Tuesday, March 27, 2018

हो मी सायकल वापरतो...



आज काल सायकल वापरतो असे म्हटले तर थोडे आश्‍चर्य वाटण्यासारखे आहे. त्यात रोज ऑफिसला सायकल घेऊन येतो, असे सांगितले तर काय म्हटले जात असेल हे इथे न सांगितलेलेच बरे. पण हो मी रोज ऑफिसला सायकलने जातो. त्यात मला कधी लाज वाटली नाही. कोण काय म्हणेल याची मी कधीही फिकिर केली नाही. मला जे वाटते, माझ्या मनाला जे पटते तो विचार मी मनापासून जोपासतो. तो मी माझा छंदच समजतो. माझ्या मनाला वाटते मी सायकल वापरावी, म्हणून मी रोज सायकलने ऑफिसला जातो. तसे याला कोणी विरोध केल्याचे मला तरी आठवत नाही. तसे टिंगलही कोणी केल्याचे मला आठवत नाही. माझ्या पाठीमागे बोलत असतील, पण ते मला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यापासून दुःखी होण्याचा काही प्रश्‍नच येत नाही. ऑफिसला सायकल घेऊन आल्याने स्वतःची पत कमी होते असे मला तर कधी वाटले नाही. कदाचित ऑफिसमध्ये याबाबत वेगळा विचार केलाही जातही असेल पण माझ्या निदर्शनास तरी कधी आले नाही. त्यामुळे यावर न बोललेलच बरे..

गेली सात आठ वर्षे रोज सायकल वापरतो. पण आजच हे सांगावे का वाटले असा प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. कारण ही तसेच आहे. पर्वा रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास ऑफिसला निघालो होतो. वाटेत आयटीआय संभाजीनगर दरम्यान एक सद्‌गृहस्थ भेटले. तेही सायकलवर होते. आयटीआयपासून संभाजीनगरकडे येताना थोडी चढण आहे. साहजिकच त्यांच्या व माझ्या सायकलचा वेग थोडा मंदावला. त्यांनी माझ्याकडे आश्‍चर्याने पाहात विचारले, "रोज सायकल चालवता.' मी म्हटले "हो' ही सायकल घेऊन सात-आठ वर्षे होत आली. तेव्हापासून रोज मी सायकल चालवतो.

त्यांना थोडे आश्‍चर्य वाटले. पण मी रोज सायकलने ऑफिसला जातो म्हटल्यावर ते थोडे थांबले व त्यांनीही मला थांबायला सांगितले. मी ही थांबलो. ऑफिसला आणि सायकल म्हटल्यावर कोणालाही आश्‍चर्य वाटणार यात मला फारसं काही वाटले नाही. कारण आत्तापर्यंत हा प्रश्‍न मला कित्येकदा अनेकांनी विचारला आहे. यामुळे मलाही त्यात फारसं काही वाटले नाही. पण त्यांना माझी चौकशी करावी वाटली म्हणून मी ही थांबलो, कारण तेही सायकलवर होते. त्यांनी सांगितले आमचा एक सायकल चालवणाऱ्यांचा गट आहे. आम्ही दर रविवारी एखादे ठिकाण शोधतो व तेथे सायकलने जातो. त्यांनी मलाही या गटात सामिल होण्याचे निमंत्रण दिले. मी ही ते स्वीकारले. पण इतक्‍या वर्षात आत्तापर्यंत असे कोणी भेटले नव्हते. इतक्‍या आत्मियतेने त्यांनी माझी चौकशी केली, याचे मला समाधानही वाटले. म्हणून मला आज हे लिहावेसे वाटले. अशी चौकशी करणारी माणसे फारच थोडी आहेत. त्यात सायकल वापरणाऱ्या माणसांची चौकशी म्हणजे विरळच. पण मला एक समाधान वाटले.

व्यायामासाठी सायकल चालवणारे अनेकजण आहेत. दररोज सकाळी भेटत असतात. त्यामुळे सायकलचे महत्त्व काय आहे, हे मला सांगावेसे वाटत नाही. ज्याची त्याची आवड असते. मला सायकल चालवायला आवडते. तो मला छंद आहे. अगदी लहानपणापासून मला सायकल चालवण्याचा छंद आहे. लहानपणी पाचवी-सहावीला असताना मी सायकल शिकलो. तेव्हा आमच्याकडे सायकल नव्हती. रूकडीमध्ये आम्ही राहायला होतो. तेव्हा सायकली भाड्याने मिळत असत. वीस पैसे अर्धा तास व तीस पैसे तास असा दर होता. आम्ही एक तास सायकल चालवत होतो. लहान सायकली होत्या. त्यावर बसता येत नव्हते. मग नळीच्या खालून दुसऱ्या बाजूच्या पायंडलवर पाय टाकून सायकल पळवत होतो. मागे एकजण धरायला असायचा. वेग वाढला की मागच्याचा हात सुटायचा, तसा आमचा बॅलन्सही सुटायचा. बऱ्याचदा पडायचो. पण सायकल शिकलो. रुकडी ग्रामपंचायतीच्या आवारात मोकळे पटांगण होते. या पटांगणात गोल गोल फेऱ्या मारून सायकल शिकलो. आजही ते दिवस आठवतात. कारण सायकल हे तेव्हाचे प्रिय वाहन होते. गाडी फारशी कोणाकडे नसायची. तेव्हा सायकल हेच लोकप्रिय वाहन होते. दुचाकी असणे हे त्या काळात प्रतिष्ठेचे समजले जायचे.

सायकलचे किस्से खूप सांगता येतील. तसे या विषयावर पुस्तकही होऊ शकते. कधी वेळ मिळालच तर नक्कीत हे पुस्तक लिहता येईल. एकदा तर मी कोल्हापूरातील साळोखेनगरमधून रूकडीला सायकलवरून गेलो होतो. त्यावेळी सर्वानीच आश्‍चर्य व्यक्त केले होते. जवळपास 20 किलोमीटरचे हे अंतर पण सायकलने प्रवास. घरात समल्यावर तर आईचा पाराच चढला होता. कारण वय अवघे पंधरा-सोळा वर्षे होते. इतक्‍या लहान वयात सायकलने प्रवास करणे योग्य वाटत नव्हते. त्याकाळात सायकल हेच एकमेव साधन असल्याने आम्ही बऱ्याचदा शेजारच्या गावात जाताना सायकल वापरत असू.
दिपावली-उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला रूकडीतून सायकलने जाणे हा तर नेहमीचा उपक्रम होता. वाटेत नदी आहे. उन्हाळ्यात नदीत पाणी नसते. त्यामुळे पात्रातून सायकल न्यायला काही अडचण येत नसे आणि पाणी असलेच तरी नदीत नावही असायची. त्यावरून नदी पार करता येणे शक्‍य होत असे. बऱ्याचदा सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला सायकलने जाण्याचा योग आला. कधी रूईच्या धरणावरून तर कधी चिंचवडमार्गे नावेतून किंवा पंचगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून सायकल घेऊ गेलो. रेल्वे पुलावरून एका पतऱ्यावरून चालत जावे लागते. तो अनुभव खूपच रोमांच आणणारा आहे. खाली पाहीले तर खोल पाणी, आजूबाजूला पाहीले तर हिरवेगार रान. पण नजर फिरवायचेही धाडस व्हायचे नाही. पाय थरथरत कसाबसा पुल पार करायचा. त्यात रेल्वे येण्याचीही भीती असते. असे लहानपणीचे सायकलचे किस्से सांगता येण्यासारखे आहेत. पण त्याकाळात सायकल व्यतिरिक्त अन्य साधन फारसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सायकल हाच प्राधान्यक्रम होता.
आता काळ बदलला आहे. अहो दुचाकी काय आता चार चाकीशिवाय ऑफिसला जाता असे सांगणे म्हणजे स्वतःची अब्रु घालवून घेण्यासारखे आहे. पण पर्यावरणाचाही विचार आता करण्याची गरज आहे. आपण गाड्या वापरतो. किती प्रदुषण करतो. याचा कधी विचार केला नसेलही, पण पर्यावरण संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. यासाठी गाडीचा वापर किती करायचा, कधी करायचा याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा. केवळ प्रतिष्ठेपोटी गाडी वापरणे हे काही शहाणपणाचे लक्षण आहे. असे मला कदापी वाटत नाही. पर्यावरणाच्या नुसत्या गप्पा मारणे वेगळे, पण पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊन प्रदुषण कसे कमी करता येईल, याचा जास्तीत जास्त विचार स्वतःपासूनच करायला हवा. इतरांना पटो न पटो पण आपण सायकल चालवून प्रदुषण कमी करू शकतो. यासाठी सायकल वापरण्यास प्राधान्य द्या, असे मला मनापासून सांगावेसे वाटते. कसली आली चंगळवादाची प्रतिष्ठा. सायकल चालवणे हेच खरे प्रतिष्ठेचे लक्षण आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. वाढत्या तापमानावर आता सायकल चालवणे हाच उपाय ठरू शकतो. एक दिवस सायकलने प्रवास करून बघा, तुम्हाला रोज सायकल चालवावी असे वाटेल. हा प्रयोग करून तरी पाहा. केवळ सायकल डे चे निमित्त नको किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सायकल चालवणे नको, सायकल चालवण्याचा आनंद मनापासून घ्यायला हवा. तो आनंद आपल्यामध्ये साठवायला हवा. त्यातूनच मनाला खरे समाधान मिळू शकेल.

आज मला काही सायकल चालवणारे सवंगडी भेटले आहेत. तुम्हालाही असे सवंगडी भेटतील. आज मी ताठ मानेने सांगू शकतो. मी एकटा नाही. सायकलने चालवणारा आता गट मला भेटला आहे. गेली सातवर्षे सायकल चालवून पेट्रोलची बचत केल्याचे समाधान काही वेगळेच आहे. पर्यावरण संवर्धनाचा, प्रदुषण मुक्तीचा केलेला हा खटाटोपही मनाला मोठे समाधान देणारा आहे. सायकल चालवल्याने आरोग्य आपोआप सांभाळले जाते. न कळत व्यायाम होतो. कसरत होते, पण यापेक्षा मनाला मोठे समाधान मिळते. म्हणूनच मी सांगेन मोटार गाड्या सोडा आणि आता सायकल चालवा..हो मी सायकल वापरतो असे ताठ मानेने सांगा...

Sunday, March 4, 2018

ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन

संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माची गुपिते उलगडताना विविध उदाहरणे सांगितली आहेत. यात अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे. विज्ञानातील काही उदाहरणे तर दिली आहेतच त्याबरोबर शेतीशी निगडीतही काही उदाहरणे सांगितली आहेत. अध्यात्म सांगताना समाज प्रबोधनाचेही महान कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे. 

सध्या भारतीय संस्कृतीला, परंपरेला नावे ठेवण्यात येतात. झपाट्याने बदलत चाललेल्या जगाचा वेग ही संस्कृती घेऊ शकत नाही असा अशी मतेही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. या संस्कृतीचा विचार आता सोडून दिला तरच आपण जगासोबत स्पर्धा करु शकू अन्यथा आपले भवितव्यही बिकट होईल अशी भीती दाखवली जात आहे. या अशा विचारांमुळे आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. पाश्चात संस्कृतीचे अनुकरण आपण करत आहोत. पण प्रत्यक्षात पाहिले तर आपण आपली संस्कृतीच योग्य प्रकारे अभ्यासत नसल्याचे दिसून येते. आपल्या संत महापूरषांनी सांगितलेली वचनेच आपण योग्य प्रकारे आत्मसात केलेली नसल्याने आपली पिछेहाट होताना दिसत आहे. 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून अध्यात्मासह शेतीतील तंत्रज्ञानाबाबतही प्रबोधन केले आहे. आपल्या देशात बाराव्या शतकात ठिबक सिंचन होते. हे ज्ञानेश्वरीतील ओवीतून स्पष्ट होते. 

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे । जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। २५ ।। अध्याय १ ला

आपले जीव प्रफुल्लीत करण्यासाठी सद् गुरुंची उपासना करावी, सद् गुरुच अद्यात्मिक प्रगतीचे मुळ आहे. यासाठी त्यांच्याच भक्तीची गरज आहे. तरच हा आत्मज्ञानाचा, परमार्थाचा वटवृक्ष जोमात वाढेल. हे सांगताना ज्ञानेश्वरांनी येथे झाडाला पाणी देताना ते त्याच्यामुळाशी द्यावे म्हणजे त्याची वाढ उत्तमप्रकारे होते असे उदाहरण दिले आहे. ठिबक सिंचनामध्ये आपण हेच तर करतो. म्हणजे त्या काळात हे ज्ञान अवगत होते. ठिबक सिंचनाच्या पद्धती त्या काळात वेगळ्या होत्या. मडक्याला छोटेसे छिद्र पाडून ते मडके झाडाच्या मुळा शेजारी पुरले जायचे. त्या मडक्यात पाणी घालून ते झाडाच्या मुळाशी देण्याची पद्धत त्या काळात होती. हा ठिबक सिंचनाचाच प्रकार आहे. म्हणजे हे तंत्र भारतात होते. या तंत्रज्ञानाबाबत संतांनी प्रबोधन केल्याचेही दिसून येते. 

पशू, पक्षी, किटक आदींचा बारकाईने अभ्यासही भारतीय संस्कृतीत केला गेलेला आढळतो. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या विविध उदाहरणातून हेही स्पष्ट होते.

 देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासिं झोंबे जैसा । सांगे नरू केवीं तैसा । पावे वेगां ।। 41 ।। अध्याय 1 ला 

पक्षी फळ दिसले तर लगेच ते खाण्यासाठी जात नाही. प्रथम तो त्याचे निरिक्षण करतो. आसपासचा परिसर पाहातो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. त्यापासून कोणता धोका आहे का हे ही पाहातो मगच तो खाण्यासाठी धावतो. या उदाहरणातून आपल्या संस्कृतीमध्ये पक्षांची निरिक्षणेही केली जात होती. त्याच्या प्रत्येक हालचालींचा अभ्यास केला जात होता. हे यातूनस्पष्ट होते.

 पैं आघविया जगा जें विख । तें विख कीडिया पीयूख । आणि जगा गुळ तें देंख । मरण तया ।। 930 ।। अध्याय 18 वा 

इतर जीवांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य आहे. अशा किटकांना गुळा सारखे गोड पदार्थ हे विष ठरतात. कलमथ नावचे एक तण आहे. ते खाल्ल्याने जनावरे दगावतात. हे तण मेंढ्यांनी खाल्यास त्यांची लोकर गळते. या तणामुळे दुग्ध जनावरांची दुध उत्पादनाची क्षमता घटते. जनावरांचे वजन झपाट्याने कमी होते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्राद्रुर्भाव झाला होता. त्यावेळी त्याचे नियंत्रण जैविक पद्धतीने करण्यात आले. हे तण इतरांसाठी विष जरी ठरत असले तरी त्यावर काही किटक जगत होते. त्या किटकांनी हे तण नष्ट केले. संशोधकांनी 1950 मध्ये हे तण खाणारे बिट्टल्स सोडून हे तण नष्ट केले. हे आत्ताच्या अलिकडच्या 19 व्या शतकातील उदाहरण आहे. पण पूर्वीच्या काळी आपल्या भारतदेशात असे प्रयोग आपल्या सांधुसंतांनी केले आहेत. 

ज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकात लिहिलेल्या या उदाहरणावरून स्पष्ट होते. 
एके पवनेंची पिती । एकें तृणास्तव जिती । 
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। 38 ।। अध्याय 7 वा

 कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते. सर्व अंगानी दूरदुष्टीने आपली विधाने मांडली होती. याचे फायदे तोटे अभ्यासले होते. त्यातून कशा प्रकारे प्रबोधन करायला हवे याचाही अभ्यास केला होता. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या अशा अनेक उदाहणातून हे स्पष्ट होते. आपले साधूसंत हे खरे संशोधक होते. त्यांनी केलेला अभ्यास आपल्यासाठी आजही उपयुक्त आहे. आपल्यासाठी मार्गदर्शकआहे. याचा विचार करून आपण आपल्या संस्कृतीला नावे न ठेवता त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा. आजच्या बदलत्या युगातही हे तत्त्वज्ञान आपल्यासाठी मार्गदर्शकच ठरणारे आहे. विकासाने वेग जरी पकडला असला तरी साधुसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा बोधच या विकासाला चालना देऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

 बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामायें ।
 ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाती न नशे ।। 59 ।। अध्याय 17 वा
 माणसाचे त्रिगुण ही अनंत जन्मे जन्मांतरे झाली तरीही बदलत नाहीत हे सांगण्यासाठी माऊलीने बीजाचे उदाहरण दिले आहे. बीजापासून झाड होते त्या झाडापासूनच पुन्हा बीज मिळते. हे चक्र कोट्यावधी वर्षे चालत आले आहे. यात पारंपारिक जातीच्या बीजाचा नाश कधीच होत नाही. पिकाच्या पारंपारिक जाती आता कालबाह्य होत आहेत. कारण त्याची लागवडही आता कमी झाली आहे या बरोबरच त्याचे बीजही आता साठवले जात नाही. पारंपारिक जातीच्या बीज संवर्धनाची गरज आहे. कारण संकरित बियाणे हे एकदाच उगवते. त्यापासून उत्पादित धान्य हे बीज नसते. त्याची लागवड करता येत नाही. पण पारंपारिक जातींमध्ये हे नसते, पण आता अशी बियाणे दुर्मिळ होऊ लागली आहेत. पारंपारिक जातीच्या संवर्धनासाठी गरज आहे. संकर झाल्याने जाती नष्ट होत आहेत. पण या संकरित बियाण्याची चव, गुणवत्ता आणि पारंपरिक चव आणि गुणवत्ता यामध्ये मोठा फरक आहे. संरकित बियाण्यास आता चवच राहीली नाही संकरित बियाण्याची गुणवत्ताही थोड्या कालवधीने कमी होते. यातून देशी बियाण्यांचे संवर्धन का गरजेचे आहे हे ही स्पष्ट होते. 

नाना उंसाची कणसें । कां नपुंसके माणुसें । 
वन लागलें जैसें । साबरीचें ।। 576 ।। अध्याय 18 वा 

उसाला तुरे लागायला सुरवात झाली तर त्या उसापासून साखर फारशी मिळत नाही. तो ऊस निरपयोगी असतो. असे माऊलीने बाराव्या शकतात सांगितले आहे. नपुसक माणसे आणि वनात सांबरिचे झाडे हे बिनकामाचे आहे. तसे उसाला कणसे आल्यानंतर त्यातील साखरेचे प्रमाण घटते यासाठी उसाचे गाळप योग्य वेळी होण्याची गरज आहे. हे शेतीतील प्रबोधनचे आहे ना. संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात प्रबोधनाचे मोठे काम केले. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उदाहरणे देऊन अध्यात्माचे बीज रोवले. प्रबोधनही केले.