Sunday, May 24, 2015

ब्रॅंडनेम

कोल्हापूर शहरापासून 10 किलोमीटवरवर रामूचा गाव. पंचगंगा नदीच्याकाठी असल्याने बागायती शेतीने सधन. ऊस आणि भाजीपाला अमाप, पण गेल्या काही वर्षात शेतमालाला दर नसल्याने येथील शेतीचे चित्र पालटलेले होते. दहा वर्षापूर्वी गावच्या रस्त्यावर बघाल तिकडे गुऱ्हाळ होती. पण आता एखादेच गुऱ्हाळ सुरू आहे. रस्त्यावर वाहनांपेक्षा जनावरेच दिसायची. पण आता एखादे जनावरं जरी आडव आलं तरी वाहनांच्या रांगा लागतात. इतकी परिस्थिती बदलली आहे. विकास झाला, पण कुणाचा? हे सांगणेच आता कठीण आहे. कच्चे रस्ते होते. ते पक्के झाले. पाण्याची सुविधा नव्हती. आता तर बघेल तिकडे पाणीच पाणी आहे. हाफ चड्डीवर फिरणारा शेतकरी आता फुलपॅंडमध्ये दिसतो आहे. बाहेरगावचा पाहुणा कधी भेटला तर जेवल्याशिवाय गावातून सोडत नव्हते. पण आता स्मार्टफोनवर जेवलास काय हे विचारायलाही वेळ नाही. इतकी परिस्थिती बदलली आहे. शेतमालाला दर मिळत नसल्यापासून शेतकरी काही समाधानी दिसत नव्हता. गुळाला दर मिळत नाही. भाजीला दर नाही. यामुळे नुकसानात पडलेला शेतकरी गुऱ्हाळ बंद करून बसला आहे. शेतात पिकतयं म्हणून कुटुंब तरी खाऊन पिऊन सुखी आहेत. मुलांना शिकवायचे नोकरीत धाडायचं शेतात मात्र आणायचं नायं हाच विचार आता शेतकऱ्यांच्या डोक्‍यात घुमु लागलाय.
गावची पोरं आता पुण्या-मुंबईत शिकायला आहेत. तसे रामूचाही मुलगा पुण्याला शिकायला होता. त्याला भेटायला म्हणून रामू पुण्याला गेला. घरच्यांनी जाताना सांगितले, येताना बाकरवडी आणायला विसरू नका. चितळ्यांची बाकरवडी खूप प्रसिद्ध आहे. मुलाला भेटून घरी जाण्यासाठी रामू निघाला. जाताना बाकरवडी घ्यायचे हे त्याच्या डोक्‍यात पक्क होत. बाकरवडी खरेदीसाठी रामू चितळ्यांच्या दुकानात गेला. पाहतो तर काय? पावकिलो बाकरवडीसाठी भलीमोठी रांग. बाकरवडी प्रसिद्ध आहे. हे माहित होते, पण खरेदीसाठी इतकी मोठी रांग पाहून रामू हबकलाच. अर्धा तास रांगेत थांबून बाकरवडी रामूने खरेदी केली. रांगेत थांबून रामू थकला होता. रेशनला सुद्धा आजकाल इतकी गर्दी नसते. बाकरवडीसाठी येथे रांगा लागतात. याचेच आश्‍चर्य त्याला वाटत होते. बाकरवडी खरेदी करून रामू बाहेर आला. पाहतो तर काय? वडापाव खरेदीसाठीही गर्दी. येथे काही पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड लागते. हे पाहून रामुला खूप आश्‍चर्य वाटले. चहा प्यायचा, तर अमृततुल्य मध्येच. पण त्या चहाची चवच न्यारी असते. हे ही खरे. रामू कोल्हापूरला परतताना एसटीत हाच विचार त्याचा मनात घोळत होता. पदार्थाची प्रत चांगली असेल तर त्याला मागणी असते. लोक रांगाकरून तो पदार्थ खरेदी करतात. खरेदीसाठी चढाओढ असते. यातून त्या पदार्थाचे बॅंडनेम तयार होते. कोठेही जा? तशी प्रत, ती चव मिळतच नाही. मालाला मागणी हवी असेल तर प्रत उत्तम असावी लागते. प्रत उत्तम राखली, तर मालाला बाजारपेठही मिळते आणि प्रसिद्धीही मिळते. बेळगावचा कुंदा, नृसिंहवाडीचे कवठाची बर्फी, लोणावळ्याची चिक्की हे जसे प्रसिद्ध आहे. तसे आपण आपला गूळ का प्रसिद्ध करू नये. शेतमालासाठी असा दर्जा निर्माण केला तर....रामूच्या मनात वीज चमकली.
रामू घरी परतला. पण वेगळा विचार घेऊन आला. या विचाराने रामूचे जीवनच बदलले. बाजारात पत फक्त कर्ज घेण्यासाठी नको, तर मालाच्या प्रतीचीही पत हवी. माल फक्त नावावर जायला हवा. असे उत्तम प्रतीचे उत्पादन व्हायला हवे. मार्केटिंगचा हाच तर नियम आहे. चांगले उत्पादन असेल, तर ग्राहक किंमतीचाही विचार करत नाही. शेतमालही असाच तयार करायचा. गुळाची प्रतही अशीच ठेवायची. कोणीही विचारले गूळ कुणाचा? तर "रामूचा गूळ' असा सहज उच्चार व्हायला हवा. नावावर भाजी खरेदी व्हायला हवी. तशी प्रत आपण राखायला हवी. तसे उत्पादन करायला हवे.
विचारात आले ते कृतीत आणण्यात रामू पटाईत होता. रामूने यावर अभ्यास सुरू केला. गुळाची प्रत राखण्यासाठी त्याने सर्व तांत्रिकबाबी अभ्यासल्या. त्यानुसार त्याने योग्य ते बदल केले. सेंद्रिय गुळाचे उत्पादन तो घेऊ लागला. विषमुक्त अन्ननिर्मितीचा त्याने ध्यासच घेतला. रासायनिक खतांचा वापर बंद करून त्याने सेंद्रिय पद्धतीने उसाची लागवड सुरू केली. गुळामध्येही रसायनांचा वापर त्याने थांबवला. स्वतःचा गूळ उत्तम प्रतीचा, खराब होणार नाही याची हमी देणारा, पौष्टिकता जपणारा हा वेगळाच ब्रॅंड रामूने विकसित केला. यामध्ये विविध प्रकारही त्याने तयार केले. मोदकाचा आकार, गुळाच्या स्लेट असे विविध प्रकारही त्याने तयार केले. रामुच्या गुळाचा ब्रॅंड अल्पावधीत परिचित झाला. भाजीपालाही सेंद्रिय पद्धतीने करून त्यांने भाजीपाल्याचीही प्रत सुधारली. सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय गूळ आदी सेंद्रिय उत्पादने घेणारा शेतकरी म्हणून आता रामू परिचित झाला. वाशीच्या मार्केटमधून भाजीला मागणी होऊ लागली. अल्पावधीतच त्याच्या उत्पादनांना देशभरातून मागणी होऊ लागली. थेट विक्रीही होऊ लागल्याने रामूच्या नफ्यात भर पडली. त्याचा हा व्यवसाय पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी येऊ लागले. फक्त एका बॅंडने हे सर्व घडवले. उत्पादन असे घ्या, त्याचा ठसा उमटायला हवा. त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी. शेती उत्पादनातही आपण वेगळा बॅंड करू शकतो. हेच रामूने करून दाखवले. 

Sunday, May 17, 2015

कातळाला फुटला पाझर

कोकणातील खेड्यात राहणारा रामु आयएएस झाला. त्याचे स्वप्न आता सत्यात उतरले होते. गावच्या लोकांनाही त्याच्याबद्दल आदर होता. त्याचा सत्कार गावकऱ्यांनी केला. वाटलं होत तो आता गावचा विकास करेल पण आता ते शासकीय अधिकारी झाला होता. रामूला ग्राम विकासाने झपाटले होते. आता त्याचे ध्येय होते ग्रामीण विकास योजना राबविण्याचे. बिहारमधील एका भागात तो नोकरीत रुजू झाला. सुरवातीची एक-दोन वर्षे काम समजून घेण्यातच गेली. वरिष्ठ अधिकारी असल्याने रामूला अनेक अधिकार होते. पण अद्याप त्याने याचा वापर कधी केला नव्हता. आता त्याला त्याची गरज वाटू लागली. ग्राम विकासाच्या योजना सत्यात उतरविण्यासाठी तो नियोजन करू लागला. बिहारमधील गाव विकासाचे आराखडे त्याने तयार केले. शहराकडे येणारे लोंढे कमी व्हावेत या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. गावातील लोकांना गावातच रोजगाराच्या संधी देण्याच्या योजना त्याने आखल्या. त्याची अंमलबजावणी रामूने सुरू केली. रोजगारासाठी मधमाशापालन, कुकुटपालन आदी शेतीवर आधारित जोडधंद्यांना चालना देण्यास सुरवात झाली. शासनाच्या अनुदानाच्या योजना गावात राबविण्याचे प्रयत्न सुरू झाले. याची खबर गावच्या ठाकुरांना लागली. कामगारांअभावी त्यांचे उद्योग बंद पडण्याची भीती त्यांना वाटली. त्यांनी रामूला दम दिला. गावात याल तर याद राखा मुडदे पाडू अशी धमकीही दिली. सर्वगावातील ठाकुरांची एकी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर रोज मोर्चे येऊ लागले. रामू विरोधात वातावरण निर्माण झाले. पाटणा, दिल्लीपर्यंत रामूच्या तक्रारी गेल्या. प्रत्यक्षात रामूने कोणतीही कारवाई केली नव्हती तरी त्याच्या विरोधात रान उठले. दिल्लीतील नेत्यांनी रामूला बोलावून घेतले. रामूच्या योजनांची वरिष्ठापर्यंत माहिती होती. त्यांच्या कामाबद्दल ज्येष्ठ नेत्यांनाही आदर होता. धडाडीचा अधिकारी म्हणूनही त्याची ख्याती होती. विकासपुरूष म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जायचे. पण दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांकडे रामूच्या आलेल्या तक्रारींनी तेही चक्रावून गेले. राजकारणातील मुरब्बी नेते शेवटी त्यांनी रामुलाच खडसावले. सर्व राजकीय नेते एकाच माळेचे मणी. सरकार कोणाचेही असो खाद्य खाण्यासाठी ते एकत्रच जमतात. खाद्य मिळाले की त्यांचे विचार बदलतात. पांढऱ्याच काळे करण्याचा त्यांच्या तर हातखंडाच आहे. रामूच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. कामापेक्षा दिल्लीच्या सरकारी कागदपत्रांचीच उठाठेव वाढली. रामूने आवाज उठवला तर साथ देणारे कोणी नव्हते. शेवटी तो तेथे परका माणूस. ज्येष्ठ नेत्यांनीही रामूला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. पण रामूच तरुण रक्त ते मान्य करायला तयार नव्हते. तसे या प्रकरणाने रामू दिल्ली दरबारी चांगलाच परिचित झाला होता. माणूस चांगला, काम चांगले, विकासाचे स्वप्न पण साथ नसेल तर काय उपयोग? एका हाताने टाळी वाचत नाही. रामू या राजकीय पद्धतीला वैतागला. अखेर त्याने राजीनामा ठोकला आणि तडक कोकणातला गाव गाठला. 
रामूने आता स्वतःच्या गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. रामू आता माजी अधिकारी असला तरी गावात त्याला मान होता. कोकणाला त्याचा चांगला परिचय होता. त्याच्यावर विश्‍वास होता. गावाने रामुला सरपंचपदी निवडले. बिनविरोध निवडून दिल्याने त्याला कामात उत्साह वाढला. पदाचा फायदा घेत त्याने गावाच्या विकासाच्या आराखडा तयार केला. कोकणात पाऊस जरी अधिक पडत असला तरी जानेवारीनंतर पाण्याची टंचाई भासतेच. मार्च ते मे महिन्यात याची तीव्रता वाढते. गावच्या विकासासातील हा सर्वांत मोठा अडसर होता. पाऊस असूनही नित्याची पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्याने विविध उपाय योजले. शासनाच्या योजनांचा फायदा घेत वनराई बंधारे, डोंगर उतारात पाणी अडवा पाणी जिरवा, छोटे छोटे बांध बांधून पाण्याचा साठा केला. या बांधबदिस्तीमुळे गावात असणाऱ्या आडाच्या पाण्यातही वाढ झाली. विहिरींना पाणी वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याची समस्या मिटली. पण आता आव्हान उभे राहिले ते पाणी पुरवठा योजनेचे. बाराही महिने पाणी पुरवठा करावा लागल्याने आता विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले. हे बिल भरणार कसे. याचा बोजा ग्रामपंचायतीवर पडला. साहजिकच याचा बोजा करावर पडला. ग्रामपंचायतीचे विविध कर वाढविणे भाग पडले. पाणी पट्टी वाढली. विकास केला तर हे तोटे वाढले. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सुर उमटू लागला. रामू या समस्येने वैतागला. विकास केला तर इतरही अनेक समस्या वाढतात हे त्याच्या लक्षातच आले नाही. विकासाने प्रगती व्हायला हवी अशा योजना राबविण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. गावच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी गावातीलच साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल याचा विचार तो करू लागला.
कोकणातील गावे ही डोंगर कपारीत आहेत. या डोंगर कपारीत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. उन्हाळ्यातही ते आटत नाहीत. गावात पाणी टंचाई भासू लागल्यावर याच स्रोतांतून पाणी आणले जायचे. गावापासून तीन चार किलोमीटर उंच भागात असणाऱ्या या स्रोतांचा अभ्यास रामूने केला. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत हे पाणी नेता आले तर गावाला बाराही महिने पाणी मिळेल उलट सायफनने पाणी पुरवठा झाल्याने विजेचे बिलही येणार नाही. महिलांना कूपनलिकेचे पाणी खेचावे लागणार नाही. दारात चौविस तास पाण्याचा पुरवठा होईल. अनेक समस्या मिटतील. हा विचार त्याने गावकऱ्यांनाही सांगितला गावानेही या योजनेला पाठिंबा दिला. पण डोंगरातील या स्रोतांतून पाणी आणण्यासाठी पाइपचा खर्च कोण करणार. इतका पैसा येणार कोठून? तो कसा उभा करायचा. पाणी पट्टी द्यायला ग्रामस्थ तयार नाहीत तेथे लाखाची योजना राबविण्यासाठी कसे पैसे येणार. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता होती. पण मुख्य प्रश्‍न होता तो पैशाचा? शेवटी शासनाकडे ग्रामसभेतून प्रस्ताव गेला. शासनाने एकात्मिक गाव विकास योजनेतून निधी मंजूर केला. यातून आवश्‍यक ते साहित्य खरेदी करण्यात आले. पण ते बसविण्यासाठी लागणारी मजूरी देण्यासाठी पैसा नव्हता. गावकऱ्यांची बैठक झाली. श्रमदानातून पाइप लाइन टाकायचे असे ठरले. गावातच पाइप लाइन करणारे कामगार होते. त्यांनी श्रमदानातून पाइप जोडून देण्याचे निश्‍चित केले. खड्डेही श्रमदानातून खोदण्यात आले. गावाच्या टाकीत अखेर पाणी पडले. उन्हाळा असो वा पावसाळा आता गावात बाराही महिने चोवीस तास पाणी मिळते. या पाण्याने गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. पाणी पट्टीही आकारली जात नाही. शून्य पाणी पट्टी आकारणार गाव म्हणून गावाचा राज्यभर लौकिकही झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच आता गावच्या जमिनीही बागायती झाल्या आहेत. कातळ पडीक जमीनीत आता हिरव्यागार झाल्या आहेत. बाराही महिने त्यावर पिके दिसत आहेत. गावात एसटी शिवाय वाहन येत नव्हते आता प्रत्येकाच्या दारात मोटार गाड्या दिसत आहेत. एका पाणी प्रश्‍नाच्या सोडवणूकीने इतका विकास झाला आहे. या विकासाची चर्चा आता देशभरात होत आहे. बिहारमध्येही याची चर्चा झाली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आता रामूच्या विकासाचे आराखडे पुन्हा मागवले आहेत. रामूला विकासाच्या योजना राबविण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याचे मार्गदर्शन आता तेथे घेतले जात आहे. दिल्लीवारीवर पाठविणारे ठाकूर आता रामूच्या विचारांनी गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिद्द असेल, ध्यास असेल तर कातळालाही पाझर फुटू शकतो. फक्त विचार विकासाचा हवा, ध्यास विकासाचा हवा. रामूनेही करून दाखवले आहे. शून्य पाणी पट्टी भरणारा मराठी गाव आता देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर नोंदविला गेला आहे.

Saturday, May 16, 2015

शेततळे

डोंगराच्या पायथ्याशीच रामूचे शेत होते. नदीपासून शेत दूर असल्याने फक्त कोरडवाहूच पिके होत. पावसाच्या पाण्यावर येणारे भात आणि हरभरा यावरच रामूचा चरितार्थ चालायचा. वाढत्या महागाईत इतक्‍या कमी उत्पन्नात घर कसे चालवायचे, हाच मोठा प्रश्‍न रामूला होता. पाच एकर डोंगर उतारात शेत असूनही मोठी अडचण होती. पाण्याची सोय झाली असती तर बागायती पिके घेऊन उत्पन्न वाढवता येणे शक्‍य होते. विहीर खोदून किंवा कूपनलिका मारून पाणी लागेलच याची शाश्‍वती नाही. कर्ज काढून विहीर खोदायची आणि पाणी लागलेच नाही तर काय? कर्जात बुडायचे. यामुळे रामू अस्वस्थ होता.
रामूने पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास घेतला. वारंवार तो पंचायतीमध्ये चकरा मारू लागला. पण फारसे यश त्याला येत नव्हते. काही पर्यायही सुचत नव्हते. विचारात डुंबलेला रामू चावडीवर हताश होऊन बसला होता. तेवढ्यात त्याचे समोर लावलेल्या जाहिरातीकडे लक्ष गेले. शेततळ्याच्या योजनेची जाहिरात होती. कृषी विभागाच्यावतीने ही योजना होती. विहिरी ऐवजी अनुदानावर शेततळे खोदले तर...रामूच्या डोक्‍यात प्रकाश पडला. शेततळे खोदण्याचे त्याने मनावर घेतले. शेततळ्याला फारशी जागाही लागत नाही. अर्ध्या एकरात शेततळे होऊ शकते. खर्चही फारसा नाही. ठराविक आकाराचा खड्डा खोदायचा. त्यावर प्लास्टिक शीट अंथरायचं. त्यात पाणी साठवायचे. पावसाळ्यात पाणी साठवायचे असल्याने पाणी लागले नाही. त्यामुळे श्रम वाया गेले ही भीतीही नाही. हिवाळ्यातले एक पीक जरी पाण्यावर आले तरी उत्पन्नात भर पडेल या उद्देशाने रामूने शेततळ्याचा निर्णय घेतला. डोंगराच्या पायथ्याशी शेत असल्याने रामूने वरच्या भागात तळे खोदायचा निर्णय घेतला. आश्‍चर्य म्हणजे तळाच्या दहा फुटावरच पाण्याचे झरे त्याला लागले. उन्हाळ्यात पाण्याचे उमाळे पाहून रामूलाही हायसे वाटले. पावसाळ्यात पाणी साठवायचीही गरज नाही. उन्हाळ्यात झरे फुटले होते. शेततळ्याच्या पाहणीसाठी येणारे अधिकारीही उमाळे लागलेले पाहून खूष झाले. त्यांनी प्लास्टिक शीटही न अंथरण्याचा सल्ला दिला. रामूचा तोही खर्च वाचला. अनुदानावरच त्याचे शेततळे झाले. पाण्याची सोयही झाली. पावसाळ्यात शेततळे भरले. भाता बरोबरच तो आता जनावरांच्या चाऱ्याची पिके घेऊ लागला. उसाचीही लागवड त्याने केली. बारमाही पिके शेतात डोलू लागल्याने उन्हाळ्यात ओसाड असणारा परिसर हिरवाईने फुलला होता. अनेक प्रकारची फळझाडेही आता बांधावर डोलू लागली होती. बारमाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. एका शेततळ्याने रामूला आर्थिक संपन्नता दिली होती.
पाण्याची सोय झाल्याने विविध प्रकारची पिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा खटाटोप रामूने सुरू केला. कृषी महाविद्यालयातील शेतकरी शास्त्रज्ञ मंच्यामध्येही तो सहभागी झाला. तेथे त्याला शेतीतील नवनवे तंत्रज्ञान समजू लागले.
एका एकरात 100 पिके ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेता येऊ शकतात. असे तंत्रज्ञान करणारे शेतकरीही त्याला शास्त्रज्ञ मंच्यात भेटले. घरात लागणारे सर्व धान्य शेतातच पिकवायचे. विकत काहीही आणायचे नाही. विषमुक्त अन्न निर्मिताचा हा विचार रामूलाही पटला. त्यानेही एका एकरात सेंद्रिय पद्धतीने 100 वर पिके घेण्याचा निर्णय घेतला. ही पिके कशी पिकवली जातात याचे तंत्र त्याने आत्मसात केले. यासाठी त्याने चार देशी गायीही पाळल्या. शेततळ्याच्या शेजारीच त्याने गोठा बांधला. शास्त्रोक्त पद्धतीने पिकांचे नियोजन केले. वाऱ्याची दिशा पाहून पिकांचे नियोजन केले. उंच पिके पश्‍चिमेकडे लहान उंचीची पिके पूर्वेकडे असे नियोजन त्याने केले. शेतात उत्तम सूर्यप्रकाश राहील अशा पद्धतीने त्याने आखणी केली. शेतातील विजेच्या खांबाशेजारीही वाया जाणाऱ्या जागेत त्याने पिके घेण्याचे नियोजन केले. विजेच्या खांबाभोवती उंच मातीचा ढिगारा रचून त्यावर कंदवर्गीय रताळी आदी पिके त्याने घेतली. भाजीपाल्याचेही नियोजन त्याने केले. एका एकरात भात, गहू, तूर, भाजीपाला, अशी जवळपास 100 वर पिके त्याने घेतली. घरात दररोज ताजा भाजीपालाही मिळू लागला. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्याने रासायनिक खतांचा खर्च वाचला. कीडनाशकासाठी फवारण्याही सेंद्रिय पद्धतीनेच होऊ लागल्याने विषमुक्त अन्न निर्मितीही होऊ लागली. घराच्या आरोग्या बरोबरच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांचेही आरोग्य जोपासले जात असल्याने त्याचेही पुण्य त्याचा पदरी पडले. विविध पिकांचा त्याचा अभ्यास झाला. बियाणे संवर्धनाचाही उपक्रम त्याने राबविला. देशी उत्तम प्रकारचे बियाणे त्याने साठविले. शेतात लागणारे सर्व बियाणे तो स्वतः उत्पादित करू लागला. यामुळे देशी बियाण्यांचे संवर्धनही त्याच्याकडून होऊ लागले. एका एकरात पाच माणसांचे कुटुंब चालवता येऊ शकते हा विचार त्याने प्रत्यक्षात करून दाखवला होता.
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा खटाटोप मात्र त्याचा सुरूच होता. शेतात असणाऱ्या शेततळ्यात त्याने मत्स्यसंवर्धन केले. पावसाळ्यात ऑगस्टमध्ये शेततळ्यात मासे सोडून एप्रिल मे मध्ये त्यांचे उत्पन्नही त्याला मिळू लागले. अवघ्या नऊ महिन्यात त्याला मत्स्यसंवर्धनातून काहीही न करता लाखोंची कमाई होऊ लागली. माशांना लागणारे खाद्यही शेतातच पिकत होते. त्याचाही खर्च नव्हता. केवळ उत्पन्नच उत्पन्न मिळू लागले. पाच वर्षात त्याने शेततळ्याच्या जोरावर केलेली भरभराट पाहण्यासाठी आता आसपासचे शेतकरीही येऊ लागले. राज्यभरात त्याच्या या प्रगतीची चर्चा सुरू होती. अवघ्या एका शेततळ्याने त्याला इतके संपन्न केले होते.

Tuesday, May 12, 2015

समर्थांचा धर्मवीरास बहुमोल सल्ला

इतिहास ही काही कथा नाही. कादंबरीकारांनी इतिहासाचे कथानक केले. यातून खरा इतिहासही झाकला गेला. याबरोबरच अनेक वादाचे प्रसंग उभे राहिले. अशा वादात न पडता. इतिहासातून आपण चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात. इतिहासातील थोर पुरुषांकडून आपण आदर्श घ्यायला हवा. त्यांचे व्यक्तीमत्व अभ्यासायला हवे. त्यांनी दिलेले सल्ले अभ्यासायला हवेत. आपण सल्ला कोणाला देतो ? जो आपला लाडका आहे. आपला जवळचा आहे. ज्याच्याबद्दल आपणाला आपुलकी वाटते. अशा व्यक्तीलाच आपण सल्ला देतो. समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजे यांना त्याच तळमळीने सल्ला दिला. समर्थांनी संभाजीराजे यांना पाठवलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श संभाजीराजांनी पाळावा. त्यानुसार त्यांनीही तडाखेबाज राज्य करावे. नावलौकीक मिळवावा, हीच तळमळ व्यक्त केली आहे. शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत राज्यकारभार करावा, यासाठी समर्थांनी केलेला हा प्रयत्न निश्‍चितच मार्गदर्शक आहे. आजच्या काळातही आजचा राजकर्त्यांसाठी तो मार्गदर्शक असाच सल्ला आहे.
संभाजीराजे हे धार्मिकवृत्तीचे होते. पण त्यांच्या ताठर आणि रागीट स्वभावामुळे अनेक माणसे दुखावली गेली. शिवरायांच्यानंतर राज्य सांभाळताना त्यांना या स्वभावाचा तोटा झाला. राजाचे व्यक्तीमत्व कसे असावे? त्याने कसे वागावे? कसा कारभार करावा? कोणत्या चुका होत आहेत? त्यावर कशी मात करायला हवी. याबाबत समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजांना सल्ला दिला होता. हा सल्ला आजच्या काळातही राज्यकारभार करणाऱ्यासाठी उपयुक्त आहे. इतिहासात काय घडले, यापेक्षा इतिहासातून आपण काय शिकलो. हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तीमत्त्वातून हेच शिकायला हवे. त्यांचे घेण्यासारखे विचार आपण आत्मसात करायला हवेत. रामदास स्वामी शिवरायांना भेटले होते का? यापेक्षा त्यांनी शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वातील कोणते पैलू मांडले आहेत. त्यांचा कोणता आदर्श त्यांनी सांगितला आहे? हे इतिहासातून शिकायला हवे. यावर अधिक विचार व्हायला हवा. शिवरायांचा पराक्रम जरी आठवला तरी खचलेल्या मनाला संजिवनी मिळते. मराठी भाषेचे हेच तर सामर्थ्य आहे. रांगडी भाषा असा लौकिक इतर कोणत्या भाषेत आहे सांगा ना? दगडालाही पाझर फोडण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे. समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी यातून बहुमोल सल्ला घ्यायला हवा. राज्यकारभार करताना राग, द्वेष बाजूला ठेऊन राज्य कारभार करावा. हा आदर्श जरी घेतला, तर आज आंदोलनात होणारे सर्वसामान्यांचे, शासनाच्या वास्तूंचे, बस-गाड्यांचे नुकसान टळू शकेल. दहशत माजवली म्हणजे राज्य हस्तगत होते हा गैरसमज आहे. दहशतीने प्रश्‍न सुटत नाहीत उलट बिघडतात. मिळालेले राज्यही जाऊ शकते. यासाठी राज्य कारभार करताना सावधान असावे लागते. चिंतन, मननासाठी एकांताची आवश्‍यकता आहे. दुरदृष्टीचा विचार अंमलात आणण्यासाठी साधनेची गरज आहे. क्षमा, शांतीने कारभार करायला हवा. जनतेच्या भावना ओळखायला हव्यात. जनतेच्या गरजा समजून घ्यायला हव्यात. त्यांचे प्रश्‍न अभ्यासायला हवेत. जनतेचे संघटन महत्त्वाचे आहे. एकीमध्ये ताकद आहे, हे ओळखून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आदर्श जोपासायला हवा. ही जनसेवा आहे. सेवेचा धर्म जोपासायला हवा. सेवा सोडली, तर तो व्यापार होतो. झोकून देऊन काम करायला हवे. वेळप्रसंगी त्यागासही सामोरे जायला हवे. ही शिकवण, हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व्यक्तीमत्व आपण इतिहासातून शिकायला हवा. राजे राज्यकारभार करताना कसे बोलायचे, कसे वागायचे, कसा व्यवहार करायचे हे आजच्या पिढीसाठी निश्‍चितच आदर्श आहे. त्यांचे हे व्यवस्थापन निश्‍चितच मार्गदर्शक आहे. 

Sunday, May 3, 2015

अभ्यास

म्हणोनि अभ्यासासि कांही । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागीं माझां ठायीं । अभ्यासें मिळ ।। 113।। अध्याय 12 वा 


अध्यात्माचा अभ्यास हा सुद्धा एक भक्तीचा प्रकार आहे. साधना करायला जमत नाही. मन साधनेत रमत नाही. काही हरकत नाही. त्यात निराश होण्याचे काहीच कारण नाही. आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योगाचा मार्ग कठीण आहे. शरीराला यामुळे यातना होतात. त्यासहन कराव्या लागतात. अशाने कधीकधी दुःखच पदरी पडते. मग अशा कठीण मार्गाने जाच कशाला? आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक सोपे मार्ग आहेत. साधना हा सुद्धा सोपाच मार्ग आहे. पण सध्याच्या बदलत्या काळात साधना करायला ही वेळ नाही. चोवीस तास काहींना काही तरी मनात सुरु असते. अशाने मन शांत कसे होईल. घरात आले तर टि. व्ही. सुरु असतो. तो पाहायचे नाही म्हटले तर फोनवर व्हॉट्‌स अप, फेसबुक सुरू होते. फोन तर मिनिटा मिनिटाला वाजतो. जेवतानाही फोन वाजतो. अशाने जेवनाकडे लक्ष कमी फोनकडेच लक्ष अधिक असते. अशा या बदलत्या परिस्थितीत मनच शांत होणे कठीण आहे. या मनाला शांत करण्यासाठी साधना करायचे म्हटले तरी तो मार्ग कठीण वाटतो. कारण डोळे मिटल्यावर डोक्‍यात विचारांचा खेळ सुरू होतो. विचार थांबतच नाहीत. हे करायचे आहे. ते करायचे आहे. मग डोळे मिटून कसे चालेल. झाले साधना भंग झाली. मन शांतच होत नाही. झोपत सुद्धा विचार घोळत असतात. अशाने मानसाला आता अनेक विचार जडले आहेत. याचाही विचार करायला मानसाला वेळ नाही. इतका माणूस कार्यमग्न झाला आहे. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? पण साधना होत नाही म्हणून निराश होण्याची काहीच गरज नाही. आत्मज्ञान प्राप्ती केवळ अभ्यासानेही साध्य होते. अध्यात्माचा केवळ अभ्यास करूनही आत्मज्ञान हस्तगत करता येते. ज्ञानेश्‍वरी वाचन हा सोपा मार्ग आहे. त्यात सांगितलेल्या ओव्यांचा अभ्यास करणे हा सुद्धा भक्तीचा मार्ग आहे. अध्यात्माचा अभ्यास करूनही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरुंची कृपा असेल तर अभ्यासानेही ज्ञान प्राप्ती होते. अभ्यासाने सद्‌गुरूंशी एकरूपता साधली तर आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. बदलत्या काळात हा सोपा मार्ग नव्या पिढीने आत्मसात करायला हवा.