Tuesday, November 15, 2011

चौथी भक्ती

तैसा मी एकवांचूनी कांही । तया तयाही सकट नाहीं ।
हे चौथी भक्ती पाहीं । माझी तो लाहे ।।

नव्या पिढीला सतत नामस्मरण, चोविस तास माळांचा जप या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत. याची टिंगळ टवाळी या पिढीकडून होत आहे. हे खरे आहे की मनाने नमस्कार केला तरी तो देवापर्यंत पोहोचतो. यासाठी देवळात जाण्याचीही गरज नाही. नुसते स्मरण ही सुद्धा देवाची भक्ती आहे. चांगल्या विचारांचा आचार ठेवला तरी त्याला देवत्व प्राप्त होते. वाल्हाने "मरा',"मरा'... असा जप केला तरी त्याच्यावर राम प्रसन्न झाला. पापांचा डोंगर उभा करूनही देव त्यांच्याच पाठीशी आहे. ही कसली भक्ती? देव दुष्टांच्या जरूर पाठीशी असतो. पण त्याचा उद्देश त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा असतो. म्हणूनच वाल्हाचा वाल्मिकी झाला. दुष्टांना मृत्यूदंड ही शिक्षा नाही. यामुळे दुष्ट नष्ट होतात दुष्टत्व संपत नाही. दुष्टत्व हे मनात असते. देव या दुष्टांची मने बदलू इच्छित आहे. मन परिवर्तन हा देवाचा मुख्य उद्देश आहे. दुष्टांच्यातील दुष्टत्व नष्ट करणे. त्याला सदाचारी बनवणे. त्या वाटेवर तो पुन्हा फिरकणार नाही, असा बदल त्याच्यात घडवतो. सद्‌गुरुही हेच करत असतात. दुष्टांचे मन परिवर्तन झाले, तरच खऱ्या अर्थाने शांती नांदेल. मृत्यूदंडाच्या शिक्षेने एक दुष्ट मारला जाईल. दोन दुष्ट तुम्ही मारू शकाल. असे किती दुष्ट तुम्ही मारत बसणार. दररोज तोच उद्योग करावा लागेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागेल. त्यावर मोठा खर्चही होईल. हा खर्च वाढतच जाईल. कारण एकाला मारले की, उद्या तिथे दुसरा कोणीतरी निर्माण होतो. हे न संपणारे चक्र आहे. त्या ऐवजी दुष्ट विचारच नष्ट करणे अधिक सोयीस्कर आहे. सद्‌गुरू तेच करतात. भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकूर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच तो भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि आता सद्विचारांचा मार्ग धरा. देव तुमच्याच पाठीशी आहे. तुमच्यातही देवत्त्व जागृत होऊ शकते.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Thursday, November 10, 2011

शांती

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरूष ।।

देशात शांती नांदली, तर विकासाला निश्‍चितच प्रोत्साहन मिळते. घरात शांती असेल, तर घरातील वातावरण प्रसन्न राहाते. समाधानामुळे प्रगती होते. घरात भरभराट होते. यासाठी मन समाधानी असायला हवे. समाधानानेच शांती येते. लोभ, क्रोध, माया, मोह आदींमुळे शांती लोप पावते. शांतीचा विनाश होतो. यासाठी यावर नियंत्रण ठेवायला हवे. पण ते जमत नाही. सध्याच्या चंगळवादी युगात तर हे आता अशक्‍यच वाटत आहे. प्रत्येकजण लोभी होताना दिसत आहे. स्पर्धेमुळे एकमेकाचे ऊनुदुणे काढण्यातच समाधान मानले जात आहे. अशानेच शांती लोप पावत आहे. एकमेकामध्ये दुरावा वाढत आहे. यासाठी विचारसरणीच बदलायला हवी. माणसांना बदलता येत नाही. यासाठी आपणच आपल्या प्रगतीसाठी आपल्या विचारात बदल करायला हवा. चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट विचार करून स्वतःला व साहजिकच आसपासच्या सर्वांना त्रस्त करण्याऐवजी चांगल्या विचाराने इतरांची मने जिंकायला हवीत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडी निवडीही वेगळ्या असतात. काळ वेळेनुसार आवडही बदलते. घरातच पाहीले तर आईला दोडका आवडतो. तर वडीलांना वांगे आवडते. भावाला कारले आवडते तर बायकोला मेथी आवडते. स्वतःची आवड याहून वेगळी असते. आवडनिवड सारख्या असणाऱ्या व्यक्तींची मने जुळतात असे म्हणतात. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. हे क्षणीक असते. प्रत्येकाची विचार करण्याचीही पद्धतही वेगळी असते. मोहाने आवड निर्माण होते. वासनेमुळे त्याला प्रोत्साहन मिळते. वासनेने एकत्र आलेली मने भोगापूर्तीच एकत्र असतात. भोगानंतर पुन्हा दुरावा निर्माण होतो. यासाठी वासनेवर नियंत्रण ठेवायला हवे. सद्विचारांनीच दुष्ट विचारावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सद्‌ विचारांची सवय मनाला लावायला हवी. यातूनच मनाला प्रसन्न ठेवता येते. समाधानी ठेवता येते. समाधानी मनाने शरीरात शांती नांदते. शरीरात तसा बदल घडतो. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हा बदल आवश्‍यक आहे. ठराविक स्थिती प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Sunday, November 6, 2011

कुंडलिनी जागृती

कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकासूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ।।

आजकाल कोणत्याही गोष्टीत प्रथम फायदा-तोटा पाहिला जातो. गोष्ट फायद्याची असेल, तर तिचा स्वीकार पटकन केला जातो. यासाठी अध्यात्माचा नेमका फायदा काय आहे. याबाबत सध्याच्या युगात जागृती करण्याची गरज आहे. पण याचा फायदा मिळायला अनेक वर्षे लागतात. यासाठी तसा त्यागही करावा लागतो. गुरुकृपा झाली तर मात्र पटकन लाभ होतो. पण यासाठी साधना करावी लागते. नित्य साधनेने आत्मज्ञान प्राप्ती सहज शक्‍य आहे. ध्यान, साधना याचे फायदे काय आहेत यासाठीच प्रथम जाणून घेण्याची गरज आहे. फायद्याच्या गोष्टी दिसल्यातर नव्या पिढीला अध्यात्माची गोडी निश्‍चितच लागेल. ध्यानाने मन स्थिर होते. मनातील दुष्ट विचार नाहीसे होतात. त्यावर नियंत्रण बसते. ध्यानधारणेच्या प्रक्रियेत कुंडलिनी जागृतीला महत्त्व आहे. सतत नामस्मरणाने, भक्तीने कुंडलिनी सहज जागृत होते. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राची नित्य साधना केल्यास गुरूकृपा होऊन कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृतीस शास्त्रीय आधार आहे. विज्ञानाच्या युगातील पिढीने हे शास्त्र जाणून घेण्याची गरज आहे. अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. येथे चमत्कार, जादू यांना थारा नाही. चमत्कार, जादू ही फसवणूक आहे. जे चमत्कार करून दाखवतात. जादू करून दाखवतात. ते स्वतःला व इतरांनाही फसवत असतात. यासाठी कुंडलिनी जागृतीचे शास्त्र अभ्यासने गरजेचे आहे. शरीरातील शक्ती केंद्रे, जाणून घ्यावीत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूरी चक्र, ह्रद्‌यचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र ( तेजचक्र), ललाटचक्र, सहस्त्राधारचक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कुंडलिनी नावाची तेजःशक्ती- निजाशक्ती जेव्हा त्यांच्या दोषांचा नाश करते तेव्हा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यास प्रतिबंधक असलेली कारणे नष्ट होऊन त्याला सुक्ष्म व शुद्ध बोधव्य लाभते.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406