Tuesday, March 17, 2020

जय जय स्वसंवेद्या ।


सद्‌गुरू आत्मज्ञान विकासासाठी त्याचे बीज अनुग्रहाद्वारे शिष्यामध्ये लावतात. हे बीज हळूहळू विकसित होते. तो शिष्य आत्मज्ञानी होतो. त्या नराचा नारायण होतो. त्याला देवत्व येते. इतके सोपे, सहज हे अध्यात्मशास्त्र आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

 ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। अध्याय 1 ला

स्वतःच स्वतःला ओळखणे ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. येथून अध्यात्माच्या प्रगतीला सुरवात होते. स्वतःला ओळखायचे म्हणजे नेमके काय? मी कोण आहे? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारावा. मी राजा आहे. मी भिकारी आहे. मी उद्योगपती आहे. मी कारखानदार आहे. मी राजकीय नेता आहे. अशी एखादी ओळख आपली आहे का? जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे का? आपले नाव, आपला व्यवसाय ही आपली ओळख आहे का? ही सर्व ओळख देहाची आहे. देह जन्माला आल्यानंतर त्याचे नामकरण केले जाते. तो काही कर्मे करतो. यातूनही त्याची ओळख निर्माण होते. मग मी म्हणजे देह आहे का? देह हा पंचमहाभूतांपासून तयार झाला आहे. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि गगन ही पंचमहाभूते आहेत. मृत्यूनंतर देह पंचत्वात विलीन होतो. मग आपली ओळख काय? देह जन्मतो, मृतही होतो. पण देह जिवंत कशामुळे असतो? त्याच्यात चैतन्य कसे येते ? ते काय आहे ? जिवंतपणा म्हणजे तरी काय ? श्‍वास आत येतो, बाहेर जातो ही क्रिया जोपर्यंत सुरू असते तोपर्यंत देह जिवंत असतो. ही क्रिया थांबली की देह म्हणजे निर्जीव वस्तू आहे. मग देह ही आपली ओळख कशी असेल. ही सुद्धा आपली ओळख नाही. देहाला जिवंतपणा कशामुळे येतो. देहात आत्मा आल्यानंतर देह जिवंत होतो. आत्मा देहातून गेल्यानंतर देह मृत होतो. मग मी म्हणजे कोण आहे ? मी एक आत्मा आहे. आत्मा ही आपली ओळख आहे. मी आत्मा आहे. पण हा आत्मा प्रत्येक देहात आहे. प्रत्येक देहात असलेला आत्मा वेगळा आहे का ? तो एकच आहे. मग सर्वांच्या ठिकाणी आत्मा हा एकच आहे. तर मग सर्वच जण हे एक आहेत. देहात आल्यानंतर त्यांची ओळख बदलली आहे. मी देह आहे हा अहंकार त्याच्यात आला आहे. या अंहकारामुळे आत्मा हा दिसतच नाही. खरी ओळख तो विसरला आहे. स्वतःची खरी ओळख ही आत्मा आहे. ही ओळख सदैव ठेवल्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ही ओळख कायम स्मरणात राहावी, यासाठीच साधना केली जाते. साधनेने ही ओळख दृढ होते. पण यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. सद्‌गुरू हे मार्गदर्शक असतात. सद्‌गुरू आत्मज्ञान विकासासाठी त्याचे बीज अनुग्रहाद्वारे शिष्यामध्ये लावतात. हे बीज हळूहळू विकसित होते. तो शिष्य आत्मज्ञानी होतो. त्या नराचा नारायण होतो. त्याला देवत्व येते. इतके सोपे, सहज हे अध्यात्मशास्त्र आहे. सद्‌गुरूंच्या आर्शिवादाने हे शास्त्र आत्मसात होते. अशा आत्मज्ञानी सद्‌गुरुंचा जयजयकार असो. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


No comments:

Post a Comment