Thursday, December 6, 2012

औषध



देखे रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।

परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसे ।।



औषध गोड नसते. ते कडू असते. पण त्याचा परिणाम हा मधुर असतो. सल्ला हा औषधासारखा असतो. तो गोड कधीही वाटत नाही. बऱ्याचदा तो मनाला पटतही नाही. पण हा कडवटपणा आपणास स्वीकारावा लागतो. तो स्वीकारल्यानंतर अनुभव हे गोड असतात. जीवनात अनेक कठीण प्रसंगीही असेच अनुभव येतात. उतारवयात बऱ्याचदा शरीर औषधांना साथ देत नाही. त्यावेळी डॉक्‍टर आपल्या शरीराची प्रयोगशाळाच करतात. विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात. शरीराला साथ देणारी औषधेच घ्यावी लागतात. तरच त्याचा परिणाम दिसून येतो. शरीराप्रमाणे मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहातो. तारुण्यात मन तरूण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकण राग येतो. अन्याया विरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते. देहबोली, हालचालीमध्येही फरक पडतो. पोरकटपणा कमी होतो. तारुण्यात पेटून उठणारे मन मात्र इथे शांतपणे मार्ग निवडत असते. त्यावर योग्य उपाय योजत असते. हा बदल वयोमानानुसार होतो. तरूणपणी सल्ले मनाला रूचत नाहीत. पण हे सल्ले स्वीकारावे लागतात. त्याचा योग्य परिणामही दिसून येतो. उतारवयात मात्र मन हे सल्ले स्वीकारण्यास पटकण मन तयार होत नाही. बळजबरीने ते स्वीकारले जातात. त्यामुळे याचा परिणाम फारसा चांगला दिसून येत नाही. कित्येकदा काही सल्ले मनाला न पटल्याने स्वभाव चिडचिडा होतो. हा शरीर, मनाचा, स्वभावाचा गुणधर्म आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. पण शरीर निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत. सर्व रोग हे मनात दडलेले असतात. मन शांत असेल तर हे सर्व रोग शांत असतात. मनाची चलबिचलता सूरू झाली की रोगांचीही चलबिचलता सुरू होते. हळूहळू रोग डोकेवर काढतात. यासाठी मनाची स्थिरता ही महत्त्वाची आहे. मन स्थिर ठेवणे हे रोगावर अत्यंत उपयुक्त औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही. मनाच्या स्थिरतेसाठी सांगितलेले उपाय यासाठी योजने गरजेचे आहे. मनाची स्थिरता ही उतारवयात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त असे औषध आहे.

No comments:

Post a Comment