Thursday, October 2, 2014

'टार्गेट' ठेवूनच शेतीचे नियोजन

'टार्गेट' ठेवूनच शेतीचे नियोजन
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर शहरातील आयुर्वेदिक डॉक्‍टर डॉ. धनंजय गिरमल यांनी वडिलोपार्जित दीड एकर शेती न विकता प्रयोगशील वृत्ती जपत ऊस उत्पादनवाढीचे "टार्गेट' ठेवले. प्रयोगशील शेतकरी आणि कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक उत्पादनात सातत्य, पीक बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी आठव्या गल्लीत डॉ. धनंजय जयपाल गिरमल यांचा दवाखाना आहे. तसेच इचलकरंजी शहरातही त्यांचा दवाखाना आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा ते इचलकरंजीला जातात. रविवारचा दिवस मात्र इचलकरंजी जवळील अब्दुललाट (ता. शिरोळ) या गावातील शेतीसाठी राखीव ठेवलेला असतो. दिवसभर थांबून वाटेकऱ्याच्या मदतीने पुढील आठवड्याचे त्यांचे शेतीचे नियोजन चालू असते.

सांगली येथून आयुर्वेद पदवी घेतल्यानंतर डॉ. गिरमल यांनी कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांचे वडीलही डॉक्‍टर होते. त्यांचा इचलकरंजी शहरात दवाखाना होता. तेथूनच ते अब्दुललाट गावातील दीड एकर शेतीचे व्यवस्थापन पाहत होते. डॉ. गिरमल यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर शेतीची पूर्ण जबाबदारी डॉ. गिरमल यांच्याकडे आली. केवळ दीड एकर शेती आहे, म्हणून सांभाळण्यापेक्षा ती विकून टाका, असा सल्ला बऱ्याच जणांनी त्यांना दिला. परंतु डॉ. गिरमल यांची शेतीची आवड त्यांना शेती विकण्यास नेहमीच नाकारत आली. काही झाले तरी शेती करायचीच, या जिद्दीपोटी त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. या शेतीच्या व्यवस्थापनात त्यांना नितीन कल्लाप्पा गिरमल (होगाडे) हे चांगले वाटेकरी मिळाल्याने पीक नियोजनात अडचण आली नाही.

"टार्गेट' ठेवून शेती ः
शेतीत प्रगती करण्याचे नियोजन डॉ. गिरमल यांना गप्प बसू देत नव्हते. उसाचे एकरी शंभर - सव्वाशे टन उत्पादन घेणारे शेतकरी शिरोळ तालुक्‍यात आहेत, मग आपल्या शेतात चाळीस टन इतकेच उत्पादन कसे, हा प्रश्‍न त्यांना नेहमी सतावत होता. या प्रश्‍नातून त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. उत्पादनवाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातील डॉ. अशोक पिसाळ, डॉ. ए. पी. पाटील यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी ऊस उत्पादनवाढीकडे लक्ष दिले. पीक नियोजन केले. याच काळात त्यांनी "ऍग्रोवन'मधील तांत्रिक लेख, शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांची नोंद ठेवण्यास सुरवात केली. त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल केले.

पीक लागवडीचे नियोजन ः
- डॉ. गिरमल यांची शेती पूरक्षेत्रापासून थोड्याच अंतरावर आहे. शेती दीड एकर असल्याने व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांनी ऊस लागवडीवरच भर दिला.
- पारंपरिक पद्धतीने उसाचे एकरी केवळ चाळीस टन उत्पादन मिळायचे. परंतु चांगले बेणे, बेणेप्रक्रिया, सुधारित पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर दिला, तर निश्‍चितपणे उत्पादनात वाढ होते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी वाटेकऱ्याच्या मदतीने नियोजन केले. दरवर्षी किमान पाच टनांनी ऊस उत्पादनवाढीचे टार्गेट ठेवले.
- काही वेळा नियोजनात चूक होते, अपेक्षित पीक उत्पादन येत नाही. परंतु निराश न होता चुकांची दुरुस्ती आणि अभ्यास करून पुढील वर्षीच्या पीक नियोजनात सुधारणा केली जाते.
- डॉ. गिरमल उसाची लागवड जूनमध्ये न करता ऑगस्टमध्ये करतात. त्यापूर्वी साडेचार फुटांवर सऱ्या पाडून पावसाच्या पाण्यावर सोयाबीनच्या जेएस-335 या जातीच्या बियाण्याची सरीच्या एका बाजूला एक फूट अंतरावर टोकण करतात. सोयाबीन पेरणीपूर्वी बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केली जाते. एक एकरासाठी आठ किलो बियाणे लागते. तीन महिन्यांत सोयाबीन कापणीयोग्य होते. कापणीनंतर सोयाबीनचा पाला, कुट्टी सरीत कुजवली जाते. चांगल्या शेणखताची उपलब्धता नसल्याने सोयाबीनचा पाला फायदेशीर ठरतो.
- सोयाबीनचे अंदाजे आठ क्विंटल उत्पादन मिळते. त्यातील चौथाई वाटेकऱ्यास दिली जाते. सोयाबीन पिकास सरासरी सहा हजार रुपये व्यवस्थापन खर्च येतो. सोयाबीन विक्रीतून सरासरी सोळा हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
- उसाच्या को-265 या जातीची लागवड सोयाबीन काढणीच्या वेळी करतात. पाच वर्षांपूर्वी ऊस लागवड करताना ते बेणेप्रक्रिया करत नव्हते, परंतु बेणेप्रक्रियेचे फायदे लक्षात आल्यानंतर आता ते बेणे लागवड कीडनाशक, तसेच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करूनच करतात.
- शिफारशीनुसारच रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून आहे. पिकाच्या गरजेनुसारच पाणी व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये एक आड एक सरी पाचट कुजविले जाते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि ऊस उत्पादनात फरक दिसतो आहे.
- पूर्वी उसाचे एकरी 40 टन उत्पादन येत होते. आता एकरी सत्तर टनांपर्यंत उत्पादन पोचले आहे. तसेच खोडव्याचे उत्पादन एकरी 50 ते 55 टनांपर्यंत मिळते.
- शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यातील कृषी अधिकाऱ्यांचेही ते मार्गदर्शन घेतात.

वाटेकऱ्यास चौथाई
शेतीमध्ये मजुरांची मोठी कमतरता आहे. मजुरांच्या कमतरतेमुळेच ते स्वतः मजुरांचे नियोजन करीत नाहीत. वाटेकरी मजुरांचे नियोजन करतो. वाटेकऱ्यास उत्पन्नातील चौथा हिस्सा दिला जातो. तसेच शेतीसाठी लागणारा सर्व खर्च स्वतः डॉ. गिरमल करतात. सोयाबीनचे दीड एकरातून दोन ते चार क्विंटल व उसाचे 17 ते 20 टनांचे उत्पन्न वाटेकऱ्यास मिळते.

औषधी वनस्पतींची लागवड ः डॉ. गिरमल यांनी इचलकरंजी येथील घराच्या परसबागेत कोरफड आणि अडुळसा लागवड केली आहे. कोरफडीचा रस आणि खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाच्या मिश्रणातून त्यांनी आयुर्वेदिक तेल तयार केले आहे. केसांच्या समस्येवर हे तेल उपयुक्त ठरले आहे. येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार औषधे मिळावीत हाच त्यामागचा उद्देश आहे. कफ, दम्याच्या औषधांसाठी अडुळशापासून त्यांनी औषधे तयार केली आहेत. शेतीची आवड असल्याने औषधी वनस्पतींची लागवड करून त्यापासून उपयुक्त औषधी बनवून ते रुग्णांना देतात.

"ऍगोवन' हा खरा मार्गदर्शक... दै. ऍग्रोवनमधील विशेष पुरवण्या, तांत्रिक लेख आणि यशोगाथांनी डॉ. गिरमल यांना शेती प्रगतीची दिशा दाखविली. याबाबत ते म्हणतात, की उसाविषयीची सर्व माहिती मी संग्रहित केली आहे. त्याचबरोबरीने भाजीपाला पिके, चारा पिके, जनावरांसाठी मुरघास, आंतरपीक पद्धती याविषयांच्या लेखांचाही संग्रह केला आहे. पुढे शेतीमध्ये पीक बदल करताना हा संग्रह दिशा देणारा आहे. शेतीमधील अनुभव आणि माहितीच्या संग्रहामुळे पुढच्या पिढीमध्येही शेतीची आवड निर्माण झाली आहे.

पुढील टप्प्यातील नियोजन...
- एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे टार्गेट, त्यादृष्टीने पीक व्यवस्थापनावर लक्ष.
- प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांशी सातत्याने चर्चा करून पीक बदलाबाबत सल्ला.
- जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर.
- ऊस, सोयाबीन बरोबरीने काही प्रमाणात भाजीपाला लागवडीचे नियोजन.
- येत्या काळात अजून काही जमीन खरेदी करणार.

संपर्क ः डॉ. धनंजय गिरमल ः 9423858765