Friday, May 5, 2017

स्वेटर उद्योगातून दिला महिलांना रोजगार

कोल्हापूर शहराच्या रमणमळा परिसरातील मालती माधवराव बेडेकर यांनी घरची शेती सांभाळत स्वेटर विणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या तीस वर्षांत त्यांनी या व्यवसायात चांगले यश मिळविले. स्वतःसह शेजारच्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन कायम स्वरूपी रोजगार मिळवून दिला.

राजेंद्र घोरपडे

एखाद्या कामाची आवड असेल तर त्यात निश्‍चितच मोठे यश मिळते. कोल्हापूर शहरातील मालती माधवराव बेडेकर यांना स्वेटर विणण्याची आवड होती. मालतीताई लग्नानंतर कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या रमणमळा येथे राहाण्यास आल्या. त्यांचे पती कोल्हापूर शुगरमीलमध्ये नोकरीस होते. रमणमळा येथे घरालगतच बेडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आणि गुऱ्हाळ होते. सहा गायी, दोन म्हशी यांचा सांभाळ करत त्यांनी शेतीत विविध पीकपद्धतीचे प्रयोगही केले. सहा वर्षे मत्स्यशेती केली. ज्वारी बीजोत्पादनही घेतले. पुढे कोल्हापूर शहराच्या वाढत्या विस्तारात मात्र त्याच्या शेतीला मर्यादा आली.

स्वेटर व्यवसायाला झाली सुरवात ः
घरची कामे झाल्यानंतर फावल्यावेळेत काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक महिलेला असतो. मोकळ्या वेळेत स्वेटर विणणे ही मालतीताईंची आवड. या आवडीनेच त्या स्वेटर निर्मितीत गुंतल्या. यात पुढे विकास करायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मालतीताईंनी मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा "वूलन मशिन निटिंग' हा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली त्यांन स्वेटर निटिंग यंत्र खरेदी केले. तेव्हा या यंत्राची किंमत हजार रुपये होती. स्वेटर विणण्यास सुरवात केली, पण या आधुनिक यंत्राच्या वापराची फारशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी यंत्र खरेदीदाराकडून पुणे येथे यंत्र वापराबाबत प्रशिक्षण घेतले.

ओळखीतून वाढला व्यवसाय
स्वेटरचा वापर हा हंगामी आहे. त्यामुळे हिवाळी हंगामातच स्वेटरला मागणी असते. तरीही जिद्दीने मालतीताईंनी मध्ये निटिंग यंत्राचा वापर करून स्वेटर विणण्यास सुरवात केली. एकमेकांच्या ओळखीनेच स्वेटरची मागणी वाढत गेली. ओळखीतून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या साधकांकडून पांढरे स्वेटर व शाल तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. पहिलीच ऑर्डर असल्याने उत्सुकता होती. या कामात त्यांना त्यांचे पती माधवराव यांनी लोकरीचे गुंडे तयार करण्यासाठी मदत केली. व्यवसायवाढीच्या दृष्टीने मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उत्पादनाच्या विक्रीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महिला उद्योजक समितीतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला.

तीन यंत्रांची खरेदी ः
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असते. च्या काळात बाजारात स्वेटर शिलाईची आधुनिक यंत्रे येत होती. उत्पादनांचा वेग वाढला होता. अशा काळात उत्पादनास असणारी मागणी विचारात घेऊन आधुनिक यंत्रे विकत घेण्याचा विचार मालतीताईंनी केला. अडीच लाखांचे कर्ज घेऊन दोन कॉम्प्युटराईज्ड आणि एक कार्डोमेट्रिक यंत्राची त्यांनी खरेदी केली. या यंत्रावर काम करण्यासाठी कामगारांची गरज होती. अशावेळी त्यांनी अन्य कामगार न निवडता परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. या यंत्रामुळे दिवसाला तीन ते चार स्वेटर विणले जायचे.

महिलांना मिळवून दिला रोजगार ः
स्वेटर व इतर लोकरीची कपडे तयार करताना विविध कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. सध्या मालतीताईंकडे महिला यंत्रावर काम करतात, तर महिलांना हातावरचे काम आहे. लोकरीचे गुंडे, शिलाई या कामासाठी प्रत्येकी दोन महिला आहेत. सहा महिला या दररोजच्या रोजंदारीवर काम करतात. त्यांना कामानुसार महिना तीन ते पाच हजार रुपये इतका पगार दिला जातो. दहा ते पंधरा महिला घरचे काम सांभाळून शिलाई कामात मदत करतात. त्या महिलांना नगास सरासरी रुपये व शिलाईसाठी नगास रुपये दिले जातात. मालती यांच्याकडे स्वेटर शिलाई काम करणाऱ्या काही मुली होत्या. लग्नानंतर त्यांना स्वेटर काम करणे अवघड होते. अशा तीन मुलींना मालतीताईंनी स्वेटर विणण्याचे यंत्र घेऊन दिले. लोकरीच्या वजनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते.
स्वेटर व इतर विविध प्रकारची उत्पादने करण्यासाठी रोज अंदाजे तीन ते चार किलोची लोकर लागते. वर्षाला अंदाजे किलो लोकर लागते. हा सर्व कच्चा माल दिल्ली व लुधियाना येथील मिलमधून मागविण्यात येते. दिवसाला साधारणपणे स्वेटर तयार होतात. महिन्याला अंदाजे हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या स्वेटरचे उत्पादन होते. हंगामानुसार कमी-जास्त उत्पादन होते.

लोकरीची विविध उत्पादने ः
लहानांपासून मोठ्यांसाठी लागणारे विविध प्रकारच्या स्वेटरचे उत्पादन मालतीताई करतात. बेबी सेट, पायमोजे, बंडी, फ्रॉक, लहान मुलांचे स्वेटर, लेडिज टॉप, कुर्तीज, लॉंग स्वेटर्स, कार्डीगन्स, जेन्टससाठी हाफ व फुल हाताचे स्वेटर्स, नेहरू स्वेटर्स, बाहुल्या अशी विविध उत्पादने तयार केली जातात. टोप्या, जर्किनमध्येही विविध प्रकार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीनुसारही विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही दुकानदार पूजेसाठी लागणारे आसन, रुमाल तसेच तोरण आदींची मागणी करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरनुसार मालाचा पुरवठा करण्यात येतो.

प्रदर्शनातून विक्री ः
सुरवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मालतीताई रमणमळा चौकात स्वतः मांडव उभारून स्वेटरची विक्री करीत होत्या. मालतीताईंनी थंडीच्या हंगामात इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, महाबळेश्‍वर, बेळगाव येथे प्रदर्शने भरविली. आता स्वेटरच्या थेट ऑर्डर मिळत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी प्रदर्शने बंद केली. फक्त कोल्हापुरातच दिवाळीनंतर डिसेंबरअखेरपर्यंत प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त स्वयंसिद्धा, भगिनी महोत्सवातर्फे आयोजित प्रदर्शनामध्येही त्या स्वेटरची विक्री करतात. स्वेटर निर्मितीमधील धडपड पाहून त्यांना सकाळ (तनिष्का-मधुरांगण), रोटरी क्‍लब, स्वंयसिद्धा संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.


Saturday, March 25, 2017

मातीच्या कलाकृतींनी दिली सुमनताईंना वेगळी ओळख

कोल्हापूर शहरातील सुमन बारामतीकर यांनी महिला बचत गटाची स्थापना केली. पापड-लोणची, चटणी मसाले या नेहमीच्या उद्योगापेक्षा काहीतरी वेगळा उद्योग असावा, या उद्देशाने मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू तयार करून विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेल्या बारा वर्षांत त्यांनी या उद्योगात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.
राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरातील सुमन चंद्रकांत बारामतीकर यांनी घरकामानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळात स्वतःचा काही लघू उद्योग असावा, या उद्देशाने २००४ मध्ये वरद महिला बचत गट सुरू केला. शिवणकाम, पापड-लोणची, चटणी-मसाले निर्मितीवर महिला बचत गटांचा भर असतो. मात्र, यापेक्षा वेगळे उत्पादन असले पाहिजे असे सुमनताईंना नेहमीच वाटायचे. पण कशाचे उत्पादन करायचे? हा विचार त्यांना नेहमीच सतावत होता. याच काळात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमध्ये चहा पिण्यासाठी मातीचे कुल्हड वापरण्यावर भर दिला होता. मातीचे कुल्हड तयार करण्यासाठी रेल्वेने महिला बचत गटांनाही प्रोत्साहन दिले. रेल्वेच्या आश्‍वासनाचा सकारात्मक दृष्टीने विचार करून सुमनताईंनी मातीचे कुल्हड करण्याचा निर्णय घेतला.
सुमनताईंचे दीर यशोवर्धन बारामतीकर हे खादी ग्रामोद्योगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार सुमनताईंनी खानापूर (जि. बेळगाव) येथे खादी ग्रामोद्योग केंद्राच्या कार्यालयामार्फत मातीपासून कुल्हड तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. कच्चा मालाची उपलब्धता विचारात घेऊन त्यांनी खानापूर येथेच भाडेतत्त्वावर जागा घेऊन कुल्हड उत्पादन सुरू केले; पण काही दिवसांतच रेल्वेने कुल्हडची मागणी बंद केली. त्यामुळे तयार कुल्हड विकायचे कोठे? असा प्रश्‍न सुमनताईंना पडला. हे कुल्हड भांडी म्हणूनही वापरता येऊ शकतात, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी दही भांडी म्हणून त्याची विक्री सुरुरू केली. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमनताईंचा उत्साह वाढला. त्यामुळे त्यांनी मातीपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे ठरवले.


लघुउद्योगाला सुरवात ः


सुमनताईंनी गार्डन पॉट (झाडे लावायच्या कुंड्या) तसेच शोपीस प्रकारामध्ये घंटा, अगरबत्ती स्टॅंड, पेन स्टॅंड, ग्लास, मुखवटे, भातुकलीचा सेट, विविध आकाराचे गणपती, महादेवाची पिंड, वाद्य वाजविणाऱ्या कलाकरांचा सेट, विविध प्रकारचे कॉर्नर पॉट, फुलदाण्या तसेच स्वयंपाक घरात लागणारी विविध आकारांतील दही भांडी, पाण्याचे ग्लास, माठ, मातीचा फिल्टर, मातीची बाटली, दीपावलीनिमित्त दिवे, पणत्यांचे विविध प्रकार आदी उत्पादनांची खानापूर येथे निर्मिती सुरू केली. यासाठी पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली. विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सुमनताईंनी वीस हजार रुपयांचे इलेक्‍ट्रीक व्हील खरेदी केले. सोबत प्रशिक्षित कारागीर घेतले. मातीची भांडी भाजण्यासाठी सध्या त्या लाकडी भट्टीचा वापर करतात.
वस्तूनिर्मितीबाबत सुमनताई म्हणाल्या, की वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे सहज उपलब्ध होत असल्याने तेथेच उत्पादने घेण्याचा निर्णय घेतला. उत्पादनासाठी मुख्य गरज असते ती मातीची. शोपीससाठी लाल माती, चिकण माती, गाळाची माती व पांढरी माती (शाडू) लागते. स्वयंपाकाच्या भांड्यासाठी लाल माती, चिकण माती, रेती लागते. भट्टीसाठी लाकडे लागतात. बाजारपेठेच्या मागणीनुसारच वस्तू तयार केल्या जातात. दर महिन्याला स्वयंपाकाची भांडी अंदाजे ५०० नग, दह्याची भांडी अंदाजे एक हजार नग, शोपीसचे विविध प्रकार अंदाजे एक हजार नग इतकी निर्मिती केली जाते.
सुमनताईंनी सहा महिला कामगार आणि चार पुरुष कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. यांना वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच सुमनताई स्वतः वस्तू तयार करतात. माती कालवणे, उत्पादनानुसार मातीचे मिश्रण तयार करणे आणि भट्टीसाठी पुरुष कामगार लागतात; परंतु महिला, पुरुष असा फरक न करता वस्तूंच्या नगावर कामगारांचा पगार ठरविला आहे. नियमित काम असतेच असे नाही. तसेच निर्मिती करताना बराच माल वाया जातो. काही वस्तू व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मातीच्या वस्तू असल्याने फुटण्याचा धोका अधिक असतो. हे सर्व टाळण्यासाठी कामगारांना चांगल्या नगाच्या उत्पादनावरच पगार दिला जातो. विविध प्रकारानुसार नगाला ८ ते १२ रुपये कामगारांना देण्यात येतात.

स्वयंसिद्धा, भीमथडीतून वस्तूंची विक्री ः

उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी सुमनताईंना बचत गटाचा मोठा आधार मिळाला. सुमनताईंचे माहेर वडणगे (जि. कोल्हापूर) असल्याने त्यांनी तेथील यशस्वी महिला बचत गटात त्या सहभागी आहेत. जिल्हा परिषदेमार्फत भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनातून विविध वस्तूंच्या विक्रीला व्यासपीठ मिळाले. वर्षातील दहा महिने प्रदर्शनात विक्री होते. सुमनताईंना मुख्य आधार मिळाला तो कोल्हापुरातील स्वयंसिद्धा या संस्थेचा. या संस्थेमार्फत विविध ठिकाणी मोठी प्रर्दशने भरविण्यात येतात. या प्रदर्शनात स्टॉल मांडून विविध वस्तूंची विक्री सुमनताई स्वतः करतात. विविध उत्पादनांची विक्री कशी करावी, यासाठी ग्राहकांशी कसे बोलायचे, कसा व्यवहार करायचा आदीचे मार्गदर्शन स्वयंसिद्धाने त्यांना दिले. याचा त्यांना मोठा फायदा झाला. पुणे येथे भीमथडी जत्रा भरविण्यात येते. या चार दिवसांच्या जत्रेमध्ये विविध वस्तूंची सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे सुमनताई सांगतात. याव्यतिरिक्त खादी ग्रामोद्योग प्रदर्शने, माणदेशी जत्रा तसेच पुणे, सातारा, मुंबई, ठाणे येथे भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उत्पादनांची विक्री सुमनताई करतात. ९५ टक्के मालाची विक्री प्रदर्शनातूनच होते. महिन्याला अंदाजे साठ हजार रुपयांची उलाढाल होते. विविध वस्तूंचे उत्पादन व वाहतूक, कारागिरांचा पगार, इतर खर्च वजा जाता सुमनताईंना महिन्याला पंचवीस हजार रुपये शिल्लक राहतात.

घरच्यांचेही प्रोत्साहन

प्रदर्शनासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी जावे लागते. सततचा प्रवास आणि वाहतूक यामुळे या कामात घरच्यांचा सुमनताईंना मोठा आधार मिळतो. सुमनताईंचे पती चंद्रकांत, मुलगी रूपाली, भाऊ सयाजीराव घोरपडे यांचे सहकार्य लाभते. त्यांच्या सहकार्यामुळेच व प्रोत्साहनामुळे या कामात यश मिळाल्याचे सुमनताई सांगतात. उपक्रमशीलतेची दखल घेत सुमनताईंना स्वयंसिद्धा संस्था आणि भीमथडी जत्रेतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संपर्क ः सुमन बारामतीकर ः ९२२५५१६१९६


Thursday, March 16, 2017

धान्यातील आर्द्रता मोजणारा मापक

ज्वारी, गहू, भात आदी तृणधान्ये कापणीनंतर उन्हामध्ये वाळवली जातात. पूर्वीच्या काळी माळावर मळणी व वाळवण चालायचे; पण सध्या जागेचा अभाव असल्याने धान्य योग्य प्रकारे वाळवले जात नाही. अशा बदलत्या परिस्थितीमुळे धान्य खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान्याची साठवणूकही करण्यासाठी पूर्वीच्या काळी हौद, कणग्या यांचा वापर केला जात होता; पण सध्या पोत्यामध्ये धान्य साठवण्यात येते. धान्यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक ओलावा राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीही त्यावर वाढतात. या प्रकारामुळे हे धान्य खराब होत आहे. हा प्रश्‍न फक्त भारतातच आहे असे नाही, तर जगभर ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जगभरातील कृषी विद्यापीठांत यावर संशोधन केले जात आहे. कॅन्सस विद्यापीठ आणि कृषी संशोधन सेवा यांच्या गटाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणामुळे जवळपास 30 टक्के धान्य खराब होण्यापासून वाचण्यास मदत झाली आहे. कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ पॉल आर्मस्ट्रॉंग आणि कॅन्सस विद्यापीठाच्या संशोधकांनी धान्याच्या पोत्यातील आर्द्रता मोजणारे उपकरण विकसित केले आहे. शेतकऱ्यांना सहजपणे हाताळता येऊ शकेल, असे हे उपकरण आहे. हे उपकरण धान्यातील सापेक्ष आर्द्रता आणि तापमान मोजते व त्यावरून धान्यातील ओलाव्याचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. या उपकरणास जोडलेली सेन्सर नळी थेट पोत्यामध्ये खुपसण्यात येते. यावरून सहा मिनिटांमध्ये त्या पोत्यातील धान्यात किती ओलावा आहे हे स्क्रीनवर दिसते. सध्या हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर इथोपिया, बांगलादेश आणि ग्वाटेमाला या देशांतील शेतकऱ्यांना वितरित केले आहे. हे उपकरण वापरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आर्मस्ट्रॉंग व त्यांचे सहकारी विचारत घेत आहेत. या उपकरणात वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची क्षमता वाढविणे, सहा मिनिटांचा लागणारा कालावधी कमी करणे, स्मार्ट फोनशी हे उपकरण जोडणे आदीवर त्यांचे संशोधन सुरू आहे.

Saturday, March 4, 2017

एबीपीमाझाचे आभार

ऎबीपी माझा तर्फे कोल्हापूरातील सयाजी हाॅटेलमध्ये आयोजित रिइनव्हेंट महाराष्ट्रा ए टेक्नाॅलाॅजी या विषयाच्या सेमीनारमध्ये आज सहभागी होण्याची संधी मिळाली. माझ्या श्री अथर्व प्रकाशनकडून मी सहभागी झालो होतो. कोल्हापूरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. आपणही एक संस्था चालवतो. याची जाणिव कधी मला झालीच नाही. पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करताना या व्यवसायात मी नवे तंत्र पुरेपुर वापरले. नोकरी करत हा व्यवसाय करताना खरंतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच मला प्रोत्साहन मिळाले. खरचं किती सोपे झाले आहे काम याची जाणिव या सेमिनारमुळे झाली. खरंतर प्रथम विश्वासच वाटत नव्हता आपण एक उद्योजकही आहोत याचा...पुस्तक प्रकाशित करणे हे एक आव्हान असते आणि ते खपवणे हे त्याहूनही कठीण काम असते पण हे आव्हान आपण स्वीकारले. त्यात यशही मिळाले साहित्यिक संस्थांचे पुरस्कारही मिळाले. इतके यश आपण मिळवले हजारो-हजारो प्रती खपवून आपण नावही कमावले हे कधी वाटलेही नाही पण या सेमिनारने मला त्याची जाणिव दिली. नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन धंदा आणखी वाढविण्याची उमेद माझ्यात जागी केली. यासाठी संयोजकांचे आभार जरुर मानायला हवेत. एचपीचेही आभार कारण त्यांच्या तंत्रज्ञानानेच आपण हे यश मिळवले आहे. डेलीहंटसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाची साथ तर आहेच. पण याची जाणिव झाली नवी उमेद माझ्यात जागी झाली यासाठी एबीपीमाझाचे आभार जरुर मानायला हवेत...

Thursday, February 23, 2017

कृषी पंढरी - व्हिजन 2050

वाढती लोकसंख्या आणि बदलते जागतिक हवामान यामुळे पुढील काळातील शेतीचा आढावा कृषी संशोधकांना नेहमीच घ्यावा लागतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने व्हिजन 2050 पर्यंतचा आढावा घेत शेतीतील आव्हाने आणि संधी याचा शोध घेतला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शेतीचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असते. तसेच बदलत्या जागतिक हवामानाचा परिणाम शेतीवर होतो, याचाही विचार मांडणे गरजेचे असते. त्यानुसार संशोधनाच्या पद्धतीही विकसित कराव्या लागतात. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.2246 अब्ज इतकी आहे. 2050 पर्यंत ही लोकसंख्या 24 टक्‍क्‍यांनी वाढेल म्हणजे ती 1.650 अब्ज इतकी असेल. सध्या 31 टक्के जनता शहरात राहते. 2050 पर्यंत हे प्रमाण 55 टक्के इतके होईल. यामुळे पुढील काळात शेतीसमोर अन्नसुरक्षा, अन्नधान्य उत्पादनवाढ, बदलते तपमान, जमिनीचा पोत टिकवणे, जमिनीचे पडणारे तुकडे, पाण्याची टंचाई आणि पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव ही मोठी आव्हाने आहेत. सध्याच्या स्थितीत उत्पादित मालाची साठवणूक व वाहतूक योग्य प्रकारे होत नसल्याने नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. भावी काळात ही नासाडी रोखण्यावर भर द्यावाच लागेल. त्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर करावा लागेल. बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. भावी काळात देशाच्या उत्तर भागात व द्वीपकल्पावर पाण्याची टंचाई व पाण्याची गुणवत्ता ही समस्या भेडसावणार आहे. समुद्रातील पाण्यात वाढते क्षारांचे प्रमाण आणि नदी-तलावातील पाण्याच्या वाढत्या तापमानाचा परिणाम माशांचे प्रजनन आणि उत्पादनावर होणार आहे. 2050 पर्यंत गहू आणि मक्‍याचे उत्पादन पाच ते दहा टक्‍क्‍यांनी घटणार आहे. जवळपास देशात 60 टक्‍क्‍यावर कोरडवाहू शेती केली जाते, यालाही मोठा फटका बसू शकतो. असे असले तरी हवामानातील बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेती हा एक घटक असल्याने त्यानुसार शेतीमध्ये बदल करण्याचे आव्हान संशोधकांसमोर असणार आहे. वाढत्या हवा व पाणी प्रदूषणामुळे जमिनीची गुणवत्ताही घसरणार आहे. दरवर्षी भारतात 0.8 मे. टन नायट्रोजन, 1.8 मे. टन स्फुरद, 26.3 मे. टन पालाशची घट होते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात होणारी घट याचेही आव्हान संशोधकांसमोर आहे. भावी काळातील 1498 अब्ज घन मीटर इतकी पाण्याची मागणी राहणार आहे. पण केवळ 1121 अब्ज घन मीटर इतकेच पाणी उपलब्ध आहे. साहजिकच भूजल आणि नदीतील पाण्याचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे आव्हान देशासमोर असणार आहे. जैवविविधता जपली नाही तर उत्पादनावर दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. केवळ चारच पिकांपासून जगातील 60 टक्के अन्न पुरवले जाते. पण या पिकांची घसरणारी जनुकीय विविधता ही मोठी धोक्‍याची घंटा आहे. 1900 पासून शेतकऱ्यांच्या शेतीतील जवळपास 75 टक्के पीक विविधता नष्ट झाली आहे. यासह रोग प्रतिकारकक्षमता असणाऱ्या पाळीव देशी जनावरांच्या जातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या जनावरांच्या जातींचे संवर्धन हा विषय नेहमीच संशोधन परिषदेच्या अजेंड्यावर राहिला आहे. आशिया आणि आफ्रिकेतील गव्हाच्या 80 टक्के जाती हवेतून पसरणाऱ्या नव्या बुरशीला बळी पडत आहेत, असा अहवाल अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे; तर जनावरांमध्येही श्‍वसनाचे विकार, एव्हीअन फ्लू यासारखे आजार झपाट्याने वाढत असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत विचार करता भावी काळात हवामान, पाणी, जमीन आणि जैवविविधता हे शेतीच्या उत्पादनावर परिणाम करणारे घटक कृषी संशोधकांसाठी आव्हान असणार आहेत.

- राजेंद्र घोरपडे 

Thursday, January 12, 2017

ज्ञानेश्‍वरी परंपरा आणि देवनाथांचा शोध

भारतात अनादि कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरुशिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. नराचा नारायण करणारी ही गुरु-शिष्य परंपरा आहे. ब्रह्मसंपन्न, आत्मज्ञानी गुरुंकडून ज्ञानदान यात केले जाते. ज्ञानदानाचा हा वारसा अनुवंशिक नाही. याला जातीचे, वयाचे, उच्च-नीचतेचे बंधनही नाही. कोणीही व्यक्ती या ज्ञानाचा लाभार्थी होऊ शकतो. भक्तीने ते ज्ञान मिळवता येते. अनादी कालापासून आत्मज्ञानी गुरु-शिष्याची सुरु असलेली ही भक्तीची परंपरा... 
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । 
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्मम्‌ ।। 

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । 
भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि ।। 

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्‍वराः । 
गुरुःसाक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

अखण्ड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्‌ । 
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

प्रल्हाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीष । 
शुकशौनक-भीष्मदाल्भ्याम ।। 

रुक्‍मांगदार्जुन वसिष्ठ बिभीषणादी पुण्यानिमान्‌ 
परम भागवतान्‌ स्मरामि ।। 

आदिनाथं च मच्छिंद्र गोरक्षं गहिनीं तथा । 
निवृत्तिं ज्ञानदेवाय देव-चूडामणे नमः ।। 

अखण्ड आनंदरुपाय समज्ञानप्रदायने 
भवभ्रान्तिर्विनाशाय श्रीगुण्डाख्य रामचन्द्र महादेव 

रामचन्द्र श्री सद्‌गुरु विश्‍वनाथाय श्रीसद्‌गुरु गोविंदनाथाय 
श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ।। 

धर्मरक्षणार्थ प्रकट 
त्या त्या कालातील परिस्थितीनुसार विविध सामाजिक, धर्मरक्षणाची कार्ये या परंपरेकडून केली गेली. भक्त प्रल्हादाच्या काळाचा विचार केला तर त्यांचे जन्मदातेच त्याचे विरोधक होते. राक्षसी विचारांचा वाढता प्रभाव नष्ट करण्यासाठी देवाने (गुरूने) भक्तांच्या आग्रहापोटी अवतार घेतल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट होते. प्रल्हादासाठी नृसिंहाने अवतार घेतला. कौरवांच्या विनाशासाठी कृष्णाचा अवतार झाला. पण येथे या भक्तीचे स्वरुप गीतेच्या रुपातून प्रकट झाले. हे ज्ञान संजयाच्या वाणीतून धृतराष्ट्राला समजले. 

ब्रह्मविद्येचा सुकाळ 
नंतरच्या काळात नाथांच्या परंपरेतून या ज्ञानाचा प्रसार झाला. आदिनाथापासून मच्छिंद्र-गोरक्ष-गहिनी अशी ही परंपरा विस्तारत गेली. पण काळाच्या ओघात या ज्ञानावर हक्क सांगितला जाऊ लागला. काहींना यापासून वंचित ठेवण्याचे प्रकार बळावले. संन्यासाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ लागला. हा प्रकार थांबला जावा, या ज्ञानावर सर्वांचा अधिकार आहे. हे ज्ञान सर्व विश्‍वात पसरले जावे. सर्वांना मिळावे या उद्देशाने मराठी प्रांतात संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीच्या रुपाने हे ज्ञान सर्वांसाठी उघड करून सांगितले. ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून हे ब्रह्मज्ञान मराठी भाषेत प्रकट झाले. भाषेचाही या ज्ञानातून विस्तार झाला. त्यातून मराठी भाषेला अमरत्व प्राप्त झाले. भक्तीची ही परंपरा महाराष्ट्रात विस्तारली. सर्व सामान्यांना हे ब्रह्मज्ञान सहज हस्तगत करता येऊ लागले. ज्ञानप्राप्तीसाठी असणारा योगाचा बिकट मार्ग दूर करुन ज्ञानेश्‍वरांनी सहजयोग सांगितला. भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. भक्तीची बीजे या मराठी नगरीत रुजवली. या परंपरेत मग संत नामदेव शिंपी, संत गोराकुंभार, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत तुकाराम असे विविध जातींचे संत झाले. यातून हे ज्ञान सर्व मानवजातीसाठी आहे याचा बोध झाला. नाथ परंपरेतील विविध संतांनी ग्रंथ रूपाने त्याचा विस्तार केला. आजही तो होत आहे व यापुढेही तो होत राहील. 

ज्ञानेश्‍वरांचे शिष्य देवनाथांचा शोध 
काळाच्या ओघात अनेक संतांची, ऋषींची कार्ये काळाच्या पडद्याआड गेली. त्यांचा शोध बोध घेण्याचा प्रयत्नही आजच्या काळातील संत घेत आहेत. कोल्हापुरातील दादा माधवनाथ सांगवडेकर यांनी संत ज्ञानेश्‍वरांचे शिष्य देवनाथ महाराज यांचा शोध घेतला. त्यांची पैठण येथील समाधी दादांनी शोधून काढली. त्यांनी देवनाथ महाराज यांच्यावर केलेल्या भक्तीतूनच हे शक्‍य झाले. 1990 मध्ये दादा माधवनाथ महाराज यांना देवनाथ महाराज यांनी दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांनी भक्तीतूनच देवनाथ महाराज यांचे चित्र जनार्दन सुतार यांच्याकडून रेखाटून घेतले. मधुकर कुलकर्णी (हंसगीत) यांच्याकडून देवनाथांच्या समाधी शोधासाठी दादांनी आरती लिहून घेतली. त्यांच्या या भक्तीतूनच पैठण येथे 2001 साली देवनाथ महाराज यांची समाधी त्यांना मिळाली. 

मंगलाचरणात उल्लेख 

पावसच्या स्वामी स्वरुपानंदांच्या मंगलाचरणातील पाचव्या ओवीमध्ये ज्ञानदेवांचे शिष्य देवनाथ महाराज असा उल्लेख सापडतो. 

ज्ञानदेव- शिष्य देव, चूडामणि । 
पुढे झाले मुनि गुंडाख्यादि ।। 5 ।। 


संत दासगणू व दादांनी सांगितलेला देवनाथांचा परिचय 
देवनाथ महाराज हे मूळचे गुजरातचे. बलसाड जवळच्या गावात ते राहात होते. त्यांचे नाव शिवदेव भगत असे होते. गिरनारची अंबा आणि द्वारकेचा कृष्ण हे त्यांचे कुलदैवत. देवनाथ यांचे आजोबा गोरक्षनाथांचे अनुग्रहीत होते. तर आई-वडील दोघेही शंकराचे भक्त होते. पण देवनाथ महाराज सात वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील गेले. देवनाथ महाराज यांच्या मामांनी महाराष्ट्राच्या सीमेजवळील मुलीशी त्यांचे लग्न लावून दिले. पण देवनाथ कृष्णभक्तीत रमू लागल्याने त्यांचे मन संसारात रमेना. ते जगदंबेचे उपासक होते. जगदंबेने दिलेल्या दृष्टांतानुसार देवनाथ महाराजांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधीस्थळी जाऊन साधना केली. माऊलीचा अनुग्रह मिळावा यासाठी त्यांनी एका पायावर उभे राहून अनुष्ठान केले. 21 दिवस अहोरात्र अनुष्ठान केल्यानंतर माऊली प्रसन्न झाली. त्यांनी अनुग्रह दिला व परंपरा पुढे प्रवाहित करण्याचा अधिकारही दिला. त्यांना ज्ञानेश्‍वरीही भेट दिली व नेवासा येथे जाऊन पारायण करण्यास सांगितले. देवनाथ महाराज यांनी संत ज्ञानेश्‍वरांची ज्ञानदानाची परंपरा पुढे चालवली. देगलूरच्या चुडामणी महाराज यांना अनुग्रह देऊन देवनाथ महाराज यांनी पैठण येथे समाधी घेतली. 

श्री भक्तिसारामृतमध्ये उल्लेख 
श्री संत दासगणू यांनी श्री भक्तिसारामृतात श्री सद्‌गुरु देवनाथ महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्रात त्यांनी देवनाथ महाराज यांनी समाधी कधी घेतली व त्यांची समाधी कोठे आहे याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. 

सिद्ध देवनाथ । महादयाळू प्रज्ञावंत । 
तयां माझा दंडवत । वारंवार असो हा ।। 266 ।। 

यांचा समाधीकाळ मशी । ठाऊक नाही निश्‍चयेशी । 
वा तत्समाधीस्थलासी । मी न जाणे श्रोते हो ।। 267 ।। 


श्री भक्तिसारामृत अध्याय 10 वा 

पण सद्‌गुरु दादा महाराज सांगवडेकर यांनी भक्ती व साधनेतून 2001 मध्ये देवनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध घेतला. गोदावरी नदीच्या तीरावर गणेशघाट, तारकेश्‍वर मंदिराजवळ, जुनानगर रोड, पैठण जि. औरंगाबाद येथे ही समाधी आहे. दादा महाराज यांचे शिष्य आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी देवनाथांच्या या समाधीचा जिर्णोध्दार केला असून तेथे आनंदभवन बांधण्यात आले आहे. 

पारायणातून भक्तिविस्तार 

ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आदेशानुसारच देवनाथ महाराज यांनी ज्ञानेश्‍वरी परंपरेची शाखा पुढे चालवली. विस्तारासाठी देगलूरच्या चूडामणी महाराज यांना त्यांनी ज्ञानेश्‍वरी दिली. त्याचाही उल्लेख श्री भक्तिसारामृतच्या दहाव्या अध्यायात आहे. 

पूर्वेस देगलूर प्रांतात । चूडामणी माझा भक्त । 
आहे तो तू करून छात्र । संप्रदाय वाढवी ।। 262 ।। 

ज्ञानेश्‍वरी ही त्यास द्यावी । आमुची आठवण ठेवावी । 
वृत्ती अभेद असावी । सर्व ठाई राजसा ।। 263 ।। 


श्री भक्तिसारामृत अध्याय 10 वा 

700 वर्षांनंतर आजही ज्ञानेश्‍वरीच्या पारायणातून या ज्ञानाचा प्रसार-प्रचार होतो आहे. देवनाथ महाराज यांनी नेवाशात पारायण केले. पारायणातून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. चुडामणी, गुंडा महाराज (देगलूर), रामचंद्र महाराज बुटी (नागपूर), महादेवनाथ महाराज (चिंचणी), रामचंद्र महाराज (विजापूर), विश्‍वनाथ महाराज (रुकडी), गणेशनाथ महाराज (बाबा वैद्य, पुणे), स्वामी स्वरुपानंद (पावस), गोविंदनाथ महाराज (रुकडी), दादा महाराज (कोल्हापूर) यांनी पारायणातून ब्रह्मसंपन्नता मिळवली. सामुदायिक ग्रंथ पारायणातून, वारीच्या माध्यमातून ही भक्ती परंपरा महाराष्ट्रात रुजवली जात आहे. या परंपरेने माणसाचे आचार-विचार घडवले आहेत. माणसातील माणूसकी टिकवून ठेवली. भक्तीच्या या परंपरेनेच खऱ्या अर्थांने माणुसकीची शिकवण दिली आहे. नराचा नरकासूर होऊ नये तर नारायण व्हावा हेच व्रत या भक्ती परंपरेने जोपासले आहे. सर्व विश्‍वाला हे ज्ञान हस्तगत व्हावे यासाठी ही भक्तीची पताका आजही फडकत आहे. गुरु-शिष्याची ही भक्ती परंपरा अनादि कालापासून अखंड भारत वर्षात सुरूच राहणार आहे. 

निष्कर्ष ः 
अनादि कालाच्या या परंपरेचा विस्तार हा भक्तितूनच होत आहे. भक्तितूनच ज्ञानाची प्राप्ती होते. योगाचा खडतर मार्गापेक्षा भक्तिचा सहज सोपा असा मार्ग अवलंबून आत्मज्ञानी व्हायला हवे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या पारायणातून ज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे. या परंपरेचे आपणही स्वामी होण्यासाठी भक्तिचा हा मार्ग आत्मसात करायला हवा. आत्मज्ञानी सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाने आपणही आत्मज्ञानी व्हायला हवे व संतांचा हा वारसा पुढे चालवायला हवा. 

संदर्भ - 

1. विश्‍वपंढरी मासिक - ऑगस्ट 2014 अंक 8 वा, लेख - तपसाधना लेखक - संगीता सांगवडेकर पृष्ठ क्रमांक 8 ते 26, संपादक - राममाया कुलकर्णी 

2. श्रीमत संजीवनी गाथा - स्वामी स्वरुपानंद, लेखनकाल - शके 1867, पान नं. 1, प्रकाशक - देसाई बंधू पावस 

3. वानरगीता - मधुकर कृष्ण कुलकर्णी तथा हंसगीत, प्रकाशक - मुनींद्र विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर 

4. श्री भक्तीसारामृत अध्याय 10 वा - श्री संत दासगणु विरचित देवनाथ महाराज चरित्र, मुनींद्र सद्‌गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर स्मृतिग्रंथ 1993, पृष्ठ क्र. 123 ते 130, प्रकाशक - अध्यक्ष, अमृत महोत्सव स्मृतिग्रंथ समिती, श्री सद्‌गुरु विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर.