Saturday, November 28, 2015

फळझाडांनी माळरान झाले हिरवेगार

डॉ. प्रभू यांनी पंधरा एकरांवर फुलवली वनराई

निसर्ग आणि शेतीच्या प्रेमापोटी कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी स्वकमाईतून करनूर (जि. कोल्हापूर) गावामध्ये शेती खरेदी केली. या जागेत वनस्पतींची जैवविविधता जोपासण्यासाठी डॉ. प्रभू यांनी पंधरा एकरांत वनराई उभारली. या ठिकाणी विविध फळझाडांची लागवड तसेच वनीकरण केल्याने परिसर हिरवागार झाला आहे.

राजेंद्र घोरपडे

सिमेंटच्या जंगलांनी डोळ्यांची रखरख वाढते. ही रखरख मनाचा आनंद हिरावून घेते. पण वृक्षांची हिरवळ त्याच डोळांना गारवा देते, मनाला नवी उभारी देते. आत्मिक शांती देते. यातून मनाला पर्यावरण संवर्धनाची आवड व छंद जडतो. कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांनीही शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा छंद जोपासला. निसर्गाच्या प्रेमापोटी डॉ. प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी स्व-कमाईतून महाराष्ट्र - कर्नाटक सीमेलगतच्या करनूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) गाव शिवारात 22 एकर शेती खरेदी केली. या जागेत त्यांनी वनस्पतींची जैवविविधता जोपासण्याच्या उद्देशाने 15 एकरात वनराई उभारली. यामध्ये त्यांनी विविध फळझाडे, फुलझाडे, त्याचबरोबरीने सागवान, निलगिरीसह विविध उपयुक्त वनस्पतींची लागवड केली. उर्वरित सहा एकरांमध्ये ऊस आणि हंगामानुसार विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
सुमारे वीस वर्षांपूर्वी कृषितज्ज्ञ डॉ. भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रभू यांनी सुरवातीच्या काळात ऊस, केळी, भाजीपाला, फुलशेती लागवडीचे प्रयोग केले. काही क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीनेही पीक व्यवस्थापन केले. केळी, फुलशेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापन लागते, सातत्याने पीक वाढीवर लक्ष द्यावे लागते. याचबरोबरीने विक्री व्यवस्था, बाजारपेठेतील चढ उतार पाहावे लागतात. मात्र डॉक्‍टरी व्यवसायातून याकडे त्यांना फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी केळी, फूलशेतीऐवजी फळबाग लागवड, वनशेतीकडे लक्ष दिले. शेतीचा व्यावसायिक दृष्टिकोन थोडासा बाजूला ठेवून आपल्या आवडीनुसार पिकांची निवड आणि लागवडीचे नियोजन त्यांनी केले. उपलब्ध लागवड क्षेत्राचा विचार करता त्यांनी फळबागेतून माळ परिसर हिरवागार करण्यावर भर दिला. केवळ एकाच प्रकारच्या फळपिकाची लागवड करण्याऐवजी विविध फळझाडांच्या लागवडीचे त्यांनी नियोजन केले. पहिल्या टप्प्यात शेतीचे नियोजन करताना दर शनिवारी डॉ. प्रभू कागलमधील शेती अधिकारी के. एल. पाटील तसेच कोल्हापुरातील कृषितज्ज्ञ श्री. दप्तरदार यांना सोबत घेऊन शेतावर जात. प्रत्यक्ष शेतावर शनिवार - रविवार तज्ज्ञांशी चर्चा करून नेमक्‍या कोणत्या पिकांची लागवड करायची याचे नियोजन त्यांनी केले. याचबरोबरीने परिसरातील शेतकरी तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशीही संपर्क ठेवला. त्यातून नवनवीन माहिती त्यांना मिळत गेली.
सुमारे पंधरा एकरांवर विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, तसेच उपयुक्त वनस्पतींची लागवड डॉ. प्रभू यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले की, एखादी वनस्पती, फळझाड आवडले की ते मी लगेच आणून स्वतःच्या शेतात लागवड करतो. काही मित्रांनीदेखील विविध फळझाडे, फूलझाडांची रोपे भेट दिली आहेत. सध्या माझ्या शेतपरिसरात विलायती चिंच, आवळा, काजू, करवंद, जांभूळ, डाळिंब, तुती, नीरफणस, शेवगा याचबरोबरीने गुलमोहर, बहावा अशी विविध प्रकारची झाडे-झुडपे, फुलझाडे लावली आहेत. यातून शेतपरिसरात छोटे वन तयार झाले. सध्या माझ्या शेतात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, पेरू अशी सुमारे तीनशेच्या वर फळझाडे आहेत. काही क्षेत्रांवर बांबू तसेच सागवानाची लागवड केली आहे. शेतीला निलगिरी आणि सुरूच्या झाडांचे कुंपण केले आहे. नफ्यातोटाचा विचार न करता या माळरानावर "ग्रीन स्पेस' तयार करण्यावरच माझा भर आहे.

कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फळबाग आणि वनशेती ः
फळबाग लागवडीबाबत डॉ. प्रभू म्हणाले की, मी पहिल्यांदा विविध फळझाडांची माहिती घेतली. त्यातील लागवड तंत्र समजावून घेतले. यासाठी मला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. नाडकर्णी यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले होते. मुरमाड लाल मातीत लागवडीसाठी फळपिकांच्या नेमक्‍या कोणत्या जाती निवडाव्यात याची माहिती डॉ. नाडकर्णी यांनी दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रातून नारळाची बाणावली, आंब्याची हापूस, रत्ना, पायरी, केसर या जातींची कलमे खरेदी केली. वनीकरणाची आवड असल्याने मी वेंगुर्ले आणि कागल येथील रोपवाटिकेतून सागवानाची रोपे खरेदी केली. आत्तापर्यंत हलक्‍या जमिनीत मी सुमारे चारशेच्या वर सागवानाची रोपे लावलेली आहेत. वनराईत मी सिट्रोनेलाची ठिकठिकाणी लागवड केली आहे.
शेतीच्या देखभालीसाठी मी शेतावर दोन कुटुंबे ठेवली आहेत. गेली दहा वर्षाहून अधिक काळ ते शेतीची देखभाल करत आहेत. शेतातून येणाऱ्या उत्पन्नातूनच शेतीसाठी लागणारा सर्व खर्च भागविण्याची जबाबदारी या कुटुंबावर मी टाकलेली आहे. यामुळे आता मला शेती व्यवस्थापनासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. गरजेनुसार रोजंदारीवर मजूर घेऊन फळबागेला खते देणे तसेच गरजेनुसार शेती मशागतीची कामे केली जातात. शेतावरील या कुटुंबांनी गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या पाळल्या आहेत. यातून फळबागेला पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध होते. शेतीची सर्व देखभाल ही दोन्ही कुटुंबे पाहात असल्याने मला फारसे व्यवस्थापनात लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे मी शेतीमधील नवीन लागवड प्रयोगाबाबत विचार करतो.

फळबागेत मोरांचा वावर
वाढत्या वसाहतवादाने गावपरिसरातही पक्ष्यांचा निवारा नष्ट झाला आहे. पक्ष्यांची संख्या घटत आहे. परंतु करनूर गावाच्या परिसरात डॉ. प्रभू यांनी तयार केलेल्या या वनराईत विविध पक्ष्यांना निवारा मिळाला. वनराईने नटलेल्या परिसरात वृक्ष्यांच्या गार सावलीमुळे पशुपक्ष्यांचा वावर वाढला. या वनात आता मोरही दिसू लागले आहेत. विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांसाठी निवारा निर्माण केल्याचे एक वेगळेच समाधान डॉ. प्रभू यांना आहे.

कूपनलिका, विहीर पुनर्भरणाने शाश्‍वत पाणी
शेतीला बारमाही पाण्याचा पुरवठा असेल तरच बागायती शेती करणे शक्‍य होते. याचा विचार करून पाण्याच्या सुयोग्य वापराचे नियोजन डॉ. प्रभू यांनी केले. माळ जमीन असल्याने डॉ. प्रभू यांना उन्हाळ्यात फळबाग आणि वनशेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवत होती. यावर मात करण्यासाठी डॉ. प्रभू यांनी विहीर पुनर्भरणाचा प्रयोग केला. त्यांच्या शेतातून ओढा जातो. या ओढ्याला पावसाळ्यात पाणी असते. हे पाणी डॉ. प्रभू यांनी विहीर आणि कुपनलिकेमध्ये सोडून पुनर्भरणाचा प्रयोग केला. गेल्या काही वर्षात सातत्याने जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने शेत परिसरातील भूजलाचा स्तर वाढून उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर त्यांना मात करता आली. उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी त्यांनी फळबागेत ठिबक सिंचन केले आहे. फळझाडे आणि वनीकरणामुळे उन्हाळ्यातही शेतीचा परिसर हिरवागार झाला आहे.

मित्र आणि कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप
फळबागेतून डॉ. प्रभू यांना आंबा, चिकू, नारळ, काजू या फळांचे उत्पादन मिळते. शक्‍य होईल तितक्‍या फळांची विक्री कागलच्या बाजारपेठेत केली जाते. शेतातील सर्वच फळांची विक्री देखभालीसाठी ठेवलेल्या कुटुंबाना गावातच करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे जास्तीच्या फळांचे मोफत वाटप डॉ. प्रभू कोल्हापूरातील मित्र परिवार तसेच स्वतःच्या हॉस्पिटलमधील दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांना करतात.

सौर ऊर्जेचा वापर
डॉ. प्रभू यांनी कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलच्या परिसरात छोटीशी बाग फुलवली आहे. या बागेस पाण्याचा व खतांचा योग्य वापर होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा सौर ऊर्जेवर कार्यरत आहे. निसर्गातील उपलब्ध शक्तीचा पुरेपूर वापर करून नैसर्गिकरीत्या हिरवळ निर्माण करण्यावरडॉ. प्रभू यांना विशेष रस आहे.

संपर्क ः डॉ. संतोष प्रभू ः 0231-2644881 

Monday, November 2, 2015

मराठी पाऊल पडते पुढे....

'रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे' इतकी टोकाची भूमिका बेळगावच्या युवकांनी घेतली आहे. एक नोव्हेंबर हा दिवस कर्नाटकातील मराठी भाषिक काळा दिवस म्हणुन पाळतात. काळ्या दिनाच्या निमित्ताने ही युवाशक्ती एकवटली. बेळगावसह 865 मराठी बहुल गावे महाराष्ट्रात यायला हवीत यात दुमत नाही यासाठी अनेक शहिदही झाले आहेत हा प्रश्न आता सर्वोच्य न्यायालयात आहे सर्वानाच या प्रश्नाच्या निकालाची उत्सुकता आहे. आता हा प्रश्न चिघळु नये याची दखल घ्यायला हवी. कानडी लोक मराठीचा द्वेश करतात असेही नाही तसे असते तर राज्योत्सवाच्या मिरवणुकीत शांताबाईचा ठेका कानडींनी धरला नसता यापुर्वीही शिंदे बंधुंच्या पोपटाने कानडी लोकांना नाचवले आहे याचा विचार करुन मराठी लोकांनी आता आंदोलनाची दिशा ठरवायला हवी. मराठी माणसाने गनिमी काव्यानेच युद्धे जिंकली आहेत हा इतिहास लक्षात ठेवायला हवा आंदोलनाच्या रणनितीत मात्र याचा अभाव दिसतो. नुसते पेटुन उठणे हा मराठी बाणा नव्हे. मराठीची छाप पडेल असे कार्य व्हायला हवे. आमच्यावर अन्याय होतो म्हणुन रडायचे हे मराठी मानसाला शोभणारे नाही अश्रु हे कोणाचे लक्षण आहे हे तरी धान्यात ठेऊन यापुढे मराठीचा खराखुरा बाणा दाखवायला हवा तशी तयारी आता ठेवायला हवी. एकवटलेल्या युवाशक्तीची ताकद आता मराठीची गुढी सीमाभागात कशी उभारेल हेच आता पहायला हवे. चला तर मग मराठीच्या पताका उंच फडकवुया
- राजेंद्र घोरपडे