Monday, June 1, 2020

काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ।।


शेतकरीही या नव्या विचारांचा बळी ठरत आहे. यासाठी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कृत्रिम आणि नैसर्गिक यातला फरक लक्षात घ्यायला हवा. तो समजण्याची दृष्टी त्याच्यात असायला हवी. नुसत्या दिखाऊपणाचे तोटे समजून घ्यायला हवेत. सध्या बाजारात आकर्षक माल असेल तर लगेच खपतो. 
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील झळाळ ।
काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ।। 470 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात, त्यांच्या वरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहुब फळासारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करावयाचे आहे? कारण त्यांच्या आंत शेण आहे.

पूर्वी शेणापासून फळांच्या प्रतिकृती तयार केल्या जायच्या. ही फळे आतून पोकळ व वरून हुबेहूब फळासारखी दिसणारी असतात. सध्या प्लास्टिक, मेन, चीनीमाती आदींचा वापर करून अशी आकर्षक फळे तयार केली जातात. हुबेहूब नैसर्गिक फळाप्रमाणे ती दिसतात. अशी फळे केवळ दिखावा म्हणूनच वापरली जातात. सध्या असा दिखावा असणारी उत्पादने अधिक घेतली जात आहेत. नवीपिढी चंगळवादाकडे वळत आहे. त्यांच्या मनातच दिखाऊपणाचा भरला आहे. ही वाढणारी वृत्ती ही घातक आहे. दिसायला सुंदर असले म्हणजे ते चांगले असते असा त्यांचा समज झाला आहे. मनाचा हा त्यांचा समज कृतीतूनही दिसून येत आहे. अधिक तरुण दिसण्यासाठी अनेक प्रकारची सौंदर्य प्रसादने तो वापरत आहे. पण जीवनात वृद्धाप्य आहे याचा विसरच त्यांना पडला आहे. अशा झटपट सौंदर्य वाढवणाऱ्या उत्तेजक पदार्थांमुळे त्यांचे आयुष्य कमी होत आहे. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत, याची जाणीवच त्याला नाही. आजचे आज पाहू, उद्याचे उद्या पाहू अशा विचारांमुळे दूरदृष्टीचा अभाव त्यांच्यात दिसून येत आहे. अशा या बदलत्या विचारांचा प्रभाव शेतकऱ्यांवरही दिसून येत आहे. 


शेतकरीही या नव्या विचारांचा बळी ठरत आहे. यासाठी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कृत्रिम आणि नैसर्गिक यातला फरक लक्षात घ्यायला हवा. तो समजण्याची दृष्टी त्याच्यात असायला हवी. नुसत्या दिखाऊपणाचे तोटे समजून घ्यायला हवेत. सध्या बाजारात आकर्षक माल असेल तर लगेच खपतो. लाल भडक गाजरे लगेच खपतात. पण फिकट रंगाची गाजरे जरी चवीला गोड असली तरीही खपत नाहीत. कारण जनतेत दिसायला सुंदर असले की घेण्याची वृत्ती वाढली आहे. चव कशी आहे हे तो पाहातच नाही. नेमका हाच मुद्दा पकडून कृषी संशोधकांनीही तशाच पद्धतीने संशोधन केले. फळे दिसायला सुंदर केली. गाजरेही दिसायला सुंदर केली. पण त्याच्या चवीचा विचार केला नाही. 

फळांचे कवच टणक केले. कीड सहजासहजी लागणार नाही याची काळजी घेतली. टोमॅटो, सफरचंद आदी फळे - भाज्यांची कवचे आकर्षक व टणक केली. पण त्याचे दुष्परिणाम विचारात घेतले नाहीत. आरोग्यावर त्याचे परिणाम होतात याचा विचार केला नाही. आरोग्यास उत्तम असणारा आहार तयार करणे हे उद्दिष्ट असायला हवे. नुसता दिखाऊपणा नको. सध्या उत्पादित होणार शेतमाल दिसायला उत्तम आहे. पण त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, याचा विचार केला जात नाही. हा विचार आता शेतकऱ्यांनीच करून उत्पादने घ्यायला हवीत. तरच मानवी आरोग्य उत्तम राहू शकेल. कोणती उत्पादने अयोग्य आहे. कोणती उत्पादने योग्य आहेत याचा विचार करून शेतकऱ्यांनीच यावर आळा बसवायला हवा. आरोग्यास प्राधान्य देऊन उत्पादने घ्यायला हवीत. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



No comments:

Post a Comment