Saturday, December 12, 2015

चला पंचगंगा वाचवुया....

आज सकाळी पंचगंगा नदीवर सकाळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. एकदिवसाच्या या उपक्रमाने पंचगंगेचा घाट स्वच्छ झाला. याबाबत आता जनमानसात जागृतीची गरज आहे. राजकर्त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देण्याची गरज आहे. यासाठी या निमित्ताने.....

भारतीय जनता पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी नद्यांचे प्रदुषण रोखण्याचे आश्‍वासन दिले होते. गंगा नदीची स्वच्छता सुरु झाली असेल पण देशातील इतर नद्यांचे काय? इतर नद्यांच्या प्रदुषणाबाबत सरकार कोणती भूमिका घेणार याबाबत अद्याप कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. नद्यांच्या प्रदुषणात वाढच होत आहे. निवडणूकांपूर्वी आश्‍वासने द्यायची निवडणुका झाल्या की प्रश्‍नांकडे डोळे झाक करायची हा सर्वच पक्षांचा अजेंडा आहे. त्यात नवे काही नाही. कॉंग्रेस असो वा भाजप वा जनता दल हे सर्वच पक्ष आत्तापर्यंत हेच करत आले आहेत. सत्तेच्या राजकारणात हे पर्यावरणाचे प्रश्‍न मात्र गंभीर होत आहेत. देशातील जंगल नष्ट होत आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनाचा प्रश्‍न गंभीर होताना दिसत आहे. जंगलाचे क्षेत्र घटू लागल्याने वन्य प्राणी नागरी वस्त्यात आलेले पाहायला मिळत आहे. यात त्यांचा बळी जातोय. याबरोबरच शेतकऱ्यांचेही यामध्ये नुकसान होत आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे सरकारने गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. विदेशात जाऊन पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारायच्या. चर्चा करायच्या, देशाचे नाव उंचावेल असे भाषण ठोकायचे. पण देशात येऊन काहीच करायचे नाही. हेच आत्तापर्यंत सर्वच पक्षाच्या राजकर्त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हेच करतील असे वाटत नसले तरी त्यांनी तसे करू नये यासाठी आपणच आता जागरुक होण्याची वेळ आली आहे. पत्रकारांनी जागल्याची भूमिका नेहमीच बजावायला हवी. राजकर्त्यांनी आश्‍वासने पाळावीत यासाठी पहारा देण्याचे काम करायलाच हवे. हे समाजकार्य वृत्तपत्रांनी करायला हवे. सौर उर्जेवर आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्याचा पंतप्रधानांचा विचार उत्तम आहे. पण याबरोबरच देशात दिलेली आश्‍वासनेही पाळणे गरजेचे आहे. राजकर्त्यांच्या आश्‍वासनांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे राजकारण बाजूला ठेऊन पाहायला हवे. यासाठी सामाजिक संघटनांना बळकटी देण्याची गरज आहे. तरच देशातील नद्यांच्या प्रश्‍न मार्गी लागू शकेल. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक नदीचा आराखडा तयार होण्याची गरज आहे. आता असे आराखडे शासकिय पातळीवर झालेही असतील पण त्याला लोक सहभागाने राबविण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवीत. तरच देशातील नद्यात शुद्ध पाणी पाहायला मिळेल. अन्यथा वाढत्या लोकसंख्येने या प्रदुषणात भर होऊन मोठी गटारगंगा होण्यात वेळ लागणार नाही. लोकसहभागाने व राजकारण बाजूला ठेऊनच हे कार्य केल्यास देशातील सर्वच गंगा शुद्ध होतील. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष विचारात घेता त्याच्या शुद्धतेसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. धरणातील पाणी साठेही अशुद्ध होऊ शकतात. ठराविक वर्षांच्या कालावधीनंतर हे साठे वापरण्यायोग्य राहात नाहीत. यासाठी अशा साठ्यांच्या पुढील काळातील प्रश्‍नावरही विचार होण्याची गरज आहे. दुरदृष्टी ठेऊन विचार होण्याची गरज आहे. नेमके हेच होताना दिसत नाही. म्हणून पर्यावरणाच्या प्रश्‍नांचे आता राजकारण थांबवायला हवे. या प्रश्‍नाने आरोग्याचे प्रश्‍नही उभे राहात आहेत. यासाठी आता वेळीच तोडगा निघायला हवा. 

Friday, December 11, 2015

शेतकऱ्यांची नाडी जाणणारा राजा

माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त.....

माननिय शरद पवार यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान नेहरुंच्याही विचारांचा मोठा पगडा आहे. जवाहरलाल नेहरु यांनी म्हटले होते की सर्व काही थांबेल पण शेती कधीच थांबू शकत नाही. हेच त्यांचे विचार पवार यांना प्रभावित करत राहीले. त्यांनी शेतीवर अधिक भर दिला. त्यांच्या आचारात, विचारात एक शेतकरी दडला आहे. राजकारणामध्ये ते बोलतात एक आणि करतात एक असे जरी त्यांच्या विषयी म्हटले जात असले तरी शेतीमध्ये पवारसाहेब हे नेहमी जे बोलतात तेच करून दाखवतात. 

एकदा ते बोलता बोलता म्हणाले होते की लहानपणी ते स्वतः दौंडला जाऊन फळे, भाजी विकायचे. फळे, भाजीची विक्री करताना शेतकऱ्याला काय यातना होतात त्या त्यानी स्वतः अनुभवल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळतो का? हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. ठेच लागल्यानंतरच शहाणपण येते. पवारसाहेबांनी त्यांच्या लहानवयातच हे कष्ट सोसले. त्यांना शेतकऱ्यांची दुःखे माहीत आहेत. त्यांच्या कृतीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कळवळा दिसून येतो. या अनुभवातूनच शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी जाणणारा माणूसच शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकतो. तशी योजना तयार करतो. विकास कसा साधायचा हे त्यालाच समजते. 
पवार यांच्या बारामतीमध्ये केवळ आठ इंचच पाऊस पडतो. जवळपास 70 टक्‍क्‍याहून अधिक जमीन ही कोरडवाहू आहे. दुष्काळी पट्ट्यात मोडते. असे असूनही या जिल्ह्यात बारा साखर कारखाने उभे आहेत. येथे पिकणारी द्राक्षे परदेशात पाठवली जातात. फळांच्या ज्यूसचे आंतरराष्ट्रीय बॅंड येथेच उत्पादीत केले जातात. अशा अनेक विकासाचे प्रकल्प याच पट्ट्यात आहेत. हे केवळ पवार यांच्यामुळेच शक्‍य झाले आहे. बारामतीच्या विकासाचा हा पॅटर्न देशभर गाजतोय. अनेकांना प्रेरणा देतोय. 
राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पवार यांनी 90 च्या दशकात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची योजना आणली. फळझाडांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान जाहीर केले. कोरडवाहू पट्ट्यात यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. या योजनेचा लाभ घेत अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या. उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. फळे विकली गेली नाहीत तर तो शेतकरी स्वतः फळे खाऊन जगू शकतो. उपाशी राहणार नाही. कुपोषण तरी थांबेल. या योजनेमागे हा दृष्टीकोन शरद पवार यांचा असावा. त्यांच्या या योजनेमुळे अनेक पडीक जमीनी लागवडीखाली आल्या. ओसाड माळरानावर डाळींबे, अंजीराच्या बागा फुलल्या. कोकणात आंबा, काजूच्या बागा फुलल्या. फळांचे उत्पादन तर वाढलेच. याशिवाय ग्रामीण भागात फळावर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योगही उदयास आले. अल्पभूधारक शेतकरी बागायतदार झाला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती माहीत असल्यानेच त्यांनी ही योजना आखली. शेतकरी काम करू इच्छितो. उत्पादन घेण्याचीही त्याची तयारी आहे. कष्ट करण्यासाठी तो मागेपुढे पाहात नाही. पण त्याच्याजवळ भांडवल नाही. फळबागा फुलवायच्या आहेत पण त्याच्या हातात पैसा नाही. शेतकऱ्यांची ही आर्थिक नाडी पवारसाहेबांनी ओळखली होती. भांडवल नसेल तर धंदा कसा उभा राहणार. पैसा नसेल तर शेतकरी काय करणार? शेतात तो बी पेरतो पण त्याला खत-पाणी देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही. असा हा शेतकरी जमीनीत फळबागा कशा फुलविणार? हे शेतकऱ्यांचे दुःख शरद पवार यांनी ओळखले. त्याला भांडवल उपलब्ध करून दिले तर तो निश्‍चितच प्रयत्न करेल. यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार यांनी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फळबागा फुलविण्याची संधी दिली. पवारांच्या या योजनेने राज्यभरात पडीक रानावर फळबागा फुलल्या. झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरण सुधारा असा प्रचारही येथे करण्याची वेळ आली नाही. पवार साहेबांची ही योजना पर्यावरणालाही साथ देणारी ठरली. या योजनेच्या सुरवातीनंतर अवघ्या सात-आठ वर्षात राज्यातील फळांचे उत्पादन झपाट्याने वाढले. कोकणातील व्यक्तींना ही योजना फारच लाभदायक ठरली. 
शरद पवार यांचे वैशिष्ठ म्हणजे ते योजना आणताना विकास डोळ्यासमोर ठेवतात. राजकारण बाजूला ठेवतात. योजनेतून राजकीय लाभ काय मिळेल हे पाहात नाहीत. त्यांच्या विकासाच्या प्रत्येक योजनेच्या कृतीत हा दृष्टीकोन पाहायला मिळतो. 
सध्याच्या राजकारण्यांचे दृष्टीकोन वेगळेच असतात. प्रथम ते स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि मग इतरांचा विचार करतात. अशा या त्यांच्या वृत्तीमुळेच ते राजकारणात मागे पडत आहेत. दुरदृष्टीचा अभाव त्यांच्याकडे आहे. राजकारणी व्यक्ती आणि पुस्तके वाचण हे गणित तर आता दूरच राहीले आहे. नव्या पिढीतील किती राजकारणी पुस्तके वाचतात सांगा ना? पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना तरी ते हजर राहतात का? हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पुस्तके वाचत नाहीत तेथे लिखाण तर कोठे करणार? सध्याच्या तरूण राजकर्त्यांनी शरद पवार यांचा पुस्तक वाचनाचा छंद जरी जोपासला तरी ते राजकारणात तग धरून राहतील. अन्यथा पाच वर्षांचा कालावधीही ते पूर्ण करू शकतील का? याबाबत शंका वाटते. शरद पवार यांचा प्रत्येक गोष्टीचा गाढा अभ्यास आहे. यासाठी ते सतत विविध विषयांची पुस्तके वाचतात. जुन्या पिढीतील राजकर्त्ये व चळवळीचे राजकर्त्ये सोडले तर पुस्तक वाचन हा विषयच सध्याच्या तरूण राज्यकर्त्यांना माहीत नाही. चळवळीच्या व्याख्यांनाना आता वेगळेच स्वरूप त्यामुळे प्राप्त झाले आहे. अभ्यास नसल्याने बेताल वक्तव्ये केली जात आहेत. विकास हा विचारच त्यांच्या डोक्‍यात येत नाही. त्यांना केवळ स्वतःचाच विचार डोक्‍यात येतो. रस्त्याची योजना आहे ना? इतका निधी त्यासाठी मंजूर झाला आहे. ठिक आहे. निवडणुका सहा महिन्यात आहेत. सहा महिने टिकतीय अशा पद्धतीचे रस्त्ये तयार झाले तरी त्यांना चालते. सहा महिन्यानंतर निवडणूका जिंकल्यावर रस्तावरील खड्डे हे पुढच्या निवडणूकीच्या आधी सहा महिने बुजविले जातात. तोपर्यंत त्या रस्त्यांचे काहीही होऊ या राजकर्त्यांचा संबंधच नसतो. अशी विचारसरणी सध्याच्या नव्या पिढीतील राज्यकर्त्यांची आहे. योजनाही ते अशाच पद्धतीने राबवितात. नव्या योजनाही आखताना ते असाच विचार करतात. अशा या कृतीने विकास ठप्प झाला आहे. 
शरद पवार यांचे आदर्श या नव्या राजकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन कार्य करायला हवे. जनचेचे दुःख जाणून घेऊन योजना आखायला हव्यात. जनतेच्या मतांची नाडी तपासून विकास होत नाही. जनतेच्या दुःखाची नाडी ओळखता यायला हवी. ही नाडी सापडली तरच त्यांच्या दुःखावर औषध देता येईल. पवारसाहेबांनी नाडी कशी तपासली हे त्यांच्याकडून जाणून घ्यायला हवे. शेतकऱ्यांची नाडी त्यांनी ओळखली म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकले. त्यांच्या योजनांनी शेतकऱ्यांचा मोठा विकास झाला आहे. त्यांच्या कार्यकालात धान्य उत्पादन कित्येक पटींनी वाढले. धान्य साठविण्यासाठी गोदामे कमी पडली इतके धान्य उत्पादन झाले. शेतकरी समृद्ध झाला. देश समृद्ध झाला. धान्य उत्पादनाचे उच्चांक त्यांच्या कार्यकालात घडले आहेत. विकास हा असा करायचा असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ या समस्यांनी ते डगमगले नाहीत. यासाठी त्यांनी विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे दुःख पुसण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ दौरा करताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीचीही काळजी कधी केली नाही. दुष्काळसाठी विशेष पॅकेज केंद्राकडून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील राहीले. जगात सर्व उद्योग बंद पडू शकतात पण कृषी हा असा उद्योग आहे जो कधीही बंद पडू शकत नाही. हा उद्योग संपला तर या जगात माणूस जगूच शकणार नाही. यासाठी शेतीचा विकास हेच ध्येय पवारसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेण्याची वक्तव्ये केली तरी शेतीतून निवृत्ती घेण्याचे वक्तव्य ते कधीही करणार नाहीत याची मला खात्री आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 157, साळोखेनगर, कोल्हापूर 416007 
र्ल ः 9011087406

Tuesday, December 1, 2015

कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

कारदगा हे कर्नाटकतील चिक्कोडी तालुक्यातील गाव. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या या गावात मराठी भाषीकांची संख्या अधिक आहे. कर्नाटकात गेलो म्हणून काय झाले आम्हाला आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. कोठेही जाऊ कोठेही राहू पण मराठी आमची मायबोली आम्ही कायम ठेऊ हा निर्धार या गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच या गावात गेली वीस वर्षे न चुकता साहित्य संमेलन होत आहे. यंदाही हे संमेलन झाले. या संमेलनास 89 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. मराठीचा या गावात होणारा गजर पाहून ते भारावून गेले. ग्रामीण भागात मराठी विषयी असणारी आपुलकी आपलेपणा, मराठीचा हा बाणा पाहून मराठी किती समृद्ध आहे याचीच प्रचिती येथे येते. जात, पंथ, धर्म बाजुला ठेऊन सर्वचजण या व्यासपीठावर एकत्र येतात. मराठी भाषेबद्दल असणारे हे त्यांचे प्रेम पाहून कोणीही भारावून जाईल असेच येथील वातावरण असते. 
वारकरी संप्रदायाने मराठीची पताका उंच फडकावली. मग या संमेलनात वारकऱ्यांची आठवण होणार नाही असे घडणारच नाही. सकाळी काढलेल्या ग्रंथ दिंडीत वारकरी वेशात बालगोपालांचा सहभाग, तालात, सुरात त्यांनी केलेला मराठीचा गजर, भजन, कीर्तन मराठीची खरी ओळख करुन दिल्याशिवाय राहात नाही. नऊवारीत- सहावारीत नटलेल्या मुलींमधून मराठी संस्कृती विषयी असणारी आपली आपुलकी, मराठी विचाराशी असणारे आपले प्रेम ओसंडून वाहताना दिसत होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात महिलांच्या उत्स्पुर्त प्रतिसादात निघालेली ग्रंथदिडी सीमाभागात मराठीचा हा ताठर बाणा कायम राखेल असाचा विश्वास दाखवत होती. संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या दिंडीचे कौतुक करताना श्री. सबनीस म्हणाले बळीचे राज्य, बहुजन श्रमिकांचे राज्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम या दिंडीत पाहायला मिळाला. पण त्याचबरोबरच दुष्काळाची जाणीव करुन देणारे वास्तवाचे भानही पाहायला मिळाले. यावरून या गावाची वैचारिक, सामाजिक समृद्धता लक्षात येते. येथील ग्रामीण साहित्यात विठ्ठल आणि भक्ती केंद्रस्थानी आहे. धुमान साहित्य संमलेनाने संत नामदेवांना राष्ट्रीय पातळीवर नेले तर कारदगा संमेलनाने धर्मनिरपेक्षतेचे सूत्र बांधले.
सीमाभागात मराठीच्या गौरवाचा आदर्श इतर गावांनीही व महाराष्ट्राने घ्यायला हवा. मराठीच्या समृद्धीसाठी, मराठी संस्कृती जोपासण्यासाठी मराठी विषयीचे आपले प्रेम, आपुलकी कायम ठेवण्यासाठी अशा साहित्याच्या गावांना भेट द्यायला हवी. नेहमी यावे नेहमी नांदावे असे हे गाव मराठीचा एक वेगळा बाणा कायम ठेवत आहे याबद्दल संमेलन आयोजकांचे मनापासून आभार मानावेत असे वाटते.
श्री सबनीस सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माझा कृषि ज्ञानेश्वरी या पुस्तकाचा गौरव केला शेणाला सोन्याचा भाव आला आहे इतके शेणाचे महत्त्व आहे जमीन उत्तम तर शेतकरी उत्तम हे ओळखून सेद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही त्यांनी केले ज्ञानेश्वरीतील शेती विषयक ओव्यावर आधारित या पुस्तकाचा गौरव केला याबद्दल सबनीससरांचे आभार मानायलाच हवेत
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
श्री अथर्व प्रकाशन, साळोखेनगर, कोल्हापूर