देहाची स्थिती बदलते. पण आत्मा बदलत नाही. जन्माच्यावेळी तो देहात येतो. मृत्यूवेळी तो देहातून मुक्त होतो. आत्माचे हे ज्ञान ज्याला अवगत झाले तो आत्मज्ञानी. नव्या युगात अनेक शोध लागले आहेत. पण अद्याप आत्मा देहात येतो कसा आणि जातो कसा. हे कोणी शोधू शकले नाही. त्याला पकडून ठेवणे कोणाला अद्याप जमले नाही. ते मानवाच्या हातात नाही. ती हाताबाहेरची गोष्ट आहे. याचाच अर्थ येथे देवाचे अस्तित्व आहे. हे देवत्व प्रत्येक सजिवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच प्रत्येकजण आत्मज्ञानी होऊ शकतो. आणि प्रत्येकाने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र जाणून घ्यायला हवे. हे शास्त्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे. म्हणूनच सर्व धर्म सारखेच आहेत. सर्वांचा हेतू एकच आहे. फक्त प्रत्येक धर्माच्या रीती वेगळ्या आहेत. वाटा वेगळ्या आहेत. तरी शेवटी त्या एकाच ठिकाणी जातात. आत्मज्ञानी होणे हाच सर्वांचा हेतू आहे.



राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, October 14, 2010

श्रीचरण

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरुंचे ।।

इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत उभी राहू शकते. अन्यथा कोसळते. मजबूत पायामुळे इमारतीला स्थैर्य प्राप्त होते. अध्यात्माचा पायाही भक्कम असावा लागतो. तरच पुढची प्रगती साधता येते. यासाठी सद्‌गुरू चरणी नतमस्तक होणे गरजेचे आहे. याचाच अर्थ मनातील अहंकार, मीपणा काढून टाकणे असा आहे. अहंकार, क्रोध, लोभ मनात असतील तर अध्यात्माच्या प्रगतीचा पाया खचतो. नुसते सद्‌गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले म्हणजे झाले असे नाही. तर यामागची भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे. आत्मज्ञान प्रातीसाठीच्या पायऱ्या चढताना अहंकार, लोभ, मीपणा, क्रोध यांचा त्याग केला तरच पुढे प्रगती साधता येते. अन्यथा पाया कमकुवत झाल्याने प्रगतीचा जीन कोसळतो. अनेक विठ्ठल मंदिरात तसेच आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर मंदिरात विना घेऊन नामस्मरण करण्याची प्रथा आहे. हा विना दुसऱ्याकडून घेताना त्याच्या प्रथम पाया पडावे लागते. ही पद्धत आहे. मग एखाद्या लहान मुलाकडूनही विना घेताना त्याच्या पाया पडावे लागते. हा लहान, हा मोठा असा भेदभाव येथे नाही. येथे उच्च नीच हा भावही नाही. गरीब श्रीमंत असाही भेदभाव येथे नाही. यातून समानता येथे नांदावी हा उद्देश आहे. सर्वांना समान हक्क आहे. सद्‌गुरुंच्या ठिकाणी सर्वांना समान संधी आहे. प्रत्येकजण आत्मज्ञानी होऊ शकतो, हा संदेश यातून द्यायचा आहे. पण आत्मज्ञानी होण्यासाठी सद्‌गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. सध्या अनेक पुस्तकी पंडित गुरू आहेत. पण ते आत्मज्ञानी असतील, तरच ते खरे गुरू अन्यथा ते केवळ पंडित आहेत. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आत्मरूपी गुरूंचे स्मरण सतत करायला हवे. सर्व विद्या त्यांच्यात एकवटलेल्या असतात. अशा या सद्‌गुरूंच्या चरणी लीन व्हावे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, October 13, 2010

तेची भक्त तेची योगी

पार्था या जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तयालागी । अखंड मज ।।

सध्या अध्यात्मावर फारशी चर्चा करताना कोणी दिसत नाही. फारसा रस कोणी दाखवतही नाही. पण देवदर्शनासाठी सगळीकडे रांगांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. गणेश उत्सवात गणपती पाहण्यासाठी गर्दी केली जाते. नवरात्र आले की देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. इतरही अनेक मंदिरात दर्शनासाठी रांगांच्या रांगा पाहायला मिळतात. पंढरीत तर नेहमीच दर्शनासाठी मोठी रांग असते. आळंदीतही गर्दी होते. दर्शन मिळावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. कोणी केवळ मुख दर्शन घेऊनच समाधानी होतात. तर कोणी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. दर्शन कोठूनही घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचते. फक्त मनापासून दर्शन करायला हवे. मनातूनही दर्शन घडते. देवाची ओढ असणाऱ्यांना देव स्वप्नातही येऊन दर्शन देतात. फक्त दर्शनाची ओढ असावी लागते. सद्‌गुरूंचे सतत स्मरण करणारे भक्त त्यांना अधिक प्रिय असतात. आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, October 8, 2010

हे विश्‍वची माझे घर

हे विश्‍वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।

जुन्या पिढीतील लोक व्यापक विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारावर अध्यात्माचा पगडा होता. त्यामुळे त्यांच्या आचार-विचारात दूरदृष्टीपणा, व्यापकता होती. सध्याच्या पिढीत इतकी व्यापकता दिसून येत नाही. संकुचित विचारसरणी सध्या वाढीस लागली आहे. पण त्यामुळे प्रगतीही संकुचित होत आहे. हे लक्षात घ्यायला हवे. सध्या जागतिकीकरणाचे वारे आहे. याचा लाभ आपण उठवायला हवा. विचार संकुचित न ठेवता त्यामध्ये व्यापकता आणायला हवी. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आहे. हे विश्‍व महाकाय आहे असे वाटत नाहीये. जुन्या पिढीतील लोकांनी विश्‍वची माझे घर असे समजून विकास घडवला. फक्त स्वतः पुरता विचार त्यांनी केला नाही. संपूर्ण समाजाचा, भागाचा, प्रांताचा विकास करायचा या ध्येयाने त्यांनी काम केले. त्यामुळे कोणी महात्मा झाले, तर कोणी कर्मवीर झाले, तर कोणी शिक्षण महर्षी झाले, तर कोणी सहकार महर्षी झाले. नव्या पिढीने त्यांची ही विचारसरणी आत्मसात करायला हवी. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' असा विचार ठेवून त्यांनी सहकार क्षेत्र उभे केले. ते स्वतः कारखाना उभा करून मोठे कारखानदार होऊ शकत होते. पण त्यांनी स्वतः पुरते कधी पाहिले नाही. इतरांचाही विकास त्यांनी पाहिला. अनेक उद्योग, कारखाने सहकारातून उभे राहिले. पण सध्या या संस्थांमध्ये संकुचित विचारसरणीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी स्वतःचा विकास सुरू केला आहे. यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. केवळ स्वतःचा फायदा पाहणाऱ्या या लोकांमुळेच सहकाराचा स्वाहाकार झाला आहे. यासाठी ही विचारसरणी बदलायला हवी. सर्वांचा विकास साधणारे विचार जोपासायला हवेत. संत महात्मांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल तर हा विचार आत्मसात करायला हवा. विश्‍वची माझे घर समजूनच विकास साधायला हवा.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, October 6, 2010

दूरदृष्टी

व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ।।

जुन्या पिढीतील लोकांमध्ये दूरदृष्टी अधिक होती. सध्याच्या पिढीत तितकीशी दूरदृष्टी दिसून येत नाही. पूर्वी लोकांवर अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीचा मोठा पगडा होता. या संस्कृतीतच मुळात दूरदृष्टीचा विचार मांडला गेला आहे. अमेरिकेला दूरदृष्टी अधिक आहे असे म्हटले जाते. त्यामुळे ते आज प्रगत आहेत. असेही सांगितले जाते. पण प्रत्यक्षात तेथे सुरू असलेल्या मंदीच्या बातम्या वाचल्यानंतर असे वाटते की, त्यांनी शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केले पण त्याच्या वापरात दूरदृष्टीचा अभाव होता असे मानावेच लागेल. कदाचित मी म्हटलेले चूकही असेल, पण सध्या तेथे मंदी आहे हे खरे आहे. म्हणजे त्यांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे हे निश्‍चित. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दूरदृष्टी असणारे अनेक थोर नेते होते, यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. दूरदृष्टी असणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे विकासाला मोठी चालना मिळाली. देशाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. संतांप्रमाणेच या लोकप्रतिनिधीमध्ये त्यागीवृत्ती होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला. पण आताच्या काळातील तरुणांत, लोकप्रतिनिधीमध्ये अशी त्यागीवृत्ती नाही. जुन्या पिढीतील लोकप्रतिनिधीप्रमाणे त्यागीवृत्ती असणारे, दूरदृष्टी असणारे लोकप्रतिनिधी आता क्वचितच पाहायला मिळतात. आणि असले तरी सध्याच्या राजकारणात त्यांचा निभाव लागणे तसे कठीणच वाटते. मुळात ते सध्याच्या राजकारणात उतरण्यास नापसंती दर्शवितात. हे ही तितकेच खरे आहे. इतका काळ बदलला आहे. पण देशाच्या विकासासाठी आणि सार्वभौमत्वासाठी नव्यापिढीत दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाह
ी दूरदृष्टी असणारे भक्त अधिक प्रिय असतात. निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थी देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, निरहंकारी असा भक्त सद्‌गुरुंना अधिक जवळचा वाटतो. असा भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो. भौतिक विकासातही अशा व्यक्ती पुढे असतात. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा अनेकांना होतो. सध्याच्या राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे. तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल राहील.



राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, October 5, 2010

फलत्याग

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ।।

फळाची आशा न ठेवता कर्म करायला हवे. सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि संस्कृतीमध्ये हे विचार पटणे जरा कठीणच वाटते. कारण सध्याच्या काळात कोणतेही काम हे फळाची अपेक्षा ठेवूनच केले जाते. पगारवाढ मिळावी. पदोन्नती व्हावी. वरचे पद मिळावे. ही अपेक्षा ठेवूनच आपण काम करत असतो. देशातील कामाच्या अनुभवावर परदेशात मोठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी अशा अनेक फळांची अपेक्षा असते. यासाठीच आपण कर्म करत असतो. अधिक नफा मिळावा या हेतूने व्यापारी काम करत असतो. सध्याच्या काळात तरी सर्वत्र हेच सुरू आहे. फळाच्या आशेनेच प्रगती होत असल्याचे अनेकजण मानतात. यामुळे नव्यापिढीला फलत्याग हा विचार रुजणे जरा कठीण वाटते. पण फळाचा त्याग करूनच कर्म करायला हवे. तसे पाहता ही त्यागी वृत्ती प्रत्येकामध्ये असते. ज्यांच्यामध्ये ही त्यागी वृत्ती नसते, तो कर्मातून योग्य लाभ मिळाला नाहीतर निराश होतो. यातून तो भरकटतो. आत्महत्या अशा निराशेतूनच होत आहेत. पगारवाढ नाही, योग्य पैसा मिळत नाही, उत्पन्नात घट झाली, मोठा तोटा झाला, पदोन्नती मिळाली नाही. अशा कारणाने निराशा येते. मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपल्या इच्छा, आकांक्षा मर्यादित ठेवाव्यात. यातून नैराश्‍य येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तर फलत्याग हा सोपा मार्ग आहे. फलत्यागातूनच शांती, समाधान मिळते. आध्यात्मिक साधना करतानाही फळाची आशा ठेवू नये. साधना करत राहावे. यातूनच पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत करता येते.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, October 3, 2010

श्रेष्ठ भक्त

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानी ।।

संतांकडे अनेकजण जात असतात. प्रत्येकाचा भक्तीचा, श्रद्धेचा मार्ग वेगळा असतो. कोण स्वतःच्या घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संतांकडे जात असतो. तर कोण विविध कामे मिळावीत या आशेने जात असतो. सद्‌गुरुंच्या दर्शनाने आपले कष्ट दूर होतात. समस्या सुटतात असा त्यांचा समज असतो. सद्‌गुरुंचे उपदेश ते घेत असतात. यामुळे त्यांची प्रगती होते. साहजिकच भक्ती दृढ होते. विश्‍वास वाढतो. सद्‌गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्या ही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायचा याबाबत मागदर्शनही करीत असतात. पण सद्‌गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्‍ती दृढ व्हावी हा असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिक प्रगतीही आवश्‍यक आहे. संसार आणि परमार्थ एकाच वेळी करत असताना भक्ताची भौतिक प्रगती असेल, तरच त्याचे मन अध्यात्मात रमेल हे सद्‌गुरुंना माहीत असते. पण अनेक भक्तांचा तसेच व्यक्तींचा याबाबत गैरसमज असतो. अनेक व्यक्ती या भौतिक सुखासाठीच सद्‌गुरुंचा वापर करून घेतात. अशा वेळी त्यांच्यातील अहंकार जागृत झाला तर मात्र भक्ती संपते. यासाठी सद्‌गुरू भक्ताला भौतिक प्रगतीसाठी मदत का करतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. सद्‌गुरुंचा श्रेष्ठ भक्त कसे होता येते याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. सद्‌गुरू श्रेष्ठ भक्त कोणास समजतात हे समजून घ्यायलाच हवे. सद्‌गुरुंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्ययुक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्‌गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्‌गुरू समजतात. जे भक्त सद्‌गुरूंना आपला आत्मभाव देतात. त्यांनाच सद्‌गुरू श्रेष्ठ भक्त मानतात. यासाठी सद्‌गुरूंच्याकडे आत्मज्ञानी होण्यासाठी जावे. भौतिक प्रगतीसाठी सद्‌गुरुंचा वापर करणे योग्य नाही. आध्यात्मिक प्रगतीसाठीच सद्‌
गुरू आहेत.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, October 1, 2010

मऱ्हाठियेचां नगरीं

मऱ्हाठियेचां नगरीं

मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखचिवरी । हों देई या जगा ।।

सध्या मराठी भाषा वापराचा आग्रह धरला जात आहे. कदाचित अशा व्यक्तींना मराठी भाषा लुप्त पावते की काय याची भीती वाटत असावी. जागतिकीकरणामुळे अनेक प्रांतातील लोक महाराष्ट्रात आले, तसे महाराष्ट्रातील लोकही परप्रांतात गेले. पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. कारण मराठी माणसाला घर सुटत नाही. महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करण्याची त्याच्या मनाची तयारी नाही. यामुळे मराठी माणसाचे स्थलांतराचे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात सध्या परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये लोक मराठी ऐवजी हिंदीच अधिक बोलतात. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. परप्रांतीयांच्या खिचडीने हिंदीचा वापर वाढत आहे. मराठी हळूहळू मागे पडत आहे. कदाचित यामुळे मराठी लुप्त होईल की काय अशी चिंता व्यक्त केली जात असावी. पण खरे पाहता कोणत्याही भाषेचा प्रभाव आणि वापर हा त्यामध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यावर अवलंबून असतो. चांगल्या साहित्याच्या निर्मितीने साहजिकच प्रभाव वाढतो. भाषेची लोकप्रियताही वाढते. वापरही वाढतो. मराठी मागे पडत आहे कारण यामध्ये तशा तोडीच्या साहित्याची निर्मिती केली जात नाही, हे परखड सत्य आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरी ग्रथांने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. भाषेचा वापर कमी झाल्याचे पाहून भीतीने इतरांना त्रास देणे ही मराठी संस्कृती निश्‍चितच नाही. याचे राजकारण करणे हे यापेक्षाही वाईट. मराठी भाषा लुप्त होईल अशी चिंता करणाऱ्यांनी लोकांची वाचनाची आवड वाढेल अशा उत्तम दर्जाच्या साहित्याची निर्
मिती करावी. अमरत्व प्राप्त झालेली भाषा लुप्त होईल ही चिंता करणे व्यर्थ आहे. मराठी भाषा अमर आहे. मनाला चिरंतन स्फूर्ती देणारी भाषा आहे. हे या भाषेचे वैशिष्ठ जपायला हवे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, September 29, 2010

संजीवन समाधी

सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधे निजविसी । बुझाऊनी ।।

सद्‌गुरू समाधिस्थ झाले तरी ते भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची आध्यात्मिक प्रगती साधण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन असते असे मानले जाते. संतांच्या अनेक लीला सांगितल्या जातात. अनेक भक्तगण त्यांचे अनुभव नेहमीच सांगत असतात. समाधिस्थ झाल्यानंतरही सद्‌गुरू भक्तांना अनुभव देतात. हे नव्या पिढीला पटणे जरा कठीणच वाटते. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. असे ही नवीपिढी समजते. असे कधी असणे शक्‍यच नाही, असे त्यांचे मत असते. मग कोणत्याही देवळात गेल्यावर मनाला प्रसन्न वाटते असे का म्हणता? पूर्वीच्या काळी जे तंटे वर्षानुवर्षे चावडीवर सुटत नसत, ते देवळात झालेल्या एका बैठकीत सुटल्याची अनेक उदाहरणे देता येतील. हे कसे शक्‍य आहे. असा चमत्कार घडलाच कसा? याचे आश्‍चर्यही वाटते. मंदिर, संतांची समाधी स्थळे या पवित्र जागा आहेत. या जागांची वैशिष्ठे विचारात घ्यायला हवीत. संतांच्या समाधीच्या जागेतील वातावरणात विशिष्ट लहरींचा वावर असतो. त्या लहरीतून मनाला आनंद, उत्साह प्राप्त होतो. या वातावरणात आल्यानंतर या लहरींची लय, तो नाद आपल्या शरीरात प्रवेश करतो. यामुळेच हे बदल घडतात. साधना म्हणजे तरी काय? "सो..हम...सो..हम..' ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना? ही लय ज्याला सापडली, पकडता आली तोच खरा आत्मज्ञानी. सद्‌गुरू ही लय भक्ताला पकडायला शिकवतात. त्यांच्या लयात आपली लय मिसळायला हवी. ती मिसळावी यासाठीच तर सगळे प्रयत्न सुरू असतात. एकदा का तो सूर, तो नाद, ती लय सापडली की मग पुन्हा विसरणे नाही. पुन्हा ती सुटून जाणे शक्‍य नाही. समाधिस्थ झाले तरी ती लय सुटत नाही. म्हणूनच तर भक्तांना अनुभव येत राहतात. संत, सद्‌गुरूची समाधी संजीवन आहे हे यासाठीच तर म्हटले जाते. ते भक्ताला त्यांच्या लयीत ओढण्याचा प्रयत्न करतात. भक्ताला आत्
मज्ञानी करण्याचा प्रयत्न करतात.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, September 28, 2010

आनंदाचा अखंड झरा

जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनव्रत आनंदे । वर्षतिये ।।

सद्‌गुरुंचे अंतःकरण शुद्ध आहे. ते उदार आहेत. गुरुकृपेने त्यांच्यातून अखंड आनंदाचा झरा ओसंडून वाहत आहे. अशा या सद्‌गुरूंना माझा नमस्कार. सद्‌गुरुंच्या कृपार्शिवादाने आत्मज्ञान प्राप्तीसाठीची ओढ वाढत आहे. कारण त्यांच्या सहवासात आल्यानंतर मनातील मरगळ दूर होते. त्यांच्या प्रेमाने, त्यांच्यातून ओसंडून वाहणाऱ्या आनंदाच्या झऱ्याने मनाला एक वेगळीच स्फूर्ती चढते. शरीरात तेज संचारते. आळंदीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भेटीला गेल्यानंतर दर्शनासाठी नेहमीच मोठी रांग असते. तेव्हा इतका वेळ त्या रांगेत आपण उभे राहू शकू का? असा प्रश्‍न कधीच पडत नाही. पाय दुखतील का? याचीही चिंता वाटत नाही. संजीवन समाधीच्या दर्शनाच्या ओढीने हा थकवा दूर होतो. कारण सद्‌गुरुंच्या सहवासात अखंड आनंदाचा झरा वाहत असतो. हीच तर खरी अनुभूती आहे.
मोटारगाडीतील इंधन असेल तरच ती धावते. त्यातील इंधन संपणार नाही, मोटारगाडी बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठी ठराविक कालावधीने सतत इंधनाची टाकी भरावी लागते. तसे अनेक भक्तजन या देहाचा गाडा अखंड कार्यरत राहण्यासाठी ठराविक कालावधीने आळंदीला जातात. गाडीला जसे इंधन लागते तसे या भक्तांना सद्‌गुरुंचा सहवास लागतो. त्यांच्या सहवासात या भक्तांच्या देहाच्या गाड्याला इंधन मिळते. आनंदाच्या डोहातून हे इंधन त्यांना मिळते. याने त्यांना नवी स्फूर्ती मिळते. कामाला नवा उत्साह येतो. काम करण्याची हुरूप वाढते. यासाठी ते काही ठराविक कालावधीने ते आळंदीच्या वाऱ्या करतात. हीच त्यांची भक्ती आहे. श्रद्धा आहे.
श्री ज्ञानेश्‍वरीच्या नियमित वाचनातून आत्मज्ञानाची ओढ वाढत राहते. मनाला आनंद मिळून साधनेला स्फूर्ती मिळते. पंढरीची वारीही याचसाठी केली जाते. वारीच्या आनंदात डुंबल्याने मनाची सगळी मरगळ दूर होते. सगळ्या चिंता दूर पळतात. हा आनंदाचा अखंड वाहणारा झरा आहे. त्यातील गोड पाणी पिण्याची इच्छा मात्र मनात असावी लागते. या गोडीने अध्यात्माची आवड हळूहळू वाढते. श्री ज्ञानेश्‍वरी वाचनाची गोडी लागते. सद्‌गुरुंचे प्रेम वाढते. मग द्वैत आपोआपच दूर होते.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, September 27, 2010

अहंकार

तसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।
अहंकार लोपीं अवधारी । द्वैत जाय ।।

अहंकाराने अनेक मोठमोठ्या व्यक्तींना पराभव पत्कारावा लागला आहे. कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो. कोणाला पैशाचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो. अहंकाराने अनेकांना दुःख पोहोचते. पण अहंकारी व्यक्तींना याची साधी कल्पनाही होत नाही. पैशाचा अहंकार खूपच वाईट. मुळात पैसा हे द्रव्य नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. अहंकाराने अंध झालेल्या व्यक्तींना याची जाणीव नसते. पैसा आहे तोपर्यंत अशा व्यक्तींना मानसन्मान मिळतो. मानसन्मान पैशाने विकत घेता येतो. याचाही अहंकार अनेकांना असतो. आजकाल पुरस्कारही पैशाने विकत मिळत आहेत. पण अशा विकल्या जाणाऱ्या पुरस्कारांना फारसे समाजात कोणी मान देत नाही याची जाणीव त्यांना नसते. पैसा संपला की सर्व संपते. सर्व मानसन्मान मग गळून पडतात. तेव्हा त्यांना भगवंताची आठवण होते.
काहींना माझ्यासारखे दुसरा कोणी ज्ञानी या जगात नाही. असा अहंकार असतो. पण खऱ्या ज्ञानाची त्यांना ओळखच नसते. असे विद्वान जेव्हा एखाद्या आत्मज्ञानाच्या सहवासात येतात तेव्हा त्यांचा अहंकार सरतो. आपल्यापेक्षा कोणीतरी ज्ञानी आहे. आपल्या मनातले ओळखणारा मनकवडा कोणीतरी आहे. याची जाणीव त्यांना होते. तेव्हा असे विद्वान आत्मज्ञानी संतांच्या चरणी लीन होतात. असे लीन झालेले विद्वान, अहंकाराचा लोप पावलेले विद्वान मग सद्‌गुरुंच्या कृपार्शिवादाने आत्मज्ञानी होतात.
सद्‌गुरुंच्या साक्षात्काराने अनेकांचा अहंकार गळून पडतो. साक्षात्कार म्हणजे काय? आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार. मनुष्य अनुभवातूनच शिकत आला आहे. नोकरीमध्येही अनुभवाला प्राधान्य दिले जाते. किती वर्षांचा अनुभव तुम्हाला आहे. असे प्रथम विचारले जाते. त्यानुसार तुमची पात्रता ठरवली जाते. आत्मज्ञानाचे अनुभव सद्‌गुरू सतत देत राहतात. यातून ते साधकाची आध्यात्मिक प्रगती साधतात. हळूहळू साधकातील अहंकार मीपणा लोप पावतो व साधकही आत्मज्ञानी होतो.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, September 24, 2010

विश्‍वात्मक रूपडे

तरि विश्‍वात्मक रूपडे । जे दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभुही परि न जोडे । तपें करितां ।।

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन घडविले. अनेक तपे करूनही शंकरालाही हे विश्‍वरूप प्राप्त होत नाही. यातून असे स्पष्ट होते की विश्‍वाचे आर्त जाणण्यासाठी योगमार्गापेक्षा भक्तिमार्ग हा सहज व सोपा मार्ग आहे. यामध्ये कोणतेही कष्ट पडत नाहीत. अगदी सहजपणे हे साध्य होते. संसाराचा त्याग करावा लागत नाही. सध्याच्या बदलत्या युगातही हा मार्ग उपयोगी आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आता जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रदूषणात वाढ झाली आहे. चंगळवादी संस्कृतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. अशा काळात अध्यात्माच्या या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. याची आवड असणाऱ्यांची, ओढ असणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. लोकांमध्ये धार्मिक वृत्ती जरूर आहे. पण सध्या अंधश्रद्धा आणि अज्ञानाने लोक भरकटलेले आहे. अध्यात्माची वाट चुकलेले आहेत. भक्ती म्हणजे काय हेच ते विसरले आहेत. चंगळवादाने ते अधिकच अज्ञानी होत चालले आहेत. अध्यात्माचा मूळ उद्देशापासून ते दूर चालले आहेत. सध्याचे सणवार, उत्सव यामध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे. त्यामध्ये अध्यात्माचे अधिष्ठानच नसते. अशा या परिस्थितीत विश्‍वरूपाचे दर्शन कसे घडू शकेल. असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. पण भक्ती जर खरी असेल तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणजे आत्मा आहे. याची अनुभूती यायला वेळ लागणार नाही. तो चराचरांत सामावला आहे. तो सर्वत्र आहे. अविनाशी आहे. याची अनुभूती हेच विश्‍वरूप दर्शन आहे. केवळ भक्तीने हे विश्‍वरूप दर्शन सहज शक्‍य आहे. यासाठी अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा उजेड पडणे गरजेचे आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, September 23, 2010

अमृताचा समुद्र

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ।।

साधना करताना अनेक अडचणी येत असतात. कधी वेळच मिळत नाही. तर कधी वेळ मिळाला तर मनात इच्छाच होत नाही. मनात घोळणाऱ्या अनेक विचारांना साधनेला बसण्याचे सामर्थच होत नाही. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? अशा बेचैन अवस्थेत प्रत्येक साधक असतो. साधनेसाठी बेचैन असणे हे देखील चांगले आहे. या ना त्या कारणाने सद्‌गुरूचे स्मरण तरी राहते. पण साधना सोडून देणे हे योग्य नाही. मनाच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करणे. साधनेसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. साधनेचे अनेक फायदे आपणास माहीत असूनही या धकाधकीच्या जीवनामुळे याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे सध्या कामाच्या व्यस्ततेत साधनेसाठी वेळे देणे हे एक मोठे आव्हानच आहे. पण हे आव्हान आपणास स्वीकारावेच लागेल. साधनेचे हे अमृत प्यायलाच हवे. अमृताच्या या महासागरात आपण डुंबायलाच हवे. साधनेच्या सुरवातीच्या काळात पायात मुंग्या येतात. शरीर जड होते. पण या गोष्टींची भीती बाळगू नये. अहो, अमृताच्या समुद्रात उडी घेतल्यावर मरणाला कशाला भ्यायचे. उलट साधनेच्या प्रगतीतील या पायऱ्या आहेत असे समजून उत्साहाने साधना वाढवायला हवी. मुंग्या हळूहळू कमी होतील. साधनेच्या काळात शरीरात अनेक हालचाली होतात. पित्त जळते. पण याचा फायदा होतो. पित्त जळाल्याने आपली भूक वाढते. चेहऱ्यावरील तेज वाढते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहते. शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती सुधारते. हे फायदे विचारात घ्यायला हवेत व साधनेच्या काळात वाटणारी मनातील भीती दूर करायला हवी. साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते. पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी? इथेतर धैर्याने डुंबायला हवे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, September 21, 2010

कैसें अनुग्रहाचे करणे

कैसें अनुग्रहांचे करणें । पार्थाचे पाहणें आणि न पाहणे ।
तयाहीसकट नारायणें । व्यापूनि घातले ।।

आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर गुरुकृपा हवीच. यासाठी गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. भक्ताची योग्य प्रगती पाहूनच सद्‌गुरू भक्तास अनुग्रह देतात. अनुग्रह देतात म्हणजे नेमके काय करतात? हा प्रत्येक भक्ताचा उत्सुकतेचा विषय असतो. सद्‌गुरू भक्ताची भक्ती पाहतात. आत्मज्ञानी असल्याने भक्ताच्या आवडीनिवडी ते ओळखतात. त्यांची भक्तीची ओढ पाहून योग्य गुरुमंत्र ते देतात. यालाच अनुग्रह झाला असे म्हटले जाते. नुसता अनुग्रह मिळून उपयोग नाही. गुरुकृपाही हवीच. गुरूमंत्राच्या नियमित जपाने, साधनेने आध्यात्मिक प्रगतीची वाट सुकर होते. "गुरूविन कोण दाखवील वाट' असे हे यासाठीच म्हटले गेले आहे. ते यासाठीच. गुरुंच्याकृपेने हे सहज साध्य होते. यासाठी वणवण भटकावे लागत नाही. अनुग्रह ही आत्मज्ञान प्रातीसाठीची पहिली पायरी आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने भक्त या पायऱ्या सहज पार करतो. शेवटी या नराचा नारायण होतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, September 17, 2010

योगियांचे समाधिधन

हा योगियांचे समाधिधन । कीं होऊनी ठेलें पार्था अधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ।।

रणभूमीवर मनाने खचलेल्या, युद्ध न करण्याच्या मनःस्थितीत असलेल्या अर्जुनाला भगवान कृष्ण युद्ध करण्यासाठी प्रेरित करत आहेत. अर्जुनाची मनःस्थिती सुधारण्यासाठी भगवंताना स्वतःचे विश्‍वरूप दाखवावे लागले. हे सर्व प्रसंग पाहण्याचे भाग्य भगवंताच्या कृपेने संजयाला मिळाले. आणि याचे सर्व वर्णन संजय अंध धृतराष्ट्राला सांगत आहे. पण धृतराष्ट्रावर याचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे शेवटी कौरव कुळाचा सर्वनाश झाला. यासाठी नुसती सद्‌गुरुंची कृपा असून चालत यासाठी योग्य दृष्टी असावी लागते. भगवंत अर्जुनासाठी विश्‍वरूपमय झाले. यासाठी अर्जुनासारखी भक्ती असावी लागते. दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. पण हे कृत्य ते आपल्या परमभक्ताकडून करवून घेऊ इच्छित आहेत. यासाठी केवळ निमित्तमात्र होण्याचे आवाहन भगवंत अर्जुनास करत आहेत. सध्याच्या युगात सद्‌गुरू दृष्ट दुर्जनांच्या मनातील दुष्टपणा काढून प्रेमाची शिकवण देऊ इच्छित आहेत. यासाठी अर्जुनासारखे परमभक्त होण्याचे आवाहन ते करत आहेत. जगात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आत्मज्ञानी सद्‌गुरू नेहमीच प्रयत्नशील असतात. हाच तर खरा त्यांचा धर्म आहे. हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे. यासाठी सद्‌गुरू आपणास आत्मज्ञानाचा ठेवा कसा मिळवायचा हे सांगत आहेत. तो मिळविण्यासाठीच युद्ध करण्याची प्रेरणा ते देत आहेत. अपयशाने दुःखी कष्टी होऊन, मनाने खचल्यानंतर अनेक जण अध्यात्माकडे वळतात. तसा ते योग्य मार्ग स्वीकारतात यात शंकाच नाही. पण धृतराष्ट्रासारखी दृष्टी त्यांना नसावी. अर्जुनासारखी वेध घेणारी नजर त्यांच्याकडे असावी. खऱ्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याचे सामर्थ त्यांच्यात असावे लागते. तरच ते या अपयशातून योग्य मार्गावर येतील. सद्‌गुरू योगीरूपाने त्यांना योग्य वाटेवर आणतात. अर्जुनासारखा भक्त भेटला तर
ते त्याला आपल्या पदावर बसविण्यासाठी धडपडतात. भक्ताने मात्र यासाठी निमित्तमात्र व्हायचे असते. सद्‌गुरू समाधिस्थ झाले तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभुतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, September 9, 2010

युग तंत्रज्ञानाचे

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्‌गुरू असे जोडला । किरीटीसी ।।

सध्य तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात प्रल्हादाच्या गोष्टी मनाला पटणे अशक्‍य वाटते. या दंतकथा आहेत. ती अतिशोक्ती वाटते. पण शास्त्रावर आधारित लिखाण करणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी हे मग लिहिले कसे हा प्रश्‍न पडतो. तसे दंतकथा आणि सत्य परिस्थिती यामध्ये बराच फरक आहे. इतिहासावर आधारित लिहिल्या गेलेल्या किंवा दंत कथेतून सांगितल्या जाणाऱ्या रंजक कथानकामुळेच आज खरा इतिहास शोधणे कठीण जात आहे. ते रंजक कथानकच आपण खरे समजत असल्यानेच गैरसमज वाढत आहेत. यासाठी या कथांचा सर्वांगांनी खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की त्या काळातील तंत्रज्ञानही उच्च होते. कारण त्या काळातील अनेक चमत्कारिक शोधांचा, वैशिष्ठपूर्ण बांधकामांचा उलगडा सध्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही होऊ शकला नाही. एकाच दगडात मंदिराचा कळस बांधला कसा गेला असेल? हा दगड नेमका इतक्‍या उंचीवर कसा नेला गेला असेल ? असे प्रश्‍न काही पौराणिक मंदिरे पाहताना आपणास सहजच पडतात. कारण त्याकाळात आताच्या सारख्या क्रेन नव्हत्या. मग हे शक्‍य कसे झाले. याचाच अर्थ त्या काळातही प्रगत तंत्रज्ञान होते. पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले. प्रल्हादावर विषाचा परिणाम झाला नाही. हे कसे शक्‍य आहे? उपचारही केले गेले नाहीत. मग तो इतके भयंकर विष पचवू कसा शकला. हा प्रश्‍न सहजच आपल्या मनात डोकावतो. पण साधनेने हे शक्‍य आहे. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते. साधनेच्या काळात पित्ताशयात अनेक रसायने तयार होतात. त्यांचा शोध सध्याच्या काळातही लावता आलेला नाही. हे परखड सत्य आहे. साधनेत शरीरात तयार होणाऱ्या द्रव्यातून रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. विष पचविण्याची ताकतही या द्रव्यात असते. भक्तीमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे. हे चमत्कार नेमके काय आहेत हे समजून घेणेही गरजेचे आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, September 8, 2010

श्री गणेशा

आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्री गुरूंचे ।।

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करताना श्री गणेशाचे स्मरण केले जाते. ही आपली संस्कृती आहे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. पूर्वी हा सण फक्त घरोघरी साजरा केला जात होता. पण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्याला सार्वजनिक रूप आणले. त्यानंतर घरगुती गणपती बरोबरच गल्लोगल्लीही श्री गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी त्या परंपरा जोपासता याव्यात यासाठी ब्रिटिशांची राजवट भारतातून हाकलून लावणे आवश्‍यक होते. या उद्देशासाठी जनतेचे एकत्र यावे. लोकांमध्ये याबाबत जागृती केली जावी. यासाठी टिळकांनी हा उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यास प्रोत्साहन दिले. पण सध्या या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. त्यातील भक्ती भाव नष्ट झाला आहे. अशा उत्सवात पाश्‍चात संगीताच्या तालावर धामडधिंगा घातला जात आहे. खरेतर भगवंताचे नाम स्मरण सतत राहावे यासाठी अशा सण, उत्सवांची सुरवात करण्यात आली. पण हा उद्देशच मुळात नष्ट झाला आहे. या चंगळवादी संस्कृतीचा वाढता प्रसार रोखणे आवश्‍यक आहे. नाहीतर आपली संस्कृती आपणास शोधूनही सापडणे शक्‍य होणार नाही. यासाठी आता भारतीय संस्कृतीच्या जतनाचा श्री गणेशा करायला हवा. एक चळवळ उभी करायला हवी. चंगळवादी संस्कृतीमुळेच सध्या ताणतणावाचे वातावरण निर्माण होत आहे. हा ताणतणाव दूर करायचा असेल तर भारतीय संस्कृतीचे जतन आवश्‍यक आहे. या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन सण, उत्सवांचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. तरूणपिढीला याबाबत मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, September 7, 2010

संपत्ती आणि दया

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती माझी ।।

अनेक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतात. पैसा त्यांना अति प्रिय असतो. तसा ते अमाप पैसाही कमावतात. पण त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सर्वत्र पैसाच दिसतो. या पैशाच्या गर्वाने ते सर्व सामान्य जनतेचा द्वेष करतात. दानाची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी विकत घेतल्याची ते भाषा करतात. इतकी मगरूरी त्यांच्यात असते. कमावलेला पैसा गरिबांना दान करण्यास त्यांना जड जाते. अहो इतकेच काय पण स्वतःच्या घरच्यांच्यासाठीही पैसा खर्च करण्यासाठी ते नाही होय नाही होय करतात. पैसा काय फुकट येतो काय? पैसा काय झाडाला लागतो काय? अशी त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. पैशाने माणसे विकत घेता येतात पण प्रेम, आशीर्वाद, कृपा विकत घेता येत नाही. यासाठी अंगात दानशूरपणा असावा लागतो. अंगात दयाभाव असावा लागतो. पैशाने अंगात आलेल्या उर्मीने तो इतका अंध झालेला असतो की घरात भेटायला आलेल्या व्यक्तीचा आदर करणेही तो विसरतो. पण पैशाची ही गुर्मी योग्य नाही. कारण पैसा हे द्रव्य आहे. ते नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही. पण घरात लक्ष्मी शिवाय शांती नाही. हे ही तितकेच खरे आहे. लक्ष्मी घरात सुख शांती समाधान घेऊन येते. पण ते टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे. आपल्या कडील पैशाने दहा गरजूंना मदत केली तर ते आपल्या कठीण प्रसंगात निश्‍चितच मदतीला धावतील यात शंकाच नाही. यासाठी दयावान व्हायला शिकले पाहिजे. अशा व्यक्ती कडे भगवंत वसती करतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, September 6, 2010

चांगल्यालाच मागणी

जे जे भेटे भूत । तें ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्‍चित । जाण माझा ।।

व्यक्ती तितक्‍या प्रकृती. दोन जुळे भाऊ असले तरी त्यांच्यात सुद्धा बराच फरक असतो. प्रत्येक पिकाच्या अनेक जाती आहेत. पण त्या प्रत्येक जातीची वैशिष्ठे वेगवेगळी असतात. पिकात उपजलेले धान्य किंवा एकाच झाडाला लागलेली फळे एकसारखी नसतात. प्रत्येक फळाच्या चवीत थोडाफार तरी फरक असतोच. काही नासके असतात. काही कडवट असतात. तर काही अति गोड असतात. तर काहींना चवच नसते. पण प्रत्येक शेतकरी चांगली फळे लागतील याचाच प्रयत्न करत असतो. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे साहजिकच अन्नधान्याची, फळांची मागणी वाढतीच राहणार आहे. यासाठी उत्पादनात वाढ कशी होईल, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर धान्याची प्रत कशी सुधारेल, त्याची गोडी, त्याचा आकार आदीचाही प्रयत्न केला जात आहे. नुसते दिसायला चांगले असून चालत नाही. बाजारात ज्याला गोडी चांगली आहे त्यालाच अधिक मागणी असते. त्यालाच चांगला भाव मिळतो. फळ नासक जरी लागल तरी आपण त्यातील चांगला भाग कापून खातोच. चांगल्या भागाला निश्‍चितच मागणी आहे. माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे. जो चांगला आहे त्यालाच आज अधिक मागणी आहे. सध्याचा काळ बदलला आहे असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत. असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला आज जगात फारशी किंमत नाही असेही सांगितले जाते. पण खरे पाहता चांगल्या गोष्टीलाच टिकाऊपणा असतो. तो एकदा डावलला जाईल. दोनदा डावलला जाईल. पण तिसऱ्यांदा त्याचीच गरज वाटू लागेल. एखादा दुष्ट दुर्जन जरी आपणास भेटला तरी त्याच्यात काहीना काही तरी चांगल्या गोष्टी निश्‍चितच असतात. त्याच्या चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सतमार्गाचा, चांगल्या गोष्टींचा ध्यास सतत करायला हवा. कारण जो चांगला आहे, सत्याचा पुरस्कार करणार आहे. तोच या जीवनात अमर होतो.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Saturday, September 4, 2010

भक्ती

तरि झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।।

आत्मज्ञान प्राप्तीचा साधा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. मनापासून केलेली भक्ती निश्‍चितच फळाला येते. योगाचा मार्ग हा कष्टदायक आहे. त्यासाठी काही जण संसाराचाही त्याग करतात. वणवण भटकतात. तरीही मनःशांती होत नाही. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी बाराबारा वर्षे तपश्‍चर्या करावी लागते. बरेच कष्ट पडतात. शरीराला त्रास होतो. एवढे करूनही आत्मज्ञान मिळेलच याची खात्री नाही. अनेक साधू शांतीच्या शोधात हिमालयात जाऊन साधना करतात. पण सध्या खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधात फिरणाऱ्या साधूंची संख्या कमी झाली आहे. संधी साधूच अधिक आहेत. काही साधूंना आत्मज्ञान प्राप्ती झाली तरीही त्यांचा उपयोग समाजासाठी करणारे फारच कमी आहेत. खडतर तपश्‍चर्या करून आत्मज्ञान प्राप्तीपेक्षा भक्तीचा मार्ग हा सोपा आहे. सद्‌गुरुंच्या भक्तीत मन रमवणे सहज शक्‍य आहे. यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. संसारात राहूनही मुक्ती मिळवता येते. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्‍वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्‌गुरुंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी करतात हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार आहे. भजन, कीतर्न हे सुद्धा भक्तीचेच मार्ग आहेत. भजन, कीर्तन, निरूपण, पारायण हे ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. यात सद्‌गुरुंचे स्मरण होते. नुसत्या श्रवणाने सुद्धा येथे मोक्ष सिद्धी होऊ शकते. यासाठी संत सहवासात जाणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांची, गोष्टीची, उपक्रमांची सवय लावून घेणे गरजेचे आहे. यातून मन आनंदी राहते. चांगल्या गोष्टींची सवय लागायला थोडा वेळ लागतो. मनाला ते लवकर रुचत नाही. पण साधासोपा भक्तीचा मार्ग अवलंबणेच या बदलत्या युगात सोईस्कर आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, September 3, 2010

विषयांचे सुख

तेविं विषयांचे जे सुख । ते केवळ परमदुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ।।

हे माझे, हे माझे असे करत मनुष्य सतत विषयांच्या, वासनेच्या मागे धावत असतो. भोगाकडे त्यांचा कल अधिक असतो. त्या शिवाय त्याला तृप्त झाल्यासारखे वाटत नाही. पण हे सुख क्षणिक असते. ते त्याच्या कधीही लक्षात येत नाही. तेवढ्यापूर्वीच ही तृप्ती असते. या क्षणिक सुखाच्यामागे मुर्खासारखे तो सतत धावत असतो. स्पर्धेच्या युगात स्पर्धा कशाची करायची हे सुद्धा महत्त्वाचे आहे. सुख मिळते म्हणून धामडधिंगा घालायचा. हा चंगळवाद आहे. पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करत आपल्याकडे सध्या वाट्टेलत्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचा परिणाम येथील पारंपरिक उत्सवावरही झाला आहे. गोकुळअष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. पण सध्या या उत्सवात स्पर्धाच अधिक वाढली आहे. दहीहंडीला आता राजकीय पाठबळाबरोबरच कॉर्पोरेट कवचही मिळाले आहे. हा कार्यक्रम आता बाळगोपाळांचा, व्यायामशाळांच्या उत्साहाचा, भाव भक्तीचा राहिला नाही. हंडी फोडण्यासाठी किती मोठा थर उभा केला याची स्पर्धा यात आता लागलेली आहे. यंदा नऊ थराची हंडी होती. या झटपटांत यंदा 273 गोविंदा जखमी झाले. यातील काही जण गंभीर अवस्थेत आहेत. अशा या उत्सवाच्या स्पर्धेतून शेवटी दुःखच पदरात पडत आहे. दहा थरांचा विक्रम यंदाही मोडता आला नाही. हे दुःख आहेच. उत्साहासाठी उत्सव असावा. मनाला त्यातून समाधान मिळावे. पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ऊर्मी त्यातून मिळायला हवी. पण सध्याचे उत्सव हे चंगळवादी संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यातून शेवटी काय साधले जाते. उत्सव कशासाठी असतो त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. धार्मिक उत्सवात सध्या भावभक्तीचा उल्लेखही होत नाही. मग खऱ्या ज्ञानाच्या, सुखाच्या प्राप्ती यातून कशी होणार. यातून केवळ परमदुःखच हाती लागणार.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, September 1, 2010

अमरत्वाचे सिंहासन

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानी भुवन । अमरावती ।।

सद्‌गुरू कृपेनंतर नराचा नारायण होतो. अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडतो. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. मुळात तो अमरच असतो. पण अज्ञानामुळे तो भरकटतो. सध्या देशात नवनवीन तंत्रज्ञानात बराच विकास झाला आहे. तसेच त्यात प्रगतीही होत आहे. आपला देश आता महासत्तेकडे वाटचाल करत आहे. असे सांगितले जाते. पण दुसरीकडे दारिद्र रेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे, असेही स्पष्ट केले जाते. मग नेमके आपण आहोत कोठे? जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. अशाने नेमका कोणता विकास साधला हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो तोच खरा समाजसेवक असतो. त्यांचे नाव अमर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात असे राज्यकर्ते होते. म्हणूनच आपण स्वतंत्र झालो. अशा राज्यकर्त्यांची सध्या देशाला गरज आहे. जनतेला ज्ञानी बनविणारे राज्यकर्ते हवेत. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसविणारेच खरे सद्‌गुरू असतात. त्यांची परंपरा पुढे चालते. आदिनाथापासून सुरू झालेली संत परंपरा आजही तशीच पुढे सुरू आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, August 31, 2010

स्वप्न

तरी स्वप्नौनी जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता ।
का स्वप्नामांजी असता । प्रवासु होय ।।

प्रत्येक व्यक्ती काहींना काही स्वप्ने उराशी बाळगत असतो. स्वप्ने असावीत. त्यातूनच नवनव्या आशा उत्पन्न होतात. विचार सुरू राहतात. प्रगती होत राहते. काही ना काही तरी करण्याची धडपड सुरू राहते. यातूनच विकासाचे खरे मार्ग सापडतात. स्वप्न भंगले. तरी निराशा येत नाही. कारण ते शेवटी स्वप्न असते. सत्य परिस्थिती नसते. स्वप्न हे नेहमी चांगल्या गोष्टीचे असावे. रात्री झोपेत सुद्धा आपणास काही स्वप्ने पडतात. ती चांगली असतात असे नाही. असे म्हणतात की पहाटेच्यावेळी पडलेली स्वप्ने ही खरी होतात. कोण जाणे. स्वप्न चांगले असेल तर ते खरे मानायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यामुळेही ते स्वप्न सत्यात उतरेल. काही भीतीदायक स्वप्ने पडतात. पण ते स्वप्न असते. त्यामुळे जागे झाल्यावर त्यातील भीती नसते. अज्ञानाने आपण देहाच्या सुखामागे धावत आहोत. या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज आहे. आत्मज्ञानाची जागृती होणे गरजेचे आहे. डोळ्यावरची अज्ञानाची झापड दूर होण्याची गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Friday, August 27, 2010

अवधान

तरी अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।

गाडी चालवताना चालकाचे अवधान चुकले तर आपण लगेच त्याला ओरडतो. अवधान हे ठेवावेच लागते. नाहीतर अपघात होतात. आपण ज्या गोष्टी करतो त्याप्रत्येक गोष्टीत अवधान हे असावेच लागते. अवधान ढळले तर चुका होतात. साधनेत अवधानास खूप महत्त्व आहे. मनात काहीही विचार सुरू असतात पण क्रिया ही सुरूच असते. सायकल चालवताना आपल्या मनात विचार सुरू असतात त्यावेळी पायंडेल ही आपण मारत असतो. दोन्हीही क्रिया एकाच वेळी सुरू असतात. साधना करतानाही तसेच आहे. आपण साधनेला बसलेले असतो पण आपल्या मनात वेगळेच विचार घोळत असतात. पण त्यावेळी आपली साधनाही सुरू असते. श्‍वास आत घेतला जात असतो. बाहेर सोडला जात असतो. पण ही क्रिया आपल्या लक्षात येत नाही. यासाठी साधना करताना मनातील सर्व विचार सोडून द्यावे लागतात. हे एकदम शक्‍य होत नाही. कालांतराने विचार कमी होतात. पूर्वीच्या काळी अनेक साधू हिमालयात जाऊन बाराबारा वर्षे साधना करत असत. मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत असत. पण तरीही त्यांचे मन स्थिर होत नसे. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आपणास साधासोपा मार्ग सांगत आहेत. फक्त अवधान द्यावे इतकेच त्यांचे मागणे आहे. त्यांचे हे मागणे जो भक्त पूर्ण करू शकतो. त्यालाच आत्मसुखाचा लाभ होतो. यासाठी वणवण भटकायची गरज नाही. संसाराचा त्याग करायचीही गरज नाही. फक्त साधना करताना अवधान देणे असणे आवश्‍यक आहे.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, August 26, 2010

मोक्ष

तैसा संसारु तया गांवा । गेला साता पांडवा ।
होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।।

जन्माला आलो म्हटल्यानंतर जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी या कराव्याच लागतात. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग तो सर्वसामान्य असो, की मोठा असो, किंवा साधू संत असो. त्याला या गोष्टींची गरज भासतेच. पण माणसाला जगण्यासाठी याची किती आवश्‍यकता आहे याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगामी काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार हे निश्‍चित आहे. वस्त्राच्या बाबतीतही हीच स्थिती निर्माण होणार आहे आणि निवाराही मिळणे कठीण होणार आहे. सध्या लोक शहराकडे धाव घेत आहेत. पण काही कालावधीनंतर हेच लोक शहरातील धकाधकीला कंटाळून खेड्याकडे वळतील. गावातील शांतता त्यांना आकर्षित करेल. त्यांना जर शांत गावांची ओढ लागली तर पुन्हा धकाधकीच्या शहरात ते येणारही नाहीत. शहराचा ते सहजच त्याग करतील. काहीजण परमार्थासाठी संसाराचा त्याग करतात. संसार हा होत असतो. परमार्थ मात्र करावा लागतो. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सर्व गोष्टी स्वतःहून आपल्याकडून करवून घेतल्या जात असतात. त्या करताना त्यात कंटाळा करून चालत नाही. पण परमार्थ हा करावा लागतो. माऊली येथे आयता मोक्ष सांगत आहे. संसार न त्यागताही मोक्ष कसा मिळवायचा हे सांगत आहे. लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रुपांतरण करता येत नाही. किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही. आत्मा हा अमर आहे. देहाचा मृत्यू होतो. आत्माचा नाही. तो आत्मा आता पुन्हा देहात अडकणार नाही. ही अनुभूती आल्यानंतर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईल.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, August 25, 2010

मनाची स्थिरता

तूं मन बुद्धी सांचेसी । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेची गा पावसी । हे माझी भाक ।।
अध्यात्माचा अभ्यास हा करायलाच हवा. साधनेतील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा. चक्रांचे कार्य काय आहे, ते कसे कार्य करतात? साधनेच्या काळात आपल्या शरीरात कोणत्या क्रिया घडतात? आपणास कोणते बोध होतात? कोणती अनुभूती येते? हे जाणून घ्यायलाच हवे. साधनेत अवधानाला अधिक महत्त्व आहे. नुसतेच शांत बसून राहणे म्हणजे साधना नव्हे. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राचे नामस्मरण करायला हवे. ते करताना अवधान आवश्‍यक आहे. मन भरकटते. पण मनाला स्थिर करणे आवश्‍यक आहे. साधनेच्या सुरवातीच्या काळात हे शक्‍य होत नाही. पण हळूहळू अभ्यासाने ते शक्‍य होते. मनातील विचार दूर होतात. साधनेत येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. सद्‌गुरुंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या जागी मन स्थिर होते. मनाला स्थिर ठेवणे कोणास जमले ? साधना सुरू असताना विचार येतच राहतात. पण याचा तोटा काही नाही हे ही लक्षात घ्यायला हवे. या विचारांच्या जागी मन स्थिर होते. यातून एखाद्या समस्येवर उत्तर मिळते. चिंतन, मननातूनच अनेक समस्या सुटतात. योग्य मार्ग सापडतात. साधनेचे हे फायदे आहेत. यासाठी सुरवातीच्या काळात साधनेत मन रमले नाही तरी हळूहळू त्याची गोडी लागते. मनाला स्थिरता येते. विचार संपतात. मग आत्मज्ञानाच्या पायऱ्या सहज चढल्या जातात.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Monday, August 23, 2010

अध्यात्म

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।।


भगवंतास धर्नुधर अर्जुनाने प्रश्‍न केला. ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अध्यात्म म्हणजे काय? तसे पाहता हे प्रश्‍न सर्वच भक्तांचे असतात. प्रत्येक भक्ताला या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता असते. हे प्रश्‍न प्रत्येकाला पडायलाच हवेत. त्याच्या उत्तराच्या शोधात तरी आध्यात्मिक ग्रंथाचे पारायण होईल. उत्तरे शोधण्यासाठी आपोआपच वाचन वाढेल, नंतर त्याची सवय लागेल. हळूहळू या प्रश्‍नाची उकल होते. अनुभुतीतून प्रश्‍नांची उत्तरे मिळत राहतात. यातून मनाला वाफसा येतो. अशावेळी सद्‌गुरू गुरुमंत्राची पेरणी करतात. सद्‌गुरुंचा नित्य सहवास अंतःकरणात राहातो. अगदी सहजपणे आपणाकडून साधना घडते. कष्ट पडत नाहीत. त्रास होत नाही. सतत नामस्मरणात आपण गढून जातो. दैनंदिन घडामोडीतही नित्य सद्‌गुरुंच्या सहवासाची जाणीव होते. मनाला स्थिरता येते. यालाच अध्यात्म असे म्हणतात. यासाठी अवधान असावे लागते. तरच आध्यात्मिक प्रगती होत राहते. साधनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. हळूहळू प्रगती होत राहते. अनुभूती येत राहते. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांमध्ये आहे. याची अनुभूती येते.


राजेंद्र घोरपडे, पुणे

Sunday, August 22, 2010

साक्षात्कार

कृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे ब्रह्म साक्षात्कारी ।
मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।।
आपल्या देशात राक्षसांना मारण्यासाठी भवानी, काली, दुर्गा मातेचा अवतार झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. दृष्ट दुर्जनांना मारण्यासाठी ही देवी अवतार घेत असते. या राक्षसांना मृत्यू समयी या देवीचा साक्षात्कार होतो. अनेक दुर्जन दुष्ट व्यक्तींनी साक्षात्कारानंतर सत्कर्मे केल्याची उदाहरणे आहेत. वाल्हा कोळीचा वाल्मीकी झाला. नंतर त्यांची देवळे, समाधी बांधण्यात आली. हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच अफजलखानाची समाधी छत्रपती शिवरायांनी बांधली. छत्रपतींचा तो नृसिंह अवतारच होता. अशी अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. आपणास तर भगवंत आपल्या कृपेने उपदेश करत आहेत. मग आपणास का भगवंताचा का साक्षात्कार होणार नाही. यावर विश्‍वास ठेवायला हवा. साक्षात्कारासाठी आपले अवधान महत्त्वाचे आहे. सर्व विश्‍वात भगवंताचा वास आहे. असा अनुभव यायला हवा. ब्रह्म सर्वांमध्ये आहे. सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे. कर्मामुळे प्रत्येकजण विभागला गेला आहे. समाजात सुख शांती नांदावी यासाठी निर्माण केलेली रचना आहे. सध्या जगात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. दृष्कृते करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा या बिकट काळात भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला मदत करतो. ही मदत भगवंताची आहे अशी अनुभूती यायला हवी. स्वतःमध्येही भगवंत आहे याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा आपणातील मीपणा दूर होईल. तो दूर होणे आवश्‍यक आहे.
राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, August 19, 2010

कृषी पदवी सत्रनिहाय पाठ्यपुस्तके हवीत!

कृषी पदवी सत्रनिहाय पाठ्यपुस्तके हवीत!

"ऍग्रोवन'च्या सर्वेक्षणातील सूर; "नोट्‌स'वरच झाले अनेक पदवीधर

राजेंद्र घोरपडे/अनिकेत कोनकर
पुणे ः राज्यात कृषी आणि संलग्न विषयांत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची सत्रनिहाय पाठ्यपुस्तके अधिकृतरीत्या उपलब्धच नाहीत! कृषी शिक्षणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशी पुस्तके उपलब्ध होण्याची गरज विद्यार्थी व प्राध्यापकांमधून तीव्रतेने व्यक्त होत आहे. काही प्राध्यापकांनी स्वतः काही पुस्तके लिहिली आहेत, मात्र भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद अथवा चारही विद्यापीठांनी एकत्र येऊन अशी पुस्तके तयार केल्यास राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, असा सूर "ऍग्रोवन'ने केलेल्या सर्वेक्षणातून उमटला आहे.

कृषी पदवी, तसेच संलग्न शिक्षणक्रमांसाठी असलेल्या विविध विषयांतील सर्व भाग एकाच वेळी अभ्यासाला नसतो. याची विभागणी वेगवेगळ्या सत्रांत केलेली असते. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम सारखाच असून, अकॅडेमिक कौन्सिलकडून तो ठरवला जातो. अभ्यासक्रमासोबतच तज्ज्ञांनी लिहिलेली क्रमिक पुस्तके (टेक्‍स्ट बुक्‍स) आणि संदर्भ पुस्तके (रेफरन्स बुक्‍स) यांची शिफारस केली जाते, मात्र ती केवळ एखाद्या सत्रापुरती मर्यादित नसतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी ही पुस्तके वाचणे अपेक्षित असते; मात्र काही मोजक्‍या विद्यार्थ्यांचे अपवाद वगळता ही पुस्तके वाचून, त्यातील संदर्भ घेऊन, स्वतः नोट्‌स काढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. काही वेळा प्राध्यापक स्वतः काढलेल्या नोट्‌स देतात. त्या विश्‍वासार्ह असतात; मात्र सर्वच प्राध्यापक अशा नोट्‌स देत नाहीत, त्यामुळे बहुतांश विद्यार्थी मग तयार असलेल्या नोट्‌सचा मार्ग अवलंबतात. त्या नोट्‌स नेमक्‍या कोणी काढलेल्या आहेत, कधीच्या आहेत, त्यातील संदर्भ नेमके कशातील आहेत याची पक्की माहिती नसते, मात्र संदर्भ पुस्तके, तसेच चार-पाच टेक्‍स्ट बुक्‍समधून अभ्यासक्रमातील नेमका विषय शोधण्यात होणारा गोंधळ, त्यासाठी संयमाने घालवावा लागणारा वेळ आणि त्यासाठीचा कंटाळा, काही वेळा पुरेशा पुस्तकांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे ही पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जे ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळणे आवश्‍यक आहे, ते प्रभावीपणे मिळत नाही. मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. राज्यातील बहुतांश कृषी महाविद्यालयांमध्ये हे चित्र पाहायला मिळते.

सत्रनिहाय पाठ्यपुस्तके ठरतील उपयुक्त
कृषी आणि संलग्न पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक सत्राच्या प्रत्येक विषयाचे एक पुस्तक तयार केले तर ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल. या पुस्तकांतील माहिती संबंधित विषयाच्या शिफारशीत टेक्‍स्ट बुक्‍समधून एकत्रित केलेली असेल आणि त्याची सोप्या भाषेत, सुलभ अशी मांडणी केलेली असेल. विषयानुरूप अधिक माहिती, संदर्भपुस्तके, टेक्‍स्ट बुक्‍सची नावेही त्यात दिलेली असतील. राज्यातील चारही विद्यापीठांनी एकत्र येऊन अशी पुस्तके विकसित केल्यास दर्जेदार आणि खात्रीशीर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विशेष निधीतून ही पुस्तके विकसित केल्यास विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किमतींत उपलब्ध होऊ शकतील. कृषी शिक्षण घेऊन सध्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनीही अशी पुस्तके आवश्‍यक असल्याचे मत मांडले आहे.
..........
विविध मते..

अशी पुस्तके विद्यार्थी व प्राध्यापकांसाठीही मदतीचे होईल, त्यात नव्या अभ्यासक्रमानुसार टीचिंग शेड्यूल्सही दिल्यास परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल. प्रश्‍नपेढी, बहुपर्यायी प्रश्‍नही दिल्यास विद्यापीठाच्या परीक्षेसोबतच स्पर्धापरीक्षेसाठीही उपयुक्त होईल. अशा पुस्तकांमुळे, कोणत्याही विद्यापीठातला पेपर आला, तरी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, प्राध्यापक, विस्तार शिक्षण, कृषी महाविद्यालय, दापोली
.................
ही संकल्पना चांगली आहे. प्रत्येक विषयाचे एक पुस्तक तयार करून, त्यामध्ये विषयाची सत्रनिहाय विभागणीही करता येऊ शकेल, जेणेकरून सर्व विषयांची अशी पुस्तके घेतली, की चारही वर्षे विद्यार्थ्यांना ती उपयुक्‍त ठरू शकतील.
- अजय राणे, सहायक प्राध्यापक, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली
..........
"पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके वाचण्याचे प्रमाण 65-70 टक्केच'
आमच्या ग्रंथालयात साठ हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यामध्ये 65 ते 70 टक्के टेक्‍स्ट बुक्‍स असून, 30 टक्के संदर्भ पुस्तके आहेत. त्याशिवाय विविध प्रकारची इयरबुक्‍स, डिक्‍शनरी, विज्ञानपत्रिका, कृषिविषयक मासिके, दैनिके आणि अन्य विषयांच्या पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके
वाचण्याचे प्रमाण 60 ते 70 टक्केच आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये मात्र ते 100 टक्के आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले वाचनाचे प्रमाण आणखी वाढण्याची गरज आहे. पुस्तके वापरण्याकडे अधिकाधिक विद्यार्थी आकृष्ट होण्याकरिता आम्ही काही उपक्रम हाती घेतले आहेत. नव्याने आलेल्या विज्ञानपत्रिकांच्या अनुक्रमणिकांची झेरॉक्‍स काढून आम्ही ती संबंधित विषयाच्या विभागामध्ये नोटीसबोर्डवर चिकटवण्यासाठी पाठवतो, जेणेकरून संबंधित
विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा संदर्भ मिळतो आणि ते मूळ विज्ञानपत्रिका वाचण्यासाठी ग्रंथालयात येऊ शकतात, तसेच नवी विकत घेतलेली पुस्तके आम्ही ग्रंथालयात दर्शनी भागात डिस्प्ले करतो, त्यामुळे नव्या पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना कळते. विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील संदर्भसाहित्याचा लाभ होण्यासाठी सुसज्ज 40 संगणकांचा विभाग सुरू करण्यात आला आहे, तसेच जुन्या विज्ञानपत्रिका आणि अन्य काही संदर्भसाहित्य सीडीच्या स्वरूपातही उपलब्ध आहे, त्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात.
- किशोर पाटील, ग्रंथपाल, कृषी महाविद्यालय, पुणे
.............
ऍकॅडमिक कौन्सिलने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तकांची (टेक्‍स्ट बुक्‍स) शिफारस केलेली असते. ही पुस्तके कृषी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात
या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही पुस्तके सत्रनिहाय नसून, त्यामध्ये संबंधित विषयाची विस्तृत माहिती असते. विद्यापीठांनी पुढाकार घेतल्यास सत्रनिहाय
पुस्तकेही काढता येऊ शकतात. पुस्तकनिर्मितीसाठी आयसीएआरकडून निधीही उपलब्ध होत असतो.
- डॉ. भीमराव उल्मेक, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पुणे
...................
सध्या काही प्राध्यापक स्वतःहून अशी पुस्तके लिहून प्रकाशित करीत आहेत. त्याचा वापरही मुले करत आहेत, मात्र अजून हा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही. या पुस्तकांच्या किमती विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या नसतात, त्यापेक्षा पुस्तके किंवा नोट्‌सच्या झेरॉक्‍स करून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. विद्यापीठ पातळीवर अशी पुस्तके तयार झाली तर उपयुक्त ठरू शकेल.
- डॉ. हरिहर कौसडीकर, सहायक प्राध्यापक,
ृमृद्विज्ञान व कृषी रसायन विभाग,
कृषी विद्यापीठ, परभणी
....................
विषयांची सत्रनिहाय पुस्तके आवश्‍यकच आहेत, अशी पुस्तके लिहिण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांची निवड करावी. या पुस्तकांमध्ये ग्राफिक्‍स, आकृत्या आदींचा वापर प्रभावीपणे करायला हवा. विद्यार्थ्यांना थेट समजतील अशी उदाहरणे देऊन विषयांची सुलभ मांडणी करायला हवी. अशी पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तर उपयुक्त ठरतीलच, शिवाय प्राध्यापकांसाठीही एक मार्गदर्शक दिशा ठरेल.
- डॉ. रामचंद्र साबळे, माजी प्रमुख, हवामानशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
................
ना नफा, ना तोटा तत्त्वावर उपक्रम
अभ्यासक्रमात बदल होत असल्याने नव्या पुस्तकांची गरज आहे. ऍग्रोनॉमी विषयाची काही सत्रांची पुस्तके आम्ही तयार करून ना नफा ना तोटा तत्त्वावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांसाठीही याचा फायदा होऊ शकतो.
- डॉ. अशोक पिसाळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.
......................
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हवा
पुस्तके वापरण्याचे व वाचनालयात जाऊन स्वतः नोट्‌स काढण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यात सुधारणा व्हायला हवी. शासकीय महाविद्यालयांमध्ये पुस्तकांची उपलब्धता अधिक आहे, मात्र आम्हीही पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्याला योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे.
डॉ. दिनकरराव रामचंद्र थोरात, प्राचार्य, कृष्णा कृषी महाविद्यालय, रेठरे बु., ता. कऱ्हाड, जि. सातारा
..................
बहुतांश विद्यार्थी तयार नोट्‌स वाचूनच अभ्यास करतात. सत्रनिहाय पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यास खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकेल.
- पुष्कर देवल, चतुर्थ वर्ष, बी.एस्सी. ऍग्री., कृषी महाविद्यालय, दापोली.
....................
एकाच विषयासाठी सहा-सात पुस्तके शिफारशीत केलेली असतात. आमचा अभ्यासक्रम नवा असल्याने काही विषयांची पुस्तके उपलब्ध होत नाहीत, मग उपलब्ध पुस्तके अन्‌ नोट्‌सच्या झेरॉक्‍स काढून वाचल्या जातात. विषयांची सत्रनिहाय पुस्तके उपलब्ध झाल्यास उपयुक्त ठरेल.
- आशीष पित्रे, चतुर्थ वर्ष, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली.
.........
पुस्तके फायदेशीर
उपलब्ध नोट्‌समधून विषयाची सखोल माहिती मिळत नाही, मात्र काही प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आम्हाला फायदा होत आहे, त्यामुळे सर्व विषयांची अशी पुस्तके प्रकाशित झाल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
- हर्षद देशमुख, बी.एस्सी. (उद्यानविद्या), तृतीय वर्ष, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
.....................
पशुवैद्यकीय पदवीसाठी शिफारस केलेली 70 टक्के पुस्तके परदेशी लेखकांची असून, उर्वरित भारतीय लेखकांची आहेत. काही जर्नल्सचाही वापर पुस्तक म्हणून करावा लागतो; मात्र सत्रापुरतीच पुस्तके उपलब्ध केल्यास संबंधित विषयाचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात मर्यादा येतील.
- डॉ. नितीन मार्कंडेय, प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी
....................................
क्रमिक पुस्तकांची फेरमांडणी आवश्‍यक
पशुवैद्यकीय शिक्षणातील क्रमिक पुस्तकांची फेरमांडणी आवश्‍यक आहे. आपल्याकडे एक किंवा दोन तज्ज्ञांनी मिळून लिहिलेली क्रमिक पुस्तके अभ्यासक्रमामध्ये आहेत, परंतु परदेशात एकाच विषयातील 20 ते 25 तज्ज्ञांच्या संशोधनाचा आधार घेत क्रमिक पुस्तक तयार केलेले असते. त्यामुळे विद्यार्थांना एकाच विषयातील विविध स्तरांवरील संशोधनाची माहिती एकाच ठिकाणी अभ्यासण्यास मिळते.
- डॉ. रामनाथ सडेकर, पशुतज्ज्ञ
.........................................
पुस्तकांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
फोर्थ डिन्स कमिटी 2007-08 यांच्या शिफारशीनुसार तयार झालेला बी. एस्सी. (कृषी) पदवीच्या नवीन अभ्यासक्रमाची 14 क्रमिक पुस्तके आम्ही
प्रकाशित केली आहेत. विद्यार्थ्यांचा यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पुस्तकामध्ये
अभ्यासक्रमानुसार आवश्‍यक रंगीत छायाचित्रे, आकृत्या आदींची माहिती समाविष्ट करण्यात आल्याने विद्यापीठांच्या कुलगुरूंनीही त्यास पसंती दर्शविली आहे.
- राजाभाऊ आहिरे पाटील, श्री राजलक्ष्मी प्रकाशन, औरंगाबाद
...................

Tuesday, August 10, 2010

अनुभूती

अनुभूती
जया सद्‌गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तरांडे । आकळिले ।।
सद्‌गुरुंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते. पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरूमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात. त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरुंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत अशी अनुभूती येते. पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी अवधानाचा वाफसा असणे आवश्‍यक आहे. तरच गुरूमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. हे बीज वाया जाणार नाही ना? अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहते. काळजी वाटते पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरवते हे सद्‌गुरूच आहेत. हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. आपल्या डोळ्यावरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणा दृष्टी देतात.

Monday, August 9, 2010

वाफसा

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनया ऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।।
शेतात बी पेरण्यासाठी जमिनीत वाफसा असावा लागतो. पावसाळ्यात पेरणी करताना जमिनीतील पाण्याचा निचरा होऊन जमीन वाफश्‍यावर येणे आवश्‍यक आहे. वाफसा येतो तेव्हाच शेतकरी पेरणी करतात. तसेच खते, तणनाशके, कीडनाशके यांचा वापर करतानाही जमिनीत वाफसा असणे आवश्‍यक आहे. सद्‌गुरुकडून सतत प्रेमाचा, ज्ञानाचा वर्षाव होत असतो. भक्त या प्रेमाच्या रसात डुंबून जातो. पण सद्‌गुरुंचा अनुग्रह होण्यासाठी भक्ताचे मन वाफशावर येणे आवश्‍यक असते. मनाचा वाफसा तयार झाला की, सद्‌गुरू त्यामध्ये गुरुमंत्राची पेरणी करतात. ते बीज वाया जाऊ नये याची काळजी घेतात. बी जमिनीत वाढते. यासाठी शेतकरी त्याच्या वाढीच्या योग्य कालावधीत खते देतात. पिकात वाढलेली तणे काढतात. सद्‌गुरू भक्ताला योग्य वेळी उपदेश करून त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी त्याला प्रोत्साहित करतात. यामुळे भक्ताला अध्यात्माची गोडी लागते व त्याची प्रगती होते. काही कालावधीने हे बीज फुलोऱ्यावर येते. त्यालाही आत्मज्ञानाची फुले लागतात. ही फुले इतरांच्यावर भक्तीचा रस ओततात. अशी ही भक्तीची परंपरा आपल्या देशात अनादी कालापासून अखंड सुरू आहे.

Sunday, August 8, 2010

सन्मार्गाची दृष्टी

दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडू जैसा ।।
तो माझा ठायीं तैसा । मी तयामाजीं ।।
दिवा आहे तेथे प्रकाश आहे. यांचे जसे ऐक्‍य आहे. तसे संत जिथे असतात तेथे चैतन्य वास करीत असते. दिवा जसा अंधार दूर करतो. तसे संत भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करतात. भक्तांच्या ह्रद्‌यात भक्तीचा मळा फुलवितात. अंधकारमय जीवन चैतन्याने भरून टाकतात. यासाठी संतसंग करावा. त्यांच्या सहवासाने आयुष्यात सन्मार्गाची वाट दृष्टीस पडते. दिवा जसा स्वतः जळतो व दुसऱ्याला प्रकाश देतो तसे संत भक्ताचे सर्व अपराध स्वतः घेऊन त्याला सन्मार्ग दाखवितात व भक्ताचे जीवन प्रकाशमान करून टाकतात. त्याला दृष्टी देतात. स्वतःच्या पातळीवर आणून बसवतात.

Saturday, August 7, 2010

अभ्यास

इये अभ्यासी जे दृढ होती । ते भरवसेंनी ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाची रीती । कळले मज ।।
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास हा आवश्‍यक आहे. आजकाल राजकारणात फक्त निवडणूक लढविणे आणि ती जिंकणे याचाच अभ्यास केला जातो. विकासकामांवर फारसा भर दिला जात नाही. आपले पद खुर्ची कशी टिकवून ठेवायची यावरच भर दिला जातो. याचेच सतत चिंतन, मनन, अभ्यास केला जातो. अनेक खासदार, मौनी खासदार म्हणून संसदेत ओळखले जातात. पण ते दरवेळी निवडून येतात. मतदार संघातील प्रश्‍नांची त्यांना जाण नसते पण मतदार कसे मत देतील याचाच त्यांचा अभ्यास असतो. यामुळेच सध्या देशाचा विकास खुंटला आहे. अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. नुसती मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यास कशाचा करायचा हे देखील महत्त्वाचे आहे. परीक्षेत मार्क कसे पडतील याचेच नियोजन करून तसा अभ्यास केला जातो. यामुळे सध्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थ्यी गुणवत्ता यादीत पाहायला मिळतात. पण संशोधनात्मक वृत्ती त्यांच्यात वाढीस लागायला हवी तरच त्या गुणवत्तेचा खरा फायदा होईल. राजकारण्यांनी फक्त मतांचा अभ्यास न करता विकासात आडकाठी ठरलेल्या प्रश्‍नांचा अभ्यास करायला हवा. खरा मुरब्बी राजकारण्याला प्रश्‍न हाताळण्याची खरी जाण असते. विकास साधून मते मिळविणारेच खरे राजकारणात टिकून राहतात, हे विसरता कामा नये. अध्यात्मात साधनेतून ब्रह्मत्वाकडे जाता येते. पण यासाठी साधना कशी करायची याचा अभ्यास हवा.

Wednesday, August 4, 2010

लहरींचा शोध

ऐसी शरीरा बाहेरलीकडे । अभ्यासाची पाखर पडे ।
तंव आतु त्राय मोडे । मनोधर्माची ।।
पूर्वीच्या काळी साधनेसाठी डोंगर कपारीत गुहांची निर्मिती केली जात होती. पण साधनेसाठी गुहाच का? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडला असणार. पूर्वी तितके ध्वनी प्रदूषणही नव्हते. सध्याच्या आधुनिक युगात ध्वनी प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा काळात साधनेसाठी गुहांचा वापर केला जात नाही पण त्याकाळी गुहेत जाऊन साधना केली जात होती. विद्युत लहरी दिसत नाहीत. त्या वातावरणात असतात. या लहरींचा परिणाम आपल्या मनावर होतो. वातावरणातील या लहरी गुहेमध्ये पोहोचू शकत नाहीत. पोहचल्यातरी त्याची तीव्रता खूपच कमी असते. नगण्य असते. याचे उत्तम उदाहरण सांगता येऊ शकेल म्हणजे गुहेत मोबाईलला रेंज मिळत नाही. पण त्या काळी हे तंत्रज्ञान नव्हते. मग या लहरींचा शोध नेमका केव्हा लागला. आपल्या साधुसंतांना या लहरींची कल्पना निश्‍चितच असणार. म्हणूनच तर त्यांनी साधनेसाठी गुहांची निर्मिती केली. पण काही असो शरीरा बाहेरच्या या लहरींच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी गुहेत साधना केली जात होती. मनाला स्थिर ठेवण्यासाठी किती खोलवर विचार त्याकाळी केला जात होता. हे यातून दिसते.

Tuesday, July 27, 2010

जागृती

सायंकाळची वेळ होती. रामू कृषी पदवीधर होऊन गावाकडे परतला होता. एस.टी.तून उतरताना त्याचा मित्र सुनिल त्याला भेटला.
काय रे राम्या, कसं येण झालं ? गावकडची आठवण बिठवण कशी काय आली ?
अरे सुनिल, खूप गावाची खूप आठवण येते रे. सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेलं आपुला हा गाव खूपच सुंदर आहे रे. येथून जाण्याची इच्छाच होत नाही. तु कसा आहेस ?
"बरा आहे. पण काय र समदा बदलाईस बर का? आवाजात सुद्धा शहरी बाज आलाय तुझा. पण काय रे समद्या सामानासह तू कसा काय परतलाय?'
"अरे माझे शिक्षण पूर्ण झाले. आता मी कृषी पदवीधर झालो आहे. वाटत आता गावाच्या विकासातच लक्ष घालाव. गावातील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान शिकवाव व प्रगतीशील शेतकरी बनवाव'
" अर पण तु गावात राहून करणार काय? सगळी शिकल्याली पोर शहराकडे जायची भाषा करतात. त्यासाठी आईबापाशी भांडतात. अन तू शिकून इथ येऊन गावात या खोपटात बसतान मांडणार?'
" हो, मी इथेच येणार गावातील आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहे. फळबाग लागवड, पोल्ट्री उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग उभे करणार आहे.'
"बरं बाबा मी चलतो. आपण उद्या चावडीच्या पारावर भेटू'
बऱ्यांच दिवसांनी रामू आपल्या गावच्या वाड्यात प्रवेश करतो. रामूचे वडील शाळेत मुख्याद्यापक आहेत. पण कामानिमित्त ते बाहेरगावीच असतात. आठवड्यातून घरी येतात. आई घरकाम पाहात शेती पाहाते.
दुसऱ्या दिवशी रामू गावच्या चावडीच्या पारावर जातो. सगळी शेतकरी मंडळी नेहमी प्रमाणे राजकिय गप्पात रंगलेली असतात. वृत्तपत्राची पाने चाळत त्यांच्या राजकिय गप्पा अधिकच रंगत असतात.
"काय पाव्हन, कनच्या गावच'
" आबा, तुम्ही ओळखल नाही मला. मी मुख्याद्यापकांचा मुलगा'
" आरं, रामू किती मोठा झालास. वळखलाच नाहीस किंर. कसा आहीस. बर चाललय नव्ह'
"हो ठिक चाललय. आबा आपल्या गावात सोसायटी होती ना?'
" हो व्हती बाबा पण समद बंद पडलय आता. कर्जाच्या ओझ्यान सगळ बुडाल. मधमाशापालनाचा व्यवसायही गेल्या तीन चार वर्षापासून बंद पडलाल. समद राजकारणात बुडाल रे"
"काय म्हणता काय?'
"तू त्यात पडू नक बाबा शाहण्याच काम नव्ह ते. ते समद घाणेरड राजकारण हाय. समद्यांची वाट लागलीया. पतसंस्था बुडाली. त्यात गोरगरीबांची पुंजी अडकलीया'
हे ऐकून रामू नाराज होतो. गावाचा फेर मारण्यासाठी आणि गावात आणखी काय बदल झालेत हे पाहण्यासाठी तेथून बाहेर पडतो.
दुसऱ्या दिवशी रामू असाच गावचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. गाव कामगार पाटलाच्या लिंबूच्या बागेत त्याला लोकांची गर्दी दिसली. गर्दी कसली जमली आहे या उत्सूकतेने तो तेथे गेला. पण त्यांने पाहीले की लिंबावरील "लिफ मायनर' या किडीची पुजा गावकरी करीत आहेत. यामध्ये गावातील प्रतिष्ठीत सुशिक्षित महिलाही आहेत. हे पाहून तो आश्‍चर्यचकीत झाला.
"काय कसली पुजा चालली आहे.'
" अरं रामू पाटलांच्या लिंबावर नागाच्या छटा उमटल्यात. त्याची पुजा चाललीया'
रामू हे पाहून हसू लागला. त्यांने गावकऱ्यांना ही पानावरील किड असल्याचे समजाविण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी त्यालाचा खुळ्यात काढले.
"अहो, माझ समजून घ्या. ही किड लिंबूवर्गीय फळझाडाची नंबर एकची शत्रू आहे. या किडीची अळी कोवळी पाने पोखरून पानातील हरितद्रव्य खात पुढे जाते. त्यामुळे तिच्यामागे पानावर पारदर्शक नागमोडी पोखरलेली चंदेरी पट्टे पडत जातात. यालाच तुम्ही नागछटा म्हणून पुजा करत आहात. ही सगळी अंधश्रद्धा आहे.'
पण गावकऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अशा घटनांना रामू नाराज झाला. त्यांने गाव सोडून शहरात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांना समजावणे तितके सोपे नाही. असे त्याला वाटते. जाताना तो गावच्या चावडीच्या फळावर या किडीबाबत माहिती मात्र लिहीतो.
पानातील हरितद्रव्य हे झाडाचे अन्न तयार करण्याचे मूळ साधन आहे. तेच ही किड खावून नाहीसे करते. त्यामुळे किड लागलेली पाने आकाराने लहान होतात व चुरगळली जातात. पाने आखडतात. सुकतात. गळून पडतात. झाडाची वाढ खुंटते. असा मजकूर तो फलकावर लिहीतो.
काही दिवसांनी गावकामगार पाटलाची बाग सुकल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येते. रामू सांगत होता. ते खरे आहे. हे लक्षात येते. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. व रामूला गावात बोलावून घेता.
रामू आता गावात सुधारणा करू लागला आहे. पाण्याची समस्या त्याने सोडवली आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ केली आहे. फळावर प्रक्रिया करणारे उद्योग त्यांने सहकारातून उभारले आहेत. आज तो गावातील एकटाच प्रगतशील शेतकरी नाही तर सारा गावच त्यांने प्रगतशील शेतकऱ्यांचा केला आहे.

Tuesday, July 20, 2010

तेजाची वाट

जे जया वाटा सूर्य जाये । तेउते तेजाचे विश्‍व होये ।।
तैसे तया पावे ते आहे । तोचि म्हणउनी ।।
आदर्शवादी व्यक्ती, संत ज्या मार्गाने जातात. त्या वाटावर आनंदाचे नंदनवन फुलते. यामुळे अशा महंत व्यक्ती आपल्या घरी याव्यात अशी इच्छा आपण मनी धरतो. अशा संतांचे चरण आपल्या हुंबऱ्याला लागावेत. त्यांच्यातुन ओसंडणाऱ्या प्रेमाने मनातील नाराजी, यातना दूर पळतात. त्यांच्या विचारांनी, उपदेशांनी दैनंदिन जीवनात उत्साह वाढतो. अशा या तेजस्वी संतांचा नित्य सहवास लाभल्यास आपणही तेजस्वी होऊन जाऊ. माउली, तुकोबांच्या पालख्या आता पंढरीत दाखल झाल्या आहेत. वारीचा मार्ग ज्ञानोबा, तुकोबांच्या जयघोषाने चैतन्यमय होतो. असे चैतन्य आपल्या गावाही निर्माण व्हावे यासाठी केवळ देहु, आळंदीहून निघणाऱ्या पालख्या आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघू लागल्या आहेत. पावसहून स्वामी स्वरुपानंदांची, सासवडहून सोपानदेवांची, त्र्यंबकेश्‍वरहून निवृत्तीनाथांची तसेच इतर अनेक संतांच्या पालख्या पंढरीत येतात. आपल्या गावाची पायवाटही चैतन्यमय व्हावी हीच या वारकऱ्यांची इच्छा असते. विठोबांच्या दर्शनाने त्यांच्यात पुन्हा पुढच्यावर्षी दिंडीत सहभागी होण्याचे बळ मिळते. त्यांचे सारे शरीर वारीच्या ओढीने तेजस्वी होते.

Tuesday, July 13, 2010

विवेकाचे गाव

ते विवेकाचे गाव । की परब्रम्हींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रम्हविद्येचे ।।
आदर्श गाव योजनेचे संकल्पना सध्या अनेक गावात राबविण्यात येत आहे. पण पूर्वी जेव्हा ही कल्पना राबविण्यात आली तेव्हा अध्यात्माची जोड त्याला देण्यात आली होती. देव देवळावर जनतेचा विश्‍वास असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर लोकांचा यावरील विश्‍वास अधिकच वाढू लागला आहे. मनाच्या शांतीसाठी लोक याकडे वळताना पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी गावातील अनेक तंटे हे चावडीमध्ये सुटायचे नाहीत पण ग्राम देवळात ते सहज सुटायचे. पिढ्यान पिढ्या चालत आलेले वैर एका झटक्‍यात देवळात सुटल्याची अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. आदर्श गावाच्या निर्मितीसाठी मंदीरांचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही. सध्या अनेक गावात दुपारच्या वेळी पत्त्याचे खेळ रंगतात. अशा चंगळवादी संस्कृतीला मार्ग दाखविण्याची आज गरज आहे. काळ बदलत चालला आहे. पूर्वीचे दिवस आता राहीले नाहीत. रिकाम टेकड्या माणसांना आता काही कालावधीत जगणे असह्य होणार आहे. यासाठी गावातील मंदीरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि भरकटलेल्या जनतेला वास्तवाचे भान करून देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विवेकी गावे तयार करण्याची गरज आहे. अशा गावात ब्रम्हविद्या नांदते हे विचारात घ्यायला हवे.

राजेंद्र घोरपडे,
पुणे

Friday, July 9, 2010

खरा सन्याशी

खरा सन्याशी
आणि मी माझे ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण ।।
पार्था तो सन्यासी जाण । निरंतर ।।
खरे नुकसान मीपणामुळेच होते. हट्ट असावा पण तो कशाचा असावा याला महत्त्व आहे. अंहकाराचा हट्ट नको. हिटलर, सद्दाम हुसेन हे शुर होते, महत्त्वकांक्षी होते. सतत जिंकण्याची त्यांना हौस लागली होती. जग जिंकायला ते निघाले होते. जगावर आपली सत्ता असावी हे त्यांचे स्वप्न होते. या हट्टा पायी या त्यांच्या मीपणामुळे झाले काय? हा इतिहास सांगण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. जगावर आपली सत्ता असावी यासाठी अनेक राज्यांनी युद्धे केली. पण माउलीने जगावर राज्य कसे करायचे हे सांगते. ही सत्ता कशी मिळवायची. एका जागी बसून साऱ्या जगाचे भूत- भविष्य जाणणे ही जगावर सत्ता मिळविल्या सारखेच आहे. दुसऱ्याला शरण येण्यासाठी भाग पाडून जगावर सत्ता मिळविण्यापेक्षा स्वतःतील अहंकार, मीपणा सोडून खरा सन्याशी होऊन आत्मज्ञानी होणाराच खरा महासत्ताक आहे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Thursday, July 8, 2010

श्रवणातून मोक्ष

श्रवणातून मोक्ष

तैसा मनाचा मारु न करिता । आणि इंद्रिया दुःख न देता ।।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचीमांजी ।।

ग्रामीण भागात आजही मृत्यूशय्येवर पडलेल्या व्यक्तीसमोर देवाधर्माची पुस्तके वाचण्याची पद्धत आहे. यामागे नेमका कोणता हेतू कोणता? अध्यात्मामध्ये नुसते मन लावून ऐकल्यानेही मोक्षाचा लाभ होतो. मृत्यूसमयी तुमचे जे विचार मनात घोळत असतात ती गती पुढील जन्मी मिळते. मनुष्य देहात जन्म घेण्याचा मुख्य उद्देश हा मोक्ष मिळविणे हा आहे. मृत्यूसमयी जर तुमच्या मनात देवाचे नाम स्मरण होत राहील तर त्याला सहजच मोक्ष प्राप्त होतो. यासाठी सतत नामस्मरणार राहणे हे चांगले. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुंची भक्ती यासारखी सोपी वाट नाही. गुरुमंत्राचे सतत नामस्मरण केल्याने मुक्तीचा मार्ग सुकर होतो. संत गोरा कुंभार मातीला आकार देता देता नामस्मरण करत असते. कोणत्याही कामात असताना नामस्मरण सतत करावे. नामामध्येच शक्ती आहे. यासाठी सतत नामस्मरणात असावे.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Wednesday, July 7, 2010

आत्मज्ञानासाठी गुरुसेवा

आत्मज्ञानासाठी गुरुसेवा
ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी आथि आणावे ।।
तरी संता या भजावे । सर्वस्वेशी ।।
जे ज्ञानाचा कुरूठा । तेथ सेवा हा दारवंटा ।।
तो स्वाधीन करू सुभटा । वोळगोनी ।।
आत्मज्ञानी होण्यासाठी सतसंग हा आवश्‍यक आहे. गुरुकृपेशिवाय आत्मज्ञानाचा लाभ होत नाही. आत्मज्ञानाची ओढ लागली, गोडी लागली की सहजच पाऊले गुरुच्या शोधात बाहेर पडतात. पण इथे गुरु भेटल्यानंतर जसा शिष्य गुरुच्या शोधात असतो तसेच गुरुही शिष्याच्या शोधात असतो याची अनुभुती निश्‍चितच येते. गुरु कसा ओळखावा हा सर्वांचा नेहमीचा प्रश्‍न आहे. देशात उपदेश सांगणारे अध्यात्मावर बोलणारे निरुपण करणारे असंख्य गुरु आहेत. पण खरा गुरु हा मनकवडा असतो. तो तुमच्या मनातील सर्व गोष्टी जाणतो. त्याच्या चरणी लीन झाल्यानंतर तुम्हाला शांती लाभते. मनाच्या शांतीनंतर गुरुंचा अनुग्रह होतो. यासाठी भक्ती- सेवा करावी लागते. सेवा याचा अर्थ साधना असा आहे. मनाच्या शांतीसाठी साधना आवश्‍यक आहे. मग अंतःकरणात आपोआप बदल घडतो. आपल्या वागण्यात, बोलण्यात मृदुता येते. जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. यातूनच खऱ्या शांतीचा बोध होतो. आत्मज्ञानाचीही अनुभुती येते.

राजेंद्र घोरपडे, पुणे

Tuesday, July 6, 2010

आली आषाढी

आली आषाढी
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी का कठीणु जाहला ।।
तरी हाची अनुष्ठिला । भला देखे ।।
विद्यार्थ्याने अभ्यास करणे हा त्याचा धर्म आहे. शेतकऱ्यांने शेतात कष्ट करणे हा त्याचा धर्म आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतःवर पडलेली जबाबदारी न चुकता पार पाडणे ही त्याचा धर्म आहे. स्वतःचे कर्तव्य हाच खरा धर्म आहे. आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्याने साधना करणे हा त्याचा धर्म आहे. हा धर्म पाळताना अनेक अडचणी येतात. पण त्या कठीण प्रसंगाना सामोरे जावे. न डगमगता, न भिता आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करणे हाच खरा धर्म आहे. शेती करताना नुकसान झाले म्हणून शेती सोडून देणे हा धर्म नाही. शांततेने त्यावर विचार करून त्यात प्रगती साधने आवश्‍यक आहे. त्यातच खरे धर्माचे पालन आहे. अनेक जण असे म्हणतात की साधना करता अनेक अडचणी येतात. वेळच मिळत नाही. काहींना काय करावे हेच सुचत नाही. साधना होतच नाही म्हणून ती टाळणे योग्य नाही. साधनेची गोडी लागावी लागते. गोडी लागली की ती आपोआप होते. आपण जे कर्म करतो त्याची गोडी लागावी लागते मग कंटाळा येत नाही. शेतीच्या कामाची गोडी लागली तर प्रगतीशील शेतकरी होण्यास फारसा वेळ लागत नाही.

राजेंद्र घोरपडे
पुणे