Tuesday, June 30, 2020

पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
भारतीय गाईचे दूध, गोमुत्र, दही, तूप आणि शेण हे औषधी गुणांमुळे उपयुक्त आहेत. गाईचे तूप आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. गोमुत्र कीडनाशक म्हणून वापरले जाते. देशी गायीच्या दुधात रोगप्रतिकारक क्षमता असते. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ।। 57 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना असे पाहा कीं, दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व तें जवळच सडांच्या कातडीच्या पदरापलीकडे आहे, परंतू गोचीड तें टाकून देऊन रक्तचपीत नाही काय ?

देशी गायीचे दूध आणि विदेशी गायींचे दूध यामध्ये मोठा फरक आहे. न्यूझीलंड आणि आफ्रिकेतील संशोधनानुसार विदेशी गोवंशाच्या दुधाने क्षयरोग, हृदयरोग यासारखे विकार होतात. युरोपीय गाईंच्या दुधात ए-1 बीटाकेसीन असते. त्याचे आतड्यांत पचन होऊन बीटा केझोमॉरफिन-7 हे पेप्टाइड तयार होते. हे पेप्टाइड रक्तात शोषले गेल्यास मधुमेह, हृदयरोग, स्वमग्नता आणि सिझोफ्रेनियासारखे रोग माणसांना होतात. डॉ. कीथ वूडफोर्ड यांनी या बीटा केझोमॉरफिन-7 ला डेव्हिल इन द मिल्क असे म्हटले आहे. असे असेल तर दूध पवित्र आणि गोड कसे. हा उल्लेख युरोपियन गायींच्या दुधास लागू होत नाही.

विदेशात झालेल्या संशोधनानुसारच भारतीय देशी गायींचे दूध हे सुरक्षित दूध म्हटले गेले आहे. देशी गायींच्या दुधाची प्रत उत्कृष्ट आणि मानवी आहारास पोषक असल्याने त्याची तुलना संकरित गायीच्या दुधाशी होऊच शकत नाही. यासाठी भारतीय वंशाचा गायी किती महत्त्वाच्या आहेत याचा विचार करून देशी गायींचे संवर्धन करण्याचा विचार व्हायला हवा. सध्या भारतात गेली काही दशके विदेशी वळूचे वीर्य वापरून गोसंकर केला जात आहे. अशा संकरामुळेच भारतात क्षयप्रवण पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत आता नव्याने पाऊले उचलण्याची गरज आहे. देशी गायींच्या वंशाचे संवर्धन हे गरजेचे आहे.

भारतीय गाईचे दूध, गोमुत्र, दही, तूप आणि शेण हे औषधी गुणांमुळे उपयुक्त आहेत. गाईचे तूप आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. गोमुत्र कीडनाशक म्हणून वापरले जाते. देशी गायीच्या दुधात रोगप्रतिकारक क्षमता असते. परजीव प्रादुर्भावास हे दूध प्रतिबंध करते. पण भारतीयांनी दूध कमी मिळते या कारणास्तव देशी गायींची कत्तल केली. विदेशी गायींचे वंश वाढविले. वाढत्या महागाईत आता या गायींच्या संगोपनाचा खर्च परवडणारा नाही. असे म्हटले जाते. रोगट दुधाच्या उत्पादनापेक्षा आरोग्यास उपयुक्त उत्पादने घेणे कधीही चांगले नाही का? गोचिडाला जसे दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाले आहे. गोड, पवित्र सोडून गोडीचाप्रमाणे तो अशुद्ध रक्‍ताचेच शोषण करू इच्छित आहे.

मानवाची बदललेली ही विचारसरणीच मानवास घातक ठरत आहे. योग्य काय अयोग्य काय याचा विचारच होत नाही. फक्त उत्पादन किती होते. नफा किती मिळतो याचाच विचार केला जात आहे. होणारे उत्पादन आरोग्यास उपयुक्त आहे का नाही याचा विचारच होत नाही. सध्या देशी गोवंश असणारे खिल्लार, डांगी, लाल कंधारी चोवीस तासात चार लिटर दूध देते. तर गवळाऊ आणि देवणी या गायी सहा लिटर दूध देतात. हे दूध पवित्र तर आहेच शिवाय शुद्धही आहे. तसेच संपूर्ण घराचे आरोग्य राखणारे आहे. देशी गायीचे गोमुत्र परिसर स्वच्छ ठेवते यामुळे घराचे आरोग्य उत्तम राहाते. यासाठीच हवे देशी गायींचे संवर्धन. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Monday, June 29, 2020

आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवीं समोर शत्रूपुढें । होणे सदा ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत माणसांची वैचारिक बैठकही विस्कळित झाली आहे. धावपळीच्या जगात झटपट उत्तरे हवी आहेत. सकाळी पेरणी केली की संध्याकाळी त्याचे उत्पन्न हवे असते. पण शेतीमध्ये तसे होत नाही. धीर धरावा लागतो. हा धीर कोणालाच धरवेनासा झाला आहे. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । 
तेवीं समोर शत्रूपुढें । होणे सदा ।। 865 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा 

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे (शत्रूला कधी पाठ न दाखविणे ) 

सुर्यफुलाचे झाड हे नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. उन्हाळ्यात उन्हाची दाहकता प्रचंड असते. या उन्हामध्ये काही काळ उभे राहणेही शक्‍य होत नाही. सुर्यफुल मात्र यामध्ये दिवस-रात्र उभे असते. त्याच्या दाहकतेचा फुलाच्या पाकळ्यावर किंचितही परिणाम दिसून येत नाही. पिवळ्या धम्मक पाकळ्या उन्हाच्या तीव्रतेतही तितक्‍याच ताज्यातवान्या असतात. असे सामर्थ्य आपल्या अंगात असायला हवे. 

शेतकरीही या आदित्याच्या झाडाप्रमाणेच काटक असतो. उन्ह नाही म्हणत, वारा नाही म्हणत, धो धो पडणारा पाऊस नाही म्हणत, थंडीतही तो असाच राबत असतो. त्याला या सर्वांशी सामना करतच कष्ट करावे लागतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या प्रमाणे त्याला सदैव जागरूक राहावे लागते. वेळ चुकवून चालत नाही. जवान जसा युद्धभूमीवर पहारा देत असतो. तसा शेतकरीही शेतात असेच राबत असतो. कामात कुचराई करून चालत नाही. दोघांचे जीवनही सारखेच आहे. कष्टाचे व सदैव जागरूकतेचे आहे. इतके कष्ट करूनही हाती काय मिळेल याची अपेक्षा शेतकरी कधीही ठेवत नाही. मिळाले ते निसर्गाने दिले, देवाने दिले या भावनेने तो त्याचा स्वीकार करतो. यंदा कमी उत्पादन मिळाले पुढच्या वर्षी भरभरून मिळेल अशा आशेने तो राबत राहातो. कमी मिळाले म्हणून तो खचून जात नाही. 

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत माणसांची वैचारिक बैठकही विस्कळित झाली आहे. धावपळीच्या जगात झटपट उत्तरे हवी आहेत. सकाळी पेरणी केली की संध्याकाळी त्याचे उत्पन्न हवे असते. पण शेतीमध्ये तसे होत नाही. धीर धरावा लागतो. हा धीर कोणालाच धरवेनासा झाला आहे. यामुळे पिकाचा कालावधी कमी करून जास्तीत जास्त पिके कधी घेता येतील यावर अधिक भर दिला जात आहे. बदलत्या काळात याची गरजही आहे. पण याला मर्यादा आहेत. निसर्गाच्या नियमापुढे नतमस्तक हे व्हावेच लागते. निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्‍न उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. 

जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच एक भाग आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मानवनिर्मित यंत्रांनी निसर्गचक्र मोडले आहे. मानवाला थांबायला वेळ नाही. थांबला तो संपला हे पक्के त्याच्या मनात रुजल्याने तो थांबायला तयारच नाही. झटपट निर्णयामुळे त्याची मानसिकताही तशीच झाली आहे. स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार तो झटक्‍यात करू लागला आहे. केव्हा जीवन संपवेल याचा नेम नाही. सुख-शांतीच नसल्याने त्याचे ही अवस्था झाली आहे. सुखाच्या शोधात तो दुःखाच्या गर्तेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागे हीच कारणे आहेत. धीर सुटल्यानेच त्याची ही अवस्था झाली आहे. घाईगडबडीच्या या जीवनात धीराची गरज आहे. यासाठी चांगल्या सवयी अंगी जोपासायला हव्यात. 

मनाला सवयी लावल्यावर चुका होणार नाहीत. नियम करून बऱ्याचदा तो मोडल्याने मानसिकता ढळू शकते. याचसाठी नियम करण्याऐवजी मनाला सवयी कशा लागतील यावर विचार करायला हवा. नियमाने बोजड वाटते. नियम नकोसे वाटतात. पण मनाला सवय लावली तर नियमाची गरजच वाटणार नाही. आज चांगले वागायचे. आज खूप काम करायचे. आजपासून चुका करायच्या नाहीत असा मनाचा दृढनिश्‍चय केला तर चुका होणार नाहीत. यासाठीच मनामध्ये हा संकल्प करायला हवा. मानसिक तयारी करायला हवी. शेतकऱ्याची कष्ट करण्याची मानसिक तयारी असते. कार्यालयात काम करणारी व्यक्ती नियमात काम करत असते. 

नियमाने कामावर जाणे. नियमाने काम करणे. नियमाने काम वेळेत पूर्ण करणे. काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. या भीतीने तो काम करत असतो. बऱ्याचदा त्याला मनाविरुद्ध काम करावे लागते. नियमांचे उलंघन करून चालत नाही. शेती करताना नियमापेक्षा कामाची सवय असावी लागते. मारून मुरगटून येथे काम होत नाही. जबरदस्तीने येथे काम होत नाही. कष्टाची सवय असावी लागते. आदित्याच्या झाडाप्रमाणे समोरच्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. शेतीत ही नियम असतात. पण ते शास्त्राचे नियम असतात. शास्त्रोक्त नियम हे पाळावेच लागतात. आळस हा शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे. शेतातील तण काढण्यास आळस केला तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. कामात आळस करून चालत नाही. 

शेतकऱ्याचे जसे जीवन आहे तसेच आत्मज्ञानाची ओढ असणाऱ्या साधकाचे आहे. साधकासही सदैव जागरूक राहावे लागते. साधनेत मन विचलित होणार नाही. मन भरकटणार नाही. यासाठी जागरूक राहावे लागते. मन भरकटले तर वासनांच्या, विषयांच्या माऱ्याला साधक बळी पडतो. साधनेचे ते शत्रू आहेत. साधनेत मन रमावे यासाठी त्याला मनावर नियंत्रण ठेवावे लागते. यासाठी काही नियम त्याला पाळावे लागतात. काही नियम हे तयार करावे लागतात. नियमनाने सवय लागते. मनाला या नियमांची सवय व्हावी लागते. मनाची तशी तयारी व्हावी लागते. साधनेतील सोऽहम चा नाद मनाने ऐकण्याची सवय लावावी लागते. कधी चार ते पाच वेळाच ऐकले जाते. तर कधी एकदाच ऐकला जातो. आता हा स्वर सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. 

सद्‌गुरू हा स्वर सतत ऐकत असतात. चालता-बोलता हा स्वर त्यांच्या मनाने ते ऐकत असतात. हा स्वर सतत ऐकायला यावा यासाठी ही सवय लावावी लागते. मन त्यातच रमवावे लागते. एकदा तो स्वर ऐकण्याची सवय लागली की मन आपोआप त्यामध्ये रमते. आज चार स्वर ऐकले उद्या दहा परवा पंधरा ठरवा एक माळ अशी माळांची संख्या वाढवावी लागते. हळूहळू माळ ओढण्याचीही गरज पडत नाही. मोजत बसण्याचीही गरज लागत नाही. 

ती सवय होऊन जाते. स्वर सदैव ऐकू येऊ लागतो. ही अवस्था साधकाला प्राप्त होते. तेव्हा तो आत्मज्ञानाचा स्वीकार करण्यास योग्य होतो. त्याला उचित फळ प्राप्त होते. शेतकऱ्याप्रमाणे मात्र कष्टात राहावे लागते. स्वर ऐकण्याचे कष्ट करावे लागतात. या स्वरात राहिल्यानंतर कष्ट कमी होतात. शहाणा शेतकरी या स्वरात राहातो. नांदतो. त्याला कष्ट पडत नाहीत. तो स्वरांच्या मागे धावतो. काम होत जाते. संसार होत जातो. स्वर ऐकण्याच्या नादात केलेल्या कष्टाचा विसर पडतो. अंगाला कष्टाची सवय लागते. मनाला स्वर ऐकण्याची सवय लागते. यातच त्या शेतकऱ्याचा आत्मज्ञानाचा मळा फुलतो. बहरतो. त्यातूनच ज्ञानाचा सुवास दरवळतो. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Sunday, June 28, 2020

मद्यपाआंगीचें वस्त्र । लेपाहातीचें शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

विचार केला तर आता शेतीचा विस्तार कमी होत आहे. कमी क्षेत्रावर आता अशाप्रकारे ठिबक सिंचन वापरणे खर्चाचे झाले आहे. अनुदानासाठी हेलपाटे मारण्यातच अनुदान संपते. शासकीय योजनांचा लाभ केवळ मोठ्या शेतकऱ्यांना होतो कमी क्षेत्रावर लाभच पोहोचत नाही. अशा या अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबकच्या योजनांचा लाभ कसा द्यायचा हे आव्हान आहे. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

मद्यपाआंगीचें वस्त्र । लेपाहातीचें शस्त्र ।
बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ।। 532 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातांत दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते, अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते.

देशातील कृषी विद्यापीठामध्ये संशोधन होते. नवनवे तंत्र विकसित केले जाते, पण अद्यापही हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचले नाही? या तंत्राचा वापर किती शेतकरी करतात. साधेच उदाहरण घ्यायचे झाले तर ठिबक सिंचनाचे घेता येईल. राज्यातील किती शेतकरी ठिबक सिंचनाने शेती करतात. पाण्याची बचत होते. विजेची बचत होते. उत्पादन खर्चात बचत होते. उत्पादनही वाढते. मग ठिबक सिंचन शेतकरी का करत नाहीत? शंभर टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन वापरावे यासाठी का प्रयत्न होत नाही. यासाठी अनुदानही दिले तरीही ही योजना यशस्वी का होत नाही. हे शास्त्र अद्याप शेतकऱ्यांना का रुजले नाही. संशोधन तर झाले आहे. उत्तम आहे याचीही माहिती आहे. मग हे शास्त्र वापरण्यात आपण मागे का?

बैलाच्या पाठीवर शास्त्र बांधले. त्या बैलाला याची कल्पना नसते..ते शास्त्र आहे की कागदाचे ओझे आहे. त्याला काहीच फरक पडत नाही. दारूड्याला आपण दारू पिऊन कोठे पडलो आहे याचे भानही नसते. अंगावर कपडे आहेत की नाही याचीही कल्पना त्याला नसते. अशी अवस्था आज कृषी संशोधनाची झाली आहे. संशोधन अमाप झाले आहे. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. ते संशोधन माहित झाले आहे. पण त्याचा वापर शेतकरी करताना दिसत नाही. नुसते पुस्तकी ज्ञान काय कामाचे? हजार वेळा ज्ञानेश्‍वरी वाचली, पण एक ओवीही समजली नाही. अशा वाचनाचा काय उपयोग. एखादे पारायण जरी मन लावून केले असते, ते ज्ञान समजावून घेतले असते तरी चालते. नुसते वरवरचे वाचन उपयोगी नाही. काही काम धंदा नाही म्हणून वाचन करून काय उपयोग? उतारवयात वेळ जात नाही. मग काय उद्योग. तर धार्मिक पुस्तकांची पारायणे करायची? चांगली गोष्ट आहे. पुस्तके जरूर वाचावीत. पण ती समजून घेऊन वाचावीत. नुसते वरवरचे वाचन नसावे.

घरात सर्व शास्त्राची पुस्तके आहेत. पुस्तकांच्यासाठी उत्तम फर्निचरही तयार केले आहे. अगदी नवी कोरी पुस्तके आहेत. त्यावर धूळ पडणार नाही. किंवा त्याला कीड लागणार नाही याची काळजीही घेतली आहे. पण ती पुस्तके कधी उघडून पाहण्याचे धाडस कधी केले नाही. मग त्या पुस्तकांचा काय उपयोग? इतकी उत्तम दर्जाची सुविधा त्यासाठी उपलब्ध करून काय उपयोग? आजकाल तंत्रज्ञान खूपच प्रगत झाले आहे. झटपट लोकांपर्यंत पोहोचते. मोबाईल तर आता प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. मग असे असताना शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही? त्याचा वापर शेतकरी का करत नाही? या प्रश्‍नाचा कधी आढावा घेतला गेला आहे का?

नुसती आकडेवारी सादर करून चर्चा करण्याने प्रश्‍न सुटत नाहीत. या चर्चेतून प्रश्‍नावर शोधलेले उत्तर अमलात आणावे लागते. तसे होत नाही. यामुळेच हे संशोधन विद्यापीठातच राहिले आहे. ज्ञान विस्तार ही प्रक्रिया हळू आहे. कोणतीही गोष्ट शेतकरी पटकन स्वीकारत नाही. त्याने पटकन स्वीकारावे असा आत्मविश्‍वास आपल्या देशातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने निर्माण केला आहे का? ते का करता आले नाही. ठिबक सिंचनाचा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. झाडाच्या मुळाशी, रोपाच्या मुळाशी पाणी दिले तरच ते झाडाला मिळते. त्याकाळात मडकी जमिनीत पेरली जायची. सध्याचे डिफ्युजर तंत्रज्ञान त्याकाळात वापरले जात होते. मग आत्ता हे तंत्र शेतकरी का वापरत नाही. ते वापरण्यात शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी आहेत. याचा विचार तरी झाला आहे का?

आकडेवारीच्या पाहणीनुसार जमिनदार शेतकरीच शासनाच्या योजनांचा लाभ घेतात असे दिसते. केवळ पाच टक्केच सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या योजनांचा लाभ घेतो. असे का? त्यातही तो समाधानी नसतो. शासनाची योजना आहे. लाभ मिळतो आहे म्हणून तो त्याचा वापर करतो. प्रत्यक्षात ते तंत्रज्ञान वापरण्यात त्याला फारसा रस वाटत नाही. असे का? त्याची मानसिकता अशी का झाली आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे. शासनाने आता ठिबक सिंचनाची सक्ती केली आहे. भावीकाळात पाण्याची टंचाई विचारात घेता तसे नियोजन हवेच. पूर्वी पाणी साठविण्याच्या फारश्‍या सुविधा नव्हत्या. धरणेही नव्हती. विहिरींची संख्याही कमी होती. अशा काळात पाण्याचा वापर हा काटकसरीने केला जात होता. पाणी उपशाच्या सोयी नव्हत्या. मोटेचे साहाय्याने पाणी किती ओढणार यालाही मर्यादा होत्या. पण झाडाच्या मुळाशी पाणी देण्याचे शास्त्र शेतकऱ्यांना अवगत होते. तसा ज्ञान विस्तारही केला जात होता. इतके जुने तत्त्वज्ञान असूनही सध्या याबाबत ज्ञान विस्तार का करावा लागतो.

विचार केला तर आता शेतीचा विस्तार कमी होत आहे. कमी क्षेत्रावर आता अशाप्रकारे ठिबक सिंचन वापरणे खर्चाचे झाले आहे. अनुदानासाठी हेलपाटे मारण्यातच अनुदान संपते. शासकीय योजनांचा लाभ केवळ मोठ्या शेतकऱ्यांना होतो कमी क्षेत्रावर लाभच पोहोचत नाही. अशा या अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबकच्या योजनांचा लाभ कसा द्यायचा हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारावेच लागेल कारण देशातील 70 टक्‍क्‍याच्यावर शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. शेतीच्या योजना आखताना आता अल्पभूधारक विचारात घेऊनच योजना आखायला हवी. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गटाला ठिबक सिंचनाखाली आणता येऊ शकते. गटच ठिबक सिंचनाखाली आला तर अल्पभूधारक शेतकऱ्याचे शेतही ठिबक खाली येईल. गटशेतीचे इतरही फायदे या शेतकऱ्यांना मिळाल्याने निश्‍चितच शेतकऱ्यांचा विकास होईल. शेतीकडे पाठ फिरवणारे शेतकरीही पुन्हा शेतीकडे वळतील. गटागटाने शेतीला प्रोत्साहन मिळेल.

पूर्वीच्या काळीही गटागटानेच शेती केली जात होती. आजही दुर्गम भागात, कमी विकसित भागात गटागटानेच शेती केली जाते. शेतीची कापणी एकत्रित केली जाते. पेरणीही एकत्रित केली जाते. अशामुळे आज यांच्या शेतात पेरणी केली की उद्या दुसऱ्याच्या शेतात पेरणी होते. काढणीही त्याचप्रमाणे होते. कामाची, वेळेची बचत होते. पण काळाच्या ओघात शेतकऱ्यातील हे ऐक्‍य कमी झाले. मध्यंतरीच्या काळात नवनवे शोध लागले. पाणी उपसण्याची साधने बदलली. मोटेची जागा पंपाने घेतली. विजेच्या वापराने उपसा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. सिंचनाचे प्रकल्प उभे राहिले. पाण्याची मुबलकता झाली. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचे तोटे सुरू होतात. पाण्याचा वापरही वाट्टेल तसा होऊ लागला. तसे ठिबक सिंचनाचा विचार मागे पडला. पाटाने पाणी देण्याची पद्धत विकसित झाली. आता पुन्हा पाण्याची वाढती टंचाई जाणवू लागल्यानेच ठिबक सिंचनाचा विचार आता जोर धरू लागला आहे.

विसरलेले शास्त्र आता पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. पुराणातील वांगी पुराणात असे म्हणणे चुकीचे आहे. जुने तेच सोने आहे. संतांनी सांगून ठेवलेले शास्त्र नेहमीच उपयोगाचे आहे. काळ बदलला तरी तेच शास्त्र उपयोग आणणे गरजेचे आहे. त्या शास्त्राचा आधार धरूनच विकास करणे गरजेचे आहे. शास्त्र सोडून विकास केल्यानंतर सुरवातीला फायदा होतो पण पुन्हा तोटे सुरू होतात. तोटा होऊ लागल्यानंतर पुन्हा पुराणांच्या पोथ्या उघडाव्या लागतात. सेंद्रिय शेतीचेही तसेच आहे. रासायनिक खतांचा शोध लागण्यापूर्वी देशात सेंद्रिय शेतीच केली जात होती. उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढला. पण उत्पादन पहिल्या टप्प्यात वाढले नंतर उत्पन्नात फरक जाणवू लागल्याने आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याची वेळ आली आहे.

आरोग्यासाठी आता तर सेंद्रिय शेतीचाच आधार आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असा विचार आता पुढे येत आहे. शास्त्राचा आधार सोडून विकासाचे आराखडे तयार केल्यानेच हे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. शेतीमध्ये तरी आता पुन्हा साधुसंतांनी सांगितलेल्या विचाराने शेती करण्याची गरज वाटू लागली आहे. सिंचनाचे प्रश्‍न असो किंवा पावसाची अनियमितता असो, मानवामध्ये वाढते आजाराचे प्रमाण असो किंवा जागतिक तापमान वाढ असो, वाढते हवा, पाण्याचे प्रदूषण असो किंवा जमिनाची बिघडलेले पोत असो या सर्वांची उत्तरे एकच आहेत. शास्त्राचा आधार सोडून विकास केल्यानेच हे प्रश्‍न भेडसावत आहेत. अनेक थोर शास्त्रज्ञांनीही आता हे मान्य केले आहे.

विकास करताना फायदा विचारात घेण्याबरोबरच भावी काळात कोणते तोटे होणार आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल. कारखाने झाले. लोकांना रोजगार मिळाला. वसाहतींचा विकास झाला. विविध सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या. पण त्याबरोबरच विकास करताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्याने आता रोगराई वाढली आहे. विविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत. आता औद्योगिक क्षेत्रात पाणीही शुद्ध मिळत नाही. अशाने विकास कोणता केला हा मोठा प्रश्‍न आहे. विकास करताना या जमिनीवरील वृक्षांची तोड झाली. पिकाऊ जमिन वाया गेली. केवळ औद्योगिक क्षेत्रामुळे जमिनींचा भाव वाढतो या विचाराने विकास केला. भाव वाढ केली पण प्रश्‍नही वाढविले.

अध्यात्म शास्त्रात विकास करू नका असे कोठेही सांगितले जात नाही. विकास करा पण विचार करून विकास करा, शास्त्र सोडून विकास करू नका असे सांगितले जाते. नेमके हेच होत नाही. यामुळेच अध्यात्म शास्त्रास नावे ठेवली जात आहेत. कृषी विद्यापीठांमध्ये सर्वागिंण विचार करून संशोधन विकसित केले जाते. बऱ्याचदा यात चुका होतात. बऱ्याचदा संशोधन अयशस्वी ठरते पण संशोधन केले जाते. ही निरंतर प्रक्रिया आहे. संशोधन विकसित करण्याअगोदर त्याचे विविध क्षेत्रावर प्रयोग केले जातात. ते योग्य आहे की नाही हे तपासले जाते. पण आता या विकासामध्येही राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. बियाणे कंपन्यांच्या नफ्यासाठी वाट्टेल तशी मंजूरी दिली जात आहे. नियंत्रण राहिलेले नाही. अशामुळे उत्पादन वाढ होणारे बियाणे पहिल्यावर्षी उत्पादन देते मात्र नंतर बियाणे खराब निघते. अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याचीही गरज आहे.

संशोधनाचा प्रसार करताना नियम हे पाळले जाणे गरजेचे आहे. पिकांच्या जाती विकसित झाल्या. उत्तम जातींचा प्रसारही झाला. पण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. शेती अशी करा? शेती तशी करा? असे सल्ले विद्यापीठाकडून दिले जातात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत हे सल्ले पोहोचतात का? विविध कंपन्यांच्या हस्तक्षेपामुळे चुकीचे सल्लेही दिले जात आहेत. कीडनाशक, खते यांच्या फवारणीचे नियंत्रण राखले जात नाही. चुकीच्या पद्धतीने फवारण्या होत आहेत. यात नुकसान कोणाचे? शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. त्याबरोबरच शेतमाल खाणाऱ्या जनतेचेही आरोग्य बिघडत आहे. यावर नियंत्रण कसे ठेवणार. योग्य शास्त्र विकसित करण्यासाठी आवश्‍यक ते कायदे करण्याची गरज आहे.

आज सेंद्रिय शेतीचा प्रसार केला जात आहे. पण याला शासनाकडून किती प्रतिसाद मिळतो. पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाची किती मदत मिळते. हा सुद्धा आता संशोधनाचा विषय आहे. शेतीमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्याचीही गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने शेतीचे खरे शास्त्र विकसित करता येईल. शेतीचे शास्त्र आता शेतकऱ्यांनीच विकसित करण्याची गरज आहे. विद्यापीठांनी पुस्तकांत बांधून ठेवलेले हे शास्त्र आता प्रत्यक्षात उपयोगात आणायला हवे. संशोधनाच्या प्रसाराचा वेग जितका वाढेल तितका विकासाचा दर वाढेल. शेतकऱ्यांनीच आता संशोधक वृत्ती ठेवून शेती करायला हवी. तरच शेतीचा विकास झपाट्याने होईल.

गटशेतीतून शेतकऱ्यामध्ये संशोधनाच्या चर्चा घडविल्या गेल्यातर शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होईल. गावागावात शेतकऱ्यांचे गट झाले तर एकमेकांमध्ये तंत्रज्ञानावर चर्चा होऊन शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. शेतीचे शास्त्र समजून घेण्यातही सहजता येईल. पूर्वीच्याकाळी अशीच शेती केली जायची. बागायतदार शेतकऱ्यांची मुले मामाच्या, काकाच्या शेतात जाऊन त्यांच्याकडून शेतीचे धडे घेत होते. बागायतदार आहे म्हणून मुलांना शेतीची कामे लावायची नाहीत. त्यांना कष्टाची कामे द्यायची नाहीत असा कोणताही नियम तेव्हा नव्हता. उलट बागायतदार स्वतःच्या मुलाला हे तंत्र समजावे यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याकडे शिक्षणासाठी ठेवत असत. कामाची सवय लागली की आपोआप विकास होतो. मानसिक तयारी होते. चांगले वळण लागते. शास्त्र शिकण्यासाठी, समजावून घेण्यासाठी मानसिक तयारी असावी लागते. वडिलांना पुस्तकांची आवड असते. पुस्तकांचे वाचनालयच त्यांनी घरात उघडलेले असते पण त्यांची मुले ही पुस्तके कधी वाचताना दिसत नाहीत. असा विरोधाभास बऱ्याच घरामध्ये पाहायला मिळतो. असे का होते? तर मुलांची वाचनाची आवड ही निर्माण करावी लागते. त्यासाठी त्याची मानसिकता बदलावी लागते. तशी तयारी करवून घ्यावी लागते. तरच ही सवय लागते. 


  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Friday, June 26, 2020

तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलांचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 
उन्ह, वारा, थंडी याची त्याला तमा नसते. शत्रू केव्हा हल्ला करेल याचा नेम नाही. आता तर तो कशाप्रकारे हल्ला करेल याचाही भरवसा नाही. नागरिकांच्या वेशात घुसखोरी तो करतो आहे. अशा परिस्थितीत लढणारा जवान हा श्रेष्ठच आहे. त्याचे श्रेष्ठत्व आहे म्हणूनच देशातले सर्व नागरिक आज सुरक्षित आहेत. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
 
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलांचा आधारु ।
घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ।। 880 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळविणें.

शेतीसाठी आवश्‍यक भांडवल कोणते? तर जमिन, बियाणे आणि अवजारे हे शेतीचे भांडवल आहे. याचा आधार घेऊन नफा मिळविणे हे शेतकऱ्याचे कर्म आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारा शिपाई मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो तो क्षत्रिय आहे आणि देशात शेती करून, व्यापार करून जगणारा कोणतीही व्यक्ती ही वैश्‍य आहे. ही रचना कर्मानुसार आहे. यात उच्चनिचता नाही. सीमेवर लढतो म्हणूनच तर देश सुरक्षित आहे. अन्यथा देशात पारत्रंत्र्य येईल. जिवाचा पर्वा न करता लढतो.
 
उन्ह, वारा, थंडी याची त्याला तमा नसते. शत्रू केव्हा हल्ला करेल याचा नेम नाही. आता तर तो कशाप्रकारे हल्ला करेल याचाही भरवसा नाही. नागरिकांच्या वेशात घुसखोरी तो करतो आहे. अशा परिस्थितीत लढणारा जवान हा श्रेष्ठच आहे. त्याचे श्रेष्ठत्व आहे म्हणूनच देशातले सर्व नागरिक आज सुरक्षित आहेत. सुखाने नांदत आहेत. त्याच्या या कर्माला सलाम हा करावाच लागेल. जय जवान जय किसान हा नारा आहे. जवानांच्या बरोबरच शेतकरी हा सुद्धा श्रेष्ठ आहे. व्यापारी किंवा इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी श्रेष्ठ का? कारण हा व्यवसाय श्रेष्ठ आहे. इतर धंद्यात, व्यापाऱ्यांत फसवणूक करून पुष्कळसा नफा कमविता येतो. पण शेती हा असा व्यवसाय आहे. येथे फसवणूक ही करताच येत नाही.
 
जे काही कमविले जाते त्याला कष्ट पडतात. जे काही मिळते ते नैसर्गिक परिस्थितीवर मिळते. आता ग्रीन हाउस किंवा तापमान नियंत्रण करून शेती केली जात आहे. व्हर्टिकल फार्मिंग आदी अनेक तंत्रज्ञान शेतीमध्ये आले आहे. टेरेस फार्मिंगही केले जात आहे. पण येणारे उत्पादन हे नैसर्गिक आहे. निसर्गावर अवलंबून आहे. वातावरण निर्मिती करून उत्पादनात वाढ करू शकतो. पण तरीही येणारे उत्पादन हे नैसर्गिकच असते. कृत्रिमपणा त्यामध्ये नसतो. म्हणजे येथे फसवणूक नसते. फसवणूक करण्यास वावही नसतो. शेतकऱ्यांच्या रक्तातच हा गुण नाही आणि तो येणारही नाही.
 
उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी काही शेतकरी विविध प्रकारच्या फवारण्या करतात. त्याचे प्रमाण ठरलेले आहे. पण तरीही प्रमाणपेक्षा अधिक फवारण्या होत आहेत. संजीवकांचा वापरही प्रमाणापेक्षा अधिक केला जात आहे. खतांचा वापरही अधिक केला जात आहे. असा आरोप होतो आहे. पण असे उत्पादन विकताना अनेक अडचणी येतात याची कल्पना शेतकऱ्यांना आहे. यामुळे असा चुका तो आता टाळतो आहे. अशामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते याचीही कल्पना त्याला आली आहे. शेतीत फसवणूकीचा धंदा हा करता येतच नाही. इतरांची फसवणूक करताना स्वतःचीच येथे फसवणूक होते. यासाठी इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी हा सर्वश्रेष्ठ उद्योजक आहे. भांडवलाच्या आधारावरच तो पुष्कळसा नफा घेऊ शकतो. आहे ते भांडवल त्याला टिकविणे हाच त्याचा धर्म आहे. यात कोणाचीही फसगत तो करत नाही याच मुळे हा व्यवसाय हा सर्वश्रेष्ठ आहे.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Wednesday, June 24, 2020

उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि साजणें । चाळावें गा ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)


मुलांना बाल वयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते तसे शेतकऱ्यांचेही पिकावरील प्रेम हे निरपेक्ष असते. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।
झाडासि साजणें । चाळावें गा ।। 65 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - थंडी नेसावी, ऊन पांघरावें आणि पावसाच्या घरांत असावे.

शेती करताना शेती आपणाशी बोलते. शेतातील पिके, झाडे शेतकऱ्यांशी बोलतात. इतके त्यांचे नाते दृढ असते. झाडाच्या, पिकांच्या संवेदना शेतकरी जाणून घेतो. आपण प्रेम केले, तर दुसरा आपल्यावर प्रेम करेल. आपण प्रेमच केले नाही, तर इतरांकडून प्रेमाची अपेक्षा का ठेवायची ? खऱ्या प्रेमात वासना नसते. हाव नसते. अपेक्षा नसते. निरपेक्ष भावनेने प्रेम करावे. अशा प्रेमाचा त्रास होत नाही. शेतकऱ्यांचे शेतावर प्रेम असते. तेही असेच निरपेक्ष असते. त्या मातीशी दृढ नाते असते. पिके, झाडे मातीत येतात. मातीवरच त्यांची वाढ होते. खरा शेतकरी या मातीशी बोलतो.
 
मातीच्या आरोग्याची काळजी घेतो. झाडाचे आरोग्य या मातीवर अवलंबून असते. मातीचे आरोग्य उत्तम असेल तर झाडाची, पिकाची वाढही जोमदार होते. आपण आपल्या आरोग्याच्या चाचण्या घेतो. रक्ताची, लघवीची तपासणी करतो. त्यावरून आरोग्य कसे आहे. कोणते आजार आहेत याची माहिती होते. तसे मातीच्या आरोग्याचीही तपासणी करण्याची गरज असते. खरा शेतकरी मातीचे आरोग्य तपासतो. त्यानुसार आवश्‍यक त्या खतांचा आहार त्या मातीस देतो. पिकानुसार कोणता आहार द्यावा याचे नियोजन तो करतो. सध्या रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे मातीतील जिवाणूंची कार्यक्षमता कमी झाली आहे.
 
मातीतील गांडुळे मृत झाली आहेत. रासायनिक खतांचा वापर त्यासाठी कमी करून शेताला सेंद्रिय खताची मात्रा वाढविण्याची गरज आहे. सेंद्रिय खतासाठी गांडूळ खताची निर्मिती करण्याची गरज आहे. खरे शेतकरी शेतातच गांडूळ खताची निर्मिती करतात. योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात गांडुळे वाढवितात. या सेंद्रिय खताच्या वापराने शेतात गांडुळांची वाढ होते. जमिनीचा पोत सुधारतो. नांगरट सुलभ प्रकारे होते. एकंदरीत जमिनीचे आरोग्य उत्तम राहाते. झाडांच्या वाढीसाठी, पिकांच्या वाढीसाठी जमिनीत आवश्‍यक ते पोषक घटक वाढतात. झाडाची वाढ उत्तम होते. पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते.
 
आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते. त्याला वेळेवर दूध पाजते. मुलांना बोलता येत नाही. पण मुलाला कोणता आजार झाला आहे. हे जसे आई ओळखते. तसे शेतकरीही पीक बोलत नसली तरी त्याला काय झाले आहे. कोणता आजार झाला आहे. त्याची वाढ कशी चांगली होईल याची काळजी घेतो. स्वतःच्या मुलांप्रमाणे त्याची वाढ करतो. मुलांना बाल वयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात.
 
आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते तसे शेतकऱ्यांचेही पिकावरील प्रेम हे निरपेक्ष असते. अध्यात्मात सद्‌गुरूंचे शिष्यावरील प्रेमही निरपेक्ष असते. सद्‌गुरूही शिष्याची अशीच काळजी घेतात. शिष्य आत्मज्ञानी व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. शिष्याच्या सर्व चुका पोटात घेऊन त्याला प्रेमाने आत्मज्ञान शिकवतात. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Tuesday, June 23, 2020

येणें फलत्यागें सांडें । तें तें कर्म न विरुढे । एकचि वेळें वेळुझाडें । वांझे जैसी ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

 
वेळू, बांबू किंवा या जातीतील वृक्षांना जसे एकदाच फुले फुलतात. तसे या मानवजातीलाही असाच एकदा बहर येतो. हा बहर यावा यासाठी मानवजातीने प्रयत्न करायला हवेत. फुलावर आलेल्या वेळूला पुन्हा अंकुर फुटत नाही. तसे त्याच्या मनात पुन्हा विकल्प उत्पन्न होत नाही. हा बहर आल्यानंतर तो जन्म-मरणाचा फेऱ्यातून मुक्त होतो. 
 - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

येणें फलत्यागें सांडें । तें तें कर्म न विरुढे ।
एकचि वेळें वेळुझाडें । वांझे जैसी ।। 135 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - जसें वेळूचें झाड एक वेळ व्यालें म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणें या फलत्यागानें जे जे कर्म टाकलें जाते, त्या त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही.

पूर्वीचे साधू-संत हे संशोधक होते. आसपास दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता. त्याच्या नोंदी ठेवल्या होत्या. भारतात नालंदा विद्यापीठ हे यासाठीच प्रसिद्ध असावे. भारतातील हे संशोधन परकीयांनी आत्मसात केले असावे. त्याचा दैनंदिन व्यवहारात कसा उपयोग केला जाऊ शकतो यावर त्यांनी भर दिला. यामुळे ते आपल्यापेक्षा अधिक प्रगत झाले. ही प्रगती आपल्याकडे केलेल्या संशोधनातून आहे याचा पुरावा आपल्याकडे नाही. पण पुराणात आढळणाऱ्या या नोंदीवरून असे स्पष्ट होते की देशातील विद्यापीठे संशोधनात आघाडीवर होती. विद्धंसक विचार त्यामध्ये नव्हता. त्यामुळे संशोधनाचा वापर हा योग्य कार्यासाठीच केला गेला.
 
तशी जडणघडण, संस्कार आपल्या संस्कृतीत रुजवले गेले. यामुळे देशात सुख-शांती समाधान नांदते. गुन्हेगारीवृत्ती कमी होती. पण सध्या आपले हे संशोधन परकीयांनी वापरून आपणासच आव्हान दिले. पण संशोधनाचा मुख्य पाया असणारे अध्यात्मशास्त्र आजही भारतात अस्तित्वात आहे. जेव्हा जेव्हा भारतात अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी भगवंत जन्म घेतो. असा आजवरचा इतिहास आहे. सध्याच्या स्थितीत भगवंतांनी अवतार घ्यावा, अशी आशा वाटत आहे. पण आता हा अवतार कसा असेल याचे उत्तर मात्र कोणी शोधत नाही.
 
हा अवतार आता स्वतःमध्येच आहे. प्रत्येकांमध्येच त्याचे अस्तित्व आहे. असे भगवंतानीच सांगितले आहे, तरीही याकडे या मानवजातीचे लक्ष नाही. आता हे विचारात घेण्याची गरज वाटू लागली आहे. तो भगवंत मीच आहे, असेही म्हणायला कोणी तयार नाही. ती त्याला अतिशयोक्ती वाटू लागली आहे. त्याचाच त्याच्या कर्मावर विश्‍वास राहिलेला नाही. असे हे कसे शक्‍य आहे. असाच प्रश्‍न आता या मानवजातीला पडला आहे. आपले इतके सामर्थ्य नाही म्हणून तो याकडे दुर्लक्ष करत आहे. पण हे सत्य आहे.
 
वेळू, बांबू किंवा या जातीतील वृक्षांना जसे एकदाच फुले फुलतात. तसे या मानवजातीलाही असाच एकदा बहर येतो. हा बहर यावा यासाठी मानवजातीने प्रयत्न करायला हवेत. फुलावर आलेल्या वेळूला पुन्हा अंकुर फुटत नाही. तसे त्याच्या मनात पुन्हा विकल्प उत्पन्न होत नाही. हा बहर आल्यानंतर तो जन्म-मरणाचा फेऱ्यातून मुक्त होतो. तो अमर होतो. भारतीयांचे हे अमरत्त्वाचे तत्त्वज्ञान मात्र परकीय घेऊन जाऊ शकले नाहीत. हे तत्त्वज्ञान घेण्यासाठी त्यांना येथे यावे लागेल. हे तत्त्वज्ञान जबरदस्तीकरुन काढून घेता येत नाही. तर ते स्वतः साधनेने आत्मसात करावे लागते. जगाच्या सुख-शांतीसाठी भारतीयांनी हे तत्त्वज्ञान सर्वांसाठी खुले केले आहे. त्याचे पेटंट करावे लागत नाही. ते विकतही मिळत नाही. सद्‌गुरूंच्या कृपेने ते आत्मसात होते.

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

Monday, June 22, 2020

आतां चेंडुवें भूमि हाणिजें । हें नव्हे तो हाता आणिजे । कीं शेतीं बी विखुरिजे । परी पिकीं लक्ष ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)


रासायनिक खतांच्या अधिक मात्रेमुळे जमिनीला मीठ फुठते. नायट्रोजनच्या अधिक मात्रेमुळे कधीकधी पीक करपण्याचा, जळून जाण्याचाही धोका असतो. अशा गोष्टी विचाऱ्यात घ्यायला हव्यात. शेती करताना नियोजनाचा अभाव असल्यानेच शेतीत नुकसान होत आहे. पिकावर लक्ष न ठेवल्याने नुकसान होते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

आतां चेंडुवें भूमि हाणिजें । हें नव्हे तो हाता आणिजे । 
कीं शेतीं बी विखुरिजे । परी पिकीं लक्ष ।। 100 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 16 वा 

ओवीचा अर्थ - आतां चेंडू जमिनीवर आपटावयाचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरितां नव्हे तर चेंडूला उशी येऊन तो आपल्या हातांत यावा म्हणून अथवा शेतांत बी फेकावयाचे ते नुसतें बी फेकणें नसतें परंतु त्या फेकण्यांत पिकावर नजर असते. 

कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नका असा सल्ला दिला जातो. म्हणजे असे नव्हे की सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. चेंडू जमिनीवर आपटायचा तो जमिनीला मारण्यासाठी आपटायचा नसतो. तो आपोआप परत येतो. आलेला चेंडू हातात पकडायचा असतो. जमिनीत बी पेरायचे ते पीक हाती मिळावे यासाठीच. नैसर्गिक आपत्तीने बऱ्याचदा पिकांचे नुकसान होते. यासाठीच अपेक्षा ठेवून कर्म करायचे नाही. मन निराश होऊ नये, मन खचू नये यासाठीच फळाची अपेक्षा ठेवायची नसते.
 
एकदा नुकसान होईल, दोनदा नुकसान होईल, तिसऱ्यांदा तरी चांगले पीक हाती येईलच ना? प्रयत्न सोडायचे नाहीत. सकारात्मक विचार करून वाटचाल सुरु ठेवायची. जे सदैव अपयशाची चर्चा करतात. त्यांना नेहमीच अपयश येते. जे सदैव यशाची, समृद्धीची चर्चा करतात ते सदैवी यशस्वी होतात. सकारात्मक विचारांमुळे मनाला नेहमीच धैर्य मिळते. उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. उत्पन्न कसे वाढविता येते याचे आधुनिक तंत्र आत्मसात करायला हवे. पण हे वापरताना आवश्‍यक ती काळजी घ्यायला हवी. रासायनिक खतांमुळे उत्पन्न वाढते म्हणून हव्यासापोटी वाट्टेल तशी खतांची मात्रा देणे योग्य नाही. आवश्‍यकतेनुसारच खतांचा वापर करावा. अधिक रासायनिक खत वापरले तर एकदा, दोनदा उत्पन्न वाढते. पण जमिनीचा त्यामुळे पोत बिघडतो याचाही विचार करायला हवा.
 
रासायनिक खतांच्या अधिक मात्रेमुळे जमिनीला मीठ फुठते. नायट्रोजनच्या अधिक मात्रेमुळे कधीकधी पीक करपण्याचा, जळून जाण्याचाही धोका असतो. अशा गोष्टी विचाऱ्यात घ्यायला हव्यात. शेती करताना नियोजनाचा अभाव असल्यानेच शेतीत नुकसान होत आहे. पिकावर लक्ष न ठेवल्याने नुकसान होते. पेरणी झाल्यानंतर अनेक जण शेताकडे फिरकतच नाहीत. थेट कापणीलाच शेतात जातात. उसाच्या बाबतीतही असेच केले जाते. पिकाला पाणी देताना पहिल्या सरीत पाणी सोडले जाते. त्यानंतर पाणी पुढे कोठे गेले हे पाहिलेच जात नाही.
 
घरची ओढ लागलेली असते. पाणी सोडायचे घर गाठायचे. घरात येऊन टीव्ही पाहात बसायचे. अशाने शेताची वाट लागत आहे. जमिनीला योग्य प्रमाणात पाणी न दिल्याने जमिनीचा पोत बिघडू लागला आहे. योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिकाची वाढही खुंटत आहे. योग्य वाढ न झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शेती करायची तर मन लावून करायला हवी. नोकरी करायची तर मन लावून करावी लागते. नाहीतर मालक कामावरून काढून टाकतो. या भीतीने काम व्यवस्थित होते. येथे तशी भीती नसतेच. थेट परिणाम होत नसल्याने दुर्लक्ष होते. पण काही वर्षानंतर उत्पादन घटले की मग डोळे उघडतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
 
जमिन सुधारण्यासाठी खर्च वाढतो. कर्ज काढण्याची वेळ येते. अशाने नुकसान होण्याची भीती असते. अंग मोडून काम करण्याची सवय नसल्याने कामाचा कंटाळा येतो. शेतीत काही राम राहिला नाही अशी मनस्थिती होते. नुकसानच नुकसान होते, असा व्यवसाय नकोसा वाटू लागतो. मन खचत. अशी अवस्था का होते? पिकावर योग्यप्रकारे लक्ष न ठेवल्याने होते. रुची ठेवून कोणताही व्यवसाय केला तर तो टिकतो. रुचीच नसेल तर तो व्यवसाय वाढणार कसा? आवडीने व्यवसायात हवे ते बदल करता येतात. विहीर आहे तर त्यात वीस-तीस मासे पाळावेत. शेतावर झाडे लावावीत. शेताचा परिसर स्वच्छ, आकर्षक ठेवावा. रस्ते करावेत.
 
पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारखे नवे तंत्र वापरावे. शेतीत होणाऱ्या नवनव्या बदलांचा अभ्यास करावा. शेतीच्या बाजारपेठेचा अभ्यास करावा. त्यानुसार शेतात नियोजन करावे. सतत बाजारपेठेत होणाऱ्या बदलांचा आढावा घेऊन पिकांची निवड करावी. कोणत्या पिकाची पेरणी किती झाली आहे. कोणती पिके प्राधान्याने घेतली जात आहेत. कोणत्या पिकाच्या बियाण्यास मागणी आहे? कोणते बियाणे यंदा अधिक खपले आहे. याचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर कोणत्या पिकास कमी-अधिक दर राहील याची कल्पना येते. बाजारपेठेचाही असाच अभ्यास करायला हवा.
 
काही वर्षे उसाचे पीक अधिक असते. तर काही वर्षे त्यामध्ये घट झालेली आढळते. कधी टोमॅटो अधिक होतो. तर कधी कांदा अधिक होतो. कधी भाजीपाला अधिक होतो. शेतकरी गेल्यावर्षी कोणत्या पिकास दर होता त्याचा विचार करून दुसऱ्यावर्षी त्याची अधिक लागवड करतात. असे योग्य नाही. गेल्यावषीचे गेल्या वर्षी, यंदा काय परिस्थिती आहे याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. सोयाबीनचेही तसेच आहे. कधी उत्पादन वाढते. कधी घसरते. याकडे लक्ष ठेवून पिकांची निवड करावी.
 
पावसाचे कमी अधिक प्रमाण व दुष्काळ या स्थितीमुळे शेतीच्या पिकात बदल होत आहेत. दुष्काळी पट्ट्यात ऊस अधिक दिसतो आहे. फळबागांची संख्या घटली आहे. अशा गोष्टींचा विचार हा शेतकऱ्यांनीच करायला हवा. अभ्यास केला तर उत्तरे मिळतात. डोळे झाकून बियाणे पेरायचे व शेती करायची हे दिवस आता गेले आहेत. शेतीही अभ्यास करूनच करावी लागणार आहे. पूर्वीची परिस्थिती आता नाही. भाताची काढणी झालेल्या शेतात एक नांगरट करून हरभरा नुसता फेकून दिला जातो. हरभऱ्याचे उत्पन्न मिळते. पण तेच काढणीनंतर नांगर, कुरी मारून हरभऱ्याची योग्य अंतरावर पेरणी केल्यास याहूनही अधिक उत्पन्न मिळते. शेतीची कामे करताना कंटाळा करून चालत नाही.
 
कंटाळा केला तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. व्यापारी दुकानात ग्राहक नाही म्हणून दुकान बंद करून फिरायला जात नाही. तो ग्राहकाची वाट पाहतो. आज ग्राहक आला नाही. उद्या येईल या आशेवर तो दुकानात बसून राहातो. त्याचीही सहनशीलता कधी कधी संपते. पण तरी तो व्यवसाय सोडून पळून जात नाही. टिकून राहायला शिकले पाहिजे. सहनशीलता वाढवायला हवी. झटपट पैसा मिळविण्याच्या सवयीमुळे आता ही सहनशीलता कमी होऊ लागली आहे. सहनशीलतेची सवय मोडत आहे. अशानेच जीवनात निराशा वाढत आहे. कंटाळून शेती केली जात आहे. शेती हा व्यवसाय आहे, असे समजून व्यापाऱ्यांच्याप्रमाणे कंटाळा झटकून कामाला जुंपायला हवे. तरच हा व्यवसाय वाढेल. शेतात बियाणे पेरायचे ते जमिनीला दान म्हणून नव्हे तर जमिनीतून भरघोस दाणे मिळावेत यासाठी पेरायचे.  

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    
 

 

 

Sunday, June 21, 2020

भेटी लागी जीवा... ( वारी 2019 व्हिडिओ)

 


यंदा वारी नाही, पण वारीची आठवण या आषाढात निश्चितच येत आहे. रिंगण सोहळा असो की डोक्यावर तुळसी घेऊन जाणारी माऊली असो किंवा विना घेऊन भजन करणारा वारकरी असो. सर्व वातावरण भक्तीमय असते. या भक्तीची ओढ आधीपासूनच लागते पण यंदा कोरोनामुळे त्याची तीव्रता अधिकच जाणवत आहे. भेटी लागी जीवा असे होऊ लागले आहे. कधी एकदा त्याचे दर्शन घडते असे झाले आहे. पण कोरोनात आता ही ओढ घरी बसूनच आपणास घेता यावी यासाठी 2019 मध्ये झालेल्या वारीची ही सुंदर छायाचित्रे आपल्यासाठी आणली आहेत सकाळचे कर्मचारी प्रकाश पाटील यांनी...

याचा आनंद घ्या या व्हिडिओमधून....
 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे    

 
 

ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कांनी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

 

सुख आणि ज्ञान मानसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला हवा.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621 
 
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कांनी ।
बैलाची करी वानी । पांगुळाचिया ।। 158 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - या प्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुखरुपी व ज्ञानरुपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी (नंदीबैलासारखी ) त्याची स्थिती करतो.

नंदीबैल कधी शेतात काम करताना पाहिला आहे का? तो केवळ माना डोलवतो. पाऊस पडेल का? असे विचारले तर पिंगळा जो सांगेल तशी मान डोलवतो. याचे तंत्र या पिंगळ्यांना अवगत असते. बारामती तालुक्‍यात या पिंगळ्याची घरे आहेत. तेथे याबाबतचे प्रशिक्षण या पिंगळ्यांना मिळते. हे तंत्र शिकल्यानंतर ते गावोगावी हिंडतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता चेहरा पाहून आपले भविष्य सांगतात. यातील बऱ्याचशा गोष्टी खऱ्या असतात. कसे सांगतात हे त्यांनाच माहिती. पण खरे सांगतात असा अनेकांचा अनुभव आहे. काही गोष्टी सांगून दान मागतात. हा त्यांचा व्यवसाय आहे. नदीबैलाचे खेळ करणे, मनोरंजन करणे व पैसे कमविणे हा त्यांच्या नित्याचा दिनक्रम.
 
हे सुखी जीवन ते जगतात. ज्ञानाचा त्यांना अभिमान असतो. यातच ते अडकून असतात. सध्याचा बांधावरचा शेतकरी हा अशा नंदीबैलासारखा आहे. त्याला कष्ट करण्याची सवयच नाही. पिंगळ्याप्रमाणेच तोही सुख आणि ज्ञानामध्ये अडकला आहे. शेतावर कधी जाणे नाही. घरातूनच सर्व गोष्टी तो बघतो. मीच उत्तम प्रशासक आहे. व्यवस्थापन मलाच जमते. साऱ्या गोष्टी घरातून बघता येणे शक्‍य आहे. व्यवहार समजण्याइतके आपण पारंगत आहोत असे तो समजतो. ज्ञानाच्या जोरावर माणसांकडून काम करून घेण्यासारखे आपण बलवान आहोत असाच त्याचा समज असतो. नंदीबैल काय मालक सांगेल तसेच वागतो. याची सुद्धा कामगार सांगतील तशीच शेती पिकते. असे बांधावरचे शेतकरी आता अधिक झाले आहेत.
 
विशेष म्हणजे हे बागायतदार आहेत. त्यांच्या जमीनी उत्तम प्रकारच्या पिकाऊ आहेत. पण या शेतकऱ्यांकडे कष्ट करण्याची तयारी नाही. जो दुसऱ्याचे भविष्य तोंड पाहून सांगतो. तो स्वतःचे भविष्य का घडवू शकत नाही. त्याला दारोदारी हिंडण्याची का गरज भासते. असे सांगून पैसा कमवणे हा त्याचा पारंपरिक व्यवसाय झाला आहे. सध्या बांधावरच्या शेतकऱ्यांचाही असाच पारंपरिक व्यवसाय आहे. कित्येकांना त्यांच्या शेताचा बांध माहित नाही. फक्त जमिनीची कागदपत्रे माहित आहेत. हा कागदावरचा शेतकरीच कर्ज माफीसाठी चकरा मारत आहे. राबणारा शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच ठेवत नाही. मुळात तो कर्ज काढण्याच्या भानगडीतही पडत नाही. कष्टाने चार पैसे मिळतात त्यात तो समाधान मानतो.
 
यावेळी मिळाले नाहीत तरी दुसऱ्यांदा जरूर मिळतील अशी आशा ठेवून कष्ट करतो. सुख आणि ज्ञान मानसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला हवा. शेतात जाऊन शेतीचा, मातीचा अभ्यास करून मातीशी नाते घट्ट करून शेती करायला हवी. तरच ती माती आपलीशी होईल. अन्यथा ती दुसऱ्याची व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन शेती करायला हवी.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी http://t.me/Dnyneshwari  येथे क्लिक करा. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
 
#Spiritual #आध्यात्मिक #ज्ञानेश्वरी #Dnyneshwari #RajendraGhorpade #राजेंद्रघोरपडे