Friday, January 23, 2015

कृषी विकासाचा सिद्धगिरी पॅटर्न

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाने धार्मिक कार्याबरोबरच आता सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, देशी गाईंचे संवर्धन असे उपक्रम राबविले आहेत. मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य सुरू आहे. भारतात आढळणाऱ्या 33 देशी गाईंपैकी 20 प्रकारच्या गाईंचे संवर्धन येथे केले आहे. यातून आरोग्यास उपयुक्त असणारी विविध प्रकारची उत्पादनेही घेतली जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा लखपती शेतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. विज्ञानाची कास धरून आध्यात्मिक प्रसाराचे, संस्कृतीचे संवर्धन करणारा हा मठ निश्‍चितच सर्वांसाठी एक आदर्श असा आहे.
- राजेंद्र घोरपडे

देशी गाय ही दूध कमी देते. तिचा संगोपन खर्च हा परवडणारा नाही. अशा विविध कारणांनी देशी गाईंचे संगोपन शेतकरी करण्याचे टाळतात. संकरित गाईंचे वाढते संगोपन यामुळे देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी झाली. अशाने देशी गाय दुर्मिळ होत आहे. हे लक्षात घेऊन मठाने त्यांच्या संवर्धनासाठी गोशाळा उभारली. देशभरातून या गाई मठाने गोळा केल्या. कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मिळ होत चाललेल्या 20 जातींच्या देशी गाईंचे संवर्धन मठाने केले आहे. आज सुमारे 700 गाई, बैल, वासरे येथील गोशाळेत आहेत.

संगोपन केलेल्या गाईच्या जाती
साहिवाल (राजस्थान-गंगानगर), गीर (गुजरात), कॉंक्रिज (गुजरात- कच्छ, मेहसा), देवणी (लातूर, परभणी, नांदेड), लाल कंधारी (नांदेड), डांगी (नाशिक, नगर), थारपारकर (बारमेर, राजस्थान), ओंगली, राठी (नेलोरी, गुंटूर आंध्र प्रदेश), अमृतमहाल (हसन, चिकमंगळूर), हळ्ळीकर( म्हैसूर), कोकण गीड, खिल्लारी कोशी (सांगली, सातारा), खिल्लारी कजरी (सांगली, कोल्हापूर), वेच्चुर (कोट्टायम), पोंगनुर (चित्तूर), उमलचेरी (तंजावर), बारगुर (इरोडे, पेरियार), कंगायम (तमिळनाडू), गावठी गाय (वंश माहिती नसलेली गाय)

सेंद्रिय तुपास मोठी मागणी
गोशाळेत दररोज एक हजार लिटरवर दूध उत्पादन होते. यापासून तूप, ताक याची निर्मिती केली जाते. सेंद्रिय उत्पादन असल्याने तुपाला मोठी मागणी आहे, तर येणाऱ्या पर्यटकांना ताक विकले जाते. याशिवाय पंचगव्यापासून विविध उपपदार्थ तयार केले जातात. गोमूत्रापासून विविध औषधेही तयार केली जातात. याशिवाय सेंद्रिय साबण, धूप याचीही निर्मिती केली जाते. या उपपदार्थांनाही मोठी मागणी आहे. विविध असाध्य व्याधींवर उपचारासाठी देशी गाईंचे हे उपपदार्थ उपयुक्त आहेत.

गोबर गॅस प्रकल्पातून इंधननिर्मिती
गोठ्याच्या ठिकाणीच गोबर गॅसचा प्रकल्प आहे. दररोज तीस अश्‍वशक्ती ऊर्जा तयार होते. दिवसाला पाच ते सहा तास त्याचा वापर केला जातो. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ, गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो; तसेच गोबरगॅस प्रकल्पातील टाकावू शेणखतापासून गांडूळ खताचीही निर्मिती केली जाते. या गांडूळ खतासही मोठी मागणी आहे.

सेंद्रिय गुळाचे उत्पादन
मठाच्या शंभर एकरावरील शेतीमध्ये ऊस, चारा पिके, आंबा, भात, भुईमूग आदी पिके घेतली जातात. उसापासून सेंद्रिय गुळ, काकवी आदी उत्पादने घेतली जातात.

सेंद्रिय शेती प्रसाराचे कार्य
मठातर्फे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यामध्ये गांडूळ खतनिर्मिती, सेंद्रिय पद्धतीने कीडनाशक, बुरशीनाशके तयार करण्याचे तंत्र शिकविले जाते. अगदी सोप्या पद्धतीने व कमी खर्चात उत्पादित करता येणारी ही उत्पादने शेतीच्या उत्पादनास लाभदायक तर आहेतच; पण त्याबरोबरच विषमुक्त अन्नाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणारीही आहेत. जमिनीचा बिघडत चाललेला पोत सुधारण्याचेही कार्य यातून केले जाते. दोन महिन्यांतून एकदा मोफत या कार्यशाळेचे मठावर आयोजन केले जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ नारायण रेड्डी तसेच राज्यातील सेंद्रिय उत्पादक शेतकरी मार्गदर्शन करतात. त्यांचे विविध अनुभव सांगतात.

लखपती शेतीचा प्रयोग
एका एकरात वर्षभरात विविध प्रकारची 188 पिके सेंद्रिय पद्धतीने घेऊन पाच व्यक्तीच्या कुटुंबाचा चरितार्थ यशस्वीपणे करता येऊ शकतो, हे दाखविणारा "लखपती शेती'चा प्रयोग येथ करण्यात आला आहे. पिकांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास खर्च वजा जाता सव्वा लाखांचे उत्पादन एका एकारात घेणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाऊ शकते. पौष्टिक, ताजा आहार देणारी ही उत्पादने असल्याने आर्थिक प्रगती बरोबरच आरोग्यही सुदृढ ठेवले जाते.

लखपती शेतीतील पीक नियोजन
वारा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. याचा विचार करून पश्‍चिमेला उंज वाढणारी म्हणजे उसासारखे पीक 15 गुंठ्यात घेतले जाते. त्यानंतर क्रमशः कमी कमी उंचीची पिके घेतली जातात. यामुळे वादळी वाऱ्यांने पिकांचे संरक्षण होते. नुकसान कमी होते. पिकांना सूर्य प्रकाश अधिक मिळाल्याने उत्पादनातही याचा परिणाम दिसून येतो. पिकांमध्ये व्यापारी पिके, धनधान्याची पिके, मसाला पिके, फळझाडे, कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळीचे नियोजन केले जाते. जेणेकरून कुटुंबाची वार्षिक गरज यातून भागू शकेल असे नियोजन असते. वैरणीसाठीही हत्तीगवत, मेथीघास, कडवळही पाच गुंठ्यात घेतले जाते. चाळीस गुंठ्यात इंच इंच जागेचा प्रभावी वापर केला जातो. शेताच्या सीमेवर तुरीचे पिके घेतले असून दोन तुरीमध्ये गवतीचहा, अननस, कडीपत्ता अशी अनेक प्रकारची पीकरचना केलेली आहे. भाजीपाला पिके आठ गुंठ्यात तर भात, भुईमूग, ज्वारी खरीपात व गहू, हरभरा, वाटाणा रब्बी हंगामात नऊ गुंठे जागेवर घेतला जातो. एका एकाराच्या याच जागेत तीन गुंठ्‌यात घर, तीन देशी गाईंसाठी गोठा, संडास बाथरूम, गोबरगॅस, परसबाग, गोबरगॅस आदी बांधण्यात आले आहे.

विजेच्या खांबाभोवतीही पिके
शेतात विजेचा खांब असेल तर त्या परिसरातील जागा ही वाया जाते. त्या ठिकाणी नांगरट योग्य प्रकारे होत नाही; तसेच तेथे पीकही योग्य प्रकारे वाढत नाही; पण या लखपती शेतात त्या जागेचाही सुयोग्य वापर करण्यात आला आहे. खांबाच्या भोवती गोलाकार पद्धतीने मातीचा ढीग करून त्यावर रताळीची लागवड येथे केली आहे. कंदवर्गीय पिके घेऊन या जागेचा योग्य वापरही या लखपती शेतीच्या प्रयोगात केला आहे.


माझ्या बालपणी घरात लागणारे धान्य घरातच पिकविले जायचे. सर्व भाजीपाला घरातील शेतातच पिकवला जायचा. बाजारात जाऊन धान्य, भाजीपाला विकत आणण्याची कधी गरजच भासली नाही. छोट्या शेतातही कुटुंब सुखात जगायचे. आजकाल शेती परवडत नाही ही ओरड ऐकताना तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा विचार करता खरच शेती तोट्याची झाली आहे का? यासाठी प्रयोग म्हणून हा लखपती शेतीचा प्रयोग आम्ही येथे केला आहे. एका एकरात पाच माणसांच्या एका कुटुंबाला लागणारे सर्व धान्य, भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने घेता येणे शक्‍य आहे. हे या प्रयोगातून आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. ही संकल्पना पाहून शेतकऱ्यांनीही प्रोत्साहित होऊन शेतीकडे पाहावे. आपले शेत, कुटुंब सधन, स्वयंपूर्ण, आरोग्यसंपन्न करावे हाच या प्रयोगा मागचा आमचा उद्देश आहे. देशी गाईंचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना व ग्राहकांना विषमुक्त अन्न या घटकांसाठी आम्ही गोशाळेचा उपक्रम सुरू केला आहे.

- श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य महाराज, कणेरी