Tuesday, July 14, 2015

रानभाज्यांची चवच न्यारी....

पूर्वीच्या काळी शेतीत नुकसान झाले तर शेतकरी कधी खचत नव्हते. समस्यांना तोंड देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. विविध पर्यायही त्यांनी यासाठी योजले होते. पावसाळ्यात अती पावसामुळे बऱ्याचदा नुकसान होई. अशा परिस्थितीत काय खायचे हा मोठा प्रश्‍न असायचा? विशेषतः पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले तर मोठी समस्या भेडसावत होती. जेवनात भाजी नसेल तर जेवन खाणार काय? दरवर्षीच ही समस्या भेडसावत असे. नेहमीच भेडसावणाऱ्या या समस्यावर त्यांनी विविध उपायही योजून ठेवले होते. उन्हाळ्यातच मुरांबे, पापड, शेवया तयार करून पावसाळ्यात गरजेच्या वेळी त्या उपयोगात आणत असत. उपासमारीवर केलेली त्यांनी उपाययोजना खरचं त्यांच्या कामातील दूरदृष्टी दाखवते. शेतात सर्व भाजीपाला नुकसान झाला तरी ते कधी खचून जात नसत. अशा काळात ते पातरी, घोळ आदी पेरणी न करता उगवणाऱ्या राणभाज्यांचा वापर ते करून जीवन जगत असत. कोणत्याही गोष्टीची ते तमा बाळगत नसत. प्राप्त परिस्थितीशी धैर्याने ते सामोरे जात असत. मानसिकता ढळू देत नसत. यामुळेच पूर्वीच्या काळी आत्महत्या होत नसत. आता आपण मात्र वेगळीच प्रतिष्ठा जपत आहोत. तणे भाज्या म्हणून खाण्यात आपणास कमीपणाचे वाटते. पण त्याची पौष्टीकता कधी आपण विचारातच घेतली नाही. पूर्वीच्याकाळी हेच खाऊन ते धष्टपुष्ट जीवन जगत होते हा विचारच आपल्या मनात येत नाही.
यासाठी आता या राणभाज्या आपल्या भोजनात कशा येतील याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पर्वाच कोल्हापूरातील "निसर्ग मित्र'ने राणभाज्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याला भेट देण्याचा योग आला. तेथे त्यांनी विविध पाककृती तयार करुन ठेवल्या होत्या. त्यात नीरफणसापासून तयार केलेली पाककृतीही होती. इतकी सोपी पाककृती आहे. हे समजल्यावर तर आश्‍चर्यच वाटलं. विशेष म्हणजे याचा स्वाद उत्कृष्ट होता. आपल्या आसपास इतकी फळे आहेत पण त्यांचा स्वाद आपण कधी घेत नसतो. हेही यावेळी माझ्या लक्षात आले. यासाठी राणभाजांचा अभ्यास आपण करायलाच हवा.

नीरफणसापासूनची पाककृती
नीरफणसाचे काप तयार करून घ्यायचे. या कापास हळद, रवा, तिखट, मीठ, हिंग पावडर लावून हा काप तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा. इतका स्वादिष्ट पदार्थ आहे, हे खाल्ल्याशिवाय आपणास कसे लक्षात येईल. यासाठी याचा आस्वाद घ्याच.

ओव्याच्या पानाची भजी
आता तेथे जाऊन भाज्यांचा आस्वाद घेतल्यावर स्वतः करण्याचा मोह होणार हे निश्‍चितच? तेथेच समजले. ओव्याची जाड पाने भजीमध्ये वापरुन भजी करता येतात. घरात परसात ओव्याचे रोप आहे. त्याला आलेली पाने तोडून भजी करून पाहिली. अप्रतिम झाली. त्या पानांचा स्वाद त्या भज्यामध्ये उतरतो. त्यामुळे भजी स्वादिष्ट होतात. आता ही सुद्धा भजी तुम्ही करून बघाच.....