Friday, September 30, 2011

भक्तीचा महिमा

भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये ।
तो मी तुझे जाहालो आहें । खेळणें आजि ।।

इतिहासातील अनेक गोष्टी आपणास पटत नाहीत. त्यावर विश्‍वास ठेवण्याऐवजी अविश्‍वास व वादग्रस्तपणाच अधिक वाढविला जात आहे. अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान कृष्ण होते. गोरा कुंभाराची मडकी स्वतः विठ्ठलाने वळली. तर बहिणाबाईंना जात्यावर पिठ दळायलाही त्याने मदत केली. भक्ताची भक्ती इतकी महान आहे. की येथे चक्क भगवंत त्याच्या मदतीला धावून येतो. भक्ताला त्याच्या प्रत्येक कामात सहकार्य करतो. पण सध्याच्या युगाला या गोष्टी पटणाऱ्या नाहीत. हे कसे शक्‍य आहे. असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. इतिहासात एक गोष्ट मात्र चांगली आहे. रचनाशास्त्रात मात्र या नव्या पिढीचा पराभव होतो. जगातील अनेक मंदीरे, वास्तू अशा आहेत की त्या बांधल्याच गेल्या कशा यावर विश्‍वास बसत नाही. आहे ना गंमत. होतो ना येथे होतो ना पराभव. नव्या पिढीला उच्च तंत्रज्ञानाचा अहंकार चढला आहे. पण त्या काळात यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते. हे मात्र मान्य करावेच लागते. थोडा विचार केला तर या भक्तीच्या गोष्टीही मनाला पटू शकतील. शास्त्राच्या आधारावर बोट ठेऊन चालणारी नवी पिढी सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. त्यांना तो सिद्धांत सिद्ध करून दाखविला तरच त्यावर विश्‍वास बसतो. अध्यात्मही अनुभूतीवर चालते. अनुभूती आल्यावरच अध्यात्मातावर विश्‍वास बसतो. अन्यथा देवाचे अस्तित्वच नाही अशा भ्रामक कल्पनेत तो वावरतो. देवाचे अस्तित्व आता नव्या पिढीला कसे पटणार? आणि नवी पिढी पटले तरच स्वीकारणार. प्रल्हादासाठी देव खांबात प्रकटला. त्याने नृसिंह अवतार घेतला. आता नव्या पिढीला असा नृसिंह अवतार झाला तरच तो पटणार आहे. इतकी ही पिढी पुढे गेली आहे. देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे. पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. हिरण्यकश्‍यपूच्या अहंकाराने त्याचे अस्तित्व झाकले जात आहे. प्रत्येकाच्या मनातच प्रल्हाद दडला आहे. त्याचे अस्तित्व नित्य आहे. फक्त त्याची जागृती जाणवायला हवी. मनातच त्याचे अस्तित्व जागृत करायला हवे. यासाठी त्याची अनुभूती यायला हवी. मग आपोआपच विश्‍वास बसेल.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Thursday, September 29, 2011

आळस

मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावे वेगीं ।।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।।
एखाद्या गोष्टीत विजयी व्हावे अशी जर इच्छा असेल तर ती गोष्ट मनापासून करायला हवी. ती करताना आळस करून चालणार नाही. नाहीतर विजय हस्तगत करता येणार नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे माणूस संपतो. राज्ये बरखास्त होतात. सीमेवर पहारा देणारा सैनिक जर आळशी असेल तर राज्य कसे टिकेल. परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांने आळस केला तर काय होईल? आळस केल्यावर गुणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल. यासाठी कामात आळस हा असताच कामा नये. आळस करून विजयाची अपेक्षा ठेवणे चुक आहे. विजयी व्हायचे असेल तर प्रथम आळस हा झटकायलाच हवा. तलवार जर तशीच ठेवली तर तिला गंज चढतो. तिची धार कमी होते. भाजी चिरायच्या विळतीचेही तसेच आहे. वापर नाही केला तर तिचीही धार कमी होते. गंजामुळे धार जाते. जीवनाचेही तसेच आहे. आळस, कंटाळा केलातर त्यालाही गंज चढतो. जीवनाची धार कमी होते. धार येण्यासाठी नियमीतपणा हवा. रोजच्या वापरात असणाऱ्या विळीला चांगली धार असते. भाज्या कापून कापून तिचा धारधारपणा वाढतो. दररोज फरशी पुसली तर तिची जशी चकाकी वाढते. तसे जीवनात कंटाळा घालवला तर नेहमीच ताचे तवाने राहता येते. मन प्रसन्न ठेवता येते. आळस हा मनातच असतो. तो घालविण्यासाठी मनाची शुद्धता गरजेची आहे. अध्यात्मिक वाचनातून, पारायणातून मनाला शुद्धता येते. या शुद्धतेनेच धार चढते. कर्माने त्रास होतो म्हणून त्याचा कंटाळा करणे योग्य नाही. नोकरीत त्रास होतो म्हणून नोकरी सोडून कसे चालेल. हा त्रास सोसायलाच हवा. आळस झटकायला हवा. आळस माणसाला संपवतो. तो कधीही संपत नाही. यासाठी आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406