Friday, May 3, 2013

उसातील काकडीने दिला बाबासाहेबांना आर्थिक आधार


वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना केवळ एखाद्या पिकावर अवलंबून राहणे परवडत नाही. उत्पन्नवाढीसाठी किंवा शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध प्रयोग शेतकरी करतात. शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगौंडवाडी येथील बाबासाहेब देवकर यांनी उसात विविध आंतरपिके घेण्याचे प्रयोग केले आहेत. यंदा दुष्काळी पार्श्‍वभूमीवर काकडीला चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी काकडीचे आंतरपीक घेतले. त्यातून फायदा मिळवताना उसातील उत्पादन खर्चही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.


राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर जिल्ह्यातील गाडेगौंडवाडी (ता. करवीर) येथील बाबासाहेब देवकर यांनी "ऍटोमोबाईल' विषयातील पदविका घेतली. सहा वर्षे कंपनीत काम केले. नोकरी करताना शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. शेतीच्या आवडीतून अखेर नोकरी सोडली. त्यांची साडेसात एकर बागायती जमीन आहे. पाण्याची सुविधा असल्याने सर्व हंगामांत पिके घेणे त्यांना शक्‍य असते. सन 1992 पासून शेती करताना विविध प्रयोगही त्यांनी केले आहेत. गेली 16 वर्षे ते पाचट जाळण्याऐवजी शेतातच कुजवत आहेत, त्यासाठी त्याची कुट्टी करून शेतात मिसळतात.

कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचामुळे शेतीत नवीन तंत्रज्ञानाचे प्रयोग सातत्याने ते करतात. उसात आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान त्यांनी मंचाच्याच माध्यमातून घेतले. गेल्या दहा वर्षांत त्यांनी उसात गहू, हरभरा, कोबी, चवळी, फ्लॉवर, वैशाख मूग, जनावरांसाठी लसूणघास, कलिंगड, भुईमूग आदी पिके घेतली आहेत. आंतरपिकासाठी खते, पाणी हे घटक स्वतंत्रपणे द्यावे लागत नाहीत. उसाची आंतरमशागतही सुलभ होते. यामुळे खर्चात बचत होऊन घेतलेल्या आंतरपिकाचे उत्पादनही हाती मिळते.
आतापर्यंत घरच्या गरजा विचारात घेऊन आंतरपिकांची निवड केली. यंदाच्या वर्षी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अशोक पिसाळ व डॉ. पांडुरंग मोहिते यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन त्यांना काकडीचे आंतरपीक घेण्यास सुचवले. यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळ आहे. यामुळे उन्हाळ्यातील पिके अनेक भागांत अधिक प्रमाणात होणार नाहीत. यात मुख्यतः भाजीपाला व काकडीचे उत्पादन तुलनेने कमी राहील. बाजारपेठेत चांगला दर मिळणार, असा विचार त्यामागे होता. त्यानुसार बाबासाहेबांनी काकडीचे नियोजन केले.


असे केले लागवड नियोजन

उसाची लागवड तीन फूट सरी पद्धतीने बाबासाहेब करतात. यंदाच्या प्रयोगात प्रत्येक दोन सरींनंतर तिसऱ्या सरीवर त्यांनी काकडी घेतली. ही लागवड पूर्वहंगामी उसातील खोडव्यात केली होती, त्यामुळे काकडीचे उत्पादन उन्हाळी हंगामातच चांगल्या प्रकारे साधण्याची संधी होती. जानेवारीत ऊस तुटून गेल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिकाम्या सोडलेल्या जागेत पॉवरटिलरच्या साहाय्याने सरी काढून त्यावर काकडीच्या बियांची टोकण केली. एकरी सुमारे 1200 रोपे बसली. दोन रोपांतील अंतर सुमारे अडीच ते तीन फूट होते.
उसाला दिलेल्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर काकडीसाठीही झाला; मात्र काकडी दोन पानांवर आल्यानंतर आणि फुलोऱ्यावर आल्यानंतर 19-19-19 या खताचे प्रत्येकी 50 किलो डोस दिले.

पाणी व्यवस्थापन

आंतरपिके घेताना पाण्याचे व्यवस्थापन योग्य ठेवावे लागते. टोकणीनंतर तसेच काकडी फुलोऱ्यावर येईपर्यंत पाण्याच्या तीन हलक्‍या पाळ्या दिल्या. काकडी फुलोऱ्यावर आल्यानंतर दर दहा दिवसांनी सकाळच्यावेळी पाण्याची पाळी दिली. दुपारी उन्हामध्ये पाणी देण्याचे टाळले, कारण मुळांना इजा होते. यामध्ये पाण्याची बचत झाली. उसामध्ये पाचट ठेवले असल्याने पाण्याची गरज कमी झाली.

रसशोषक किडींचे नियंत्रण केले

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बेन्डाझिमच्या दोन ड्रेंचिंग (आळवण्या) घेतल्या. विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींचे नियंत्रण करण्यावर भर दिला, त्यासाठी तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली.

वेलांना बांबूचा आधार

काकडीचा वेल जमिनीवर पसरला तर त्याची वाढ योग्य प्रकारे होत नाही; तसेच काकडी जमिनीवर लोळल्यास खराब होण्याचा धोका असतो. दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी काकडीचा वेल नायलॉन दोरीवर सोडणे उत्तम असते. यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येकी आठ फूट अंतरावर बांबू उभारून त्यावर नायलॉन दोऱ्या बांधल्या. या दोऱ्यांवर वेल सोडण्यात आला. एकरी साधारणपणे 200 बांबू लागले. यासाठी चार बंडल वायर लागते.


गेल्यावर्षी बाबासाहेबांनी उसात हरभरा हे आंतरपीक घेतले होते. दोन सरींनंतर रिकामी ठेवण्यात आलेल्या सरीच्या ठिकाणी गादीवाफा करून त्यावर हरभऱ्याची लागवड केली. हरभरा उत्पादनासाठी दोन हजार रुपये खर्च आला. एकरी सुमारे दोन क्विंटल उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता दहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. या व्यतिरिक्त उसाचे उत्पादन एकरी 60 टन मिळाले. याच शेतात ऊस तोडून गेल्यानंतर यंदा काकडीची लागवड साधली आहे.

....................
प्रयोगातील अर्थशास्त्र -

काकडीचा प्लॉट जवळपास संपला आहे. शेवटचे अल्प तोडेच बाकी आहेत. आतापर्यंत सुमारे साडेचार टन उत्पादन एकरी मिळाले आहे. नांदणी भाजीपाला संघामार्फत काकडीची मुंबई बाजारपेठेत विक्री केली. मुंबईतील दरानुसार किलोला 16 पासून ते 24, 26 रुपयांपर्यंत, तर सरासरी 18 रुपये प्रति किलो दर मिळाला.
एकूण 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. काकडीसाठी अंदाजे खर्च सांगायचा तर बियाणे, पेरणी, फवारणी, खते, तोडणी, मजुरी, बांबू, दोऱ्या, वाहतूक असा एकूण खर्च 35 हजार रुपये आला आहे. खर्च वजा जाता मिळालेले उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये आहे. संघ वाहतूक व इतर खर्चासाठी किलोमागे चार रुपये घेतो. संघ असल्याने विक्रीची हमी मिळते. मालाला योग्य दर मिळून वेळेवर आर्थिक व्यवहार होत असल्याने योग्य नफा हाती पडतो.
बाबासाहेब अनेक वर्षांपासून ऊसशेती करतात. त्यांचे सध्याचे पूर्वहंगामी लावणी उसाचे उत्पादन एकरी 70 टन आहे, तर खोडवा उसाचे 50 ते 55 टन आहे. लावणी उसाचा उत्पादन खर्च एकरी सुमारे 40 हजार रुपयांच्या घरात, तर खोडवा उसाचा हा खर्च सुमारे 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे.
आंतरपिकांतील उत्पन्नामुळे उसाचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत झाली.
.....................
आंतरपिकाचे बाबासाहेबांनी सांगितले फायदे

- मुख्य पिकाचा उत्पादन खर्च कमी होतो.
- खते व पाण्याची बचत या अर्थाने की आंतरपिकाला स्वतंत्र देण्याची गरज कमी होते.
- मुख्य दीर्घ पिकातील भांडवली खर्च आंतरपिकांतून सुरवातीच्या तीन महिन्यांतच कमी होतो.
- दोन्ही पिकांकडे चांगले लक्ष देणे शक्‍य होते.
..................................................................

"ऍग्रोवन'मधील लेख वाचून शेती

"ऍग्रोवन'मध्ये इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग लागवड करण्यासंदर्भात चार फेब्रुवारीच्या अंकामध्ये लेख आला होता, त्यानुसार इक्रिसॅट पद्धतीने त्यांनी भुईमूग लागवड केली आहे.
.....................
संपर्क ः बाबासाहेब देवकर - 9823348700
गाडेगोंडवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर

No comments:

Post a Comment