Thursday, May 14, 2020

विचारांच्या मळणीची गरज

धान्य स्वतंत्र करण्यासाठी जशी मळणी आवश्‍यक आहे. तसे अध्यात्मात आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीही साधनेची, सात्त्विक विचारांची मळणी ही करावीच लागते. कणसावरून सात्त्विक विचारांचा ट्रॅक्‍टर हा फिरवावाच लागतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


की भूंस बीज एकवट । उफणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ।।130।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफणलें असतां धान्य जाग्यावर राहतें व उडून गेलेले ते फोलकट, असें ज्याप्रमाणे समजून येतें.

पिकात दाणे भरल्यानंतर योग्यवेळी त्याची कापणी करावी लागते. कापणी केलेल्या कणसांची मग खळ्यावर मळणी केली जाते. मळलेल्या कणसातून दाणे स्वतंत्र होतात. त्याला वारा देऊन फलकटे व दाणे स्वतंत्र केले जातात. आता यांत्रिकीकरणामुळे एकाचवेळी ह्या सर्व क्रिया करणे शक्‍य झाले आहे. कापलेली कणसे यंत्रात टाकली की दाणे व फलकटे स्वतंत्र होऊन बाहेर पडतात. शेवटी मळणी ही करावीच लागते. दाण्यावरील आवरण हे दूर करावेच लागते. शेंगा फोडाव्या लागतात. तरच आतील दाणे बाहेर येऊ शकतील. उष्णतेने काही फळातील दाणे बाहेर पडतात. पण उष्णतेचीही गरज त्याला भासते. अध्यात्माचेही तसेच आहे. मनातील मरगळ दूर करण्यासाठी, मनावर साचलेला मळ धुण्यासाठी ग्रंथांची पारायणे ही करावीच लागतात. वाचनाने, पारायणाने मनातील अशुद्ध विचार दूर होतात. सात्त्विक विचारांचे दाणे मग आपोआप एकत्र होऊ लागतात. काही फळांची टरफले कठीण असतात. सोलून, बदडूनही ती दूर होत नाहीत. ती दूर करण्यासाठी उष्णतेची गरज भासते. उकळत्या पाण्यात टाकून टरफलाचा टणकपणा कमी करावा लागतो. मनातील काही अशुद्ध विचार पटकन, सहजरीत्या दूर होत नाहीत. ते विचार धुण्यासाठी मग साधनेची गरज भासते. साधनेने मनाची मरगळ दूर होते. मन प्रसन्न होते. शरीराचे तापमान वाढते. साधनेत पाठ शेकली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेने मनातील कठीणातील कठीण अशुद्ध विचारही जाळून टाकले जातात. दूर होतात. शुद्ध, सात्त्विक विचारांचा झरा मग मनात वाहू लागतो. एकाग्रता वाढते. सर्व टरफले दूर होतात. साधनेने मग आत्मज्ञानाचे बीज आपोआप बाहेर येते. धान्य स्वतंत्र करण्यासाठी जशी मळणी आवश्‍यक आहे. तसे अध्यात्मात आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीही साधनेची, सात्त्विक विचारांची मळणी ही करावीच लागते. कणसावरून सात्त्विक विचारांचा ट्रॅक्‍टर हा फिरवावाच लागतो. दाणे स्वतंत्र होई पर्यंत फिरवावा लागतो. भाताची धाटे खाटेवर बडवावी लागतात. तसे मनावर सात्त्विक विचारांचा घाव हा घालावाच लागतो. बडवून, बडवून दाणे स्वतंत्र केली जातात. तसे घाव घालून सात्त्विक बीज वेगळे करावे लागते. सात्त्विक वारा देऊन मनावरील फलकटे दूर करावी लागतात. तरच आत्मज्ञानाचे बीज हाती लागेल.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment