Monday, December 31, 2012

सेवा

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।।

सेवा म्हणून काम करण्याची प्रथा आता लोप पावत आहे. यावरून मानसाचा स्वभाव किती बदलत चालला आहे हे समजते. आर्थिक गणितांमुळे माणूस बदलतो आहे. समिकरणे बदलत चालली आहेत. जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उद्या पोट कसे भरायचे याची काळजी त्यांना लागून राहिली आहे. अशा या संकटांतच शेतकरी नुकसानीमुळे आत्महत्या करू लागले आहेत. नुकसान पटविण्याची ताकद आता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. या बदलत्या काळात सेवाधर्म महत्त्वाचा ठरणार आहे. सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्यचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज आहे. एकमेकांमध्ये हा भाव उत्पन्न झाल्यास खचलेली मने दुभंगणार नाहीत. त्यांच्या हातून गैरकृत्य होणार नाही. सेवेचा गैरफायदा घेणारेही असतात. पण सेवा हा धर्म माणणाऱ्या व्यक्तींनी निःस्वार्थी भावाने सेवा केल्यास गैरफायदा घेणाऱ्यांचीही मने बदलू शकतात. त्यांच्यामध्येही हा सेवाभाव उत्पन्न करण्याचे सामर्थ यामध्ये आहे. याचा विचार करून ही सेवा करायला हवी. प्रत्येक मानवामध्ये भगवंत आहे असे समजून सेवा करायला हवी असे अध्यात्म सांगते. दुसऱ्याला सुख देण्याने स्वतःला सुख मिळते. दुसऱ्याचे दुःख पुसायला शिकले पाहिजे. यामध्ये सेवा हा भाव असायला हवा. जेथे सेवा आहे तेथे प्रेम आहे. जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. सेवेचे भाव संपतो तेव्हा तेथे व्यापार होतो. व्यापारात मी तू हा भाव येतो. त्याचे मोजमाप होते. उचनिच हा भाव येतो. तेथे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा राहात नाही. दुःख नांदते. अशाने मनाला उभारी मिळत नाही. मन खचते. यासाठी सेवा हा भाव जोपासून व्यवहार करायला हवेत. त्याचा व्यापार होता कामा नये. ही काळजी घ्यायला हवी. अध्यात्मातही सेवा हा भाव ठेवूनच सेवा करायला हवी. अन्यथा तोही व्यापार होतो.

Sunday, December 30, 2012

शेतकरी आंदोलनाची दिशा बदलायला हवी

28 नोव्हेंबरला संध्याकाळी कळंबा कारागृहा बाहेर मोठी गर्दी झाली होती. आजपर्यंत एकदाही एवढी गर्दी कधी कारागृहासमोर पाहायला मिळाली नाही. 15-20 आलिशान गाड्यांचा ताफाच उभा होता. अहो नुसते कारागृहासमोरील रस्त्यावर गाडी उभी केली तर पोलिस चौकशीला येतो. पण त्याचदिवशी काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उत्सुकता म्हणून थोडी चौकशी केली तर समजले की शेतकरी संघटनेच्या 72 कार्यकर्त्यांना कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांना जामिनावर सोडण्यात येत आहे. उसाला तीन हजार दर मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केले म्हणून त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांची दिवाळीही कारागृहातच साजरी झाली. यामुळे निराश झालेले त्यांचे कुटुंबीय त्यांना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात होते.

12 नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यात खासदार राजू शेट्टी यांना अटक करण्यात आल्यानंतर आंदोलन चिघळले. दगडफेक, तोडफोड, जाळपोळ झाली. या कारणांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. राज्यभर ही धरपकड सुरू होती. काही ठिकाणी हवेत गोळीबारही करण्यात आले. सांगलीत तर गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला. तेव्हापासून हे सर्व कार्यकर्त्ये कळंबा कारागृहात होते.

दरासाठीच आंदोलन सुरू करताना आता बारामती, इंदापूरकर सम्राटांची दिवाळी गोड करू देणार नाही. अशी घोषणा केली होती. पण झाले उलटेच दिवाळीचा सण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारागृहात साजरा करावा लागला. पण इतके करूनही तीन हजार रुपयांचा दरही उसाला मिळालाच नाही. सुरवातीला 2300 चा दर कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांसाठी निश्‍चित झाला होता. पण हा दर शेतकरी संघटनेने फेटाळत आंदोलन अधिक तीव्र केले. हिंसक मार्गाचा अवलंब केला. अनेक ठिकाणी तोडणीच्या ठिकाणी अडथळे आणण्यात आले. गाड्यांचे टायर फोडण्यात आले. ऊस तोड बंद पाडण्यात आली. पण हे सर्व करताना हे कोणाचे करत आहोत हे शेतकरी संघटनेने विचारात घ्यायला हवे होते. ज्यांची तोड रोखली तेही शेतकरीच होते, परके नव्हते. आपलेच बांधव होते काही ठिकाणी कारखान्याच्या संचालकांची तोड रोखण्यात आली, तेथेही अशीच तोडाफोडी करण्यात आली. पण हे संचालक कोणी दुसरे आहेत का? त्यांना निवडून कोण देतो? हे शेतकरी सभासदच ना? संचालकांच्या मालकीचा कारखाना आहे का? तसेही नाही, मग त्यांचे नुकसान करून स्वतःच रोष का ओढवून घेतला गेला.

या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे दिसते की आंदोलनाची ही दिशा निश्‍चितच चुकीची होती. निवडलेला मार्ग चुकीचा होता. आजकाल काहीही झाले की दंगे केले जातात. जनतेला वेठीस धरले जाते. बस, एसटी या नेहमीच फोडल्या जातात. हे आता नेहमीचेच झाले आहे. सरकारला आता हीच भाषा समजते असा चुकीचा समज झाल्याने यासाठी आता आंदोलनेही अशीच होत आहेत. जाळपोळीच्या घटना घडल्यावरच सरकार जागे होते. पण यावेळी सरकारने यात भागच घेतला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दर कारखान्यांनी ठरवावा सरकार यात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले. सरकारचेही थोडे चुकले. सरकारने प्राथमिक बोलणी करायला हवी होती चर्चेतून पळवाट काढल्यानेच शेतकरी चिडले. पण सरकार तरी काय करणार म्हणा? दर शेवटी कारखानाच ठरवतो. मग शेतकऱ्यांनीही दहशतीचा मार्ग अवलंबला. पण अशाने हे आंदोलन म्हणजे चळवळ आहे असे यंदा कोठेच वाटले नाही. शेट्टी यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. पण त्यामध्ये चळवळ आहे. असे वाटत होते. तो एक शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेला लढा आहे असे वाटत होते. पण यंदा मात्र हे चित्र दिसले नाही. यामध्ये राजकीय हितच पाहायला मिळाले. पाण्यासाठी शेट्टी यांनी काढलेली यात्रा गांधीजींच्या दांडी यात्रेची आठवण करून देणारी होती. पण आता शेट्टी यांची ही चळवळ बदललेली आहे. अहिंसेचा मार्ग हिंसेत रूपांतरित झाला आहे. अशी
दहशत पसरवून दर देण्यासाठी सरकारला. कारखानदारांना भाग पाडायचे हे एखाद्या चळवळीच्या संघटनेला शोभणारे निश्‍चितच नाही. नेमकी ही चूक का झाली. शेतकरी नेमका का भडकला? यालाही कारणे असतीलही पण थोडा संयम बाळगायला हवा होता.

शेतकरी आंदोलने यापूर्वीही झाली. पण शेतकऱ्यांनी जाळपोळ करून दहशत माजवल्याचे फारसे ऐकण्यात, पाहण्यात आले नाही दगडफेकीच्या घटना या होत असतात, पण त्यातही मर्यादा असते. मर्यादा ओलांडण्याच्या घटना फारच क्वचित पाहायला मिळतात. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत संयमाने आंदोलने केली आहेत. पोलिसांचा लाठीमार खाल्ला आहे. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांच्या गाड्या जाळल्याच्या घटना प्रथमच घडल्या आहेत एकंदरीत पाहता पूर्वीच्या आंदोलनात दहशत पसरविणे हा भाग नव्हता. दहशत पसरवून फारसे काहीही हातीही लागत नाही दहशत बसविणे म्हणजे वचक बसविणे असे होत नाही दहशत आणि वचक यामध्ये निश्‍चितच फरक आहे दहशतीने कायमची वचक बसते हा गैरसमच आहे वचक बसविण्यासाठी योग्य मार्ग अवलंबिणे गरजेचे होते आपला देश आज स्वातंत्र्यात आहे हे सरकार आपणच निवडून दिलेले आहे, स्वातंत्र्यात जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी आंदोलन हे जरूर केले पाहिजे पण त्याचा मार्ग हिंसेचा, दहशतीचा असेल तर तो निश्‍चितच चुकीचा आहे,

साखर कारखाने हे सहकारी आहेत. सहकारात एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे ब्रीद वाक्‍य आहे. सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे कारखाने हे सहकारी राहिले नाहीत असेच वाटते. सहकार आता संपला आहे का? कारखाने काढणारे कोणी व्यापारी नाहीत. शेतकरीच आहेत. यामध्ये सभासदही सर्व शेतकरीच आहेत. व्यापारी नाहीत. मग कारखान्यावर निवडून गेलेले संचालकही शेतकरीच आहेत आणि ते शेतकऱ्यांनीच निवडून दिलेले आहेत. मग ते संचालक झाल्यानंतर स्वतः कारखान्याचे मालक असल्यासारखे व्यवहार करतात का? त्यांची वागणूक व्यापाऱ्यासारखी लूटीची असते का? अशा शंका आता डोकावू लागतात. सर्वच संचालक असे असतात असे नाही

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले तीनचार दशके एकाच व्यक्तीची सत्ता कारखान्यावर राहिलेली आहे अशी अनेक उदाहरणे आहेत. कारखान्याचे संस्थापकही तेच आहेत. विशेष म्हणजे हे साखर कारखाने योग्य प्रकारे सुरू असून प्रगतीही करत आहेत, तसे त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत

2009 मध्ये शेतकऱ्यांनी असेच दरासाठी आंदोलन केले. त्यावेळी कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यात तडजोड होऊन कोल्हापूर जिल्ह्यासाठी 2600 रुपये अंतिम दर ठरविण्यात आला. पण जिल्ह्यातील कागलचा शाहू कारखाना वगळता इतर कोणताही कारखाना इतका दर देऊ शकलेला नाही. गेल्या दोन वर्षात कारखान्यांनी अंतिम बिले अद्यापही अदा केलेली नाहीत. आंदोलने करूनही बिले कोठे दिली गेली आहेत. आंदोलन यशस्वी झालेच नाही. यासाठी आंदोलन यशस्वी होण्यासाठी व आपला उद्देश साध्य होण्यासाठी आंदोलनाची दिशा निश्‍चित करायला हवी. हिंसेच्या मार्गाने काहीच मिळत नाही. उलट नुकसानच होते. आंदोलक शेतकऱ्यांचा ऊसही कारखाने उचलताना राजकारण करणार. यात नुकसान कुणाचे? शेवटी शेतकरीच यात भरडला जातोय. यासाठी आंदोलनाची दिशा ही अहिंसेच्या मार्गाने असावी व कारखान्याच्या मर्मावर बोट ठेवणारी असावी. तरच यापुढील काळात शेतकऱ्यांना फायदा होईल. हिंसक आंदोलनामुळेच कारखाने दर देतात असे आत्तापर्यंत कधीच घडलेले नाही. कारखानदार पळवाटा शोधून शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि वेळ गेल्यावर शेतकरी मिळाले त्यात समाधान मानून आंदोलनामुळे इतके तरी मिळाले असे म्हणत समाधान मानतात. पण यापूर्वी कोठे आंदोलने झाली होती. त्यावेळी दर व्यवस्थित दिले जात होतेच ना? मग आता आंदोलनामुळे कारखान्यावर वचक बसला आहे. असे होतच नाही.

कारखान्यावर अहिंसक मार्गाने वचक ठेवायला हवी. समोरासमोरच्या लढाईत आपलेच नुकसान अधिक होते. यासाठी गनिमीकावा करायला हवा. आत्तापर्यंत झालेली युद्धे ही गनिमीकाव्यामुळेच जिंकता आली आहेत. आंदोलनेही गनिमीकाव्यानेच जिंकायला हवीत. यासाठी अहिंसेचा मार्ग अवलंबून कारखान्यावर वचक ठेवण्यासाठी गनिमीकावा करायला हवा.

कारखान्याच्या संचालकांना कोंडीत पकडायला हवे. यासाठी कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची गरज आहे. गाळप, साखर उत्पादन किती होते. ही आकडेवारी जाहीर केली जाते. पण त्याबरोबरच इतर उत्पादनांचीही माहिती द्यायला हवी. कारखान्याचा सर्व आर्थिक व्यवहार हा पारदर्शक करण्यासाठी लढा उभारायला हवा. यामुळे टेंडरमध्ये होणारे घोटाळे, पोत्यामागे केलेली लूट, साखरेला मिळालेला दर व प्रत्यक्षात दाखवलेले दर, उसाच्या वजनात केलेली तफावर (काटामारी) या सर्व घोटाळ्यावर प्रकाश टाकता येईल. कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला याची सखोल माहिती पुरविण्याची व्यवस्था कारखान्याने करावी. यासाठी कारखान्यावर दबाव आणायला हवा. तरच हे सर्व शक्‍य होणार आहे. सध्या ऑनलाइन सर्व माहिती दिली जाऊ शकते. पारदर्शकता आणण्यासाठी सर्व आकडेवारी ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यास घोटाळे आपोआपच बाहेर येतील. यामुळे कारखान्यावर वचक बसेल. उसाचा दर ठरवताना यामुळे शेतकऱ्यालाच याचा आपणाला किती दर कारखाना देऊ शकेल याची कल्पना येईल. संचालक मंडळाला असे कोंडीत पकडून दर देण्यास भाग पाडता येऊ शकेल. साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाला दर देताना कोणत्या अडचणी येतात हे सभासद शेतकऱ्यांना लक्षात आल्यानंतर हे प्रश्‍न कसे सोडवता येतील यावर खुली चर्चाही होऊ शकते. यामुळे शेतकरी स्वतःच्या फायद्यासाठी कारखान्याचा फायदा कसा होईल याला निश्‍चितच प्राध्यान्य देतील. कारखाना कसा तोट्यात आले हेही यातून स्पष्ट होईल. खरेचित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यावर विचारविनिमयातून विविध मार्ग सुचविले जाऊ शकतात. कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणली तर कारखान्याचा विकास होईल. यातूनच शेतकऱ्यांना योग्य दर निश्‍चितच मिळू शकेल. यासाठी संचालकांना कोंडीत पकडणारा गनिमीकावा शेतकरी संघटनेने करायला हवा. आंदोलनाची ही दिशा निश्‍चितच शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरू शकेल. हिसेने सर्व समस्या कधीच सुटत नसतात. युद्धेही जिंकता येत नाहीत. मात्र गनिमीकाव्याने यश निश्‍चितच मिळू शकेल.

चौकट
आंदोलनाच्या घटनेतून हे शिकायला हवे. शेतकऱ्यांनीही या मागण्या लावून धरायला हव्यात...

- कारखान्याकडे नोंदविली जाणारी ऊस लागवडीची तारीख व तोडणीची तारीख ऑनलाइन पाहता यावी यासाठी सुविधा उपलब्ध केली जावी. यामुळे तोडणीमध्ये होणाऱ्या राजकारणावर आळा बसेल. ऊस वेळेवर तोडला गेल्याने वजनात होणारी घटही थांबेल, शेतकऱ्यांचे नुकसानही थांबेल. वेळेवर तोडणी झाल्याने कारखान्याच्या साखर उत्पादनातही चांगलाच फरक दिसेल.
- कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस दर कसा ठरवला जातो याची इत्थंभूत माहिती कारखान्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याच्या कारभारावर शेतकऱ्यांचा विश्‍वास बसेल. अशाने काही स्वार्थी राजकीय मंडळींकडून शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल संपेल.
- कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्याने त्यांचे आर्थिक व्यवहार सभासद शेतकऱ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत.
- शेतकऱ्याचे उसाचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी त्याला सुधारित तंत्रज्ञान, सल्ले हे सर्व संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावे. तसेच मोबाईलवरही एसएमएसच्या माध्यमातून त्याला वारंवार सल्ले दिले जावेत. जेणेकरून तो जागरूक राहून तंत्रज्ञानाचा अवलंब करेल. उत्पादनवाढीसाठी त्याला प्रोत्साहन मिळेल. त्यांची मानसिकता सुधारेल. कारखान्याचा सभासद म्हणून त्या शेतकऱ्याला या सर्व गोष्टी हक्काने मिळायला हव्यात. तशी वातावरण निर्मितीही करायला हवी. असे केल्यास भरकटलेली शेतकऱ्यांची मने नियंत्रणात राहतील. त्याला सुविधा उपलब्ध झाल्याने तो सुखावेल.
- कारखान्याला ऊस घालणे, हप्ता घेणे, साखर घेणे एवढ्यापुरतेच शेतकऱ्यांशी संबंध मर्यादित न ठेवता त्याला इतर सुविधाही कारखान्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाहायला हवे. आजकाल आजारपणाचा खर्चही वाढला आहे. यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. औषधोउपचारात सवलती उपलब्ध करून द्यायला हव्यात. कारखान्याने देणग्या देऊन उभारलेल्या संस्थांमध्ये सभासद शेतकऱ्यांना विशेष सवलती मिळायला हव्यात. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी कारखान्याने काही सवलती, सुविधा, योजना राबवायला हव्यात. यामुळे शेतकऱ्याचा कारखान्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल.
- ऊस शेतापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्त्ये नसतात. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. या समस्या कारखान्याने सोडवायला हव्यात. उसाच्या प्रत्येक शेतापर्यंत कारखान्याने रस्त्ये करून द्यायला हवेत.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा असे नुसते सल्लेच दिले जातात. प्रत्यक्ष हे तंत्रज्ञान वापरण्यात अनेक अडचणी येतात. इतकी महागडी यंत्रे शेतकरी खरेदी करू शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांना ठिबक संच आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी विशेष अनुदान योजना राबवव्यात. शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त हे अनुदान असावे.
- रासायनिक खताचे भडकलेले दर, सेंद्रीय खताचा होत असलेला कमी वापर याचा विचार करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कारखान्याने गांडुळ खत निर्मितीसारखे प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना याचा लाभ करून द्यायला हवा. कीडनाशकांच्याही भडकलेल्या किमतींचा विचार करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे कार्यक्रम राबवायला हवेत. एकंदरीत शेतकऱ्याला शेतीतील खर्च कसा कमी होईल यावर कारखान्याने भर देऊन सभासद शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू करायला हव्यात. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ करून देण्यासाठी शेतकरी संघटनांनी चळवळ उभी करायला हवी.

फळसूचक कर्म

वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ।।

वास्तवाला धरून तत्त्वज्ञान असावे. तरच ते मनाला भावेल. अन्यथा ते निष्क्रिय ठरेल. आत्मज्ञान हे अमरत्वाकडे नेणारे ज्ञान आहे. पण हे सांगताना वास्तवाचे भान ठेवायला हवे. तरच ते या नव्या पिढीला समजेल. वास्तवाशी सुसंगत उदाहरणे त्यामध्ये द्यायला हवीत. बदलत्या जीवनपद्धतीत हे तत्त्वज्ञान कसे मार्गदर्शक आहे. हे पटवून द्यायला हवे. तरच नवी पिढी याकडे आकर्षित होईल. अन्यथा ते व्यर्थ आहे असेच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करेल. जगात वावरायचे असेल तर कर्म हे केलेच पाहीजे. पोटा पाण्याचा व्यवसाय सोडून जपमाळा ओढून कोणी जेवनाचे ताट दारात आणून ठेवणार नाही. जो व्यवसाय आहे, तो करावाच लागतो. गोरा कुंभार मडकी वळत वळतच आत्मज्ञानी झाले. त्यांनी त्यांचे कर्म सोडले नाही. सर्व संत पोटा पाण्यासाठी आवश्‍यक असणारे कर्म करतच होते. शांततेच्या शोधात सर्व संसाराचा त्याग करून हिमालयात गेले तरी पोटासाठी कर्म करावेच लागणार. पोटातील अग्नी थंड केल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही. मारून मुरगुटून कोणी साधना करू शकत नाही. साधनेची सक्ती करूनही साधना होत नाही. त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. मनात नसेल तर प्रत्यक्षात कधीच प्रकट होणार नाही. यासाठी कर्म हे मनात यावे लागते. वास्तवात पुढे आलेले कर्म हे टाळता येणारे नाही. ते करावेच लागणार. हे कर्मच फळ देणार आहे. अशी भावना प्रकट व्हायला हवी. गोरा कुंभार माती मळत होते. माती पायाने मळली जात होती. पण मनात विठ्ठलाचे ध्यान सुरू होते. कर्म होत होते. येथे दोन्ही कामे सुरू होती. रोजचा पोटा पाण्याचा व्यवसाय सुरू होताच आणि दुसरीकडे विठ्ठलाची आराधनाही सुरू होती. भक्ती अशी करायची असते. नित्यकर्म सुरू असतानाही भक्ती करता येते. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचे फक्त ध्यान करायचे असते. कर्मातही ते आहेत हा भाव मनात प्रगट झाला की ते कर्म सहज होते. भक्तीत मन रमले की ज्ञान प्रकट होते. हे कर्मच फळसूचक आहे. रोज कामावर जाणे आहेच. नेमुन दिलेले काम करणे आहेच. हे कर्म करताना मनाची एकाग्रता वाढावी, यासाठी सद्‌गुरूंचे स्मरण आवश्‍यक आहे. कर्मावर मन एकाग्र व्हावे. सद्‌गुरू स्मरणाने ही एकाग्रता येते. हे कर्म सहज होत राहाते. हे कर्मच मनामध्ये एकाग्रता उत्पन्न करते आणि वाढवते. मन विचलीत न झाल्याने योग्य फळ आत्मसात होते. यासाठीच नित्य कर्मावर मनाची एकाग्रता वाढवायला हवी. त्यातच रममान व्हायला हवे. तेच आपणास आत्मज्ञानाचे फळ देणार आहे.

Thursday, December 27, 2012

गटशेतीतून भाजीपाला शेती केली यशस्वी

- राजेंद्र घोरपडे
सांगवडेवाडीतील शेतकऱ्यांचे यश 

सांगवडेवाडी (जि. कोल्हापूर) येथील शेतकऱ्यांनी राज्य कृषी विस्तार योजना "आत्मा'अंतर्गत गावात तीन स्वयंसहायता गटांची सुरवात केली. या गटांतील शेतकरी प्रामुख्याने वांगी, टोमॅटो, काकडी या पिकांची लागवड करतात. एकत्रित नियोजन, समन्वय आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी गटशेतीमुळे अनेक समस्या सुटण्यास मदत झाली आहे. 

कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगवडेवाडी येथील 70 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. सिंचनाची सुविधा असल्याने बऱ्यापैकी शेती बागायती आहे; मात्र कमी क्षेत्रातील शेतीमध्ये आव्हाने अधिक आहेत. गाव शहराजवळ असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले आहे. गेली सात वर्षे येथील शेतकरी भाजीपाला लागवड करतात. 

भाजीपाला उत्पादन करताना बाजारभावातील चढ-उतार, खताची टंचाई, खतासाठी लिंकिंग, वाढता उत्पादन खर्च, कीड- रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट असे प्रश्‍न त्यांना भेडसावू लागले. लहान क्षेत्र आणि कमी आर्थिक ताकदीवर मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांना भासू लागली. त्यांच्या या विचाराला करवीर तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले आणि गावात शेतकऱ्यांनी गटांची स्थापना केली. 

आज सांगवडेवाडीत श्री गणेश, श्री जयादेवी, बळिराजा असे तीन स्वयंसहायता गट आहेत. श्री गणेश गटामध्ये 18, श्री जयादेवी गटामध्ये 21, तर बळिराजा गटामध्ये 23 शेतकरी आहेत. हे शेतकरी प्रत्येकी अर्ध्या ते एक एकराच्या क्षेत्रात पावसाळी - उन्हाळी वांगी, टोमॅटो, काकडीची लागवड करतात. हा सर्व भाजीपाला कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड व कपिलतीर्थ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.

असे असते पिकांचे नियोजन-

दर्जेदार वांग्याला चांगली मागणी

संजय खोत यांची एकूण पाच एकर शेती आहे. त्यातील 15 ते 20 गुंठे क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांपासून ते वांग्याचे उत्पादन घेतात. या वर्षी त्यांनी 16 गुंठे वांगी लागवड केली आहे. गटामुळे त्यांना शेतीतील भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्यास मदत झाली. प्रत्येक महिन्याचा पंधरा तारखेला गटाची बैठक होते. यामध्ये विविध प्रश्‍नांवर विचारविनिमय होतो. त्यातून अडचणी सोडविल्या जातात. शेतीतील नवनव्या तंत्रज्ञानाची देवाण- घेवाण केली जाते. पुढील कामांचे नियोजन केले जाते. फवारणी, एकात्मिक कीड नियंत्रण, ठिबक सिंचन, लागवडीच्या पद्धती आदींवर चर्चा होते. यातूनच त्यांनी वांग्याला ठिबक सिंचन केले आहे. किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावले आहेत.
यंदा खोत यांनी वीस गुंठ्यांवर मांजरी गोटा या जातीची लागवड केली आहे. एकत्रित कामाच्या पद्धतीमुळे मजुरांच्या टंचाईवर काही प्रमाणात मात करणे शक्‍य झाले. पूर्वी सरी- वरंबा पद्धतीने वांग्याची लागवड केली जायची, यंदा मात्र गटातील चर्चेतून त्यांनी पाच फूट रुंद गादीवाफ्यावर झिकझॅक पद्धतीने तीन फुटांवर वांग्याची रोपे लावली आहेत. गटशेतीमध्ये झालेल्या फायद्याबाबत खोत म्हणाले, की एकत्रित लागण, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन करता आले. मजुरांच्या समस्येवर मात करता आली.

वांगी लागवडीचा खर्च (क्षेत्र 16 गुंठे)
- पूर्वमशागत- 1000 रुपये
- रोपे तयार करण्याचा खर्च ः 800 रुपये
- तरू लावण : 700 रुपये
- आंतरमशागत : 3200 रुपये
- आळवणी, फवारणी खर्च : 4500 रुपये
- खतासाठी खर्च : 5000 रुपये
- 20 तोडणीचा एकत्रित खर्च : 10,000 रुपये
- वाहतुकीचा खर्च : 2000 रुपये

एकूण............................. 27,200 रुपये

वांग्याचे उत्पादन-
सध्या सहा तोडण्या झाल्या आहेत. एकूण वीस तोडण्या होणे अपेक्षित आहे. त्यातून साधारणपणे 100 ते 150 पाट्या उत्पादन होते. एका पाटीत साधारणपणे 40 किलो माल बसतो. अंदाजे पाच महिन्यांच्या कालावधीत पाच टन वांगी उत्पादन होते. यंदा दहा किलो वांग्याचा दर 100 ते 300 रुपयांच्या दरम्यान आहे. सरासरी दर 150 रुपये विचारात घेता 75 हजार रुपये मिळू शकतील. खर्च वजा जाता 47 हजार 800 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

संपर्क-संजय खोत, 7798537232

पीक व्यवस्थापन खर्चात झाली बचत... 

राम भेंडवडे यांची एकूण दोन एकर शेती आहे. त्यातील एक एकरावर यंदा त्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. एक एकरासाठी त्यांना 5500 रोपे लागली. गटशेतीबाबत भेंडवडे म्हणाले, की एका रोपवाटिकेतून गटाद्वारे एकत्रित खरेदी केल्याने रोपे स्वस्त मिळाली.
गटातील चर्चेनुसार, टोमॅटोच्या दोन सरींतील अंतर साडेचार फूट आणि ओळींतील अंतर दीड फूट ठेवले. रोपांची संख्या कमी बसली तरी झाडांचा विस्तार चांगला होऊन चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

टोमॅटोचा एकरी खर्च
........... खर्च 1000 रुपये
पेरणी 3000 रुपये
खते 8000 रुपये
रोपांचा खर्च 4500 रुपये
बांधणीचा खर्च 3000 रुपये
अपेक्षित तोडणी ( 20 ते 25 ) 12, 500 रुपये
वाहतुकीचा खर्च 5000 रुपये
अन्य खर्च 4000 रुपये

एकरी खर्च 41,000 रुपये

अपेक्षित उत्पन्न- एका तोडणीत सर्वसाधारण 50 किलोच्या दहा पाट्या उत्पादन मिळते. एकरी सरासरी दहा टन उत्पादन मिळते. टोमॅटोला दहा किलोला सरासरी 50 ते 200 रुपये दर मिळतो. विक्रीतून साधारणपणे एक लाख रुपये मिळतात. खर्च वजा जाता 50 ते 60 हजार रुपये तीन महिन्यांत मिळतात.
संपर्क- राम श्रीपाल भेंडवडे, 9970690451

असा आहे गटशेतीचा फायदा... 

बांधावरच मिळाली खते
गटशेतीमुळे बांधावरच खते उपलब्ध झाली आहेत. यंदाच्या वर्षी गटातर्फे दोन ट्रक खत खरेदी केले. महाराष्ट्र शासनाच्या गोकुळ शिरगाव आणि मार्केट यार्डातील बफर स्टॉकमधून एकाच वेळी खत खरेदी केल्यामुळे पोत्यामागे 40 ते 50 रुपयांची बचत झाली. खत थेट बांधावर उपलब्ध झाल्याने कृषी सेवा केंद्रांतून होणारी लिंकिंग आदीच्या समस्येपासून सुटका झाली.
- सुकमार खोत, टोमॅटो उत्पादक, 9763242534

प्रक्रियाही शिकलो आम्ही
गटामार्फत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये भाजीपाला, फळे यावर प्रक्रिया कशी केली जाते याचे तंत्र शिकविले जाते. टोमॅटोपासून सॉस, जाम आदीचे महिलांना प्रशिक्षण मिळाले आहे. टोमॅटोचे दर घसरल्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे; तसेच विटा आणि वाळूच्या साहाय्याने घरगुती फ्रिज तयार करून त्यामध्ये टोमॅटो कसे सुरक्षित ठेवायचे, हेसुद्धा शिकलो. यामध्ये काही दिवसांसाठी टोमॅटो साठवता येतात.
- उषा जयपाल चौगुले, टोमॅटो उत्पादक

तीन ते चार फवारण्या झाल्या कमी
गटातील शेतकऱ्यांना आत्मा योजनेअंतर्गत जैविक कीड नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात आले; तसेच शेतकऱ्यांना कामगंध सापळे, ट्रॅप्स अनुदानावर देण्यात आले. यामुळे यंदा तुडतुडे, मावा, पांढरी माशी, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. साहजिकच फवारणीचा खर्च कमी झाला आहे. जवळपास तीन ते चार फवारण्या कमी झाल्याने खर्चात बचत झाली आहे.
- राजेंद्र चौगुले, वांगी उत्पादक, 9850619494

तोडणीचे करतो नियोजन
गटामुळे पिकाच्या तोडणीचे नियोजन करता येते. गावातील तीनही गटांमध्ये यावर चर्चा होते. एकाच दिवशी सर्वांची तोडणी येणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. एकाच दिवशी सर्वांनी तोडणी केल्यास मालाची आवक वाढल्याने दर कमी मिळण्याचा धोका असतो. यासाठी तोडणीचे नियोजन केले जाते. गटांनी विक्रीसाठी एकच व्यापारी ठरवला आहे, त्यामुळे दर योग्य मिळतो, फसवणूक टळते, तसेच तोड केलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी मालाबरोबर विक्रीसाठी जाण्याची गरज भासत नाही. मालासोबत एक- दोघेजण जाऊन रक्कम आणतात. यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांचा विक्रीसाठी लागणारा वेळ, खर्च वाचतो.
- राजेंद्र हुजरे, टोमॅटो उत्पादक, 8275272527

रोपांची खरेदी झाली स्वस्तात
गटातील शेतकरी रोपांची खरेदी एकाच वेळी एकाकडे करतात, यामुळे रोपे स्वस्त मिळतात. एका रोपाला एक रुपया इतका दर यंदा होता; पण गटामुळे हे रोप 80 पैशांना मिळाले. एकरी हजार रुपये तरी सहज वाचतात. तसेच, एकत्रित वाहतुकीमुळेही बचत होते.
- रावसाहेब दादू चौगुले, वांगी उत्पादक

Friday, December 21, 2012

ज्ञानाचा हक्क

देवी लक्ष्मी येवढी जवळिक । तेहीं न देखे या प्रेमाचे सुख ।
आजि कृष्णस्नेहाचे पिक । यातेंचि आथी ।।

डॉक्‍टरचा मुलगा डॉक्‍टर, क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, संपादकाचा मुलगा संपादक होतोच असे नाही. याचा अर्थ हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात. तशा व्यक्तीही सारख्या नसतात. दोन व्यक्ती दिसायला एक सारख्या असतील पण त्यांची कर्मे, ज्ञान ग्रहणाची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येकाची आवड निवडही वेगळी असते. यामुळेच हा फरक दिसून येतो. वारसा हक्काने ज्ञान संपादन होत नाही. यामुळे शिक्षकाचा मुलगा त्याचा शिक्षकीपेशा पुढे चालवेलच असे नाही. पुजापाठ करणारे भडजी मात्र त्यांच्या मुलालाच त्याचा हा हक्क देतात. तो हक्क ते सोडत नाहीत. ज्ञानदान, ज्ञान ग्रहणाचा हक्क सर्वांना आहे. कोणीही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो. कोणी कशातही पारंगत होऊ शकतो. तसे भडजी सुद्धा सर्वांना होता येते. पण काही कर्मठ ज्ञानीपंडीतांनी हा हक्क केवळ आमचाच आहे असा हेका धरला. यासाठी ही परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यातून वादही झाले. गुरू-शिष्य ही परंपरा जातीपाती, वारस, नातीगोती यावर अवलंबून नसते. गुरू-शिष्याचे नाते हे ज्ञान दानाचे, ज्ञान ग्रहनाचे नाते असते. यामध्ये या गोष्टी आड येत नाहीत. कृष्ण आणि अर्जुन यांचेही नाते असेच दृढ होते. कृष्णाचे राधेवर खूप प्रेम होते. पण ज्ञानाचे गुह्य त्यांनी त्यांच्या पत्नीला न सांगता केवळ त्यांनी त्यांचा खरा भक्त अर्जुनालाच सांगितले. गुरू-शिष्यातील नात्याचा हा महत्त्वाचा भाग आहे. प्रेमामुळे, स्नेहामुळे, नातलगांमुळे हे ज्ञान आदानप्रदानाचे कार्य चालत नाही. या ज्ञानावर सर्वांचा हक्क आहे. आत्मज्ञान हे सर्वांना मिळवता येते. यासाठी खरा भक्त होण्याची गरज आहे. खरी सेवा करण्याची गरज आहे. गुरूकृपेने हे ज्ञान प्राप्त होते. यामध्ये भेदभाव नाही. उच्चनिच हा भेद नाही. यामुळे सर्वजातीधर्मातील वारकरी परंपरेमध्ये पाहायला मिळतात. संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बहिणाबाई, अशी विविध जाती धर्मातील व्यक्ती आत्मज्ञानी झाली. ही गुरू-शिष्य परंपरा आहे. गुरू ज्ञानदान करताना. त्याची जात, वारसा हे पाहात नाहीत. तर त्याची भक्ती पाहतात. घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्‍य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहन करण्याच्या क्षमतेनुसार ही प्रक्रिया सुरू असते. येथे आरक्षण नाही. येथे वशीला नाही. श्रीमंती पाहीली जात नाही. येथे फक्त गुणाला महत्त्व आहे. गुणानुसार पात्रता ठरते. ही पात्रता गुरू ठरवितात. तो हक्क गुरूंना आहे. आत्मज्ञानी गुरू योग्य शिष्याची निवड करतात. त्यालाचा हा आत्मज्ञानाचा लाभ होतो.

Tuesday, December 18, 2012

नैसर्गिक स्वाद


कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।

मुर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ।। 198 ।। अध्याय 3


चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो. त्याचा त्रास होत नाही. त्यामध्ये दाहकता नसते. पूर्वी घराघरांत वीज नव्हती. अशावेळी रात्रीचा हा चंद्राचा शीतल प्रकाश हवाहवासा वाटायचा. पण आता चंद्र उगवतो कधी आणि मावळतो कधी हे सुद्धा लक्षात येत नाही. विजेच्या क्रांतीमुळे चंद्राचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. मानवाला आता त्याची गरज वाटत नाही. कृत्रिम पर्याय उपलब्ध झाल्याने आता नैसर्गिक गोष्टींचे अस्तित्व जाणवेणासे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगती ही कृत्रिम आहे. यामुळे सगळे जीवनच कृत्रिम होत आहे.. भावनाही कृत्रिम होऊ लागल्या आहेत. स्तुतीही कृत्रिम वाटत आहे. यामध्ये जिवंतपणा वाटत नाही. जिवंतपणा हा नैसर्गिक असतो. अंतःकरणातून येतो. तो वरवरचा नसतो. कृत्रिम जिवंतपणा मात्र अद्याप संशोधकांना आणता आलेला नाही. कृत्रिम मानव त्यांनी तयार केला आहे. रोबोट तयार केला आहे. तो मानसाची सर्व कामे करू शकतो. पण त्याला भावना नाहीत. त्याला विचार नाही. त्याला मन नाही. नैसर्गिकपणा नाही. त्यामुळे नैसर्गिक चव काय असते हे नव्या पिढीला अनुभवता येत नाही. कृत्रिम जगाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक जगाची ओळख नव्या पिढीला करून देण्याची गरज भासू लागली आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवावे लागणार आहे. इतकी ही नवी पिढी कृत्रिम होत आहे. कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये यासाठी निसर्गातील गोडी, चव चाखण्याचीही सवय त्यांना लावण्याची गरज भासणार आहे. अध्यात्म हे सुद्धा नैसर्गिक आहे. कृत्रिम नाही. आत्मज्ञान ही सत्‌ पुरुषांना मिळालेली निसर्गाची देणगी आहे. ही नैसर्गिक देणगी त्यांनी अभ्यासाने आत्मसात केली आहे. तसे निसर्गाचा स्वादही नव्यापिढीला आत्मसात करायला शिकवायला हवे. यामुळे निसर्गाचे भय त्यांच्यामध्ये राहणार नाही. निसर्ग जपण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे. संकरित बियाण्यामुळे आज नैसर्गिक गोडवा नष्ट झाला आहे. ती नैसर्गिक गोडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिकपणा जोपासायला हवा. कृत्रिम गोष्टी ह्या क्षणिक असतात. विजेची निर्मिती केली जाते. ही वीज क्षणिक आहे. त्याची निर्मिती बंद केल्यानंतर ती आपणास उपलब्ध होऊ शकत नाही. पण चंद्राचा प्रकाश हा नैसर्गिक आहे. कृत्रिम प्रकाशाची झापड डोळ्यावर आल्याने हा प्रकाश आता आपणास दिसेनासा झाला आहे. त्याची गोडीही मनाला भावत नाही. आत्मज्ञानाचेही असेच आहे. कृत्रिम ज्ञानाचा प्रभाव वाढल्यानेच नैसगिक आत्मज्ञानामध्ये रस वाटेनासा झाला आहे. यासाठी नैसर्गिक गोष्टींचा स्वाद नव्या पिढीस सांगायला हवा.

Monday, December 17, 2012

सेवाभाव


म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावी ।
ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ।।

कितीही कठीण प्रसंग आले तरी सेवाभाव हा धर्म आपण सोडता कामा नये. राज्यकर्त्यांनी सेवा हा धर्मच सोडल्यामुळे सत्तेची गणिते चुकत आहेत. पुर्वीच्याकाळी एकमुखी सत्ता असायची. त्याला कारण त्या राजकर्त्यांमध्ये सेवाभाव होता. सेवा हाच त्यांचा धर्म होता. यामुळे जनतेमध्ये त्यांना विरोधकच नसत. तसे धाडसही कोणी करायचे नाही. केले तर ते फार काळ टिकायचेही नाही. कायमस्वरूपी सत्तेसाठी सेवा हा धर्म राज्यकर्त्यांनी जोपासायला हवा. हा धर्म सुटला की आसन निश्‍चितच डळमळीत होते. साधकांनीही सेवाभाव अंशी जोपासायला हवा. याचा फायदा मनशांत ठेवण्यामध्ये होतो. सेवेतून समाधान मिळते. मनाला शांती मिळते. हे काम खालच्या दर्जाचे आहे. हा भाव काम करताना ठेवता कामा नये. सेवा हाच धर्म माणून ते कमा करायला हवे. यामध्ये सर्व कामाची सवय लागते. विशेष म्हणजे वेळ प्रसंगी आपणास एखादे खालच्या दर्जाचे काम करावे लागले तरी मनाला त्याची सल टोचत नाही. मन विचलित होत नाही. मनाची शांती टिकून राहते. साहजिकच याचा परिणाम चांगला होतो. अयोग्य काम करण्याचे मात्र टाळायला हवे. योग्य तेच स्वीकारायला हवे. ही सवय अंगी लागावी यासाठीच वारकरी संप्रदायामध्ये काही नियम तयार केले आहेत. हा मोठा, हा लहान, हा श्रीमंत, हा गरीब हा भेदभाव मनातून जावा यासाठीच हे नियम आहेत. विना घेण्याची पद्धत संप्रदायात आहे. हा विना घेताना समोरच्या व्यक्तीला वाकून नमस्कार करूनच तो विना घ्यायचा असतो. हा नियम याचसाठी आहे. एखाद्या लहान व्यक्तीने हा विना घेतलेला असेल तर त्याच्याकडून घेतानाही हा नियम पाळावा लागतो. विना घेणारा कितीही मोठा, गर्भश्रीमंत असला तरीही हा नियम येथे आहे. अशा या नियमामागे भेदभाव दूर व्हावा हेच उद्देश आहेत. विशेष म्हणजे असे काही नियम हे यासाठीच तयार केले आहेत. सेवाभाव निर्माण व्हावा यासाठी या सवयी अंगी लागाव्यात हा या मागचा उद्देश आहे. अहंकार जावा, अहंभाव जावा हे उद्देश आहेत. अहंकाराने मानसाचे मोठे नुकसान होते. मीपणामुळे, हेखेकोरपणामुळे स्वतःचे नुकसान का करून घ्यायचे हा विचार करायला हवा. पण हा अहंकार, मीपणा सहज जात नाही. हे जावेत यासाठीच काही नियमांचे पालन हे करायला हवे. यामुळे आपणाला या गोष्टींची सवय लागते. धकाधकीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काही सवयी ह्या आवश्‍यक आहेत. तसे आता या सवयींचे पालन करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्‍य वाटत असले तरी हाच खरा धर्म आहे. याचे आचरण हे आवश्‍यक आहे. सेवावृत्तीच अनेकांचे भले करते. अमरत्व प्राप्त करून देते. याचा विचार करायला हवा. स्वतःच्या स्वार्थासाठी सेवेचा त्याग करणे हे मुर्खपणाचे आहे.

Sunday, December 16, 2012

विकारांवर उपाय



सांगे श्रवणीं ऐकावे ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ।।

धकाधकीच्या जीवनामुळे माणसांची झोपच उडाली आहे. यामुळे अनेक विकार, विकृती मानवामध्ये दिसून येऊ लागल्या आहेत. लहरीपणा, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. अती आवाजामुळे, ध्वनी प्रदुषणामुळे श्रवणशक्ती कमी होताना आढळत आहे. डोळ्यांना विश्रांती न मिळाल्याने अंधत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुर्गंधीमुळे सुगंधाचा वासही नाकाला झोंबू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. नियोजनच कोलमडल्याने हे प्रकार वाढत आहेत. पुर्वीच्याकाळी हे विकार उतारवयात होत असत पण ऐन तारुण्यात वृद्धत्वाच्या विकारांचा सामना नव्यापिढीला करावा लागत आहे. यावर औषध उपचारांचाही परिणाम फारसा दिसून येत नाही. मनाची शांतीच मनुष्य हरवून बसला आहे. यावर उपाय आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पण पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्याला हे साधेसोपे उपायही समजेनासे झाले आहेत. अशाने मनाला शांती मिळते. समाधान मिळते. हेच मुळात पटेणासे झाले आहे. पैशाने सर्व खरेदी करता येते याच भ्रमात मनुष्य वावरत आहे. मनशांती ही पैशाने विकत मिळत नाही. ती आपल्याला मिळवावी लागते. योगा, व्यायाम यामुळेही क्षणिक मनशांती लाभते. ताजेतवाने होता येते. पण कायमस्वरूपी मनशांती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली आत्मसात करावी लागते. नियोजनाला जीवनात खूप महत्त्व आहे. या नियोजनात काही काळ हा मनाला विश्रांतीसाठी द्यावा लागतो. दररोज तासभर मनाला शांतीसाठी अध्यात्मात मन रमवायला हवे. त्याचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये सांगितलेले साधनेचे उपाय योजायला हवेत. साधनेने मनाचा थकवा दूर होतो. मनाला नवी उभारी मिळते. मनातील विचार शांत होतात. मन प्रसन्न होते. यासाठी साधना ही आवश्‍यक आहे. कमीत कमी पाच मिनिटेतरी साधना करायला हवी. पण यासाठी मानवाला वेळच नाही. शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचार शक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. अध्यात्मिक ग्रथांच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते. हळुहळु मन त्यामध्ये रमु लागते. शांत झोप लागते. यामुळे होणाऱ्या विकारावर हा एकमेव उपाय आहे. याचा विचार करायला हवा. औषधाने जे साध्य होत नाही ते यामुळे निश्‍चितच साध्य होते. यासाठी प्रयत्न करायला हवा.

Saturday, December 8, 2012

शून्य मशागत तंत्राने भातशेती केली फायद्याची

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे विना नांगरणी अर्थात शून्य मशागत तंत्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी अवलंबत आहेत. ऊस तोडणीनंतर त्या शेतात पावसाळ्यामध्ये या तंत्रज्ञानाने भातशेती केली जाते. कमी खर्चासह उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांत या तंत्राबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. हसुरदुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील संतोष रामचंद्र पाटील गेल्या चार वर्षांपासून हे तंत्र वापरत आहेत. राजेंद्र घोरपडे
शेतीत सतत विविध प्रयोग करून सकारात्मक विचारांची मनाला सवय लावून घ्यायला हवी. कोल्हापूर जिल्ह्यातील हसुरदुमाला येथील संतोष पाटील यांनी हेच विचार जोपासून शेतीचे नवे तंत्र अवलंबत आपला विकास साधला.

बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 पासून संतोष शेतीत आहेत. वडिलोपार्जित त्यांची 30 एकर शेती आहे. भोगावती नदीकाठीच शेती असल्याने सुपीकता तसेच पाणीही मुबलक. तरीही वाढत्या उत्पादन खर्चामुळे उत्पन्नाचा मेळ घालावाच लागतो. उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर करीत जास्तीत जास्त नफा कसा घेता येईल या दृष्टीने संतोष यांनी शेतीतील नवे तंत्र अभ्यासण्यास सुरवात केली. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्रा. अजय देशपांडे यांनी त्यांना ठिबक सिंचनाबाबत मार्गदर्शन केले. सन 1992 मध्ये मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संतोष यांनी भाग घेतला. कृषी महाविद्यालयाच्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचातही ते सहभागी झाले.

चिपळूणकरांचे मार्गदर्शन भातशेती करताना संतोष यांना अनेक समस्या जाणवत होत्या. अनेक ठिकाणी उगवण होत नव्हती. उत्पादन समाधानकारक नव्हते. खुरपणी, कोळपणीसाठी मजुरांची टंचाई होती. नांगरट, फळी मारणे आदी कामे वेळेवर होत नसल्याने पेरणीस विलंब व्हायचा. नदीकाठी शेत असल्याने पुरात भाताचे नुकसान व्हायचे. या समस्येवर मात करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाच्या शोधात संतोष होते. दरम्यान कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचा परिचय शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या निमित्ताने झाला. शून्य मशागत तंत्राद्वारे त्यांची शेती सुरू होती. संतोष यांनी चिपळूणकर यांच्या शेतास भेट दिली, त्यांचे तंत्र अभ्यासले व ते वापरण्याचे ठरविले.

चिपळूणकर तंत्राचा वापर गेल्या चार ते पाच वर्षांपासून विना नांगरणी अर्थात शून्य मशागत तंत्रज्ञान संतोष वापरत आहेत. मार्चमध्ये ऊस तुटून गेल्यानंतर खोडवी शेतात राखायची. दरम्यान, वळवाचा पाऊस झाला व ऊस उगवून आला तर शेतात मेंढरे चरायला सोडायची. यानंतरही तणे किंवा गवताळ वाढ आढळल्यास ग्लायफोसेट तणनाशक फवारून ते नियंत्रित करायचे. पाण्याचा ताण पडल्याने खोडव्याच्या उसाची वाढ थांबते.

पावसाळ्यात खोडवी कुजून त्याचे खत तयार होते. रोहिणी नक्षत्रात भाताची टोकणी 10 x 10 इंचावर करायची. एका जागी दोन बिया वापरायच्या. यामुळे बियाणे कमी लागते. एकरी साडे चार किलो बियाणे लागते. त्यातील चार किलो बियाण्याची टोकणी करायची व उरलेल्या अर्धा किलो बियाण्याची रोपे तयार करायची. उगवण होत नाही अशा ठिकाणी ही रोपे लावायची. गेल्या वर्षी संतोष यांनी सुमारे 135 दिवसांत तयार होणाऱ्या जातींची लावण केली. साधारणपणे हादगा झाल्यानंतर काढणी होते. भातात लावणीनंतर सुमारे दीड महिन्यांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल तणनाशकाची फवारणी होते.

भातशेतीतील नव्या- जुन्या लागवड पद्धतीतील अंदाजे जमाखर्च (एकरी) - जुनी पद्धत (खर्च) नवी पद्धत (खर्च)
पूर्वमशागत- 8000 रुपये बियाणे 4000 रुपये
आंतरमशागत 2000 रुपये पेरणी 1200 रुपये
बियाणे 4000 रुपये खत, कीडनाशके 4300 रुपये
पेरणी 1200 रुपये इतर खर्च 500 रुपये
खते, कीडनाशके 4300 रुपये
.................................................. ...................................................
एकूण 19,500 रुपये एकूण अंदाजे 10 हजार रुपये

यंदा संतोष यांनी तीन एकरावर भात लागवड केली. एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. क्विंटलला 1150 रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता एकरी 35 हजार रुपये नफा मिळाला. हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी भाताचे उत्पादन एकरी 20 क्विंटलपर्यंत मिळत होते.

शून्य मशागत तंत्राचा फायदा - उत्पादन खर्चात बचत
- मजूरटंचाईवर मात
- मशागतीसाठी ट्रॅक्‍टर आदींची अवलंबिता नाही
- पेरणी वेळेवर होत असल्याने पिकाची जोमदार वाढ

पाण्यावर तरंगता मोटारपंप नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीतील पाण्याची पातळी विचारात घेऊन मोटारपंप सतत खालीवर करावा लागतो. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पाण्यात पंप बुडण्याची शक्‍यता असते. पाणी खाली गेल्यानंतर ते खेचताना अडचणी येतात. पावसाळ्यात विहिरीत पाण्याची पातळी वाढेल तसा मोटारपंप वरती बसवावा लागतो. ही काढणी- जोडणी जोखमीची असते. मनुष्यबळही लागते. हा विचार करून संतोष यांनी पाण्यावर तराफा करून त्यावर मोटारपंप बसविली. पाण्याची पातळी कमी झाली किंवा वाढली तरी त्याचा फटका पंपास बसत नाही. सन 2005 पासून त्यांनी 10 अश्‍वशक्तीचे दोन पंपसेट पाण्यावर तरंगणाऱ्या तराफ्यावर बसविले आहेत.

संतोष यांना झालेला फायदा पाहून यंदा हसुरदुमालातील कृषी विज्ञान मंडळाच्या काही शेतकऱ्यांनी भातासाठी शून्य मशागत तंत्र वापरले. त्यांचे उत्पादन असे -
शेतकरी क्षेत्र सरासरी उत्पादन 1) उत्तम पुंडलिक पाटील 35 गुंठे 30 क्विंटल
2) उत्तम पुंडलिक पाटील 35 गुंठे 21 क्विंटल
3) उत्तम पुंडलिक पाटील 30 गुंठे 21 क्विंटल
4) विलास विठ्ठल खराडे 50 गुंठे 36 क्विंटल
5) काशिनाथ रामजी पाटील 10 गुंठे सात क्विंटल
6) अण्णासाहेब रामचंद्र देशपांडे 80 गुंठे 48 क्विंटल
7) केशव भाऊ खराडे 18 गुंठे 10 क्विंटल
8) हिंदुराव दत्तात्रय कानुगडे 10 गुंठे 10 क्विंटल
9) वसंत भिकू पाटील 25 गुंठे 16 क्विंटल
10) नामदेव हिंदुराव भोईटे 4 गुंठे 4 क्विंटल
11) ज्ञानदेव हिंदुराव भोईटे 7 गुंठे 6 क्विंटल
12) श्रीपती दिनकर पाटील 15 गुंठे 10 क्विंटल
13) कृष्णात शंकर तोडकर 15 गुंठे 10 क्विंटल


सुपीकता वाढविणारे तंत्रज्ञान... विना नांगरणीचे तंत्र नक्कीच उपयोगाचे आहे. खोडवे आणि उसाच्या मुळांचे जाळे जमिनीत कुजून त्याचे सेंद्रिय खत पिकास मिळते. यामुळे सेंद्रिय खताची टंचाई भासणाऱ्यांना हे तंत्र निश्‍चितच उपयुक्त आहे. सेंद्रिय खतामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. मनुष्यबळाचा वापर कमी लागतो. या तंत्राने उसाच्या पूर्वमशागतीचा खर्च एकरी 250 ते 300 रुपये येतो. या तंत्रामुळे जादा खर्च न करता जमिनीची सुपीकता वाढत जाते.

- प्रताप चिपळूणकर, प्रयोगशील शेतकरी, कोल्हापूर

संतोष पाटील- 7588171257
हसुरदुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर

Thursday, December 6, 2012

औषध



देखे रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।

परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसे ।।



औषध गोड नसते. ते कडू असते. पण त्याचा परिणाम हा मधुर असतो. सल्ला हा औषधासारखा असतो. तो गोड कधीही वाटत नाही. बऱ्याचदा तो मनाला पटतही नाही. पण हा कडवटपणा आपणास स्वीकारावा लागतो. तो स्वीकारल्यानंतर अनुभव हे गोड असतात. जीवनात अनेक कठीण प्रसंगीही असेच अनुभव येतात. उतारवयात बऱ्याचदा शरीर औषधांना साथ देत नाही. त्यावेळी डॉक्‍टर आपल्या शरीराची प्रयोगशाळाच करतात. विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात. शरीराला साथ देणारी औषधेच घ्यावी लागतात. तरच त्याचा परिणाम दिसून येतो. शरीराप्रमाणे मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहातो. तारुण्यात मन तरूण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकण राग येतो. अन्याया विरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते. देहबोली, हालचालीमध्येही फरक पडतो. पोरकटपणा कमी होतो. तारुण्यात पेटून उठणारे मन मात्र इथे शांतपणे मार्ग निवडत असते. त्यावर योग्य उपाय योजत असते. हा बदल वयोमानानुसार होतो. तरूणपणी सल्ले मनाला रूचत नाहीत. पण हे सल्ले स्वीकारावे लागतात. त्याचा योग्य परिणामही दिसून येतो. उतारवयात मात्र मन हे सल्ले स्वीकारण्यास पटकण मन तयार होत नाही. बळजबरीने ते स्वीकारले जातात. त्यामुळे याचा परिणाम फारसा चांगला दिसून येत नाही. कित्येकदा काही सल्ले मनाला न पटल्याने स्वभाव चिडचिडा होतो. हा शरीर, मनाचा, स्वभावाचा गुणधर्म आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. पण शरीर निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत. सर्व रोग हे मनात दडलेले असतात. मन शांत असेल तर हे सर्व रोग शांत असतात. मनाची चलबिचलता सूरू झाली की रोगांचीही चलबिचलता सुरू होते. हळूहळू रोग डोकेवर काढतात. यासाठी मनाची स्थिरता ही महत्त्वाची आहे. मन स्थिर ठेवणे हे रोगावर अत्यंत उपयुक्त औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही. मनाच्या स्थिरतेसाठी सांगितलेले उपाय यासाठी योजने गरजेचे आहे. मनाची स्थिरता ही उतारवयात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त असे औषध आहे.

Thursday, November 15, 2012

विषयांचा त्याग




म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।

रागद्वेष स्वभावेॅ । नाशतील ।।



सतत अनेक विचार घोळत असतात. हे विचार जोपर्यंत संपत नाहीत, तो पर्यंत मनाला शांती लाभणार नाही. मन स्थिर होणार नाही. वृद्धापकाळात किंवा वयाच्या 40 नंतर अनेक आजार जडतात. यावर डॉक्‍टर विचार करणे कमी करा असा सल्ला देतात. मुळात अति विचार करण्यामुळेच हे रोग जडलेले असतात. या रोगावर विरक्त मन हा उपाय आहे. असे असेल तर पाश्‍चात संस्कृतीत या रोगावर इलाज नाहीत. आपल्या संस्कृतीत मात्र निश्‍चितच यावर उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे यासाठी पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. इतके सोपे सहजपणे हे उपाय आपणास सांगितले गेले आहेत. संस्कृतीमध्येच याचा आचार-विचार सांगितला आहे. मग आपण आपल्या संस्कृतीचा तिरस्कार का करतो? एखादी गोष्ट आपल्या संस्कृतीत सांगितलेली असेल, तर त्याचा सखोल अभ्यास का केला जात नाही. यावर सखोल विचार केला तरच हे तत्त्वज्ञान आपणास आत्मसात होणार आहे. अन्यथा तिरस्कार करून हे तत्त्वज्ञान अयोग्य आहे. असेच आपण म्हणत बसणार. आपल्या संस्कृतीला नावे ठेवत बसणार. पण भावी काळात आपणच आपल्या संस्कृतीच्या संवर्धनाकडे वळू. आपणाला त्याचे फायदे निश्‍चितच पटू लागतील. अनेक रोग हे मनापासूनच उत्पन्न होतात. यासाठी मनावर नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या संस्कृतीत हेच सांगितले आहे. मनावर बंधने घालण्याची सवय आपणास पडावी यासाठी काही गोष्टी शिकविल्या गेल्या आहेत. पण नेमके येथेच आपण चूक करत आहोत. नेमक्‍या याच गोष्टीचा त्याग आपण करत आहे. विषयांचा वाढता प्रभाव हेही यामागचे कारण आहे. विषयांना धरून राहिल्यानेच आपल्या डोळ्यावर झापड आली आहे. चांगल्या गोष्टी याचमुळे आपल्या दृष्टीस पडेनाश्‍या झाल्या आहेत. यासाठी विषयांचा त्याग करायला हवा. लोभ, स्वार्थ, काम यांचे प्राबल्य वाढल्यानेच हातून या चुका होऊ लागल्या आहेत. स्वार्थामुळे आपण अनेकांची मने दुखावत आहोत. घरामध्ये वागतानाही या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही असे वागणे आपण शिकायला हवे. हीच अहिंसा आहे. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू करायला हवे. याची सुरवात ही स्वतः पासून करायला हवी. आजच्या बदललेल्या जगात असे करणे निश्‍चितच आव्हानात्मक असणार आहे. पण हे आव्हान आपण स्वीकारायलाच हवे. पूर्वीच्या कालात ही परिस्थिती वेगळी होती. पण त्याकाळातही असे वागणे हे आव्हानच होते. त्याकाळातील लोकांनी हे स्वीकारले त्यामुळेच ते पुढे संत, महात्मा झाले. विषयांचा त्याग त्यांनी केला. साहजिकच त्यांच्यात उत्पन्न होणारा राग, द्वेषही नष्ट झाला. यामुळे त्यांचे ते सतत निरोगी राहिले. रोग त्यांना जडलेच नाहीत. जे रोग जडले त्याला प्रतिकार करण्याचीही क्षमता त्यांच्यात उत्पन्न झाली. विषयांचा त्याग केल्याने हे सर्व आपणास सहज प्राप्त होते.

Tuesday, November 13, 2012

अल्पभूधारक शेतकरी जगवणे हेच आव्हान

अल्पभूधारक शेतकरी जगवणे हेच आव्हान


- राजेंद्र घोरपडे

9011087406



गेल्या पन्नास वर्षांचा विचार करता शेतीमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. लाकडी नांगर आता इतिहास जमा झाले आहेत. त्याची जागा आता ट्रॅक्‍टरने घेतली. असे होताना शेताचा आकारही कमी होत चालला आहे. याचा विचार व्हायला हवा. तसे आधुनिक तंत्रज्ञानात कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते. पण हे ग्रीनहाऊसचे तंत्र सर्वसामान्य शेतकरी आत्मसात करू शकत नाही. तसे भांडवलही त्याच्याकडे नाही. यामुळे भावी काळात शेती आणि शेतकरी टिकवायचा असेल तर योग्य नियोजनाची गरज भासणार आहे. दुरदृष्टीचा विचार करून नियोजन आखायला हवे तरच देशातला शेतकरी शेतीत टिकून राहणार आहे.



1991 ते 2001 या काळात 80 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. 1991 मध्ये 11.3 कोटी शेतकरी शेती कसत होते. तर 2001 मध्ये 10.5 कोटी शेतकरी शेती कसत होते. दररोज दोन हजार शेतकरी शेती सोडून उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधत आहेत. उदारीकरणाचा परिणाम म्हणून याकडे पाहीले जाते. पण इतरही कारणे आहेत. याचा आढावा घेणे गरजेचे आहे.



शेतकऱ्यांच्या आत्महत्यातही 2001 नंतर वाढ झाली. याचाही परिणाम विचारात घ्यायला हवा. 1995 ते 2009 या काळात महाराष्ट्रात 47 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वीस वर्षात शेतीवर इतके भयाण संकट का कोसळले आहे.? सरकारला शेतकरी जगवायचा आहे. का नुसते पॅकेज जाहीर करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. पॅकेज हा विकासासाठीचा मार्ग होऊ शकत नाही. नुकसान भरपाई, पॅकेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का?



2006 मध्ये बर्ड फ्लूने अनेक पोल्ट्रीधारक शेतकरी उद्धवस्थ झाले. शासनाने काही पोल्ट्री धारकांना नुकसान भरपाई दिली. पण आजही काही शेतकरी या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. आज सहा वर्षे झाले हे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अधिवेशनानंतर निधीच्या तरतुदीचा सरकारी अध्यादेश (जीआर) निघतो. पण निधीचे वाटप काही होत नाही. इतक्‍या वर्षानंतर तो शेतकरी ती नुकसानभरपाई घेऊन प्रगती काय करणार? विकास कसा साधणार? यामुळेच नुकसान भरपाई किंवा पॅकेज हा पर्याय होऊ शकत नाही. यासाठी आगामी काळात नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. नवा पर्याय हा पारदर्शी असायला हवा. शेतीला जोड व्यवसाय करणारा शेतकरी या नुकसानीमुळे जोड धंदा तर सोडत आहेत. पण शेतीही सोडत आहे. त्याची भावी पिढी या शेतीत येत नाही. शेतकरी मुलाला शेतीमध्ये आणण्यास इच्छुक दिसत नाही.



गेल्या पन्नास वर्षात दोन हेक्‍टर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्यात वाढ झाली आहे. दहा हेक्‍टरच्यावर क्षेत्र असणाऱ्या शेतकरी केवळ 1.3 टक्केच राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार कमी होत चालला आहे. देशातील 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. 1960 साली 60 टक्के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र होते. भावी काळात या पेक्षाही भयानक चित्र पाहायला मिळेल. देशातील शेतकऱ्यांच्याकडे कसायला शेतच नाही अशी परिस्थिती असणारे शेतकरी पाहायला मिळतील. देश श्रीमंत होत चालला आहे पण शेतकरी मात्र गरीब होत आहे. नियोजन करताना ही आकडेवारी विचारात घ्यायला हवी. शेतकरी शेतमजूर झाला आहे. याची आकडेवारीही पाहायला हवी. काही शेतकरी भागाने घेऊन शेत करत आहेत. याचा अर्थ तो शेतकरी आहे पण त्याच्या जवळ कसायला आवश्‍यक तेवढे क्षेत्र नाही. किंवा तो शेत नसणारा शेतकरी आहे. सध्या एखाद्या गावात साधारण असे 20 ते 30 टक्के शेतकरी पाहायला मिळतील. यामध्ये भावी काळात वाढ होणार आहे. कसेल त्याची जमीन हा कायदा सरकारने केला आहे. असे कायदे शेतकऱ्यांच्याच मुळा उठतात. याचा विचार सरकारने करायला हवा. कायदा करताना याचे भान सरकारने ठेवायला हवे. शेतकरी संपवायचा नाही तर तो जगवायचा आहे. सरकारी कायद्याने जमीनीवरुन तंटेच वाढत आहेत. कायदा हा अशा गोष्टीसाठी नसावा. अशा कायद्यानेच शेतकरी संपतो आहे. त्याच्यातील माणूसकी संपवली जात आहे. सरकारने दूरदृष्टी ठेवून विचार करायला हवा.



शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने चरितार्थ चालवायचा कसा? हा प्रश्‍न शेतकरी कुटुंबाजवळ पडला आहे. यामुळेच तो शेती सोडून शहराचा रस्ता पकडतो आहे. वाढत्या महागाईमुळे यात मोठी भरच पडत आहे. शेतकऱ्यांनी शेती सोडण्याचा वेग वाढतो आहे. हे थांबविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वाढती महागाई रोखण्यात कोणत्याही सरकारला यश आलेले नाही. हा प्रश्‍न आवाक्‍याबाहेर गेला आहे. शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे पण उत्पन्नात वाढ झालेली नाही. शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. गरजेपुरते अन्न पिकविणेही आता या शेतकऱ्याला शक्‍य नाही. यासाठी सरकारने भावी धोरणे ठरविताना याचा विचार करायला हवा. जिराईत शेती बागायती झाली म्हणजे सर्व प्रश्‍न सुटले असे होत नाही.



अशा या भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची जाणीव सरकारला असेलही पण यावर पर्याय कोणते सुचविले जाऊ शकतात याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. हे मात्र निश्‍चित. कारण यामुळेच शेतीसाठीचे पाणी आता उद्योगाकडे वळविले जाऊ लागले आहे. ही सरकारची पळवाट आहे. प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याऐवजी सरकार पळवाटा शोधत आहे हे यापेक्षाही भयाण आहे. पळवाटा शोधून शेतीचे प्रश्‍न सुटत नाहीत. पळवाटांनी शेतीची प्रगती झाली असल्याचे भासत आहे. पण ही प्रगती मर्यादीत आहे. याचा विचार करायला हवा. जागतिक मंदीच्या काळात देशाला शेतीनेच सावरले आहे याचा विचार अर्थमंत्र्यांनी नियोजन करताना करायला हवा. पर्याय शोधण्यासाठी जनतेला आवाहन करायला हवे. या प्रश्‍नावर सरकारने संसदेत चर्चा घडवायला हवी. अनेक पर्याय यातून खुले होऊ शकतील. पळवाटा शोधल्यानेच शेतकरी शेती सोडून पळतो आहे. याचा विचार करायला हवा. देशाला शेतीच तारू शकते. यासाठी शेतकरी जगवायला हवा.



कर्जबाजारीपणा, शेतीत नुकसान, कौटुंबिक जबाबदाऱ्यामुुळे वाढता तणाव आदी कारणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मुख्यता सावकारीपाशात अडकलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. यासाठी शेतकऱ्यांची कर्जे माफही केलीत. पण याचा लाभ उठविणारेही अनेक आहेत. बोगस कर्ज प्रकरणे करून सरकारची फसवणूक केली. सरकारच्या अशा योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांना होतच नाही. यासाठी शेतकरी जगविण्यासाठी योग्य नियोजन असायला हवे. 100 टक्के पारदर्शी योजना राबविणेही कठीण आहे. पण पर्यायही उभे करताना या अशी प्रकारांना रोखण्याची उपाययोजना ठेवायला हवी. यासाठी त्वरीत कारवाई हाच उपाय योग्य ठरू शकतो. प्रलंबित प्रश्‍नांमुळे कोणालाच फायदा होत नाही. गरजूंना योग्य वेळी मदत केली तरच फायदा होतो. अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचाच प्रकार होतो. यासाठी वेळेचे भान ठेवायला हवे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांनाच होतो का याचाही आढावा वारंवार घेणे गरजेचे आहे. शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देऊन सावकारी नष्ट करायला हवी. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्याला योग्य मार्गदर्शन करायला हवे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सांगून अशा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन देऊन त्याची खचलेली मानसिकता नष्ट करायला हवी. तणावमुक्ती हाच आत्महत्या रोखण्याचा मुख्य उपाय आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन वेळोवेळी कसे होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.



भावी काळात शेती टिकवायची असेल तर या प्रश्‍नावर हे करता येणे शक्‍य आहे.

- पाच वर्षात 100 टक्के बागायती क्षेत्र करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवायला हवे.

- पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक, तुषार सिंचनाची सक्ती करायला हवी. विशेषतः पाणी पुरवठा सोसायट्यामध्ये याची सक्ती करायला हवी. यामुळे सर्व शेतकऱ्यांना मुबलक व योग्य प्रमाणात पाणी मिळेल. यामुळे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल तसेच पाण्याचे समान वाटप होऊन जास्तीत जास्त क्षेत्र बागायती करता येऊ शकेल. अल्पभूधारक शेतकरीही ठिबक करू शकल्याने कमी क्षेत्रातही जास्तीत जास्त उत्पादन तो घेऊ शकेल.

- गटशेतीस प्रोत्साहन देऊन बाजारभावापेक्षा अधिक किंमतीत शेतमालाच्या खरेदीची हमी सरकारने द्यायला हवी.

- अनुदान, नुकसान भरपाई ऐवजी हमी भावाने शेतमाल खरेदीची हमी यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन शेतकऱ्यास प्रोत्साहन मिळेल.

- अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, कीडनाशकांचे वाटप करून त्याच्या शेतमालाची हमी भावाने खरेदी करायला हवी.

- नैसर्गिक आपत्तीच्या काळात (कीड, रोग) सरकारने एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करणारी पथके तयार करायला हवीत. ही पथके शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर करतीलच शिवाय या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करायला हवे याचेही प्रशिक्षण ते देतील. बेरोजगार कृषी पदवीधरांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

- घरातील फ्रिझ, एसी बंद झाल्यानंतर कंपनीची माणसे येऊन तो दुरुस्त करून देतात. तशी वार्षिक देखभाल ठेवणाऱ्या गटांची स्थापना करायला हवी. या गटास सरकारच्या वतीने प्रोत्साहन दिले जाईल पण त्यांचा पगार हा शेतकरी ठरवतील. शेताच्या नांगरटीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांची जबाबदारी या गटावर असेल. बागायतदार शेतकऱ्यांना या पथकांचा निश्‍चितच चांगला फायदा होऊ शकेल. इतकेच नव्हेतर हा गट प्रक्रिया उद्योगांची उभारणीस प्रोत्साहन देईल. आजही फणस, करवंदे आदी फळावर प्रक्रिया केली जात नाही. पश्‍चिम घाटात असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा उत्तम लाभ होऊ शकेल. फक्त .अशी कामे करणारी यंत्रणा उभी करायला हवी. बदलत्या शेती पद्धतीत असे नवे तंत्र अवलंबणे गरजेचे होणार आहे.



गेल्या पन्नास वर्षात शेतकऱ्यांकडील जमिनीचे बदललेली टक्केवारी

1960-61 1981-82 , 1991-92 2002-03

एक हेक्‍टर पेक्षा कमी क्षेत्र असणारे 39.1 45.8 56.0 62.8

एक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे 22.6 22.4 19.3 17.8

दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणारे 61.7 68.2 75.3 80.6

दोन ते चार हेक्‍टर असणारे 19.8 17.7 14.2 12.0

चार ते दहा हेक्‍टर असणारे 14.0 11.1 8.6 6.1

दहा हेक्‍टरच्या वर क्षेत्र असणारे 4.5 3.1 1.9 1.3









Friday, November 9, 2012

भात बीजोत्पादनातून होतोय अल्पभूधारक आर्थिक सक्षम

कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्‍यात तुकड्या-तुकड्यात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने बीजोत्पादनाचा पर्याय उपलब्ध केला. त्यांना या प्रकल्पातून सुधारित लागवड तंत्रज्ञान शिकवले. त्यातून पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादन वाढत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळत आहे.


राजेंद्र घोरपडे



कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुके भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. चंदगड, आजरा येथे उत्पादित होणाऱ्या भाताला वेगळीच चव असते. आजरा घनसाळ, काळी गजरी अशी इथल्या भाताची ओळख आहे. पारंपरिक जातींची उत्पादकता मात्र एकरी 15 ते 20 क्विंटल इतकी कमी आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता इतके कमी उत्पादन परवडत नाही. यासाठीच नवे प्रयोग करणे गरजेचे झाले आहे.



या भागातील शेती उताराची म्हणजे पायऱ्या-पायऱ्यांची आहे. त्यांचे तुकडे पडत आहेत. शेतकरी अधिकच अल्पभूधारक होत आहे. मालाला योग्य दर मिळाला तरच येथील शेतकरी शेतीत तग धरू शकणार आहे. त्यादृष्टीने बीजोत्पादन हा पर्याय चांगला वाटून येथील कृषी विभागाने बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने या भागात बीजोत्पादन प्रकल्प राबविला आहे.



...असा आहे बीजोत्पादन कार्यक्रम

आजरा, अरळगुंदी, आरदाळ, भादवण, बहिरेवाडी, चिमणे, देवर्डे, हत्तीवडे, कासार कांडगाव, किटवडे, महागोंदवाडी, मेंडोली, पोळगाव, साळगाव, सोहळे, उत्तूर, वडकशिवले, वझारे अशी अठरा गावे भात बीजोत्पादन प्रकल्पात समाविष्ट आहेत. या गावांतील 364 शेतकऱ्यांनी 234 हेक्‍टरवर आपला सहभाग नोंदवला आहे. इंद्रायणी, भोगावती, कर्जत - 5, फुले समृद्धी, रत्नागिरी 24, रत्नागिरी 1 आदी वाणांचा यात समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. सुरवातीला बीजोत्पादनासाठी शेतकरी उत्सुक नव्हते. मात्र त्याचे महत्त्व, त्याचा होणारा फायदा, तंत्रज्ञान समजावून दिल्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.



बीजोत्पादन आणि क्षेत्र

वर्ष बीजोत्पादन क्षेत्र

- 2010 100 हेक्‍टर

-2011 150 हेक्‍टर

- 2012 234 हेक्‍टर



भात शेतीमध्ये पडलेला फरक -

बीजोत्पादन प्रकल्पा आधी बीजोत्पादन प्रकल्पानंतर

1) पारंपरिक पद्धतीने लागवड 1) लागवडीच्या सुधारित पद्धतींचा वापर

2) पारंपरिक वाणांची निवड 2) सुधारित, अधिक उत्पादनक्षम जाती

3) अयोग्य अंतरावर रोपलावण 3) 10 x 15 इंच अंतरावर लावण

4) लावणीची पारंपरिक पद्धत 4) पट्टा, चार सूत्री पद्धतीने लावण

5) एका जागी 10 ते 15 रोपांची लावण 5) एका जागी दोन ते चार रोपांची लावण

6) एकरी 40 किलो बियाणे 6) एकरी 15 किलो बियाणे

7) अयोग्य अंतरावर लागवडीमुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव 7) कीड, रोगाचे प्रमाण तुलनेने कमी

8) एकरी उत्पादन 15 ते 25 क्विंटल 8) एकरी उत्पादन 35 ते 40 क्विंटल





बीजोत्पादन कसे ठरले फायदेशीर?

नदी काठी शेत असल्याने पावसाळ्यात शेतात दलदल असते. पूर्वी घनसाळ वाण घेत होतो. त्याची उंची जास्त आहे. पाणथळ जमिनीत हा भात लोळतो. बीजोत्पादन योजनेत इंद्रायणी वाण गेली दोन वर्षे घेत आहे. याची उंची कमी असल्याने लोळत नाही. या वाणात पोचट दाणे किंवा चिंबण्याचे प्रमाण कमी आहे. साहजिकच उत्पादनावर अनुकूल परिणाम होतो. इंद्रायणीचे एकरी 40 पोती उत्पादन झाले. पारंपरिक पद्धतीत उत्पादन 20 पोत्यांपर्यंत मिळायचे. गेल्या वर्षी इंद्रायणीला प्रति क्विंटल 1500 रुपये दर मिळाला. बाजारभावापेक्षा हा दर 20 टक्के अधिक आहे.

- पांडुरंग कृष्णा पाटील, साळगाव



बीजोत्पादन प्रकल्पाचा लाभार्थी होण्यापूर्वी घनसाळ, कर्जत वाण घ्यायचो. पारंपरिक आडमापी पद्धतीने लागवड होती. चिखल पेरणी करताना कोठेही आळे करून रोपे लावायचो. घनसाळला फुटवे कमी असल्याने 10 ते 15 रोपे एका आळ्यात लावण्यात येत होती. यामुळे बियाणेही जास्त लागायचे. लावणीसाठी मजुरीचा खर्च जास्त होता. आता बीजोत्पादनात इंद्रायणी वाण घेत आहे. याला फुटवे जास्त असल्याने दोन ते चार रोपे एका आळ्यात लावली तरी चालतात. चार सूत्री व पट्टा पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण मिळाले. यात बियाण्याची बचत होत आहे.

- पांडुरंग श्‍यामराव पाटील, साळगाव



पूर्वी पारंपरिक पद्धतीच्या घनसाळ लागवडीत एकरी 20 पोती उत्पादन मिळायचे. तीन- चार वर्षांपूर्वी क्विंटलला 900 ते 1000 रुपये दर मिळायचा. गेल्या दोन वर्षांत क्विंटलला 2500 रुपये दर तांदूळ महोत्सवामुळे मिळत आहे. यापुढे कायम इतका दर मिळेल याची शाश्‍वती नाही. बीजोत्पादनात बाजारभावापेक्षा 20 टक्के अधिक दर देण्याची हमी दिली आहे. यात मध्यस्थीचा प्रश्‍न नाही. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, दर पाडण्याचे कारस्थान आदी समस्या भेडसावत नाहीत. बीजोत्पादनात फुले-समृद्धी वाणाची निवड केली. सुधारित तंत्र वापरल्याने एकरी 40 पोती उत्पादन मिळाले. क्विंटलला 1500 रुपये दर मिळाला. पारंपरिक पद्धतीपेक्षा निश्‍चित 10 ते 12 हजार रुपये अधिक उत्पन्न मिळत आहे. दराची हमी असल्याने अनेक प्रश्‍न सुटले आहेत.

- जयसिंग श्‍यामराव नार्वेकर, पोळगाव



यंदा प्रथमच बीजोत्पादन योजनेचा लाभार्थी झालो. अर्ध्या एकरावर बीजोत्पादन आहे. इंद्रायणी वाण घेतला. वाढ जोमदार असून किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी आहे. बीजोत्पादनामध्ये भेसळ होऊ नये म्हणून विशेष काळजी घेताना अन्य भात वाणाच्या लागवडीपासून तीन ते चार फूट अंतर ठेवून लागवड करण्यास सांगितले आहे. मुळांत पश्‍चिम घाटमाथ्यावर शेताच्या तुलनेत बांधच मोठे असल्याने दोन वेगवेगळ्या जातीच्या शेतातील अंतर साहजिकच योग्य राखले जाते. यामुळे भेसळ होण्याचा धोका कमी असतो.

- पांडुरंग गोविंद नार्वेकर, पोळगाव



दहा एकर शेती आहे. त्यातील तीन एकरांवर भात घेतो. गेली दोन वर्षे इंद्रायणी, भोगावती, फुले समृद्धी या वाणांचे बीजोत्पादन घेत आहे. गेल्या वर्षी भोगावतीचे एकरी 25 ते 26 क्विंटल उत्पादन मिळाले. क्विंटलला 1465 रुपये दर मिळाला. पारंपरिक पद्धतीत एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन होते. दर एक हजार रुपयांच्या आसपास मिळायचा. व्यापारी दर पाडतात. काढणीनंतर लगेच विक्री करावी लागत असल्याने या काळात दरही मिळत नाही. साठवणूक करणे शक्‍य नसल्याने मिळेल त्या दरात भात विकावा लागतो. याच गोष्टीचा फायदा व्यापारी घेतात. वजनकाट्यात फसवणूक होते. बीजोत्पादनात ही फसवणूक होत नाही. बाजारभावापेक्षा अधिक दर तसेच हमी मिळत असल्याने निश्‍चित फायदा होत आहे.

- बाळू गोविंद मणगुतकर, गणेशवाडी



एक एकरावर भोगावती वाण बीजोत्पादनासाठी आहे. फुटवे चांगले म्हणजे प्रति रोप 25 ते 30 आहेत. त्यामुळे लावणीवेळी रोपे कमी लागतात. यामुळे खर्चात थोडी बचत होते. आता खतांचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्च एकरी 14 हजार रुपये येतो. खर्च वजा जाता 20 हजार रुपये उत्पन्न मिळते. पण हे फक्त बीजोत्पादनमध्ये शक्‍य झाले. नेहमीच्या भातशेतीत उत्पादन कमी व दराची हमी नसते. शासनाने बाजारभावाप्रमाणे भाताची खरेदी केली तर शेतकऱ्यांना निश्‍चितच फायदा होईल. व्यापारी, मध्यस्थ यांपासून होणारी फसवणूक थांबेल.

- मुकुंद लक्ष्मण तानवडे, देवर्डे



भात उत्पादकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने बीजोत्पादनाची योजना सुरू केली. शेतकऱ्यांना त्यातून चांगल्या गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध होईल. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

- एकनाथ माने, तालुका कृषी अधिकारी

संपर्क - 9421200167

Friday, November 2, 2012

मुळावर घाव



जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।

तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।



एखादी गोष्ट नष्ट करायची झाल्यास त्याच्या मुळावर घाव घालावा लागतो. वरवर नुसती पाने तोडून काहीच साधत नाही. मुळ जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत त्या झाडाची वाढ होतच राहणार. पालवी येतच राहणार. मुळ मरत नाही, तोपर्यंत त्यात जिवंतपणा राहणारच. तसेच दोषांचे आहे. दोष नष्ट करायचे असतील तर त्याच्या मुळाशी जायला हवे. तो दोष कसा उत्पन्न झाला, याचा विचार करायला हवा. याचे उत्तर मिळाले तरच तो दोष नष्ट करता येईल. काहींना सिगारेट, तंबाखूचे व्यसन असते. ते सोडायचे आहे. पण सुटत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ही सवय काही जातच नाही. पण सोडण्याची तीव्र इच्छा मात्र असते. असे का होते? हे व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी काय करायला हवे. तर या व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव त्याला व्हायला हवी. एकदा का त्याची जाणीव झाली की हळूहळू व्यसनापासून दूर जाण्याची मानसिकता तयार होऊ लागते. यातच या व्यसनाचा आर्थिक फटका कसा बसतो. याचा विचारही पटवून द्यायला हवा. अरेरे या व्यसनावर आपण दिवसाला इतके खर्च करतो. महिन्याभरात इतका खर्च यावर होतो. हे व्यसन सुटले तर आपले इतके पैसे वाचतील असे विचार याच कालावधीत त्या व्यक्तीच्या मनावर बिंबवायला हवेत. पण असे करूनही व्यसन सुटतेच असे नाही. कारण या व्यसनाचे मुळ अद्यापही जिवंत आहे. मुळात हे व्यसन कशामुळे लागले त्याचा शोध घेण्याची गरज आहे. धनसंपन्न असूनही अशी व्यसने असतात. मग पैसा हे कारण नाही. तर मानसिक शांती, समाधान हे त्यामागचे कारण आहे. मन शांत व नियंत्रणात ठेवता यायला हवे. मनातच व्यसन सोडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न व्हायला हवी. यासाठी तणावातून सुरू झालेले हे व्यसन सुटू शकेल. तणावमुक्ती हे व्यसनावरील उत्तम औषध आहे. तणावातून मुक्त होण्यासाठी अध्यात्माची कास धरायला हवी. मनावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय अध्यात्मात सांगितले आहेत. पण हे पुस्तकी ज्ञान आत्मसात करून मनावर नियंत्रण ठेवता येत नाही. यासाठी ज्ञानेश्‍वरीच्या पारायणासोबत साधना ही आवश्‍यक आहे. ज्ञानेश्‍वरी साधनाच करायला सांगते. मनावर विजयी होण्याचा तो उत्तम मार्ग आहे.

Monday, October 29, 2012

एकाग्रता मनाची



अर्जुना तुझे चित्त । जऱ्ही जाहले द्रवीभूत ।

तऱ्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ।।



रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग..सीमेवर लढणाऱ्या शिपायाची हीच अवस्था असते. सदैव त्यांना सतर्क राहावे लागते. कोठून गोळी येईल याचा नेम नाही. डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. डोळा जराही लागला तरी काहीही घडू शकते. सतर्कता ठेवावी लागते. जो झोपला, तो संपला. हे जसे सीमेवर पहारा देणाऱ्या शिपायाचे जीवन आहे तसे प्रत्येकाच्या जीवनातही अशी जागरूकता असावी लागते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागते. गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. मानसाच्या मनाला यामुळे उभारी मिळते. मन प्रसन्न राहते. सतर्क राहण्यासाठी प्रसन्न असणे गरजेचे आहे. मनाला जर गंज चढला तर तो उतरविणे महा कठिण असते. यासाठी मनाला गंज येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गंज येऊ नये यासाठी वस्तूला तेल, ग्रीस लावावे लागते. तसेच मनाचे आहे. मनाला गंज येऊ नये यासाठी मन चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवावे लागते. मनाला शांतता ही गरजेची आहे. ध्यानामध्ये मन रमले तर मनाला आनंद मिळतो. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकाग्रतेने मन विचलित होत नाही. मनाला या गोष्टीची सवय लागली तर मनाची प्रसन्नता कायम राहाते. सदैव मन आनंदी ठेवावे. राग, द्वेष, मत्सर, लोभ नसावा. मन प्रसन्न ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. दैनंदिन जीवनात असे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला तर प्रत्येकाचे जीवन आनंदाने फुलून जाईल. यासाठी तसे विचार आत्मसात करावे लागतील. विचाराने माणसात बदल घडतो. मनात प्रसन्नतेचा विचार घुसला तर बदल निश्‍चितच घडेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मन खचू देता कामा नये. ते प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहिले तर जीवनात सहज विजय संपादन करता येऊ शकतो. यासाठीच ध्यान धारणा आहेत.





Saturday, October 13, 2012

जन्म लावा सार्थकी

जन्म लावा सार्थकी



ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे ।

हे जन्ममरण तैसे । अनिवार जगीं ।।



जन्माला आल्यानंतर त्याला मरण हे आहेत. प्रत्येक सजिव वस्तूचा हा गुणधर्म आहे. वयोमानानुसार त्याची रुपेही बदलणार. ते बदलणे मानवाच्या हातात नाही. हे बाह्यगुण आहेत. सूर्य उगवताना सुंदर दिसतो. मनाला मोहून टाकणारा प्रकाश त्याच्यातून ओसंडून वाहत असतो. त्याच्या ह्या सौदर्यांने मन प्रसन्न होते. लहान मुलेही असेच मनाला आनंद देतात.ती हवीहवीशी वाटतात. त्यांच्यासोबत बागडताना मनाचा थकवा दूर होतो.पण जसजसा दिवस वर येऊ लागतो तसे त्याची धगही जाणवू लागते. उन्हाळ्यात सूर्याची धग असह्य होते. मानवाचेही तसेच आहे. जसेजसे त्याचे वय वाढेल तसे त्याचा प्रपंच वाढत राहातो. अनेक गोष्टीचा त्रास वाढतो. पण त्या सहन कराव्या लागतात. उन्हाची धगही आवश्‍यकच आहे. यामध्ये अनेक कीड, रोग नष्ट होतात. पण ही धग ठराविक मर्यादेतच हवी. तसेच मानवाचे आहे. मानवाच्या रागात अनेकांची मने दुखावली जातात. यासाठी रागाची धग किती असावी यालाही मर्यादा आहेत. यासाठी नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा. मन नेहमी आनंदी ठेवायला हवे. धग किती असावी याचे नियंत्रण आपल्या मनावर अवलंबून आहे.या धगीत दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी मृदुता असायला हवी. तरच आपण नेहमी आनंदी राहु शकू. मनाला तशी सवय लावून घ्यायला हवी. मनाला एकदा जर याची सवय झाली तर सारे जीवनच आनंदी होऊन जाईल. आपल्या वागण्याचा इतरावरही प्रभाव पडेल. असे वागणे नेहमीच फायद्याचे ठरू शकेल. मृत्यूनंतरही आपली आठवण इतरांच्या हद्‌ययात कायम राहील. झालेला जन्म यामुळे निश्‍चितच सार्थकी लागेल.



राजेंद्र घोरपडे

Monday, October 8, 2012

साखर कारखाने स्वयंपूर्ण व्हावेत


राज्यात 202 नोंदणीकृत साखर कारखाने आहेत. पण यामध्ये जवळपास 30 ते 40 टक्के सहकारी साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेले हे कारखाने बंद का ? याचा विचार होणार का? यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यामुळे शहराकडे वाढणारे लोंढे कमी होतील. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकडे सरकारने विचार करायला हवा.



40 टक्के कारखाने तोट्यात

उत्पादन सुरु असलेल्या साखर कारखान्यांची संख्या 2010 मध्ये 110 होती. पण यामधील 40 कारखाने हे तोट्यात होते. 2011 मध्ये 123 साखर कारखान्यात उत्पादन करण्यात आले. तेव्हा यातील 48 साखर कारखाने हे तोट्यात होते. सुरु कारखान्यामध्ये जवळपास 40 टक्के साखर कारखाने हे तोट्यातच असतील तर साखर उद्योगात राज्य भरभाराटीत आहे असे कसे म्हणता येईल. हा उद्योग भावी काळात टिकवायचा असेल तर यावर ठोस उपाय योजने गरेजेचे आहे असे सरकारला वाटत नाही का?



घटीचा आढावा घ्यावा

गेल्या 50 वर्षांचा आढावा घेतल्यास उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात आठ पटीने वाढ झाली आहे. त्याच प्रमाणात वाढ उसाच्या उत्पादनात झाली आहे. क्षेत्राच्या प्रमाणात उत्पादन वाढ बरोबर दिसून येत असली तरी सुधारित जातींचा वापर वाढून झालेली उत्पादन वाढ कोठेच दिसत नाही. मग क्षेत्र वाढले पण उत्पादन घटले असेच चित्र उभे राहाते. एकरी उत्पादकता कमी झाली आहे का? याचा विचार व्हायला नको का? उसाच्या वारंवार लागवडीमुळे जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम झालेले आहेत का? याचा आढावा घ्यायला नको का? जर घेतला असेल तर यावर कोणते उपाय योजले आहेत? मग आकडेवारीत फरक का दिसत नाही? याचा विचार व्हायला हवा.





गेल्या पन्नास वर्षातील उसाच्या लागवडीची आकडेवारी ः

ऊस तोडणी क्षेत्र ऊसाचे उत्पादन

( हजार हेक्‍टरमध्ये ) ( हजार टनात)



1960-61 155 10,404

1970-71 167 14,433

1980-81 258 23,706

1990-91 442 38,154

2000-01 595 49,569

2009-10 756 64,159

2010-11 965 85,691

2011-12 1,022 85,635





घाटमाथ्यावर उत्पादकता वाढीची गरज



पश्‍चिम घाटमाथ्यावरील 80 टक्के शेतकऱ्यांचे उसाचे एकरी उत्पादन 25 ते 35 टन इतकेच आहे. इतक्‍या कमी उत्पादनात शेतकरी परवड नसुनही ऊस शेती करत आहे. याची कारणेही अनेक आहेत. काही झाले तरी उसाला ठराविक दर निश्‍चित मिळतो. तसा दर भाजीपाला किंवा इतर शेतमालाला मिळतोच असे नाही. भाजीपाल्यास चांगला दर मिळाला तर ठिक नाहीतर काहीवेळा भाजी फुकट वाटूनही कोणी घ्यायला तयार होत नाही. रस्तावर फेकून देण्याची किंवा जनावरांना चारा म्हणून वापरण्याचीही वेळ येते. शेतमाल हा नाशवंत आहे. ठराविक कालावधीत त्याची विक्री होणे गरजेचे असते. नेमके ही गरज व्यापारी ओळखून शेतकऱ्याची फसवणूक करतात. यावर पर्याय म्हणून शेतकरी ऊस शेतीकडे पाहातो. पाण्याची गरज उसाला किती आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवे. कृषी विभागाने उपलब्ध योजनांचा लाभ शेतकऱ्याला करून द्यायला हवा. पश्‍चिम घाटमाथ्यावरील उसाचे वाढते क्षेत्र विचारात घेता या उसाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामुळे निश्‍चितच फायदा होईल.



उसाला हवा योग्य दर



साखरेचा भाव तीस ते चाळीस रुपये किलोवरही गेला तरी उसाला कधीही त्या प्रमाणात दर मिळाला नाही. मग महागलेल्या साखरेचा नेमका फायदा होतो कोणाला? दलाली, मध्यस्थी, आदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी लुट थांबविण्यासाठी सहकार क्षेत्र उभे राहीले, मग हे सहकारी साखर कारखाने साखरेला मिळणाऱ्या दराच्या प्रमाणात ऊसाला दर का देऊ शकत नाहीत. यामागील कारणे शोधण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्याला दोन हजार ते अडीच हजारच्यावर कधीही उसाला दर मिळाला नाही. महागाई मात्र वाढतच राहीली. खताचे दर, कीडनाशकांचे दर, आदी कृषी निविष्ठांचे दर वाढतच आहेत. शेतमजूरीही वाढतच चालली आहे. साहजिकच ऊसाच्या उत्पादन खर्चात दुपट्टीने वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या महागाईचा विचार करुन साखर कारखान्यांनी कधीही उसाची दर वाढ दिली नाही. पण आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे.



इथेनॉलला दर मिळावा



साखर कारखान्यांनी उद्योगवाढीसाठी उपउत्पादनावर भर देण्याची गरज आहे. राज्यातील चालु कारखाने विचारात घेता केवळ 50 टक्केच कारखाने साखरे व्यतिरिक्त इतर उत्पादने घेतात. राज्यात आजच्या घडीला 65 साखर कारखान्यामध्ये आसवानी प्रकल्प आहे. पण इथेनॉलचे उत्पादन घेऊनही त्याला योग्य दर मिळत नसल्याने कारखान्यांना म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. यासाठी कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साखरेसह इतर उत्पादनांनाही योग्य दर मिळावा यावर शासनाने भर द्यायला हवा. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर योजले जाणारे पर्याय विचारात घ्यायला हवेत.



सहवीजनिर्मितीवर भर द्यावा



कारखान्यांनी त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करायला हवा. यासाठी विविध पर्यायांचा विचार करायला हवा. सहवीज निर्मितीवर यासाठीच भर द्यायला हवा. 2010 मध्ये राज्यात 27 कारखान्यात सहवीजनिर्मिती केली जात होती. यातून 349 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. 2011 मध्ये 32 कारखान्यातील सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 425 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली. सर्वच कारखान्यांनी सहवीजनिर्मिती करून कारखाना स्वयंपूर्ण केल्यास साखर उद्योग निश्‍चितच भरभराटीला लागेल. याचा फायदा शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर देण्यात होईल.



राज्यातील साखर उत्पादन

(लाख मेट्रीक टनात)

वर्ष साखर उत्पादन

2010 71.69

2011 90.72

Saturday, October 6, 2012

योग्य तेच स्वीकारा

योग्य तेच स्वीकारा




या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।

तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।।



चांगल्या गोष्टी निवडण्याची सवय हवी. यामुळे सकारात्मक विचारसरणी होते. मनाला नकाराची सवय लागली तर विचारसरणीही नकारात्मक होते. हे नको, ते नको. असे करता करता काहीच करायला नको. असा मत प्रवाह होतो. नेहमी नाकारत राहीले तर इतरही तुम्हाला नाकारतात हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच विचार सकारात्मक असायला हवेत. यामुळे मन आशावादी राहाते. उत्साही राहाते. नकारात्मक विचाराने मन खिन्न, दुःखी होते. निराशवादी बनते. यातूनच मग आत्महत्या घडतात. नव्या पिढीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक वाद, नैराश्‍य, कर्जबाजारीपणा, अपयश ही यामागची कारणे सांगितली जातात. पण आत्महत्या हा जीवनाचा शेवटचा पर्याय नाही. संघर्षमय जीवनाची अखेर आत्महत्येत असू नये. धीर सुटता कामा नये. वाळुचे कणही रगडता तेल गळे तसे सतत संघर्ष करत राहीले तर निश्‍चितच त्यात यश मिळते. यासाठी सतत सकारात्मक विचार करत राहायला हवे. आज हे साध्य झाले नाही. पण उद्या ते मी हस्तगत करेण अशी आशा बाळगायला हवी. पण यासाठी निवडलेला मार्ग हा सत्याचा असेल. हे ही विसरता कामा नये. उद्दिष्ठ साध्य होत नाही म्हणून अनैतिक मार्ग स्वीकारणे योग्य नाही. अयोग्य मार्ग कधीही योग्य होऊ शकत नाही. त्याची सवय लागते. आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे असे म्हटले जात आहे. पण तो मार्ग शेवटी अयोग्यच आहे. एकदा का त्यात सापडला तर सर्व जीवन निरर्थक होते. यासाठीच मार्ग निवडतानाच योग्य ती काळजी घ्यायला हवी. चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात. पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत. खरा मार्ग कोणता आहे. याचा विचार करायला हवा. खरे संत माणसामध्ये दडलेले चैतन्य स्वीकारतात. त्यालाच परमेश्‍वर मानतात. त्याचाच ध्यास करतात. काशी, मथुरेची वारी करुनही जे हस्तगत होत नाही ते एका जागी शांत बसून ध्यान करण्याने मिळते. प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करण्याऐवजी मनाने केलेला नमस्कार देवाजवळ लगेच पोहोचतो. यासाठी मनामध्ये तो भाव असायला हवा.



राजेंद्र घोरपडे

Wednesday, October 3, 2012

सत्याची कास

सत्याची कास




तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न सांडिसी ।

तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ।।



व्यक्तिमत्व कसे असावे? व्यक्तिमत्व विकासासाठी काहीजण शिक्षण घेतात. आजकाल त्याची गरज झाली आहे. लोकांशी कसे बोलावे? कसे वागावे? समोरच्या व्यक्तिवर प्रभाव कसा पाडावा? यासाठी शिक्षण दिले जाते. व्यवसायात प्रगती करायची असेल तर हे सर्व गरजेचे आहे. सर्वच गुण अंगभूत असतात असे नाही. काही गोष्टी ह्या शिकाव्याच लागतात. सर्वांना या गोष्टी जमतात असे नाही. पूर्वीचे ग्रंथ पाहिले तर यामध्ये हेच शिकवले गेले आहे. मनाचे श्‍लोक काय सांगतात? आपणास काय शिकवतात? याचा विचार करायला नको का? मन स्थिर कसे ठेवावे? मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हेच तर सांगतात ना. व्यक्तिमत्व विकासात याची गरज वाटत नाही का? चांगले शिक्षण, संस्कारच यातून शिकवले जातात ना. मग आजकाल हे श्‍लोक ऐकायला कोठेच मिळत नाहीत? असे का? गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात. याचा विचार करायला नको का? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का? गणेश उत्सवात, नवरात्र या सणांमध्ये असे श्‍लोक शिकवले गेले तर व्यक्तिमत्व विकास होणार नाही का? असे वाटत नाही का? मग या गोष्टींचा विचार ज्येष्ठांनी तसेच तरूणपिढीने करायला नको का? योग्य ते संस्कार करण्यासाठी असे सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. हे विचारात घ्यायला हवे. पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगलवादी भारतीय संस्कृती नाही हे लक्षात घ्यायला हवे. पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत. याचा विचार व्हायला हवा. जग कितीही बदलले तरी सत्य बदलत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. या सत्याची कास धरायला शिकले पाहिजे. तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.



राजेंद्र घोरपडे

Saturday, September 29, 2012

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ

सेंद्रिय शेती आणि प्रक्रियेतून देसाईंनी शोधली बाजारपेठ
कृषी रसायने, रासायनिक खते यांच्या अति वापरामुळे शेती, पर्यावरण, मानवी तसेच जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प तेरणी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील अरुण देसाई यांनी घेतला. आज सेंद्रिय उत्पादकांचा गट तयार करून ते विविध सेंद्रिय माल पिकवतात. मालावर प्रक्रिया करून त्याला आश्‍वासक बाजारपेठही मिळविण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
राजेंद्र घोरपडे
तेरणी येथील अरुण देसाई यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची कास धरली. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर ते पूर्वी करायचे. द्राक्षाचेही काही काळ उत्पादन घेतले. द्राक्षात अनेक फवारण्या कराव्या लागायच्या. दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे येथील निसर्गशेती विज्ञान शिबिरात भाग घेतला. शेती, पर्यावरण आणि मानव या सर्वांच्या आरोग्याचे हित याबाबत ते गंभीर झाले. त्यानुसार त्यांनी 1991 च्या सुमारास सेंद्रिय शेतीची कास धरली. प्रयोग परिवारचे संस्थापक श्री. अ. दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोग सुरू केले. गांडूळ शेती सुरू केली. आजऱ्याचे मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन घेतले. एका चौरस फुटामध्ये पडणारा सर्व सूर्यप्रकाश पकडण्याचे दाभोळकरांचा सिद्धांतही त्यांनी उपयोगात आणायला सुरवात केली. सेंद्रिय पदार्थांचे जमिनीत पुनर्भरण करीत राहणे आणि जैविक घटकांचा वापर यावर त्यांचा भर आहे. शेतातीलच उपयोगी जैविक घटक वाढविण्यावरच त्यांचा अधिक भर आहे. या पद्धतीने हळद, ऊस, सोयाबीन, भाजीपाला, आंबा, तूर आदी विविध पिके ते घेतात. हळदीबाबत प्रातिनिधिक बोलायचे तर लागवडीपूर्वी शेतात एकरी 10 गाड्या शेणखत मिसळतात. हळदीच्या शेतात हिरवळीच्या खताचे, म्हणजे तागाचे बियाणेही पेरले जाते. पुढे ताग कापून तिथेच गाडला जातो. तेरणी परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. अशावेळी तागाचा अन्नद्रव्ये मिळविण्याबरोबर मल्चिंग म्हणूनही उपयोग होतो. मल्चिंगमुळे जमिनीत उबदारपणा राहातो. यंदा हळदीच्या सेलम जातीची लागवड आहे. काढणी फेब्रुवारीमध्ये होईल. देसाई यांनी आपल्या सेंद्रिय शेती प्रयोगात तेरणीतीलच आपल्या सुमारे दहा नातेवाईक सदस्यांनाही सामावून घेतले आहे. या सर्वांच्या मिळून एकूण 55 एकर शेतीवर विविध पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली जातात. प्रत्येकाचे किमान एक ते कमाल तीन हेक्‍टर क्षेत्र आहे.
हळदीचे एकरी 12-15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उसाचे एकरी 40 टन, सोयाबीनचे 10 क्विंटलपर्यंत, भाताचे सुमारे 22 क्विंटल असे उत्पादन सरासरी होते.
सेंद्रिय शेती प्रशिक्षणात सहभाग
एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेतर्फे (एनकॉन) 2001 मध्ये औरंगाबाद येथे सेंद्रिय शेती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण झाले. यात भाग घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेने 18 हजार रुपयांची मदत त्यांना केली. सेंद्रिय शेतीची उत्पादने, प्रक्रिया आणि विपणन यावर त्या वेळी झालेल्या मार्गदर्शनाचा देसाई यांनी फायदा करून घेतला.
शेतीमालावर प्रक्रिया करून विक्री
उत्पादन खर्च आणि अपेक्षित नफा यावर आधारित दराने विक्री केल्यास फायदा निश्‍चितच मिळतो. हे लक्षात घेऊन शेतीमालाची मूल्यवृद्धी करण्यावर देसाई यांनी भर दिला आहे. त्यांचे सुधारित पद्धतीचे गुऱ्हाळघर आहे. सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गूळ तयार करताना दाणेदार गूळ, त्याच्या ग्रेड्‌स, पावडर, पॅकबंद काकवी आदी उत्पादने देसाई तयार करतात. सेंद्रिय आजरा घनसाळ, काळी गझेली या सुवासिक भाताच्या जातींचे योग्य पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते.
कृषी विभागाचे सहकार्य
देसाई यांनी आपल्या एकूण शेतीचे सामूहिक पद्धतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 27 हजार रुपये खर्च येतो. मात्र कृषी विभागाचे यासाठी अनुदान आहे. प्रमाणीकरणासाठी तत्कालीन कृषी उपसंचालक मधुकर घाग, तालुका कृषी अधिकारी बेंदगुडे यांनी सहकार्य केले. तालुका कृषी अधिकारी श्री. डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांचे सहकार्य देसाई यांना लाभले आहे.
सेंद्रिय उत्पादनांसाठी बाजारपेठ
-
सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी गडहिंग्लज येथील तत्कालीन सहायक निबंधक विजयराव देसाई यांनी अरुण देसाई यांना सहकारी संस्था काढण्याची कल्पना सुचविली. त्याप्रमाणे संस्था स्थापन करून आपल्या गटातील सर्व शेतकरी सदस्यांचा शेतीमाल वा प्रक्रियायुक्त उत्पादनांची विक्री या संस्थेद्वारे होते. सेंद्रिय प्रमाणित उत्पादनांना बाजारपेठ शोधणे, त्यात सातत्य ठेवणे, दर चांगला मिळणे हे आव्हानात्मक काम आहे. देसाई आपल्यापरीने त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पुणे, मुंबई, बंगळूर, गोवा, वर्धा आदी ठिकाणाहून त्यांनी खरेदीदार शोधले आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड, मंडई, कोथरूड, कॅम्प येथेही त्यांचे व्यावसायिक ग्राहक आहेत. मुंबईतील जसलोक रुग्णालयाशेजारील हेल्थ शॉप, एका महिला व्यावसायिकेचे संडे मार्केट, पॉंडिचेरी येथेही त्यांचा सेंद्रिय माल विकला जातो. आजरा घनसाळ भात किलोला 50 ते 60 रुपये दराने त्यांनी विकला आहे.
हळदीची औषधी कॅप्सुल्स
हळद पावडरही तयार केली जाते. ती किलोला 200 ते 300 रुपये दराने विकली जाते. बाजारात औषधी कंपन्यांनी हळदीची कॅप्सुल्स उपलब्ध केली आहेत. या धर्तीवर औषध कंपन्यांच्या सहकार्याने अशी कॅप्सुल्स तयार करण्याचे देसाई यांचे प्रयत्न आहेत.
अवजारांत सुधारणा
देसाई अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असल्याने अवजारात सुधारणा करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. सुधारित पद्धतीचे कोळपे त्यांनी तयार केले आहे. एका बैलाच्या मदतीने सहज नांगर ओढता यावा यासाठी त्यात सुधारणा केली आहे. उसामध्ये भरणीवेळी निंबोळी पेंड, एरंड, करंजी पेंड देताना ते हा नांगर वापरतात. देसाई यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, कृषी विभाग, ग्रामपरिवर्तन, पुणे यांचे सन्मानपत्र, शाहू किसानशक्ती, आदर्श कृषी भूषण असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
संपर्क - अरुण देसाई, 9423987202
सेंद्रिय मालाला परदेशात मागणी आहे. काही खरेदीदार परदेशातही तो पाठवतात. सरकारने तशी संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. परदेशात प्रदर्शन, महोत्सवांचे आयोजन करून बाजारपेठा उपलब्ध होण्याची गरज आहे. त्यातून सेंद्रिय मालाला निश्‍चितच चांगला दर उपलब्ध होईल
अरुण देसाई

Monday, September 3, 2012

दुष्काळी पट्ट्यातील शेतात गरज सेंद्रिय कर्ब वाढविण्याची

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे काही अनुभव अनुकरणीय आहेत. ते म्हणतात, की गेल्या काही वर्षांत अनियमित पावसामुळे शेतीत अनेक समस्या उद्‌भवत आहेत. हवामानाच्या या बदलत्या चक्रात शेतीत बदल गरजेचा झाला आहे. यापुढे पीक नियोजन करताना शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन हा विषय प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे आहे. यंदा तर दुष्काळाने देशातील अनेक भाग होरपळत आहेत. अशा परिस्थितीत पिके वाचविणे जिकिरीचे झाले आहे. जमिनीची जलसंधारण क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतकरी कोळपणी करून जमिनीवरील भेगा बुजवतात. जमिनीचा वरचा थर भुसभुशीत ठेवतात. यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून बऱ्याच कालावधीपर्यंत जमिनीत ओलावा राहातो. पण हे उपाय अपुरे पडत आहेत. यावर ठोस उपाय योजण्यासाठी शेततळी, छोटे छोटे जलसिंचन प्रकल्प उभे राहिले. पण पावसानेच दडी मारल्याने आता नवे पर्याय शेतकऱ्यांना शोधणे गरजेचे झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारा ओलावा जमिनीत टिकविला पाहिजे. यंदा राज्यातील काही शेतकऱ्यांनी यावर प्रयोग केले आहेत. विदर्भातील राजेश पाटील यांनी कापसाच्या पिकात योग्य व्यवस्थापनातून ओलावा टिकविला आहे. एक पट्टा पिकांचा आणि एक पट्टा तणांचा घेऊन या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही चांगल्या प्रकारे पीक जगवण्याचा प्रयत्न केला आहे. एका पट्ट्यात तणे वाढवायची, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ती जमिनीलगत कापायची. तणांचे मल्चिंग केल्याने भूपृष्ठावर ओलावा टिकवून ठेवला जातो. तणांच्या मुळ्या जमिनीत राहिल्याने जमीन भुसभुशीत राहाते. पुढे तण कुजल्याने त्याचे खत तयार होते. पिकाला त्याचा फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्यातही गाडेगोंडवाडी, हासूर दुमाला, वरणगे-पाडळी, वाघापूर येथील शेतकरी हा प्रयोग करीत आहेत. शेतात तणे नकोत असा एक मतप्रवाह आहे. पण तण हेच धन आहे यासाठी तणे वाढवा असा उलटा मत प्रवाह शेतकऱ्यांना रुचत नाही. सर्वसामान्य शेतकरी ठिबक, तुषार आदी आधुनिक तंत्राने शेती करू शकतोच असे नाही. इतका खर्च करणे त्याला परवडत नाही. लहान क्षेत्र असल्याने मोठ्या उपाययोजनाही त्याला फायद्याच्या ठरत नाहीत. खर्चिक मार्गाऐवजी सोपे, स्वस्त, सहज अवलंबता येणारे उपायच फायदेशीर ठरतात. यासाठीच सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तण काही मर्यादेत वाढवायचे व ते कुजवायचे हा प्रयोग करायला हवा. अल्पभूधारकांसाठी कमी खर्चात, कमी पाण्यावर अशा प्रकारे पिके जगवून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणे सहज शक्‍य आहे. पावसाने ओढ दिल्याच्या काळात जमिनीत ओलावा टिकविण्याची गरज असते. यासाठीच जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवत ठेवण्याचे उद्दिष्ट हवे. खतासाठी तणांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. विदर्भातील काही शेतकरी मिश्र पिके घेतात. तूर- सोयाबीन, कापूस-सोयाबीन, कापूस-तूर, तूर- मूग किंवा उडीद अशी ही शेती असते. मिश्रपीक पद्धतीमुळे मुख्य पिकास पाण्याचा ताण सहन करावा लागतो. काही वेळेला मुख्य पिके वाया जाण्याचाही धोका असतो. यासाठी मिश्रपीक घेण्याऐवजी मुख्य पिकामध्ये तणांचा पट्टा वाढविण्याचे प्रयोग सुरू आहेत. ही तणे फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्यांचा वापर मल्चिंगसाठी हिरवळीच्या खतांबरोबर करता येतो. त्यातून पाण्याची बचत केली जाते. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांतही असे प्रयोग काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये बागांमधील आंतरमशागत बंद केली आहे. तणे वाढवायची व फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच ब्रश कटरने जमिनीलगत कापून त्याचे आच्छादन केले जाते. तणांच्या मुळांना धक्का द्यायचा नाही. यामुळे बागांमध्ये आंतरमशागतीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चातही बचत होते व पिकास सेंद्रिय खतही उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. यासाठी शेतातील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणाऱ्या भागात असे प्रयोग होणे गरजेचे आहे. संपर्क - प्रताप चिपळूणकर, 8275450088 (शब्दांकन - राजेंद्र घोरपडे)

दुष्काळी पट्ट्यातील शेतात गरज सेंद्रिय कर्ब वाढविण्याची

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे काही अनुभव अनुकरणीय आहेत. ते म्हणतात, की गेल्या काही वर्षांत अनियमित पावसामुळे शेतीत अनेक समस्या उद्‌भवत आहेत. हवामानाच्या या बदलत्या चक्रात शेतीत बदल गरजेचा झाला आहे. यापुढे पीक नियोजन करताना शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन हा विषय प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे आहे. यंदा तर दुष्काळाने देशातील अनेक भाग होरपळत आहेत. अशा परिस्थितीत पिके वाचविणे जिकिरीचे झाले आहे. जमिनीची जलसंधारण क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतकरी कोळपणी करून जमिनीवरील भेगा बुजवतात. जमिनीचा वरचा थर भुसभुशीत ठेवतात. यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून बऱ्याच कालावधीपर्यंत जमिनीत ओलावा राहातो. पण हे उपाय अपुरे पडत आहेत. यावर ठोस उपाय योजण्यासाठी शेततळी, छोटे छोटे जलसिंचन प्रकल्प उभे राहिले. पण पावसानेच दडी मारल्याने आता नवे पर्याय शेतकऱ्यांना शोधणे गरजेचे झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारा ओलावा जमिनीत टिकविला पाहिजे. यंदा राज्यातील काही शेतकऱ्यांनी यावर प्रयोग केले आहेत. विदर्भातील राजेश पाटील यांनी कापसाच्या पिकात योग्य व्यवस्थापनातून ओलावा टिकविला आहे. एक पट्टा पिकांचा आणि एक पट्टा तणांचा घेऊन या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीतही चांगल्या प्रकारे पीक जगवण्याचा प्रयत्न केला आहे. एका पट्ट्यात तणे वाढवायची, फुलोऱ्यावर येण्यापूर्वी ती जमिनीलगत कापायची. तणांचे मल्चिंग केल्याने भूपृष्ठावर ओलावा टिकवून ठेवला जातो. तणांच्या मुळ्या जमिनीत राहिल्याने जमीन भुसभुशीत राहाते. पुढे तण कुजल्याने त्याचे खत तयार होते. पिकाला त्याचा फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्यातही गाडेगोंडवाडी, हासूर दुमाला, वरणगे-पाडळी, वाघापूर येथील शेतकरी हा प्रयोग करीत आहेत. शेतात तणे नकोत असा एक मतप्रवाह आहे. पण तण हेच धन आहे यासाठी तणे वाढवा असा उलटा मत प्रवाह शेतकऱ्यांना रुचत नाही. सर्वसामान्य शेतकरी ठिबक, तुषार आदी आधुनिक तंत्राने शेती करू शकतोच असे नाही. इतका खर्च करणे त्याला परवडत नाही. लहान क्षेत्र असल्याने मोठ्या उपाययोजनाही त्याला फायद्याच्या ठरत नाहीत. खर्चिक मार्गाऐवजी सोपे, स्वस्त, सहज अवलंबता येणारे उपायच फायदेशीर ठरतात. यासाठीच सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तण काही मर्यादेत वाढवायचे व ते कुजवायचे हा प्रयोग करायला हवा. अल्पभूधारकांसाठी कमी खर्चात, कमी पाण्यावर अशा प्रकारे पिके जगवून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करणे सहज शक्‍य आहे. पावसाने ओढ दिल्याच्या काळात जमिनीत ओलावा टिकविण्याची गरज असते. यासाठीच जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवत ठेवण्याचे उद्दिष्ट हवे. खतासाठी तणांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. विदर्भातील काही शेतकरी मिश्र पिके घेतात. तूर- सोयाबीन, कापूस-सोयाबीन, कापूस-तूर, तूर- मूग किंवा उडीद अशी ही शेती असते. मिश्रपीक पद्धतीमुळे मुख्य पिकास पाण्याचा ताण सहन करावा लागतो. काही वेळेला मुख्य पिके वाया जाण्याचाही धोका असतो. यासाठी मिश्रपीक घेण्याऐवजी मुख्य पिकामध्ये तणांचा पट्टा वाढविण्याचे प्रयोग सुरू आहेत. ही तणे फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्यांचा वापर मल्चिंगसाठी हिरवळीच्या खतांबरोबर करता येतो. त्यातून पाण्याची बचत केली जाते. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांतही असे प्रयोग काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये बागांमधील आंतरमशागत बंद केली आहे. तणे वाढवायची व फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच ब्रश कटरने जमिनीलगत कापून त्याचे आच्छादन केले जाते. तणांच्या मुळांना धक्का द्यायचा नाही. यामुळे बागांमध्ये आंतरमशागतीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चातही बचत होते व पिकास सेंद्रिय खतही उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. यासाठी शेतातील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतीसाठी पाण्याची कमतरता भासणाऱ्या भागात असे प्रयोग होणे गरजेचे आहे. संपर्क - प्रताप चिपळूणकर, 8275450088 (शब्दांकन - राजेंद्र घोरपडे)

Tuesday, July 24, 2012

ऊसरोपवाटिका व्यवसायातून उघडले उत्पन्नवाढीचे दरवाजे

दर्जेदार ऊस उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून पूरक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांनी शोधलीच, शिवाय रोपांचा उपयोग करणाऱ्या ग्राहक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळू लागला आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्यात चिंचवाड (ता. करवीर) येथील संदीप पाटील यांचे दोन एकर शेत पंचगंगा नदीच्या पूरक्षेत्रात आहे. दरवर्षी उसाचे शेत पुरात बुडते. सन 1995 मध्ये पुराचे पाणी जास्त दिवस राहून संपूर्ण ऊस कुजला. पुन्हा लावण करण्याची वेळ आली. पूर ओसरल्यानंतर किंवा भात पिकानंतर रोपवाटिकेद्वारे रोपांची लावण करायची, असे निवृत्त प्राध्यापक डॉ. के. एम. पोळ यांनी सुचविले. त्यानुसार संदीप प्लास्टिकच्या पिशवीत रोपे तयार करून लावण करू लागले. उगवण चांगली होत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरीही रोपांची मागणी करू लागले. उगवण न झालेल्या रिकाम्या जागी रोप लावण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यातूनच संदीप यांच्या रोपवाटिका व्यवसायाचा जन्म झाला. त्यांना वडील शांतिनाथ व ज्येष्ठ बंधू सचिन पाटील यांचीही मदत होते.
भाड्याच्या जागेत रोपवाटिका -
रोपांची मागणी वाढू लागल्याने रोपवाटिकेसाठी क्षेत्र कमी पडू लागले. यासाठी महिन्याला 1500 रुपये भाड्याने दीड एकर क्षेत्र घेतले. गेली सहा वर्षे याच जागेत ते रोपवाटिका करतात. सुमारे 13 महिला कामगार त्यांच्याकडे आहेत. वर्षाला पाच लाख रोपे तयार करतात. दोन ते अडीच रुपये प्रति रोप अशी विक्री होते. त्यातून सुमारे दहा लाख रुपये मिळतात. रोपवाटिकेचा साडेआठ लाख रुपये खर्च वजा जाता दोन - अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
बियाणे प्लॉट नियोजन -
फुले 265, को 86032, 99010, 99004 या जातींची रोपे संदीप तयार करतात. बियाणे कृषी विभागाकडून खरेदी करतात. पंधरा गुंठ्यांत चार प्लॉट करून त्यात ठराविक दिवसांच्या अंतराने कांड्यांची लागवड केली जाते. एकावेळी सुमारे तीन टन उसाची तोड होते. त्यापासून 12 ते 15 हजार रोपे आठवड्यात तयार केली जातात. प्लास्टिकच्या पिशवीत गाळाची माती, गांडूळ खत, जिवाणू खते (पीएसबी, ऍझोटोबॅक्‍टर) आदींचे मिश्रण भरून त्यात एक डोळा पद्धतीने लावण होते. कृषी विभागाने अधिकृत जाहीर केलेली जिवाणू खतेच ते वापरतात. एका वर्षी अनधिकृत जिवाणू खते वापरल्याने दीड लाख रोपे खराब झाली होती. सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. रोपांच्या उगवणीसाठी कोकोपीट वापरल्यास 35 दिवसांच्या आत लावण करावी लागते, अन्यथा ती पिवळी पडतात, वाढीची ताकद कमी होते. यासाठीच गाळाच्या मातीत प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करतात.
रोपवाटिका खर्च - (अंदाजे)
रोपवाटिकेच्या अर्धा एकर क्षेत्राचे भाडे (महिन्याला 1500 रु.) - अठरा हजार
माती, शेणखत (60 ते 70 गाडी) - 850 रुपये प्रति गाडी - 50 हजार
सव्वा टन प्लास्टिक पिशवी (100 रुपये किलोप्रमाणे) - 1 लाख 20 हजार
वर्षाला 70 टन बियाणे (तीन हजार रुपये टनाप्रमाणे) - दोन लाख दहा हजार
वीज, पाण्यासाठी वार्षिक - 30 हजार
मजूर (वार्षिक) - चार लाख
जिवाणू खते, अन्य निविष्ठा - दहा हजार
एकूण खर्च - साडेआठ लाख रुपये
रोपांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न - दहा ते बारा लाख रु.
रोपांना इतर जिल्ह्यांतूनही मागणी
गेली दहा वर्षे रोपवाटिका व्यवसायात आहेत. पुणे, वैभववाडी, जत, जिल्ह्यातील राधानगरी, करवीर तालुक्‍यातील शेतकरी नोंदणीद्वारे रोपे नेतात. तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी सल्लागार ए. आर. पाटील आदींचे मोलाचे सहकार्य संदीप यांना लाभले आहे.
संदीप पाटील - 9271700909
माळ्याची नोकरी सोडून उभारली रोपवाटिका
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील कृषी विद्यालयात सत्यजित शिंदे माळी म्हणून सात वर्षे कार्यरत होते. नोकरीत कायम न केल्याने मनात रुखरुख होती. अखेर नोकरी सोडून तळसंदे येथे स्वतःच्या शेतीत 2009 मध्ये रोपवाटिका सुरू केली. वडील सुरेंद्र धोंडिराम शिंदे माजी सैनिक होते, त्यांनी रोपवाटिकेसाठी अर्थसाहाय्य केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडून को 86032 जातीचे बियाणे आणले. सुरवातीला दहा हजार रोपे तयार केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात चांगल्या प्रतीची रोपे तयार करून विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते दरवर्षी बेणे खरेदी करतात. पहिल्या वर्षीच्या बियाण्यापासून रोपे तयार केल्यास त्यांची वाढ उत्तम होत नाही, वजन कमी भरते. यामुळेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीचे बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरतात.
रोपांसाठीचे व्यवस्थापन
दिवसाला दोन हजार, तर महिन्याला सुमारे 30 हजार रोपेनिर्मितीचे उद्दिष्ट असते. दरवर्षी एक ते दीड लाख रोपे तयार करतात. को 86032, फुले 265 आदी जातींच्या बेण्यांची 20-20 गुंठ्यांवर लागवड होते. एक रोप तयार करण्यासाठी दीड ते पावणेदोन रुपये खर्च येतो. दोन ते अडीच रुपये प्रति रोप याप्रमाणे विक्री होते. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये अधिक मागणी असते. सातारा, गोटखिंडी, उदगाव, आष्टा, तसेच परिसरातील शेतकरी रोपांची खरेदी करतात. आगावू नोंदणी करावी लागते.
सत्यजित शिंदे - 9158982042
आधुनिक पद्धतीकडे भीमरावांचा ओढा
वारणानगरचे भीमराव केकरे पाच लाख रुपये खर्चून उभारलेल्या शेडनेटमध्ये दररोज अडीच ते तीन हजार रोपांची निर्मिती करतात. आधुनिक पद्धतीने रोपनिर्मिती असल्याने मागणी अधिक आहे. दिवसाला तीन हजार रोपांच्या निर्मितीसाठी सुमारे 100 प्लास्टिक ट्रे लागतात. त्यासाठी लागणारे कोकोपीट आंध्र प्रदेशातून खरेदी करावे लागते. दिवसाला दहा पोती लागतात. 10 ते 13 कामगार दररोज त्यांच्याकडे कामास आहेत. अडीच ते तीन हजार रोपेनिर्मितीसाठी सहा हजार रुपये दिवसाला खर्च येतो. अडीच रुपये दराने रोपांची विक्री केल्यानंतर खर्च वजा जाता अंदाजे दहा टक्के निव्वळ नफा मिळतो.
भीमराव केकरे - संपर्क - 9552528632
रोपवाटिकेचे फायदे
- रोपवाटिकेतील रोपांची उगवण क्षमता चांगली असते.
- बेणेप्रक्रिया केलेली असल्याने कीड - रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- साखर कारखाना लावणीची नोंद दीड महिना अगोदर करून घेतो, यामुळे तोड वेळेवर होते.
- थेट रोपांच्या लावणीमुळे दोन भांगलणी, खताची एक मात्रा यावरील खर्च वाचतो.
- रोपांतील अंतर योग्य ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे होते.
- पारंपरिक लावणीच्या तुलनेत उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते.
- हंगामानुसार पाण्याच्या काही पाळ्या वाचतात.
- रोपांमध्ये फुटव्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे सरासरी उत्पादनात चांगली वाढ होते.
रोपे वापरण्याचा फायदा झाला
पूर्वी दोन डोळा पद्धतीने लावण करायचो. एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. रोपवाटिकेतून रोपे विकत घेऊन लावण सुरू केली. आता 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते. किडी - रोगांचा विशेषतः काणी, खोडअळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळले.
- रघुनाथ चव्हाण, तळसंदे
माझे शेत पूरक्षेत्रात आहे, त्यामुळे कांडी लावणीनंतर अनेक ठिकाणी उगवण होत नाही किंवा पुराचे पाणी जास्त दिवस शेतात राहिल्यास उसाची मरतूक होते. या मोकळ्या जागा रोपांच्या लावणीतून भरून घेतो. खोडव्यामध्येही अनेक ठिकाणी उगवण न झाल्याने जागा रिकामी राहते. या ठिकाणीही रोपांची लागवड करण्यात येते.
- दिलीप पांडुरंग पवार, कदमवाडी, जि. कोल्हापूर
उसाची लावण करताना कांडी पायाने जमिनीत पेरतात. यामध्ये डोळा खराब होण्याचा, तसेच कांडी खोलवर गेल्याने उगवण न होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे 100 टक्के उगवण होत नाही. साहजिकच उत्पादनावर परिणाम होतो. याउलट रोप लागवडीत रोपांची संख्या योग्य ठेवली जाते. दोन रोपांतील अंतरही योग्य ठेवले जाते. खतांचा पुरवठा योग्य ठिकाणी होतो. यामुळे खते वाया जाण्याचा धोका टळतो. ठिबक सिंचन केल्यास फायदा वाढतो. रोपलावणीत योग्य व्यवस्थापनाची सांगड घालून उत्पादन वाढविणे शक्‍य आहे.
- डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

Wednesday, July 11, 2012

भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा

भाताचे देशी वाण संवर्धनाचा सूर्याजी पाटलांनी घेतलाय वसा
आयुर्वेदिक डॉक्‍टर शेतकरी पटवतोय देशी वाणांचे आरोग्यदायी महत्त्व सध्याच्या संकरित पीकजातींच्या युगात देशी जातींच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे; मात्र आपला आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय सांभाळत कोल्हापूर जिल्ह्यातील परिते (ता. करवीर) येथील डॉ. सूर्याजी गणपत पाटील यांनी मात्र भात पिकाच्या देशी जातींच्या संवर्धनाचा वसा जपला आहे. दररोजच्या आहारातही ते याच भातवाणांचा वापर करतात. उत्तम आरोग्यासाठी अशा जातींची जपणूक गरजेची असल्याचा संदेश आपल्या कार्यातून त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
राजेंद्र घोरपडे
सन 1985 मध्ये आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. सूर्याजी पाटील यांनी गावी परिते येथे व्यवसायास सुरवात केली. त्यांची वडिलोपार्जित 13 एकर शेती आहे. शालेय जीवनापासूनच वडिलांसोबत ते शेतीकामे करायचे. ऐन दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी उसाला खताची मात्रा देऊन अकरा वाजता पेपर देण्यासाठी त्यांना जावे लागले होते. आवडीमुळेच शेतीकामांचे कष्टही त्यांना जाणवले नाहीत. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
सध्याच्या धकाधकीच्या आणि महागाईच्या जीवनात स्वार्थ साधण्याच्या मागेच मानव लागला आहे. यामुळे तो माणुसकी हरवून बसला आहे. शिक्षण घ्यायचे आणि अमाप पैसा कमविण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या योजायच्या, हाच व्यवसाय झाला आहे. चांगले काय, गरज कशाची आहे, याचा विचारच मानव विसरून गेला आहे. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत आहे. उतारवयात तो विविध व्याधींनी ग्रस्त होत आहे. केवळ योग्य आहार नसल्याने त्याची मानसिकता बदलली आहे. हेच तत्त्वज्ञान डॉ. सूर्याजी यांनी ओळखून जीवनात बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. अध्यात्माची जोड त्यांच्या विचारांना मिळाली आहे. पंढरीची माघातील वारी ते न चुकता करतात. जीवनातील चांगल्याचा स्वीकार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेतीतही तसे बदल त्यांनी सुरू केले आहेत.
देशी वाणांचे संवर्धन...
रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनींचा पोत खराब होत चालला आहे. अन्नपदार्थांची सात्त्विकता कमी होत आहे. रासायनिक कीडनाशकांचे अंश पिकांमध्ये, पर्यायाने अन्नात राहात असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे भावी काळात देशी वाणांच्या संवर्धनाची आवश्‍यकता भासणार आहे. हे विचारात घेऊनच डॉ. सूर्याजी यांनी भाताच्या पारंपरिक देशी जाती जतन करण्याचा निर्णय घेतला.
वाणांचा शोध...
पूर्वी डॉ. सूर्याजी यांच्या घरी भाताच्या पारंपरिक देशी जातीच लावल्या जात. लहानपणी देशी वाणांची गोडी चाखलेल्या डॉ. सूर्याजी यांना संकरित वाण बेचव वाटू लागले. त्यांनी जुन्या जाती शोधून लागवड करण्याचे ठरवले. जिल्ह्याच्या दुर्गम भागांचा दौरा केला. दुर्मिळ जाती हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच शेतकरी लागवड करतात, हे लक्षात आले. आजरा भागात "काळी जिरगा', गिरगावमध्ये "जोंधळा जिरगा', भादवण (ता. आजरा)मध्ये "चंपाकळी' या जाती मिळविल्या. काळ्या जिरगा वाण अनेक ठिकाणी अगदी बंगळूरला जाऊन शोधले. तेथे मोठ्या आकाराचा हा वाण मिळाला. काळी गरजी वाणही मिळाले. या सर्वांचे संवर्धनही त्यांनी केले आहे.
सेंद्रिय पद्धतीनेच लागवड
भाताच्या देशी वाणांची लागवड सेंद्रिय पद्धतीने करावी लागते, अन्यथा त्यांचा पौष्टिकपणा राहात नाही, असे प्रयोगानंतर डॉ. सूर्याजींना आढळले. दरवर्षी दीड - दोन एकरांवर ते देशी वाण लावतात. त्यांना खत देताना लेंडी खतासाठी 15 दिवस बकरी शेतात बसवितात. 400 ते 500 बकऱ्यांच्या कळपास दिवसाला 300 रुपये खर्च येतो. 500 किलो गांडूळ खत, प्रति ट्रॉली 400 रुपये दराने 50 ते 60 गाड्या शेणखत शेतात मिसळतात. सेंद्रिय खतावर साधारणपणे 10 ते 15 हजार रुपये खर्च होतात. देशी बियाणे घेतलेल्या शेतात काढणीनंतर ऊस घेतला जातो, तो निडव्यापर्यंत ठेवतात. रासायनिक खतांचा अत्यल्प वापर होतो. एकरी 60 ते 70 टनांपर्यंत एकरी उत्पादन मिळते. चौथ्या वर्षी पुन्हा लेंडी खत, सेंद्रिय खत, गांडूळ खत देऊन शेतात पुन्हा देशी भात लावला जातो.
उत्पादकता कमी पण दराला भारी
देशी वाणांची उत्पादकता कमी समजली जाते. सेंद्रिय पद्धतीने लागवड करून एकरी 12 - 14 क्विंटल उत्पादन डॉ. सूर्याजी काढतात. आज या भातास 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव आहे. याचा विचार करता संकरित वाणांच्या तुलनेत ही लागवड फायदेशीर ठरते. घरगुती वापरासाठी हे वाण उपयोगी ठरतात. दराचा विचार केल्यास या जाती फायदेशीर असल्याचे डॉ. सूर्याजी यांना वाटते.
औषधी भात म्हणूनच ओळख
काळी गरजी, काळा जिरगा, हावळा, जोंधळा जिरगा या जाती "औषधी भात' म्हणूनच परिचित आहेत. क्षयरोगी, अशक्तपणा असणाऱ्यांना, बाळंतिणीस पत देण्यासाठी, दीर्घ मुदतीच्या आजारी रुग्णांना या जातींचा तांदूळ उपयुक्त आहे. या जातींत विविध जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शिअम यांचे प्रमाण अन्य वाणांपेक्षा अधिक आहे. हा भात पचनास हलका, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. त्यात साखरेचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आदी विकार असणाऱ्यांना हा भात उपयुक्त आहे.
आंबा, आवळ्याची बागही
डॉ. सूर्याजी यांनी यंदा रेठरे (जि. सातारा) येथून बासमती 370 सुवासिक भातही आणला आहे. सात एकरांवर आंबा - आवळ्याची बागही आहे. आवळ्याच्या नरेंद्र - 7, कांचन जाती आहेत. आंब्याच्या नीलम, केसर, चौसा, लंगडा जाती त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. उसाची 98005 या नव्या जातीची 200 रोपे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून आणून दोन वर्षांपूर्वी त्याची लागवड केली आहे.
खिलारी गाईंचे संगोपन
खिलारी जातीचे संगोपन डॉ. सूर्याजी यांनी छंद म्हणून केले आहे. लातूर येथून जातिवंत खिलारी वंशाच्या जनावराचे सिमेन आणून गाई गाभण ठेवल्या जातात. नर जातीचे वासरू जन्माला आल्यास दोन वर्षांपर्यंत संगोपन करून विक्री केली जाते. यातून 30 ते 40 हजार रुपये मिळतात. भारतीय शास्त्रात खिलारी गाईंची विक्री करायची नाही असे उल्लेख आहेत, त्याचे पालन करत डॉ. सूर्याजी या गाई शेतकऱ्यांना संगोपनासाठी दान करतात.
उत्पादकता कमी तरीही...
देशी वाणांची उत्पादकता कमी आहे. सेंद्रीय पद्धतीने भात लागवड करुन एकरात 12 ते 14 क्विंटल उत्पादन डॉ. सुर्याजी काढतात. आज या भातास 60 ते 70 रुपये किलो इतका भाव आहे. याचा विचार करता संकरित बियाण्याच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरते. घरगुती वापरसाठीच डॉ. सुर्याजी देशी भाताची लागवड करतात. पण बाजारभावाचा विचार केला तर या भाताच्या जाती फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. असे डॉ. सुर्याजी यांना वाटते.
भारतात मोठी जैवविविधता आहे. पिकांच्या 160 देशी प्रजाती आहेत. संकरित वाणांसाठीही जंगली वाणांची गरज भासते. असे 340 जंगली वाण भारतात आहेत. अलीकडे या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक वाणांचे उत्पादन कमी असल्याने त्यांची लागवड शेतकरी करत नाहीत. झपाट्याने बदलणाऱ्या जगात स्थानिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या डॉ. सूर्याजी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी हा आदर्श घेऊन काही क्षेत्रावर पारंपरिक वाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे.
-
डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ
संपर्क - डॉ. सूर्याजी गणपत पाटील - 9423800588 परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर