Friday, March 13, 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील यात्रा, जत्रांना ३१ मार्चपर्यंत बंदी


सार्वजनिक कार्यक्रम, जत्रा, उरुस आदींवर 31 मार्चपर्यंत बंदी
*जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश*

 *कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.): कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आदींवर 14 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु आदींना विधिवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही.* 
 आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बांधीत रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना विषाणूचे संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्यची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यास अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार येणार आहेत. परदेशी प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे आवश्यक आहे.
  कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, विषाणूची लागण संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस/इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोट कलम ग (c) व ड (m) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 43 लागू केले आहे. 
  जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु आदींना विधिवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही. खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतु या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. तहसिलदार किंवा मुख्याधिकारी नगरपालिका किंवा महापालिका आयुक्त  यांची त्यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यक्रमांसाठी लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
  शासकीय यंत्रणांनी अशाप्रकारे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा इत्यादीच्या आयोजना संदर्भात परवानगी देण्यात येऊ नये.
  जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद व महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त विधिवत पुजा व कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
 आदेशाचे किंवा तहसिलदार, मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अध्या गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल. यासाठी सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी व आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आले, असेही आदेशात नमूद आहे.

No comments:

Post a Comment