Thursday, August 26, 2010

मोक्ष

तैसा संसारु तया गांवा । गेला साता पांडवा ।
होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।।

जन्माला आलो म्हटल्यानंतर जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी या कराव्याच लागतात. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग तो सर्वसामान्य असो, की मोठा असो, किंवा साधू संत असो. त्याला या गोष्टींची गरज भासतेच. पण माणसाला जगण्यासाठी याची किती आवश्‍यकता आहे याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगामी काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार हे निश्‍चित आहे. वस्त्राच्या बाबतीतही हीच स्थिती निर्माण होणार आहे आणि निवाराही मिळणे कठीण होणार आहे. सध्या लोक शहराकडे धाव घेत आहेत. पण काही कालावधीनंतर हेच लोक शहरातील धकाधकीला कंटाळून खेड्याकडे वळतील. गावातील शांतता त्यांना आकर्षित करेल. त्यांना जर शांत गावांची ओढ लागली तर पुन्हा धकाधकीच्या शहरात ते येणारही नाहीत. शहराचा ते सहजच त्याग करतील. काहीजण परमार्थासाठी संसाराचा त्याग करतात. संसार हा होत असतो. परमार्थ मात्र करावा लागतो. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सर्व गोष्टी स्वतःहून आपल्याकडून करवून घेतल्या जात असतात. त्या करताना त्यात कंटाळा करून चालत नाही. पण परमार्थ हा करावा लागतो. माऊली येथे आयता मोक्ष सांगत आहे. संसार न त्यागताही मोक्ष कसा मिळवायचा हे सांगत आहे. लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रुपांतरण करता येत नाही. किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही. आत्मा हा अमर आहे. देहाचा मृत्यू होतो. आत्माचा नाही. तो आत्मा आता पुन्हा देहात अडकणार नाही. ही अनुभूती आल्यानंतर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईल.


राजेंद्र घोरपडे, पुणे

No comments:

Post a Comment