Saturday, June 27, 2015

"निसर्ग मित्र' जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील "निसर्ग मित्र' ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा जपत या संस्थेने गाव परंपरेचा अभ्यास करत त्या जपल्या जाव्यात, यासाठी राबविलेले उपक्रम ग्रामविकासाला मार्गदर्शक आहेत. 

राजेंद्र घोरपडे

सन 1980 च्या प्रारंभी पक्षी निरीक्षण, जंगल भ्रमण, वृक्षारोपण, परसबाग आदींच्या छंदातून कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र आल्या. यात अनेकांनी पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार मांडला. यातूनच "निसर्ग मित्र' या संस्थेची संकल्पना सुचली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले यांनी 1982 मध्ये ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये डॉ. जय सामंत, वसंतराव शिरगावकर, डॉ. पुष्पा बेर्डे, वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन, डॉ. विजय करंडे, आदम मुजावर, शेखर पडळकर आदींचा सहभाग होता. सन 1998 मध्ये डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी निसर्ग मित्रतर्फे विविध उपक्रम सुरू केले. संस्थेतर्फे रंकाळा बचाव, पंचगंगा प्रदूषणाबाबत जागृती, सह्याद्री बचाव, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, वृक्ष दत्तक उपक्रम, नैसर्गिक रंग निर्मिती प्रकल्प, देवराया वाचविण्यासाठी मोहीम आदी विविध चळवळी राबविल्या जातात. अशा विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाते. केवळ गप्पा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून प्रबोधन हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेमध्ये कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन समिती, हरितसेना, कोल्हापूर जिल्हा बांबू मिशन हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

रानभाज्यांचे बीजसंवर्धन ः
पावसाच्या पाण्यावरच रानभाज्या येतात. पण केवळ पावसावर रानभाज्या येतात की त्याची लागवडही केली जाऊ शकते, याबाबत निसर्ग मित्रतर्फे विविध प्रयोग सुरू आहेत. यासाठी परसबाग कार्यशाळा संस्थेतर्फे घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 30 कुटुंबांना 30 प्रकारच्या रानभाज्यांचे बियाणे देण्यात आले. भारंगी, टाकाळा, काटेमाठ, राजगिरा, कुरडू, घेटूळी (पूनर्नवा), वाघाटी, केना, आघाडा, तांदळी, वायवर्णा, चांगेरी (आंबुशी), रानउडीद, घोळ, भोकर, गुळवेल आदी रानभाजांचा यामध्ये समावेश आहे. या भाजांची लागवड परसबागेत, टेरेसवर करून त्याचे उत्पादित बीज इतर 29 कुटुंबांना वाटले जाते. जेणेकरून सर्वांकडे या रानभाज्यांच्या बीजाचे संवर्धन होते. बचत गटाच्या माध्यमातूनही रोपवाटिका करून रानभाज्यांच्या बीजसंवर्धनाचेही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

देशी वृक्षांचे बीज संकलन
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने (22 एप्रिल) दरवर्षी वनौषधी बिया, स्थानिक पारंपरिक जातीची बियाणे जमा करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येते. बेल, शेंद्री, जांभूळ, बकुळ, कडिपत्ता, रिठा, सीताअशोक, जारुळ, बहावा, पारिजातक, सोनचाफा अशा विविध सुमारे 40 प्रकारच्या वृक्षांचे बीज गोळा केले जाते. बीज गोळा करण्याबाबत शास्त्रीय माहिती संस्थेतर्फे देण्यात येते. यंदाच्या वर्षी सुमारे तीन लाख बिया गोळा झाल्या. या बिया विविध गटांमध्ये वाटून त्याची रोपे तयार करण्यात आली. उर्वरित बियाणे सामाजिक वनीकरण विभागाकडे संवर्धनासाठी दिले जाते. या उपक्रमातून स्थानिक जैवविविधता जोपासली जात आहे.

नैसर्गिक रंगाची निर्मिती
रंगपंचमीमध्ये नैसर्गिक रंग वापरले जावेत, यासाठी त्यांची निर्मिती आणि प्रबोधन संस्थेतर्फे केले जाते. संस्थेने पळस, काटेसावर, पांगिरा, बेल, पारिजातक, बहावा, मेहंदी, शेंद्री, हिरडा, बेहडा, झेंडू, गुलाब, खैर, नीलमोहर, जास्वंद अशा 23 झाडांचा अभ्यास केला. यांच्या फुलापासून नैसर्गिक रंगही तयार केले. निर्माल्यातून तसेच हार विकणाऱ्यांच्याकडून टाकाऊ फुलातूनही नैसर्गिक रंग तयार करण्यात आले आहेत. वनस्पतीजन्य रंग निर्मितीसाठी आदर्श बचत गटाच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.

सौरऊर्जेवर चूल
संस्थेचे सदस्य पराग केमकर यांनी सौरऊर्जेच्या चुलीचे विविध प्रकार तयार केले आहेत. गिफ्ट पेपर आणि पुठ्ठ्याच्या मदतीने ही सौर चूल करता येते. या सौर चुलीसाठी अन्न शिजविण्यासाठी दोन डबे लागतात. साधारणपणे पाचशे रुपयांत ही चूल तयार होऊ शकते. गिफ्ट पेपरऐवजी रेडियम पेपर व फायबरचा पुठ्ठाही वापरून टिकाऊ चूल तयार करता येऊ शकते. सौर चूल तयार करण्यासाठी साधनसामग्रीनुसार सुमारे 100 ते 1200 रुपये खर्च येतो. वर्षातील दोनशे दिवस ही चूल वापरून खाद्यपदार्थ शिजविता येतात. यामुळे सिलिंडरचा खर्च वाचतो, पर्यावरणाचे संरक्षण होते. ही चूल फ्लोडिंगची असल्याने कोठेही नेता येऊ शकते. प्रकाशवर्षाच्या निमित्ताने या चुलीचा प्रसार करण्याचे कार्य निसर्गमित्र संस्थेने हाती घेतले आहे. ही चूल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. आत्तापर्यंत सुमारे सातशे जणांनी ही सौर चूल तयार करून वापरही सुरू केला आहे.

संस्थेचे विविध उपक्रम ः
  •  दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नका? हा संदेश दिला जातो. तसेच या सुटीमध्ये फटाके न उडविणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते. फटाक्‍यांवर होणाऱ्या वायफळ खर्चातून ही सहल होते. 
  • जलप्रदूषण रोखण्यासाठी नैसर्गिक रंगाने रंगविलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून संस्था राबवीत आहे. 
  • "कचरा व्यवस्थापन' याविषयी जागृती करण्यासाठी शिवछत्रपती यांच्या कचराविषयीच्या आज्ञापत्राची आकर्षक पत्रके करून शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, तरुण मंडळे यांना देऊन प्रबोधन केले जात आहे. 
  • कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण. 
  • कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन. 

देवराया वाचवूया उपक्रम ः
संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील देवराया संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील 250 च्यावर देवरायांचा अभ्यास संस्थेने केला. या देवरायांची वैशिष्ट्ये जाणून घेतली. देवराईमध्ये असणाऱ्या जैवविविधतेची माहितीही स्थानिकांना दिली जाते. "देवराया वाचवूया, श्रद्धावने तयार करूया' या उपक्रमाअंतर्गत देवरायातील वृक्षांचे बी गोळा केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या रोपांची लागवड परिसरात केली जाते. भारतीय संस्कृतीतील विविध सणांसाठी लागणारे वड, आपटा, बेल, कडुलिंब आदी वृक्षांची लागवड केली जावी, यासाठी प्रबोधनाबरोबरच प्रयत्नही केले जातात.

वैशिष्ट्यपूर्ण देवराया ः
  • पाल देवराई ः भुदरगड तालुक्‍यातील पाल येथील देवराईमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. येथील वृक्षांचा विस्तार मोठा असल्याने परिसरात गारवा राहतो. या वृक्षांच्या डोलीत घुबड, वेडाराघू, ससाणे, दयाळ आदी पक्षांचे वास्तव्य आहे. 
  • आंबेश्‍वर देवराई ः शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा येथे पाच एकरांत ही देवराई आहे. येथे कासा, सोनचाफा, आंबा, पिंपर्णी, वड, किंजळ, बांबू, सातवीण, कदंब, कुंकुफळ असे विविध वृक्ष आहेत. ही देवराई वनौषधीने बहरलेली आहे. 
  • कुरकुंभेश्‍वर देवराई ः यात्रेमध्ये कोंबडे देण्याची प्रथा अनेक गावांत असते. पण आजरा तालुक्‍यातील पेरणोली येथील करकुंभेश्‍वर देवराईमध्ये मात्र जिवंत कोंबडे सोडण्याची प्रथा आहे. या देवराईमध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांना खाद्य म्हणून गावकरी कोंबडे सोडतात. वन्यप्राणी भक्षासाठी गावात प्रवेश करू नयेत, हा या मागचा हेतू आहे. 

शेवगा महोत्सव ः
शेवगा खाल्ल्याने क्षारधर्म वाढतो. यासाठी पावसाच्या सुरवातील शेवग्याची भाजी खावी असे शास्त्र आहे. याबाबत प्रबोधनासाठी दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात (मृग नक्षत्राच्या प्रारंभी) शेवगा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये शेवग्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. शेवग्याचे सूप, भजी, कढी, आमटी, वडी, थालीपीठ, झुणका, शेवगा फ्राय, चटणी, कटलेट, अशा विविध 63 प्रकारच्या पाककृती या महोत्सवात दाखविल्या जातात.


संपर्क ः 9423858711 अनिल चौगुले (कार्यवाह, निसर्ग मित्र)



Saturday, June 6, 2015

आनंद'दायी शेतीतून मिळतेय समाधान

शहरातील धकाधकीच्या जीवनात आनंदासाठी आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे सर्वांनाच वाटते. पर्यटन केंद्रावर जाण्यापेक्षा घरच्या शेतावरच जाऊन निसर्गाचा आनंद का घेऊ नये? या उद्देशाने कोल्हापूरातील डॉ. आनंद गुरव यांनी वडिलोपार्जित शेतीशी नाते जोडून घेतले. यामुळे दैनंदिन कामातून थकवा दूर होतो आणि काही प्रमाणात उत्पन्नही मिळते.
राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरातील रंकाळा रोडवर डॉ. आनंद गुरव यांचा दवाखाना आहे. डॉ. गुरव हे बालरोगतज्ज्ञ असून, 2005 मध्ये त्यांनी कोल्हापुरात दवाखान्यास सुरवात केली. गगनबावडा तालुक्‍यातील असंडोली हे डॉ. गुरव यांचे मूळगाव. वडिलोपार्जित शेतीतील चार एकर शेती डॉ. आनंद यांच्या वाट्याला आली. घरची शेती विकली तर गावाशी असलेली ओळखच नाहीशी होईल, या हेतूने त्यांनी स्वतःची शेती जोपासण्याचा निर्णय घेतला; पण वैद्यकीय व्यवसायातून वेळ कसा मिळणार, हाच मोठा प्रश्‍न होता. यासाठी त्यांनी शेती भागाने लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतीचे नियोजन सोपे गेले. त्याचबरोबरीने शेती विकासाच्या नवनवीन कल्पना राबविण्याची संधीही मिळाली. असंडोली परिसरातील जांभळी नदीच्या काठावर डॉ. आनंद यांची शेती आहे. निसर्गरम्य परिसर आणि कोदे येथील पाटबंधारे प्रकल्पामुळे पाण्याची मुबलकता या भागात आली आहे. यामुळे बागायती शेत विकण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. उलट विविध पीक पद्धतीचे नियोजन त्यांच्या डोक्‍यात येऊ लागले.
या परिसरातील स्वच्छ हवा, बाराही महिने हिरवागार निसर्ग सर्वांना खुणावत राहतो. शहरातील धकाधकीच्या जीवनात थोडीशी विश्रांती आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी अशा निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे डॉ. आनंद यांना मनोमन वाटते. यातूनच त्यांनी शेतीच्या नियोजनात लक्ष घातले. घरच्या चार एकरांच्या शेतीत डॉ. आनंद ऊस, उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल, मका, काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातून शेती व्यवस्थापनाचा मेळ घातला जातो.
कोल्हापूर शहरापासून 25 किलोमीटरवर असंडोली हे गाव आहे, त्यामुळे दररोज वैद्यकीय कामकाजातून शेतावर जाणे त्यांना शक्‍य होत नाही. त्यामुळे डॉ. गुरव यांनी वाटेकऱ्याच्या साथीने शेतीचे नियोजन केले आहे. दर आठ ते दहा दिवसांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वाटेकऱ्याबरोबरीने पीक व्यवस्थापनाचे नियोजन डॉ. गुरव करतात. गरजेनुसार पीक पद्धती ठरविली जाते. शेतीसाठी लागणारा निम्मा खर्च डॉ. आनंद करतात, निम्मा खर्च वाटेकरी करतो. येणाऱ्या उत्पन्न निम्मे- निम्मे वाटून घेतले जाते. त्यामुळे पीक उत्पादन वाढीवर सातत्य ठेवले जाते.

पीक व्यवस्थापनाचे नियोजन ः
- नदीकाठावर जमीन असल्याने ऊस हेच मुख्य पीक आहे. चार एकर शेतात तीन एकरांवर ऊस घेतला जातो. एका एकरात अन्य पिके घेतली जातात. पिकांच्या फेरपालटासाठी नियोजन डॉ. गुरव करतात.
- उसाची आडसाली लागवड असते. खोडवाही ठेवला जातो. त्यामुळे खर्चात काही प्रमाणात बचत होते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड होत होती. आता दोन वर्षांपासून रोप पद्धतीने ऊस लागवड केली जाते. परिसरातील साखर कारखान्यातून उसाच्या को-86032 जातीची रोपे खरेदी केली जातात. परिसरातील शेतकरी आणि ऊस तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये काही प्रमाणात मका, भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते.
- ऊस रोप लागवडीमुळे पिकाचा एक ते दीड महिन्याचा कालावधी वाचतो. लागवड कमी वेळेत पूर्ण होते. उसाची जोमदार वाढ होते. संख्याही योग्य राखली जाते. लागवडीस मजूरही कमी लागतात. सुमारे पाच हजार रुपये खर्चात बचत होते.
- सध्या उसाचे एकरी 35 टन उत्पादन मिळते. ऊस लागवड, रोपे, खत, पाणी आणि मजूर व्यवस्थापनासाठी त्यांना एकरी साधारणपणे 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो. वाटेकरी आणि सर्व खर्च वजा जाता एकरी 20 हजार रुपये मिळतात.
- दर दोन वर्षांनी माती परीक्षण करून त्यानुसार पीक निहाय सेंद्रिय आणि रासायनिक खतमात्रेचे नियोजन केले जाते.
- शेताच्या बांधावर देशी केळी तसेच आंब्याची कलमे लावली आहेत.
- दर वर्षी भाताची एक एकरावर लागवड असते. भाताच्या जया जातीची चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादनात सातत्य आहे. गगनबावडा परिसरात पाऊस अधिक पडत असल्याने येथे भाताची रोप लावणी केली जाते. पिकांच्या फेरपालटीमध्ये उन्हाळी भुईमूग लागवड केली जाते. त्यामुळे कुटंबास वर्षभर पुरेल इतके भात आणि भुईमुगाचे उत्पादन मिळते.
- वर्षभरात चार एकर शेतीतून सर्व खर्च वजा जाता सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नापेक्षा शेतीमध्ये आनंदाने जाणारा वेळ आणि नवनवीन पीक पद्धतीतून शेतीमध्ये होणारा बदल डॉ. गुरव यांना महत्त्वाचा वाटतो.

शेतीमधील प्रयोगांना चालना
शेती वाटेकरी करतो म्हणून केवळ उत्पन्न घ्यायलाच जायचे, हे डॉ. आनंद यांना पटत नाही. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासही प्रारंभ केला आहे. बांधावर फळबाग लागवड, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा शेतीत अवलंब, पाणी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्राबाबत डॉ. गुरव माहिती घेत असतात. या भागात विजेची अनियमितता आहे. त्यामुळे नदीमध्ये पाणी उपलब्ध असूनही पिकाला पाणी देताना अडचणी येतात. काही वेळा पिकाला गरजेच्या वेळी पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन डॉ. गुरव पाणीपुरवठ्याच्या पंपावर मोबाईल स्टार्टर बसविणार आहेत. मोबाईलवरून मिसकॉल दिला की मोटर सुरू होते आणि परत मिसकॉल दिला की मोटर बंद होते, त्यामुळे ज्यावेळी वीज असेल त्या वेळी लगेचच मोटार सुरू करणे शक्‍य होणार आहे.

संपर्क ः डॉ. आनंद गुरव ः 9822187049

Monday, June 1, 2015

जाणून घ्या सेंद्रिय शेतीच्या योजना

केंद्रातील मोदी सरकारही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. यापूर्वीच्या कॉंग्रेस सरकारनेही सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना तयार केल्या होता. गेल्या दहा वर्षात देशातील सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात वाढ होता आहे. कीडनाशके व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम पाहाता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन हे मिळायलाच हवे. आरोग्याच्या वाढत्या समस्या ह्या निकृष्ट अन्नामुळे आहेत. खाद्यपदार्थात कीडनाशकांचे प्रमाण पाहाता. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व विषमुक्त अन्नाची निर्मिती करायला हवी, ही आता काळाची गरज झाली आहे.
हे ओळखूनच सरकारने विशेष पाऊले उचलली आहेत. परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत 2015-16 आर्थिक वर्षासाठी केंद्राने सेंद्रिय शेतीसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये 50 शेतकऱ्यांचा एक गट करून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी निधी देण्यात येणार आहे. 50 शेतकरी प्रत्येकी एक एकरावर सेंद्रिय शेती करतील. या प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षांसाठी एकरी 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. 50 शेतकऱ्यांचे असे दहा हजार गट तयार केले जाणार आहेत. यामुळे तीन वर्षात पाच लाख एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली येणार आहे. या योजनेतून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल अशी आशा सरकारला वाटते. 2003-04 मध्ये देशात 42 हजार हेक्‍टरवर सेंद्रिय शेती केली जात होती. गेल्या दहा वर्षात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 17 पटीने वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये 7.23 लाख हेक्‍टरव वर सेंद्रिय शेती करण्यात आली आहे. 2001 पासून देशात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, नागालॅंड, मिझोरम, सिक्किम या राज्यात सेंद्रित शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंपरागत कृषि विकास योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक उद्यानविद्या विकास प्रकल्प, राष्ट्रीय तेलबिया आणि पामतेल प्रकल्प, आयसीएआरचा सेंद्रिय शेती नेटवर्क प्रकल्प या योजनेतून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.