Friday, December 11, 2015

शेतकऱ्यांची नाडी जाणणारा राजा

माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त.....

माननिय शरद पवार यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान नेहरुंच्याही विचारांचा मोठा पगडा आहे. जवाहरलाल नेहरु यांनी म्हटले होते की सर्व काही थांबेल पण शेती कधीच थांबू शकत नाही. हेच त्यांचे विचार पवार यांना प्रभावित करत राहीले. त्यांनी शेतीवर अधिक भर दिला. त्यांच्या आचारात, विचारात एक शेतकरी दडला आहे. राजकारणामध्ये ते बोलतात एक आणि करतात एक असे जरी त्यांच्या विषयी म्हटले जात असले तरी शेतीमध्ये पवारसाहेब हे नेहमी जे बोलतात तेच करून दाखवतात. 

एकदा ते बोलता बोलता म्हणाले होते की लहानपणी ते स्वतः दौंडला जाऊन फळे, भाजी विकायचे. फळे, भाजीची विक्री करताना शेतकऱ्याला काय यातना होतात त्या त्यानी स्वतः अनुभवल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळतो का? हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. ठेच लागल्यानंतरच शहाणपण येते. पवारसाहेबांनी त्यांच्या लहानवयातच हे कष्ट सोसले. त्यांना शेतकऱ्यांची दुःखे माहीत आहेत. त्यांच्या कृतीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कळवळा दिसून येतो. या अनुभवातूनच शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी जाणणारा माणूसच शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकतो. तशी योजना तयार करतो. विकास कसा साधायचा हे त्यालाच समजते. 
पवार यांच्या बारामतीमध्ये केवळ आठ इंचच पाऊस पडतो. जवळपास 70 टक्‍क्‍याहून अधिक जमीन ही कोरडवाहू आहे. दुष्काळी पट्ट्यात मोडते. असे असूनही या जिल्ह्यात बारा साखर कारखाने उभे आहेत. येथे पिकणारी द्राक्षे परदेशात पाठवली जातात. फळांच्या ज्यूसचे आंतरराष्ट्रीय बॅंड येथेच उत्पादीत केले जातात. अशा अनेक विकासाचे प्रकल्प याच पट्ट्यात आहेत. हे केवळ पवार यांच्यामुळेच शक्‍य झाले आहे. बारामतीच्या विकासाचा हा पॅटर्न देशभर गाजतोय. अनेकांना प्रेरणा देतोय. 
राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पवार यांनी 90 च्या दशकात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची योजना आणली. फळझाडांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान जाहीर केले. कोरडवाहू पट्ट्यात यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. या योजनेचा लाभ घेत अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या. उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. फळे विकली गेली नाहीत तर तो शेतकरी स्वतः फळे खाऊन जगू शकतो. उपाशी राहणार नाही. कुपोषण तरी थांबेल. या योजनेमागे हा दृष्टीकोन शरद पवार यांचा असावा. त्यांच्या या योजनेमुळे अनेक पडीक जमीनी लागवडीखाली आल्या. ओसाड माळरानावर डाळींबे, अंजीराच्या बागा फुलल्या. कोकणात आंबा, काजूच्या बागा फुलल्या. फळांचे उत्पादन तर वाढलेच. याशिवाय ग्रामीण भागात फळावर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योगही उदयास आले. अल्पभूधारक शेतकरी बागायतदार झाला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती माहीत असल्यानेच त्यांनी ही योजना आखली. शेतकरी काम करू इच्छितो. उत्पादन घेण्याचीही त्याची तयारी आहे. कष्ट करण्यासाठी तो मागेपुढे पाहात नाही. पण त्याच्याजवळ भांडवल नाही. फळबागा फुलवायच्या आहेत पण त्याच्या हातात पैसा नाही. शेतकऱ्यांची ही आर्थिक नाडी पवारसाहेबांनी ओळखली होती. भांडवल नसेल तर धंदा कसा उभा राहणार. पैसा नसेल तर शेतकरी काय करणार? शेतात तो बी पेरतो पण त्याला खत-पाणी देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही. असा हा शेतकरी जमीनीत फळबागा कशा फुलविणार? हे शेतकऱ्यांचे दुःख शरद पवार यांनी ओळखले. त्याला भांडवल उपलब्ध करून दिले तर तो निश्‍चितच प्रयत्न करेल. यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार यांनी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फळबागा फुलविण्याची संधी दिली. पवारांच्या या योजनेने राज्यभरात पडीक रानावर फळबागा फुलल्या. झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरण सुधारा असा प्रचारही येथे करण्याची वेळ आली नाही. पवार साहेबांची ही योजना पर्यावरणालाही साथ देणारी ठरली. या योजनेच्या सुरवातीनंतर अवघ्या सात-आठ वर्षात राज्यातील फळांचे उत्पादन झपाट्याने वाढले. कोकणातील व्यक्तींना ही योजना फारच लाभदायक ठरली. 
शरद पवार यांचे वैशिष्ठ म्हणजे ते योजना आणताना विकास डोळ्यासमोर ठेवतात. राजकारण बाजूला ठेवतात. योजनेतून राजकीय लाभ काय मिळेल हे पाहात नाहीत. त्यांच्या विकासाच्या प्रत्येक योजनेच्या कृतीत हा दृष्टीकोन पाहायला मिळतो. 
सध्याच्या राजकारण्यांचे दृष्टीकोन वेगळेच असतात. प्रथम ते स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि मग इतरांचा विचार करतात. अशा या त्यांच्या वृत्तीमुळेच ते राजकारणात मागे पडत आहेत. दुरदृष्टीचा अभाव त्यांच्याकडे आहे. राजकारणी व्यक्ती आणि पुस्तके वाचण हे गणित तर आता दूरच राहीले आहे. नव्या पिढीतील किती राजकारणी पुस्तके वाचतात सांगा ना? पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना तरी ते हजर राहतात का? हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पुस्तके वाचत नाहीत तेथे लिखाण तर कोठे करणार? सध्याच्या तरूण राजकर्त्यांनी शरद पवार यांचा पुस्तक वाचनाचा छंद जरी जोपासला तरी ते राजकारणात तग धरून राहतील. अन्यथा पाच वर्षांचा कालावधीही ते पूर्ण करू शकतील का? याबाबत शंका वाटते. शरद पवार यांचा प्रत्येक गोष्टीचा गाढा अभ्यास आहे. यासाठी ते सतत विविध विषयांची पुस्तके वाचतात. जुन्या पिढीतील राजकर्त्ये व चळवळीचे राजकर्त्ये सोडले तर पुस्तक वाचन हा विषयच सध्याच्या तरूण राज्यकर्त्यांना माहीत नाही. चळवळीच्या व्याख्यांनाना आता वेगळेच स्वरूप त्यामुळे प्राप्त झाले आहे. अभ्यास नसल्याने बेताल वक्तव्ये केली जात आहेत. विकास हा विचारच त्यांच्या डोक्‍यात येत नाही. त्यांना केवळ स्वतःचाच विचार डोक्‍यात येतो. रस्त्याची योजना आहे ना? इतका निधी त्यासाठी मंजूर झाला आहे. ठिक आहे. निवडणुका सहा महिन्यात आहेत. सहा महिने टिकतीय अशा पद्धतीचे रस्त्ये तयार झाले तरी त्यांना चालते. सहा महिन्यानंतर निवडणूका जिंकल्यावर रस्तावरील खड्डे हे पुढच्या निवडणूकीच्या आधी सहा महिने बुजविले जातात. तोपर्यंत त्या रस्त्यांचे काहीही होऊ या राजकर्त्यांचा संबंधच नसतो. अशी विचारसरणी सध्याच्या नव्या पिढीतील राज्यकर्त्यांची आहे. योजनाही ते अशाच पद्धतीने राबवितात. नव्या योजनाही आखताना ते असाच विचार करतात. अशा या कृतीने विकास ठप्प झाला आहे. 
शरद पवार यांचे आदर्श या नव्या राजकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन कार्य करायला हवे. जनचेचे दुःख जाणून घेऊन योजना आखायला हव्यात. जनतेच्या मतांची नाडी तपासून विकास होत नाही. जनतेच्या दुःखाची नाडी ओळखता यायला हवी. ही नाडी सापडली तरच त्यांच्या दुःखावर औषध देता येईल. पवारसाहेबांनी नाडी कशी तपासली हे त्यांच्याकडून जाणून घ्यायला हवे. शेतकऱ्यांची नाडी त्यांनी ओळखली म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकले. त्यांच्या योजनांनी शेतकऱ्यांचा मोठा विकास झाला आहे. त्यांच्या कार्यकालात धान्य उत्पादन कित्येक पटींनी वाढले. धान्य साठविण्यासाठी गोदामे कमी पडली इतके धान्य उत्पादन झाले. शेतकरी समृद्ध झाला. देश समृद्ध झाला. धान्य उत्पादनाचे उच्चांक त्यांच्या कार्यकालात घडले आहेत. विकास हा असा करायचा असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ या समस्यांनी ते डगमगले नाहीत. यासाठी त्यांनी विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे दुःख पुसण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ दौरा करताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीचीही काळजी कधी केली नाही. दुष्काळसाठी विशेष पॅकेज केंद्राकडून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील राहीले. जगात सर्व उद्योग बंद पडू शकतात पण कृषी हा असा उद्योग आहे जो कधीही बंद पडू शकत नाही. हा उद्योग संपला तर या जगात माणूस जगूच शकणार नाही. यासाठी शेतीचा विकास हेच ध्येय पवारसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेण्याची वक्तव्ये केली तरी शेतीतून निवृत्ती घेण्याचे वक्तव्य ते कधीही करणार नाहीत याची मला खात्री आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 157, साळोखेनगर, कोल्हापूर 416007 
र्ल ः 9011087406

No comments:

Post a Comment