Tuesday, November 26, 2013

अनुभव ज्ञानेश्‍वरी पुस्तक प्रस्तावना

।। ॐ ।।
विवेकाचे गाव
आदरणीय सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांच्या परिवारातील ज्ञानेश्‍वरीचे
अभ्यासक माननीय राजेंद्र घोरपडे यांचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक वाचले. घोरपडे
हे सकाळ मध्ये उपसंपादक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची भ्रमंती आहे. ते
ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक आहेत. साधक ही आहेत. माननीय रामराया सांगवडेकर याचा
सहवास त्यांना लाभला आहे. तो मौलिक आहे. आजच्या काळात ज्ञानेश्‍वरी कशी
अनुभविता येईल याविषयीचे ललित चिंतन या पुस्तकात आहे. ज्ञानेश्‍वरीतील निवडक
ओव्यांच्या आधारे केलेले हे चिंतन, छोटेखानी असले, तरी त्याला मनाने समजून
घेण्याचा अवकाश फार मोठा आहे.
हे पुस्तक विवेकाला अनुसरून आहे. गावात विवेक जागा असेल, तर सर्व प्रश्‍न
सुटतात. त्यासाठी अहंकार नाहीसा करावा लागतो. श्रमदानातून आणि विनम्रवृत्तीतून
एकी निर्माण होते. शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारते. शरीराच्या उगाचच
कष्टविण्याचे कारक नाही. गुरुकृपेने असा विवेक प्राप्त होतो. त्यागाची भावना म्हणजे
संन्यास होय. देहातील विविध रसायनयुक्त असा देह बनतो. त्याच्यात आत्मचैतन्य
येते. हा विज्ञानाचा भाव नीट अभ्यासला पाहिजे, तरच आत्मज्ञानाचा अनुभव येतो.
आत्मज्ञानाच्या विकासासाठी मठ किंवा शिवालय असते. आज मात्र मठांमध्ये तंटे
निर्माण झाले आहेत. विविध देवालयातील विेशस्तांना आपली खुर्ची सांभाळण्याची
काळजी लागली आहे. यावर ज्ञानदेवांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचविला आहे.
तो म्हणजे, विवेक शक्ती वाढविणे हा होय. त्यासाठी ध्यानाची आवश्‍यकता आहे.
च्या एकाग्रतेतून ध्यानाच्या वाटा दिसू लागतात. त्यावर वाटचाल करणे एकूणच
अवघड असते. गुरुसेवेतून अशा वाटा सहज होतात. मनाचा अभ्यास नीट होतो.
साध्या-साध्या दैनंदिन जीवनातून या गोष्टी समजून घेता येतात. आजच्या सुसाट
जीवनात याची गरज आहे. ते घोरपडे यांनी परिणामकारकपणे सांगितले आहे. मनाला
अध्यात्माची गरज आहे. शरीराला आयुर्वेदाची गरज आहे. मनाला गुरुसेवा जरुरीची
आहे. शरीराला खिलाडूपणा आवश्‍यक आहे. यासाठी उत्कृष्ट कर्मे ही महत्त्वाची
आहेत. नित्यकर्म ही देवपूजा मानायला हवी. त्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाचा हक्क आहे.
हे ज्ञान वारसा हक्काने क्वचित मिळते. ज्ञानातून आत्मज्ञान मिळाले, की मनाला आनंद
मिळतो. सुख क्षणिक असते. आनंद चिरंजीव असतो.

ज्ञानेश्‍वरीतील अनुभवविश्‍व समृध्द आहे. ते आजही मनास धैर्य देते. विश्‍व
म्हणजे वर्तमानातील जाणिवांचा समूह. जाणीव नेहमी वर्तमानाला पूरक असते.
विवेकाला जाणिवेची बैठक लागते. मनाला विचार करण्याची सवय जडते. असे
विचार सक्रिय असतात. यातून मानवी निर्णय चांगले ठरतात. सत्याचा आग्रह गरजेचा
ठरतो. यातून अहिंसा अनुभवता येते. स्वतःमध्ये गुण असतील तर, अहिंसेला मूल्य
प्राप्त होते. तेच देवाचे रूप असते. अध्यात्म ही सेवा आहे. सेवाभाव विश्‍व जिंकू
शकतो. गंगेचे पाणी साऱ्यांना स्वच्छ करते. त्याप्रमाणे शुद्ध मन अनेकांना स्वच्छ
करते, आपले कर्तव्य-कर्म चोख केले की, माणसाला देवपणाचा अनुभव येतो.
घोरपडे यांना समर्थाचिया पंक्तिभोजनें या ओवीत समान नागरी कायदा जाणवला.
विठ्ठलाच्या दर्शनाला वेगळी रांग नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानात वेगळी रांग नसते. ती
एक विशिष्ट दृष्टी असते.
या पुस्तकात अनेक चिंतनशील विचार आहेत. यातून ज्ञानेश्‍वरीकडे वेगळ्या
दृष्टीने बघता येते. अंतरंग शुद्ध राखणे आणि अहंतेला थारा न देणे या महत्त्वाच्या
बाबी आहेत. हे ध्यानात येण्यासाठी हे पुस्तक वाचावे. ते मन शुद्ध करील. आपणही
शुद्धीवर येऊ. संवेदनशील मनाला हे पुस्तक आवडावे. सुबोध वाक्‍ये, सुलभ निरूपण,
श्रद्धायुक्त मन या लेखातून व्यक्त होते. आजचा वर्तमान निवांत मनाने कसा जगता येईल
ते या पुस्तकातून कळते. श्रद्धेतून मिळणारी डोळस जाणीव विवेकाचा गाव निर्माण
करते. या गावात विशुद्ध मी आनंदाने राहतो. त्याच्याशी बोलायला माऊली येते.
तो जगण्यातून नवा होतो. त्याच्या आत्मज्ञानाला बहर येतो. शांतवृत्तीतून तो मनाचा
नंदादीप लावतो. देवाशी बोलताना, त्याच्या मनाला भरती येते. निष्काम कर्मातून तो
गगनभरारी घेतो. त्याच्या प्रत्येक कृतीला माऊली सोबत करते. तो तृप्त होतो. हा
अनुभव या पुस्तकातून श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी दिला. तो त्यांनी आपल्याला प्रसाद
म्हणून वाटला. हे भाग्य ज्याला मिळेल, त्याला सारे काही मिळेल. याबद्दल श्रीयुत
घोरपडे यांचे अभिनंदन. त्यांना पुढील लेखनप्रवासासाठी शुभेच्छा.

डॉ. यशवंत पाठक,
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख,
पुणे विद्यापीठ, गणेशखिंड,
पुणे 411007

Monday, November 18, 2013

"अनुभव ज्ञानेश्‍वरी' पुस्तकाचे प्रकाशन

श्री अथर्व प्रकाशनच्या "अनुभव ज्ञानेश्‍वरी' या पुस्तकाचे प्रकाशन आज "सकाळ'च्या कार्यालयात सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर सकाळचे निवासी संपादक मनोज साळुंखे, संजय पाटोळे, सुधाकर काशिद, चंद्रशेखर माताडे यांच्या हस्ते झाले. 
 

Thursday, November 14, 2013

"अनुभव ज्ञानेश्‍वरी' येत आहे 17 नोव्हेबरला

इये मराठीचिये नगरी या माझ्या पहिल्या पुस्तकाला वाचकांनी चांगली पसंती दर्शिवली यामुळेच अशी पुस्तके पुन्हा वाचकांच्या भेटीला द्यावीत अशी प्रेरणा मला मिळाली. पहिल्या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहता ज्ञानेश्‍वरीवर आधारित पुस्तकांची मालिकाच करण्याचा मी संकल्प केला आहे. विविध विषय घेऊन ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पुस्तके घेऊन आपल्या भेटीला येत राहणार आहे.
इये मराठीचिये नगरी हे पुस्तक वाचून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
नागपूरचे चेतन अकर्ते यांनी या पुस्तकांचे मोबाईल ईबुक करण्याची संकल्पना मांडली, तसे ते त्यांनी ताबडतोब केलेही. हजारो मोबाईलधारकांनी हे पुस्तक मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार कसे मानावेत हेच समजत नाही. हिंगोली परिसरातील कीर्तनकार माऊली विधाते यांनी ह्या पुस्तकांतील उदाहरणे कीर्तनात सांगण्याची परवानगी मागितली. पंकज पाटील, सचिन गावरी, रविंद्र फासे, साई हिवराळे, श्रावण पवार आदींनी ईबुकवर प्रतिक्रियाही नोंदवली. पल्लवी निंबाळकर यांनी कॅलिफोर्निया येथून फोनवर संपर्क साधून पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी अनेकांनी पुस्तकाची स्तुती केली. आपल्या या आर्शीवादानेच अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक लिहिण्यास उत्साह वाढला. अनुभव ज्ञानेश्‍वरी या पुस्तकानंतर आता ज्ञानेश्‍वरीतील शेतीविषयक ओव्या घेऊन कृषी ज्ञानेश्‍वरी लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर लिहिणाऱ्याला स्फुरण चढते. ज्ञानेश्‍वरी स्वतः अभ्यासत इतरांनाही त्यातील प्रसाद मिळावा या उद्देशाने ही सेवा सुरू आहे.
ज्ञानेश्‍वरीचे वाचन करताना जे काही स्फुरले, मनाला भावले, जे काही अनुभवले तेच या अनुभव ज्ञानेश्‍वरी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्‍वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. त्यातील एखादी तरी ओवी अभ्यासावी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. ती ओवी अनुभवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ओव्यांचे अनुभव आपोआपच आपल्या मनाला साद घालतात.
आवड आपोआपच लागते. हळूहळू आपल्याही जीवनात बदल होतो. काय आता सांगावे. सद्‌गुरुच ही सेवा आपल्याकडून करवून घेत आहेत. ह्या सेवेतूनच हळूहळू आत्मज्ञानाची ओळख सद्‌गुरू करून देत आहेत. ह्या सेवेतूनच आता आत्मज्ञानी करावे हीच सद्‌गुरूचरणी प्रार्थना आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला अनेकांनी मोठे सहकार्य केले. विशेषतः माझे नातेवाईक माजी महापौर शिवाजीराव कदम, गुरुदत्त शुगर वर्क्‍सचे घाटगे आदींनी मोलाची मदत केली. या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे, यावर बराच विचार झाला. काही कल्पना मांडून अनेकांची मते घेतली. असेच घेताना दैनिक सकाळमधील प्रदीप घोडके यांनी स्वतः मुखपृष्ठ करून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी सुंदर, आकर्षक, आजच्या पुस्तकांच्या बाजारपेठेत चालू शकेल असे मुखपृष्ठ तयार करून दिले. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. घोडके काका यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सल्ला घ्यावा म्हणून काही नमुने दाखवले तर त्यांनी ती कल्पना लगेचच प्रत्यक्षात करून दिली. इतकी सहजता त्यांच्या कामात आहे. अध्यात्मामध्ये सहजपणाला अधिक महत्त्व आहे. उत्स्फूर्तपणे एखादी कल्पना सहजपणे मांडणे तितके सोपे नसते. ते आतून यावे लागते. अंतःकरणातून ही सहजता येते. पुस्तकाच्या या कामात अनेकांचे सहकार्य लाभले, यामध्ये प्रसाद इनामदार, विजय वेदपाठक, नितीन सुतार, अभय कोडोलीकर, विनय
गुरव, जगदीश जोशी आदींचेही सहकार्य लाभले. त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे. गणेश प्रिंटर्सचे विजयराव थोरवत यांनी छपाई वेळेत करून सहकार्य केले. अथर्व प्रकाशनचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे.
प्रकाशनाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक असते. यामध्ये कोल्हापुरातील अक्षरदालनचे अमेय जोशी व रावा प्रकाशनचे राहुल कुलकर्णी यांनीही बहुमोल सहकार्य केले. विशेषतः जोशी यांनी पुस्तकामध्ये अनेक बदल सुचवले. बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीच्या पुस्तकांना मागणी असते, त्यानुसार आवश्‍यक ते बदल करावे लागतात. भावनिक मुद्दे बाजूला ठेवून पुस्तकामध्ये काही बदल हे गरजेचे असतात. त्यांनी सांगितलेल्या या सूचना पुस्तकनिर्मितीमध्ये निश्‍चितच उपयोगी
ठरल्या. अक्षरदालन व रावा प्रकाशन या दोघांचाही मी ऋणी आहे.
वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या पुस्तकालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो. सद्‌गुरूंच्या कृपेने ज्ञानेश्‍वरीची ही सेवा अशीच अखंड सुरू राहावी. यापुढील कृषी ज्ञानेश्‍वरी या पुस्तकाची निर्मिती लवकरात लवकर
व्हावी. आपल्या सहकार्याने व सद्‌गुरूंच्या आर्शीवादाने हे कार्य निश्‍चितच तडीस जाईल, असा विश्‍वास मला वाटतो.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Monday, September 23, 2013

"कृषी ज्ञानेश्‍वरी'

"इये मराठीचिये नगरी' या पुस्तकानंतर आता स्वतःच्या श्री अथर्व प्रकाशन तर्फे "अनुभव ज्ञानेश्‍वरी' हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे पुस्तक छपाईला देत आहोत. त्यानंतर आता "कृषी ज्ञानेश्‍वरी' या पुस्तकांची सुरवात झाली आहे. अपेक्षा करतो हे सुद्धा पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती देण्यात आम्ही यशस्वी होऊ.

राजेंद्र घोरपडे, संपर्क 9011087406

देशी गाय

याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती ।
शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ।।

नव्या तंत्रज्ञानाने देशी गायीचे महत्त्व कमी केले आहे. कारण ती दूध कमी देते. वाढत्या महागाईत भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. साहजिकच देशी गायींची जागा आता संकरित दुधाळ गाईंनी घेतली आहे. पण देशी गायीचे महत्त्व आजही अनन्य साधारण आहे. त्यांचे पालनपोषण करणे हे आज गरजेचे आहे. देशी गायीच्या दुधात, गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. देशी गायीचे तूपही औषधी आहे. संधीवातासारख्या अनेक असाधारण रोगांवर गोमुत्रातून आयुर्वेदिक औषधे देण्यात येतात. या गायीचे वैशिष्ट म्हणजे ती सकाळी एकदाच गोमुत्र देते. म्हणजे ती इतर वेळी कोणत्याही प्रकारची घाण करत नाही. तिच्या या सवयीमुळे तिचे संगोपन करणेही सोपे आहे. स्वच्छ राहणे व इतरांनाही स्वच्छ करणे हा तिचा गुण आहे. कीडनाशक म्हणूनही तिच्या गोमुत्राचा उपयोग केला जातो. तिचे हे महत्त्व ओळखूनच पूर्वीच्या काळी साधूसंतांनी तिचे संगोपन केले. पण बदलत्या काळात दूध उत्पादनाचा विक्रम ही गाय करू शकत नसल्याने आता ती टाकाऊ झाली आहे. आकडेवारीचे विक्रम गाठण्याच्या नादात दुधाची प्रत खालावत चालली आहे. याचा विचार कोणी करतच नाही. उत्पादनाचा विक्रम करण्यापेक्षा उत्तम प्रतीचे दूध आणि उत्पादने देण्याचा देशी गायीचा गुण जोपासणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन वाढणे ही काळाची गरज आहे. पण त्या बरोबर मालाची प्रतही सुधारणे गरजेचे आहे. टिकावू मालाचे उत्पादन आज बाजारात होत नाही. वीसवर्षापूर्वी अनेकांच्या घरात फ्रिज नव्हते. तरीही दूध, फळे, भाजीपाला उत्तम राहायचे. आता फ्रिज असूनही एकादिवसातच हा भाजीपाला सुकून जातो. मग फ्रिजने दिले काय? फक्त थंड ठेवण्याचे कार्य त्याने केले. पण विजेचे बिलही वाढविले आहे. अशी ही महागाई वाढत आहे. बदलत्या काळातील गरज म्हणून आपण याचा स्वीकार करत आहोत. वाढते तापमान विचारात घेऊन हा बदल आपण स्वीकारत आहोत. पण या बदलत्या तापमानास कोण कारणीभूत आहे. आपणच ना? पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या जनावरांचा सांभाळ करा असाच सल्ला दिला आहे. संत ज्ञानेश्‍वरही हेच सांगतात. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्रोत ही दुभती जनावरे मिळवून देतात. बैल, भाकड जनावरांच्या बरोबरच आता दुभत्या जनावरांचीही संख्या घटत आहे. याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे. नव्या पिढीला आता कष्टाचे काम नको आहे. ग्रामीण भागातील तरुण कमी कष्टाचा रोजगार शोधत आहेत. जनावरे सांभाळणे हे कष्टाचे, कमी पणाचे लक्षण मानले जात आहे. पण आर्थिक स्त्रोत्राचा विचार करून तरी नव्या पिढीने सुधारित तंत्राने दुभती जनावरे सांभाळण्यावर भर द्यायला हवा.

Wednesday, September 11, 2013

आगळा वेगळा "सकाळ परिवार'


दहा सप्टेंबर माझा वाढदिवस. हा दिवस नेहमीच माझ्या आयुष्यात सकाळ आणि माझे एक आगळेवेगळे नाते निर्माण करत राहीला आहे. 1992 मध्ये सकाळने वाचक मेळावे सुरू केले होते. याची सुरवात सकाळने रुकडी येथून केली. तो दिवस दहा सप्टेंबरच होता. या दिवशी या कार्यक्रमामध्ये सकाळने वाचकांना बोलण्याची संधी दिली. सकाळ नेहमीच असा काही ना काही नवा उपक्रम सातत्याने राबवत आला आहे. अशा या संधीमुळे अनेक वाचक सकाळने जोडले आहेत. अनेकांना वेगवेगळ्या संधी मिळवून दिल्या आहेत. सकाळ वाचकांना नुसते लिहायला नाही तर बोलायलाही प्रोत्साहित करतो. वाचकांचेही व्यक्तिमत्व घडवतो. यामध्ये मला प्रथम बोलण्याचे धाडस झाले. चार लोकांच्या समोर उभे राहून बोलण्यासही धाडस लागते. बोलायला हातात माईक घेतल्यानंतर काय बोलायचे हे सुचले पाहीजे. लोकांना बोलायला लावणारा सकाळ अशी ओळख त्यावेळी सकाळ ने निर्माण केली. त्यावेळी वाचकांनी रुकडी या ग्रामीण भागातून बातमीदार असावा अशी मागणी केली. तेव्हा सकाळचे तत्कालिन संपादक अनंत दीक्षित यांनी तुमच्यातील कोणी इच्छुक असेल तर भेटा त्याचा विचार आम्ही जरूर करू असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी मी दीक्षित सरांना भेटलो आणि त्यांनी सकाळमध्ये बातमीदार म्हणून लगेच नियुक्ती पत्रही दिले. मला वाटलेही नव्हते सकाळमध्ये आपली नियुक्ती इतक्‍या झटपट होईल.
सकाळमध्ये बातमीदार म्हणून मी निवडलो गेलो. पण बातम्या कश्‍या लिहीतात. बातमी कशाला म्हणतात याचे कोणतेही ज्ञान त्यावेळी मला नव्हती. मी त्यावेळी बारावी पास होतो. पदवीचे शिक्षण घेत होतो. समाज दैनिकातून काही लेख माझे प्रसिद्ध झाले होते व वाचकांची पत्रे नियमीत लिहीत होतो. वाचकांच्या पत्राला सकाळने पुरस्कारही दिला होता. इतकाच माझ्याकडे अनुभव होता. अशावेळी फक्त लिखानाची आवड, आणि लिखान इतकेच काय ते भांडवल होते. बातमी लिहीणे याचा अभ्यास लागतो. बातमी कशाची होते याचेही ज्ञान नव्हते. पण मी बातमीदार म्हणून निवडलो गेलो. मला त्यावेळी सांगण्यात आले दररोजच्या वृत्तपत्रात जशा बातम्या येतात तशाच पद्धतीच्या बातम्या आपण पाठवत जा. रुकडी त्यावेळी दहा हजारच्या आसपास लोकसंख्या असलेले ठिकाण होते. सकाळचा खपही फारसा नव्हता. केवळ 35-50 अंक खपत होते. अशा ठिकाणी बातम्या तरी किती असणार? कार्यक्रमा व्यतिरिक्त बातम्या तरी येथे काय असणार? तेव्हा कार्यक्रमही फारसे होत नव्हते. मी गावाचा सर्वांगिण विचार केला व बातम्या काय घडू शकतात याचा विचार माझ्या मनात घोळू लागल्या. ग्रामीण भागात फारसे काही घडत नाही. क्रामिकच्या घटनाही क्वचितच. मुळात पोलिस ठाणेच रुकडीत नसल्याने तोही बातमीचा विषय नव्हता. मला आता येते बातम्या शोधायच्या होत्या. बातम्या काय द्यायच्या हाच प्रश्‍न माझ्या मनाला सतावू लागला. त्यावेळी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाने (माझ्याच शाळेने) दीक्षित सरांना कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानासाठी निमंत्रित केले असे समजले. मी याचा पाठपुरावा घेण्यासाठी सकाळ एमआयडीसी कार्यालयात गेलो. दीक्षितसर नेमके त्या दिवशी नव्हते. उपस्थित उपसंपादकांना हा विषय सांगितला. त्यांनी मला ताबडतोब एखादा चांगला विषय निवडून बातमी करण्यास सांगतले. गावात बातमीचे विषय नसतात हे सांगून आता येथे भागणारेही नव्हते. तसे उपसंपादकांचा फारसा परिचय नसल्याने व आपणाला काही येत नाही हे बाहेर पडू नये यासाठी मी बोलण्याचे टाळलो. जे सांगतात ते शांतपणे ऐकून घेतले व तेथून निघालो. 22 सप्टेंबरला कार्यक्रम होता. दोन-चार दिवसांचा कालावधी माझ्याजवळ होता. बातमी शोधण्यासाठी मी गावभर हिंडलो. मला काहीच सुचत नव्हते. शेवटी रेल्वे स्टेशनवर निवांत बसलो होतो. त्यावेळी एक धनगर तेथे आला. शाहूवाडीतील तो धनगर होता. सोबत मेंढरे होती. स्टेशनवर निवांत पडण्यासाठी तो जागा शोधत होता. मेंढरे स्टेशनच्या मागेच खुराड्यात ठेवली होती. तो मी बसलेल्या बाकावर बसला. त्यावेळी स्टेशनवर फारशी बाकडीही नव्हती. तो कंटाळाला होता विसावण्यासाठी तो बसला आहे हे मी ओळखले. मी सहज त्याला विचारले कोठून आला आहात. तो म्हणाला मी विजापूरहून आलो आता असे मुक्काम करत शाहुवाडीला जाणार. महिनाअखेरीपर्यंत शाहुवाडीत जाणार. त्याच्याशी गप्पा मारल्या. मी ठरवले आता हीच बातमी करायची आणि द्यायची दुसरा विषयही नव्हता. बातमी तयार केली. विजापूरहून धनगर परतीच्या प्रवासाला...बातमी सकाळच्या कोल्हापूर शहर कार्यालयात देण्यासाठी निघालो. तेवढ्यात रस्त्यात मला कडकलक्ष्मी दिसली. रेल्वेला वेळ होता. मी ठरवले धनगरांच्या परतीची बातमी होऊ शकते तर कडकलक्ष्मीची बातमी का होणार नाही. ते सुद्धा दसरा-दिवाळीच्या काळातच ग्रामीण भागात येतात. माळावर पाल्यात राहातात. त्याचीही बातमी मी तयार केली. कडकलक्ष्मीचे रुकडीत आगमन...दोन्ही बातम्या तयार करून शहर कार्यालयात देण्यासाठी गेलो. पाकीट बंद केले होते कोणी फोडणार नाही याची दखल मी घेतली होती. कारण कोणी येथेच फोडले आणि असल्या बातम्या वाचून माझीच टिंगल करणार नाही ना अशी भीती होती. संपादकीय विभागाने काय तुला काय दिसतय ती बातमी होते असे सांगितलेच होते. समोर काय घडत आहे याची बातमी होते एवढेच मला बातमी बाबतीत माहित होते. विचारले तर तुम्हीच सांगितले होते असे म्हणायला मी मोकळा होतो. शहर कार्यालयात सुधाकर काशिद, सोपान पाटील, विजय चोरमारे आदी होते. मी बातमी दिली. विशेष म्हणजे बातमी कोणी फोडली नाही. ते पाकीट तसेच त्यांनी पार्सलच्या खोक्‍यात टाकले. मी घरी परतलो.
दररोज बातमी आली आहे का ते आवर्जुन पाहात होतो. दोन दिवस बातमी काही लागली नाही. दीक्षितसरांचा कार्यक्रम 22 तारखेला होता. बातमी प्रसिद्ध न झाल्याने मी कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवले. बातमीदारी आपणाला जमणार नाही. असा पक्का निर्धार माझा झाला होता. इतक्‍या लहान गावात बातम्या कोठल्या असे म्हणून बातमीदारीला आता रामराम...असे म्हणून मी माझ कॉलेज गाठले. माझे कॉलेज सकाळी 8 वाजता असायचे. त्यामुले मी सकाळी सह्याद्री एक्‍सप्रेसने सहा वाजताच कोल्हापूरात आलो होतो. इतक्‍या सकाळी पेपर कोठेच वाचायला मिळत नाही. आठ ते दहा माझा तास होता. दोन्ही वर्ग संपल्यानंतर मी कॉलेजच्या लायब्रित आलो. सवयीप्रमाणे सर्वात प्रथम सकाळ चाळला. आतल्या पानात तीन कॉलमात बातमी प्रसिद्ध झाली होती. विजापूरहून धनगर परतीच्या प्रवासाला....हेडिंग नेहमी वेगळ्या पद्धतीत इटालिक केले होते. बातमीही इटालीक होती. लेफ्ट अलाईन केली होती. इतर बातम्यापेक्षा बातमीला वेगळी ट्रिटमेंट दिली होती. बातमी पाहून मला प्रथम आश्‍चर्यच वाटले. हा बातमीचा विषय होतो हेच मुळात मला पटत नव्हते. आता बातमीतर मीच दिली होती. दुसऱ्या एका पानावर कडकलक्ष्मीचे आगमन... ही बातमीही प्रसिद्ध झाली होती. आता मात्र माझा विश्‍वासच उडाला. मी पुन्हा पुन्हा या बातम्या पाहू लागलो. मला पटतच नव्हते. मी पटकण रेल्वेस्टेशन गाठले व रुकडीला आलो. दीक्षितसरांचे व्याख्यान दुपारी होते. त्याला उपस्थित राहीलो.
व्याख्यानाची बातमी घेऊन दुसऱ्या दिवशी एमआयडीसी कार्यालय गाठले. दीक्षितसर नव्हते. बातमी दिली. कालच्या बातम्याबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते याबाबत मला उत्सुकता होती. शीतल महाजणी मॅडम होत्या त्या म्हणाला सकाळ सर्वांनाच बरोबर घेऊन जातो. कडकलक्ष्मी ही सुद्धा व्यक्तीच आहे. त्यांचे जीवन, त्यांचे राहणीमान, धनगरांचे जीवन यावर बातम्या होऊ शकतात. ग्रामीण जीवन वृत्तपत्रात यावे या उद्देशानेच सकाळने ग्रामीण भागात बातमीदार नियुक्त केले आहेत. दररोजच्या घटनांपेक्षा वेगळे देण्याचा प्रयत्न नेहमीच सकाळ करतो आहे. लोकांना वाचणीय लोकांना आवडेल लोकांच्या मनाला पटेल लोकांना आपलस वाटेल असे लिखान करण्याचा सकाळचा प्रयत्न असतो. त्यानंतर सकाळमधून रुकडीतून बातमीदार म्हणून अनेक बातम्या दिल्या. साखर कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळघरे फायदेशीर, उसापेक्षा सोयाबिन फायदेशीर असे अनेक लेख लिहीले.
शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात गेलो. पुण्यात पुन्हा संध्यानंदमध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. काही वर्षे केसरीतही उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर मल्हार अरणकल्ले सर व सुनिल चव्हाण यांनी ऍग्रोवनमध्ये घेतले. पुन्हा एकदा सकाळ परिवारात सामिल झालो. सकाळ परिवाराचे वैशिष्ठ म्हणजे येथे आपणास भरपूर संधी मिळतात. लिखानाला मोठा वाव मिळतो. लिहायला न येणारा मनुष्यही येथे लिहायला शिकतो. बोलायला न येणाराही मनुष्य येथे वक्ता होऊ शकतो. सकाळ परिवार माणसे घडवतो. स्नेह वाढवतो. अमाप प्रेम येथे मिळते.
नुकताच माझा दहा सप्टेबरला वाढदिवस साजरा झाला. सकाळ परिवारने माझा वाढदिवस साजरा केला. मुख्य संपादक श्रीराम पवार, निवासी संपादक मनोज साळुंखे, संजय पाटोळेसर, शेखर जोशी, सर्व उपसंपादक यांच्या उपस्थितीत केके कापून वाढदिवस साजरा झाला. असा सोहळा घरीही कधीही झाला नाही. सकाळ कर्मचाऱ्यांचे असे वाढदिवसही येथे साजरे केले जातात. आज पुर्वीच्या व्यक्ती येथे नसतील पण पूर्वीचे वातावरण मात्र येथे कायम आहे. तो स्नेह, जिव्हाळा येथे कायम आहे. काम करण्यासाठी उत्तम वातावरण सकाळमध्ये आहे. पुर्वीही होते तसेच आहे. माणसे आली गेली. बदलली तरी वातावरण, उद्दिष्ठ मात्र येथे तेच आहे. फक्त कार्यक्रमाचे स्वरूप बदलले आहे. अशा या आगळ्यावेगळ्या परिवारात नेहमीच राहावे असे वाटतो. तो स्नेह कायम असावा असे वाटते.

राजेंद्र घोरपडे

Thursday, August 8, 2013

केळी व्यवस्थापनातून 31 महिन्यांत तीन पिके

केळीच्या काटेकोर व्यवस्थापनातून साधली 31 महिन्यांत तीन पिके


उसाचे प्राबल्य असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात केळीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. अंबप (ता. हातकणंगले) येथील प्रदीप साळोखे हे गेल्या सात वर्षांपासून केळीची लागवड करत असून, विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 30 महिन्यांत केळीची लावण, खोडवा, निडवा घेतात. यांची योग्य वेळ साधल्याने केळीनंतर सुरू उसाची लागवड करणे शक्‍य होते.

राजेंद्र घोरपडे

अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील प्रदीप साळोखे यांची वडिलोपार्जित 25 एकर शेती आहे. प्रदीप यांनी पदवीनंतर पशुधन सुपरवायझर (एलएसएस)चा अभ्यासक्रम पूर्ण करून काही काळ नोकरी केली; मात्र 1991 मध्ये त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या शेतीमध्ये दहा एकर ऊस, सव्वादोन एकर केळी, पाच एकर सोयाबीन, दीड एकर आंबा ही पिके आहेत. त्यांच्याकडे पंधरा जनावरे असून जनावरांसाठी अर्धा एकर मका, कडवळ आदी चाऱ्याची पिकेही ते करतात. या सर्व पिकांमध्ये येणाऱ्या अडचणींसाठी विविध तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेत बदल करतात. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी मंचामध्येही ते सदस्य आहेत.

पिकाची निवड करताना...

पिकाची निवड करताना त्याची बाजारपेठेत काय स्थिती आहे हे पाहणे गरजेचे आहे, असे प्रदीप यांना वाटते. यासाठी प्रथम त्या पिकाचे राज्यातील क्षेत्र किती आहे, यंदा किती क्षेत्रावर याची लागवड होण्याची शक्‍यता आहे, त्यासंदर्भात बियाण्याची विक्री किती झाली आहे, ही विक्री या हंगामात किती होण्याची शक्‍यता आहे, त्यानुसार बाजारपेठेत या पिकास किती वाव आहे याची माहिती ते बियाणे कंपन्यांच्या ऍग्रोनॉमिस्टकडून जाणून घेतात. या माहितीच्या आधारे ते पिकाची निवड करतात, त्याचे क्षेत्र किती ठेवायचे हे ठरवितात. गेल्या सात वर्षांपासून प्रदीप केळीची लागवड करत आहेत. यंदा प्रदीप यांनी केळीची निवड करताना कृषी विभाग, कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ, टिश्‍यूकल्चर लॅब, बियाणे कंपन्यांतील ऍग्रोनॉमिस्ट, ठिबक सिंचन कंपन्यांतील व्यक्तींकडून पिकाबाबत आढावा घेतला. यंदा उन्हाळ्यात राज्यात दुष्काळी स्थिती होती, त्यामुळे रोपांसाठी करण्यात आलेल्या नोंदणीच्या प्रमाणात त्यांची विक्री झाली नसल्याची माहिती तज्ज्ञांकडून प्रदीप यांना मिळाली. त्यातच रावेर, जळगाव, हिंगोलीमध्ये गारपीट झाल्याने तेथे केळीचे मोठे नुकसान झाले. यंदा सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात केळीचे क्षेत्र घटले असल्याचीही माहिती मिळाल्याने प्रदीप यांनी नेहमीप्रमाणे एक एकरावर केळीची लागवड न करता सव्वादोन एकरांवर केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

केळीची लागवड

लागवडीची पद्धत ः जोड ओळ पद्धत
रोपांतील अंतर ः दोन ओळींतील अंतर 4.50 फूट, दोन पट्ट्यांतील अंतर नऊ फूट, दोन रोपांतील अंतर पाच फूट (झिगझॅग पद्धतीने लागवड)
केळीची जात ः जी 9





31 महिन्यांत केळीची तीन पिके
केळीची लावण, खोडवा, निडवा अशी तीन पिके साधारणपणे 36 ते 40 महिन्यांत येतात; पण योग्य व्यवस्थापनाने ही तीनही पिके केवळ 30 ते 31 महिन्यांत घेणे शक्‍य आहे. या पद्धतीत
केळीच्या रोपांची लावण ही एप्रिलमध्ये केली जाते. यामुळे दहा- अकराव्या महिन्यात घड काढणीसाठी तयार होतात. म्हणजे पहिल्या वर्षी काढणी ही मार्चमध्ये होते. या अगोदर एक महिना म्हणजे फेब्रुवारीमध्येच खोडव्याचे व्यवस्थापन केले जाते. खोडवा पीक हेसुद्धा दहा- अकराव्या महिन्यात काढणीस येते. जानेवारीत खोडव्याची काढणी होते. त्याअगोदर एक महिना म्हणजे डिसेंबरमध्येच निडव्यासाठी मुंडवे ठेवले जातात. याची काढणी पुन्हा अकरा महिन्यानंतर म्हणजे साहजिकच ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये काढणी होते. म्हणजे अवघ्या 30 ते 31 महिन्यांत केळीची तीन पिके होतात.

खोडवा- निडवा व्यवस्थापन
- मागील वर्षी झिगझॅग पद्धतीने रोपे न लावल्यामुळे मुंडव्यांची वाढ होण्यामध्ये थोडीशी अडचण आली, त्यामुळे एक महिना अधिक लागल्याचे प्रमोद यांनी सांगितले. या वर्षी झिगझॅग पद्धतीने रोपे लावल्याने तो एक महिना वाचू शकेल. 31 महिन्यांऐवजी 30 महिन्यांत तीन पिके घेण्यासाठी ते काटेकोर प्रयत्न करत आहेत.
- पट्टा पद्धतीमध्ये दोन पट्ट्यांतील अंतर नऊ फूट ठेवण्यात येते. रिकाम्या जागेकडे झाड कलण्याचा गुणधर्म असल्यामुळे घड लागल्यानंतर केळीचे झाड हे नऊ फुटांच्या पट्ट्याकडे कलते.
- साहजिकच साडेचार फुटांच्या अंतरावरील दोन ओळींमध्ये भरपूर सूर्यप्रकाश पोचू शकतो, याचाच फायदा घेत घड काढणीस येण्याच्या अगोदर एक ते दीड महिना खोडव्या- निडव्यासाठी मुंडवे ठेवण्यात येतात.
- जोमदार वाढलेले, बुंधा जाड असणारे, तलवारीसारखी पाने असणारे मुंडवे मुख्यतः खोडव्या- निडव्यासाठी ठेवण्यात येतात.
- घडाच्या विरुद्ध दिशेचा मुंडवा खोडव्या- निडव्यासाठी ठेवला जातो.
- घडाची व केळीच्या झाडाची कापणी होते तेव्हा खोडवा- निडवा हा एक ते दीड महिन्याचा असतो, यामुळे या पद्धतीत पिकाचा कालावधी हा कमी केला जातो.

केळीनंतर सुरू ऊस लागवड
नोव्हेंबरमध्ये काढणी झालेल्या शेतामध्ये सुरू उसाची लावण केली जाते. हा ऊस पुन्हा अकरा महिन्यांत कापणीसाठी येतो. नेहमीच्या केळी लागवडीमध्ये केळीचा निडवा हा जूनमध्ये काढणीसाठी येतो. यामुळे नेहमीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीत आणखी एक पैसा देणारे पीक घेता येणे शक्‍य होते. प्रदीप यांना उसाचे उत्पादन एकरी 60 टनांपर्यंत मिळाले.

केळीचे अर्थशास्त्र ः
पहिल्या वर्षी लावणीसाठी प्रदीप यांना एकरी एक लाख 20 हजार रुपये खर्च आला. तीन ते चार काढणीमध्ये त्यांना एकरी 40 टन उत्पादन मिळाले. टनाला सरासरी 12 हजार रुपये इतका दर त्यांना मिळाला. खर्च वजा जाता तीन लाख साठ हजार रुपये उत्पन्न मिळाले. खोडवे व निडव्यासाठी साधारणपणे एक लाख रुपये खर्च आला. अनुक्रमे एकरी 32- 35 टन उत्पादन मिळाले.

घड काढणी खर्चातही बचत
केळीचे घड काढण्यासाठी टनाला पाचशे रुपये घेतले जातात; पण पट्टा पद्धतीमुळे शेतामध्ये ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह नेता येत असल्याने जागेवरच काढणी केली जाते. नऊ फुटांच्या जागेत ट्रॅक्‍टर सहजपणे नेता येतो. काढणी उत्तमप्रकारे होते. यामध्ये घड मोडण्याचे प्रमाणही कमी असते. साहजिकच मालाची प्रत सुधारते. दरामध्ये याचा फायदा होतो. या पद्धतीत काढणीचा खर्च टनाला शंभर रुपये इतका येतो.

केळीत कोथिंबीर आंतरपीक
कोल्हापुरातील बाजारपेठेत 20 मेनंतर जूनच्या अखेरीपर्यंत कोथिंबिरीस चांगला दर मिळत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रदीप यांनी केळीच्या पिकात 30 गुंठे क्षेत्रामध्ये कोथिंबिरीची लागवड केली होती. एकरी दोन किलो धने त्यांना लागले. त्यांना 18 हजार रुपये कोथिंबिरीतून मिळाले.

प्रदीप यांच्या केळीची वैशिष्ट्ये ः
- 30-32 महिन्यांत तीन पिके ते घेतात. या पद्धतीने त्यांचे हे दुसरे केळी पीक आहे. कमी कालावधीत अधिकाधिक पिके व उत्पन्न.
- आधारासाठी बांबूऐवजी बेल्टचा वापर. एक बेल्ट साधारणपणे तीन- चार वर्षे टिकत असल्याने खर्चात बचत.
- काढणीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर केल्याने खर्चात बचत.
- केळीच्या कापणीनंतर लगेचच सुरू उसाची लागवड.
- केळीमध्ये आंतरपिकांतूनही उत्पन्न.

................
प्रदीप शंकरराव साळोखे, 9403781148

Saturday, June 29, 2013

धरणांचे आर्थिक गणित मांडणारा लेखाजोखा

पुस्तक परिचय
.................................
पुस्तक ः इकॉनॉमिक्‍स ऑफ रिव्हर फ्लो
संपादक ः डॉ. भरत झुनझुनवाला
प्रकाशक ः कल्पाज पब्लिकेशन, सी-30, सत्यवतीनगर, दिल्ली 110052
........
धरणांचे आर्थिक गणित मांडणारा लेखाजोखा
राजेंद्र घोरपडे
.................
भारतात दिवसेंदिवस धरणांची संख्या वाढत आहे. परंतु अमेरिकेत मात्र मोठ्या प्रमाणात धरणांचा बीमोड करण्यावर भर देण्यात येत आहे. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्याने पर्यावरणाची मोठी हानी होते. तसेच धरणांवर दुरुस्तीसाठी होणारा खर्चही वाढतो, आदी आर्थिक व पर्यावरणीय कारणांसाठी धरणे नष्ट करण्याची मोहीम अमेरिकेत सुरू करण्यात आली आहे. याबाबत या पुस्तकात तज्ज्ञांचे लेख डॉ. भरत झुनझुनवाला यांनी संपादित केले आहेत. हे पुस्तक इंग्रजी भाषेत आहे.
पुस्तकात पाच भागात तज्ज्ञांचे लेख देण्यात आले असून पहिल्या भागात अमेरिकेत धरणे नष्ट करण्यामागची कारणे दिलेली आहेत. तेथील अनेक धरणांची कालमर्यादा संपल्याने त्यावर डागडुजी करण्यापेक्षा ती नष्ट करणे अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडण्यात आले आहे. धरणे नष्ट करण्याला धरण क्षेत्रातील व्यक्तींचा विरोध आहे. कारण धरण क्षेत्रातील जमिनींचे भाव गडगडतील अशी भीती त्यांना वाटत आहे. पण तरीही अमेरिकेने सुरक्षेचे कारण पुढे करून धरणे नष्ट करण्यावरच अधिक जोर दिला आहे. दुसऱ्या भागात अमेरिकेतील नष्ट करण्यात येत असलेल्या धरणांची काही उदाहरणे देण्यात आली आहेत. लोअर स्नेक रिव्हरवरील चार धरणे, इल्वाह धरण, एडवर्ड धरण, एम्बेरी धरण या नष्ट करण्यात आलेल्या धरणांचा आढावा यात घेण्यात आला आहे. तिसऱ्या भागात जलविद्युत धरण प्रकल्पावर होणार खर्च आणि त्यापासूनचा फायदा याची तुलना करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या धरणे फायदेशीर असल्याचे आढळत नाही. जलविद्युत प्रकल्पाऐवजी अमेरिका औष्णिक, अणुऊर्जा, सौर ऊर्जा आदी ऊर्जेच्या स्रोतांना अधिक महत्त्व देत आहे. जलविद्युत प्रकल्पांचे नूतनीकरण करता येत नाही, आदी मुद्द्यांवर या भागात प्रकाश टाकण्यात आला आहे. चौथ्या भागात धरणावरील जलविद्युत प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची माहिती देण्यात आली आहे. पाणी प्रदूषण, प्रवाही नद्यांचा विचार, वन्य कायदा आदींवर या भागात चर्चा करण्यात आली आहे. पाचव्या भागात नद्यांतील पाण्याच्या मुक्त प्रवाहाचे आर्थिक महत्त्व सांगण्यात आले आहे. भारतात जलविद्युत प्रकल्पावर होणारा खर्च विचारात घेतला जात नाही. उलट यापासून मिळणारे फायदेच अधिक जोर देऊन मांडले जातात. या सर्व गोष्टींचा विचार करून अमेरिकेच्या धरणे नष्ट करण्याच्या मोहिमेपासून भारतानेही बोध घ्यावा, असे या पुस्तकातून झुनझुनवाला यांना सुचवायचे आहे. धरणांचे आर्थिक फायदे तोटे व पर्यावरणाची हानी आदींचा अभ्यास करण्याऱ्यांसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे.

Friday, June 14, 2013

छंदातून उभारला बांबूच्या सुमारे 350 कलाकृतींचा व्यवसाय

कोल्हापुरातील अशफाक मकानदार यांचा उपक्रम
बांबूपासून सुमारे साडेतीनशे प्रकारच्या विविध कलाकृती तयार करून, त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न कोल्हापूर येथील अशफाक मकानदार यांनी केला आहे. बदलत्या जमान्यानुसार ग्राहकांची मागणी लक्षात घेत त्यांनी आपल्या राज्यासोबतच परराज्यांतही विविध वस्तूंना बाजारपेठ तयार करीत या व्यवसायाची क्षमता सिद्ध केली आहे.
राजेंद्र घोरपडे

बांबूवर आधारित वस्तूंचा वापर ही सध्याची "फॅशन' आहे. घराच्या सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. कोल्हापूर शहरातील जैबुन्निसा मकानदार यांना अशा वस्तूनिर्मितीचा छंद होता. पोलिओने अपंगत्व आलेल्या जैबुन्निसा यांनी याच छंदाचे रूपांतर पुढे व्यवसायात केले. सन 1985 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय त्यांच्या पश्‍चात त्यांचा मुलगा अशफाक सांभाळत आहे.

इंजिनिअर होऊनही नोकरी न करता आईच्या या व्यवसायात त्यांनी वृद्धी केली आहे. सन 2003 पासून पूर्णवेळ ते या व्यवसायात आहेत. बदलत्या जमान्यात बांबूच्या उत्पादनांची मागणी, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यात नवे बदल वा मूल्यवर्धन करून बाजारपेठेत त्यांची मागणी वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जुन्या वस्तूंना "मॉडर्न टच' दिला. व्यवसायासाठी त्यांनी पंतप्रधान रोजगार हमी योजनेमार्फत 15 लाख रुपयांचे 13 टक्के व्याजदराने कर्ज घेतले. या रकमेत 15 टक्के अनुदान मिळाले.

बांबूपासून अशफाक बनवतात या विविध वस्तू! फ्लॉवर पॉट, पेन स्टॅंड, ज्वेलरी बॉक्‍स, बर्ड हाऊस, विंड चाईम, डायनिंग सेट, बांबूच्या खुर्च्या, आरामखुर्च्या, सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, चटई, पडदे, फ्लोरिंग पार्टिशन्स, फ्रूट बास्केट, टोप्या, आकाशदिवे, झुले, टॉवेल होल्डर, फाउंटन्स, फ्लोअर लॅम्प, झुंबर, वॉल लॅम्प, बॅंगल्स, हेअर क्‍लिप, ट्रे, कॅंडल डीनर स्टॅंड, बांबूची विविध स्ट्रक्‍चर्स.
- या वस्तूंमध्ये विविध प्रकारची कलाकुसर असते.

- बाजारपेठेतील मागणीनुसार ही उत्पादने घेतली जातात.
- बांबूपासून सुमारे 15 प्रकारचे आकाश कंदील, पन्नास प्रकारचे फ्लॉवरपॉट, तर दहा प्रकारचे ज्वेलरी बॉक्‍स तयार करतात. या कलाकृती तयार करण्यासाठी बहुला, बिजली, मकल, कळक, मेसकाठी (कागदी चिवा), टल्ला आदी प्रकारच्या बांबूंचा वापर अशफाक करतात. बांबूंची खरेदी मुख्यतः कोल्हापुरातील टिंबर मार्केटमधूनच होते. आवश्‍यकतेनुसार उत्पादने घेत असल्याने तेवढ्याच कच्च्या मालाची खरेदी करावी लागते, यामुळे महाग असूनही कच्चा माल मिळेल त्या दरात खरेदी करतात. अशफाक यांना पत्नी नाझनीन, वडील बादशहा यांची व्यवसायात मोलाची मदत होते. कलाकुसरी करण्यासाठी पाच महिला कामगार आहेत, त्यांच्या सोबत नाझनीन स्वतःही राबतात.

काही वस्तूंविषयी -

इंटिरिअर लॅम्प याच्या निर्मितीसाठी कळक जातीचा बांबू लागतो. 14 फूट लांबीचा बांबू लागतो. एका बांबूची किंमत अंदाजे 40 ते 100 रुपये असते. आकार व लांबीनुसार विविध दर असतात. बांबूवरील गाठी काढून घेऊन तो घोळून घेतला जातो, त्याला पॉलिश करून आवश्‍यकतेनुसार विविध आकार तयार केले जातात. त्याला कीड- रोग लागू नये यासाठी प्रक्रिया केली जाते. पॉलिश किंवा गरजेनुसार रंग दिला जातो. वर्षभरात अंदाजे एक हजार लॅम्प तयार करतात. ते तयार करण्यासाठी वीज, मजुरी, पॉलिश, रसायन आदी साहित्य, वाहतूक असा अंदाजे सात लाख रुपयांचा खर्च येतो. प्रति नग 650 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळतो. खर्च वजा जाता अंदाजे तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.

आकाश कंदील यासाठी मेसकाटी (कागदी चिवा) प्रकारचा बांबू वापरण्यात येतो. दोन इंच जाडीचा व 24 फूट लांबीचा चिवा अंदाजे 60 रुपये दराने विकत घेतात. चिवा फोडून पट्ट्या तयार केल्या जातात. गरजेनुसार आकार करून त्यावर प्रक्रिया केली जाते. चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे सुमारे 35 प्रकारचे आकाश कंदील वर्षभरात अंदाजे सहा हजार संख्येने तयार करतात. चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता दीड लाख रुपये मिळतात.

विंड चाईम आकाश कंदील तयार करताना शेंड्याकडील शिल्लक राहिलेल्या चिव्याचा उपयोग विंड चाईम तयार करण्यासाठी केला जातो. सुमारे 20 प्रकारचे विंड चाईम तयार करतात. वाऱ्याची झुळूक येताच घरात अडकवलेल्या या विंड चाईममधून मधुर ध्वनी निर्माण होतो.

बांबूचे बेड कळक बांबूपासून विविध क्षेत्रफळांचे बेड तयार करतात. एका बेडसाठी अंदाजे 20 बांबू लागतात.

उत्पादनांना बाजारपेठ लग्नसराईत रुखवतात सजावटीसाठी बांबूच्या विविध वस्तूंचा वापर होतो. दीपावलीच्या काळात आकाश कंदिलांना मागणी असते. सध्या मुंबई, बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, गोवा या शहरांतील मॉल्स, मोठे स्टोअर्स येथे बांबूची उत्पादने अशफाक यांनी विकली आहेत. अनेक ठिकाणी विक्रीवृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्पादनांची आगाऊ मागणी नोंदवूनच उत्पादन घेतले जाते. रेस्ट हाऊस, रिसॉर्ट, पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, टेंट हाऊस, फार्म हाऊस, पर्णकुटी (बांबू हाऊस) आदींकडूनही सजावटीसाठी या उत्पादनांना मागणी असते. उत्पादनांच्या विक्रीसाठी "डेव्हलपमेंट कमिशन ऑफ हॅन्डिक्राफ्ट'कडून विविध प्रदर्शनांमध्ये मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातात.

वार्षिक उलाढाल - वर्षभरात अंदाजे साडेतीनशे प्रकारच्या वस्तू अशफाक तयार करतात. यातून सुमारे 50 लाख रुपये किमतीची उलाढाल होते. उत्पादन खर्च, मार्केटिंग (त्यासाठी वेगळी टीम आहे), वाहतूक आदीचा खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. त्यात मागणीनुसार चढ- उतार राहतात.

अशफाक यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये - स्व-उत्पादित मालाची किंमत अशफाक स्वतः ठरवतात, यामुळे विक्रीनंतरचा नफा निश्‍चित असतो.
- व्यवसायवृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन सजावटी- आराखडे करून सातत्याने उत्पादनात बदल, त्यामुळे मालाचे मूल्य व बाजारातील मागणी कायम ठेवतात.
- इंटरनेटच्या माध्यमातून लाकडाच्या विविध उत्पादनांची "डिझाईन्स' बांबूमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात.
- काही कामे जलद होण्यासाठी यंत्रांचा वापर वाढविला आहे.
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी "डिझाईन'च्या स्पर्धा ते भरवितात. यातून नव्या पिढीसाठी आकर्षक वाटणारी डिझाईन्स विचारात घेऊन तशा पद्धतीचा उत्पादनात बदल करण्याचा प्रयत्न करतात.
- बांबू विषयातील संकेतस्थळ सुरू करून विक्रीवृद्धीसाठी प्रयत्न केले आहेत.

अशफाक मकानदार - 9028525410
साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर

व्यवसायातील जोखीम वा समस्या - बांबूच्या उत्पादनांना लाकडी वस्तूंच्या तुलनेत ग्राहकांकडून त्वरित पसंती मिळणे कठीण असते,
त्यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रकारे पटवून द्यावे लागते.
- या उत्पादनांच्या किमतीही ग्राहकांना महाग वाटतात.
- बांबूची उत्पादने दीर्घकाळ टिकतात का याबाबत ग्राहक शंका घेतात.
अशफाक म्हणाले, की बांबूच्या वस्तू पंधरा वर्षे टिकतात. जंगलतोडीच्या आजच्या युगात इकोफ्रेंडली बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. आम्ही बांबूचे महत्त्व व्यवसायाच्या माध्यमातून वाढवत आहोत.

Tuesday, May 14, 2013

टुटी फ्रुटीतील "विजय'

पपई प्रक्रियेतून राशिवडेच्या तरुणाने शोधला उत्पन्नाचा स्रोत; धाडसाने उभा केला प्रकल्प समाधानकारक दर नाही म्हणून हताश होऊन बसण्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यातील विजय तापेकर पपई प्रक्रिया उद्योगाकडे वळले. त्यासाठी प्रशिक्षण घेतले. भांडवल उभे केले. धाडसाने या उद्योगाची उभारणी केली. आज पपईतून टुटी-फ्रुटीची निर्मिती करून या व्यवसायातून त्यांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. राजेंद्र घोरपडे
विजय तापेकर यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. त्यांचे वडील गणपती तापेकर केळी, आले, झेंडू, भाजीपाला आदी पिकांची लागवड करतात. गेल्या 22 वर्षांपासून त्यांच्याकडे पपईची शेती होते. अन्य शेतकऱ्यांची तीन एकर शेतीही भाडेपट्टीने कसायला घेतली आहे. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर विजय यांनीही घरची शेतीच सांभाळण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांचा थेट विक्रीस विरोध वडिलांसोबत गोवा बाजारपेठेत पपई, केळीची विक्री करण्यासाठी विजय जायचे. व्यापाऱ्यांना माल विकण्याऐवजी अधिक नफा मिळतो म्हणून विजय यांनी गोवा बाजारपेठेत थेट विक्री सुरू केली; मात्र तेथील व्यापाऱ्यांनी यास कडाडून विरोध दर्शविला. एकदा तर काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या पपईचे नुकसानही केले. त्यानंतर विजय यांनी थेट विक्रीचा नाद सोडला. काही व्यापाऱ्यांशी संबंध वाढवून नियमित विक्री सुरू केली.

प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल ... विजय यांनी स्वतःच्या पपईबरोबरच अन्य शेतकऱ्यांचीही पपई खरेदी करून गोवा बाजारपेठेत विक्री सुरू केली; मात्र समाधानकारक दर न मिळाल्याने अनेकदा नुकसान व्हायचे, पपई फेकून देण्याची वेळ यायची. बाग शेवटच्या टप्प्यात असताना शिल्लक पपई टाकून द्यावी लागे. हे नुकसान एक ते पाच टनांपर्यंत व्हायचे. इतर शेतकऱ्यांचेही असेच नुकसान व्हायचे. ही शिल्लक पपई प्रक्रियेसाठी सांगली, इस्लामपूर, सातारा जिल्ह्यात पाठविण्याचाही विजय यांनी प्रयत्न केला; पण वाहतुकीचा खर्च वगळता काहीच पैसे हाती पडले नाहीत, यामुळे आपल्याच भागात प्रक्रिया उद्योग उभारण्याचा विचार विजय यांच्या मनात घोळू लागला.

प्रकिया उद्योगाची वाटचाल प्रक्रियेतून होणारे नुकसान टाळता येऊ शकते, हे विजय यांच्या मनात पक्के रुजले. प्रक्रिया उद्योगाचा निर्धार पक्का केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ- माणगाव येथे डॉ. हेडगेवार प्रकल्प सेवांतर्गत महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचे प्रशिक्षण वर्ग चालत असल्याचे समजले. त्यादृष्टीने 2004 मध्ये फळप्रक्रिया उद्योगाचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. जेवण व राहण्याच्या सोयीसुविधेसह दोन हजार रुपये खर्च आला.

उद्योगाची उभारणी प्रशिक्षण घेतले, पण उद्योग उभारणी कशी करणार, हाच प्रश्‍न होता. भांडवल मोठे लागते. लाखो रुपयांचे कर्ज कोणी सहजासहजी देत नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तर हजारो प्रश्‍न विचारून भेडसावून सोडले. कित्येकदा प्रक्रिया उद्योगाचा नाद सोडावा की काय, असे विजय यांना वाटायचे. अखेर एका सहकारी बॅंकेने दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. विजय बायोटेक या नावाने उद्योग सुरू झाला. बांधकामासाठी चार लाख रुपये खर्च आला. पिलिंग मशिन (साल काढणी यंत्र), स्लायझिंग, क्‍युबिंग (लहान तुकडे करणारे यंत्र), 50 लिटर क्षमतेचा बॉयलर, केटल (शिजविण्याचे पात्र) आदींच्या खरेदीसाठी सहा लाख रुपये खर्च आला. कच्चा मालाच्या खरेदीसाठी बॅंकेत खेळते भांडवल चार लाख रुपये ठेवले. असा सुमारे चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च उद्योग उभारणीसाठी आला. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी 50 टक्के अनुदान मिळाले. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य झाले.

अशी होते पपई प्रक्रिया - टुटी फ्रुटी तयार करण्यासाठी तैवान 786 या जातीची कच्ची पपई लागते.
- पपई सोलणी यंत्राच्या साहाय्याने सोलून घेऊन साल काढली जाते.
- काप करून 18 टक्के मिठाच्या द्रावणात 21 दिवस भिजत ठेवले जातात.
- त्यानंतर तुकडे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन त्यांचे क्‍युबिंग मशिनच्या साहाय्याने तुकडे केले जातात.
- त्यानंतर केटलमध्ये स्टीमच्या साहाय्याने शिजवले जातात.
- उकळत्या पाण्यात शिजलेले तुकडे 65 टक्के साखरेच्या द्रावणात 24 तास ठेवले जातात.
- त्यानंतर पुन्हा केटलमध्ये शिजवून घेतले जातात. त्यात विविध प्रकारचे रंग, प्रिझरवेटिव्ह आदींचा वापर केला जातो.
- त्यानंतर ते योग्य प्रकारे वाळवण्यात येतात, त्यानंतर पॅकिंग होते.

टुटी फ्रुटीचे उत्पादन टुटी फ्रुटीचे उत्पादन - दररोज अंदाजे 300 किलो
यासाठी कच्चा माल - 700 किलो पपई

महिन्याला - पाच ते सहा टन
वार्षिक - सुमारे 50 टन

300 किलो टुटी फ्रुटीच्या उत्पादनाचा खर्च (एका दिवसासाठी) पपई 700 किलो (दर 4 रुपये प्रति किलो) ......2800 रुपये
यासह साखर, मीठ, मजुरी, इंधन, पॅकिंग मटेरिअल, रसायने, वीज, पाणी, वाहतूक आदी मिळून
अंदाजे एकूण खर्च 12 हजार रुपये. घटकांचे दर कमी- जास्त होतील तसा उत्पादन खर्च वाढतो. खर्चाच्या 15 टक्के मार्जिन पकडून दर ठरविला जातो.

विक्री - प्रति किलो - 40 ते 50 रुपये

अद्याप बॅंकेचे कर्ज आहे, त्यामुळे 15 हजार रुपयांचा महिन्याचा हप्ता येतो. दिवसाला हप्ता गृहीत धरून येणारा सर्व खर्च वजा जाता दिवसाला हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.

टुटी फ्रुटीची विक्री - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बेकरी व्यावसायिक, पान मसाला दुकानदार, कोल्ड्रिंक व्यावसायिक, होलसेल मालाचे विक्रेते टुटी फ्रुटीची खरेदी करतात. आठवड्यातून एकदाच सर्व मालाची डिलिव्हरी जागेवर केली जाते, यामुळे वाहतूक खर्च व रोजच्या मालाची ने- आण करण्याचा त्रास वाचतो.

पपईची गोव्याला विक्री उन्हाळ्यात पपई लगेच पिकते. अशी पपई टुटी फ्रुटीला वापरता येत नसल्याने गोवा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली जाते. आठवड्यातून दोन वेळा अंदाजे पाच टन माल गोवा व मुंबई बाजारपेठेला पाठवला जातो. स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रति किलो चार ते सहा रुपये दराने मालाची खरेदी होते. बाजारपेठेत सात ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतो. रमझानमध्ये हा दर 20 ते 30 रुपयांपर्यंतही जातो.

विजय तापेकर - 9420582444
राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

Friday, May 3, 2013

उसातील काकडीने दिला बाबासाहेबांना आर्थिक आधार


वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना केवळ एखाद्या पिकावर अवलंबून राहणे परवडत नाही. उत्पन्नवाढीसाठी किंवा शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध प्रयोग शेतकरी करतात. शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगौंडवाडी येथील बाबासाहेब देवकर यांनी उसात विविध आंतरपिके घेण्याचे प्रयोग केले आहेत. यंदा दुष्काळी पार्श्‍वभूमीवर काकडीला चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी काकडीचे आंतरपीक घेतले. त्यातून फायदा मिळवताना उसातील उत्पादन खर्चही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.


राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगौंडवाडी (ता. करवीर) येथील बाबासाहेब देवकर यांनी "ऍटोमोबाईल' विषयातील पदविका घेतली. सहा वर्षे कंपनीत काम केले. नोकरी करताना शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. शेतीच्या आवडीतून अखेर नोकरी सोडली. त्यांची साडेसात एकर बागायती जमीन आहे. पाण्याची सुविधा असल्याने सर्व हंगामांत पिके घेणे त्यांना शक्‍य असते. सन 1992 पासून शेती करताना विविध प्रयोगही त्यांनी केले आहेत. गेली 16 वर्षे ते पाचट जाळण्याऐवजी शेतातच कुजवत आहेत, त्यासाठी त्याची कुट्टी करून शेतात मिसळतात.

कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचामुळे शेतीत नवीन तंत्रज्ञानाचे प्रयोग सातत्याने ते करतात. उसात आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान त्यांनी मंचाच्याच माध्यमातून घेतले. गेल्या दहा वर्षांत त्यांनी उसात गहू, हरभरा, कोबी, चवळी, फ्लॉवर, वैशाख मूग, जनावरांसाठी लसूणघास, कलिंगड, भुईमूग आदी पिके घेतली आहेत. आंतरपिकासाठी खते, पाणी हे घटक स्वतंत्रपणे द्यावे लागत नाहीत. उसाची आंतरमशागतही सुलभ होते. यामुळे खर्चात बचत होऊन घेतलेल्या आंतरपिकाचे उत्पादनही हाती मिळते.
आतापर्यंत घरच्या गरजा विचारात घेऊन आंतरपिकांची निवड केली. यंदाच्या वर्षी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अशोक पिसाळ व डॉ. पांडुरंग मोहिते यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन त्यांना काकडीचे आंतरपीक घेण्यास सुचवले. यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळ आहे. यामुळे उन्हाळ्यातील पिके अनेक भागांत अधिक प्रमाणात होणार नाहीत. यात मुख्यतः भाजीपाला व काकडीचे उत्पादन तुलनेने कमी राहील. बाजारपेठेत चांगला दर मिळणार, असा विचार त्यामागे होता. त्यानुसार बाबासाहेबांनी काकडीचे नियोजन केले.


असे केले लागवड नियोजन

उसाची लागवड तीन फूट सरी पद्धतीने बाबासाहेब करतात. यंदाच्या प्रयोगात प्रत्येक दोन सरींनंतर तिसऱ्या सरीवर त्यांनी काकडी घेतली. ही लागवड पूर्वहंगामी उसातील खोडव्यात केली होती, त्यामुळे काकडीचे उत्पादन उन्हाळी हंगामातच चांगल्या प्रकारे साधण्याची संधी होती. जानेवारीत ऊस तुटून गेल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिकाम्या सोडलेल्या जागेत पॉवरटिलरच्या साहाय्याने सरी काढून त्यावर काकडीच्या बियांची टोकण केली. एकरी सुमारे 1200 रोपे बसली. दोन रोपांतील अंतर सुमारे अडीच ते तीन फूट होते.
उसाला दिलेल्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर काकडीसाठीही झाला; मात्र काकडी दोन पानांवर आल्यानंतर आणि फुलोऱ्यावर आल्यानंतर 19-19-19 या खताचे प्रत्येकी 50 किलो डोस दिले.

पाणी व्यवस्थापन

आंतरपिके घेताना पाण्याचे व्यवस्थापन योग्य ठेवावे लागते. टोकणीनंतर तसेच काकडी फुलोऱ्यावर येईपर्यंत पाण्याच्या तीन हलक्‍या पाळ्या दिल्या. काकडी फुलोऱ्यावर आल्यानंतर दर दहा दिवसांनी सकाळच्यावेळी पाण्याची पाळी दिली. दुपारी उन्हामध्ये पाणी देण्याचे टाळले, कारण मुळांना इजा होते. यामध्ये पाण्याची बचत झाली. उसामध्ये पाचट ठेवले असल्याने पाण्याची गरज कमी झाली.

रसशोषक किडींचे नियंत्रण केले

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बेन्डाझिमच्या दोन ड्रेंचिंग (आळवण्या) घेतल्या. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यावर भर दिला, त्यासाठी तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली.

वेलांना बांबूचा आधार

काकडीचा वेल जमिनीवर पसरला तर त्याची वाढ योग्य प्रकारे होत नाही; तसेच काकडी जमिनीवर लोळल्यास खराब होण्याचा धोका असतो. दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी काकडीचा वेल नायलॉन दोरीवर सोडणे उत्तम असते. यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येकी आठ फूट अंतरावर बांबू उभारून त्यावर नायलॉन दोऱ्या बांधल्या. या दोऱ्यांवर वेल सोडण्यात आला. एकरी साधारणपणे 200 बांबू लागले. यासाठी चार बंडल वायर लागते.


गेल्यावर्षी बाबासाहेबांनी उसात हरभरा हे आंतरपीक घेतले होते. दोन सरींनंतर रिकामी ठेवण्यात आलेल्या सरीच्या ठिकाणी गादीवाफा करून त्यावर हरभऱ्याची लागवड केली. हरभरा उत्पादनासाठी दोन हजार रुपये खर्च आला. एकरी सुमारे दोन क्विंटल उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता दहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. या व्यतिरिक्त उसाचे उत्पादन एकरी 60 टन मिळाले. याच शेतात ऊस तोडून गेल्यानंतर यंदा काकडीची लागवड साधली आहे.

....................
प्रयोगातील अर्थशास्त्र -

काकडीचा प्लॉट जवळपास संपला आहे. शेवटचे अल्प तोडेच बाकी आहेत. आतापर्यंत सुमारे साडेचार टन उत्पादन एकरी मिळाले आहे. नांदणी भाजीपाला संघामार्फत काकडीची मुंबई बाजारपेठेत विक्री केली. मुंबईतील दरानुसार किलोला 16 पासून ते 24, 26 रुपयांपर्यंत, तर सरासरी 18 रुपये प्रति किलो दर मिळाला.
एकूण 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. काकडीसाठी अंदाजे खर्च सांगायचा तर बियाणे, पेरणी, फवारणी, खते, तोडणी, मजुरी, बांबू, दोऱ्या, वाहतूक असा एकूण खर्च 35 हजार रुपये आला आहे. खर्च वजा जाता मिळालेले उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये आहे. संघ वाहतूक व इतर खर्चासाठी किलोमागे चार रुपये घेतो. संघ असल्याने विक्रीची हमी मिळते. मालाला योग्य दर मिळून वेळेवर आर्थिक व्यवहार होत असल्याने योग्य नफा हाती पडतो.
बाबासाहेब अनेक वर्षांपासून ऊसशेती करतात. त्यांचे सध्याचे पूर्वहंगामी लावणी उसाचे उत्पादन एकरी 70 टन आहे, तर खोडवा उसाचे 50 ते 55 टन आहे. लावणी उसाचा उत्पादन खर्च एकरी सुमारे 40 हजार रुपयांच्या घरात, तर खोडवा उसाचा हा खर्च सुमारे 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे.
आंतरपिकांतील उत्पन्नामुळे उसाचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत झाली.
.....................
आंतरपिकाचे बाबासाहेबांनी सांगितले फायदे

- मुख्य पिकाचा उत्पादन खर्च कमी होतो.
- खते व पाण्याची बचत या अर्थाने की आंतरपिकाला स्वतंत्र देण्याची गरज कमी होते.
- मुख्य दीर्घ पिकातील भांडवली खर्च आंतरपिकांतून सुरवातीच्या तीन महिन्यांतच कमी होतो.
- दोन्ही पिकांकडे चांगले लक्ष देणे शक्‍य होते.
..................................................................

"ऍग्रोवन'मधील लेख वाचून शेती

"ऍग्रोवन'मध्ये इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग लागवड करण्यासंदर्भात चार फेब्रुवारीच्या अंकामध्ये लेख आला होता, त्यानुसार इक्रिसॅट पद्धतीने त्यांनी भुईमूग लागवड केली आहे.
.....................
संपर्क ः बाबासाहेब देवकर - 9823348700
गाडेगोंडवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर

Thursday, April 18, 2013

ऊस पट्ट्यात फुलला "फुलशेतीचा बुके'

बुकेसाठीच्या फुले आणि फिलर्सच्या विक्री व्यवस्थापनातून राजकुमार भोसले यांनी मिळवले यश नरंदे (जि. कोल्हापूर) येथील राजकुमार भोसले हे गेल्या सहा वर्षांपासून बुकेसाठी लागणाऱ्या लांब दांड्याची फुले व फिलर्सचे उत्पादन करतात. योग्य नियोजन आणि विक्री व्यवस्थापनातून चांगला फायदा कमावत वडिलोपार्जित चार एकर शेतीची 12 एकरापर्यंत वाढ केली आहे. शिक्षण कमी असले तरी अंगभूत हुशारीने राजकुमार यांचा "फूल शेतीचा हा बुके' आजूबाजूच्या उसाच्या पट्ट्यामध्ये ठळकपणे नजरेत भरत आहे. राजेंद्र घोरपडे 

नरंदे (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथील राजकुमार भोसले यांची वडिलोपार्जित चार एकर शेती होती. राजकुमार यांनी शालेय शिक्षण आठवीपर्यंत झाल्यानंतर घरच्या शेतात लक्ष घातले. गावातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे ऊस आणि भाजीपाला पिकांची लागवड केली होती. मात्र माळरान जमिनीतून ऊस व भाजीपाल्याचे समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 1996 ला दोन एकरामध्ये गुलाबाची लागवड केली. त्यातून चांगल्या प्रकारे उत्पादन व उत्पन्न मिळाल्याने राजकुमार यांचा उत्साह वाढला.
गुलाबाच्या विक्रीसाठी बाजारात सातत्याने जाणाऱ्या राजकुमार यांनी फुलांसोबतच बुके सजावटीसाठी ग्लॅडिओलस, स्प्रिंगेरी, कामिनी, गोल्डन रॉड, ब्लुडीजी, स्टारडीजी यांसारख्या फिलर्सचीही गरज लागत असल्याचे लक्षात आले. सुरवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रावर ग्लॅडिओलसची लागवड केली. त्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाल्याने बुके सजावटीसाठीच्या फिलर्सची लागवड करण्याचा निर्णय घेतला. फिलर्समध्ये त्यांनी गोल्डन रॉड, स्प्रिंगेरी, कामिनी आदींची लागवड केली.

उत्पन्नाची शेतीतच गुंतवणूक
फुलांसोबतच फिलर्स असल्याने त्यांच्याकडे मागणी वाढत होती. शेतीतून आलेला पैसा हा शेतीच्या विस्तारातच गुंतवत चार एकरावरून शेती 12 एकरापर्यंत वाढविली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा सुधारित तंत्रज्ञानातून अधिक नफा मिळू शकतो, हे पाहून त्यांनी हरितगृहाची उभारणीही केली आहे. आज त्यांच्याकडे सहा एकर क्षेत्रावर हरितगृह आहे. उर्वरित सहा एकर क्षेत्रामध्ये बुकेसाठी लागणाऱ्या फिलर्सची लागवड केली आहे. त्यामध्ये त्यांच्या सध्या एक एकर स्प्रिंगेरी, 20 गुंठ्यांत कामिनी, एक एकरामध्ये गोल्डन रॉडची लागवड केलेली आहे. तसेच अन्य फुलांमध्ये दरवर्षी डबल निशिगंध 30 गुंठ्यांवर, सिंगल निशिगंध एक एकरावर व ग्लॅडिओलसची 30 गुंठ्यावर लागवड ते करतात. 

घरच्यांचेही सहकार्य हरितगृह शेतीचे तंत्र सुरवातीला त्यांना माहीत नव्हते. त्या काळात आष्टा गावातील तानाजी चव्हाण या 1970 पासून फुलशेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे मार्गदर्शन मिळाल्याचे राजकुमार सांगतात.
राजकुमार यांचे बंधू प्रकाश आणि नंदकुमार भोसले यांचेही शेतीमधील मार्गदर्शन मिळते. राजकुमार यांच्या व्यवसाय वाढीमध्ये त्यांची पत्नी अनिता यांचाही मोठा वाटा आहे. त्या शेतीतील सर्व कामगारांचे व्यवस्थापन पाहतात. मालाच्या काढणीपासून ते पॅकेजिंगपर्यंतची सर्व कामे त्या कामगारांकडून करून घेतात. प्रसंगी कामगारांबरोबर स्वतः या कामामध्ये सहभागी असतात.

स्प्रिंगेरी लागवड सहा वर्षांपूर्वी राजकुमार यांनी एक एकर क्षेत्रावर स्प्रिंगेरीची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी 25 ट्रॉल्या शेणखत शेतामध्ये मिसळले. लावण पाच फूट रुंदीच्या गादीवाफ्यावर दीड फूट x एक फूट अंतरावर केली. एकरी साडेचार हजार रोपे लागली. पाणी व खते ठिबक सिंचनाद्वारे दिली जातात. खुरपणी व्यतिरिक्त यामध्ये फारशी आंतरमशागत करावी लागत नाही.

खत व्यवस्थापन दर आठवड्याला ठिबकमधून खते दिली जातात. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 19-19-19 आणि 12- 61- 0 हे विद्राव्य खत, दुसऱ्या आठवड्यात 16- 08-24 आणि 0- 52- 34 तिसऱ्या आठवड्यात दिले जाते. या व्यतिरिक्त तीन आठवड्यांतून एक वेळेस कॅल्शिअम नायट्रेट दिले जाते. पाणी दोन तास दररोज ड्रीपने दिले जाते.

स्प्रिंगेरीतून तीन लाख उत्पन्न लागवडीनंतर स्प्रिंगेरी पिकातून जवळपास दहा वर्षांपर्यंत उत्पन्न देते. आता सहा वर्षे झाली आहेत. दररोज तीन हजार काड्यांची तोड होते. 50 काड्यांचा बंडल करून विक्रीस पाठविला जातो. मागणीनुसार दररोज 50 ते 60 बंडल निघतात. एक बंडलला बाजारभावाप्रमाणे 25 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. लागवडीसाठी साडेचार हजार रोपे आठ रुपयांप्रमाणे विकत घेण्यात आली. त्यासाठी 36 हजार रुपये लागले होते. त्याचा प्रतिवर्ष खतासाठी 30 हजार, वीज बिल व अन्य खर्च साधारणपणे सहा हजार रुपये खर्च होतात. वर्षाला अंदाजे पाच ते सहा लाख काड्यांचे उत्पादन मिळते. वर्षाला स्प्रिंगेरी पीक व्यवस्थापनासाठी अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो.

कामिनी लागवड चार वर्षांपूर्वी स्प्रिंगेरीमध्येच 20 गुंठे क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून कामिनीची लागवड केली आहे. पाच फुटांचे गादी वाफे करून चार x अडीच फूट अंतरावर लागवड केली आहे. त्यासाठी 2300 रोपे यासाठी लागली. प्रति रोप 12 रुपये किमतीने रोपे आणली होती. दररोज 10 काड्यांचे एक बंडल असे मागणीनुसार अंदाजे 50 ते 100 बंडलची तोड केली जाते. बाजारभावाप्रमाणे एका बंडलाला 10 ते 15 रुपये दर मिळतो.

गोल्डन रॉड लागवड 

एक एकर क्षेत्रामध्ये गोल्डन रॉड लावला आहे. तीन फुटांच्या सरीवर एक फूट अंतरावर मुळ्यांची लावण राजकुमार यांनी केली आहे. एकदा केलेली लागवड दोन वर्षे चालू शकते. एक एकरी चार हजार रुपये खर्च आला. महिन्यातून एकदा एकरी डीएपी 100 किलो आणि युरिया 25 किलोचा असा खताचा डोस दिला जातो. खतासाठी वर्षाला 25 हजार रुपये, काढणीसाठी 20 हजार रुपये, असा एकत्रित अंदाजे 60 हजार रुपये खर्च आहे. मागणीनुसार दररोज 100 ते 150 बंडल गोल्डन रॉडची काढणी केली जाते. एका बंडलामध्ये 15 ते 20 काड्या असतात. एका बंडलाला साधारणपणे 10 ते 20 रुपये इतका दर मिळतो.

डबल निशिगंध लागवड दरवर्षी 30 गुंठ्यांवर डबल निशिगंधाची लागवड राजकुमार करतात. जूनमध्ये लावण केल्यानंतर साधारणपणे ऑगस्ट ते मार्च असे सात ते आठ महिने उत्पादन मिळते. 30 गुंठ्यांमध्ये 14 हजार कंद साधारणपणे लागतात. त्यासाठी 12 हजार रुपये लागतात. अडीच फुटांच्या गादीवाफ्यावर दीड-दीड फुटाच्या अंतरावर कंद लावण्यात येतात. महिन्याला एकरी डीएपी 70-80 किलो व युरिया 10 किलोचा खताचा डोस दिला जातो. अंदाजे 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. एक दिवसाआड 600 काडी निघते. त्याला प्रति दांडा तीन ते सात रुपयांपर्यंत दर मिळतो.

विक्रीची व्यवस्थापन 1) बुके व्यावसायिकांच्या दारात -
नरंदे येथे फार्म हाऊसवर पॅकिंग केले जाते. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगाव, कऱ्हाड, इस्लामपूर, कोकणात सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी येथील बुके तयार करणाऱ्या व्यावसायिकांशी थेट मालाची विक्री केली जाते. हे व्यावसायिक थेट संपर्क साधून मालाची आगाऊ ऑर्डर देतात. मालाचा दर मात्र बाजारपेठेतील दर आणि असलेल्या मागणीनुसार ठरविला जातो. मालाच्या वाहतुकीसाठी स्वतःची तीन पिकअप वाहने आहेत. वाहतुकीसाठी अंदाजे वर्षाला पन्नास हजार तरी खर्च होतो.

2) होलसेल विक्री गाळा -
- कोल्हापूर शहरामध्ये होलसेल विक्रीसाठी दुकानही घेतले आहे. या दुकानातून जास्तीत जास्त माल हा स्थानिक बाजारपेठेतच विकला जातो. स्थानिक बाजारपेठेत मालाला मागणी कमी असल्यास मुंबई, हैदराबाद, विजयवाडा, बंगळूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून मालाची विक्री केली जाते. तिकडे हा माल रेल्वेतून पाठविण्यात येतो.
3) गणपती, दसरा, दीपावली अशा सणांच्या काळात व्हॅलेंटाइन डे या कालावधीत फुलांना अधिक मागणी असते. लग्नाचे मुहूर्त असलेल्या महिन्यामध्येही फुलांची मागणी अधिक असते. त्याचा अभ्यास करून नियोजन केले जाते.


सुधारित शेती पोचली साडेपाच एकरावर हरितगृहामध्ये जरबेरा, गुलाब आणि कार्नेशियन यांची लागवड केली आहे. गुलाब अडीच एकरात, कार्नेशियन अर्धा एकरावर आणि जरबेरा अडीच एकरावर क्षेत्रामध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून हरितगृहातून फुलांचे उत्पादन घेत आहेत.
- बुके तयार करताना लागणारा सर्व शेतीमाल स्वतःच्या शेतात उत्पादित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

राजकुमार यांच्या शेतीची वैशिष्ट्ये - बुके व्यावसायिकांना लागणारे सर्व प्रकारचे फूल दांडे आणि फिलर्स अशा शेतीमालाचे उत्पादन ते घेतात. व्यावसायिकांची मागणी लक्षात आल्याने नियोजन सोपे जाते.
- थेट बुके व्यावसायिकांशी विक्री करत असल्याने दलालीचा खर्च वाचतो
- स्वतःच्या शेतीमालाचा दर ते स्वतःच ठरवतात.
- मालाच्या वाहतुकीसाठी स्वतःचीच वाहने असून, माल वेळेवर पोचवण्याकडे लक्ष दिले जाते.
संपर्क - राजकुमार रामचंद्र भोसले, 9765554242

Wednesday, March 27, 2013

मधमाशीपालनातील "मधुकर'

कोल्हापूर जिल्ह्यात उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या जंगली भागात नाईक यांचा पूरक व्यवसाय
पश्‍चिम घाटमाथ्यावरील जैवविविधता, तसेच तेथील कुटीर उद्योगांचीही जोपासना गरजेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव (ता. भुदरगड) येथील मधुकर नाईक अनेक वर्षांपासून मधमाशीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शेतीला हा पूरक व्यवसाय त्यांना किफायतशीर ठरला आहे.
 
राजेंद्र घोरपडे
पाटगाव येथील मधुकर संभाजी नाईक यांची तशी चार एकर शेती असली तरी त्यातील बरीच पडीक. भात व नाचणी ही त्यांची मुख्य पिके. त्यातून घरी खाण्यापुरते उत्पादन मिळते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे अर्थार्जन अजून होण्याची गरज होती. पाटगाव परिसरात जंगल असल्याने तेथे सातेरी जातीच्या मधमाश्‍या आढळतात. त्यांच्यापासून मधसंकलनाचा व्यवसाय करण्याचे नाईक यांनी ठरवले. सुरवातीला मधसंकलनासाठी रोजंदारी केली. सन 1970 मध्ये महिन्याला 30 रुपये मजुरी मिळायची. पुढे ही कला अवगत झाल्यानंतर त्यांनी स्वतःच हा व्यवसाय सुरू केला. सध्या यावरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

अनेक चढ-उतार येऊनही त्यांनी हा व्यवसाय सोडला नाही. शहराचा रस्ता पकडला नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपली वाटचाल सुरूच ठेवली. या व्यवसायात आता मुलगा विनायक याचीही साथ मिळत आहे.

दहा वर्षे रोजंदारी केल्यानंतर 1980 पासून मधुकर यांनी व्यवसायात स्वयंपूर्णता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या काळात वर्षाला 150 ते 200 किलो इतका मध ते गोळा करत. पाटगावात तेव्हा सहकारी तत्त्वावर मध उत्पादक संस्था होती. किलोला 30 रुपये दर सोसायटीकडून मिळत होता. सन 1994 पर्यंत या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत होते. 1994 मध्ये 28 हजार किलो इतके उच्चांकी मधसंकलन सोसायटीमध्ये झाले होते.

थायी सॅक ब्रुड रोगाचा प्रादुर्भाव
सन 1994 नंतर थायी सॅक ब्रुड रोगाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायावर जवळपास गंडांतरच आले. अंडीकोषातच मधमाश्‍या मरायच्या. मरतूक मोठी असल्याने मधमाश्‍यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. वर्षाला केवळ 20 ते 25 किलो इतकेच मधसंकलन व्हायचे. यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला. पाटगाव येथील मध उत्पादक सहकारी संस्थाही मोडकळीस आली. पण तरीही मधुकर यांनी हा व्यवसाय सोडला नाही. त्यांनी जिद्दीने तो पुढे सुरू ठेवला.

मध संकलन कसे चालते?
 सातेरी जातीच्या मधमाश्‍यांपासून मध काढला जातो.
-मुख्यतः फेब्रुवारी ते मे या कालावधीत संकलन चालते.
-मधमाश्‍यांच्या वसाहती असलेल्या पेट्या जंगलात योग्य ठिकाणी ठेवाव्या लागतात.
-फेब्रुवारीनंतर अनेक जंगली वनस्पती फुलोऱ्यावर येतात.
-कोणत्या कालावधीत कोणत्या वनस्पती फुलोऱ्यावर येतात, कोणत्या भागात या वनस्पतींची संख्या अधिक आहे. याची पाहणी करून तसे पेट्या ठेवण्याचे नियोजन मधुकर करतात.
त्यांच्याकडे मधसंकलन करणाऱ्या सुमारे 30 ते 35 पेट्या आहेत.
- वसाहतींची संख्या, हवामान व फुलोरा या बाबींवर आधारित मधाचे उत्पादन अवलंबून असते.
- वर्षाला सुमारे 250 ते 300 किलो इतका मध संकलित होतो.

-उत्पन्न
दरवर्षी सुमारे 15 पेट्या तरी मधुकर यांना नव्याने कराव्या लागतात. प्रति पेटी एक हजार रुपये खर्च येतो. पेटी आणि मध संकलनासाठी मजुरीचा असा सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. सध्या 250 रुपये प्रति किलो दराने मधाची विक्री होते. परिसरातील, कोल्हापूर तसेच मुंबई भागातील ग्राहक घरी येऊन मध घेऊन जातात.
मधाची क्वालिटी चांगली असल्याने दरवर्षीचे ग्राहक तसेच नव्यानेही ग्राहक जोडले जातात.
मध यांत्रिक पद्धतीने काढला जातो, तसेच तो फिल्टर केला जातो. त्याची गुणवत्ता चांगली ठेवली जाते.
वसाहतींचीही विक्री केली जाते. गेल्या वर्षी मधुकर यांनी 16 वसाहतींची विक्री केली. प्रति वसाहत 900 रुपये दर मिळाला. या व्यवसायातून वर्षाला सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचे उत्पन्न खर्च वजा जाता मिळते. पाटगावसारख्या जंगली भागात उत्पन्नाचे प्रभावी स्रोतच नसल्याने तसेच परिसरातील कोणताही व्यवसाय इतका रोजगार देत नसल्याने मधुकर यांना हा व्यवसाय सर्वाधिक फायदेशीर वाटतो.

वसाहतींचे नियोजन
 डिसेंबरमध्येच मधमाश्‍यांच्या वसाहती पेट्यात भरण्याचे काम चालते. जुन्या पेटीतील राणीमाशी योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलली जाते. मधाचे संकलन योग्य प्रकारे होण्यासाठी पोळ्यांचा रंग पांढरा आहे का? वसाहतीतील मधमाश्‍यांचे काम नियमित चालू आहे का? खाद्याची कमतरता आहे का? आदींची पाहणी करणे गरजेचे असते. पेटीत दोन कप्पे असतात. या दोन्ही कप्प्यात माश्‍या पोळी तयार करतात. खालचा कप्प्यातील मध हा माश्‍यांसाठी खाद्य म्हणून ठेवण्यात येतो तर वरच्या कप्प्यातील मध काढून घेण्यात येतो.

मधासाठी आवश्‍यक वनस्पती
जांभूळ
रामरक्षा
रान पेरव


शिकेकाई

मोरआवळा
 मधाच्या संकलनासाठी जंगलामध्ये शिकेकाई, रामरक्षा, जांभूळ, मोरआवळा, हुरा, रान पेरव, पांगिरा, सावर, हेळा, नाना, सोनवेल, गेळा, कुंभा आदी वनस्पतींची संख्या अधिक असणे आवश्‍यक आहे. अशा भागातच मध संकलन अधिक होते. जंगलातील या वनस्पतींचे संवर्धन यासाठी गरजेचे आहे असे मधुकर यांना वाटते. मधमाशीपालनाच्या या व्यवसायामुळेच या वनस्पतींचे संवर्धन पाटगाव परिसरात केले जात आहे.

कर्ज काढून पेट्यांची खरेदी
दोन वर्षांपूर्वी मधुकर यांनी खादी ग्रामोद्योगच्या योजनेतून तीन वर्षांसाठी कर्ज काढून 25 पेट्यांची खरेदी केली. एका पेटीची किंमत 1500 रुपये असून, यासाठी खादी ग्रामोद्योगचे 25 टक्के अनुदान मिळाले. वर्षाला दहा हजार रुपयांचा हप्ता व चार हजार रुपये व्याजापोटी भरावे लागतात. कर्ज काढून व्यवसाय करण्याचे धाडस मधुकर यांनी केले खरे, पण मध संकलनाची चिंता नेहमीच सतावते. जर योग्य संकलन झाले नाही, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर हप्ता कसा फेडणार याची चिंता असते. महाबळेश्‍वर येथील मध संचालनालय, खादी ग्रामोद्योग व जिल्हा कृषी विभागाने घाटमाथ्यावरील मध उत्पादकांसाठी वेगळी योजना तयार करण्याची गरज त्यांना वाटते.

- मधुकर संभाजी नाईक, 9405265639
पाटगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्या वर्षी 40 शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योगतर्फे मधमाशीपालनाचे प्रशिक्षण व अनुदानावर 120 पेट्यांचे वाटप केले. हे लाभार्थी पाटगाव, तांब्याची वाडी, मानी, मठगाव परिसरातील आहेत. यंदाही 40 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- महावीर लाटकर, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

Saturday, March 23, 2013

इये मराठीचे नगरी

पुस्तकाचे नाव- इये मराठीचे नगरी  mobile ebook
लेखक- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 9011087406
 available to free download
https://play.google.com/store/apps/details?id=com.sachi.ethe_marathicheye_nagari.AOUEBEOJTSBCWOZH
संत वाड:मयाविषयी ज्यांना ज्ञानेश्‍वरी दुर्बोध वाटते यांच्यासाठी "इये मराठीचिये नगरी" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांना नव्याने जागृत करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. अलीकडच्या नव्या पिढीत संत वाड:मय हा प्रकार दुरापास्त होत आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक नव्या पिढीला सोपेपणाने ज्ञानेश्‍वरीकडे आकर्षित करणारे ठरेल असा लेखकांचा विश्‍वास आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या नव्या पिढीमध्ये ज्ञानेश्‍वरीतील ओव्याचे सोप्या शब्दांत अर्थ मांडण्यात आले आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरुन सहज जरी फेरफटका मारला तरी ज्ञानेश्‍वरी काय आहे याची कल्पना येवू शकेल. सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्‍वरी वाचण्याची इच्छा व्हावी, अशा सहजतेने ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांचा अर्थ सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्वद ओव्यांचा भावार्थ मांडण्यात आला आहे. या ओव्यांचा अर्थ समजावून सांगताना लेखकाने इतिहासाचा दाखला, त्याला सद्यस्थितीची जोड याचा सुरेख मेळ घातला आहे. या ओव्याचा अर्थ समजावून सांगण्याचे कसब लेखकाने साधले आहे. प्रत्येक ओवीला एक भावनेची किनार देण्यासाठी लेखक आग्रही आहे. ज्ञानेश्‍वरी अभ्यासताना त्याचा सर्वांगाने विचार व्हावा, चांगले, वाईट, यातील फरक समजवून कसा घ्यावा, मनाची शांती चांगल्या कार्यासाठी किती महत्वाची आहे, चांगल्या संस्कारासाठी ओव्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या विविध घटकांची चर्चा ओघवत्या भाषेत लेखकाने केली आहे. पुस्तक धार्मिक असले तरी प्रचलित भाषेचा ओघवता स्पर्श प्रत्येक निरुपणाला आल्याने इये मराठीचिये नगरी हे पुस्तक लिहण्यामागे समाजाने धार्मिकतेच्या माध्यमातून समाजसुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रयत्न लेखकाने प्रत्येक ओवीचा अर्थ मांडताना केला आहे.

Thursday, March 21, 2013

आत्मबोध

तें ज्ञान ह्रद्‌यीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फिटे ।
विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।।

आत्मज्ञान प्राप्तीची एक पायरी आत्मबोधाची आहे. पण हा आत्मबोध कसा होतो? यासाठी काय करावे लागते? हे जाणून घेणे गरजेचे आहे. मी आत्मा आहे. हे ज्ञान जेव्हा होते. याची अनुभूती जेव्हा येते. तेव्हा या ज्ञानाची प्रतिष्ठापना ह्रद्‌यात होते. सोह्‌मचा जप जेव्हा ह्रद्‌यात प्रकट होतो. श्‍वासावर जेव्हा आपले नियंत्रण राहाते. तेव्हा मन स्थिर होते. या स्थितीमध्ये मनात शांतीचा अंकुर फुटतो. यातूनच आत्मबोध वाढतो. हा अंकुर जसजसा वाढेल तसा आत्मबोध वाढतो. याचे वृक्षात रूपांतर होते. त्याला मग आत्मज्ञानाची फळे येतात. यासाठी साधना ही महत्त्वाची आहे. सद्‌गुरूंनी सांगितलेली सोह्‌म साधना नित्य करणे आवश्‍यक आहे. साधनेत मन रमवायला हवे. पण नेमके हेच होत नाही. धकाधकीच्या जीवनात तर आता हे अशक्‍यच वाटत आहे. गुरूकृपेशिवाय हे शक्‍य नाही. मुळात ही साधनाच सद्‌गुरू करवून घेत असतात. यासाठी त्यांच्याकडे ही विनवणी आपणच करायला हवी. तर मग आपोआपच ते ही साधन करवून घेतील. फक्त आपण सवड काढायला हवी. धावपळीच्या जीवनात सवडच मिळत नाही. खरंतर आता या धावपळीत गप्प बसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व संपविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे मनाला गप्प बसण्याचा, निवांतपणाचा विचारच डोकावत नाही. थांबला तो संपला. अशी अवस्था झाली आहे. यामुळे साधना करण्याकडे लोकांचा ओढा कमीच होत चालला आहे. साधना करणे म्हणजे फुकट वेळ घालविणे अशी समजूत आता होऊ घातली आहे. पण प्रत्यक्षात निवांतपणा, विश्रांतीही जीवनाला आवश्‍यक असते. प्रवास करताना काही ठिकाणी थांबे हे घ्यावेच लागतात. तरच प्रवास सुखकर होतो. नाहीतर अंगदुखी, अंग अवघडणे हे प्रकार सुरू होतात. जीवनाच्या प्रवासाचेही असेच आहे. त्यामध्येही काही थांबे घ्यायला हवेत. सततच्या कामात विरंगुळा हा हवाच. यासाठी पर्यटन आपण करतोच. पण दिवसभराच्या कामातही विरंगुळा हवा. थांबा हवाच. यासाठी दहा पंधरा मिनीटे साधना करायला हवीच. साधनेचे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. मनाला त्यामुळे थोडी विश्रांती मिळते. मन ताजेतवाने होते. धकाधकीच्या जीवनात याची मुळात गरज आहे. जीवनात यशाचे शिखर सर करण्यासाठी आत्मबोधाचे हे ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. धकाधकीच्या जीवनात व्यायाम नसल्याने अनेक आजार उत्पन्न होत आहेत. यासाठी मनाचा हा व्यायाम तरी नियमित करायला हवा. यामुळे मन ताजेतवाने होऊन नवनव्या कल्पनांना चालना मिळू शकेल. यासाठी तरी साधना करायला हवी. हीच वाट आत्मज्ञानाकडे निश्‍चितच नेईल.

मनुष्यजात

देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।
जाहलें असे केवळ । माझां ठायीं ।।

भारतात अनेक जाती, पंथ, परंपरा आहेत. दुसऱ्या देशातही तशाच जाती, परंपरा आहेत. प्रत्येकाला त्याच्या जातीचा, धर्माचा, देशाचा स्वाभीमान असतो. आपण बाहेर गेल्यानंतर आपण मराठी आहे याचा टेंभा मिरवतो. कोणी कानडी असेल तर तो कानडी असल्याचा तोरा मिरवतो. हे स्वाभाविक आहे. त्यात गैर असे काहीच नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यातच आपले महत्त्व असते. यासाठी स्वाभीमान असायला हवा. आज प्रत्येक वृत्तपत्र त्यांचा खप, प्रत्येक चॅनेल त्यांचा टीआरपी कसा जास्त आहे. आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न करते. आज त्याची गरज झाली आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी कशी श्रेष्ठ आहे हे दाखविण्याचे प्रयत्न होतात. मुळात आपणास दूर गेल्यानंतरच आपल्या संस्कृतीची ओढ लागते. त्याचे श्रेष्ठत्व समजते. जाती व्यवस्था जगात सर्वत्र आहे. याला विशेष महत्त्व आहे. कारण यामुळे मनुष्य संघटित राहातो. त्याची सुरक्षितता वाढते. त्याचे कुटुंब, नातेसंबंध यांच्यात ऐक्‍य असते. यामुळे गरजेच्यावेळी त्याला मदतीला अनेकजण धावून येतात. यासाठी या जातींचे महत्त्व आहे. एकलकोंडेपणा राहात नाही. आज शहरात एकलकोंडेपणा वाढला आहे. कोणाकडे जाणे नाही, येणे नाही. अशाने माणसाची मानसिकता ढळत चालली आहे. मुळात हीच स्थिती खरी अध्यात्माची ओढ वाढविणारी आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तो भरकटत आहे. अनेकजण त्याच्या या एकाकीपणाचा फायदा घेत आहेत. असे होऊ नये यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्यजातीचा भगवंताकडे ओढा असतो. हा मुळात त्याचा स्वभावता गुण आहे. पण गोंधळलेल्या मानसिक स्थितीमुळे तो भरकटत आहे. भगवंताचे भजन, चिंतन, मनन हा स्वभावधर्म आहे. प्रत्येक जातीधर्मात हेच सांगितले आहे. म्हणून मनुष्यजातीचा हा धर्म पाळायला हवा. भगवंताच्या चरणी लीन व्हायला हवे. गर्वाने, तमोगुणाने मनुष्य भरकटला जात आहे. त्याच्या हा अहंकारच त्याला संपवत आहे. हा अहंकार जागृत करण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून होत आहे. यामुळे तर जातीय तणाव वाढत आहे. अहंकाराने तो भ्रमिष्ठ होत आहे. त्याचाच क्रोध वाढत आहे. क्रोधावर नियंत्रण कसे ठेवायचे याचे उपाय धर्मात सांगितले आहेत. धर्म हा शांतीचा मार्ग सांगतो. त्यामुळे तेथे क्रोधाचा मार्ग कधीच असू शकत नाही. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. पण देव संरक्षणासाठी क्रोधीत जरूर होतो. स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर तो अधर्म आहे. तो अधर्म नष्ट करण्यासाठी त्याला क्रोध हा आवश्‍यक आहे. हा तर मनुष्यजातीचा स्वभाव आहे.

Saturday, March 16, 2013

जावे पुस्तकांच्या गावा

पुस्तकाचे नाव- इये मराठीचे नगरी
लेखक- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 9011087406
पृष्ठ संख्या- 104, किंमत- रुपये 80
............
भावार्थ ज्ञानेश्‍वरी  -  राजकुमार चौगुले
संत वाड:मयाविषयी ज्यांना ज्ञानेश्‍वरी दुर्बोध वाटते यांच्यासाठी "इये मराठीचिये नगरी" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांना नव्याने जागृत करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. अलीकडच्या नव्या पिढीत संत वाड:मय हा प्रकार दुरापास्त होत आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक नव्या पिढीला सोपेपणाने ज्ञानेश्‍वरीकडे आकर्षित करणारे ठरेल असा लेखकांचा विश्‍वास आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या नव्या पिढीमध्ये ज्ञानेश्‍वरीतील ओव्याचे सोप्या शब्दांत अर्थ मांडण्यात आले आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरुन सहज जरी फेरफटका मारला तरी ज्ञानेश्‍वरी काय आहे याची कल्पना येवू शकेल. सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्‍वरी वाचण्याची इच्छा व्हावी, अशा सहजतेने ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांचा अर्थ सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्वद ओव्यांचा भावार्थ मांडण्यात आला आहे. या ओव्यांचा अर्थ समजावून सांगताना लेखकाने इतिहासाचा दाखला, त्याला सद्यस्थितीची जोड याचा सुरेख मेळ घातला आहे. या ओव्याचा अर्थ समजावून सांगण्याचे कसब लेखकाने साधले आहे. प्रत्येक ओवीला एक भावनेची किनार देण्यासाठी लेखक आग्रही आहे. ज्ञानेश्‍वरी अभ्यासताना त्याचा सर्वांगाने विचार व्हावा, चांगले, वाईट, यातील फरक समजवून कसा घ्यावा, मनाची शांती चांगल्या कार्यासाठी किती महत्वाची आहे, चांगल्या संस्कारासाठी ओव्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या विविध घटकांची चर्चा ओघवत्या भाषेत लेखकाने केली आहे. पुस्तक धार्मिक असले तरी प्रचलित भाषेचा ओघवता स्पर्श प्रत्येक निरुपणाला आल्याने इये मराठीचिये नगरी हे पुस्तक लिहण्यामागे समाजाने धार्मिकतेच्या माध्यमातून समाजसुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रयत्न लेखकाने प्रत्येक ओवीचा अर्थ मांडताना केला आहे.

गुरू शिष्य


जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणें काळीं ।।

नाथ परंपरेमध्ये ज्ञान हे गुरूकडून शिष्यास दिले जाते. यामुळे गुरूशिष्याच्या या नात्यास महत्त्व आहे. सद्‌गुरू हे आत्मज्ञानी असतात. त्याचा उपदेश हा उपयुक्त असतो. त्यांच्या उपदेशामुळेच गुरू-शिष्यांचे नाते दृढ होते. एक उद्योगपती सद्‌गुरूंच्यांकडे उपदेशासाठी आला. त्याची आई आजारी होती. तिला झटका आला होता. ती कोमात होती. तिला शुद्धीवर आणण्याचे सर्वप्रयत्न सुरू होते. पण ती शुद्धीवर येत नव्हती. नेमके कारण डॉक्‍टरांनाही समजत नव्हते. या समस्येने त्रस्त उद्योगपती अखेर सद्‌गुरूंच्या चरणी आला. त्याने सद्‌गुरूंना याबाबत विचारले. सद्‌गुरूंनी त्याला आईचे दात मोजण्यास सांगितले. ते सर्व व्यवस्थित आहेत का? याबद्दल पाहाण्यास सांगितले. सद्‌गुरू आत्मज्ञानी होते. त्यांनी नेमके कारण ओळखले होते. उद्योगपती लगेच दवाखान्यात गेला आणि त्याने डॉक्‍टरांना हा प्रकार सांगितला. डॉक्‍टर हसले आणि त्यांनी या उद्योगपतींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. उद्योगपतीने मग स्वतःच आईचे सर्व दात आहेत का पाहिले. तर खरच त्यातील दोन दात नव्हते. त्याने लगेच त्या डॉक्‍टरांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार डॉक्‍टरांनी आईची तपासणी केली. त्यात तिच्या पोटात दोन दात असल्याचे आढळले. ते काढण्यात आले आणि चमत्कार काय तर काही वेळातच त्या उद्योगपतीची आई शुद्धीवर आली. खरेतर त्या दातांच्या विष्यामुळेच ती शुद्धीवर येत नव्हती. सद्‌गुरूंना आत्मज्ञानाने दातामुळे समस्या असल्याचे समजले. डॉक्‍टरांना मात्र ते लक्षात आले नाही. आता येथे डॉक्‍टर श्रेष्ठ की सद्‌गुरू श्रेष्ठ. दोघेही ज्ञानी आहेत, पण आत्मज्ञानी संत सर्वज्ञानी असतात. त्यांना ती दृष्टी असते. यासाठी ते श्रेष्ठ असतात. यासाठीच आत्मज्ञानी संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये. विश्‍वास नसला तर कमीत कमी काय सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे हे तपासायला तरी काहीच हरकत नाही. यामुळे आपला काही तोटा तर होत नाही. सद्‌गुरूचा हा उपदेश उद्योगपतींनी ऐकला. त्याची पडताळणी केली. त्यांनी स्वतः तपासणी केली म्हणूनच त्यांची आई शुद्धीवर आली. विज्ञानाने प्रगती जरूर केली आहे. पण ते ज्ञान योग्य प्रकारे वापरायला हवे. ते वापरण्याचे कौशल्य हवे. ते कौशल्य नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. काही गोष्टी विज्ञानानेही समजत नाहीत. सुटत नाहीत. त्या आत्मज्ञानाने समजतात. त्या गोष्टी सोडविण्यासाठी यावर विश्‍वास ठेवायला हवा. 

Friday, March 8, 2013

स्वधर्म

म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचिं एकु ।।

स्वधर्म कोणता? स्वतः लाच स्वतःमध्ये पाहणे हाच स्वधर्म आहे. म्हणजे काय? स्वतःचे रूप स्वतःच पाहणे. मी कोण आहे? जग मला एका नावाने ओळखते. माझे जगात नाव आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आता नाव जगभर पोचवता येते. एकाक्षणात तुमचा पराक्रम जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. आता जग जवळ आले आहे. आपण टाकलेली एखादी पोस्ट एकाक्षणात सर्वांना पोहोच होते. जगात आपला नावलौकिक होतो. पण जग ज्या नावाने मला ओळखते तो मी आहे का? याचा अभ्यास करण्याची गरज आहे. नावामध्ये काय आहे. मृत्यूनंतर फक्त नावच उरते. तो मी आहे का? तो नाही तर, मग मी कोण आहे? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारायला हवा. यावर विचारमंथन करायला हवे. जग जिंकायला निघालेल्या एका शुराला भारताच्या सीमेवर एका साधूने हा प्रश्‍न विचारला होता. त्याला राग आला. त्याने त्या साधूला उलटे टांगले. पण तरीही साधूने त्याला उपदेश देणे सुरूच ठेवले. साधू म्हणाला, स्वतः प्रथम कोण आहेस याचा विचार कर? स्वतःवर विजय मिळव. तेव्हाच तू सर्व जग जिंकशील. या साधुच्या विचाराने तो शूरवीर अस्वस्थ झाला. पण त्याच्या डोक्‍यात हा विचार घोळू लागला. साधुच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळेना. त्याने विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर त्याला सापडेना. शेवटी त्याने नतमस्तक होऊन त्या साधूला या प्रश्‍नाचे उत्तर विचारले. तो साधू म्हणाला, तू एक प्रदेश जिंकलास, उद्या दुसरा प्रदेश जिंकशील. असे करून तू जग जिंकल्याचा स्वाभिमान मिरवत असशील. पण तू स्वतःला जिंकू शकलास का? स्वतः कोण आहेस याचा विचार कधी केला आहेस का? अरे, तू केवळ एक आत्मा आहेस. या तुझ्या देहात हा आत्मा आला आहे. तोच आत्मा माझ्याही देहात आहे. सर्व प्राणीमात्रामध्ये तो आत्मा आहे. सर्व चराचरामध्ये त्याचे वास्तव्य आहे. तो देहात येतो आणि जातो. पण तो अमर आहे. त्याला मृत्यू नाही. त्याला जन्मही नाही. तो नाशवंत नाही. अविनाशी आहे. तो आत्मा तू आहेस. हे तू जाणण्याचा प्रयत्न कर. हे जाणणे हाच तुझा खरा धर्म आहे. हा तुझा स्वतःचा धर्म आहे. हे जेव्हा तुला समजेल तेव्हा तू स्वतः अमर होशील. तेव्हा तू खरे जग जिंकले असे समज. ज्याने स्वतःवर जय मिळविला, त्याने सर्व जगावर विजय मिळवला. मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे.

Tuesday, March 5, 2013

कर्नाटकचा कृषी अर्थसंकल्प एक आदर्श


कर्नाटक सरकारने यंदा तिसरा कृषी अर्थसंकल्प आठ फेब्रुवारीस सादर केला. विशेष म्हणजे तीनही कृषी अर्थसंकल्प वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी सादर केले. कृषी अर्थसंकल्प 2011-12 चा पहिला अर्थसंकल्प तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी सादर केला. तर दुसरा कृषी अर्थसंकल्प 2012-13 तत्कालिन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केला. यंदा कर्नाटकचे मुख्यमंत्री जयदिश शेट्टर यांनी 2013-14 साठीचा कृषी अर्थसंकल्प सादर केला. वेगवेगळ्या व्यक्तिंनी कृषी अर्थसंकल्प सादर केले असले तरीही तीनही कृषी अर्थसंकल्पात एक वाक्‍यता दिसून येते. सेंद्रीय शेतीला प्राधान्य, शेतीसाठी मोफत वीजपुरवठा, सिंचनासाठीच्या विविध योजनांवर तरतूदी, बियाणे विकासासाठी योजना, खतांसाठी विशेष तरतूदी यामध्ये पाहायला मिळतात.
यंदाच्या अर्थसंकल्पाचा विचार करता शेतकऱ्यांचे विविध विभागात वर्गीकरण करून त्यानुसार योजना तयार करण्याचा सरकारचा विचार दिसतो. यासाठीच सरकारने शेतकऱ्यांना पासबुके देण्याचा विचार केला आहे. हा एक चांगला विचार आहे. अल्पभुधारक आणि कमाल जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या असतात. कोरडवाहू शेती करणारा शेतकरी आणि बागायती शेती असणारा शेतकरी यामध्येही मोठा फरक असतो. क्षेत्र किती आहे यापेक्षा ते क्षेत्र कसे आहे याला महत्त्व असते. त्यानुसार शेतकऱ्यांना सरकारच्या योजना तयार करण्यासाठी हे पासबुक सरकारला निश्‍चितच मार्गदर्शक ठरणार आहे. सरकारच्या अनुदान वाटपातही हे पासबुका निश्‍चित महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडत असल्यामुळे सरकारचे लक्ष शेती विकासावर केंद्रीत झाले आहे. शेतकऱ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटक सरकार निश्‍चित प्रगतीसाधत आहे. हा त्यांचा आदर्श इतर राज्यांसाठी निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारा आहे.
अर्थसंकल्पात जलसिंचनाच्या योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे. दुष्काळी भागासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनासाठीही तरतूद करण्यात आली आहे. यावरून सरकार उद्योगापेक्षा शेतीला पाणी देण्यावर अधिक भर देते हे स्पष्ट होते. सरकार प्रथम शेतीचा विकास करू इच्छित आहे. सिंचनाचे प्रकल्प राबविताना शेतीला पाणी पुरवठा हा उद्देश यातून स्पष्ट होतो.
भुचेतना योजनेतून इक्रिसॅट सारखा संशोधन संस्थांनाही सामावून घेऊन शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती व उत्पादकता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. 2012-13 चा या योजनेचा आढावा घेतला तर 16 पिकांचे उत्पादन 21 टक्‍क्‍यांवरून 43 टक्‍क्‍यांपर्यत वाढविता आले आहे. या योजनेचा फायदा विचारात घेऊन हे कर्नाटक मॉडेल महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यानेही अमलात आणले आहे.

कृषी अर्थसंकल्पामध्ये कृषी, उद्यानविद्या, सेंद्रीय शेती, जैव इंधन, मधुमक्षिका पालन, रेशीम शेती, मत्स्य शेती यांचा समावेश आहे. या विभागाच्या विकासासाठी विशेष योजना व तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची संकल्पना निश्‍चितच शेतीच्या विकासास प्राधान्य देणारी आहे. कोणत्या घटकावर किती निधी खर्च होतोय. हे यातून स्पष्ट होते. यातून शेती विकास कसा साधला जाणार हेही स्पष्ट होते. कोणते क्षेत्र वाढत आहे. कोणते घटत आहे. यावरही प्रकाश टाकला जात असल्याने एकंदरीत शेतीच्या विकासास यातून निश्‍चितच चालना मिळणार आहे. सध्या केंद्रीय स्तरावरही शेतीसाठी वेगळ्या अर्थसंकल्पाचा विचार केला जात आहे. आजही जर देशात 60 टक्‍क्‍याहून अधिक जनता ही शेती व शेतीशी निगडीत व्यवसायावर अवलंबून असेल तर निश्‍चितच शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प असण्याची गरज भासते. अशा वेळी या घटकाच्या बारीकसारीक गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची गरज आहे. देशातील शेतीचा विकासा साधायचा असेल तर यासाठी वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची निश्‍चितच गरज वाटते.


यंदाच्या कृषी अर्थसंकल्पातील काही महत्त्वपूर्ण तरतूदी आणि निर्णय ः

1. अमृतभूमी योजना
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. प्रत्येक तालुक्‍यात सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गट या राज्याने तयार केला आहे. यामाध्यमातून 1 लाख 10 हजार शेतकरी 4 लाख 46 हजार एकरवर सेंद्रीय शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारने 100 कोटींचे अनुदानाची तरतूद केली आहे. त्यातील 2012-13 यावर्षात 58 ,571 शेतकऱ्यांनी या अनुदानाचा लाभ घेतला आहे. या योजनेस आता अमृतभुमी योजना असे नाव देण्यात आले आहे आणि या योजनेची जबाबदारी उद्यानविद्याशाखकडे हस्तांतरीत केली आहे.

2. शेतकऱ्यांना पास बुक
शेतकऱ्याकडे असणारी जमीन, त्याचा पट्टा, तो कोणत्या गटात मोडतो म्हणजे तो कोरडवाहू शेती करतो की बागायतादार आहे, सेंद्रीय शेती करतो की अन्य शेती असे विविध गट, कोणत्या सुविधांसाठी तो पात्र आहे याची माहिती सांगणारे एक पासबुक कर्नाटक सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांच्या या नोंदीमुळे विविध योजना राबविता येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत असे सरकारला वाटते. या पासबुकच्या माध्यमातून शेतकऱ्याला सर्व आवश्‍यक माहिती देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी सरकारने 15 कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

3. एक खिडकी योजना
कृषी विभागात तज्ञांची कमतरता भासते. यामुळे ज्ञान विस्ताराचे कार्य योग्य प्रकारे होत नाही. आवश्‍यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने विचारात घेऊन सरकारने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून तज्ञ संस्थांच्या सहकार्याने हे सर्व नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग तुमकुर, चिक्कमंगलूर, बिजापूर आणि रायचूर या जिल्ह्यात खरीप हंगामात प्रथम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर रब्बी हंगामात हा प्रकल्प 12 जिल्ह्यात राबविण्यात येईल त्यानंतर 2014-15 पासून कर्नाटकातील सर्व राज्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद सरकारने या अर्थ संकल्पात केली आहे.

4. भू चेतना योजना
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेती उत्पादनात वाढ व्हावी. यासाठी इक्रीसॅटच्या सहकार्याने भू चेतना योजना सुरू केली आहे. कोरडवाहू पिकांची उत्पादकता 20 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचे उद्दिष्ठ यासाठी निश्‍तित केले आहे. या योजनेसाठी 75 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. यंदा ही योजना 168 लाख एकरावर राज्यात राबविण्यात येणार असून यामध्ये 144 लाख एकर कोरडवाहू आणि 24 लाख एकर सिंचनाखालील क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

5. सौर उर्जा पंप
राज्यात 18 लाख कृषी पंप आहेत. यासाठी वाढता विद्युत पुरवठा विचारात घेता कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना सौर उर्जा पंप देण्याची योजना हाती घेतली आहे. यासाठी सरकारने चार महसूल जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

6. शेतीसाठी मोफत वीजपुरवठा
सिंचनासाठी आवश्‍यक दहा एचपीच्या विद्युतपंपासाठी मोफत वीज पुरवठा सरकारकडून केला जातो. ही योजना गेली तीन वर्षे कर्नाटक सरकार राज्यामध्ये वापरत आहे. यासाठी सरकारने गेल्या वर्षी 17 लाख कृषीपंपासाठी 4600 हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली होती यंदाही सरकार ही योजना राबविणार असून यासाठी 5250 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे.

7. हळद आणि बेदाणे मार्केट
सध्या कर्नाटकात हळद आणि बेदाणे मार्केट अस्थित्वात नाही. मुख्यतः महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बाजारावरच यासाठी अवलंबून राहावे लागते. ही अवलंबिता दूर व्हावी यासाठी सरकारने अथणी तालुक्‍यातील कागवाड येथे हळद आणि बेदाणे मार्केट सुरू करण्याचा सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी तज्ज्ञांच्या सहकार्याने आवश्‍यक त्या विकास योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.


अर्थसंकल्पात वाढीव तरतूद
पहिला कृषी अर्थसंकल्प 2011-12 17,857 कोटींची तरतूद
दुसरा कृषी अर्थसंकल्प 2012-13 19,660 कोटींची तरतूद
तिसरा कृषी अर्थसंकल्प 2013-14 22,310 कोटींची तरतूद

Saturday, March 2, 2013

नियम

तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थांसी गा ।।

एक मंदीर होते. सुंदर होते. परिसरही निसर्गरम्य होता. पण गावाच्या मध्यभागी असूनही या मंदीरात फारसे कोणी जाता येताना दिसत नव्हते. मला मंदीर आवडले म्हणून मी तेथे नेहमी जाऊ लागलो. तेथे साधना करायचो. पण इतका चांगला परिसर असूनही येथे कोणीच का येत नाही? हा प्रश्‍न मात्र मला नेहमीच विचलीत करायचा. लोकांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत का? की लोकांना आजकाल अशा नयनरम्य, शांत परिसरातही जायला वेळ नाही? असे अनेक प्रश्‍न मला पडू लागले. उत्तर मात्र सापडत नव्हते. मी मंदीरात नेहमीप्रमाणे साधनेला बसलो होतो. अचानक माझा मोबाईल वाजला. त्यावेळी मंदीरात माझ्या व्यतिरिक्त एक-दोन व्यक्ति असतील. मी फोन वर बोलू लागलो. लगेच मंदीरातील पुजारी, मंदीरामध्ये इतर कामकाज पाहणाऱ्या व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी मला मोबाईल ताबडतोब बंद करण्यास सांगितला. त्यांनी माझ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तुम्हाला लिहीलेले वाचता येत नाही का? मंदीर आवारात मोबाईलवर बोलण्यास बंदी आहे. असे खडे बोल सुरू झाले. त्यांची उद्धट भाषा पाहून मलाही राहावले नाही. मीही बोलण्यास सुरवात केली. कारण त्या मंदीरात मी रोजच जात होतो. ध्यान मंदीराची जागा स्वतंत्र आहे. तेथे मोबाईलवर बोलू नये, हे मलाही समजते. पण मंदीर आवारात बोलले, तर काहीच फरक पडत नाहीत. तसे मंदीरात कोणी नव्हतेही? अशावेळी माझ्या बोलण्याचा कोणाला त्रास होणार, हेच मला समजत नव्हते. मी रोज मंदीरात साधनेला बसतो तेव्हा, तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांशी गप्पा मारत बसतात. याचा त्रास रोजच होतो. पण ते चालते. माझे बोलणे चालत नाही. यानंतर मी लगेच तेथून उठलो, बाहेर आलो. माझ्याशी देव बोलला. गावाच्या भर वस्तीत असणाऱ्या या मंदीरात कोणीच का येत नाही? हाच तुझा प्रश्‍न होता ना? मिळाले का उत्तर. नुसता निसर्गरम्य परिसर असून चालत नाही. तेथील वातावरणही रम्य असावे लागते. यासाठी त्या मंदीरात काम करणाऱ्या व्यक्ती, पुजारी हेही तसेच सुभाषिक असायला हवेत. तरच तेथे लोक रमतात. अन्यथा सर्व सुविधा असूनही कोणीच तेथे फिरकत नाही. कारण प्रत्येकाला मनशांती हवी असते. यासाठी प्रत्येकजण तेथे येत असतो. असा फुकटचा वाद घालायला कोणी येत नाही? त्यापेक्षा तेथे जाणे लोक पसंत करत नाहीत. नियम असावेत पण त्याची अमंलबजावणी योग्यवेळी, योग्यप्रकारे व्हायला हवी. मोबाईल बोलण्यास बंदी आहे. तेव्हा मंदीरातील पुजाऱ्याला गप्पा मारत बसण्यास बंदी का नाही? यासाठीच नियम कोणते असावेत यावरही सर्व अवलंबून आहे. निसर्गरम्य परिसर मनाला मोहित करतो, पण तेथे प्रेम नसेल, तेथे भेटणारे वाद घालणारे असतील, तर तेथे देव सुद्धा नांदत नाही. मग तेथे भक्तही राहात नाहीत. यामुळेच तेथे कोणी जात नाही.

संशय

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।।


संशयामुळे मनाची स्थिरता विचलित होते. घरात शांती नांदायची असेल. दोघांचा संसार चागला चालावा असे वाटत असेल तर संशयास थारा देता कामा नये. काही नसले तरी मनात संशयाची पाल चुकचुकतेच. पण याकडे दुर्लक्ष करून त्यावर मात करता येते. घरातच आपण अनेक गोष्टीवर संशय व्यक्त करतो. याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. खिशातले पैसे कमी झाले असे वाटले की लगेच, जोडीदाराने खिशातील पैसे हळूच काढून घेतले आहेत का? असा अनेकदा संशय व्यक्त केला जातो. त्यातून चिडचिड होते. दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडणही होते. नंतर आठवते की पैसे वेगळ्याच गोष्टीवर खर्च केले होते. मग काय माफीनामा. पण मन तेही करायला तयार होत नाही. चूक मान्य करण्यात आपणास लाज वाटते. कमीपणा वाटतो. पण अशाने नाते संबंध ताणत जातात. याचा विचारला करायला नको का? काही वेळेला तर अशाने घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. संशयामुळे इतकी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. संशयच व्यक्त केला नाही तर, हा प्रसंग उद्‌भवणारही नाही. पोलिसांची वृत्ती ही संशयी असते. प्रत्येक गोष्टीकडे ते याच दृष्टीने पाहतात. एखाद्याने चोरी केलेली नसली, तरी त्याला संशयाने पकडून बेधम मारहाण करून त्याला चोरी केली असल्याचा जबाबही नोंदवितात. संशयामुळे अशा चुका अनेकदा घडतात. खून न केलेल्या व्यक्तीसही तुरुंगवास भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. संशयाने शिक्षा कधी दिली जाऊ नये. नंतर पश्‍चात्ताप करावा लागतो. गुन्हा न करणारी व्यक्तीही नंतर मोठा गुन्हा करू शकते. संशयावर मात करायची असेल तर, सत्य जाणून घ्यायला हवे. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पैसे जोडीदाराने घेतल्याचा संशय घेण्याऐवजी आपण कोठे खर्च केलेत का? कोठे ठेवले होते? कोठे पडले का? याचा विचार प्रथम करायला हवा. पण तसे होत नाही. संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. मानसिक विचारांमुळे आपल्या शरीरात विविध रसायने उत्पन्न होत असतात. पीत्त म्हणजे हे रसायनच आहे. रागामुळे पीत्त उसळते. यासाठी मानसिक संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे. शांत मनामुळे शरीरास आवश्‍यक रसायनांचीच निर्मिती होते. साधनेमुळे मनातील राग नियंत्रित करता येतो. साहजिकच जहाल, शरीराला मारक ठरणाऱ्या अशा रसायनांची निर्मिती यामुळे कमी होते. याचा परिणाम शरीरावर निश्‍चितच दिसून येतो. शांत माणसांना आजारही कमी होतात. यासाठीच संशयाने मनास पिडा देणे योग्य नाही.

Saturday, February 23, 2013

मधमाश्‍या पालन व्यवसायास प्रोत्साहनाची गरज


-पाटगावच्या मध उत्पादकाचे मत; परिसराच्या विकासाच्या दृष्टीने योजना हव्यात
राजेंद्र घोरपडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. 22 ः डोंगरीभागात राहणाऱ्यांना रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसतात. विशेषत: पश्‍चिम घाटामध्ये ही स्थिती आहे. त्यातच तेथील जैवविविधता जपण्यासाठी प्रयत्न होण्याच्या दृष्टीने तेथे परंपरागत अस्तित्वात असलेले मधमाश्‍या पालनासारखे उद्योग जोपासणे गरजेचे आहे. पश्‍चिम घाटातील वनस्पतींच्या संवर्धनातही याचे महत्त्व आहे. 1994 नंतर मधमाश्‍यांवर आलेल्या थायी सॅक ब्रुड या रोगामुळे मधमाश्‍यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. यामुळे पाटगाव परिसरातील मधमाश्‍या पालनाचा व्यवसायच उद्‌ध्वस्त झाला. गेल्या चार-पाच वर्षांत हा व्यवसाय पुन्हा जोमाने वाढत आहे. मधाच्या उत्पादनातही वाढ झाली. हा व्यवसाय पुन्हा उभा राहावा, यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे, असे येथील मध उत्पादकांना वाटते.
गेल्या 40 वर्षांपासून मधुकर नाईक हे पाटगाव परिसरात हा व्यवसाय करत आहेत. येथील सहकारी मध उत्पादक संस्थेमध्ये ते संचालकही होते. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "1994 ला मी स्वतः 1200 किलो मध संकलित केला होता. त्या वेळी पाटगाव येथे सहकारी तत्त्वावर मध उत्पादक संस्था कार्यरत होती. या संस्थेमध्ये त्यावर्षी 28 हजार किलो इतके उच्चांकी मध संकलन झाले होते. तसे दरवर्षी ही संस्था 15 ते 20 हजार किलोवर मध संकलित करत होती. पण, त्यानंतर संस्थेकडे संकलित होणाऱ्या मधामध्ये घट झाली. परिसरात थायी सॅक ब्रुड या रोगाने थैमान घातल्याने मधमाश्‍यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. मधाचे संकलनच नसल्याने संस्था मोडकळीस आली. आज ही संस्था अस्तित्वातच नाही.''
गेल्या चार-पाच वर्षांत परिसरातून मध संकलन चांगले होत आहे. 1994 पूर्वी मी स्वतः दरवर्षी 500 ते 600 किलो मध संकलित करत होतो. गेल्या चार-पाच वर्षांत प्रतिवर्ष इतके संकलन होत नसले तरी 300 किलोपर्यंत मजल मारता आली आहे, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
मधमाश्‍या पालनाचा हा व्यवसाय पुन्हा येथे वाढावा. येथील स्थानिकांना यामुळे चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जंगलातून गोळा होणारा मध हा औषधी असल्याने, तसेच त्याची गुणवत्ता उत्तम असल्याने या मधास अधिक मागणी आहे. याला दरही चांगला मिळतो. यासाठी महाबळेश्‍वर येथील मध संचालन, खादी ग्रामोद्योग व जिल्हा कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन हा उद्योग पुन्हा नव्याने वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. खादी ग्रामोद्योग 120 रुपये किलोने मध विकत घेते. बाजारपेठेत हाच दर जागेवर 250 किलो इतका आहे. याचा विचार करून शासनाने मधाला योग्य दर मिळवून द्यावा. मधाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मध उत्पादक सहकारी संस्था पुन्हा कार्यरत करण्याची गरज आहे, असेही श्री. नाईक यांना वाटते.
..............
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्यावर्षी 40 शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योगतर्फे मधमाश्‍या पालनाचे प्रशिक्षण अनुदानावर 120 पेट्यांचे वाटप केले होते. हे सर्व लाभार्थी पाटगाव, तांब्याची वाडी, मानी, मठगाव परिसरातील आहेत. यंदाही 40 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा.
- महावीर लाटकर, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जिल्हा कृषी विभागामार्फत मधमाश्‍या पालन संचासाठी 50 टक्के, मधुमक्षिका वसाहत तयार करण्यासाठी 50 टक्के, मध काढणी यंत्रासाठी 50 टक्के देण्यात येते. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. हा व्यवसाय वाढीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Tuesday, February 12, 2013

शेतीत यांत्रिकिकरणातूनच आता दुसरी हरितक्रांती !


राजेंद्र घोरपडे

सध्या शेतीमध्ये मजूरांची मोठी टंचाई भासते. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यातच वाढती मजूरी आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेती फायद्याची होत नाही अशी ओरड होऊ लागली आहे. तर पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे यात्रिकीकरणामध्येही मर्यादा पडत आहेत. वाढता उत्पादन खर्च शेतीमध्ये अनेक समस्या उत्पन्न करत आहे. अशा या परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन आज नव्या पिढीतील संशोधकां समोर आहे. असेच काही उदात्त हेतू समोर ठेऊन कोल्हापूरातील कृषि महाविद्यालयात "कृषी यांत्रिकीकरण आणि प्रक्रिया' यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे कोल्हापूरातील स्थानिक केंद्र, कृषी अवजारे उत्पादक संघटना यांच्या सहकार्याने कृषी महाविद्यालयात ही कार्यशाळा झाली. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी संशोधकांनी मार्गदर्शन केले. नवी आव्हाने, संधी याची ओळख करून दिली. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर विभागातील 12 कृषी महाविद्यालयातील 68 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यशाळेत सहभागी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील अश्‍विनी कांबळे, अश्‍विनी वंजारी, ज्योती पाटील या विद्यार्थीनी म्हणाल्या की सध्या कृषी अभियांत्रिकी या विषयात अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेषतः संशोधनाची अनेक आव्हाने समोर असल्याने यामध्ये करिअर करण्याचा आमचा मानसा आहे. सध्याच्या गरजा विचारात घेऊन अवजारांची निर्मिती करावी लागणार आहे. संधी म्हणाल तर आता दुसरी हरित क्रांती देशात घडवायची असेल तर कृषी यांत्रिकीकरणामध्ये अमुलाग्र प्रगती व्हायला हवी. यातूनच आता क्रांती होणार आहे. यामध्ये महिलांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. कारण येथे मुलींना ट्रॅक्‍टर स्वतः चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. अशा उपक्रमामुळेच आम्हा मुलींना प्रोत्साहन मिळते आहे. कोल्हापूर कृषी महाविद्यालयात शिकणारे मध्यप्रदेशातील अंबरिश पंड्या, कन्हैयालाल साकेत आणि बिहारचा अविनाश भारती हे विद्यार्थी म्हणाले पंजाब, हरियानाची यांत्रिकिकरणामुळे उत्पादकता अधिक आहे. आमची राज्ये मागे आहेत. महाराष्ट्राही मागे आहे. या राज्यात यांत्रिकिकरणाचीं खरी गरज आहे. हे डॉ. पी. यु. शहारे यांच्या व्याख्यानातून समजले. आता सुधारित अवजारे विकसीत करून राज्यांच्या विकासात योगदान देण्याचा आमचा मानस आहे. बाहुबली कृषी महाविद्यालयातील रोहीत बोरगावे हा विद्यार्थी म्हणाला की इ्‌ंधनाच्या वाढत्या दरामुळे ट्रॅक्‍टर चालवताना इंधनाची बचत कशी करता येते. योग्य वापरातून कार्यक्षमता कशी वाढवली जाऊ शकते हे प्रा. टी. बी. बास्टेवाड यांच्या व्याख्यानातून समजले. त्यांनी केलेले प्रबोधन निश्‍चितच आम्हाला मार्गदर्शक आहे. राजमाची येथील मोकाशी कृषी महाविद्यालयातील संदीप भामरे, भगवान पाटील यांनी अशा कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांचाही सहभाग असायला हवा होता असे मत मांडले. यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या समस्या कशा भेडसावत आहेत. यावर विस्तृत चर्चा झाली असती व यातून अनेक प्रश्‍नांचा उलघडाही झाला असता याचा फायदा निश्‍चितच विद्यार्थी, शेतकरी व मार्गदर्शक तज्ज्ञ, संशोधन यांना झाला असता असे त्यांना वाटते. प्रा. एम. बी. शिंगटे यांनी इंधनाच्या समस्येवर मात करण्यासाठी आता बॅटरीवर, सौर उर्जेवर चालु शकणारी अवजारांचे उत्पादनावर भर देण्याची गरजही बोलून दाखवली. यामध्ये आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संशोधनाच्या मोठ्या संधी आहेत.