Tuesday, December 6, 2011

गुरुमाऊली

एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच व्यवहारु ।
तो मत्प्रातिकारु । जाणावया ।।

पहिली गुरू ही आई असते. कितीही थोर व्यक्ती झाली तरी त्याच्या या यशामागे आईचे प्रेम, माया निश्‍चितच कारणीभूत असते. हे प्रेम, माया त्याला यशाच्या शिखरावर नेण्यास कारणीभूत ठरते. जगात सर्व काही विकत मिळू शकते, अगदी प्रेमही विकत मिळते. पण आईची माया, प्रेम विकत घेता येत नाही. ती नशिबानेच मिळते. असे म्हटलेही जाते की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईच्या कुशीत शांती असते. आनंद असतो. गोडवा असतो. हे ज्याला मिळाले तो निश्‍चितच तृप्त झाला. आईच्या संस्कारामुळेच तो थोर होतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही आत्मज्ञानी गुरूची गरज असते. आत्मज्ञानी गुरू हे आईसारखेच असतात. तीच गोडी, तेच प्रेम त्यांच्यातून ओसंडून वाहत असते. त्या प्रेमात, त्या गोडीत समरस व्हायला शिकले पाहिजे. त्यामध्ये मनमुराद डुंबायला पाहिजे. आत्मज्ञानी संतांच्या या प्रेमामुळेच त्यांना आईची उपमा दिली गेली आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना "माऊली' असे म्हटले गेले आहे. संतांची समाधी ही संजिवन असते. त्यांच्या सहवासात प्रेम ओसंडून वाहत असते. यामुळेच सातशे वर्षानंतर ही आळंदीत भक्तीचा मळा आजही जोमात फुलतो आहे. या मळ्यात विसावा घ्यायला हवा. त्या कुशीचा अनुभव घ्यायला हवा. माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संत ही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या प्रेमानेच भक्तामध्ये अमुलाग्र बदल घडतो. प्रेमाच्या अनुभूतीने भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. प्रेमाने युद्धही जिंकता येते. यासाठी बोलण्यात गोडवा हवा. वागण्यात गोडवा हवा. आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला ही गोडी लावायला शिकले पाहीजे. प्रेमाचे चार शब्दही दुसऱ्याच्या मनातील राग वितळवू शकतात. दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. यासाठी वक्तव्यात सुधारणा करायला हवी. तशी सवय आपण आपल्याला लावून घ्यायला हवी. आत्मज्ञानी संतही शिष्याला प्रेमाने शिकवतात. त्याच्यात बदल घडवितात. यासाठी अशा या संतांच्या सहवास राहायला हवे. त्यांना जाणून घ्यायला हवे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Tuesday, November 15, 2011

चौथी भक्ती

तैसा मी एकवांचूनी कांही । तया तयाही सकट नाहीं ।
हे चौथी भक्ती पाहीं । माझी तो लाहे ।।

नव्या पिढीला सतत नामस्मरण, चोविस तास माळांचा जप या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत. याची टिंगळ टवाळी या पिढीकडून होत आहे. हे खरे आहे की मनाने नमस्कार केला तरी तो देवापर्यंत पोहोचतो. यासाठी देवळात जाण्याचीही गरज नाही. नुसते स्मरण ही सुद्धा देवाची भक्ती आहे. चांगल्या विचारांचा आचार ठेवला तरी त्याला देवत्व प्राप्त होते. वाल्हाने "मरा',"मरा'... असा जप केला तरी त्याच्यावर राम प्रसन्न झाला. पापांचा डोंगर उभा करूनही देव त्यांच्याच पाठीशी आहे. ही कसली भक्ती? देव दुष्टांच्या जरूर पाठीशी असतो. पण त्याचा उद्देश त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा असतो. म्हणूनच वाल्हाचा वाल्मिकी झाला. दुष्टांना मृत्यूदंड ही शिक्षा नाही. यामुळे दुष्ट नष्ट होतात दुष्टत्व संपत नाही. दुष्टत्व हे मनात असते. देव या दुष्टांची मने बदलू इच्छित आहे. मन परिवर्तन हा देवाचा मुख्य उद्देश आहे. दुष्टांच्यातील दुष्टत्व नष्ट करणे. त्याला सदाचारी बनवणे. त्या वाटेवर तो पुन्हा फिरकणार नाही, असा बदल त्याच्यात घडवतो. सद्‌गुरुही हेच करत असतात. दुष्टांचे मन परिवर्तन झाले, तरच खऱ्या अर्थाने शांती नांदेल. मृत्यूदंडाच्या शिक्षेने एक दुष्ट मारला जाईल. दोन दुष्ट तुम्ही मारू शकाल. असे किती दुष्ट तुम्ही मारत बसणार. दररोज तोच उद्योग करावा लागेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागेल. त्यावर मोठा खर्चही होईल. हा खर्च वाढतच जाईल. कारण एकाला मारले की, उद्या तिथे दुसरा कोणीतरी निर्माण होतो. हे न संपणारे चक्र आहे. त्या ऐवजी दुष्ट विचारच नष्ट करणे अधिक सोयीस्कर आहे. सद्‌गुरू तेच करतात. भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकूर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच तो भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि आता सद्विचारांचा मार्ग धरा. देव तुमच्याच पाठीशी आहे. तुमच्यातही देवत्त्व जागृत होऊ शकते.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Thursday, November 10, 2011

शांती

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरूष ।।

देशात शांती नांदली, तर विकासाला निश्‍चितच प्रोत्साहन मिळते. घरात शांती असेल, तर घरातील वातावरण प्रसन्न राहाते. समाधानामुळे प्रगती होते. घरात भरभराट होते. यासाठी मन समाधानी असायला हवे. समाधानानेच शांती येते. लोभ, क्रोध, माया, मोह आदींमुळे शांती लोप पावते. शांतीचा विनाश होतो. यासाठी यावर नियंत्रण ठेवायला हवे. पण ते जमत नाही. सध्याच्या चंगळवादी युगात तर हे आता अशक्‍यच वाटत आहे. प्रत्येकजण लोभी होताना दिसत आहे. स्पर्धेमुळे एकमेकाचे ऊनुदुणे काढण्यातच समाधान मानले जात आहे. अशानेच शांती लोप पावत आहे. एकमेकामध्ये दुरावा वाढत आहे. यासाठी विचारसरणीच बदलायला हवी. माणसांना बदलता येत नाही. यासाठी आपणच आपल्या प्रगतीसाठी आपल्या विचारात बदल करायला हवा. चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट विचार करून स्वतःला व साहजिकच आसपासच्या सर्वांना त्रस्त करण्याऐवजी चांगल्या विचाराने इतरांची मने जिंकायला हवीत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडी निवडीही वेगळ्या असतात. काळ वेळेनुसार आवडही बदलते. घरातच पाहीले तर आईला दोडका आवडतो. तर वडीलांना वांगे आवडते. भावाला कारले आवडते तर बायकोला मेथी आवडते. स्वतःची आवड याहून वेगळी असते. आवडनिवड सारख्या असणाऱ्या व्यक्तींची मने जुळतात असे म्हणतात. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. हे क्षणीक असते. प्रत्येकाची विचार करण्याचीही पद्धतही वेगळी असते. मोहाने आवड निर्माण होते. वासनेमुळे त्याला प्रोत्साहन मिळते. वासनेने एकत्र आलेली मने भोगापूर्तीच एकत्र असतात. भोगानंतर पुन्हा दुरावा निर्माण होतो. यासाठी वासनेवर नियंत्रण ठेवायला हवे. सद्विचारांनीच दुष्ट विचारावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सद्‌ विचारांची सवय मनाला लावायला हवी. यातूनच मनाला प्रसन्न ठेवता येते. समाधानी ठेवता येते. समाधानी मनाने शरीरात शांती नांदते. शरीरात तसा बदल घडतो. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हा बदल आवश्‍यक आहे. ठराविक स्थिती प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Sunday, November 6, 2011

कुंडलिनी जागृती

कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकासूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ।।

आजकाल कोणत्याही गोष्टीत प्रथम फायदा-तोटा पाहिला जातो. गोष्ट फायद्याची असेल, तर तिचा स्वीकार पटकन केला जातो. यासाठी अध्यात्माचा नेमका फायदा काय आहे. याबाबत सध्याच्या युगात जागृती करण्याची गरज आहे. पण याचा फायदा मिळायला अनेक वर्षे लागतात. यासाठी तसा त्यागही करावा लागतो. गुरुकृपा झाली तर मात्र पटकन लाभ होतो. पण यासाठी साधना करावी लागते. नित्य साधनेने आत्मज्ञान प्राप्ती सहज शक्‍य आहे. ध्यान, साधना याचे फायदे काय आहेत यासाठीच प्रथम जाणून घेण्याची गरज आहे. फायद्याच्या गोष्टी दिसल्यातर नव्या पिढीला अध्यात्माची गोडी निश्‍चितच लागेल. ध्यानाने मन स्थिर होते. मनातील दुष्ट विचार नाहीसे होतात. त्यावर नियंत्रण बसते. ध्यानधारणेच्या प्रक्रियेत कुंडलिनी जागृतीला महत्त्व आहे. सतत नामस्मरणाने, भक्तीने कुंडलिनी सहज जागृत होते. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राची नित्य साधना केल्यास गुरूकृपा होऊन कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृतीस शास्त्रीय आधार आहे. विज्ञानाच्या युगातील पिढीने हे शास्त्र जाणून घेण्याची गरज आहे. अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. येथे चमत्कार, जादू यांना थारा नाही. चमत्कार, जादू ही फसवणूक आहे. जे चमत्कार करून दाखवतात. जादू करून दाखवतात. ते स्वतःला व इतरांनाही फसवत असतात. यासाठी कुंडलिनी जागृतीचे शास्त्र अभ्यासने गरजेचे आहे. शरीरातील शक्ती केंद्रे, जाणून घ्यावीत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूरी चक्र, ह्रद्‌यचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र ( तेजचक्र), ललाटचक्र, सहस्त्राधारचक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कुंडलिनी नावाची तेजःशक्ती- निजाशक्ती जेव्हा त्यांच्या दोषांचा नाश करते तेव्हा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यास प्रतिबंधक असलेली कारणे नष्ट होऊन त्याला सुक्ष्म व शुद्ध बोधव्य लाभते.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Friday, October 28, 2011

गुरुकृपा

मग आलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।।

गुरुकृपा म्हणजे काय? ती कशी होते? याबद्दल प्रत्येकाला उत्सूकता असते. मला एक गृहस्थ म्हणाला. गुरूकृपेने मला सगळे मिळाले. गुरुंचा शब्द मी पाळला आणि अमाप पैसा मिळाला. माझा अध्यात्मावर विश्‍वासही नव्हता. तसे या युगात अध्यात्मावर विश्‍वास तरी कोण ठेवणार? पण मला गुरूकृपेचा अनुभव आला. गुरुंच्या शब्दाला महत्त्व असते. मला दैनंदिन जीवनात अनेक कटकटी वाटत होत्या. घरगुती समस्यांनी मी त्रस्त झालो होतो. समस्यांच्या गर्तेत अडकल्यानंतरच जनतेला देव आठवतो. तसा मलाही देव आठवला. देवळात जायला लागलो. तेथे नेहमी प्रवचन चालायचे. प्रवचनकार सांगत होते. माऊलीने संसार करत परामर्थ करा असे सांगितले आहे. संसार सोडण्याचा विचार माझ्या मनात घोळत होता. यासाठीच मी सन्यस्थाचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करत होतो. पण येथे तर उलटेच सांगितले जात आहे. संसार न सोडता परमार्थ करा असे सांगितले जाते. हे कसे शक्‍य आहे. मी विचार केला. ठिक आहे. हा ज्ञानेश्‍वरांचा आदेश, गुरूंचा आदेश असे समजून प्रयत्न तरी करून पाहू. संसार होत राहतो. परमार्थ करावा लागतो. संसारात राहायचे पण त्यात गुरफटायचे नाही. काय हरकत आहे. असे करून पाहायला. असे समजून मी प्रयत्न सुरू ठेवले. घरगुती समस्यांपासून मी दूर राहीलो. रोजच्या कटकटींचा विचारच सोडून दिला. त्यामुळे झाले काय? संसार सुरू होता. पण त्या संसाराचा त्रास मला होत नव्हता. माझ्या कामावर, व्यवसायावर या कटकटींचा परिणाम होत नव्हता. घरच्या नेहमीच्या कटकटी त्याच असतात. त्याकडे कानाडोळा केला. संसार होतच राहीला. पण त्या कटकटींपासून मी दूर राहीलो. माझा विकास झाला. हातात अमाप पैसा खेळू लागला. आपोआपच संसारात शांती नांदू लागली. पण परमार्थांचा अर्थ अद्याप समजलेला नाही. मोक्ष म्हणजे काय हेही माहित नाही. पण तरीही संसारात शांती नांदते. याचे समाधान आहे. गुरूंचा आर्शिवाद पाठीशी आहे. असे वाटते. ही गुरूकृपाच आहे. आता आत्मज्ञानाचा अभ्यास करत आहे. सांगण्याचा ताप्तर्य हेच की सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरुंचा आर्शिवाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरुंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.



राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Friday, October 21, 2011

आत्महत्या

येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावें घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।।

धकाधकीच्या जीवनात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जीवनात नैराश्‍य आल्याने, कर्जबाजारीपणाला कंटाळून, अपयश आल्याने आत्महत्या केल्या जात आहेत. त्रासाला कंटाळूनही काहीजण आत्महत्या करतात. नव्या पिढीत माणूसकी कमी होत आहे. यातूनच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. माणसाला आधार देणारा माणूसच राहीलेला नाही. कौटूंबिक जीवनातही वादाचे प्रसंग वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीमुळे तर मैत्रीची व्याख्याच बदलली आहे. अशा या युगात मानवता याच धर्माची गरज आहे. त्याचा प्रसार होण्याची गरज आहे. अशी परिस्थिती पूर्वीच्या काळीही होती. पण त्या काळात संतांच्या महान कार्यामुळे यावर प्रतिबंध बसला. सध्याही अशा मानवतेच्या संतांची गरज आहे. सध्या भगवीवस्त्रे घालून धर्माचा प्रसार करणारे अनेकजण दिसतात. पण मानवतेचा गंधही त्यात नसतो. नुसती प्रवचने, सल्ले देऊन हे कार्य होत नाही. यासाठी स्वतः आत्मज्ञानी होण्याची गरज आहे. आत्मज्ञानी संतंच हा मानवतेचा धर्म टिकवू शकतात. असा संत प्रत्येकजण होऊ शकतो. जगातील सर्व धर्म हे मानवतेचीच शिकवण देतात. तरीही जगात अशांतता आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण केली जाते. स्पर्धा लावली जाते. सत्तेच्या हव्यासापायी तंटे लावले जातात. अशा या स्वार्थानेच धर्म बदनाम होत आहे. हुकुमशहांच्या हव्यासाने अनेकांचे बळी घेतले जातात. पण या हुकुमशहांचा शेवट खूपच वाईट असतो पण याची चर्चा होत नाही. हे हुकुमशहा मरताना दयेची याचना करतात. पण त्यांना कोणीही दया दाखवत नाही. काही हुकुमशहांनी तर आत्महत्याच केल्या आहेत. मग त्यांनी अत्याचार तरी केले कशासाठी? दिनदुबळ्यांना दया दाखविली नाही त्यांना कोण दया दाखविणार. हत्या करणारेच आत्महत्या करतात. हाच इतिहास आहे. यातून बोध घ्यायला हवा. यासाठीच तर मानवता धर्माची गरज आहे. देशात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गंभीर रुप धारण केले आहे. नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मानवतेच्या धर्माचा प्रसार करायला हवा.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Monday, October 17, 2011

स्वधर्माचे आचरण

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ।।

अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांवर नेहमीच टिका होते. पारायणे करून कुठे देव भेटतो का? पारायणांचा फायदा काय? संतांच्या मागे लागून वेळ फुकट घालविण्यात काय अर्थ आहे? ध्यान, धारणेत वेळ घालविण्या ऐवजी देशसेवा करा? असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टिका करणारे नास्तिक आहेत असेही नाही. पण टिका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे. पण आराम काही काळ तरी हवा असतो. हे मान्य करायलाही वेळ नाही. नवीपिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे. देव आहे तर मग दाखवा? नाहीतर तो विचार सोडून द्या. अशी विचारसरणी बनली आहे. अध्यात्म हे थोतांड आहे. असे नव्या पिढीला वाटत आहे. देवाला रिटायर करा असे म्हणणारे, तसे सल्ले देणारेही आज बरेच आहेत. भारतात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहीले आहेत. पण ते वाचायला आज नव्या पिढीला वेळच नाही. ते काय आहेत हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. ज्यांची इच्छा आहे. त्यातील अनेकजण हे ते केवळ त्यातून पैसा कसा मिळवता येतोच याचाच विचार करतात. देशातील महान अध्यात्मिक ग्रंथावर टिका होत आहे. देशातीलच नागरिक त्यावर टिका करत आहेत. वेळ असणाऱ्या मंडळींनी मांडलेले शास्त्र, वेळ घालविण्यासाठी मांडलेले सिद्धांत आहेत. असे म्हटले जात आहे. टिका करणारे परके नाहीत. देशीच आहेत. असे का? तर या स्वधर्माचे आचरणच थोडे विषम आहे. झटपट निकाल यात लागत नाही. पुर्वी एक दिवशीय सामना 60 षटकांचा असायचा. नंतरच्या काळात तो 50 षटकांवर आला. पुढे पुढे 45 षटकेच खेळली जाऊ लागली. आता ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामने खेळले जात आहेत. झटपट निकाल लागला पाहीजे. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळायला हवे. लाभ झटपट मिळायला हवा. हुशारीची व्याख्याही बदलली आहे. गुण मिळविणारे हुशार. मग ते कसेही मिळविलेले असोत. पाठांतर करून घोकम पट्टी करून आज काल हुशार होता येते. गुणांवर हुशारी तोलली जात आहे. अशाने नव्या पिढीतील चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होत आहे. ती क्षमताही राहीलेली नाही. पैसा कमविणे हेच उद्दिष्ट झाले आहे. अशा या विचारसरणीत स्वधर्माचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. व्यापारी वृत्तीने अध्यात्माचा विचारच संपवला आहे. विश्‍वास, श्रद्धा, भक्तीवर आधारिलेले अध्यात्म आता दिसेनासे झाले आहे. मतांच्या पेट्यांसाठी रथ यात्रा काढली जाते. उत्सव भरवले जातात. पैसा मिळतो म्हणून देवधर्म केला जातो. दानही पैसा अधिक मिळावा यासाठीच केले जाते. फळाची अपेक्षा ठेऊन कर्म केले जात आहे. अशात स्वधर्माचा विसर पडला आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच जाणणे. मी कोण आहे याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांमध्ये आहे. सर्वांमधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे. यासाठी ध्यान, धारणा आहे. यातून सुख, शांती, समाधान मिळते. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी याचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाचे फळ निश्‍चितच मिळते. म्हणूनच तर ही गुरूशिष्य परंपरा आजही अखंड सुरू आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Monday, October 10, 2011

परमसेवा

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ।।
सद्‌गुरु मनकवडे असतात. ते भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. आत्मज्ञानी संत त्यानुसार भक्ताला मार्गदर्शन करतात. आधार देतात. भक्ताची आध्यात्मिक प्रगती करतात. पण अशा आत्मज्ञानी सद्‌गुरुंचा मनोभाव ओळखणार कसा? सद्‌गुरुंच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार त्यांची सेवा करणे, हीच खरी परमसेवा आहे. खरा शिष्य सद्‌गुरूंच्या मनातील भाव ओळखू शकतो. त्यानुसार त्यांची सेवा करतो. आत्मज्ञानी संताना शिष्याकडून फक्त पान, फुल, फळ याचीच अपेक्षा असते. स्वच्छ अंतकरणाने दिले तरच ते त्याचा स्वीकार करतात. पण हल्ली संतांना आणि देवस्थानांना देणग्या देण्याची चढाओढ प्रचंड सुरू आहे. काही समाजात तर पुजेचे मान मिळविण्यासाठी लिलावही आयोजित केले जातात. विशेष म्हणजे लाखो, कोटी रुपये खर्चून ही सेवा केली जाते. देवाला जर फक्त पान, फुल, फळ हेच लागते तर ही जडजवाहिरे, धनसंपत्ती दान का केली जाते? दान दिल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये काळ्यापैशाचे प्रमाण अधिक आहे. मुळात ही संपत्ती गैरमार्गाने कमविली जाते आणि ती पचनी पडण्यासाठी देवाला दान दिले जाते. हे कसले दान. खरे दान, खरी सेवा ही यामध्ये नाहीच. अशा प्रकारामुळेच अध्यात्माची चौकट बदनाम होत आहे. या अपप्रचारामुळेच धर्मावर शिंतोडे ओढले जात आहेत. खरे तर धर्मामध्ये याला सेवा म्हटलेले नाही. हा तर व्यापार आहे. यासाठी सेवेचा खरा अर्थ समजून घेतला पाहीजे. अध्यात्माचा अभ्यास केला पाहीजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारी साधना केली पाहीजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Sunday, October 2, 2011

आदित्याची झाडे

आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणें सदा ।।

आदित्याची झाडे म्हणजे सुर्यफुल. ते नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. सूर्याच्या धगीला ते घाबरत नाही. क्षत्रियाचे हे एक लक्षण आहे. पण सध्याच्या युगात हा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. न भिता, न डगमगता, न घाबरता शत्रूचा सामना करायला हवा. नुसते ताठ उभे राहीले तरी शत्रूची पळता भय थोडी होते हे लक्षात घ्यावे. अंगात असा ताठर बाणा हवा. घरात कुत्रा असेल तर त्या घरात जायला आपण घाबरतो. कुत्रे काहीही करत नाही. तरीही भीती असते. ते अंगावर येईल का? ते चावेल का? ते भुंकेल का? असे ना ना विचार डोक्‍यात घोळत असतात. कुत्रे फक्त उभे राहीले तरी समोर जायला भीती वाटते. ते नुसते पाहात असते. पण समोर जाण्याचे धाडस होत नाही. इतकी दहशत कुत्रा निर्माण करतो. कुत्र्याचा ताठरपणा इतका प्रभावी असतो. त्याच्या या व्यक्तीविशेषामुळेच तो घरात पाळतात. घराचे संरक्षण तो करतो. चोरांच्या आहटाने कुत्रा भुकतो. मालकाला जाग येते. चोरी होण्यापासून संरक्षण होते. शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी भुजगावणे उभारतो. भुजगावण्यामुळे पक्षी दूर पळतात. धाटातील दाण्यांचे सरक्षण होते. पक्षी शेतात कोणी तरी उभे आहे असे समजून तेथे जात नाहीत. इतका या भूजगावण्याचा प्रभाव आहे. आजार हा माणसाचा शत्रू आहे. मग तो कोणताही असो. सध्याच्या युगात अनेक मानसिक आजार माणसाला जडले आहेत. आजारपणात धीर हेच मोठे औषध आहे. धीर खचला तर आजारपणातून बाहेर येणे कठीण होते. धीर खचता कामा नये. आजाराचा सामना खंबीरपणे करायला हवा. ध्यैर्याने सामोरे जायला हवे. जो घाबरला तो संपला. भीती मनात उत्पन्न होते. यासाठी मन खंबीर असायला हवे. मन खचू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मनावरच सगळे अवलंबून आहे. मनात आले तर सर्व काही साध्य करता येते. मनात आले तर जगही जिंकता येते. यासाठी मनाची तशी तयारी करायला हवी. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी करावी असावी लागते. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मन स्थिर झाले की नेम चुकत नाही. लक्ष्य साध्य होते. यासाठी मनावर नियंत्रण मिळवायला हवे. आदित्याच्या झाडाप्रमाणे मनालाही सामर्थवान बनवले पाहीजे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Saturday, October 1, 2011

राजेशाही

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडंव होये ।
कां राक्षसां दिवो पाहे । राति होऊनी ।।
सध्या लोकशाही आहे. राजेशाही पूर्वी होती. राजेशाहीत राजा होता. लोकशाहीत आता लोकप्रतिनिधी आहेत. या दोन्ही शाहीत निश्‍चितच फरक आहे. राजेशाहीत भ्रष्टाचारी राजाचे शासन जनता उलथून पाडत असे. जनतेने राजाच्या विरोधात विद्रोह केल्याच्या अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. लोकशाहीत भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा पराभव करण्याचा अधिकार जनतेला दिला आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी हे आजचे सरदार व मंत्री हे राजे आहेत असे म्हणायला काहीच हरकत नसावी. काळ बदलला तसा विचारही बदलले. सत्ता पलटली आहे. एकाधारशाही आता संपली आहे. पण विचार केला तर राजेशाहीत जनता जितकी सुखी होती तितकी लोकशाहीत निश्‍चितच सुखी नाही. पण लोकशाही आवश्‍यक आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य आहे. सर्वांचा विचार यामध्ये आहे. पण लोकप्रतिनिधींनी सामर्थवान राजाच्या गुणांचा, आदर्शांचा वारसा जपायला हवा. केवळ ऐशोआराम करणे म्हणजे राजेशाही अशी व्याख्या करणे योग्य नाही. सध्या हे लोकप्रतिनिधी असेच समजून जगत आहेत. सत्ता आली की ऐश्‍वर्य. स्वतःचे घर भरायचे. उलट राजेशाहीत राजांनी काय केले. त्यांनी सत्तेचा भोग घेतला स्वतःचे राजवाडे भरले. असे सांगून त्यांचाच हा आदर्श आहे. हे पटवून देण्यातही हे लोकप्रतिनिधी मागे नाहीत. पण प्रत्यक्षात राजेशाहीचा अर्थ तसा नाही. सामर्थवान राजाचा प्रभाव काय होता हे ज्ञानेश्‍वरांनी एका ओवीतच सांगितले आहे. राजाची दहशत काय असते हे यातून स्पष्ट होते. राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवर जायलाही चोर घाबरतो. चोराचे धाडसही होत नसते. इतकी दहशत त्यांच्यामध्ये होती. मग सध्याच्या लोकप्रतिनिधींची अशी दहशत आहे का? ती का नाही. उलट लोकप्रतिनिधीच चोरांना सोडवायला पोलिस ठाण्यात दाखल होतात. असे आजचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या सभेतच चोरीच्या अनेक घटना घडतात. लोकप्रतिनिधींच्या वाटेवर जायला आजची जनताच घाबरते आहे. यामुळेच सभेला पैसे देऊन जनता गोळा करावी लागते. चोरावर धाक असणाऱ्या राजाचा रुबाब काय असेल याची कल्पनाही या लोकप्रतिनिधींना करवत नाही. लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे. अशा श्रेष्ठ राजांचा आदर्श हा जपायलाच हवा. त्यांचे गुण हे अंगी बाणायलाच हवेत.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Friday, September 30, 2011

भक्तीचा महिमा

भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये ।
तो मी तुझे जाहालो आहें । खेळणें आजि ।।

इतिहासातील अनेक गोष्टी आपणास पटत नाहीत. त्यावर विश्‍वास ठेवण्याऐवजी अविश्‍वास व वादग्रस्तपणाच अधिक वाढविला जात आहे. अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान कृष्ण होते. गोरा कुंभाराची मडकी स्वतः विठ्ठलाने वळली. तर बहिणाबाईंना जात्यावर पिठ दळायलाही त्याने मदत केली. भक्ताची भक्ती इतकी महान आहे. की येथे चक्क भगवंत त्याच्या मदतीला धावून येतो. भक्ताला त्याच्या प्रत्येक कामात सहकार्य करतो. पण सध्याच्या युगाला या गोष्टी पटणाऱ्या नाहीत. हे कसे शक्‍य आहे. असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. इतिहासात एक गोष्ट मात्र चांगली आहे. रचनाशास्त्रात मात्र या नव्या पिढीचा पराभव होतो. जगातील अनेक मंदीरे, वास्तू अशा आहेत की त्या बांधल्याच गेल्या कशा यावर विश्‍वास बसत नाही. आहे ना गंमत. होतो ना येथे होतो ना पराभव. नव्या पिढीला उच्च तंत्रज्ञानाचा अहंकार चढला आहे. पण त्या काळात यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते. हे मात्र मान्य करावेच लागते. थोडा विचार केला तर या भक्तीच्या गोष्टीही मनाला पटू शकतील. शास्त्राच्या आधारावर बोट ठेऊन चालणारी नवी पिढी सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. त्यांना तो सिद्धांत सिद्ध करून दाखविला तरच त्यावर विश्‍वास बसतो. अध्यात्मही अनुभूतीवर चालते. अनुभूती आल्यावरच अध्यात्मातावर विश्‍वास बसतो. अन्यथा देवाचे अस्तित्वच नाही अशा भ्रामक कल्पनेत तो वावरतो. देवाचे अस्तित्व आता नव्या पिढीला कसे पटणार? आणि नवी पिढी पटले तरच स्वीकारणार. प्रल्हादासाठी देव खांबात प्रकटला. त्याने नृसिंह अवतार घेतला. आता नव्या पिढीला असा नृसिंह अवतार झाला तरच तो पटणार आहे. इतकी ही पिढी पुढे गेली आहे. देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे. पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. हिरण्यकश्‍यपूच्या अहंकाराने त्याचे अस्तित्व झाकले जात आहे. प्रत्येकाच्या मनातच प्रल्हाद दडला आहे. त्याचे अस्तित्व नित्य आहे. फक्त त्याची जागृती जाणवायला हवी. मनातच त्याचे अस्तित्व जागृत करायला हवे. यासाठी त्याची अनुभूती यायला हवी. मग आपोआपच विश्‍वास बसेल.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Thursday, September 29, 2011

आळस

मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावे वेगीं ।।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ।।
एखाद्या गोष्टीत विजयी व्हावे अशी जर इच्छा असेल तर ती गोष्ट मनापासून करायला हवी. ती करताना आळस करून चालणार नाही. नाहीतर विजय हस्तगत करता येणार नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसामुळे माणूस संपतो. राज्ये बरखास्त होतात. सीमेवर पहारा देणारा सैनिक जर आळशी असेल तर राज्य कसे टिकेल. परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांने आळस केला तर काय होईल? आळस केल्यावर गुणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल. यासाठी कामात आळस हा असताच कामा नये. आळस करून विजयाची अपेक्षा ठेवणे चुक आहे. विजयी व्हायचे असेल तर प्रथम आळस हा झटकायलाच हवा. तलवार जर तशीच ठेवली तर तिला गंज चढतो. तिची धार कमी होते. भाजी चिरायच्या विळतीचेही तसेच आहे. वापर नाही केला तर तिचीही धार कमी होते. गंजामुळे धार जाते. जीवनाचेही तसेच आहे. आळस, कंटाळा केलातर त्यालाही गंज चढतो. जीवनाची धार कमी होते. धार येण्यासाठी नियमीतपणा हवा. रोजच्या वापरात असणाऱ्या विळीला चांगली धार असते. भाज्या कापून कापून तिचा धारधारपणा वाढतो. दररोज फरशी पुसली तर तिची जशी चकाकी वाढते. तसे जीवनात कंटाळा घालवला तर नेहमीच ताचे तवाने राहता येते. मन प्रसन्न ठेवता येते. आळस हा मनातच असतो. तो घालविण्यासाठी मनाची शुद्धता गरजेची आहे. अध्यात्मिक वाचनातून, पारायणातून मनाला शुद्धता येते. या शुद्धतेनेच धार चढते. कर्माने त्रास होतो म्हणून त्याचा कंटाळा करणे योग्य नाही. नोकरीत त्रास होतो म्हणून नोकरी सोडून कसे चालेल. हा त्रास सोसायलाच हवा. आळस झटकायला हवा. आळस माणसाला संपवतो. तो कधीही संपत नाही. यासाठी आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Monday, August 1, 2011

10 वर्षांत 80 लाख शेतकऱ्यांचा शेतीला रामराम

उदारीकरणाचा ग्रामीण भागावर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. 1991 ते 2001 या काळात 80 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. याला ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनीही पुष्टी दिली आहे. 1991 मध्ये 11.3 कोटी लोक शेती कसत होते, तर 2001 मध्ये 10.5 कोटी शेतकरीच शेती करत आहेत. दररोज दोन हजार शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत. असे चित्र असताना दुसरीकडे रोजगारातही घट होत आहे. यामुळे ग्रामीण भागाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होणार आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, शेतमजुरांची टंचाई, कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेत येणाऱ्या अडचणी आदी वाढत्या समस्यांमुळे शेतीकडे वळणाऱ्यांची संख्या घटतेय. कर्जबाजारीपणाला कंटाळून 1995 ते 2009 या काळात महाराष्ट्रातच जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उदारीकरणानंतर देशात बियाणे उत्पादन करणाऱ्या मोन्सॅन्टो, सिंजेटा, कारगिल यांसारख्या परदेशी कंपन्या भारतात आल्या. यामुळे उत्पादनात वाढ झाली. किडीला प्रतिबंधक जाती या कंपन्यांनी दिल्याने उत्पादन वाढले; पण हे महागडे बियाणे घेऊन शेतमालाला योग्य भाव नसल्याने ते शेतकऱ्यांना परवडले नाही. वाढत्या उत्पादन खर्चाबरोबर शेतमालाला भावही मिळणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. जागतिक पातळीवर भाव वाढल्यावर केली जाणारी निर्यातबंदी शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. उदारीकरणामुळे शेतीच्या संरचनेत बदल झाला आहे. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आले. जिरायत शेती बागायती होऊ लागली. तृणधान्यांची जागा नगदी पिकांनी घेतली. आता तर अचूक निदानाची शेती देशात विकसित होत आहे. शेतीतील या बदलत्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होत आहे. पेरलं म्हणजे उगवतंय इतकी उतावीळपणे शेती करून यापुढे चालणार नाही. बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे याचा विचार करूनच यापुढे शेती करावी लागणार आहे. तरच शेतीत शेतकरी तग धरू शकेल. उदारीकरणामुळे शेतमालाच्या निर्यातीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला. जागतिक व्यापारी संघटनेने (डब्ल्यूटीओ) ठरवून दिलेल्या नियमानुसार निर्यातीत बदल झाला. युरोपमध्ये निर्यात होणाऱ्या पिकांच्या डीएनएची तपासणी केली जाते. त्यानंतरच निर्यातीस परवानगी दिली जाते, असे बदल आता होत आहेत. शेतीचे हे बदलते रूप विचारात घेऊनच शेती व्यवसायात उतरायला हवे. यापुढे एकट्याने शेती करून चालणारे नाही. एकात्मिकपणे शेती करायला हवी. यामुळेच गटशेती, सहकारी शेती यांसारख्या कल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. काही कॉर्पोरेट कंपन्याही शेतीच्या क्षेत्रात उतरत आहेत. हरितगृहांनी पारंपरिक शेतीच बदलून टाकली आहे. काही ठिकाणी संगणकाच्या साहाय्याने केवळ पाच-सहा व्यक्तींच्या सहकार्याने 100 एकर शेतीत उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. हे बदलते रूप सर्वसामान्य शेतकऱ्यांना पेलवणारे नाही. यामुळेच तो आता यातून बाहेर पडू लागला आहे. हेच एक मोठे आव्हान आता सरकारपुढे आहे.


राजेंद्र घोरपडे

Monday, July 25, 2011

शेतकरी राजा जागा राहा

शेतकरी राजा जागा राहा
"पेरलं म्हणजे उगवतयं' अशी शेती करण्याचे दिवस आता संपले आहेत. शेतीमध्ये नैसर्गिक आपत्ती बरोबरच आता कृत्रिम समस्याही वाढल्या आहेत. शेती करताना टंगळामंगळ करून चालणार नाही. जागरूक राहूनच शेती केली तरच ती तग धरू शकणार आहे. पूर, कीड, रोग, दुष्काळ हा आता नेहमीचाच आहे. जागतिक तापमानवाढीनंतर ही संकटेही वाढतच चालली आहेत. या संकटाबरोबरच खते, बियाणे टंचाई आणि यात होणारी फसवणूक या समस्यांनाही शेतकऱ्यांना आता भेडसावत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबिनचे बी उगवलेच नाही. बियाणे उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अशी फसवणूक कशी काय झाली? याचा विचार होण्याची गरज आहे. कृषि विभागाने वेळीच जागरूक राहून उगवणीसाठी अप्रमाणित असलेल्या सोयाबिनच्या 231 क्विंटल बियाण्याची विक्री बंदीचा आदेश दिला. यामुळे होणारे नुकसान टळले आहे. पण हातकंणगले तालुक्‍यातील रुकडी येथे जवळपास 80 एकरावर जुनमध्ये झालेल्या सोयाबिनची पेरणीही उगवली नव्हती. संबंधीत बियाणे उत्पादक कंपनीने लगेचच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन हे प्रकरण मिटवले खरे. पण शेतकऱ्यांनी असे प्रकार घडल्यानंतर याची तक्रार कृषि विभागाकडे करायला हवी. अन्यथा हे प्रकार वाढतच राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळेच अशा प्रकारावर वेळीच प्रतिबंध बसू शकेल. बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवयला हव्यात. अन्यथा नुकसानभरपाई मिळण्यातही अडचणी येऊ शकतात. याची काळजी घ्यायला हवी. यंदा कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लवकर सुरू झाला. यामुळे पेरण्या वेळेवर झाल्या. समाधानकारक पाऊसही पडत आहे. निसर्गाची शेतकऱ्यांना चांगली साथ मिळत आहे. पण बोगस बियाण्यांच्या अशा घटनांनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नुकसानभरपाई देऊन झालेले नुकसान टाळता येणारे नाही. वेळेवर पेरणी झाली नाही, तर सोयाबिनवर किड-रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामुळेही नुकसान होते. तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची झालेली दगदग विचारात घ्यायला हवी. शासनाची जागरूकताही महत्त्वाची आहे. पण शेतकऱ्यांची तक्रारच नाही असे सांगून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते. हे करून चालणार नाही. बोगस बियाण्यांची विक्री कंपन्यांकडून होणार नाही यासाठी कंपन्यावर काही बंधणे घालायला हवीत. असणारे कायदे कडक करायला हवेत. कंपन्यांच्या या कारभारावर शासनाचा वचक असायलाच हवा. शेतकऱ्यांनीही यासाठी वेळीच आवाज उठवायला हवा. केवळ नुकसानभरपाई घेऊन गप्प बसण्याचे दिवस आता संपले आहेत.

Saturday, May 14, 2011

मौन

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तात्री कें बांधों हाव ।
दिससी तेतुली भाव । भजों काई ।।

पाटगावचे मौनी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ते नेहमी मौन धारण करून असत. फक्त समर्थ रामदास स्वामी यांच्याशीच ते संभाषण करत. त्यांच्यासमोरच त्यांचे हे मौन व्रत सोडत. अशा या महान गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना 1676 मध्ये अनुग्रह दिला. कर्नाटक दौऱ्यांच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अनुग्रहाचा लाभ झाला. गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी मोठे भाग्य लागते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन बखरीमध्ये आढळते. पण मौनी महाराजांच्या विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कोणत्या जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे होते याचीही माहिती नाही. त्यांचे गुरू कोण? याचेही पुरावे उपलब्ध नाहीत. प्रसिद्धीपासून पराडमुख असणारे संतच महान होतात. माहिती उपलब्ध नसणारे, असे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांचा भक्त परिवार आजही मोठा आहे. त्यांच्या महान कार्यानेच, भक्तांना अनुभव देण्याच्या सामर्थामुळेच ते महान झाले आहेत. समाधीस्थ झाले तरीही ते आपल्या भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांची प्रगती साधत राहतात. अनुभूतीतून भौतिक, आध्यात्मिक प्रगती साधतात. यासाठीच त्यांची समाधी, मंदीरे ही संजीवन समजली जातात.
सध्याच्या युगात मौन व्रत पाळणारे भेटणेच अशक्‍य आहे. हं, पण संसदेत "मौनी खासदार' म्हणून ओळखणारे अनेकजण आहेत. विशेष म्हणजे हे मौनी खासदार प्रत्येक निवडणूकीत निवडून येतात. 30-40 वर्षेतरी सलग सत्ता त्यांच्याच हातात असते. त्यांच्यावर मौनी खासदार म्हणून टिकाही होते, पण तरीही ते निवडून येतात. लोकमत त्यांच्या बाजूने असते. हे कसे? यावर संशोधन होणे गरजेचे आहे. काय खंरच त्यांना मौनाचा फायदा होतो का? कारण सध्या दंगेखोर नेत्यांपेक्षा असले मौनी नेतेच परवडले असे जनतेला म्हणायचे तर नाही ना?
मौनाचे अनेक फायदे आहेत. पण हे व्रत सर्वसामान्यांना जीवन जगताना पाळता येणे कठीणच आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. प्रयत्नांनी सर्वकाही साध्य होते. सांसारिक जीवनात या मौन व्रताचा निश्‍चितच फायदा होतो. घरातील वादाच्या प्रसंगी, भांडण तंट्यामध्ये मौन धारण केल्यास हे वाद निवळू शकतात. मौनामुळे सहनशीलता येते. वयोवृद्ध, ज्येष्ठांना घरात उगाचच बडबड करून इतरांना त्रास देण्याची सवय असते. तसे ते मुद्दाम करत नसतात. ही त्यांची सवयच असते. याचा त्रास इतरांना होतो. हे त्यांच्या कधीही लक्षात येत नाही. तसे ही गोष्ट प्रत्येक कुटूंबात आढळतेच. यावरून वाद हे होतच असतात. ही प्रत्येक कुटूंबातील समस्या आहे. वयोवृद्धांच्या अशा वागण्यामुळेच वृद्धाश्रमांची गरज वाढत चालली आहे. शांत बसणे त्यांना कधी जमतच नाही. तारूण्यातही इतका उत्साह त्यांनी कधी दाखवलेला नसतो. पण म्हातारपणी त्यांना कामाचा मोठा उत्साह असतो. अशा गोष्टींचा कुटूंबातील घटकांना त्रास होतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी अध्यात्मातील या मौनव्रताचा अवलंब करावा. असे त्यांना वाटत नाही. आध्यात्मिक वाचन जरूर करतात. पण मौन व्रताचे पालन ते कधीही करत नाहीत. किंवा करावे असे त्यांना कधी वाटतही नाही. पण त्यांनी या उतार वयात हे व्रत पाळले तर त्यांच्या इतरांना मोठा फायदा होईल यात शंकाच नाही. मनाला आनंदी ठेवण्यासाठी, घरातील शांती कायम ठेवण्यासाठी हे मौन व्रत निश्‍चितच लाभदायक आहे.



राजेंद्र घोरपडे 9011087406

Monday, May 9, 2011

नास्तिकवाद

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला । नास्तिकवादु ।।

नास्तिक मग तो कोणत्याही जातीतील असो, शेवटी तो नास्तिकच असतो. पापीच असतो. एखाद्या नास्तिकाने धनाच्या, संपत्तीच्या मोहाने परजातीचा स्वीकार केला, तरी त्या जातीतील लोक त्याचा स्वीकार करतीलच असे नाही. कारण जात बदलल्याने त्याचे नास्तिकपण धुतले जात नाही. त्याने केलेली पापे धुतली जात नाहीत. सध्या जागतिकरणाच्या काळात जातीय व्यवस्थेला फारसे महत्त्व राहीलेले नाही. जातपात आता मानली जात नाही. तसे एकादृष्टीने हे चांगलेच आहे. कारण सध्याच्या युगात जातीय व्यवस्थेला उच्च-नीच या भेदभावांनी घेरलेले होते. यामुळे जातीय व्यवस्थेचा मुळ उद्देशच नष्ट झाला होता. आपल्या देशात समाजात एकोपा नांदावा, सुख शांती नांदीवी या उद्देशाने जातीय व्यवस्थेची रचना करण्यात आली. यामध्ये उच्चनीच असा भेदभाव कधीही नव्हता. पण काळाच्या ओघात काही स्वार्थी राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा भेदभाव निर्माण केला. पैशाच्या लोभाने लालसेने, स्वार्थी वृत्तीमुळे हा वाद, हा भेदभाव निर्माण केला. जातीय व्यवस्थाही मुळात सर्वांना समान हक्क देणारी आहे. सर्वांना त्यामध्ये समान वागणूक दिली जात होती. शांतता नांदावी हा मुख्य उद्देश त्यामध्ये होता. पण स्वार्थांमुळे हा मुख्य उद्देशच नष्ट केला गेला. मुळ रचनेत भेदभाव नाही. शांतीसाठी उभारलेल्या गोष्टीमध्ये अशांती कशी असेल. स्वार्थीमंडळींनी ही अशांती घुसडली आहे. पण आता काळ खुपच पुढे गेला आहे. सध्याच्या काळात वाद निर्माण करणारे हेच आहेत आणि वाट मिटवणारेही हेच आहेत. यामुळेच सत्तेत वारंवार बदल होत आहेत. एकादे नाटक फार काळ टिकत नाही. त्याचाही कालावधी असतो. स्थिर सरकार ही कल्पनाही आता मागे पडली आहे. देशात स्थिर सरकार नांदावे असे वाटत असेल तर, स्वार्थी राजकर्त्यांची ही फळी मोडून काढायला हवी. पण याविरुद्ध आवाज कोण उठवणार? माणसांना सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माणसे सुधारतील याची शाश्‍वती देता येत नाही. तसे त्याचा परिणाम काही ठराविक लोकांवर जरूर होतो. काहीजण सुधारतात ही. सर्वच बदलतात असे होत नाही. मग नेमके याविरूद्ध लढणार कसे. नास्तिकांना अस्तिक करणे अवघड आहे. पण त्यांच्यातील नास्तिकता न स्वीकारने, हे तर आपल्याच हातात आहे. यावर एकमत व्हायला हवे. आपोआप बदल होईल.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Friday, May 6, 2011

झोत : बफर स्टॉक खुला करावा

झोत
.......................
बफर स्टॉक खुला करावा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत खतांचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी प्रत्येक गावात खत वापर, जमीन आरोग्यपत्रिका या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 12.94 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे महाराष्ट्र दिनाच्या आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी सांगितले. नुकतीच खते आणि बियाणेसंदर्भातील राज्याचे खरीप नियोजन जाहीर करण्यात आले. यामध्ये यंदा खते आणि बियाण्यांचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील मंत्री खताबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही जाहीर करतात. हंगाम सुरू होण्याआधी ही स्थिती सर्वत्र असते; पण हंगाम सुरू झाल्यानंतर या सर्व घोषणा हवेत विरतात. खते मात्र शेतकऱ्यांना मिळत नाहीत. ही आजपर्यंतची स्थिती आहे. ही स्थिती कशामुळे उद्‌भवली याचा विचार करण्याची गरज आहे. पूर्वी खतांचा पुरवठा हा सहकारी सोसायट्यांमार्फत होत होता. आता या संस्था बंद अवस्थेत आहेत. यामुळे खरे तर खतांचे नियोजन कोलमडले आहे. सोसायट्यांप्रमाणे कृषी सेवा केंद्रे खतांचे नियोजन करू शकत नाहीत. सेवा केंद्रात लिंकिंगचीही सक्ती केली जाते. याचा विचार व्हायला हवा. सोसायट्यांप्रमाणे आता शासनाने अशी यंत्रणा उभी करायला हवी. साखर कारखाने, संस्था पातळीवर खतांचा पुरवठा केल्यास खतांचे नियोजन योग्य प्रकारे होऊ शकेल. खतांचा उपलब्ध साठा आणि आवश्‍यक साठा शासनाला मिळू शकेल. यंदा खरिपासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मागणीपेक्षा खतांचा पुरवठा जास्त आहे, तरीही खते वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी आहे. यंदा युरिया, डी.ए.पी, 10:26:26 या खतांची टंचाई भासण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. कृषी विभागाने शासकीय आदेशानुसार 19 हजार टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे नियोजन केले आहे, त्यापैकी पाच हजार 600 टनांचा बफर स्टॉक आताच करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच खतांची मागणी असते. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने या कालावधीत शेतकऱ्यांना खते लागतात. शासनाने खरिपाच्या उत्तरार्धात खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून या कालावधीतही बफर स्टॉक करण्याची सक्ती केली आहे. यामुळे सध्या खतांची टंचाई असूनही शासकीय आदेशानुसार विक्रीसाठी कमी प्रमाणात खते उपलब्ध असतानाही त्यातून बफर स्टॉक केला जात आहे. त्यामुळे ज्या वेळी सप्टेंबर, ऑक्‍टोबरच्या दरम्यान मागणी कमी असते, त्या वेळीच बफर स्टॉक करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यंदाही कृषी विभागाने खते व बियाणे भेसळीबाबत भरारी पथकाची स्थापना केली आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकात जिल्ह्यातील प्रमुख कृषी अधिकारी व तंत्रज्ञ, तर तालुकास्तरावरील पथकांत तालुक्‍यातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. या पथकांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घेण्याची गरज आहे. फसवणूक केली जात असलेल्या दुकानांची माहिती भरारी पथकांना देऊन योग्य ते सहकार्य वेळीच केल्यास खतांच्या साठेबाजीवर मात करता येणे शक्‍य होईल.

Monday, May 2, 2011

खरा धर्म

पैं वासरूवाचा भोंकसा । गाईपुढे ठेवू जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ।।

हुशारमंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते. पण हे कार्य सर्वांनाच साधता येते असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात. काही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळमार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेऊन चालत नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेऊन लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात असे नाही. पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला तर, तो अधर्म होत नाही. खरे तर प्राप्त परिस्थिती जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसाने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहीला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसले. एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भूकने व्याकूळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्यांने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. अशा परिस्थितीत त्यांने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्यांने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. प्राण्यांना हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुडतो. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गाईला आनंद वाटतो. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःचा त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.

राजेंद्र घोरपडे 9011087406

Thursday, April 28, 2011

धनलोभी

ऐसेनि धना विश्‍वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया । उरों नेदी ।।

पैसा हा सध्याच्या नव्या युगाची अत्यावश्‍यक गोष्ट आहे. पैसा असेल तर सर्व काही सुलभ होते. पैशाशिवाय आज माणसाला काहीच किंमत नाही. यामुळे प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. या धनाच्या लोभातूनच अनेक प्रश्‍न उत्पन्न होत आहेत. खून, मारामाऱ्या तर आजकाल नेहमीच्याच घटना झाल्या आहेत. तसे पूर्वीच्या काळीही ह्या समस्या होत्या. राजेशाहीत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी, वाढविण्यासाठी लढाया होत होत्या. सारा कोणी वसूल करायचा यातून वाद होत होते. पैशासाठीच ह्या लढाया झाल्या. सध्यातर कोणताही काम धंदा न करणारी गुंड माणसे लोकांकडून हप्ते वसूल करून स्वतःचे गुंडगिरीचे साम्राज्य प्रस्थापित आहेत. पैशाच्या लोभानेच हे साम्राज्य उभे राहात आहे. चंगळवादातून गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये अशिक्षित आहेत, असे नाही तर सुशिक्षितांचीच संख्या अधिक आहे. अनेक शिकली सवरलेली माणसेच हे काम करत आहेत. राजकिय नेते तर ही माया जमविण्यासाठी रोज नवनव्या युक्‍त्या शोधतात. त्याचा अवलंब करतात. योजना राबविण्यापेक्षा त्यातून किती माया आपणास जमा करता येते. यावरच त्यांचा भर अधिक असतो. अशा योजनांसाठी ते दिल्ली वाऱ्या, मंत्रालयाचे खेटे मारतात. योजनेचा पैसा लाटण्यातच त्यांना अधिक रस वाटतो. पैसा कमविण्यात मठ, मंदीरेही मागे नाहीत. अशाने अध्यात्माचा खरा अर्थच नष्ट झाला आहे. अनेक साधूंनी वैराग्याच्या नावाखाली भलीमोठी माया जमविलेल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वाधिक पैसा कमविणारे देवस्थान सर्वाधिक श्रेष्ठ समजले जाते. हा बदललेल्या समाजाचा आरसा आहे. उलट अशा पद्धतीने अध्यात्मातही बदल करायला हवेत असे तत्त्वज्ञानही ही मंडळी सांगत आहेत. पैसा हेच वर्चस्व आहे. असा ग्रह त्यांचा झाला आहे. पैशाने सारे जग जिंकता येते असे त्यांना वाटते. पण समाधान जिंकता येत नाही हे परखड सत्य आहे. पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला कि मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Monday, April 25, 2011

अती तेथे माती

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विंष ।।

कोणतीही गोष्ट अती केली की त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. जेवन सुद्धा प्रमाणातच जेवायला हवे. अन्यथा अपचन होते. अती अभ्यासामुळे परिक्षेत नापास झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पिकांना रासायनिक अधिक खत दिल्यास पिके जळून जातात. पाणी अधिक दिल्यास पिकांची वाढ खुंटते. यासाठी कोणतीही गोष्ट प्रमाणातच असायला हवी. प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण हे आहेतच. निसर्गाची ती देणगीच आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा व्हायला नको. निसर्गाचे नियम हे तोडता येत नाहीत. निसर्गापुढे मनुष्य काहीही करू शकत नाही. शोध कितीही लागले. प्रगती कितीही केली तरी निसर्गाच्या शक्तीशी वैर करून चालत नाही. त्या शक्तीचा योग्य उपयोग करून घ्यायला शिकले पाहीजे. पाऊस पडतो. पण या पडणाऱ्या पावसाचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. कधी पाऊस अधिक पडतो, तर कधी पडतच नाही. पण पडणाऱ्या पावसाचा थेंब अन थेंब हा मातीत जिरवायला हवा. तो साठवता यायला हवा. नैसर्गिक पावसावरच आपले जीवन अवलंबून आहे. तो ठेवा जपायला हवा. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याची कारणे शोधायला हवीत. तेथील वृक्षसंपदा जपायला हवी. जगाचे तपमान वाढत आहे. ते का वाढत आहे. या मागची कारणे शोधायला हवीत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदुषण वाढत आहे. ते रोखायला हवे. निसर्गाच्या नियमांचा आपल्या जीवनात लाभ उठवता यायला हवा. निसर्गाचा प्रकोपलाही मानवी चुका तितक्‍याच कारणीभूत आहेत. हे विसरता कामा नये. मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्‍वासोच्छास्वही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणिव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे. याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला हवी.

राजेंद्र घोरपडे 9011087406

Saturday, April 23, 2011

आध्यात्मिक तेज

ऐसें ईश्‍वराकडे निज । धावें आपसया सहज ।
तया नावं तेज । आध्यात्मिक तें ।।

जपानमध्ये त्सुनामी आली. ही दृष्ये पाहताना निसर्गाचा कोप काय असतो हे स्पष्ट दिसले. निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही याची जाणीव झाली. अशा प्रसंगामुळे आपणास देवाची आठवण जरूर होते. ठेच लागल्यावर जशी आईची आठवण होते. तोंडातून अगदी सहजपणे आई गं.. असे शब्द बाहेर पडतात. एकंदरीत संकटाच्या काळात आपणास देवाची आठवण होते. इतरवेळी देवाची आठवण होत नाही. भीतीमुळे आपण देवाकडे वळतो. आधाराची गरज वाटते. पण प्रत्यक्षात अध्यात्मात असे काही नाही. नित्य देवाचे स्मरण करावे. आनंदी राहावे. विधीलिखीत आहे ते टाळता येत नाही. घडणारे घडतच राहणार. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल व दुसऱ्यांना कसे आनंदी ठेवता येईल हेच महत्त्वाचे आहे. नव्या पिढीमध्ये देवाचा ओढा फारसा दिसत नाही. पुर्वीच्या काळी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाची स्तोत्रे म्हटली जायची. संध्याकाळची सुरवातही देवाच्या स्मरणाने व्हायची. पण आताच्या काळात असे फारसे आढळत नाही. हे संस्कार आताच्या पिढीत नाहीतच. फक्त संकटे आली की मगच देवाचे स्मरण होते. इतर वेळी नुसता दिखावा केला जातो. एवढेच काय देव धर्म मानणाऱ्या व्यक्तीला वेळेचा दुरपयोग करणारा मुर्ख असे समजले जाते. बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे. पूर्वी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आता ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावत आहेत. वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी ह्रद्‌याचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर ह्रद्‌यविकाराचा झटका बसू शकतो. हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Tuesday, April 19, 2011

चला पंचगंगा वाचवू या....

आपल्या देशात दुरगामी विचार करून कोणताही प्रकल्प किंवा योजना राबविली जात नाही. केवळ काही वर्षापूरताच होणारा फायदा विचारात घेतला जातो. हे परखड सत्य आहे. नियोजनाचा अभाव आपल्या देशात मोठ्या प्रमाणात याचमुळे दिसून येत आहे. नद्यावर धरणे बांधली. यामुळे सिंचनाखालील तसेच औद्योगिक क्षेत्राला फायदा झाला. पण तो फायदा किती झाला याचे मोजमापही विचारात घ्यायला हवे. पाणी हे जीवन आहे. याचा विचार करून त्याचा वापर करायला हवा.
शहरांसाठी थेट पाईपलाईन योजना राबविली जाते. थेट पाईप लाईनमुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा शहराला होऊ शकतो. हे खरे आहे. पण नदीतील पाणी प्रदुषित करणे योग्य नाही. नदीतील प्रवाही पाण्याचे प्रदुषण रोखणे हे तितकेच गरजेचे आहे. नदीच्या प्रवाही पाण्यात शहरातील सांडपाणी सोडून देऊन नद्यांची गटारगंगा करणे हे योग्य नाही. थेट पाईपलाईन ने शहरांचा विकास केला. पण शहरात आलेल्या या पाण्याचे सांडपाण्यात रुपांतर होऊन ते पुन्हा नदीत का सोडले जाते. ही योजना राबविताना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणारी योजनाही मंजूर करणे आवश्‍यक नव्हते का? जितके पाणी आपण शहराला पुरवतो. तितके पाणी हे सांडपाणी होणार याचा विचार तेव्हाच का केला गेला नाही? का केवळ नफाच पाहीला जातो. पंचगंगा नदीकाठी सुमारे 170 गावे आहेत. त्यांना हे दुषित पाणी मिळणार याचा विचार तेव्हाच व्हायला हवा होता. कोल्हापूर समतेच्या विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मग शहर आणि ग्रामीण भागामध्ये फारकत का? शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थेट पाईपलाईन व खेड्यांना सांडपाणी मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी. हा कोणता न्याय. विकास करताना समतेचा विचार का मांडला गेला नाही?
अमेरिकेत सध्या नद्यावरील धरणे फोडण्यास सुरवात झाली आहे. कारण ही धरणे आता कालबाह्य झाली आहेत. ही धरणे सांभाळण्यापेक्षा ती फोडणेच अधिक फायद्याचे आहे असे अमेरिकेला वाटत आहे. कारण या धरणांच्या पाण्यातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा डागडुजी आणि दुरुस्तीचा खर्चच अधिक होत आहे. हे अर्थशास्त्र तिथे मांडले गेले आहे. आपल्याकडे असा शास्त्रोक्त विचार केव्हा केला जाणार? नद्यांचा प्रवाह रोखला गेल्याने पाण्याचे प्रदुषण वाढत आहे. नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत आहे. आता ही धरणे फोडून नद्यांची जैवविविधता, वाहत्या पाण्याचे सौंदर्य आदीची जोपासना अमेरिकेत केले जात आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या उपक्रमाचा विचार आपणही करायला हवा. कारण काही वर्षांनी आपलीही ही धरणे कालबाह्य होणार आहेत. याच्या डागडुचीचा खर्च त्यावेळी किती असेल व त्याचा फायदा किती असेल याचे गणित आपण मांडायला हवे? ही समस्या आपणासही भेडसावणार आहे याचा विचार आत्ता पासूनच करायला हवा. अमेरिकेत लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे तेथे तोडाफोडीचा फारसा परिणाम तेथील जनजीवनावर होत नाही. पण आपणास बांधलेली धरणे फोडणे परवडणारे आहे का? ही धरणे डागडुजी करत किती वर्षे टिकवली जाणार? यावर किती खर्च होणार? धरण तोडण्याचीच वेळ आली तर शहरांना पाणी मिळणार कोठून ? यासाठी विकास साधताना हा पुढील विचार करायलाच हवा. यासाठीच नद्यांचा नैसर्गिक प्रवाह टिकवायला हवा. प्रदुषणही यामुळे कमी होते. जैवविविधताही जोपासायला हवी. पंचगंगा नदीचा प्रवाह टिकवायला हवा. त्याची गटारगंगा होऊ नये यासाठी प्रयत्न हा व्हायलाच हवा.
कोणताही विकास साधताना दुरगामी परिणामांचा विचार हा करायलाच हवा. सर्वबाजूंनी विचार व्हायला हवा. तसे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. सांडपाणी नदी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करून सोडले गेल्यास प्रदुषण कमी करता येऊ शकते. याचा विचार हा व्हायलाच हवा. सांडपाण्यावर प्रक्रिया केले जाणारे प्रकल्प हे उभारले जावेत. यासाठी आत्ताच विचार व्हायला हवा. याचे नियोजन आता करण्याची खरी गरज आहे. या दृष्टीने समाजाला जागृत करण्याची गरज आहे. महानगरपालीकेने यासाठी विचार करायला हवा.
शहरात पाण्याचा वापर वाट्टेल तसा केला जातो. पाण्याचा बचत करण्यास लोकांना प्रोत्साहित करायला हवे. पाणी वाचविण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करायला हवे. यासाठी आसपासच्या खेड्यात पाण्याची कशी समस्या उभी आहे. याचा विचार शहरातील जनतेने करायला हवा? तेथे पाण्यासाठी भटकंती होते. वीजेचा पुरवठाही अनियमित असतो. भारनियमनामुळे खेड्यांचा विकास खुटला आहे. शहरांचा विकास साधताना खेड्यातील ह्या परिस्थितीकडे एक नजर ही टाकायलाच हवी. पंचगंगा नदी वाचवूया या अभियानाच्या निमित्ताने नदी प्रदुषणाचा नदी काठच्या खेड्यावर कसा परिणाम होतो आहे. याचा अभ्यासही व्हायला हवा. नद्या वाचविण्यासाठी खेडी- शहरांनी एकत्र लढा उभा करायला हवा. तरच भावी भविष्य उज्ज्वल राहील. अन्यथा विकासाची ही गंगा गटारीतच संपेल.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Friday, April 15, 2011

आर्जव

आता बाळाचां हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य ।
तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव तें ।।

लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येचा हा विस्फोट धोकादायक आहे. यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. या प्रश्‍नांमुळे माणसाचे दैनंदिन जीवन अस्थीर होत चालले आहे. त्यांच्या मनाची शांती, मानसिकता ढळत चालली आहे. तो चिडचिडा होताना पाहायला मिळत आहे. सगळीकडे गोंगाटामुळे तो शांतीच्या शोधात जरूर आहे. अशा वेळी त्याला योग्य मार्ग, दिशा सापडणे गरजेचे आहे. अन्यथा तो भरकटेल. त्याच्यातील माणूसकी नष्ट होईल. ही भीती आहे. कारण शेवटी मनूष्य हा माकड कुळातीलच आहे. यामुळे माणसात माकड कृत्ये जागृत होणास फारसा वेळ लागत नाही. पण माणूस आणि माकडात फरक आहे. हेही विसरता कामा नये. माणसाला मन आहे. विचार करण्याची बुद्धी आहे. जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात अडचणी आल्या की, त्याची मानसिकता ढळते. मनासारखे घडत नसेल तर तो निराश होतो. या नैराश्‍येतूनच त्याच्या मनाचा समतोल ढळतो. काहीजण अशा या त्याच्या वृत्तीचा फायदा उठवतात व त्याच्या स्वांतत्र्यावर हल्ला चढवतात. अशाने त्याचा समतोल ढळतो. पण या वृत्तीचा सामना करण्याचे सामर्थ तो त्याच्या मनामध्ये उत्पन्न करू शकतो. कितीही कोणी खिचवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडापणा सोडून देऊन प्रेमाने, मधूर वाणीने तो इतरावर आपली माया पसरवू शकतो. पण यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते. अहिंसेचा विचार सतत मनात जागृत ठेवायला हवा. सामंजस्याने अनेक प्रश्‍न सोडवले जाऊ शकतात. यासाठी बोलण्यात, वागण्यात तशी मृदूता यायला हवी. बालकाला जर भूक लागली असेल तर याची जाणिव मातेला लगेच होते. ती त्याला लगेच जवळ घेते आणि पाजवते. त्याला तृप्त करते. प्रत्येक प्राणिमात्रामध्ये हा गुण आहे. हे स्नेह, हा जिव्हाळा, हा पान्हा प्रत्येक प्राणिमात्रात पाहायला मिळतो. मातेचे दूध मुलाला हितकारक असते. त्यामुळे बालकात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. प्रत्येक प्राणिमात्रात आढळणारे हे प्रेम नैसर्गिक आहे. प्राणिमात्रामध्ये असणारे हे प्रेम, हे सौजन्य यालाच आर्जव असे म्हटले आहे. या प्रेमाने जग जिंकता येते. सध्याच्या धकाधकीच्या युगात अशा विचारांची, प्रेमाची गरज माणसाला अधिक वाटणार आहे. जैन धर्मामध्ये क्षमा व मार्दवा पूजाचे आर्जव तत्त्व हे सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देते. जणू काही तोच धर्माचा पाया आहे. व्यक्तीने आचारात अहिंसा, विचारात अनेकांतवाद आणि वाणित मधूरता आणली पाहिजे.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Saturday, April 2, 2011

संगतीचा परिणाम

पाणी बुडऊ ये मिठातें । तंव मीठची पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशेभय ।।

पाण्यात मीठ टाकले तर पाणी खारट होते. पाण्यात साखर टाकली तर पाणी गोड होते. पाण्याचा संग कोणाशी होतो यावर त्याची चव ठरते. तसे चांगल्याची संगत केली तर चार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. वाईटाच्या संगतीत चार वाईट सवयी लागू शकतात. मीठ पाण्यात टाकल्यावर ते त्यामध्ये विरघळते. यामुळे ते खारट लागते. पण अशुद्ध मिठ त्यापाण्यामुळे शुद्ध होते. अशुद्ध मीठ शुद्ध पाण्यात टाकून ते शुद्ध करता येते. शुद्ध, सात्विक वृत्तीच्या सानिद्धात राहील्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो. पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या हे ठरविणेच अवघड झाले आहे. मठामध्येही भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक वाईट गोष्टी मठामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी सुसंस्कृत ठिकाणे कशी शोधायची हा मोठा प्रश्‍न आहे. अशाने धर्माची बदनामीही होत आहे. याबाबत अपप्रचारही केला जात आहे. स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येकजण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्विक ठिकाणे मिळणार कोठे? चांगली ठिकाणे नाहीत याचा अर्थ धर्म संपला आहे. असे नाही. चांगला विचार हाच खरा धर्म आहे. चांगल्या विचारांची पुस्तके हीच सात्विक विचारांची ठिकाणे आहेत. ती शोधणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांच्या संगतीत, चांगल्या विचारांच्या पुस्तकांच्या संगतीत आपोआपच चांगल्या गोष्टीची संगत घडते. स्वतःलाच ही सवय लावली तर इतरही त्यामध्ये सहभागी होतील. इतरांनीही ही सवय लागेल. मुख प्रचारातूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार होऊ शकतो. यातूनच चांगले व्यासपीठ उभे राहू शकते. दुसरा भ्रष्ट कारभार करतो म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले चालते हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहीला तर चांगले संस्कार घडतील. लोक चांगले म्हणतील. चांगल्या विचारात राहील्यावर वाईटाची भीती कसली?

राजेंद्र घोरपडे 9011087406

Sunday, March 13, 2011

महालक्ष्मी

पै निर्धना घरीं वानिवसे । महालक्ष्मीचि येऊनि बैसे ।
तयाते निर्धन ऐसें । म्हणों ये काई ।।

जपान जगात आघाडीवर आहे. तंत्रज्ञानात त्यांनी मोठी क्रांती केली आहे. कितीही संकटे आली तरी ते नेहमी ताठ मानेने उभे राहीले आहेत. भूकंप हा तर त्यांना नेहमीचाच आहे. पण यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग काही कमी झाला नाही. प्रयत्नातही त्यांनी कधी कसूर मागे ठेवली नाही. चोविस तास कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. असे कष्ट भारतीयांनी केले असते तर भारतही जगात महासत्ताक झाला असता. आपण महासत्ताक होण्याची नुसती स्वप्नेच पाहात आहोत. भारतीयात जीव तोडून कष्ट करण्याची तयारी नाही. तशी त्यांची मानसिकता दिसून येत नाही. स्वार्थी वृत्तीने देश पोखरला गेला आहे. देशात आवश्‍यक गोष्टींची मुबलकता असेल तर कष्ट करण्याची मानसिकता नसते. भारताची पिक्षेहाट याचमुळे झाली आहे. देश यामुळेच आळसी बनला आहे. देशात पाण्याची मुबलकता आहे. शेतीची जमिनही सुपिक आहे. आवश्‍यक तेवढे उत्पादनही होते. यामुळे देशात समृद्धी आहे. गरजेपूरते कष्ट करण्याची तयारी भारतीयामध्ये आहे. पण भ्रष्टाचार आणि द्वेषभावनेने देश पोखरला जात आहे. नैसर्गिक आपत्ती कमी येते. जपानमध्ये नैसर्गिक आपत्तीची मालीकाच असते. भुकंप, तर कधी त्सुनामी. यांनी त्या देशाच्या प्रगतीस नेहमीच आव्हान दिले आहे. तरीही तो देश प्रगतीपथावर आहे. संकटातूनच खरी प्रगती होत राहते. संकटे सहन करण्याची ताकद अंगात निर्माण व्हायला हवी. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची नेहमीच तयारी ठेवायला हवी. यातूनच प्रगती होते. इस्राईलमध्ये पाण्याची कमतरता आहे. पण त्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर शेतीत भरघोस उत्पादने घेतली आहेत. तसे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आपण त्यांचा आदर्शही घेऊ शकत नाही. आपणकडे पाण्याची मुबलकता असूनही आपण आघाडी मिळवू शकलो नाही. सांगण्याचा हेतू इतकाच की कितीही संकटे आली तरी प्रगती करण्याची तयारी ठेवायला हवी. मन खचता कामा नये. संकटांचा सामना करूनच मोठी प्रगती साधता येते. कितीही उंचीवरून खाली पडले तरी मांजराप्रमाणे ताठ उभे राहता यायला हवे. कष्ट करणाऱ्याच्या घरी, संकटांचा सामना करण्याचे सामर्थ ठेवणाऱ्यांच्या घरी महालक्ष्मी निश्‍चितच नांदते यावर विश्‍वास ठेवायला हवा.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406

Sunday, February 27, 2011

माहेर

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजें जी ।।

माहेर म्हणजे आई वडीलांचे घर. महिलांना माहेरची अधिक ओढ असते. सासरी कितीही प्रेम मिळाले, कितीही संपन्नता असली तरी माहेरच अधिक प्रिय असते. काही झाले तरी लगेच माझ्या माहेरी असे नाही. माझे माहेर तसे होते अशी उदाहरणे, टोमणेबाजी सुरू होते. माहेर विषयी कोणी वाईट बोललेले त्यांना सहन होत नाही. माहेरचे कौतूक त्यांच्या तोंडी नेहमीच असते. माहेर सारखे प्रेम या जगात कोठेच नाही असे त्यांना वाटते. असे प्रेम सासरी असले तरी माहेरची बरोबरी होत नाही असे त्यांना वाटते. माहेरमध्ये सर्व हक्काचे असते. आपलाच अधिकार असतो. सासरी आल्यावर तसा अधिकार सासरी मिळत नाही. काही स्त्रिया आपला अधिकार राहावा, वचक राहावा यासाठी माहेरकडचाच एकादा गडीमाणूस खास कामासाठी नेमतात. सासरचा गडीमाणूस त्यांना फारसा आवडत नाही. माहेरकडची सर्व माणसे त्यांना प्रेमळ वाटतात. हवी हवीशी वाटतात. बदलत्या काळात आता असे माहेरचे प्रेमही बदलत चालले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या संस्कृतीत माहेरविषयीच प्रेम राहीले नसेल तर सासर विषयी प्रेमाची कशी स्थिती असेल हा मोठा प्रश्‍न आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर- माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. खरे प्रेम लुप्त होत चालले आहे. काळाच्या ओघात माणसामधील स्वार्थी वृत्ती वाढल्याने हा फरक पडला आहे. पण समाधानासाठी माहेर सारखे सुख कोठेच नाही. खरे प्रेम हे माहेरीच असते. तेच खरे प्रेम आहे. तीच खरी प्रेमाची ओढ आहे. तिच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. तेथेच खरे प्रेम मिळते.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406

Monday, February 21, 2011

भजन

म्हणोनि माझिया भजना । उचितु तोची अर्जुना ।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।।

सद्‌गुरुचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्‍तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे या गोष्टी अशक्‍यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत. याची कल्पना त्यांना नाही. याचेच मोठे दुःख वाटते. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. भगवंताना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फुल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले ऐवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे. पण या मंदीरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदीरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्‍यकता नाही. निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406

Monday, February 14, 2011

गुरु शिष्य ऐक्‍य

पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ।।

बदलत्या काळानुसार गुरू आणि शिष्य या नात्यातही मोठा बदल होत आहे. पूर्वीचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना हातात छडी घेऊन शिकवत होते. विद्यार्थीही त्यांचा मार खात असे पण त्यांनी मार का दिला याचा विचार करून त्याच्या मनामध्येही बदल होत असे. तो सकारात्मक बदल असे. काही विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्या शिक्षकांनी असा मार दिला, असे त्यांना समजावले त्यामुळे ते इतके मोठे होऊ शकले. त्यातून अनेक बोध घेऊ शकले असे सांगतात. हे अनुभव ऐकताना नव्यापिढीला खूपच आश्‍चर्य वाटते. आता काळ बदलला आहे. तसे गुरू-शिष्याचे नातेही बदललेले आहे. पूर्वीच्या काळातील गुरू हे त्यागी होते. शिष्याला मोठा करण्याची धडपड त्यांच्यात होती. शिष्य मोठा झाला तर त्यांना खरा आनंद मिळत असे. शिष्याच्या प्रगतीतच त्यांना समाधान वाटत असे. इतका जिव्हाळा या नात्यामध्ये होता. प्रसिध्दीचा मोह सुद्धा त्यांना कधी नव्हता. असे गुरू नव्यापिढीत पहायला मिळत नाहीत. शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे. तसे गुरू-शिष्य या नातेसंबंधातही मोठा बदल होत आहे. पाश्‍चिमात्य गुरूंमध्ये त्याग, आत्मियता, जिव्हाळा, तळमळ पहायला मिळत नाही. हीच संस्कृती सध्या नव्यापिढीत जोपासली जात आहे. नाती आता पैशाने मोजली जात आहेत. सध्या पदव्याही विकत मिळतात. शिक्षणासाठीचे वाढते शुल्क विचार घेता त्यानुसारच शिक्षण मिळत आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी अधिक पैसा मोजावा लागत आहे. त्यानुसार तसे विचार प्रवाहही बदलत आहेत. शिक्षणाच्या या व्यापारामुळे गुरू- शिष्य संबंधालाही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाच्या तुलनेत शिक्षण दिले जात आहे. अशा शिक्षण संस्थात त्याग, पुज्यता, गुरूंचा सन्मान या गोष्टी कशा काय शिल्लक राहतील. वर्गात किती तास शिकवले यावरच त्यांची पात्रता ठरवली जाते. त्यावरच त्यांना पगार मिळतो. शिष्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी तीही पैशाच्या तुलनेत मोजली जाते. अशा या नव्यापिढीला त्यागी गुरू कसे मिळतील. पूर्वी गुरू शिष्याला त्याच्या पदी बसविण्यासाठी उत्सूक असत. त्यातच त्यांना आनंद वाटायचा. तिच खरी त्यांना मिळालेली दक्षिणा असायची. पण सध्या असे गुरू मिळणे अशक्‍यच आहे. हे त्यागाचे संस्कार आता टिकवायला हवेत.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Friday, February 11, 2011

युग

कलियुगांती कोरडी । चहुं युगांची सालें सांडी ।
तवं कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ।।

आताचे युग हे कलियुग आहे असे म्हटले जाते. एक युग संपले की लगेच दुसऱ्या युगाचे फुटवे फुटू लागतात. युगामागून युगे येत राहतात. आता तंत्रज्ञानाचे युग आहे. नवनवे शोध लागत आहेत. तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार होत आहे. पण या युगालाही अंत आहे. खनिजाचे साठे संपत आहेत. पर्याय शोधले जात आहेत. सौर उर्जेचा पर्याय आपण आता शोधला आहे. नवे पर्यायही शोधले जात आहेत. अणुउर्जेचाही पर्याय निवडला जात आहे. कारण भावी काळातील वीजेचा तुटवडा कसा पूर्ण करणार? यावर सर्व अवलंबून आहे. कोळसा संपला तर पुढे काय? याला उत्तर हवेच. यामुळे एक संपले की त्याला दुसरा पर्याय हा शोधावाच लागतो. त्यानुसार प्रगती करत राहावे लागते. नव्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. असे बदल पुर्वीपासून होत आले आहेत. हे बदल होत राहणारच. बदल हाच निसर्गाचा नियम आहे. पण आत्मज्ञानात बदल होत नाही. अनेक नवे शोध लागतात. नवे तंत्रज्ञान येते. जुने तंत्रज्ञान मागे पडते. पण आत्मज्ञान पूर्वी होते. आताही आहे आणि यापूढेही ते राहणार आहे. परंपरेनुसार ते पुढे धावत राहणार. युगे येतात जातात. त्यानुसार ज्ञानही बदलत राहते पण आत्मज्ञान आहे तसेच राहते. त्यात बदल होत नाही. जे सत्य आहे. तेच शाश्‍वत आहे. तेच टिकते. यासाठी कायम सत्याची कास धरायला हवी. सत्याला ओळखायला शिकावे. खरे सुख समजून घ्यायला हवे. सत्य हाच खरा धर्म आहे. त्याचा अंगीकार करायला हवा. युगानुयुगे या ज्ञानाची परंपरा चालत आहे. यापुढेही ती चालत राहणार आहे.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Sunday, February 6, 2011

दैव

होय अदृष्ट आपैतें । तैं वाळुची रत्ने परते ।
उजू आयुष्य तै मारितें । लोभु करी ।।

दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात. अथवा जर आयुष्य अनुकूल असेल तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. इतके सामर्थ या दैवात आहे. पण दैवाचा हा खेळ कोणाला कळला? आत्मज्ञानाने दैवाचा खेळ समजतो. पण आयुष्यात घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. नशिबात एखादी घटना घडणार असेल, तर ती घडतेच. अनेक नवे शोध लागले. नवनव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली. पण त्सुनामी सारखी एखादी लाट क्षणात सारे उध्वस्त करते. हा दैवाचा भाग आहे. दैवाची कृपा झाली, तर नराचा नारायण होतो. जिर्णावस्थेत काबाडकष्ट करणारा महान राजाही होऊ शकतो. यासाठी दैवाची कृपा व्हायला हवी. मरा मरा म्हणून जप करणारा, वाल्ह्याचा महान वाल्मीकी ऋषी झाला. कृपा कशी होईल हे सांगता येत नाही. एखाद्या चोवीस तास जप करणाऱ्या व्यक्तीलाही काहीच भेटत नाही. असेही घडते. नुसती जपायची माळ ओढून चालत नाही. तो भाव मनात प्रकट व्हायला लागतो. यासाठी सद्‌गुरुंची कृपा व्हायला हवी. मग माळा जपायची गरज भासत नाही. आपोआप साधना होते. नाही तर ती करवून घेतली जाते. दैवाच्या कृपेनेच हे विचार मनात प्रकटतात. दैवाच्या कृपेनेच,सद्‌गुरुंच्या आर्शिवादानेच तर हे लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. प्रत्यक्षात लिहीत मी आहे पण हे लिहून घेणारा कोणीतरी दुसरा आहे. हे काम तो माझ्याकडून करवून घेत आहे. ते विचार तो माझ्या मनात भरत आहे. तेच इथे उमटत आहेत. त्याचे अस्तित्व माझ्यात कोठे तरी आहे. यामुळेच हे लिखाण माझ्याकडून होत आहे. यामुळे मी केले, मी लिहिले हा अहंकार आता माझ्यामध्ये उरलेला नाही. मी पणाचा गर्व नाही. हा अहंकार आता नाही. मनात येणारे विचार ही त्याच्यामुळेच प्रकट होत आहेत. त्याला आता मला पकडायचे आहे. तो सो$हम चा नाद मला पकडायचा आहे. ती लय मला धरायची आहे. त्याच्यातच आता मला माझे मन रमवायचे आहे. कारण तोच ह्या सर्व विचार लहरींचा निर्माता आहे. त्याच्यातूनच हे सर्व प्रकट होत आहे. त्याच्या विचार लहरीतूनच हे विचार प्रकट होत आहेत. ते दैव मला पकडायचे आहे. दैवाला मला अनुकूल करून घ्यायचे आहे.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Thursday, February 3, 2011

मोहाचा महारोग

तरी कृपाळु तो तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
मोहाचा फिटो । महारोगु ।।

पूर्वीच्या काळी प्लेग, देवी यासारखे महारोग होते. या साथीच्या रोगात अनेक माणसे मृत होत असत. काही वर्षापूर्वी `स्वाइन फ्लू' नावाच्या नव्याच रोगाने थैमान घातले होते. तो झपाट्याने पसरतो. तसे साथीचे रोग हे झपाट्याने पसरतात. त्यात जगभरात हजारो लोक मृत्युमुखी पडले. असाच माणसास मोहाचाही रोग होतो. हा रोग लागला तर लवकर सुटत नाही. या मोहाच्या जाळ्यात जर माणूस अडकला तर त्याचे आयुष्यही वाया जाऊ शकते. अनेक जणांना संपत्ती जमा करण्याचा मोह लागला आहे. पैसा इतका जमा केला आहे की तो इथे ठेवायलाही जागा नाही. देशात पैसे ठेवायला सुरक्षित जागा नाही म्हणून आता पैसे स्विस बॅंकेत ठेवले जात आहेत. हा सगळा काळा पैसा आहे. मोहाने जमा केलेली ही माया आहे. पण मोहाचे हे जाळे त्यांना कोणत्याही क्षणी संपवू शकते. हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जाळ्यात अडकल्यानंतर जाणीव होऊन काय उपयोग? भ्रष्टाचारही या अशा मोहानेच वाढत चालला आहे. एवढी संपत्ती मिळवूनही करायचे तरी काय हा प्रश्‍न या मोह सम्राटांना का पडत नाही? समाधान नष्ट करणारी ही संपत्ती नेमकी जमवितात तरी कशासाठी? या संपत्तीने अनेकांचा तळतळाट मागे लागलेला असतो. लुटीचा हा रोग वाढतच चालला आहे. यामुळे देशात लुटारूच वाढले आहेत. पूर्वी स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने लूट केली जात होती. हा पैसा चांगल्या कामासाठी वापरला गेला. ते अमर झाले. उद्देश चांगला होता. सर्वमान्य उद्देश होता. हेतू चांगला होता. यातून समाधान मिळणार होते. पण स्वातंत्र्यानंतर ही लूट कायम राहिली. पण ती स्वतःच्याच देशातील जनतेची असल्याने ही लूट ही चोरी ठरत आहे. हा लुटीचा रोग बळावल्यास पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी उठाव होईल हे निश्‍चित. लूट करणाऱ्यांचे आयुष्य हे कधीच सुखी समाधानी राहिलेले नाही. हा इतिहास आहे. हे वास्तव आहे. हे जाणणारे या वाटेला कधीच जाणार नाहीत, हे ही खरे आहे. पण मोहाचा हा रोग बळावला आहे. यासाठी मोहावर आवर हा घालायलाच हवा. मोहामुळे मोठ मोठी साम्राज्येही उद्धस्त झाली आहेत. हा महारोग नियंत्रणात येऊ शकतो. यासाठी विवेकाचा काढा प्यायला हवा. विवेकानेच हा रोग बरा होऊ शकतो.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Thursday, January 27, 2011

स्वस्वरूप

स्वस्वरूप

आतां ते तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांती निवडिलें । बीज जैसें ।।

स्वतःच स्वतःचे रूप पाहायचे. स्वतःचे बाह्यरूप पाहण्यासाठी आरसा लागतो. आपल्या चेहऱ्यावर एखादा डाग लागला असेल तर तो त्यात दिसतो. चेहऱ्याचे सौंदर्य कसे आहे हे आपण त्यात न्हाहाळतो. एकंदरीत चांगले कसे दिसता येईल याचा प्रयत्न आपण त्यातून करत असतो. केस विस्कटलेले असतील तर ते आपण व्यवस्थित करतो. नीटनेटके राहण्याचा प्रयत्न करतो. बाह्य रूपात आपण चांगले राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मग अंतरंगात का करत नाही? मन स्वच्छ ठेवण्याचा का प्रयत्न करत नाही? स्वतःचे अंतःकरणही असेच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. नुसती बाह्यरुपात स्वच्छता नको, तर अंतरंगही साफ असायला हवे. अंतर्बाह्य साफ असेल तर समस्याच उरणार नाहीत. यासाठी आपणच आपले अंतरंगातील मन तपासायला हवे. स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. स्वतःला जाणून घ्यायला हवे. मी कोण आहे? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे. पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात मी कोण आहे? याचा विचार व्हायला हवा. मी एक आत्मा आहे याचा बोध व्हायला हवा. अंतरंगात डोकावण्यास सुरवात केल्यावर हळूहळू आपल्या चुका आपणालाच कळू लागतात. त्या सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. यातून सात्विकवृत्तीत वाढ होते. याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात फरक पडतो. काही दुखावले गेलेलेही आपल्या जवळ येऊ लागतात. काहीजण सात्त्विक वृत्तीचे असल्याचे आव आणतात. पण त्यांचे हे नाटक फार काळ टिकत नाही. हा क्षणिक दिखावा अनेक दुःखांना कारण ठरू शकतो. यातूनही निराशा उत्पन्न होते. यासाठी सात्विकवृत्तीचा आव आणू नये. पण सध्याचा युगात असे संतासारखे वागणे मूर्खपणाचे समजले जात आहे. पण हे आजच घडत आलेले नाही. यापूर्वीही असेच घडले आहे. सतांना अनेकांनी तुच्छ लेखले गेले आहे. त्यांचे हाल केले गेले आहे. हे फक्त भारतीय संस्कृतीतच नाही. जगातील इतर देशातही असेच घडले आहे. येशूचाही असाच छळ झाला आहे. हे सर्व धर्मात असेच आहे. पण असत्याचा जेव्हा जेव्हा हाहाकार माजतो. तेव्हा तेव्हा सत्याचा जन्म होतो आणि सत्याचा विजय होतो. सत्यच शाश्‍वत आहे. सत्यच सुंदर आहे. सत्यच ईश्‍वर आहे. हे जाणून घ्यायला हवे. मी आत्मा आहे याचा बोध घ्यायला हवा. मळणीनंतर जसे धान्य स्वतंत्र होते. तसा आत्मा या देहापासून वेगळा करावा. मग पुन्हा मिसळणे नाही. देहाची मळणी करायला हवी. आत्मा वेगळा झाल्यानंतर पुन्हा त्यात तो मिसळला जात नाही. मग तो आत्मस्वरूपी स्थिर होतो.



राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Monday, January 24, 2011

सात्त्विक राजा

नगरेची रचावीं । जलाशयें निर्मावीं ।
महावने लावावीं । नानाविधें ।।

प्रत्येक मनुष्यात सत्त्व, रज, तम हे गुण असतात. त्याचे प्रमाण कमी अधिक असते. सात्त्विक वृत्तीत वाढ झाल्यास मनुष्याला देवत्व प्राप्त होते. शहरेच वसवावीत. जलाशये वगैरे पाण्याचे मोठे साठे बांधावेत. नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत. हे रजोगुणाचे लक्षण आहे. धरणांचे प्रकल्प उभारताना अनेक समस्या उभ्या राहतात. याचे वाद अनेक वर्षे चालतात. यात कोणाला न्याय मिळतो. कोणाला न्याय मिळतही नाही. ज्यांनी पाण्यासाठी घरे सोडली त्यांनाच पाणी मिळत नाही ही आजची स्थिती आहे. धरणे ही व्हायला हवीत. हेही खरे आहे. पण ती बांधताना विस्थापितांनाही त्यामध्ये योग्य न्याय द्यायला हवा. पण तसे होत नाही. धरणाचा फायदा हा प्रत्येकाला झाला पाहिजे. असे नियोजन करायला हवे. असे नियोजन असेल तर धरणाला विरोध होणार नाही. धरणाचा फायदा प्रत्येकाला समान मिळाला पाहिजे. पाण्याचे समान वाटप झाले तर वाद होणार नाहीत. पण तसे घडत नाही. प्रत्येकाचा स्वार्थ त्यामध्ये अडवा येतो. प्रत्येकजण स्वतःला अधिक कसा फायदा होईल हेच त्यामध्ये पाहतो. अशाने वाद वाढतच जातात. सात्त्विक वृत्तीने कोणी काम करण्यास तयारच नाही. स्वतःच्या व्यक्तिगत फायदा पाहणाऱ्या राजकियवृत्तीमुळेच देशाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहेत. अन्यायामुळेच नक्षलवाद वाढत आहे. अन्यायाचा विस्फोट अशा प्रकारे होणे हे एक दुर्दैव आहे. देशांतर्गत सुरक्षा अशाने धोक्‍यात येऊ शकते. सर्वांना सम न्याय मिळाला पाहिजे. सध्या यासाठी लढा देऊन काहीही मिळत नाही. असे दिसते यामुळे हे घडत आहे. समन्यायी देण्याची वृत्तीच सरकारमध्ये नाही. मग असे प्रश्‍न उत्पन्न होणारच. असे लढे उभे राहणारच. यासाठी सरकारनेच प्रकल्पांचे नियोजन करताना समन्यायी ठेवावा. यामुळे देशात वाढणारा नक्षलवाद निश्‍चितच कमी होईल. यासाठी राज्य कारभारातच सात्वीकवृत्ती वाढीस लागायला हवी. सात्वीकवृत्तीचे राजेच आज अमर आहेत. त्यांचेच नाव होते. सर्वांना समान न्याय देणारा राजाच स्वतःचे साम्राज्य उभे करू शकतो. त्यांचे साम्राज्य टिकून राहते.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Saturday, January 22, 2011

झोप

ब्रह्मायु होईजे । मग निजेलियाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ।।

महत्त्वाच्या पदावरील अनेक माणसे केवळ नाममात्र कारभारी असतात. त्यांना अनेक अधिकार असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. सरकारी कार्यालयात ही परिस्थिती पहायला मिळते. नुसती हजेरी मांडून पगार तेवढा घ्यायला जातात. ही तामसवृत्ती दुसऱ्यांना सुद्धा त्रासदायक ठरते आहे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या सानिध्यातील इतरांनाही ही सवय लागते. वरिष्ठच झोपलेले असतील तर कार्यालयातील शिपायापासून सर्वजण आळशी असलेले पाहायला मिळतात. एखाद्या अधिकाऱ्याने पद मिळाले तर त्याचा वापर योग्य कामासाठी, सत्कर्मासाठी करायला हवा. अशी वृत्ती त्याच्यात असायला हवी. उच्च पदावरील तामसीवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे सरकारी कार्यालयांची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे. राज्यकर्तेही अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. अशा अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यातच राज्यकर्त्यांना अधिक रस घेतात. अशा या कारभारामुळे जनता त्रस्त आहे. किरकोळ कामासाठीही जनतेला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते आहे. काही अधिकारी याला अपवाद असतात. पण असे कार्यक्षम अधिकारी फार काळ सेवेत टिकत नाहीत असाही अनुभव आहे. कारण तामसाच्या सानिध्यात आपणही तामस होऊ का? अशी भीती त्यांना वाटते. असे हे तामसीवृत्तीचे झोपी गेलेले अधिकारी सात्त्विक होणार तरी कधी? विकासाच्या, महासत्तेच्या चर्चा करताना अशा सरकारी कारभारामुळे बाधा पोहोचते आहे. याकडे हे सरकार तरी लक्ष देते का? झोपलेल्या सरकारला जाग येईल तरी कधी? निवडून गेलेले मौनी खासदार - आमदार यांचे मौन सुटणार तरी कधी? नुसत्या शासकीय फायली इकडून तिकडे करून आयता पगार लाटण्यातच यांचे कामकाज चालते. कागदोपत्री योजनांची पूर्तता करून पैसे लाटणारे हे राज्यकर्ते कोणाच्या फायद्याचे? अशाने देशाचा विकास तरी कसा होणार? कागदावरच महासत्तेच्या गप्पा मारण्यात सर्वजण पटाईत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती खूप गंभीर आहे. तमोगुणाचे साम्राज्य पसरलेले आहे. पूर्वीच्याकाळी अनेक राजे असे होते. सत्ता भोगण्यातच त्यांचे आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्‍नांची त्यांना जाणही नव्हती. ऐश आरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा या कारभारामुळेच आपला देश कित्येकवर्षे पारतंत्र्यात होता. हा इतिहास विसरता कामा नये. सरकारचे व सरकारी कार्यालयातील तामसीवृत्तीचे हे व्यसन सुटणार तरी कधी? असा हा तामसगुण केवळ त्यांच्यासाठीच नव्हेतर इतरांसाठीही हानिकारक आहे. यातून जागृती ही यायलाच हवी.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Monday, January 17, 2011

लोभीवृत्ती

जैसा मीनाचां तोंडीं । पडेना जंव उंडीं ।
तंव गळ आसुडी । जळपारधी ।।

माणूस लोभी आणि स्वार्थी असतो. अशा या त्यांच्या स्वभावामुळेच तो अनेक संकटात सापडतो. जगात वावरताना लोभ,माया, स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. ताक सुद्धा फुंकून पिण्याची सवय हवी. लोभाच्या लालसेने आपण स्वतःच स्वतः समोर अनेक संकटे उभी करत असतो. अनेक शेतकरी अधिक उत्पन्नाच्या लालसेपोटी पिकांना प्रमाणापेक्षा अधिक खते टाकतात. ठराविक मर्यादेपर्यंत पिके खतांचे शोषण करू शकतात. कोणत्या पिकास किती प्रमाणात खते द्यायला हवीत. त्याची आवश्‍यकता किती आहे हे संशोधकांनी शोधले आहे. त्या प्रमाणातच खतांचा पुरवठा करणे योग्य असते. अधिक उत्पन्नाच्या लालसेने खतांची मात्रा वाढवून शेतकरी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतो. यासाठी कोणतीही गोष्ट ठराविक एखाद्या मर्यादेपर्यंत उत्तम प्रतिसाद देते. हाव असावी पण त्याला ठराविक मर्यादा असावी लागते. खाद्याच्या आमिषाने मासा जळपारध्याच्या जाळ्यात सापडतो. सध्या समाजात अशा अनेक जळपारध्यांचा सुळसुळाट झालाय. व्यापाऱ्यांच्याही वृत्तीत मोठा बदल झाला आहे. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर प्रथम सत्तेत असणाऱ्या राज्यकर्त्यांनी लोभ सोडायला हवा. लुटारू वृत्ती सोडायला हवी. जसा राजा तशी प्रजा असे म्हटले जाते. भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या सानिध्यात भ्रष्ट लोकांचा वावरच अधिक असतो. अशा वृत्तीमुळे भ्रष्ट कारभारात वाढ होत आहे. सर्वसामान्य जनता यामुळे बदलत चालली आहे. ही जनता कधीतरी या विरोधात उठाव करणार हे निश्‍चित. जाळ्यात सापडलेल्या अनेक माशांनी उठाव केला तर, जलपारध्याने टाकलेले जाळे सुद्धा कोलमडू शकते. त्यातून मासे बाहेर पडू शकतात. यासाठी एकत्रित उठाव व्हायला हवा. या लोभीवृत्ती विरुद्ध उठाव करायला शिकले पाहिजे. सर्वप्रथम स्वतःपासून याची सुरवात करायला हवी. लालसा सोडली तर मनाची शांती टिकते. असे लक्षात येईल.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

Thursday, January 13, 2011

ज्ञान-अज्ञान

ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नांव ।।

रात्र नाही व दिवसही नाही त्यावेळेला सांजवेळ म्हटले जाते. त्याप्रमाणे विपरीत ज्ञान नसते किंवा स्वरूपज्ञान नसते तेव्हा ते केवळ अज्ञान असते. अज्ञानात ज्ञान गुरफटलेले आहे. फळाच्या आतमधील गर खाण्यास योग्य असतो. साल टाकून द्यावी लागते. ती साल काढावी लागते तरच आतला गर खाता येतो. सालीसकट गर खाल्ला तर त्याची चव वेगळी लागते. गराची गोडी जाते. चवीचे खाणारा असतो तो साल काढून गर तेवढाच खातो. तसे ज्ञान हे अंतर्मनात असते. ते हस्तगत करण्यासाठी अज्ञानाचे पडदे दूर करायला हवेत. अज्ञानासकट ज्ञान हस्तगत करता येत नाही. यासाठी अज्ञान दूर करायला हवे. प्रकाश जिथे आहे तिथे अंधार हा सापडत नाही. तसे ज्ञान जिथे आहे तेथे अज्ञान नसते. फळ कच्चे असताना त्याच्या सालीचा रंग वेगळा असतो. सालीच्या रंगावरून फळाची परिपक्वता समजते. फळ पक्व झाल्यावर सालीचा रंग वेगळा असतो. तसे ज्ञान पक्व झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये बरेच बदल झालेले दिसतात. त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात एक पक्वता असते. त्याच्या व्यवहारातही फरक जाणवतो. ही पक्वता आल्यानंतर त्याने अज्ञानाची झापड दूर करावी लागते. तरच खऱ्या ज्ञानाची आस्वाद घेत येतो. अज्ञानामुळे त्या ज्ञानाची गोडी कमी होते. पक्वता आल्यावर फळे सुद्धा आपोआप फुटतात व त्यातून बिया बाहेर येतात. गर बाहेर येतो. पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते. पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व व्हायला हवे. तरच अज्ञान दूर होईल. ज्ञानाच्या पक्वतेची जाणीव, तो बोध व्हायला हवा. सद्‌गुरूकृपेने ही पक्वता येते. जाणीव होते. त्याचा बोध होतो. त्या अनुभूतीने अज्ञान आपोआप दूर सारले जाऊन ज्ञानाची वाट सुकर होते.

राजेंद्र घोरपडे 9011087406

Thursday, January 6, 2011

नित्यता

जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता । माझियाची ।।

एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचे असेल तर त्याचा ध्यास घ्यावा लागतो. नित्य ध्यासाने त्या गोष्टीत परिपूर्णता साधता येते. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती पाहिजे. विचारात चांगुलपणा असेल आणि कामात नित्यता असेल तर, यश सुद्धा त्याच्यापुढे लोटांगण घालते. संत गोरा कुंभार यांच्या नित्य ध्यासामुळेच विठुराया त्यांची मडकी वळायचा. सद्‌गुरुंच्या नित्य ध्यासाने सद्‌गुरू मदतीला धावून येतात. कधी ते कुणाची घरकामे करतात, तर कधी ते कुणाचे दळण दळतात. तर कधी कुणाचा रथाचे सारथी होतात. सध्याच्या युगात अशा गोष्टी मनाला पटणे कठीण आहे. नव्या पिढीला या गोष्टी समजणे कठीण आहे. पण एखाद्या कामात नित्यपणा असेल तर तुमच्या स्पर्धकांवर सुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या नित्यपणामुळे तुमचा शत्रूही त्रस्त होऊन शत्रुत्व सोडू शकतो. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. अपयश एकदा येईल, दोनदा येईल तिसऱ्यांदा यश निश्‍चितच मिळते. प्रयत्न सोडायचे नाहीत. क्रिकेटमध्ये प्रत्येक कसोटी सामन्यात फलंदाज शतक ठोकू शकत नाही. काही वेळेला तर तो सतत शून्यावरही बाद होतो. पण परिश्रमाने, प्रयत्नाने त्याच्यात सातत्य येते. नेहमी चांगल्या धावा करण्याकडे त्याचा कल राहतो. खेळाचे जसे आहे तसेच जीवनाचेही आहे. व्यवसायात रोज भरघोस उत्पन्न होईल असे नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला नेहमीच चांगला भाव मिळतो असे नाही. पण यासाठी शेतकऱ्याने शेती सोडून देणे किंवा व्यावसायिकाने व्यवसाय सोडून देणे योग्य नाही. चुका कशा होतात, का होतात याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सुधारता आल्या पाहिजेत. एखादी गोष्ट समजत नाही तर ती मनमोकळेपणाने सांगितली पाहिजे. दुःख व्यक्त केल्याने मन हलके होते. थोडा आधार होतो. कामातील नित्यतेमुळे खचलेल्या मनाला पुन्हा उभे करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते. सततच्या ध्यासानेच नराचा नारायण होतो.


राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406

Tuesday, January 4, 2011

कर्णफुले

मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।।

साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर साधनेत लागले तर दूरचे आवाजही स्पष्ट ऐकू येतात. साधनेमुळे श्रवणशक्तीत सुधारणा होते. असे साधनेचे अनेक फायदे आहेत. यातील हा एक फायदा आहे. पण दूरच्या या आवाजांनी मन विचलित होऊ देऊ नये. मनाला सोsहंच्या ठिकाणीच स्थिर करणे गरजेचे आहे. हळूहळू प्रगती होत राहते. एकदम झटकीपट सर्वच मिळते असे नाही. सध्याच्या युगात झटपट गोष्टी मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना अशाच गोष्टीत अधिक रस वाटू लागला आहे. जुन्या पिढीत असे नव्हते. जुन्या पिढीत सहनशीलता खूप होती. परवाच मी वाचले की नाशिकमध्ये कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीतून द्राक्ष उत्पादकांमध्ये नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आणि यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केलेल्या एका द्राक्ष उत्पादकाच्या वडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. ते म्हणाले की सध्याच्या पिढीला झटपट यश मिळविण्याची हाव लागली आहे. 1985 मध्ये त्यांनी एक एकर द्राक्ष बागेच्या उत्पन्नातून दीड एकर शेती विकत घेतली होती. असे यश मुलाला कमवायचे होते. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. यात असे यश झटपट मिळणार नाही. थोडी सहनशीलता ठेवायला हवी. धीर धरायला हवा. हा विचार आताच्या पिढीत नाही. एक दोन वर्षाच्या नुकसानीतून इतके निराश होण्याची काहीच गरज नाही. निराशा त्याने बोलूनही दाखवली नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली. झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत.

राजेंद्र घोरपडे, संपर्क ः 9011087406