Tuesday, June 26, 2018

ज्ञानेश्‍वरी परंपरा आणि देवनाथांचा शोध


भारतात अनादि कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरुशिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. नराचा नारायण करणारी ही गुरु-शिष्य परंपरा आहे. ब्रह्मसंपन्न, आत्मज्ञानी गुरुंकडून ज्ञानदान यात केले जाते. ज्ञानदानाचा हा वारसा अनुवंशिक नाही. याला जातीचे, वयाचे, उच्च-नीचतेचे बंधनही नाही. कोणीही व्यक्ती या ज्ञानाचा लाभार्थी होऊ शकतो. भक्तीने ते ज्ञान मिळवता येते. अनादी कालापासून आत्मज्ञानी गुरु-शिष्याची सुरु असलेली ही भक्तीची परंपरा... 

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । 
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्मम्‌ ।। 

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । 
भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि ।। 

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्‍वराः । 
गुरुःसाक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

अखण्ड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्‌ । 
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

प्रल्हाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीष । 
शुकशौनक-भीष्मदाल्भ्याम ।। 

रुक्‍मांगदार्जुन वसिष्ठ बिभीषणादी पुण्यानिमान्‌ 
परम भागवतान्‌ स्मरामि ।। 

आदिनाथं च मच्छिंद्र गोरक्षं गहिनीं तथा । 
निवृत्तिं ज्ञानदेवाय देव-चूडामणे नमः ।। 

अखण्ड आनंदरुपाय समज्ञानप्रदायने 
भवभ्रान्तिर्विनाशाय श्रीगुण्डाख्य रामचन्द्र महादेव 

रामचन्द्र श्री सद्‌गुरु विश्‍वनाथाय श्रीसद्‌गुरु गोविंदनाथाय 
श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ।। 

धर्मरक्षणार्थ प्रकट 
त्या त्या कालातील परिस्थितीनुसार विविध सामाजिक, धर्मरक्षणाची कार्ये या परंपरेकडून केली गेली. भक्त प्रल्हादाच्या काळाचा विचार केला तर त्यांचे जन्मदातेच त्याचे विरोधक होते. राक्षसी विचारांचा वाढता प्रभाव नष्ट करण्यासाठी देवाने (गुरूने) भक्तांच्या आग्रहापोटी अवतार घेतल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट होते. प्रल्हादासाठी नृसिंहाने अवतार घेतला. कौरवांच्या विनाशासाठी कृष्णाचा अवतार झाला. पण येथे या भक्तीचे स्वरुप गीतेच्या रुपातून प्रकट झाले. हे ज्ञान संजयाच्या वाणीतून धृतराष्ट्राला समजले.

ब्रह्मविद्येचा सुकाळ 
नंतरच्या काळात नाथांच्या परंपरेतून या ज्ञानाचा प्रसार झाला. आदिनाथापासून मच्छिंद्र-गोरक्ष-गहिनी अशी ही परंपरा विस्तारत गेली. पण काळाच्या ओघात या ज्ञानावर हक्क सांगितला जाऊ लागला. काहींना यापासून वंचित ठेवण्याचे प्रकार बळावले. संन्यासाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ लागला. हा प्रकार थांबला जावा, या ज्ञानावर सर्वांचा अधिकार आहे. हे ज्ञान सर्व विश्‍वात पसरले जावे. सर्वांना मिळावे या उद्देशाने मराठी प्रांतात संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीच्या रुपाने हे ज्ञान सर्वांसाठी उघड करून सांगितले. ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून हे ब्रह्मज्ञान मराठी भाषेत प्रकट झाले. भाषेचाही या ज्ञानातून विस्तार झाला. त्यातून मराठी भाषेला अमरत्व प्राप्त झाले. भक्तीची ही परंपरा महाराष्ट्रात विस्तारली. सर्व सामान्यांना हे ब्रह्मज्ञान सहज हस्तगत करता येऊ लागले. ज्ञानप्राप्तीसाठी असणारा योगाचा बिकट मार्ग दूर करुन ज्ञानेश्‍वरांनी सहजयोग सांगितला. भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. भक्तीची बीजे या मराठी नगरीत रुजवली. या परंपरेत मग संत नामदेव शिंपी, संत गोराकुंभार, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत तुकाराम असे विविध जातींचे संत झाले. यातून हे ज्ञान सर्व मानवजातीसाठी आहे याचा बोध झाला. नाथ परंपरेतील विविध संतांनी ग्रंथ रूपाने त्याचा विस्तार केला. आजही तो होत आहे व यापुढेही तो होत राहील.

ज्ञानेश्‍वरांचे शिष्य देवनाथांचा शोध 
काळाच्या ओघात अनेक संतांची, ऋषींची कार्ये काळाच्या पडद्याआड गेली. त्यांचा शोध बोध घेण्याचा प्रयत्नही आजच्या काळातील संत घेत आहेत. कोल्हापुरातील दादा माधवनाथ सांगवडेकर यांनी संत ज्ञानेश्‍वरांचे शिष्य देवनाथ महाराज यांचा शोध घेतला. त्यांची पैठण येथील समाधी दादांनी शोधून काढली. त्यांनी देवनाथ महाराज यांच्यावर केलेल्या भक्तीतूनच हे शक्‍य झाले. 1990 मध्ये दादा माधवनाथ महाराज यांना देवनाथ महाराज यांनी दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांनी भक्तीतूनच देवनाथ महाराज यांचे चित्र जनार्दन सुतार यांच्याकडून रेखाटून घेतले. मधुकर कुलकर्णी (हंसगीत) यांच्याकडून देवनाथांच्या समाधी शोधासाठी दादांनी आरती लिहून घेतली. त्यांच्या या भक्तीतूनच पैठण येथे 2001 साली देवनाथ महाराज यांची समाधी त्यांना मिळाली.

मंगलाचरणात उल्लेख 

पावसच्या स्वामी स्वरुपानंदांच्या मंगलाचरणातील पाचव्या ओवीमध्ये ज्ञानदेवांचे शिष्य देवनाथ महाराज असा उल्लेख सापडतो.

ज्ञानदेव- शिष्य देव, चूडामणि ।
पुढे झाले मुनि गुंडाख्यादि ।। 5 ।।

संत दासगणू व दादांनी सांगितलेला देवनाथांचा परिचय 
देवनाथ महाराज हे मूळचे गुजरातचे. बलसाड जवळच्या गावात ते राहात होते. त्यांचे नाव शिवदेव भगत असे होते. गिरनारची अंबा आणि द्वारकेचा कृष्ण हे त्यांचे कुलदैवत. देवनाथ यांचे आजोबा गोरक्षनाथांचे अनुग्रहीत होते. तर आई-वडील दोघेही शंकराचे भक्त होते. पण देवनाथ महाराज सात वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील गेले. देवनाथ महाराज यांच्या मामांनी महाराष्ट्राच्या सीमेजवळील मुलीशी त्यांचे लग्न लावून दिले. पण देवनाथ कृष्णभक्तीत रमू लागल्याने त्यांचे मन संसारात रमेना. ते जगदंबेचे उपासक होते. जगदंबेने दिलेल्या दृष्टांतानुसार देवनाथ महाराजांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधीस्थळी जाऊन साधना केली. माऊलीचा अनुग्रह मिळावा यासाठी त्यांनी एका पायावर उभे राहून अनुष्ठान केले. 21 दिवस अहोरात्र अनुष्ठान केल्यानंतर माऊली प्रसन्न झाली. त्यांनी अनुग्रह दिला व परंपरा पुढे प्रवाहित करण्याचा अधिकारही दिला. त्यांना ज्ञानेश्‍वरीही भेट दिली व नेवासा येथे जाऊन पारायण करण्यास सांगितले. देवनाथ महाराज यांनी संत ज्ञानेश्‍वरांची ज्ञानदानाची परंपरा पुढे चालवली. देगलूरच्या चुडामणी महाराज यांना अनुग्रह देऊन देवनाथ महाराज यांनी पैठण येथे समाधी घेतली.

श्री भक्तिसारामृतमध्ये उल्लेख 
श्री संत दासगणू यांनी श्री भक्तिसारामृतात श्री सद्‌गुरु देवनाथ महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्रात त्यांनी देवनाथ महाराज यांनी समाधी कधी घेतली व त्यांची समाधी कोठे आहे याची माहिती नसल्याचे म्हटले आहे.

सिद्ध देवनाथ । महादयाळू प्रज्ञावंत । 
तयां माझा दंडवत । वारंवार असो हा ।। 266 ।। 

यांचा समाधीकाळ मशी । ठाऊक नाही निश्‍चयेशी । 
वा तत्समाधीस्थलासी । मी न जाणे श्रोते हो ।। 267 ।। 

श्री भक्तिसारामृत अध्याय 10 वा 

पण सद्‌गुरु दादा महाराज सांगवडेकर यांनी भक्ती व साधनेतून 2001 मध्ये देवनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध घेतला. गोदावरी नदीच्या तीरावर गणेशघाट, तारकेश्‍वर मंदिराजवळ, जुनानगर रोड, पैठण जि. औरंगाबाद येथे ही समाधी आहे. दादा महाराज यांचे शिष्य आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी देवनाथांच्या या समाधीचा जिर्णोध्दार केला असून तेथे आनंदभवन बांधण्यात आले आहे.

पारायणातून भक्तिविस्तार 

ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आदेशानुसारच देवनाथ महाराज यांनी ज्ञानेश्‍वरी परंपरेची शाखा पुढे चालवली. विस्तारासाठी देगलूरच्या चूडामणी महाराज यांना त्यांनी ज्ञानेश्‍वरी दिली. त्याचाही उल्लेख श्री भक्तिसारामृतच्या दहाव्या अध्यायात आहे.

पूर्वेस देगलूर प्रांतात । चूडामणी माझा भक्त । 
आहे तो तू करून छात्र । संप्रदाय वाढवी ।। 262 ।। 

ज्ञानेश्‍वरी ही त्यास द्यावी । आमुची आठवण ठेवावी । 
वृत्ती अभेद असावी । सर्व ठाई राजसा ।। 263 ।। 

श्री भक्तिसारामृत अध्याय 10 वा 

700 वर्षांनंतर आजही ज्ञानेश्‍वरीच्या पारायणातून या ज्ञानाचा प्रसार-प्रचार होतो आहे. देवनाथ महाराज यांनी नेवाशात पारायण केले. पारायणातून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. चुडामणी, गुंडा महाराज (देगलूर), रामचंद्र महाराज बुटी (नागपूर), महादेवनाथ महाराज (चिंचणी), रामचंद्र महाराज (विजापूर), विश्‍वनाथ महाराज (रुकडी), गणेशनाथ महाराज (बाबा वैद्य, पुणे), स्वामी स्वरुपानंद (पावस), गोविंदनाथ महाराज (रुकडी), दादा महाराज (कोल्हापूर) यांनी पारायणातून ब्रह्मसंपन्नता मिळवली. सामुदायिक ग्रंथ पारायणातून, वारीच्या माध्यमातून ही भक्ती परंपरा महाराष्ट्रात रुजवली जात आहे. या परंपरेने माणसाचे आचार-विचार घडवले आहेत. माणसातील माणूसकी टिकवून ठेवली. भक्तीच्या या परंपरेनेच खऱ्या अर्थांने माणुसकीची शिकवण दिली आहे. नराचा नरकासूर होऊ नये तर नारायण व्हावा हेच व्रत या भक्ती परंपरेने जोपासले आहे. सर्व विश्‍वाला हे ज्ञान हस्तगत व्हावे यासाठी ही भक्तीची पताका आजही फडकत आहे. गुरु-शिष्याची ही भक्ती परंपरा अनादि कालापासून अखंड भारत वर्षात सुरूच राहणार आहे.

निष्कर्ष ः 
अनादि कालाच्या या परंपरेचा विस्तार हा भक्तितूनच होत आहे. भक्तितूनच ज्ञानाची प्राप्ती होते. योगाचा खडतर मार्गापेक्षा भक्तिचा सहज सोपा असा मार्ग अवलंबून आत्मज्ञानी व्हायला हवे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या पारायणातून ज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे. या परंपरेचे आपणही स्वामी होण्यासाठी भक्तिचा हा मार्ग आत्मसात करायला हवा. आत्मज्ञानी सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाने आपणही आत्मज्ञानी व्हायला हवे व संतांचा हा वारसा पुढे चालवायला हवा.

संदर्भ - 

1. विश्‍वपंढरी मासिक - ऑगस्ट 2014 अंक 8 वा, लेख - तपसाधना लेखक - संगीता सांगवडेकर पृष्ठ क्रमांक 8 ते 26, संपादक - राममाया कुलकर्णी

2. श्रीमत संजीवनी गाथा - स्वामी स्वरुपानंद, लेखनकाल - शके 1867, पान नं. 1, प्रकाशक - देसाई बंधू पावस

3. वानरगीता - मधुकर कृष्ण कुलकर्णी तथा हंसगीत, प्रकाशक - मुनींद्र विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर

4. श्री भक्तीसारामृत अध्याय 10 वा - श्री संत दासगणु विरचित देवनाथ महाराज चरित्र, मुनींद्र सद्‌गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर स्मृतिग्रंथ 1993, पृष्ठ क्र. 123 ते 130, प्रकाशक - अध्यक्ष, अमृत महोत्सव स्मृतिग्रंथ समिती, श्री सद्‌गुरु विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर. 

Saturday, June 16, 2018

सन्यास

सन्यास

राजे सन्यास घ्यायचे. सर्व संपत्तीचा, राजसिहासनाचा त्याग करून ते जंगलात राहण्यासाठी जात. हिमालयातही साधनेसाठी जात. हे पूर्वीच्या दंतकथातून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात सन्यास या शब्दाचा वेदोक्त अर्थच या कथा कादंबऱ्यातून मांडला गेलेला नाही. राज्याने सन्यास घेतला म्हणजे त्याने राजेशाही थाट सोडून हातात कटोरा घेऊन मादूगरी मागत हिंडायचे. दारोदारी भीक्षा मागायची आणि साधना करायची असा त्याचा नित्यक्रम असल्याचेच चित्र कथातून मांडले जाते. सन्यासाचा खरा अर्थच अशा कथानकांमुळे जगासमोर येऊ शकला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर अनेक राजे काही वर्षांनी सन्यास घेतल्याचे सांगितले जाते. पण सन्यास कशासाठी घेतला जातो. त्या राजाच्या पुढच्या पिढींनी कोणते कार्य करायचे. त्या राजाच्या पुढच्या पिढीनेही सन्यास धर्माचा स्वीकार करायचा का. पण कोठेपर्यंत आणि हा सन्यास असतो तरी काय. सर्वसामान्य व्यकीनेही सन्यास घेतल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांनी असेच भटकत राहायचे काय. पूर्वीच्याकाळी अशा पद्धती नव्हत्या. सन्यास या शब्दाचा चुकीचा अर्थ मांडला गेल्याने मुळ सन्यास धर्मच विसरला गेला आहे. राजा असो व सर्वसामान्य माणसाचा सन्यास असो प्रंपच धर्माचे पालन करत त्याने परमार्थाचा स्वीकार करायचा असतो. 

सन्यास हा एक पवित्र धर्म आहे. या धर्माचा स्वीकार केल्यानंतर वेदोक्त आदेश काय आहे हे यासाठीच जाणून घेण्याची गरज आहे. 
 
सन्यासाचा वेदोक्त आदेश...
1. सकळ विश्वशांतीसाठी झटावे. 
2. दैन्य दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे 
3. जीवाजीवाची अध्यात्मसंवेदना जागी करावी 
4. त्रिभुवन आनंदाने भरावे 

सन्यास घेतल्यानंतर या चार गोष्टीचे पालन करावे असा वेदोक्त आदेश आहे. सन्यास म्हणजे सर्व संग परित्याग असा अर्थ नाही. राजा असो व सर्वसामान्य व्यक्ती सर्वांसाठी हा वेदोक्त आदेश समान आहे. पण दंतकथानकांमुळे मुळ नियमच बाजूनला राहीले गेले. अध्यात्माची मोड तोड करून खरे अध्यात्मशास्त्रच मुळात दुषित केले गेले. यासाठी अध्यात्मशास्त्राचा दंतकथातून नव्हे तर वेदावर, गीतेवर आधारित ग्रंथातून अभ्यास होण्याची गरज आहे. यातूनच खरे अध्यात्म विकसित होऊ शकेल. 

पण सध्याच्या नव्या पिढीत हे अध्यात्म आता रुजेल का. असा प्रश्न आपणास पडला असेल किंवा पुर्वीच्या अध्यात्माचे नियम आत्ताच्या नव्या तंत्राच्या युगात लागू होतील का असेही आपणास वाटणे स्वाभावीक आहे. काळ कोणताही असो. अध्यात्म हे शास्त्र आहे. शास्त्रातील प्रयोगाचा सिद्धांत हा कधी बदलत नसतो. मग अध्यात्मातील प्रयोगांचे सिद्धात कसे बदलले जातील. राजेशाही संपली. राजे राजवाडे आता राहीले नाहीत. आता लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये राजेशाहीतील कायदे बदलले आहेत. म्हणजे अध्यात्याचे नियम आणि कायदेही बदलले असे होत नाही. पण आज काय अध्यात्मिक मठांचे कायदे लोकशाहीत बदलले आहेत. खरतर इथेच खरी मोठी चुक झाली आहे. मठाचे कायदे बदलले. मठाच्या नियमानुसार आजकाल कोणीही मठाधिष, मठाधिपती होऊ लागले आहेत. स्वयंघोषित मठाधिपती, स्वयंघोषित महाराज यांचा सुळसुळाट याचमुळे तर पाहायला मिळत आहे. भगवी वस्त्रे घातली आणि तोंडात चार मंत्र पुटपुटले की झाले महाराज. चार चाैघांना सल्ले दिले की थाटला मठ आणि झाले मठाधिपती. अशीच आजकालची स्थिती झाली आहे. जुन्या मठांची कागदपत्रे गोळा करून हक्क दाखवून जमिनी लुबाडूनही मठाधिपती झाले आहेत. खरेतर नव्या कायद्याने मठाधिपती होण्याचा अधिकार त्यांना मिळालाच कसा. अध्यात्माचा गंधही नसणारे आजकाल मठाधिपती झाले आहेत. अध्यात्माच्या नियमांची मोडतोड करून संपत्तीच्या हव्यासापोटी, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, चंगळवादी संस्कृतीने खऱ्या अर्थाने या समाजमनावर आक्रमण केले आहे. समाजाची मनेही त्यांनी बदलवली आहेत. सरकारने अध्यात्मिक मठांचे नियम करताना काही कायदे हे अध्यात्माच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने अध्यात्म संस्कृतीचा, अध्यात्म शास्त्राचा विकास होईल. अन्यथा अध्यात्माच्या नावाने थोतांडशास्त्र विकोपाला जाईल. यातून ढोंगी, स्वयंघोषीत महाराजच तयार होतील. त्यांना राजआश्रयही दिला जात आहे. अशाने अशा मठात आत्महत्या, गुन्हे हे घडणारच. हे थांबवायचे असेल तर अध्यात्माच्या नियमांनुसार कायदे कडक करण्याची गरज आहे. 

गोड बोलणे, माया करणे, लोकांना आपलेसे करणे त्यांच्यावर छाप पाडणे हे ज्यांना जमते ते निश्चितच स्वयंघोषित महाराज होतात. स्वच्छ कपडे परिधान करायचे, चार गोड शब्द दुसऱ्याच्या मनाला स्पर्श करतील अशा पद्धतीने बोलायचे थोडे नेतृत्त्व काैशल्य आत्मसात केले की झाले. जय हो जय हो म्हणत मग महाराज होण्याचा मार्ग मोकळा. जनतेलाही अशीच व्यक्ती आपलीसी वाटते. यातून आपले शोषण कधी होते याचे भानही त्यांना राहात नाही. इतके ते त्यात गुंतलेले असतात. अशा महाराजांचे खरे स्वरूप उलघडले तरी ते स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्याच्यावरही त्यांचा विश्वास नसतो इतके ते यामध्ये गुरफटलेले असतात. 

यावर खऱ्या साधुसंतांनी उपाय सांगितले आहेत. अशा ढोंगी साधुंची लक्षणे वारंवार सांगितली आहेत. अध्यात्माचे परखड सत्य संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितले आहे. गीतेत सांगितले आहे. तरीही आपण ते स्वीकारत नाही. पान, फुल, फळाव्यतिरिक्त कोणतेही दान संत स्वीकारत नाहीत. तेही प्रेमाने, श्रद्धेने दिले तरच ते स्वीकारतात. तरीही जनता लाखोच्या देणग्या आेतून संतांना विकत घेतल्याची भाषा करतात. संत हे सर्वांचे असतात. त्यांना सर्वजण सारखेच असतात. दान न देणारा व कोठ्यावधीचे दान देणारा दोघेही त्यांच्यासाठी समान असतात. फक्त नामाचे दान ते स्वीकारतात. त्यांना नामाने जिंकता येते. नामानेच त्यांचे मन जिंकता येते. त्यांनी दिलेले नाम सदैव जपले तर ते सदैव आपल्या पाठीशी असतात. आपणास आधार देतात. नाम हे धनाने घेता येत नाही. नाम हे अंतकरणातून घ्यावे लागते. नामास्मरणातूनच मोक्ष प्राप्त होतो. सद् गुरूंच्या नामस्मरणातून आत्मज्ञान प्राप्त होते. नामासारखे दुसरे साधन नाही. साधनाही त्याचीच करायची असते. आणि आत्मज्ञानी व्हायचे असते. तरच खरा सन्यास सार्थकी लागेल. सन्यासाची चारसुत्री आत्मज्ञान प्राप्तीनंतरही जोपासायची असते. सकळ विश्वशांतीसाठी झटावे. दैन्य दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे. जीवाजीवाची अध्यात्मसंवेदना जागी करावी. त्रिभुवन आनंदाने भरावे यासाठीच सन्यास घ्यायचा असतो. सन्यास म्हणजे संसाराचा त्याग नव्हे. संपत्तीचा त्याग नव्हे. तर हा पवित्र धर्म या चारसुत्रीत सांगितला आहे. त्याचे पालन करणे हा सन्यास आहे.