Tuesday, April 9, 2019

वैराग्य



संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल - 8999732685

तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दडवितां । पाठीं लागे ।। 39 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें या सर्व संसाराला अनित्यता आहे, असें ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिलें तरी, तें वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागें लागेल.

मासे जसे पाण्याबाहेर काढल्यानंतर जिवंत राहण्यासाठी तडफडतात. तसे मनुष्य जगण्यासाठी तडफडत आहे. हे सर्वसामान्यांचे जीवन पाहून सम्राट अशोकाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. साम्राज्याचा त्याग त्याने केला. मिळालेले ऐश्‍वर्य त्यागने ही तितकी सोपी गोष्ट नाही. आरामात जीवन जगताना असे वैराग्य उत्पन्न होणे तितकी सहज घटना नाही. पुढे हा सम्राट गौतम बुद्ध झाला. मुंबईतील लोकलची गर्दी पाहून रेल्वे स्थानकावरूनच एखाद्या खेडूताने गावचा रस्ता पकडला. त्यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. मुंबई, पुणे अशा शहरातील जीवन हे असे धावपळीचे आहे. गावाकडे कष्टाचे जीवन असले तरी अशी धावपळ नसते. त्यात एक शांती असते. समाधान असते. शेतात राबल्यानंतर दुपारची भाकरी खाऊन झाडाखाली निवांत पडले असता गाढ झोप लागते. शहरात असे होत नाही. पण शहराला सोडणे हा त्याग म्हणता येणार नाही? ही तेथील जीवनाची दगदग पाहून केलेली पळवाट आहे. हा संन्यास ही होत नाही. हे वैराग्य तर निश्‍चितच नव्हे. कामावरून आले तरी घरात शांतता नसते. एकतर सतत टीव्ही सुरू असतो. आपल्या घरात सुरू नसला तरी शेजाऱ्यांचा आवाज आपणास त्रास देत असतो. शांत पडावे म्हटले, तरी पडता येत नाही. तरीही आपण ते जीवन जगतो. त्याचा आनंद उपभोगत असतो. पूर्वीच्या काळीही नगरातील जीवन हे असेच धावपळीचे होते. जगण्यासाठी धडपड होती. संसार म्हटले की चिंता ह्या आल्याच. मुलांची चिंता, आई-वडिलांची चिंता, स्वतःची चिंता. काही ना काही चिंतेचा विषय जरूर असतोच. कोणी आजारी असेल तर त्याची चिंता. स्वतः आजारी असलो, तर स्वतःची चिंता. मन सतत अशाने विचलित होत राहाते. काहींना हा विचार इतका मनाला लागतो की ते या संसाराचा त्याग करतात. खरंतर घरच्या कटकटीतून बाहेर पडावे यासाठी संसाराचा त्याग म्हणजे पळवाट आहे. संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही सन्यस्थ जीवन जगता येते. त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. संसार होत असतो तो करावा लागत नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. दैनंदिन कामकाज हे प्रत्येकालाच करावे लागते. राजा असला तरी त्याला त्याचे काम करावेच लागते. रंकात राहात असणारा नागरिकालाही काम हे करावे लागते. ते टाळता येणे शक्‍य नाही. ही दैनंदिन गरज आहे. अमाप संपत्ती असली तरी ती सांभाळण्याचे काम तरी त्याला करावेच लागते ना? हे काम आपोआप होत असते. संसारातील अनित्यता जो ओळखतो तो काही न करता परमार्थाच्या वाटेवर येतो.

No comments:

Post a Comment