Saturday, February 28, 2015

ग्रामीण जनतेचे स्वावलंबन हेच "स्वयंसिद्धा' चे ब्रीद

आई उद्योजक झाली तर पुढची पिढीही उद्योजक होईल. यासाठी फावल्यावेळेत महिलांनी उद्योग करून स्वतःला स्वयंपूर्ण करावे या उद्देशाने कोल्हापूरातील "स्वयंसिद्धा' ही संस्था कार्य करते. सामुदायिक उद्योग, बचतगट, सामुदायिक शेती, कंत्राटी शेती, श्रमदानातून विकासकामे यातून ग्रामीण विकासाला डॉ. व्ही. टी. फाऊंडेशनने वाहून घेतले आहे. संघटन-सहकार्य-सद्‌भाव या त्रिसुत्रीने ग्रामीण जनतेला स्वावलंबी करणे हेच या दोन्ही संस्थेचे उद्दिष्ट आहे. श्रीमती कांचन परुळेकर संचलित या संस्थांच्या कार्या विषयी थोडक्‍यात.....
- राजेंद्र घोरपडे

देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. यासाठीच प्रथम महिलांचा विकास व्हायला हवा. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी. महिला अर्थकारणात सबळ झाल्या पाहिजेत. तरच त्या स्वतःच्या घराचा विकास करु शकतील. साहजिकच त्या देशाच्या विकासाचे नेतृत्वही करु शकतील. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन 1992 मध्ये डॉ. व्ही. टी. पाटील यांनी स्वयंसिद्धा ही संस्था स्थापन केली. स्त्री शिक्षणासाठी अविरत श्रम घेणाऱ्या डॉ. व्ही. टी. पाटील यांचे स्मारक संस्थेच्या रुपाने उभे राहावे या उद्देशाने कांचनताईंनी 1994 मध्ये डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनची स्थापना केली. कोल्हापूर शहरासह राज्यातल्या ग्रामीण भागातही या दोन्ही संस्थेनी विविध उपक्रम राबवून महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा वसा घेतला आहे.

संस्थेची उद्दिष्ट्ये ः
  • ग्रामीण जनतेला स्वावलंबी करण्यासाठी अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था करणे.
  •  स्वयंनिर्भयतेसाठी संघटना, कमावतं साधन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक भान यासाठी आधारसेवा उपलब्ध करून देणे.
  • मनुष्यबळाचा सर्वांगीण विकास, महिला सबलीकरण यासाठी योगदान.
  • विकासोन्मुख अशी ग्रामीण पुनर्रचना करणे.

संस्थेचा विस्तार....
  •  2500 महिला उद्योजिका
  • 150 ट्रेनर्स
  • 50 स्वयंसेवी कार्यकर्त्ये कार्यरत
  • गेली दहा वर्षे राधानगरी, चंदगड तालुक्‍यात कार्य
  • गेली तीन वर्षे शाहुवाडी तालुक्‍यात कार्य

प्रबोधनाचे वेगळे फंडे
  • पाहा पाहण्यामध्ये दिसणे येऊ दे या उद्देशाने सीडीच्या माध्यमातून विविध उद्योगांची माहिती दिली जाते. गाणी. मनोरंजन यातून उद्योजकते वळावे यासाठी मनाची तयारी केली जाते. माहिती व ज्ञान हे सोपे करून सांगणे हाच यातील मुख्य उद्देश आहे.
  •  मुलींसाठी माहेरची झाडी ः बायफ संस्थेने तयार केलेल्या वृक्षारोपन संदर्भातील सिडीद्वारे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्या मुलीला एक झाड भेट दिले जाते. हे झाड त्या मुलीने स्वतःच्या घराच्या अंगणात लावायचे. लग्नानंतरही माहेरच्या या वृक्षाची जोपासणा त्या मुली करतात. यातून पर्यावरण व निसर्ग प्रेमाचे संवर्धन
  •  विक्री योग्य वस्तु उत्पादनाचे प्रशिक्षण ः करवंद, केळी, दुध, नाचणी, तांदूळ, आंबा, काजू आदी शेतमालावर प्रक्रियेचे प्रशिक्षण, फराळ, लोणची, पापड आदी खाद्य पदार्थासह शिवण, लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण.
  •  उत्पादित मालाला बाजारपेठ कशी मिळवायची यासाठी प्रशिक्षण, बोलायचे कसे मालाची विक्री कशी करायची. स्पॉट सेल, प्रदर्शने आदी.
  • विविध संस्थांना भेटी देऊन प्रबोधन
  •  आंबा येथे कृषि पर्यटन वाढीसाठी प्रशिक्षण
  • ग्रामीण कलांचे संवर्धन ः चाळणवाडी येथे तेथील गावातील प्रसिद्ध जाखडी नृत्य व गजनृत्यांची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न
  • शाळा मध्येच सोडलेल्या मुलांना अनौपचारिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

स्वयंनिर्भयतेसाठी आठवडी बाजार
फावल्यावेळेत महिला हळद पावडर, जॅम, लोणची, पापड, पान मसाला, शेगदाणे लाडू, चिक्की, चकली आदी विविध प्रकारची उत्पादने तयार करू शकतात. पण त्यांची विक्री ही सर्वात मोठी समस्या असते. त्यासाठी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साईक्‍स एक्‍सटेंन्शनमधील स्वयंसिद्धाच्या जागेमध्ये आठवडी बाजार भरविला जातो. दर बुधवारी दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये हा बाजार भरतो. शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिला येथे त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात.

मल्लेवाडीत सामुदायिक शेती
नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात राहणाऱ्या अनेक व्यक्तींची शेती मल्लेवाडीत पडीक होती. ही शेती स्वयंसिद्धा गटामार्फत सामुदायिकरित्या केली जाते. या शेतात भुईमुग, भाजीपाला पिके, भात आदी पिके घेतली जातात. यामध्ये बियाणे व खताचा खर्च शेत मालकातर्फे केला जातो. गटातील महिला नांगरट, भांगलणीपासून उत्पादन घेण्यापर्यंत एकत्रितपणे काम करतात. आलेल्या उत्पादनाचा अर्धा हिस्सा शेत मालकाला व अर्धा हिस्सा महिला गटात विभागला जातो. गटाच्या या कार्यामुळे पडिक जमीनींचा विकासही होतो व गावातील सर्वसामान्य कुटूंबाना उपजिविकेसाठी उत्पन्नही मिळते.

जे टिकते त्यावर प्रक्रिया
शेतीमध्ये उत्पादित होणारा माल हा नाशवंत असतो. यासाठी वेळीच त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. प्रक्रियेच्या अनेक पारंपारिक पद्धती आजही गावामध्ये आहेत. या पद्धतींना आधुनिकतेची जोड देण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. महिलांचे संघटन करून बजत गटांना याबाबत मार्गदर्शन केले जाते. फळपिकांपासून लोणची, जॅम, ज्यूस आदी विविध प्रकारची उपउत्पादने घेतली जातात. हे पदार्थ करून त्याची विक्री कशी करायची याबाबतही संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येते.

महामार्गावर स्टॉलसाठी सहाय्य
शाहुवाडी तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. पण महाबळेश्‍वरमधील स्ट्रॉबेरी जेव्हा बाजारात येते तेव्हा स्ट्रॉबेरीचा दर अचानक कोसळतो. अशावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये यासाठी येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांचे गट तयार करण्यात आले. या गटांना स्ट्रॉबेरीवरील प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील अनेक शेतकरी आता विविध उपपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री करत आहेत. मलकापूर-निळेपासून आंबाघाटापर्यंत 22 स्टॉलवर स्ट्रॉबेरी तसेच विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री केली जाते. या गटांना संस्थेमार्फत प्लास्टीकचे टेबल, उन्हापासून संरक्षणासाठी छत्री व दोन खुर्च्या दिल्या आहेत. तसेच त्या शेतकऱ्यांना विक्रीबाबतचे प्रशिक्षणही संस्थेने दिले आहे. स्ट्रॉबेरीच्या हंगामात चार महिने हे स्टॉल कार्यरत असतात.

शहरात मोक्‍याच्या ठिकाणी प्रदर्शने
  • स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला दोन प्रदर्शने भरविण्यात येतात.
  • स्वयंसिद्धा मार्फतही शहरात विविध ठिकाणी दोन प्रदर्शने भरविली जातात.
  • चार दिवसांच्या एका प्रदर्शनासाठी जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो. यामध्ये 15 लाखांच्या आसपास उलाढाल होते.

प्रयोगापुरते बियाणे वाटप 
पश्‍चिम घाटमाथ्यावरील शेतकरी पाण्याची सुविधा नसल्याने पावसाळी भातानंतर कोणतेही पिक घेत नाही. आठ महिने रान तसेच पडून राहते. ही समस्या विचारात घेऊन संस्थेने विविध प्रयोग केले. यामध्ये आरकेल जातीच्या वाटाणा बियाण्याचे वाटप यशस्वी ठरला. संस्थेतर्फे राधानगरी व शाहुवाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फक्त एकदाच प्रयोगापुरते आरकेल जातीच्या वाटाण्याचे बी पुरविले जाते. हा वाटाणा भात कापणीनंतर उपलब्ध असणाऱ्या ओलाव्यावर व हिवाळ्यात पडणाऱ्या धुक्‍यावर सहज वाढतो. यातून वर्षभर घराला पुरेल इतके उत्पन्न त्यांना मिळते. पाण्याची उपलब्धता असेल तर भरघोस उत्पन्नही मिळू शकते. शेतकऱ्यांना एकदा बियाणे वाटप केल्यानंतर ते शेतकरी आता दरवर्षी भातानंतर वाटाण्याचे पिक घेत आहेत.

शाळांमध्ये गांडूळ खत निर्मिती
शालेय विद्यार्थ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. वालूर, सांबू, ऐनवाडी, माळेवाडी या गावातील शाळामध्ये याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते. या गावातील शाळेच्या परसबागेतच गांडळू खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. या शाळेतील हे विद्यार्थी आता घरातील परसबागेतही गांडूळ खताची निर्मिती करत आहेत.

अंदाजे दहा वर्षापूर्वी आम्हाला "स्वयंसिद्धा'कडून पाच हजार रुपयांचे गांडूळ कल्चर युनिट मिळाले. यातून आमच्या कुटूंबाने हा उद्योग सुरु केला. शेणखताच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी पाच ते दहा टन गांडूळ खत आम्ही तयार करतो. या खताची खरेदी इंडॉल कंपनीकडूनही केली जाते. शेतकरीही खताची खरेदी करतात. 60 रुपये किलोने खताची खरेदी होते. गांडूळ कल्चरचीही विक्रीही आम्ही करतो. खताच्या विक्रीतून वर्षाला खर्च वजा जाता 40 ते 50 हजार रुपये तर कल्चरमधून अंदाजे 10 ते 15 हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त घरच्या शेतीलाही सेंद्रिय खत उपबद्ध होते. रासायनिक खतासाठी लागणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचला आहे. स्वयंसिद्धामुळेच आम्ही शेतीमध्ये स्वयंसिद्ध झालो आहोत.
- शीतल पाटील, मल्लेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

स्वयंसिद्धा संस्था, फोन ः 0231-2525129