Tuesday, December 1, 2015

कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

कारदगा हे कर्नाटकतील चिक्कोडी तालुक्यातील गाव. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या या गावात मराठी भाषीकांची संख्या अधिक आहे. कर्नाटकात गेलो म्हणून काय झाले आम्हाला आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. कोठेही जाऊ कोठेही राहू पण मराठी आमची मायबोली आम्ही कायम ठेऊ हा निर्धार या गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच या गावात गेली वीस वर्षे न चुकता साहित्य संमेलन होत आहे. यंदाही हे संमेलन झाले. या संमेलनास 89 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. मराठीचा या गावात होणारा गजर पाहून ते भारावून गेले. ग्रामीण भागात मराठी विषयी असणारी आपुलकी आपलेपणा, मराठीचा हा बाणा पाहून मराठी किती समृद्ध आहे याचीच प्रचिती येथे येते. जात, पंथ, धर्म बाजुला ठेऊन सर्वचजण या व्यासपीठावर एकत्र येतात. मराठी भाषेबद्दल असणारे हे त्यांचे प्रेम पाहून कोणीही भारावून जाईल असेच येथील वातावरण असते. 
वारकरी संप्रदायाने मराठीची पताका उंच फडकावली. मग या संमेलनात वारकऱ्यांची आठवण होणार नाही असे घडणारच नाही. सकाळी काढलेल्या ग्रंथ दिंडीत वारकरी वेशात बालगोपालांचा सहभाग, तालात, सुरात त्यांनी केलेला मराठीचा गजर, भजन, कीर्तन मराठीची खरी ओळख करुन दिल्याशिवाय राहात नाही. नऊवारीत- सहावारीत नटलेल्या मुलींमधून मराठी संस्कृती विषयी असणारी आपली आपुलकी, मराठी विचाराशी असणारे आपले प्रेम ओसंडून वाहताना दिसत होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात महिलांच्या उत्स्पुर्त प्रतिसादात निघालेली ग्रंथदिडी सीमाभागात मराठीचा हा ताठर बाणा कायम राखेल असाचा विश्वास दाखवत होती. संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या दिंडीचे कौतुक करताना श्री. सबनीस म्हणाले बळीचे राज्य, बहुजन श्रमिकांचे राज्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम या दिंडीत पाहायला मिळाला. पण त्याचबरोबरच दुष्काळाची जाणीव करुन देणारे वास्तवाचे भानही पाहायला मिळाले. यावरून या गावाची वैचारिक, सामाजिक समृद्धता लक्षात येते. येथील ग्रामीण साहित्यात विठ्ठल आणि भक्ती केंद्रस्थानी आहे. धुमान साहित्य संमलेनाने संत नामदेवांना राष्ट्रीय पातळीवर नेले तर कारदगा संमेलनाने धर्मनिरपेक्षतेचे सूत्र बांधले.
सीमाभागात मराठीच्या गौरवाचा आदर्श इतर गावांनीही व महाराष्ट्राने घ्यायला हवा. मराठीच्या समृद्धीसाठी, मराठी संस्कृती जोपासण्यासाठी मराठी विषयीचे आपले प्रेम, आपुलकी कायम ठेवण्यासाठी अशा साहित्याच्या गावांना भेट द्यायला हवी. नेहमी यावे नेहमी नांदावे असे हे गाव मराठीचा एक वेगळा बाणा कायम ठेवत आहे याबद्दल संमेलन आयोजकांचे मनापासून आभार मानावेत असे वाटते.
श्री सबनीस सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माझा कृषि ज्ञानेश्वरी या पुस्तकाचा गौरव केला शेणाला सोन्याचा भाव आला आहे इतके शेणाचे महत्त्व आहे जमीन उत्तम तर शेतकरी उत्तम हे ओळखून सेद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही त्यांनी केले ज्ञानेश्वरीतील शेती विषयक ओव्यावर आधारित या पुस्तकाचा गौरव केला याबद्दल सबनीससरांचे आभार मानायलाच हवेत
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
श्री अथर्व प्रकाशन, साळोखेनगर, कोल्हापूर

No comments:

Post a Comment