Monday, December 19, 2016

सहकारी प्रश्‍नांवरील वैद्य ः शरद पवार

देशातील सहकाराने शंभरी ओलांडली आहे. पण गेल्या काही वर्षात सहकार मोडीत निघाल्याच्या चर्चा होत आहेत. इतिहास पाहिला तर सहकार मोडीत काढण्याचे प्रयत्न नेहमीच घडत आले आहेत असे दिसते. सावकार, भांडवलदारांनी नेहमीच याबाबत कट- कारस्थाने केली आहेत. सहकारी उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या खटपटीही होताना दिसतात. पण या विरोधात काही राजकिय नेत्यांनी सहकार वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गटतट पक्ष बाजूला ठेऊन सहकारासाठी त्यांनी निरपेक्षभावनेने योगदान दिले. सरकार दरबारी यासाठी दबावही त्यांनी आणला. आपली मते नाकारली तरीही ती कशी योग्य आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांचेच कसे बरोबर आहे हे ही पुढील काळात सिद्ध झाले असे योगदान देणाऱ्या नेत्यांमध्ये माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांनी सहकारासाठी दिलेले योगदान नेहमीच प्रशंसनीय व मार्गदर्शक ठरत आहे.

याबाबत अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. साखर संघाचे माजी कार्यकारी संचालक मोहन मराठे यांनी सांगितलेले एक उदाहरण मला येथे नमुद करावेसे वाटते. मराठे साखर संघाचे संचालक असताना त्यांची बऱ्याचदा पवार साहेबांची भेट झाली. दिल्लीत असताना नॅशनल फेडरेशनच्या कार्यालयात पवारसाहेब नेहमीच जात. 1994 मध्ये लेव्हीच्या प्रश्‍नामुळे सहकारी साखर कारखाने अडचणीत आले होते. त्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान होते. लेव्हीचा हा प्रश्‍न घेऊन पवारसाहेब नेहमी पंतप्रधानांना भेटत. या भेटीत त्यांच्यासोबत मराठे, इंदू पटेल, शिवाजीराव पाटील हेही असत. 1975 मध्ये 70 टक्के साखर लेव्हीसाठी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शेतकऱ्यांच्या उसाला दर देणे शक्‍य होत नव्हते. आर्थिक अडचणीमुळे कारखाने चालविणे अशक्‍य झाले होते. अनेक कारखान्यांनी या प्रश्‍नी न्यायालयात दावेही ठोकले होते. लेव्हीच्या साखरेमुळे सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले होते. 1994 पर्यंत काही सहकारी साखर कारखाने मोडीत निघायची वेळ आली होती. बॅंकचे कर्ज वाढल्याने शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नव्हते. बॅंक गॅरेटी मिळत नव्हती. कर्जही देण्यास बॅंका तयार नव्हता. आर्थिक कोंडीच्या या प्रश्‍नामुळे सहकारच धोक्‍यात आला होता. शेतकरीही अडचणीत आला होता. उसाला दर नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली होती. उत्पादनातील घटीमुळे साखरेच्या प्रश्‍नाने बिकट स्थिती ओढवली होती. यावर लेव्हीचा प्रश्‍न सोडविणे गरजेचे होते. शरद पवार यांनी लेव्हीचा प्रश्‍नावर तोडगा निघावा यासाठी नरसिंह राव यांना काही फार्मुले सांगितले होते. या प्रश्‍नी ते वारंवार राव यांची भेट घेत असत. पण राव यांनी विरोधक जॉर्ज फर्नांडिस यांचा धसका घेऊन या प्रश्‍नी तडजोड करण्यास नकार दिला होता. हा प्रश्‍न न्यायालयाच्या चौकटीतच सोडवावा अशी भूमिका घेतली होती. शरद पवार मात्र लेव्हीसाठी 1975 पूर्वीचा नियम लागू करून कोंडी सोडवावी यावर ठाम होते. पवार साहेबांनी काही फॉर्मुलेही तयार केले होते. पण नरसिंह राव यांनी तडजोड केलीच नाही. अखेर हा प्रश्‍न न्यायालयाच्या चौकटीत सोडवला गेला. न्यायालयाने निकाल दिला. शरद पवार यांचा फार्मुला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सारखेच होते. 19 वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रश्‍नांवर शरद पवार यांनी तोडगा सांगितला होता तोच न्यायालयाने सांगितला.

यावरुन सहकार साखर कारखाने वाचविण्यासाठी पवारसाहेबांनी मांडलेले मुद्दे किती योग्य होते याचीच जाणिव होते. त्यांचा या प्रश्‍नावरचा अभ्यासही किती खोलवर होता हेही लक्षात येते. शरद पवार यांचे निर्णय हे सहकार आणि शेतकरी केंद्रित असतात. शेतकऱ्यांचे हित आणि सहकाराच्या पायाला धक्का लागणाऱ्या निर्णयाच्या विरोधात ते नेहमीच उभे राहतात. सहकारातील प्रश्‍नावर त्यांनी केलेले प्रयत्न हे नेहमीच मार्गदर्शक असेच आहेत. सहकार वाचला पाहिजे, साखर कारखाने वाचले पाहिजेत यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रसंगी ते कठोर कारवाईच्या सुचनाही देतात. त्यांची भूमिका ही नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे.

सहकाराने सर्वसामान्यांना आधार दिला आहे. सावकारी पाशातून मुक्तता केली आहे. सर्वसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. असा हा सहकार मोडीत काढण्याची कट कारस्थाने नेहमीच भांडवलदारांनी केली. या कारस्थान्यांचे कट मोडीत काढण्याचे काम नेहमीच पवारसाहेबांनी केले आहेत. शेतकरी सावकारी पाशात अडकू नये यासाठी सहकारी सोसायट्यातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. शेतीत होणारे नुकसान, दुष्काळ विचारात घेऊन सत्तेत असताना पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज या सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून दिले. प्रसंगी शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन कर्जमाफीसाठीही त्यांनी पॅकेजही दिले. सहकारी सोसायट्यांच्या पूर्णजीवनासाठी वैद्यनाथन समिती स्थापन केली. कर्ज माफी देऊन सहकारी सोसायट्या सह शेतकऱ्यांनाही जीवदान दिले.

सहकारी साखर कारखाने जेव्हा जेव्हा आर्थिक कोंडीत सापडले, तेव्हा तेव्हा पवारसाहेबांनी त्यावर तोडगे काढले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला, उत्पादनांना दर देण्यासाठी त्यांनी प्रसंगी कठोर भुमिकाही घेतल्या आहेत. आर्थिक कोंडीतून मुक्ततेसाठी साखर कारखान्यांना शिस्तीचे धडेही दिले आहेत. केंद्रिय कृषि मंत्री असताना पवार यांनी कारखान्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी उपपदार्थांच्या निर्मितीवर त्यांनी भर देण्यास प्रोत्साहित केले. इथेनॉल, सहवीजनिर्मितीतून कारखान्याना स्वयंपूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. आजारी सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण होऊ नये यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. इथेनॉल निर्मितीवर भर इतकीच मर्यादा त्यांनी ठेवली नाही. इथेनॉललाही दर कसा मिळेल यासाठी पवारसाहेबांनी सातत्याने प्रयत्न केले. परदेशात इंधनामध्ये इथेनॉल मिसळले जाते. हे पाहून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जावे यासाठी सरकार दरबारी निर्णय घेण्यास पवारसाहेबांनी भाग पाडले. यामुळे इथेनॉलचा वापर वाढला. साहजिकच इथेनॉलची बाजारपेठ वाढली. इथेनॉलचा दरही वाढला. कारखान्यांना यामुळे आर्थिक फायदा झाला.

साखर कारखाने आजारी पडले की त्यांचा लिलाव करावा लागतो. साहजिकच सभासद शेतकऱ्यांचा हक्क जातो. सहकार मोडीत निघतो. सहकारी कारखान्यांच्या अशा खासगीकरणावर चाप लावण्याची गरज आहे. यासाठी कारखान्यांना आर्थिक शिस्तीची गरज आहे. हे ओळखूण पवारसाहेबांनी शिस्तीचे धडे नेहमीच दिले आहेत.

सहकारी साखर कारखान्यांबरोबरच सहकारी दुध संस्था, सुत गिरण्या, पोल्ट्री, द्राक्ष उत्पादक संघ आदी सहकारी संस्थांचे प्रश्‍नही पवारसाहेबांनी अत्यंत खूबीने सोडविले आहेत. सहकारी दुध संघाबरोबरच दुध उत्पादकही जगला पाहिजे त्याच्या हातीही चार पैसे अधिक मिळाले पाहिजेत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळाचे दुधाचे उत्पादन अधिक झाल्याने दुध संकलन बंद करण्याची वेळ आली होती. सहकारी दुध सोसायट्या त्यामुळे अडचणीत आल्या होत्या. साहजिकच याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. दुधाचा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी दुध पावडर व दुधाची निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील सहकारी दुध संघाना बल्क कुलर उपलब्ध व्हावेत यासाठी पवारसाहेबांनी प्रयत्न केले.

सहकारातील राजकिय व नोकरशाहीचा असणारा हस्तक्षेप दुर करण्यासाठी सहकारातील घटना दुरुस्तीचा निर्णय घेण्यासाठीही सरकार दरबारी शरद पवार यांनी प्रयत्न केले. केंद्रात मंत्री असताना पंचायत राज घटना दुरुस्तीच्या धर्तीवर सहकारातही घटनादुरुस्ती व्हायला हवी तरच सहकारी संस्था वाचतील अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सहकारी संस्थावर 22 ते 24 सदस्यांच संचालक मंडळ नको यासाठी घटना दुरुस्ती विधेयक त्यांनी मांडले आहे. मोठे संचालक मंडळ असल्याने त्यांच्या गाडी घोड्याचा खर्च वाढतो. सहकारी संस्थावर हा आर्थिक बोजा पडतो. यासाठी कार्यक्षम संचालकांचे मंडळच असावे यासाठी घटनादुरुस्ती व्हावी यासाठी पवार प्रयत्नशिल आहेत. त्यांच्या या प्रयत्नानांही यश निश्‍चित येईल.

शरद पवार यांचा सहकार आणि शेतीचा अभ्यास विचारात घेऊन सध्या सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेतेही वारंवार त्यांचा सल्ला घेण्यासाठी बारामतीच्या वाऱ्या करताना दिसतात. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्र्यांपासून सर्वांनाच शरद पवार यांचे मार्गदर्शन हवे हवेसे असते. सहकारातील खाचा खोचा याची जाण असणारा हा नेता नेहमीच सर्व पक्षातील नेत्यांना मार्गदर्शन करत असतो. सहकारावरील त्याच्या अभ्यास, प्रश्‍न सोडविण्याची हातोटी विचारा घेता पवारसाहेब हे सहकारातील वैद्यच आहेत. सहकारातील प्रश्‍नावर त्यांनी केलेल्या उपचारामुळे आज सहकार टिकूण आहे.


Sunday, December 18, 2016

बाटली सोडली नांगर हाती

बीड जिल्ह्यातील हा गाव. गावात सर्व लमाणीच होते. काहीजण मोलमजूरीकरुन पोट भरायचे. तर काही जण दसऱ्यानंतर ऊस तोडणीची कामे करायचे. काहीजण गुऱ्हाळावर काम करायचे. कष्टकरी गाव. पण या गावाला व्यसनाची दृष्ट लागली. कष्ट करुन थकलेल्या माणसाला गरीबी खायला उटते. गरीबी असली की पैसा देणारा कोणताही व्यवसाय चांगलाच वाटतो. तो व्यवसाय वाईट जरी असला तरी तो चांगलाच वाटतो. 
गावातील एकाने दारु भट्टी सुरु केली. गुऱ्हाळघरावर काम करुन राबणारा हा कामगार आता खराब गुळापासून दारु तयार करु लागला. अवघ्या काही दिवसातच त्याच्या हाती पैसा खेळू लागला. कमी कष्टात जास्त कमाई होऊ लागली. त्याची ही करामत पाहून गावातील आणखी चारपाच तरुण त्याच्याप्रमाणे दारुचा व्यवसाय करु लागले. हळूहळू अख्खा गावच दारुच्या आहारी गेला. गावातील सर्व लमाणी कुटूंबे दारुच्या व्यवसायात गुंतली. 
हाती पैसा आला पण त्याबरोबर गावात समस्या वाढल्या. गावाला दारुचे व्यसन लागले. आरोग्य खालावले. माणसांची बुद्धी काम देईना. महिलांनाही दारुचे व्यसन जडले. दारुचा हा धंदा जोमात होता. पैसा मिळत होता. पण समाधान नव्हते. दारुच्या संगतीने इतरही व्यसने तेथे जोर धरु लागली. तशा समस्याही वाढत गेल्या. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. 
दारुच्या निर्मितीसाठी पाणी भरपूर लागते. बीड जिल्ह्यातील हा दुष्काळी पट्टा. येथे पाण्याची कायमचीच समस्या. त्यात दारुसाठी पाण्याचा वापर वाढल्याने पाण्याची समस्या बिकट झाली. यावर मात कशी करायची हाच प्रश्‍न पुढे होता. दारु व्यवसाय करणाऱ्या गावास मदत तरी कोण करणार. सरकारचेही धाडस होईना. टॅंकर पाठवला तर विरोधक ओरडतील. दारुसाठी पाण्याचा वापर होतोय म्हणून सत्तेतून पाय उतार व्हावे लागेल. या भीतीने लोकप्रतिनिधींनीही या गावाकडे पाठच फिरवली होती. व्यसनी माणसांना कोण मदत करणार हाच प्रश्‍न भेडसावत होता. पण गावाला पाण्याने उद्दल घडवली. पाणी नसेल तर काय होऊ शकते याची कल्पनाही करणे कठीण होते. व्यवसाय ठप्प झाला. तसा पाण्यासाठी जीवही तडफडू लागला. काहीजणांनी शहराचा रस्ता धरला. 
व्याकुळ झालेल्या या गावाला प्रसाद नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता भेटला. गावची व्यसनाधिनता पाहून त्याचे मन भरुन आले. त्याला या लोकांची काळजी वाटू लागली. पण ही समस्या सोडवण्यासाठी गाव साथ देईल का याचीही त्याला चिंता होती. तरीही त्याने गावाला मदत करण्याचे ठरवले. गावाला पाणी दिले तर गाव व्यसनापासून दूर जाईल असे त्याला वाटू लागले. पाणी देतो दारु सोडा असा अट्टाहास त्याने त्यांच्यासमोर धरला. प्रसादने दारुचा व्यवसाय बंद करुन शेती करण्याची अट घातली. ही अट गावातील कोणालाच मान्य नव्हती. कारण उत्पन्नाचा स्त्रोत सोडून दुसरा व्यवसाय करणे या लमाणी समाजास पटणे अशक्‍य होते. दारुच्या आहारी गेलेल्यांना समजावणेही कठीण होते. पण प्रसादने जिद्द सोडली नाही. प्रसादने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दारुत बक्कळ पैसा मिळतो. पण हाती कायच राहात नाही. पाण्याची समस्या सोडविण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. मग तुम्ही जलसंधारणाची कामे कशी करणार आणि गावचा पाण्याचा प्रश्‍न कसा सोडविणार हे प्रसादने त्यांना पटवून दिले. दारुच्या व्यसनाचे दुष्परिणामही त्याने त्यांना समजावून सांगितले. त्याने त्या समाजात जनजागृती केली. व्यसनापासून दुर राहण्याचा सल्ला दिला. पाण्याच्या समस्येमुळे गाव थोडा ताळ्यावर आला होता. याचाच फायदा घेत प्रसादने गावाची समजूत काढली. जलसंधारणाची कामे करुन पाणी प्रश्‍न कसा सोडवायचा ते सांगितले. पण त्यासाठी पैसा कोठून आणणार हा प्रश्‍न होता. 
प्रसादने एक शक्कल लढवली. दारु व्यवसाय सोडणाऱ्यास दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे त्याने ठरविले. तसा प्रस्ताव त्याने गावापुढे मांडला. पण यावर गावाचा विश्‍वास नव्हता. अखेर एक तरुण दारु व्यवसायीक उठला. त्याने दारु व्यवसाय सोडण्याची ग्वाही दिली. प्रसादने त्याला लगेच दहा हजार रुपये बक्षीस दिले. हे पाहताच गावातील आणखी चार-पाच तरुण पुढे आले. त्यांनीही व्यवसाय सोडण्याची ग्वाही दिली. पाण्याने त्रासलेल्या गावाला पाण्याशिवाय आता काहीच दिसत नव्हते. दहा तरुणांनी हा दारुचा व्यवसाय सोडून शेती करण्याचा निर्धार केला होता. त्यांना प्रसादने एक लाख रुपये बक्षिस दिले. पण या सर्वानी हे पैसे जलसंधारणाच्या कामात खर्च करण्याचा निर्णय घेतला. एका पाण्याच्या थेबासाठी आसूसलेला हा गाव पाहता पाहता जलसंधारणाच्या कामात गुंतला. 
गाळ साठल्याने गावच्या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. पाण्याची साठवणूक वाढावी यासाठी गावकऱ्यांनी गावच्या तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. टॅंक्‍टर मालकांनी गाळ मोफत उचलून न्हावा अशी योजना आखण्यात आली. तसे गावातील दहा-बारा टॅक्‍टर मालक या कामात गुंतले. त्यांनी गाळ उपसण्यास सुरवात केली. गाळ उपसला. तलावाची साठवण क्षमता वाढली. गावातील विहिरींचे पुर्नभरण करण्याचाही निर्णय झाला. जलसंधारणाची कामेही झाली. ओढे, नाल्यावर बांध बाधण्यात आले. पाणी अडवा पाणी जिरवा हाच संदेश गावात गेला. तशी झपाट्याने कामेही झाली. एका बक्षीसाने हा बदल घडवला. 
पावसाळा आला. तलावात पाणी साठले. विहिरींना पाणी वाढले. ओढे, नाल्यात बंधारे बांधल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले. गावाचा परिसर हिरवा करण्याचा निर्धार आता गावाने घेतला होता. पाण्याच्या संवर्धनासाठी आता वृक्षांची गरजही त्यांना वाटू लागली. पाहता पाहता गावाचे बांध वृक्षांनी सजले. रस्ते, नाल्याचे काठही वृक्षांनी बहरले गेले. 
इतर वेळी केवळ खरीपात ज्वारी घेणारा हा गाव आता पाण्याच्या मुबलकतेने अन्य भाजीपाला पिके घेण्याकडे वळला. भाजीचे उत्पादन करुन त्याची विक्री करण्यासाठी गावाने पुढाकार घेतला. खरीपासह उन्हाळ्यातही गाव हिरवा दिसू लागला. दारुची विक्री करणारा गाव आता भाजीपाल्याची विक्री करु लागला आहे. दारुच्या व्यसनाने जे गमावले ते आता हातात नांगर धरुन गावाने कमावले. गेलेली पत गावाने पुन्हा मिळविली. गावची प्रगती झाली. लोक शिक्षित झाले. गावाची प्रतिष्ठा वाढली. 

Saturday, December 3, 2016

अवनि’ करतेय शिक्षण, पर्यावरणाची जागृती

कोल्हापूर शहरातील ‘अवनि’ ही संस्था समाजातील बालकामगार, निराधार, आश्रय नसणाऱ्या बालकांना बालपण मिळवून देण्याचे काम करते. याचबरोबरीने शिक्षण, ग्रामविकास, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या कामातही संस्थेने आपला ठसा उमटविला आहे.
 राजेंद्र घोरपडे

समाजातील बालकामगार, निराधार, आश्रय नसणाऱ्या बालकांना बालपण मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने सन १९९४ मध्ये प्रा. अरुण चव्हाण यांनी सांगली येथे ‘अवनि’ (अन्न, वस्त्र, निवारा) या संस्थेची स्थापना केली. याचबरोबरीने ग्रामस्वच्छता, पर्यावरण जागृतीसह कचरा निर्मूलनाचे कार्यही संस्थेने हाती घेतले. निराधार मुली, महिलांना आधार; तसेच कचरा वेचणाऱ्या महिलांना संस्थेने स्वयंरोजगार मिळवून दिला. कोल्हापुरातील जीवबानाना पार्क येथे संस्थेने बालगृह उभारले आहे.
उपक्रमाविषयी सांगताना ‘अवनि’ संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, की सन १९९६-९८ मध्ये ग्रामस्वच्छता अंतर्गत सरकारने शौचालय बांधण्याची योजना सुरू केली. या कामात ‘अवनि’ संस्था सहभागी झाली. करवीर तालुक्‍यातील सहा गावांत संस्थेने १६५ शौचालये बांधली. सुरवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, त्यामुळे या कामात संस्थेला मोठा टप्पा गाठता आला नाही; पण संस्थेने ध्येय सोडले नाही. पर्यावरण आणि स्वच्छतेच्या कामात आजही ‘अवनि’चा पुढाकार आहे. घराघरांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या निर्मूलनाचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे.

कोल्हापुरात निवासी बालगृह ः

भूमिहीन मजूर, शेतमजूर, दारिद्र्यत्रस्त कुटुंबातील मुलांना आधार देण्याचे कार्य ही संस्था करते. या मुलांसाठी कोल्हापूर शहरातील जीवबानाना पार्क येथे निवासी बालगृह सुरू केले. या बालगृहामध्ये सुमारे ४० मुले-मुली राहतात. संस्थेचा वाढता विस्तार विचारात घेऊन हणबरवाडी येथे २५० मुलांची सोय होईल इतके मोठे बालगृह बांधण्याचे काम सुरू आहे.

बालकामगारांचे पुनर्वसन ः
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील धाबे, हॉटेल, हातगाड्यांवर काम करणाऱ्या बालकामगारांचा शोध घेऊन त्यांची मुक्तता करण्याचे कार्य संस्था गेली दोन वर्षे करत आहे. आत्तापर्यंत जवळपास २०० हॉटेलांमध्ये संस्थेने पाहणी केली आहे. या शोधमोहिमेत आत्तापर्यंत १३४ बालकामगारांची मुक्तता केली असून, त्यांचे पुनर्वसनही संस्थेने केले आहे.

डे केअर सेंटर ः
कचरा वेचणाऱ्या महिलांची तीन ते सहा वयोगटातील मुले सांभाळण्यासाठी डे केअर सेंटर हा उपक्रम संस्थेने सुरू केला. गेली तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत असून, कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर, यादवनगर, संभाजीनगर, कत्यायनी कॉम्प्लेक्‍स यासह ग्रामीण भागात फुलेवाडी, वडणगे येथे ही डे केअर सेंटर्स चालवली जातात. सहा वस्त्या मिळून सुमारे १२० मुलांची काळजी संस्थेतर्फे घेतली जाते.

कचरा संकलनावर प्रक्रिया ः

कचरा वेचणाऱ्या सुमारे ३३६ कुटुंबांशी संस्था जोडलेली आहे. या कुटुंबांचे संघटन करून त्यांना ओळखपत्रे तसेच घरकुले, शौचालये आदी सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोल्हापूर शहरातील दहा वस्त्यांमध्ये कचरा गोळा करण्याचे काम संस्था करते. सध्या रोज १२० घरांतील कचरा संस्थेतर्फे संकलित केला जातो. दररोज ५० ते ५५ किलो कचऱ्याचे संकलन होते. यामध्ये सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो. यासाठी २२ महिलांना कचरा कसा गोळा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील भक्ती-पूजानगर येथे संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. यासाठी विविध आकारांचे खड्डे तयार करण्यात आले आहेत. दररोजचा कचरा वेगवेगळ्या खड्ड्यांत साठविण्यात येतो. सोमवार ते रविवार असे खड्डे केले आहेत. सात दिवस या खड्ड्यांत कचरा कुजवल्यानंतर तो एका मोठ्या खड्ड्यात साठविण्यात येतो. साधारणपणे ३१ दिवसांत या कचऱ्यापासून खत तयार होते. महिन्याला साधारणपणे ९० किलो सेंद्रिय खताची निर्मिती होते. चाळीस रुपये किलो या दराने विक्री केली जाते.

विविध संस्थांकडून गौरव ः
‘अवनि’च्या कार्याची दखल घेऊन अनुराधा भोसले यांना आत्तापर्यंत विविध संस्थांनी गौरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने राजर्षी शाहू गौरव पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर पुरस्कार,
हिरकणी पुरस्कार, उंच माझा झोका या पुरस्कारांबरोबरीने अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना गौरविले आहे.

पर्यावरणपूरक घर ः

महात्मा गांधींच्या ग्राम व पर्यावरणविषयक विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी मुंबई येथील गांधी फाउंडेशन व ‘अवनि’ने एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले. नंदवाळ (वाशी) येथे संस्थेची पाच एकर जागा आहे. या जागेत पर्यावरणपूरक डोम पद्धतीची दोन घरे बांधली आहेत. सध्या येथे चार विद्यार्थी राहात असून, उर्वरित जागेत भाजीपाला, मका, कडधान्ये, भुईमूग इत्यादी पिकांची लागवड केली जाते. येथे जैविक शेतीबाबात प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते.
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षण ः
लातूर, बीड, उस्मानाबाद आदी दुष्काळी जिल्ह्यांतून येणारी कुटुंबे ही उपजीविकेसाठी वीटभट्टी, धाबा, साखर कारखान्यांची ऊसतोडणी अशी कामे करतात. या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न असतो. शाळा उपलब्ध नसल्याने अशी मुले लहान वयामध्ये मजुरी करतात. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन ‘अवनि’ने त्यांच्या शिक्षणासाठी कार्य हाती घेतले. सन २००१ पासून संस्थेने शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्यास सुरवात केली.
याबाबत अनुराधा भोसले म्हणाल्या, की संस्थेतर्फे कोल्हापूर शहराच्या परिसरातील उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, कळंबा, बालिंगा, वाकरे खुपिरे; तसेच शिरोळ तालुक्‍यातील चिंचवाड, उदगाव येथे सर्व्हेक्षण करून शाळाबाह्य मुले शोधण्यात येतात. तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी वीटभट्ट्यांवर आनंद शाळा ‘अवनि’ संस्था चालविते. सहा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना परिसरातील शाळांत शिक्षणाची सोय करून दिली जाते.
आॅक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये कामाच्या निमित्ताने ही कुटुंबे येतात आणि मार्च- एप्रिलमध्ये परत आपापल्या गावी जातात. या कालावधीत या मुलांना परिसरातील शाळांत शिक्षणाची सोय केली जाते. ही मुले गावी गेल्यावर तेथील शाळेत जातात की नाही, याची पाहणी संस्थेतर्फे केली जाते. सन २००१ मध्ये सुरवातीला सुमारे २०० मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न संस्थेने सोडविला. यंदा सुमारे १२०० मुलांच्या शिक्षणाची सोय संस्थेने केली आहे. आत्तापर्यंत सुमारे ९१०० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

संपर्क ः अनुराधा भोसले ः ९८८१३२०९४६

Friday, November 25, 2016

रांग आमच्या सवयीची

रांग आमच्या सवयीची
रांग आमच्यासाठी नित्याची
लहानपणी होती रेशनची रांग
साखर धान्य होते महाग
रॉकेलचा होता तुटवडा
त्याच्या थेंबा थेंबासाठी करावी लागे धडपड
थोडे शिकलो मोठे झालो
महाविद्यालयात प्रवेशासाठी गेलो
तेथेही मग रांगेत थांबायला शिकलो
पदवी प्रमाणपत्र घेतानाही रांगेत थांबलो
नोकरी मिळवण्यासाठी रांग
मुलाखत देण्यासाठी रांग
पैसा कमवल्यावर बिले भरण्यासही रांग
खते बियाणे खरेदीसाठीही रांग
थोर सांगत हवी रांगेच्या संघर्षाची सवय
तरच मिळेल जीवनात यश, ऐश्वर्य
यासाठीच सरकार लोकांना लावतेय
आयुष्यभर वेगवेगळ्या रांगांची सवय
राजेंद्र घोरपडे

Saturday, October 8, 2016

गुणवत्तापूर्ण बिस्किटे हीच ठरली ओळख...

हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री सचिन तेरदाळे यांनी डिसेंबर २०१४ मध्ये सुरवातीला छोट्या प्रमाण घरगुती स्तरावर बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षभरात या व्यवसायाने चांगली गती घेतली. आज त्यांनी स्वतःचे बिस्कीट विक्रीचे दुकान सुरू केले आहे. 

राजेंद्र घोरपडे 

घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर उर्वरित वेळेत घरगुती स्तरावर लहानसा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे महिलांना वाटते. हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील पद्मश्री तेरदाळे यांचीही अशीच इच्छा होती. पद्मश्री यांच्या काकांचा एरंडोली(जि. सांगली) या गावी घरगुती बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय पाहिल्यानंतर पद्मश्री यांनाही बिस्किटेनिर्मिती करण्याचे ठरवले. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी एक किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी करून गावामध्येच बिस्किटे तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला गावातील लोकांकडून बिस्किटे तयार करण्याबाबतची मागणी असायची. एका किलोसाठी पन्नास रुपये या मजुरी दराने त्या बिस्किटे करून देतात. बिस्किटासाठी लागणारे सर्व साहित्य ग्राहकांकडून घेऊन त्यांना लागेल, त्या पद्धतीची बिस्किटे त्या तयार करून देतात. एक किलो बिस्किटे तयार करण्यासाठी डिझेल, वीज आणि बेकिंगचे साहित्य असा सरासरी २० रुपये इतका खर्च येतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना गावातील नागरिकांच्याकडून दररोज चार ते पाच किलो बिस्किटांची मागणी मिळू लागली. यातून खर्च वजा जाता त्यांना रोजचे १०० ते १५० रुपये मिळायचे. गावातील मागणीच्या व्यतिरिक्त पद्मश्री यांनी स्वतःही बिस्किटे तयार करून छोट्या प्रमाणात विक्री सुरू केली. गहू, नाचणी बिस्किटे, नारळ, गव्हाची नानकटाई, नमकिन बिस्किटे, कमी साखरेची बिस्किटे, नाचणी आणि गहू मिश्रीत बिस्किटे अशी विविध प्रकारची उत्पादने त्यांनी विकण्यास सुरवात केली.

‘स्वयंसिद्धा’ने दिली दिशा 
कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतून पद्मश्री तेरदाळे यांना बिस्किटे निर्मिती व्यवसायाबाबत पूरक मार्गदर्शन मिळाले. या संस्थेतर्फे दर बुधवारी कोल्हापुरात महिला व बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी दुपारी बारा ते तीन या वेळेत बाजार भरविण्यात येतो. तेथे पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री सुरू केली. या बाजारानंतर महिलांना संस्थेतर्फे विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येते. वाणीमुक्ती कार्यशाळेतून कसे बोलायचे, व्यवसाय कसा करायचा, विक्रीसाठी कशाची आवश्‍यकता आहे, याची माहिती महिलांना देण्यात येते. यातून पद्मश्री यांना प्रेरणा मिळाली. स्वयंसिद्धा संस्था अनेक ठिकाणी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविते. या माध्यमातूनही पद्मश्री यांनी बिस्किटांची विक्री वाढविली.

महिलांना रोजगाराची संधी ः 
पद्मश्री सध्या दररोज ३० किलो गव्हापासून सुमारे ६० किलो बिस्किटांची निर्मिती करतात. त्या स्वतः दररोज बिस्किटे निर्मिती करतात, त्याच बरोबरीने त्यांनी गावातील सात महिलांना रोजगाराची संधी दिली आहे. कधी बिस्किटांच्या निर्मितीचे काम जास्त असते, कधी कमी असते. सहकारी महिलांना त्या तासाला १२ रुपये इतकी हजेरी देतात. दिवसाला पाच ते आठ तासांचे काम या महिलांना मिळते.

कार्यशाळेत मार्गदर्शन ः 
स्वयंसिद्धा संस्थेमार्फत सांगोला (जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यशाळेत पद्मश्री तेरदाळे यांनी बिस्किटेनिर्मिती व्यवसायाबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. तेथे त्यांनी बिस्किटांची विक्रीही केली. त्यांच्या उच्च प्रतिच्या बिस्किटांचे कौतुक तर झालेच या व्यतिरिक्त त्यांना येथून दरमहा सहा किलो बिस्किटांची कायमची मागणी मिळाली.

कुटुंबाचे मिळाले सहकार्य ः 
पद्मश्री यांचे पती सचिन हे बिस्किटांच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत करतात. बिस्किटे निर्मितीसाठी महिन्याला २०० किलो गहू, २५ किलो घरगुती साजूक तूप, ४० किलो लोणी आणि ७० लिटर डिझेल लागते. लोणी हे नृसिंहवाडी, कवठेपिरण आदी गावांतील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. पद्मश्री यांच्या सासू चंपाबाई या दळण, कांडपापासून ते मालाच्या खरेदी-विक्रीसह कामगारांच्यावर देखरेख ठेवतात. छोट्या गावात हिमतीने घरगुती बिस्किटे निर्मितीचा उद्योग सुरू केल्याबद्दल स्वयंसिद्धा संस्थेने पद्मश्री यांना सौ. मंदा देवेंद्र आचार्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गुणवत्तेमुळे व्यवसायवृद्धी ः 
तेरदाळे यांनी बिस्किटाचे उत्पादन करताना अधिक नफ्यापेक्षा गुणवत्ता हाच निकष ठेवला. बिस्किटे निर्मितीसाठी चांगल्या दर्जाचे घटक त्या वापरतात. विशेषतः लोणी, तूप, दूध हे घरगुतीच वापरले जाते. चांगल्या गुणवत्तेमुळे दरमहा बिस्किटांची मागणी वाढत आहे.

मोठ्या क्षमतेच्या यंत्रांची खरेदी ः 
तेरदाळे यांना वाढत्या बिस्किटांच्या मागणीमुळे एक किलो क्षमतेचा ओव्हन वापरावर मर्यादा आल्या. पीठ मळण्यासाठी मोठ्या यंत्राची गरज वाटू लागले. लहान यंत्रामुळे काम वेळेत होण्यास अडचणी येत होत्या. हे टाळण्यासाठी पद्मश्री यांनी पीठ मळण्यासाठी एक लाख रुपये किमतीचे मिक्‍सिंग मशिन आणि तीन लाख रुपये किमतीचे चार किलो क्षमतेचा ओव्हन खरेदी केला.

बिस्किट विक्रीसाठी शॉपी ः 
तेरदाळे यांनी बिस्कीट विक्रीसाठी कोल्हापुरातील राजारामपूरीमध्ये शॉपी सुरू केली. येथे दररोज बिस्किटांच्या विक्रीतून सरासरी तीन हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त बाहुबली, कुंथगिरी, सोलापूर, पुणे येथेही विक्रीसाठी बिस्किटे त्या पाठवितात.

परदेशातूनही मागणी 
ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे जाणाऱ्या कोल्हापुरातील व्यक्तींकडून वर्षातून तीन ते चार वेळा बिस्किटांची मागणी होते. साजूक तुपातील एक किलो बिस्किटे विक्रीचा दर २५० रुपये आहे, तर परदेशात बिस्किटे पाठविण्याचा कुरिअरचा खर्च ८१० रुपये प्रति किलो इतका आहे. मात्र गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशातूनही मागणी असल्याचे पद्मश्री सांगतात.

संपर्क ः पद्मश्री तेरदाळे ः ८४२१४८२८४४

Monday, October 3, 2016

व्यक्तीमत्व विकास....

व्यक्तीमत्व वागण्यातून दिसते. तुम्ही किती उद्धट आहात हे आपल्या कृतीतून दिसून येते. त्यासाठी दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही.
काही दिवसापूर्वी मी असाच एक व्हिडिओ पाहीला. त्यामध्ये अमेरिका व प्रान्सच्या विचारसरणीत कसा फरक आहे. ते दाखवले होते. हे बोलके चित्र खूप काही सांगून जाते. यातून बरेच काही घेण्यासारखे आहे. अमेरिकेत जादा झालेला शेतमाल समुद्रात फेकून दिला जातो. इतकेच नव्हेतर स्टोअर किंवा माँलमध्ये विक्री न झालेले माल भंगारात काढण्यात येतो. तोही कचऱ्यात टाकून दिला जातो. तेथे श्रीमंती आहे. मालाची किंमत नाही. पण यातून अमेरिकेची विचारसरणी कशी आहे याचाही प्रत्यय आपणास येतो. त्याच्या विचारात माणूसकी नाही. याचेही दर्शन होते. पण या ऊलट फ्रान्समध्ये मात्र जास्त झालेला शेतमाल गरजूंना वाटला जातो. स्टोअर किंवा माँलमध्ये जास्त दिवस न विकलेला मालही गरजूंना मोफत वाटला जातो. यातून त्या देशात श्रीमंती कमी आहे असे वाटते. तेथे काही गरजू आहेत. असेही दिसते पण त्याच बरोबर त्यांच्या विचारात माणूसकी आहे. वस्तू टाकावू झाली तरी तिचा योग्य वापर करता येऊ शकतो. एखाद्या गरजूचे पोट त्यातून भरु शकते हा विचार आहे.
हा फरक आहे या दोन देशातला. भारताने यावर जरूर विचार करावा. कोणाशी कसे वागायचे कोणा कडून काय घ्यायला हवे याचाही विचार करायला हवा. परराष्ट्र धोरण ठरविताना हा विचार जरुर विचारात घ्यायला हवा. कदाचित हा एखाद्या देशाबाबत केलेला अपप्रचारही असेल पण यातून शिकण्यासारखे निश्चितच आहे. हे ही विचारात घ्यायला हवे. या दोन्ही देशांशी आपण व्यवहार करताना हा विचार जरुर विचारात ठेवायला हवा.
आपणाकडेही शेतकरी मालाला भाव नाही म्हणून शेतमाल फेकून देतो. त्याने तसे न करता गरजू व्यक्तींना तो वाटला तर त्याला पुण्य मिळेल. मालाला दर मिळाला नाही म्हणून नुकसान झाले खरे पण एखाद्या गरजूचे पोट तरी भरले हे पुण्य पदरात पडले. असा विचार करून जर त्याने व्यवहार केला तर तो नुकसानीने हताश, निराश न होता पुण्याच्या शिदोरीने तो आत्महत्येच्या विचारापासून दूर जाऊ शकतो. हे ही विचारात घ्यायला हरकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी असा माणसिक आधार त्याला द्यायला हवा. पुण्याचा विचार माणसामध्ये सद्विचार आणतो. सद्संगतीने धैर्य येते. दुष्ट विचारांना आळा बसतो. चुकीच्या मार्गाचा स्वीकार होत नाही. यासाठी नेहमी पुण्य कसे पदरता पाडता येईल याचा विचार करायला हवा. यातून आपले जीवन समृद्ध करायला शिकले पाहिजे.  

Saturday, September 3, 2016

वडिलांच्या प्रेरणेमुळे शेतीमध्ये जपली प्रयोगशीलता

संडे फार्मर
--------------------------------


वडिलांचे शेतीतील कष्ट, प्रयोगशीलता यांचा आदर्श ठेवून सुरेश दगडू काटकर यांनी गावाकडील शेतीशी नाते कायम ठेवले आहे. कोल्हापूर शहरामध्ये सब पोस्टमास्तर पदावर कार्यरत असणाऱ्या सुरेश काटकर यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे. कृषी अधिकारी, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून पीक फेरपालटीवर त्यांचा भर असतो.

राजेंद्र घोरपडे

तेलवे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे सुरेश काटकर यांची चार एकर शेती आहे. सुरेश यांचे वडील दगडू सखाराम काटकर हे फारसे शिकलेले नसले तरी कष्टातून त्यांनी मुलांना शिकवले. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयोगशीलता जपली. वयाच्या ८७ व्या वर्षीही ते शेतीच्या नियोजनात रमलेले असत. आजारपणामुळे त्यांना आता शेतीकडे लक्ष देणे होत नाही; परंतु वडिलांच्या प्रयोगशीलतेचा वसा सुरेश काटकर यांनी जपला आहे. सुरेश हे बांधकाम विषयातील डिप्लोमाधारक. सुरवातीला त्यांनी दोन-तीन वर्षे कंत्राटी व्यवसाय केला. याच दरम्यान त्यांना पोस्ट खात्यात नोकरी मिळाल्यानंतर बांधकाम व्यवसाय सोडला. नोकरीच्या चक्रात अडकल्यानंतर इतर व्यवसाय करणे तितके सोपे नसते. त्यात सरकारी नोकरी असेल तर जबाबदारी जास्तच वाढते. सध्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील पोस्ट आॅफिसमध्ये सुरेश काटकर हे सब पोस्टमास्तर पदावर कार्यरत आहे. नोकरीतील व्यस्ततेमध्येही त्यांची शेतीची ओढ काही कमी झाली नाही. लहानपणापासूनच शेतीमध्ये गुंतलेले असल्याने नोकरी असूनही आठवड्यातून एकदा तरी कोल्हापूर शहरापासून २५ किलोमीटरवर असणाऱ्या शेतावर जाऊन वाटेकरी, परिसरातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चाकरून पीक व्यवस्थापनाचे नियोजन काटकर करतात.

जमिनीनुसार पीक पद्धतीचे नियोजन ः
सुरेश यांची चार एकर शेती आहे. त्यामध्ये अर्धा एकर मळीचे शेत आहे. कासारी नदीपासून सुमारे ३०० मीटरवर अडीच एकर काळवट जमीन आणि एक एकर माळरान आहे. काटकर यांनी नदीवरून पाणीपुरवठा योजना करून सर्व क्षेत्रात पाणी पोचविले आहे. शेतीमध्ये ऊस, सुर्यफूल, भात ही पिके आलटून पालटून घेतली जातात. नदीजवळ असल्याने बारमाही पाणी उपलब्ध होते. सर्व शेती त्यांनी भागाने केली आहे. पाण्याचा खर्च वगळता सर्व खर्च निम्मा-निम्मा विभागून घेतला जातो. तसेच उत्पन्नही निम्मे-निम्मे विभागून घेतले जाते, त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. कासारी नदीच्या पूर क्षेत्रात काही जमीन असल्याने काटकर यांना काही वेळा पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. काही वेळा पुराच्या पाण्यात सात-आठ दिवस शेती राहिल्याने पीक नुकसानही सोसावे लागते. पूरबाधित उसाचे करायचे काय हा प्रश्‍न काही वेळा त्यांच्या समोर असतो. हा ऊस काढून मग प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने हंगामी पिकाचे नियोजन ते करतात. यामुळे आर्थिक तोटा कमी करणे त्यांना शक्य होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी कृषितज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेत पीक फेरपालटाचे नियोजन केले. त्यामध्ये त्यांना यशही मिळत आहे.
पीक लागवडीबाबत सुरेश काटकर म्हणाले, की काही शेती पूर क्षेत्रात असल्याने जास्तीचा पाऊस झाला, तर पुराचा धोका असतो. तीन, चार दिवस पुराचे पाणी शेतात राहते, त्यामुळे ऊस पिकाशिवाय अन्य पिकांची लागवड शक्य होत नाही. आडसाली लागवडीसाठी तीन फुटांची सरी सोडून उसाची लागवड केली जाते. माती परीक्षण करूनच उसाला सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा दिली जाते. दर्जेदार बेणे निवडण्यावर माझा भर आहे. प्रयोगशील ऊस शेतकऱ्यांच्या सल्ल्यानेच लागवडीचे केले जाते, त्यामुळे सध्या एकरी ५५ ते ६० टन ऊस उत्पादन मिळते. खोडव्याला माती परीक्षणानुसार पहारीच्या अवजाराने रासायनिक खत दिले जाते, त्यामुळे खताचा योग्य वापर होतो, आर्थिक बचत होते. उसाचा खोडवे तुटून गेल्यानंतर शेतात फेरपालट म्हणून उन्हाळ्यात भात किंवा सूर्यफुलाची लागवड केली जाते.
भातशेतीच्या नियोजनाबाबत काटकर म्हणाले, की पीक फेरपालटीचे नियोजन आणि उपलब्ध क्षेत्र लक्षात घेऊन कधी उन्हाळी तर कधी पावसाळी भात लागवड केली जाते. भात लागवडीसाठी सुधारित जातीचे बियाणे निवडले जाते. त्यामुळे उतारा चांगला मिळतो. प्रयोगशील भात उत्पादकांचे अनुभव लक्षात घेऊन रत्ना, कर्जत तसेच इतर भाताच्या जातींची लागवड करतो. लागवडीसाठी भात रोपे गादीवाफ्यावर तयार केली जातात. चिखलणी करून भात रोपांची पुनर्लागवड केली जाते. दर वर्षी २० गुंठे ते एक एकरावर भात लागवड असते. मला रत्ना जातीचे एकरी सरासरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. भात भरडून तांदूळ घरीच वापरतो. काहीवेळा खोडवा गेल्यानंतर दहा गुंठे क्षेत्रावर उन्हाळी हंगामात सूर्यफुलाच्या संकरित जातीची लागवड करतो. या पिकाच्या व्यवस्थापनासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येतो. सहासरी दहा गुंठ्यांतून चार क्विंटल उत्पादन मिळते. सूर्यफुलाची विक्री न करता घाण्यावरून तेल काढून घेतो. या तेलाचा घरीच वापर करतो. प्रत्येक पिकाच्या व्यवस्थापनाचा हिशेब ठेवला आहे. त्यामुळे नफा, तोटा कळतो. त्यातून पुढील वर्षी सुधारणा करतो.

पाण्याच्या निचऱ्यासाठी चर
काटकर यांची काही जमीन कासारी नदीच्या पूर क्षेत्रात असल्याने काहीवेळा पुराचे पाणी शेतात येते. पूर ओसरल्यानंतरही शेतातील बरेच दिवस पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे क्षारफुटीचा धोका असतो. त्याचा पीक वाढ आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन काटकर यांनी शेताच्या बाजूला अडीच फूट खोलीचा चर काढून तो वाळू, दगडगोट्यांनी बुजविला. हाच चर पुढे ओढ्याला जोडला. चरामुळे जमिनीतील पाण्याचा लगेच निचरा होऊन वाफसा येतो. त्यामुळे जमीन चांगल्या स्थितीत राहिली आहे.

ॲग्रोवनची होते मदत
पीक व्यवस्थापनाच्या माहितीसाठी सुरेश काटकर यांना ॲग्रोवनची मदत होते. याबाबत ते म्हणाले की, मी ॲग्रोवनमधील लेख लिहिणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करतो. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कडून पीक व्यवस्थापनाची माहिती घेतो. काही शेतकऱ्यांच्या शेतीला मी भेटीदेखील दिलेल्या आहेत, त्यामुळे मला माझ्या शेती व्यवस्थापनातील चुका समजतात. पुढील वर्षी मी बदल करतो. त्याचा पीक उत्पादनवाढीस फायदा झाला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे आयोजित शिवार फेरीमध्ये मी सहभागी असतो. कृषी अधिकारी सर्जेराव पाटील हे माझे बालमित्र. त्यांच्या सल्ल्यानेच मी दर वर्षीचे पीक नियोजन करतो. आकुर्डे येथील अजित पाटील यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय पाहून मीदेखील नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांना गटशेतीचा आधार
गावातील शेती नियोजनाबाबत माहिती देताना काटकर म्हणाले की, आमचे गाव एक हजारपेक्षा कमी लोकवस्तीचे आहे. गेल्या काही वर्षांपासून मजूरटंचाई जाणवू लागली. हंगामाच्या काळात शेती कामाला मजूर मिळत नाहीत. यावर गावकऱ्यांनी गटशेतीचा उपाय शोधला आहे. आता दहा-बारा शेतकऱ्यांचे गट करूनच शेती केली आहे. आलटून पालटून एकमेकांच्या शेतात शेतकरी मदतीला जातात. पीक नियोजन तसेच आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी गटशेतीची मला मदत होत आहे. नोकरीमुळे मी गेली वीस वर्षे एकाच वाटेकऱ्याकडे माझी शेती कसण्यासाठी आहे. श्रमाचा योग्य मोबदला त्यांनाही मिळतो, त्यामुळे तेही समाधानी आहेत. नोकरी संपली, की मीदेखील गावी शेतावरच राहण्यास जाणार आहे.

संपर्क ः सुरेश काटकर ः ९४२०००९५०६ 

Monday, August 29, 2016

अभिषेकाचे पुण्य....



अनेक मंदिरात मुर्तींना अभिषेक केले जातात. पण या अभिषेकात वापरले जाणारे दुध वायाच जाण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हे दुध वाहत जाऊन सांडपाण्यात मिसळते इतके भानही लोकांना राहात नाही. तरीही भावनेपोटी हे अभिषेक सुरुच असतात. अशा या प्रथांना कोठेतरी आळा बसायला हवा. काही मंदिरात तर हजारो लिटर दुध असेच वाया जाते. ही प्रथा थांबवण्याचा वसा बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. गेले दोन वर्षे कपिलेश्‍वर मंदिरात श्रावणातील सोमवारी होणारे अभिषेक या कार्यकर्त्यांनी रोखले आहेत. हे वाया जाणारे दुध त्यांनी अनाथ व वृद्धा आश्रमांना देऊन एक वेगळा आदर्श उभा केला आहे.

आता मला विचाराल तर आम्हा नव्यापिढीला अभिषेक कोणी सुरु केला याची कल्पनाही नाही. तो का केला जातो हे ही माहीत नाही. ते जाणून घेण्याचीही आमची इच्छा नाही. केवळ परंपरा म्हणून अभिषेक करण्याकडेच आमचा कल दिसतो. पूर्वज सांगतात म्हणून श्रद्धेपोटीच आपण अभिषेक करतो. यात त्या मुर्तीची झिज होते याचे भानही राहात नाही. हा अभिषेक दिवसातून एकदाच करावा याचेही भान नसते. दगडीमुर्तीला देव मानायचे मग त्या दगडावर दुध ओतून ओतून त्याचे सोैदर्य नष्ट होते. हे आपल्या लक्षात कसे येत नाही. देवाचे सौदर्य नष्ट होत असेल तर मग ती पुजा कशी आपणास मान्य होते हेच मुळात समजत नाही. तरीही आपण अभिषेक करतच राहातो. अशा अभिषेकाने कित्येक मंदिरात दुर्गंधीही पसरते. याकडे कोणाचेही लक्ष नसते. हीच देवाची भक्ती का? नव्या पिढीला भक्ती म्हणजे काय याचीही माहिती नसल्याने ही परंपरा म्हणून आपण अंधश्रद्धा जोपासतो आहोत. याबाबत आता प्रबोधनाची गरज आहे. संतांनी भक्ती कशी करावी ? श्रद्धा म्हणजे काय ? पुजा कोणाची होते ? पुजेसाठी काय हवे असते ? हे सर्व सांगितले आहे. पण तरीही आपण याचा अभ्यास करत नाही. विचार करत नाही. मग चुका या होणारच. पण त्या चुका आहेत हे ही आपण मान्य करायला तयार नाही. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण तरीही जनता मात्र याबाबत अज्ञानी कशी ? भोळीभाबडी जनता अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडते. विज्ञान प्रगत झाले पण लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवणारे काही कमी राहीले नाहीत. त्यांनी या प्रगत तंत्राने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूकही आता हायटेक झाली आहे. आपण फसत आहोत याचेही भान आता जनतेला राहीले नाही. पण काही जागरुक माणसे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहेत. समाजाला दिशा देण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे.

कपिलेश्‍वर हे बेळगाव शहरातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. हजारो लोक दुधाच्या पिशव्या घेऊन या मंदिरात अभिषेक करत होते. पण हे सर्व दुध गटारीत मिसळले जायचे. दुधाची ही नासाडी रोखण्याचा संकल्प नांदुर गल्लीतील मंडळांनी घेतला. देवस्थांनचे पुजारी व विश्‍वस्थांना विश्‍वासात घेऊन त्यांनी दुधाची नासाडी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. दैनिक सकाळनेही या उपक्रमाचे स्वागत करत जनजागृतीसाठी मंडळास सहकार्य केले. दुधाचा अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विश्‍वासात घेऊन येणारे दुध संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेली दोन वर्षे हे कार्य सुरु आहे. शेकडो लिटर वाया जाणारे दुध संकलीत करून अनाथ व वृद्धाश्रमात ते वाटण्यात येत आहे. खरी भक्ती कोणती? खरा धर्म कोणता ? खरे पुण्य कशात आहे ? हे आता जनतेनेच ठरवायला हवे आणि कृती करायला हवी. भक्तीचा खरा अर्थ समजून कृती करायला हवी. बेळगावचा हा उपक्रम देशातील अनेक मंदिरात राबविता येणे शक्‍य आहे. याबाबत जागृतीही करता येणे शक्‍य आहे. अभिषेकाचे पुण्य कशाने मिळेल हे जनतेने समजून घेऊन आता कृती करायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

देवस्थानच्या परिसरात असे अनेक उपक्रम राबविण्याची आता गरज आहे. अनेक मंदिरात देवळात नारळ फोडले जातात. या नारळातील गोड पाणी शिंपडण्यात येते. पाण्याचे पवित्र विचारात घेऊन कार्य करायला हवे. हे पाणी कोणाच्या तरी पोटात गेल्यास त्याला उर्जा मिळेल. हा विचार का केला जात नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला हे पाणी दिले तर त्याचा आधार मिळेल. हा विचार का केला जात नाही. यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा देवस्थानाने उभारायला हवी. अशा विचार का केला जात नाही. दैनिक सकाळच्या तनिष्का गटाने जोतिबा डोंगरावर हा उपक्रम राबविला. त्याला प्रतिसादही मिळाला. नारळाचे वाया जाणारे पाणी साठवून ते शाळा व रुग्णांना ताबडतोब दिले. या उपक्रमाचे कौतुक झाले. अशा या उपक्रमातून देवस्थानात होणारी स्वच्छताही राखली जाते याचा विचार व्हायला हवा.

पुण्य कर्म कोणते हे आता जनतेनेच ओळखायला हवे. तशी कृती करायला हवी. खरी भक्ती कोणती ? खरे अध्यात्म कशात आहे ? देव कोठे आहे ? याचा अभ्यास करुन कृती करायला हवे. हे जाणून घेऊन आपला आचरण करायला हवे. ही जागृती आली तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे सांगण्याची गरज भासणार नाही.

- राजेंद्र घोरपडे

Tuesday, August 23, 2016

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे...

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे... 
अभ्यासकांची भावना; अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाच्या विविध रूपांची छाप

- राजेंद्र घोरपडे


कृष्ण विविध रूपात पाहायला मिळतो. प्रेममय, भक्तिमय, खोडकर असे त्याचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांना आपलेसे वाटते. वात्सल्य, शृंगार, भक्ती, करुणा अशा रसांचा आविष्कार कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात आहे. प्रेम म्हणजे भक्ती या जाणिवेतून त्याच्यावर काव्य रचना झाल्या. संतांनी विठ्ठल रूपात कृष्णाचे वर्णन केले आहे. कारण पंढरीच्या विठ्ठलात शिव आणि विष्णू अशा दोन्ही तत्त्वांची एकरूपता संतांनी पाहिली आहे. असा हा कृष्ण संत साहित्य अभ्यासकांना कसा वाटतो याविषयी... 


श्रीकृष्ण हे अष्टावधान व्यक्तिमत्त्व आहे. राजनैतिक, युद्धकुशल, चतुरंग योद्धा असा तो आहे. प्रसंगी आपल्या मूल्यांसाठी, स्नेहासाठी तो सारथ्यही पत्करतो. बालवयात तो निरागस खोडकर वाटतो. तारुण्यात तो प्रेमभक्तीत रंगलेला असा वाटतो. त्यानंतर चतुरस्र नेतृत्व करणारे असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. संतांनी कृष्णाचे विविध पैलू मांडले आहेत. संत नामदेवांचा कृष्ण निरागस, निर्मळ असा आहे. संत एकनाथांनी रंगवलेला कृष्ण बालक्रीडेत रममाण झालेला आहे. तो रोमॅन्टिकही वाटतो. संत तुकारामांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर अभंग रचले. त्यांच्या अभंगातून तो भक्तीचे दैवत म्हणून पाहायला मिळतो. पंडित कवींनी लोकांचे रंजन करणारा, चांगल्या मूल्यांची जपणूक करणारा कृष्ण रंगवला आहे. शाहिरांनी शृंगारप्रधान असे त्याचे चित्र उभे केले आहे. एकूणच कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे.
- ल. रा. नसिराबादकर, 
संत साहित्याचे अभ्यासक 

भगवद्‌गीतेतील कृष्ण कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असा तीन प्रकारचा आहे. अर्जुनाला शिकवण्याचे केवळ निमित्त आहे. त्यामुळे आजच्या जीवनातही त्यातील तत्त्वज्ञान लागू पडते. या तीन गोष्टींनी जीवन आनंदी होते. कर्माच्या मोबदल्यात काय मिळाले याचाच विचार होतो. ते आवश्‍यक असले तरी सध्याच्या पिढीला कर्म करण्याआधीच फळ हवे आहे. श्रद्धेने कर्म केले तर यश जरूर मिळते. परमार्थ करताना व्यवहार ज्ञानही आवश्‍यक आहे. याची सांगड घातली तरच प्रपंच सफल होतो.
- यशवंत पाठक, 
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

भगवद्‌गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. भगवद्‌गीता कृष्णाने सांगितलीच नाही, असे म्हणणारेही लोक आहेत. पण हिंदू धर्मात तीन ग्रंथ पवित्र मानले जातात. त्यात भगवद्‌गीतेचा समावेश आहे. कृष्णाचे जगणे हे भगवद्‌गीतेसारखे आहे. यासाठी भगवद्‌गीता समजल्याशिवाय कृष्ण चरित्र समजत नाही व कृष्ण चरित्र समजल्याशिवाय भगवद्‌गीताही समजत नाही.
- डॉ. सदानंद मोरे, 
संत साहित्याचे गाढे अभ्यासक 

Sunday, August 21, 2016

मन करा रे प्रसन्न


ज्याने मन जिंकले
त्याचे मन हे उत्तम दोस्त झाले
ज्याने मनाकडून पराभव स्विकारला
त्याचा सर्वात मोठा शत्रू मन हाच झाला

हा मनाचा नियम आहे
यासाठी मनाला नियंत्रित करायचे आहे
मनावर विजय मिळवायचा आहे
मनावर आपल्या ताब्यात ठेवायाचे आहे

मनाला शांती आवडते
तेव्हा मनाला प्रसन्नता येते
मनाला अशांती आवडते
तेव्हा मन हिंसावादी होते

मनाचे हे शास्त्र समजून घ्यायला हवे
त्यासाठी मनाला नियंत्रणात ठेवायला हवे
लोभ, वासनेपासून मन दुर ठेवायला हवे
मन आपल्या ताब्यात यायला हवे

मन करा रे विचार मुक्त
विचार थांबले की व्हाल मुक्त
मग करा एकचाच स्वीकार
सो हम सो हम चा करा गरज

मनाला लाभेल अखंड प्रसन्नता
मनाला लाभेल अखंड शांतता
मन लागेल वेड अध्यात्माचे
मग फुलेले मन आत्मज्ञानाचे

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 20, 2016

सावर रे मना...

मन चपळ, चपळ
मन चंचल, चंचल

न राही एके जागी
फिरे सारखे जागो जागी

या मना कसे आवरु
अगणिक विचारांना कसे सावरु

वाऱ्याला रोखू झाडे लावून
प्रकाशाला रोखू भींती उभारुन

सर्वांना आहे विश्रांती
पण मनाला नाही ऊसंत

सतत धावे इकडे तिकडे
सतत राहे भटकत जिकडे तिकडे

एकाग्रतेने कर सोहम सोहम ध्यान
मन त्यावर कर स्थिर होईल मग आत्मज्ञान

- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 13, 2016

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...

‘श्रमिक सहयोग’ राबवितेय प्रयोगशील उपक्रम 

चिपळूण तालुक्‍यात रुजताहेत विकासाची बीजे 


चिपळूण तालुक्‍यामधील (जि. रत्नागिरी) विविध गावांमध्ये श्रमिक सहयोग ही संस्था निसर्ग शेती, वनसंवर्धन, सूक्ष्म जलविद्युत केंद्र, वंचित समाजासाठी वाडी-वस्त्यांवर अनौपचारिक शाळा असे विविध उपक्रम राबवीत आहे. सन २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथे ‘प्रयोगभूमी’ हे प्रयोगशील शिक्षण केंद्र सुरू केले. विविध उपक्रमांतून ही संस्था शाश्वत विकासाचे धडे परिसरातील लोकांना देत आहे. 

- राजेंद्र घोरपडे 

कोकणच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील काही ध्येयवादी व्यक्तींनी १९८४ मध्ये चिपळूण तालुक्‍यात श्रमिक सहयोग या संस्थेची स्थापना केली. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासगट, चिंतन शिबिरे, व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी प्रबोधनात्मक उपक्रम संस्थेने सुरू केले. आदिवासी समाजामध्ये एका पिढीने दुसऱ्या पिढीस शिक्षित करण्याची पद्धती आहे, त्यामुळे या मुलांना शिक्षण देताना अनेक अडचणी उभ्या राहतात. या मुलांना आपला अभ्यासक्रम बोजड वाटतो. हे लक्षात घेऊन त्यांना रुचेल, पटेल अशा भाषेत शिकविण्याची गरज असते. यासाठी श्रमिक सहयोगने मुलांच्या कार्यक्षमता शोधून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामीण स्त्रिया-युवकांचे प्रबोधन व संघटन, कोकणातील पर्यावरणविषयक तसेच विकासपद्धती विषयक मुद्द्यांची हाताळणी, समाजातील कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनधारांच्या अधिकाराच्या मुद्द्यांची हाताळणी, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणपद्धतीची मांडणी यावर संस्थेचे कार्य सुरू झाले. चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्‍यांतील सुमारे १५० गावांत संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेने पहिली १२ वर्षे कातकरी- आदिवासी समाजाच्या दुर्गम भागातील २६ वाड्यांवर अनौपचारिक शाळा चालविल्या, त्यातून सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

प्रयोगशील निवासी शाळा 
वंचित मुलांच्या विकासासाठी २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी येथे १६ एकर जमीन खरेदी करून प्रयोगशील निवासी शाळा सुरू केली. या शाळेत सध्या ४० मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना औपचारिक अभ्यास, व्यवसाय शिक्षण, कला-कौशल्य असे शिक्षण देण्यात येते. या शाळेच्या संचालनासाठी पुणे येथील नवमहाराष्ट्र कम्युनिटी फाउंडेशन (नवम) या संस्थेचे सहकार्य मिळाले होते. प्रयोगभूमीतील मुलांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थानमार्फत शालेय शिक्षण व्यवस्थेत सामील करून घेण्यात येते. ‘प्रयोगभूमी’चे संचालन समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, गट यांच्या साहाय्याने चालते. त्यासाठी ‘पालकत्व योजना’ चालविली जाते. नवम (पुणे), एस.पी.ए. एज्युकेशन फाउंडेशन (मुंबई), सकाळ रिलीफ फंड इत्यादी संस्थांचा यात सहभाग आहे.

‘संडे स्कूल’मधून मार्गदर्शन 
डोंगरी भागातील कातकरी समाजात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण न करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. अशा तरुणांसाठी प्रयोगभूमीमध्ये ‘संडे स्कूल’ ही संकल्पना राबविली जाते. दर रविवारी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येतो. सध्या यामध्ये १२ तरुण सहभागी झाले असून, दहावी परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.

स्वयंसहायता गटातून महिला विकास 
चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील ६५ गावांमध्ये संस्थेने २५० स्वयंसहायता गट स्थापन केले आहेत. यातून सुमारे ३७०० स्त्रिया संघटित झाल्या असून त्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्रमिक सहयोग परिसरातील सहयोगी गटांना सातत्याने प्रशिक्षण, संशोधन इत्यादी स्वरूपात मदत करते. कोकण संघर्ष समिती, सह्याद्री वाचवा अभियान, कोंकण नारी मंच, आम्ही चिपळूणकर, कृषी वसंत शेतकरी संस्था, आदिम कातकरी आदिवासी संघटना इत्यादी संस्थांना सहकार्य केले जाते.

पुरस्कारांनी गौरव ः 
संस्थेला वीजनिर्मिती व पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन व पर्यावरण शिक्षण संस्थेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा समाजकार्य गौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी समाजशिक्षक पुरस्कार
आणि सामाजिक कार्यासाठीचा अस्मि प्रतिष्ठानचा पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे.

शेकरू महोत्सवाचे आयोजन 
कोयनानगर प्रकल्पाच्या चौथ्या टप्पा परिसरात असणाऱ्या वनांमध्ये पर्यावरणप्रेमींना शेकरू फिरताना आढळले. या निसर्गरम्य परिसरात वन खात्याने शेकरूचा अधिवास असल्याची शासकीय नोंद केल्यानंतर वनसंवर्धनासाठी प्रयोगभूमीने पाऊल उचलले. संपूर्ण परिसरात वृक्षतोडीस बंदी घातली. याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने संस्थेने आम्ही चिपळूणकर, वन खाते, डी.बी.जे. महाविद्यालय यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी प्रयोगभूमीमध्ये शेकरू महोत्सव आयोजित केला होता. या वेळी परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित करण्यात आली. महोत्सवासाठी उपस्थित निसर्गप्रेमींनी वन परिसरात फिरून, जंगलातील विविध वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग, प्राण्यांच्या पायाचे ठसे, पक्ष्यांचे आवाज, फुलपाखरांचा अधिवास याबाबत माहिती संकलित केली.

सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प 
कोयना वीज प्रकल्पाच्या परिसरात असणाऱ्या अनेक वाड्या-वस्त्या, तसेच प्रयोगभूमीतही वीज नव्हती. अशा या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने श्रमिक सहयोगचा अभ्यास सुरू झाला. नागालॅंडमध्येही डोंगरी भागात ही समस्या आहे. तेथे सरकारने झरे-ओढे, धबधब्याच्या वाहत्या पाण्यावर छोटी जलविद्युत केंद्रे उभारली आहेत. हे पाहून तसाच प्रयोग प्रयोगभूमीत करण्यात आला. प्रयोगभूमीच्या परिसरात वाहणाऱ्या झऱ्यावर २००७ पासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. नागालॅंड सरकारच्या सहकार्याने वीजनिर्मितीचे यंत्र येथे बसविले अाहे. वाहत्या झऱ्याचे पाणी १५ मीटर उंचीवर अडवून तेथून पाइपने हे पाणी जल विद्युत निर्मिती यंत्रापर्यंत आणले आहे. या यंत्रात ठराविक दाबाने पाणी सोडून वीजनिर्मिती करण्यात येते. चार-पाच महिने दररोज तीन किलोवाॅट विजेची निर्मिती या यंत्रातून होते.
प्रयोगभूमीने यंदा ‘चला वीजनिर्मिती करूया’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. पर्यटन, प्रबोधन, मनोरंजन, शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव असे उद्देश ठेवून आयोजित या कार्यशाळेमध्ये राज्यभरातून अनेकांनी सहभाग घेतला. सहभागी व्यक्तींना या यंत्राची सर्व तांत्रिक माहिती देऊन स्वतः हे यंत्र जोडणी करून वीज तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यास सांगण्यात आले होते.

भाताच्या पारंपरिक जातींचे संवर्धन 
चिपळूण तालुक्‍याच्या डोंगरी भागात खामडी ही पारंपरिक भाताची जात आढळते. सध्याच्या काळात ही जात दुर्मिळ होऊ लागली आहे. प्रयोगभूमीमध्ये दीड एकरावर खामडी (लाल तांदूळ) या भाताच्या पारंपरिक जातीचे संवर्धन करण्यात येत आहे. एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली असून, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी भात लागवडीबाबत कार्यशाळा घेण्यात येतात.

संपर्क ः
राजन इंदुलकर ः ९४२३०४७६२०, ८४०८०११२३१

Thursday, August 11, 2016

आमदारांना पगारवाढीच्या अनोख्या शुभेच्छा

आमदारांना पगारवाढ झाली पण देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत काही वाढली नाही. उसाचा दर काही वाढला नाही. शेतकरी नेते केवळ आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात. स्वतःचे नाव कमावतात. खासदारकी-आमदारकीही मिळवतात. मंत्रिही होतात आणि शेतकऱ्यांना विसरतात अशी काहीशी परिस्थिती सध्या तरी आहे. शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या उसाला भाव मिळाला. कोणीतरी बोलणारे आहे. म्हणून शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. या विश्वासांचा त्यांनी मान राखायला हवा. हे बोलण्याचा उद्देश याचसाठी कारण पर्वाच आमदारांची पगारवाढ झाली. या आमदारांचे काही शेतकऱ्यांनी अनोखे अभिनंदन केले. असाच एक फ्लेक्स वाचणात आला. त्यावर शुभेच्छुकांची नाव वाचली आणि डोळे उघडले. शुभेच्छुस होते. कपाशीवरील लाल्या रोग अनुदान वंचित शेतकरी, मोसंबी अनुदान वंचित शेतकरी, महागाईने होरपळलेला शेतकरी वर्ग, रंजले गांजलेले सर्व सामान्य शेतकरी. आपणास मिळाले नाही म्हणून काय झाले दुसऱ्याला मिळाले आहे ना. याच भावनेने त्यांनी या आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहो आम्हाला मिळाले नाही याचे दुःख नाही पण दुसऱ्याला मिळाले म्हणून आम्हाला जळायचे नाही. त्यांना मिळाले त्यांचा मान राखायला हवा. शेतकऱ्यांच्या या स्वभावाचा विचार करायला हवा. अहो महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मुठीत घेतलेले मीठ टाकले नाही. वाट्टेल तेवढा मार बसला तरी त्याला प्रतिकार केला नाही. उलट वार केला नाही. उ की चुही केले नाही. अशा या गांधी वादाचा शेतकऱ्यांवर प्रभाव आहे. कितीही अत्याचार झाला तरी तो सहन करायचा पण या सहनशक्तीचा अंत राजकर्त्यांनी पाहू नये कारण इंग्रजही देश सोडून गेले. तसे तु्म्हालाही सत्ता सोडावी लागेल प्रसंगी देशही सोडावा लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. शेतकरी गप्प आहे सोसतो आहे याचा अर्थ असा नव्हे की तो काहीच करणार नाही. हिसेंचा मार्ग कधीही घातक आहे. तो शेतकरी स्वीकारणार नाही. पण तुम्हाला पाय उतार करण्यासाठी योग्य मार्ग मात्र तो निश्चित स्वीकारतो याचा विचार करायला हवा. केवळ आश्वासने देऊन आता भागणार नाही. शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो याचा विचार करुन राजकर्त्यांनी काम करायला हवे. पगारवाढ घेताना शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा होता. ही पगारवाढ स्वीकारताना शेतकऱ्यास विसरू नका ऐवढेच येथे मला सांगावेसे वाटते.
राजेंद्र घोरपडे

आली आषाढी

आली आषाढी आषाढी
जडली भाव भक्तीची कडी

दुमदुमु लागला विठ्ठल विठ्ठलाचा नाद
वारी वाटेवर गुंफला नामजपाचा निनाद

पावसाच्या सरींनी केले साफ मन
शुद्ध भक्तीची बीजे रोवली ध्यानात

नाभी एकवटली, टक स्थिरावली भूस्थानी,
कुंडलीनी झाली जागृत, झाले विठ्ठलाचे दर्शन

राजेंद्र घोरपडे,

Sunday, August 7, 2016

साने गुरुजींचे स्वातंत्र्य विचार

सहज साधनाची वेबसाईट चाळताना मला साधनेच्या पहिल्या अंकातील साने गुरुजींचा लेख वाचनात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झाल्यानंतर साधना साप्ताहिकाचा जन्म झाला. पहिल्या स्वातंत्र्यदिनीच पहिलाच अंक प्रकाशित केल्यामुळे साहजिकच देशाच्या स्वातंत्र्यावर यामध्ये संपादकीय लेख आहे. साने गुरुजींनी स्वातंत्र्य म्हणजे काय याचा विचार यामध्ये मांडला आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळूण सत्तरी गाठली तरी आपण साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य आणू शकलो नाही याची खंत वाटते.

स्वातंत्र्य म्हणजे संधी असे साने गुरुजी म्हणतात. विकासाची संधी प्रत्येकाला देण्यात यावी असे त्यांना वाटत होते. प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार द्यायला हवा. पण त्यांचा विचारातील संधी मिळू शकली नाही. सज्जन विचार नांदावेत असे त्यांना मनोमन वाटत होते. पण तसे घडले नाही. स्वातंत्र्य मिळाले फक्त इंग्रजी राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली. इतकाच बदल झाला. सत्ता बदलच झाला. फक्त व्यक्ती बदल झाला. असेच म्हणावे लागेल. लाच घेण्याचे प्रकार वाढले. राजकिय नेत्यांची मनमानी वाढली. कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा. पण तसे घडले नाही. राजकत्यांच्या अरेरावीने हळूहळू स्वकियांची राजवट परकिय वाटू लागली. साने गुरुजींनी रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. सध्या देशात सत्तेत असणाऱ्या सरकारनेही रामराज्य आणण्याची स्वप्ने आपणास दाखवली होती. रामाचे राज्य आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरुही असतील. पण ते त्यांच्यासाठीच एक आव्हान उभे राहीले आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी प्राणांची आहुती गेली तरी चालेल. विचार कधी मरत नाहीत. तो विचार जोपासणारे कोणी तरी उभे राहतेच. अखेर सत्याचाच विजय होतो. यासाठी लढत राहायला हवे. विचारांची चळवळ कधी संपत नाही. संधी देण्याचा विचार साने गुरुजींनी मांडला. पण संधीसाधूंचेच राज्य येथे आले. सध्या तर चांगल्या व्यक्तींनी राजकारणाची पायरीही चढू नये अशी स्थिती आहे. यावरुन संधी कोणाला मिळाली हे सांगण्याची मला येथे गरज वाटत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे संधी हा साने गुरुजींचा विचार लक्षात घेऊन मोदी सरकारने काम केल्यास रामराज्य आणणे शक्‍य आहे.

विकासाच्या संधी देऊन अहिंसक विचारांनी सरकारने काम केल्यास स्वातंत्र्यानंतर पाहिलेली स्वप्ने सत्यात आणणे शक्‍य आहे. सध्या आर्थिक दरी वाढली आहे. गरीब गरीबच होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती सरकारने विचारात घेऊन पाऊले उचलायला हवीत. वाढती आर्थिक दरी देशासाठी घातक आहे याचा विचार करुन समानता आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल याचा विचार आता सरकारने करायला हवा. त्यावर चिंतन करायला हवे.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असेही साने गुरुजी म्हणतात. सरकारने आर्थिक समानता आणण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवे. लोकमानस ओळखून कामे करायला हवीत. भाषिक वाद वाढत आहेत. प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. ती टिकवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते. हा विचार करुन भाषेचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. भाषेतून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलायला हवीत. विशेषतः सीमा भागात हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवत आहे. पण जनतेनेही संयम ठेऊन व्यवहार करायला हवेत. उगाच खोटी प्रतिष्ठा बाळगूण दुसऱ्यांना त्रास देणे योग्य होणार नाही. विकासासाठी राज्याचे तुकडे करणेही योग्य नाही. तुकडे केल्याने विकास साधता येईलही पण ते तुकडे एकमेकांशी भांडत राहतात याचाही विचार करायला हवा. एकत्र कुटूंब विभक्त झाले तर प्रत्येकाचा विकास होतो असे वाटते खरे पण विभक्त झाल्यानंतर विकासाच्या स्पर्धेतून वादही होतात. या वादातून नुकसानच अधिक होते याचाही विचार व्हायला हवा. भाऊ भावाचा खून करत आहे. राज्याचे तुकडे केल्यानंतर हे तुकडे एकमेकांशी भांडत राहणार याचाही विचार व्हायला हवा. सीमेचे वाद होतात, इंच इंच जमिनीसाठी वाद होतात. नोकरी, व्यवसायासाठी वाद होतात. लुट, हाणामाऱ्या वाढतात यातून विकास तो काय साधला जाणार हे ही विचारात घ्यायला हवे. यासाठी जबाबदारीने योग्य ती पाऊले उचलायला हवीत.

साने गुरुजींना स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे; स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, नैतिक भावना. असे वाटते. पण असा सतविचार घेऊन आपल्या देशातील कोणतेच सरकार आत्तापर्यंत काम करताना दिसले नाही. इतका सज्जनपणा दाखवणेही कोणाला जमले नाही. सज्जनपणाचे ढोंग करुन लुटारुंचे राज्य आपल्या देशात आले. चंगळवादाने देशाला पोखरले. मग याला स्वराज्य कसे म्हणायचे हाच मोठा प्रश्‍न आहे. कायदा कोणासाठी आहे हेच समजत नाही. राजकर्त्ये कायदा हातात घेऊन कामे करत आहेत. अशाने देशात शांती नांदेल असे कधीही शक्‍य नाही. पण स्वराज्यात सुराज्य आणणे शक्‍य आहे. हा विचार ठेऊन कामे केल्यास विषमता दुर करणे शक्‍य आहे. दुरावलेली मनेही जवळ आणणे शक्‍य होणार आहे. हा बदल केवळ समाजच घडवू शकतो. समाज विघातक कृत्ये करणारे एक टक्केही लोक नाहीत. सर्वच राज्यकर्त्ये वाईट आहेत असेही नाही. यासाठी समाजातील दहा टक्के लोकांनी एकत्र येऊन या एक टक्के लोकांना ताब्यात ठेवल्यास देशात रामराज्य आणणे शक्‍य आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार अशा संस्थांचा आवाज दाबत असेल तर त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही याचाही विचार व्हायला हवा. समाजाने अशांना धडा शिकवण्याची गरज आहे. पण आता कोण आवाज उठवणार. कोण चळवळ उभारणार. हे ही तिककेच महत्त्वाचे आहे. पण चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम सुरु केल्यास हे अशक्‍य नाही हे ही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य देशात कसे नांदवता येईल याचा आता विचार होण्याची गरज वाटते.

- राजेंद्र घोरपडे 

Saturday, August 6, 2016

अभिषेक

चिमणगाव पंधरा हजार लोकवस्तीचा गाव. पुरातन मंदिरे ही गावाची ओळख. रामाने वनावसाच्या काळात येथे वास्तव्य केले होते. यामुळे या गावाला विशेष महत्त्व. वनवासाच्या काळातच देशात मोठा दुष्काळ पडला होता. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू होती. पाऊस पडावा दुष्काळ दूर व्हावा अशी सर्वांची धारणा होती. पण देवाला याची दया येत नव्हती. अशावेळी चिमणगावातील जनतेने रामाकडे दुष्काळावर उपाय योजण्याची मागणी केली होती. लोकांचे होणारे हाल पाहून रामाने गावच्या डोंगरावर साधना केली व ब्रह्मास्त्राने येथे लिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. डोंगरावर मारलेल्या बाणाने येथे कायम स्वरूपी झरा निर्माण झाला. हा झरा दुष्काळातही कायम वाहत असतो. या पाण्यामुळे परिसरात कायम हिरवाई बहरलेली असते. या हिरवाईत चिमण्यांचा चिवचिवाट सतत ऐकायला मिळतो. यावरून येथे वसलेल्या या गावाला चिमणगाव असे नाव पडले, असेही येथील लोक सांगतात. असे हे डोंगरकपारीत वसलेले चिमणगाव भक्तीचे केंद्र झाले आहे. शांत वातावरणामुळे आणि विविध गुहांमुळे साधनेसाठी अनेक भाविक येथे येतात. वड, पिंपळासारखे मोठे वृक्ष, विविध वनौषिधींनी नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी एक वेगळे आकर्षण आहे. कोण साधनेसाठी येथे येतो तर कोण मंत्रोच्चारासाठी येथे येतो.

दर सोमवारी येथे ॐ नमो शिवायः चा जप दिवस-रात्र होतो. मंत्रोच्चराच्या काळात अनेक भाविक येथील शंकराच्या मुर्तीवर व पिंडीवर दुधाचा अभिषेक घालतात. येथे दूध घातल्याने मन स्वच्छ होते असेही मानले जाते. मनातील सर्व अस्वच्छ विचारनाहीसे होतात. स्वच्छतेसाठीच अभिषेक असे त्याचे महत्त्व आहे. आता दुधा सोबत तांदूळही पिंडीवर टाकला जात आहे. या दूध, तांदळाचा सडाच पडलेला परिसरात
पहायला मिळतो. अभिषेकाच्या दुधाचा पाट शेवटी गटारीला मिळतो. याकडेही कोणाचे लक्ष नाही. यामुळे मंदिर परिसरात एक दुर्गंधी पसरली आहे तरीही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. भक्तीच्या नावे अशुद्धता येथे होते आहे. असेही कोणाला वाटत नाही. शिव...शिव...करत दुसऱ्याचा स्पर्श झाला तरी घरात जाऊन अंघोळ करणाऱ्या भक्तांनाही अभिषेकाने पसरलेली दुर्गंधी दिसत नाही. मंदिर ऐतिहासिक असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे. व्यापारी मात्र दूध, तांदळाचा व्यापार वाढविण्यावरच भर देत आहेत. पर्यटकांना दूध, तांदळाचे महत्त्व सांगून त्यांच्या गळी हा अभिषेक उतरवत आहेत. व्यापाऱ्यांच्या या फायद्याने ही ऐतिहासिक वास्तू गलिच्छ झाली आहे. याचेही भान कोणाला नाही. प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. भाविकांच्या भक्तीपुढे सारेच हतबल झाले आहेत. या दुर्गंधीने गावात डास पसरले. या डासांतूनच आता डेंगुची साथही गावातआली. साथीच्या रोगाचा प्रसार सतत होऊ लागला. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमूळे या ठिकाणाचे पावित्र्य धोक्‍यात आले. रोगराईमुळे पाहता पाहता पर्यटकांचा ओघही घटला. व्यापाऱ्यांचा धंदा बुडाला. व्यावसायिकांचे उत्पन्न थांबले. सारा चिमणगावच ओस पडला. गावावर अवकळा आली. हे सर्व एका अभिषेकाने झाले.

या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावण्यात आली. यामध्ये तरुण, सुशिक्षित - अशिक्षित सर्वच यामध्ये सहभागी झाले. अभिषेकामुळे ही दुर्गंधी पसरते यावर ग्रामसभेत एकमत झाले. पण अभिषेक बंद कोण करणार हा मोठा प्रश्‍न होता. यासाठी अभिषेकावर अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा असे ग्रामसभेत ठरले. तरुणांनी अभिषेकावर अभ्यास सुरू केला. अभिषेक दुधाचाच का? यावरही आता पुस्तके, ग्रंथ चाळले जाऊ लागले. एकात उत्तर मिळाले. दुधाने मुर्ती स्वच्छ होते. स्वच्छतेसाठी दुधाचा वापर केला जातो. मूर्ती स्वच्छ राहावी यासाठी अभिषेक घालण्यात येतो. पण काळाच्या ओघात ही गोष्ट लोक विसरले आहेत. फक्त स्वच्छ होण्यासाठी आवश्‍यक तेवढे दुध मूर्तीवर न ओतता. प्रमाणा बाहेर याचा वापर होऊ लागला आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात वापरावी लागते. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला तर त्याचा दुरुपयोग होतो. येथे हेच तर झाले आहे. हे तरुणांच्या लक्षात आले. अभ्यासातून काढण्यात आलेला निष्कर्ष अखेर ग्रामसभेत मांडण्यात आला. काही धर्मांध व्यक्तींनी हा निष्कर्ष मान्य केला नाही. याला विरोध दर्शिवला पण स्वच्छतेच्या प्रश्‍नी सर्वांनी पाठींबा दर्शिवला. ग्रामसभेत मंदिरातील इतर स्वच्छतेवरही चर्चा झाली. मूर्तीवर तांदूळ टाकले जातात. मंदिरा बाहेर नारळ फोडण्यात येतो. त्यातील पाणीही वाया जाते. या पाण्यानेही परिसरात अस्वच्छता होत आहे. येणारे पर्यटक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. वेफर्स, कुरकुरेच्या तयार पॅकेटमुळेही प्लास्टिकचा कचरा परिसरात होत आहे. या अशा अस्वच्छतेच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. देवाचे मंदिर हे पवित्र ठिकाण. अशा परिसरात अस्वच्छता योग्य नाही. कोणताही धार्मिक विधी हा स्वच्छ आचार, विचारासाठी असतो. स्वच्छतेचा विचार, मन शुद्धीचा विचार सांगणारे हे ठिकाण अस्वच्छ असणे योग्य नाही. यासाठी स्वच्छता, शुद्धी
हेच अध्यात्म जोपासण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. मंदिरात स्वच्छतेसाठी विविध उपाय योजना करणाचे ठरले. यात मुख्य म्हणजे अभिषेकामुळे होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी अभिषेक बंद करण्यात झाला. मूर्तीच्या स्वच्छतेसाठी आवश्‍यक तेवढेच दूध अभिषेकासाठी वापरून उरलेले दूध संकलित करण्याचा निर्णय झाला. हे संकलित झालेले दूध गरजूंना, वृद्धश्रमांना, अनाथांना देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले. तरुण मंडळांनी याकामी पुढाकार घेतला. मूर्तीवर टाकण्यात येणारे तांदूळही गोळा केले जाऊ लागले. तेही अनाथ आणि वृद्धाश्रमांना देण्याचा निर्णय झाला. नारळ फोडल्यानंतर त्याचे टाकून देण्यात येणारे पाणीही गोळा करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना वाटण्याचे ठरले. प्लास्टिकचा वाढता कचरा विचारात घेऊन प्लास्टिक
वापरावर मंदिर परिसरात बंदी घालण्यात आली. या सर्व कामांसाठी गावातील तरुण मंडळे पुढे आली. देवस्थानच्या विेशस्तांनीही याकामी पुढाकार घेतला. श्रावणातील पहिल्या सोमवारी याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. यासाठी जनतेचे प्रबोधन करणारे फलक जागोजागी लावण्यात आले.
नेहमीप्रमाणे श्रावणातल्या या सोमवारीही दर्शनासाठी गर्दी झाली. येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन करणे हे मोठे आवाहन तरुण मंडळा समोर होते. कोणी उद्धट उत्तरे देत होते. कोणाला हा विचार पटला नाही. त्यांनी दूध घरी नेले. तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला. पण ग्रामसभेच्या निर्णयामुळे व स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्याचे कारण सांगून भाविकांत जागृती करण्यात आली. मनात शुद्ध विचार असेल, बोलण्यात मृदुता असेल तर कोणाचेही प्रबोधन सहज करता येते. तरुणांनी सर्वांच्या भावनांचा विचार करत. सर्वांचा मान ठेवत कार्य केले.

नम्रपणे केलेली विनंती शत्रूतही बदल घडवते. तसाच बदल आता या मंदिराच्या आवारात घडला. जणूकाय चमत्कार वाटावा असे ते वातावरण होते. जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांनी मोठे प्रबोधन केले. माणसांना स्वच्छतेचे महत्त्व यातून सांगण्यात आले. स्वच्छता असेल तरच देवाची वस्ती तेथे असते. देव मंदिरात राहावेतयासाठी मनासह परिसराची स्वच्छता करा. असा संदेश वारंवार भाविकांच्या मनावर बिंबवण्यात आला. अध्यात्मात असणारे स्वच्छतेचे महत्त्व वारंवार सांगण्यात आले.

स्वच्छतेचे हे सोमवार आता नियमित सुरू झाले. गावातील इतर मंदिरातही हाच उपक्रम राबविण्यात येऊ लागला. गावातील सारी मंदिरे स्वच्छ झाली. तसा गावही स्वच्छ झाला. परिसरातील स्वच्छता पाहून येणारे पर्यटकही गावाची वाहवा करू लागले. गावाचा हा आदर्श आता इतर गावांनीही घेतला आहे.

Friday, August 5, 2016

सद्गुरु मला सांगा

सद्गुरु, मला सांगा
मला सांगा मी तुमची कशी प्रार्थना करु
मला सांगा मी तुम्हाला कोणत्या नावाने पुकारु
मला सांगा मी तुम्हाला कसे ओळखू
मला सांगा मी तुम्हाला कसे पारखू
मला सांगा मी तुम्हाला कसे भेटू
सद्‌गुरु म्हणे सोपे आहे,
माझा आध्यात्मिक आत्मा तुझ्यातच पाहा

- राजेंद्र घोरपडे

आध्यात्मिक शांती

प्रोटॉन्सवर भार धन, इलेक्‍ट्रॉन्सवर भार ऋण
भाराविना न्युट्रॉन्स, या सर्वांच्या वर्तुळाचा होतो अणू
श्‍वास आतमध्ये जाताना "सो' तर बाहेर पडताना "हम'
मनाची एकाग्रता या सर्वांच्या वलयातून होते अध्यात्म
अणुच्या उर्जेतून घडवला जातायेत विघातक स्फोट
तर अध्यात्माच्या उर्जेतून आत्मज्ञानाचे पाठ
हिसाचार विज्ञानाचा,
कि शांती अध्यात्माची
- राजेंद्र घोरपडे

Tuesday, August 2, 2016

सर्वांचा आत्मा एकच

सद्गुरु म्हणे
आंबा, वड, चंदन, बाभूळ
या वृक्षांचे गुणधर्म वेगळे
आंबाच्या फळांची गोडी न्यारी,
तर थकलेल्या वाटसरुस वडाचा आधार
काटेरी बाभूळाचे कुंपण सुरक्षित
तर चंदनाच्या वासाने मिळतो आनंद जीवनात
पण या सर्व वृक्षांचा अग्नी एकसारखाच
तसे वेगवेगळी विचारसरणी माणसांची
पण त्या सर्वांचा आत्मा मात्र एक सारखाच
- राजेंद्र घोरपडे, 9011087406

Monday, June 27, 2016

सावध रे सावध

सावध रे सावध
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ।।
आज संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरकडे रवाना होत आहेत. ग्यानबा तुकारामाच्या गजराने पुणे जिल्ह्याचा परिसर दुमदुमुन निघतो. अध्यात्माच्या प्रगतीसाठी निघालेले वारकरी एकमेकाला सावध करत पुढे चालत असतात. जा मार्गावरुन ही दिंडी निघते त्या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांनारेही या अध्यात्माच्या गजराने सावध होतात. पालखीचा हा सोहळा पाहून रस्त्याने जाणारा वाटसरूही त्याचे दुःख विसरतो. त्याच्यातील दुष्टभाव नाहीसा होऊन त्याच्या विचारात चांगुलपणाचा अंकुर फुटतो. इतके सामर्थ या पालखीच्या दर्शनाने होते. सर्वत्र प्रसन्नता, आनंद या वारी मार्गावर ओसंडून वाहात असतो. या प्रसन्नतेला येणारा-जाणारा वाटसरुही सावध होतो. त्याच्या मनालाही प्रसन्नता लाभते. नकळत त्याच्यातही बदल होतो. हा बदल त्याला जरी जाणवत नसला तरी त्याचे महत्त्व तो अनुभवत असतो. ही अनुभूती त्याला येत असते. फक्त त्याचे अवधान त्याने जागृत ठेवायला हवे. वारीची दृष्ये पाहणारेही या जयघोषाने प्रसन्न होऊन जातात. संतांच्या या आनंदाच्या डोहात आपणही डुंबायला हवे. वारीच्या या निमित्ताने आता आपणही सावध होऊ या. अध्यात्मात सावधानतेला महत्त्व आहे. युद्धाच्याक्षणी सैनिक एकमेकाला सावध करतात. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एकमेक सावध होत पुढे वाटचाल करतात. तसा आपणही सावध होत आपल्या शरीरातील अवयवांना सावध करत साधनेसाठी सज्ज व्हायला हवे. तन-मनास सावध करुन साधनेवर लक्ष केंद्रित करायला हवे. वारीतून तनाला आणि मनाला मिळणारी प्रसन्नता साठवून त्याचा वर्षभर उपयोग करायला हवा. पावसाळा चारच महिन्यांचा असतो. पण आता तर तो एक-दीड महिनाच पडतो. पावसाळ्यात पडणारे पाणी उन्हाळ्यात आपणास उपयोगी पडावे यासाठी आपण ते साठवून ठेवतो. धरणे, तलाव, पाणलोट विकास हा यासाठीच केला आहे. भूजलाच्या पातळीतही वाढ व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. भूगर्भाचे पुर्नभरण आपण करत आहोत. जणेकरुन उन्हाळ्यातही आपणस पाणी कमी पडू नये. तसे वारीचे हे दहा-बारा दिवस आनंद-प्रसन्नतेचा असतात. ही प्रसन्नता आपण साठवून ठेवायला हवी. याचा वापर वर्षभर करायला हवा. उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला हवी. ती आपल्या शरीरात साठवायला हवी. तनात मनात ती उर्जा कायम राहायला हवी. ही उर्जा साठवण्यासाठी आपण सावध व्हायला हवे. तनाला मनाला सावध करायला हवे. वर्षभर येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मनाला खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ मिळावे यासाठी ही उर्जा साठवायला हवी. यासाठीच वारीच्या प्रसन्न वातावरणात डुंबायला हवे. मन मोकळेपणाने त्यात सहभागी व्हायला हवे.

Saturday, June 4, 2016

अक्षर

तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित ।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ।। 32 ।। अध्याय 12 वा


सोऽहं हे अक्षर आहे तरी काय? सोऽहं हा स्वर आहे. आपण श्‍वास आत घेतो तेव्हा सो तर श्‍वास बाहेर सोडतो तेव्हा हम्‌ हा स्वर उत्पन्न होतो. श्‍वास आत बाहेर घेण्याची ही क्रिया म्हणजे सोऽहम्‌. साधनेत हेच तर करायचे असते. श्‍वास आत बाहेर घेण्याच्या या क्रियेवर मन केंद्रित करायचे असते. मन या स्वरात मिसळायचे असते. सोऽहं हे अक्षर असे आहे. आपला जन्म होतो तेव्हापासून ते आपला मृत्यू होईपर्यंत हाच तर जप सुरू असतो. समस्त जिवांचा हाच तर प्राण आहे. यासाठीच समस्त जिवात मी सामावलो आहे. मी म्हणजे हा सोऽहं सामावला आहे. प्रत्येक मानवामध्ये तो आहे. हा सोऽहं जो आत्मा आहे. तो या शरीरात आला आहे. जन्म झाल्यानंतर तो शरीरात येतो. मृत्यू पावल्यानंतर तो शरीरातून जातो. देहात आला असल्याने आपण त्याला नाव देतो. पण प्रत्येकाच्या देहात तो आहे. या देहात वेगळा, त्या देहात देहात वेगळा असा भेदभाव नाही. त्याला मरण नाही. तो अमर आहे. अविनाशी आहे. इंद्रियात येतो पण इंद्रियापासून तो वेगळा आहे. सोऽहं हा स्वर आहे त्यामुळे तो दिसत नाही. पण तो कानाने ऐकायचा असतो. मन त्याच्यावर नियंत्रित करायचे असते. डोळ्यांची नजर त्याच्यावर केंद्रित करायची असते. त्याला वास नाही, गंध नाही त्यामुळे त्याची जाणीव ही स्वरांनीच अनुभवायची असते. आपण म्हणजे कोण आहोत ? आपणाला नाव आहे पण ते आपण नाही. ते देहाचे नाव आहे. मग आपले खरे स्वरूप काय आहे? श्‍वास हेच आपले खरे स्वरूप आहे. आपण म्हणजे श्‍वास आहोत. श्‍वासातील स्वर सोऽहं. हे आपले खरे स्वरूप आहे. हे आपण ओळखायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. ते अनुभवायला हवे. त्याची अनुभूती यायला हवी. अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सोऽहं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले तो ज्ञानी. ज्याने याचा अनुभव घेतला तो ज्ञानस्वरुप होतो. ज्याला याचा बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. अमरत्वाला पोहोचतो. कारण सोऽहं हे अक्षर अमर आहे. अविनाशी आहे. यासाठी या भावनेने सोऽहं ची साधना करायला हवी. उपासना करायला हवी. म्हणजे आपणही आत्मज्ञानी होऊ. आपणही त्याचा बोध घ्यायला शिकले पाहिजे. हेच अध्यात्म आहे. अध्यात्म हे याच अक्षरात सामावले आहे. या अक्षरातच सर्व विश्‍व सामावले आहे. यामुळेच या विश्‍वस्वरुप अक्षराची उपासना करायला हवी. सर्व सचिवांची अनुभूती या अक्षरातून घ्यायला हवी. 

Saturday, May 7, 2016

वडिलोपार्जित वसा जपण्याचा हसूरच्या डॉक्‍टरांचा ध्यास


वडिलोपार्जित शेती टिकवून ठेवायची, विकायची नाही, याच उद्देशाने गेली २४ वर्षे डॉ. सचिन कुलकर्णी (हसूरकर) शेती करीत आहेत. हसूर (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे त्यांची शेती आहे. कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसाय सांभाळत गावाकडची शेतीही ते पाहतात. पीक उत्पादनवाढीचे प्रयोग करीत डॉ. सचिन कुलकर्णी यांची शेतीमधील वाटचाल सुरू आहे. 

राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर शहरातील डॉ. सचिन विनायक कुलकर्णी (हसूरकर) हे व्यवसायाने त्वचारोगतज्ज्ञ. करवीर तालुक्‍यातील हसूर हे त्यांचे मूळ गाव. हसूर आणि बाटणवाडी परिसरात त्यांची वीस एकर बागायती आणि चार एकर डोंगराळ शेती आहे. बाकीची शेती जिरायती आहे. वडिलोपार्जित शेती असल्याने लहानपणापासूनच डॉक्‍टरांना पीक पद्धतीची माहिती होती. डॉक्‍टरांचे आजोबा काशिनाथ हरी कुलकर्णी हे भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. या भागातल्या शेतकऱ्यांना आजोबा मार्गदर्शन करत. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे डॉ. सचिन यांना शेतीची आवड निर्माण झाली. आजोबा त्याकाळी चांगल्या पद्धतीने गुऱ्हाळही चालवत. परंतु कारखाना सुरू झाल्यानंतर गुऱ्हाळ बंद झाले. आजोबांच्या इच्छेपोटी डॉ. सचिन यांचे वडील डॉ. विनायक हेसुद्धा डॉक्‍टरी व्यवसाय सांभाळत शेती पाहत होते. त्यांचाच वारसा आता गेली २४ वर्षे डॉ. सचिन चालवत आहेत.
शेती नियोजनाबाबत डॉ. कुलकर्णी म्हणाले की, वीस एकर बागायत शेती ही पाच ठिकाणी विभागलेली आहे. विविध ठिकाणची शेती पाहणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शेताचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यासाठी मी वाटेकरी नेमले आहेत. वाटेकऱ्यांच्यामुळे शेती टिकून चांगले उत्पादनही मिळत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाबरोबरच आठ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधानही मिळते. शेतात उत्पादित होणारा चारा वाटेकरी त्यांच्या जनावरांसाठी वापरतात. काही वाटेकरी उसात चाऱ्यासाठी मक्‍याची लागवड करतात. या बदल्यात या वाटेकऱ्यांकडून शेतीस लागणारे शेणखत मिळते. वैद्यकीय व्यवसायामुळे आठवड्यातून दोन दिवस शेतीच्या नियोजनासाठी वेळ मिळतो. त्या वेळी शेतीमधील अडचणी आणि उपायांबाबत वाटेकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा होते.
डॉ. कुलकर्णी यांनी प्रयोग परिवाराचे डॉ. श्रीधर दाभोळकर यांच्या मार्गदर्शनानुसार गांडूळ शेतीचा प्रयोग केला होता. शेतामध्येच गांडूळखत तयार केले. ठराविक आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये शेणखत आणि ऊस पाचट कुजवून त्यामध्ये गांडुळे सोडली. खत तयार झाल्यावर हे खत शेतामध्ये मिसळून भुईमुगाचे चांगले उत्पादन घेतले. जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर ते करतात. प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला त्यांना शेतीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरतो. डॉ. कुलकर्णी यांची काही शेती काळवट, पाणथळ आहे. जमिनीत पाणी साचून राहत असल्याने पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. हे विचारात घेऊन त्यांनी या क्षेत्रामध्ये मुरमाड माती मिसळली. जमिनीचे सपाटीकरण केले. त्याचा पुढे पीक उत्पादनासाठी फायदा होणार आहे.

रोप पद्धतीने ऊस लागवड ः 

डॉ. कुलकर्णी यांच्या शेतामध्ये मुख्यतः ऊस, भात, भुईमूग पिकांची हंगामनिहाय लागवड असते. पूर्वी ते उसाची पारंपरिक पद्धतीने लागवड करीत होते. पण बऱ्याचदा पिकाची व्यवस्थित वाढ होत नव्हती. यावर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने रोप पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. चार फुटाची सरी ठेवून को- ८६०३२ आणि को-९२०५ या जातीच्या रोपांची लागवड सुरू केली. कांड्याने लागवड केलेल्या उसाचे एकरी उत्पादन ३० ते ३५ टनांपर्यंतच येत होते. आता रोप लागवडीमुळे ५० टनांपर्यंत पोचले आहे. खोडव्याचे उत्पादन ३५ टनांपर्यंत मिळते. रोप लागवडीमुळे दोन महिन्यांचा कालवधी आणि खर्चही वाचला. रोपांमध्ये मर कमी असल्याने वाढ चांगली होते. आलेल्या उत्पन्नातील जमिनीसाठीचा चौथाई हिस्सा डॉक्‍टर घेतात. उरलेले ७५ टक्के उत्पन्न निम्मे-निम्मे विभागून घेतले जाते. मशागतीपासून कापणीपर्यंतचा सर्व खर्च डॉक्‍टर स्वतः करतात. सर्व खर्च वजा जाता आणि वाटेकऱ्यांचा हिस्सा वजा जाता उसातून एकरी २० हजार रुपये मिळतात. ऊस काढल्यानंतर त्या शेतात भात लागवड केली जाते किंवा रान पड ठेवले जाते. भात पिकासाठी लागणारा सर्व खर्च डॉक्‍टर करतात. भाताच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकरी ३० क्विंटल भात उत्पादन त्यांना मिळते. त्यातील निम्मे-निम्मे उत्पादन वाटून घेतले जाते. येत्या काळात पाणीटंचाई लक्षात घेऊन सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे त्यांचे नियोजन आहे.

बांधही देतो उत्पन्न 

डॉक्‍टरांनी शेतीच्या बांधावर शेवगा, आंबा, नारळाची लागवड केली आहे. यातूनही त्यांना उत्पन्न मिळते. डॉक्‍टरांच्या आजोबांनी लावलेल्या हापूस, पायरी आंब्याचे उत्पादन आजही त्यांना मिळते. फळझाडांची योग्य निगा राखली, तर उत्पादन नियमित मिळते, हा डॉक्‍टरांचा अनुभव आहे. झाडांना आळे करून खते, पाणी नियमित देत असल्याने आजही ही फळझाडे चांगले उत्पादन देतात.

अवजारे, ट्रॅक्‍टरची खरेदी 

बागायती शेती असल्याने वारंवार शेती अवजारे आणि ट्रॅक्‍टरची गरज भासते. शेती मशागतीची कामे वेळेवर झाली नाहीत, तर उत्पादनावर परिणाम होतो. मशागतीसाठी वेळेवर ट्रॅक्‍टर, अवजारेही मिळत नाहीत. वारंवार भेडसावणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी ट्रॅक्‍टर आणि शेती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या अवजारांची खरेदी केली. त्यामुळे शेती नियोजनाचे काम सोपे झाले. वेळेची बचत झाली.

रुग्ण देतात पीक व्यवस्थापनाच्या टिप्स 

डॉ. सचिन कुलकर्णी हसूर गावातही प्रॅक्‍टिस करतात. त्या वेळी अनेक रुग्ण त्यांच्या पीक व्यवस्थापनाची चौकशी करतात. रुग्णांसोबत डॉक्‍टरही स्वतःच्या शेतीतील प्रश्‍नांवर चर्चा करतात. उसामध्ये हुमणी आणि लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता, तेव्हा डॉक्‍टरांनी औषधोपचारासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडूनच उपाययोजना जाणून घेतल्या. त्यानुसार नियोजन केल्याने पिकाचे नुकसान कमी झाले. वेळोवेळी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला पीक व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरतो आहे.

संपर्क ः डॉ. सचिन कुलकर्णी (हसूरकर) ः ९८२२६८१०२६