Tuesday, June 12, 2012

कोपार्डेच्या पाटलांनी धाडसाने उभारला स्वीटकॉर्न प्रक्रिया उद्योग

शासकीय योजनांची वाट न पाहता कोपार्डे (जि. कोल्हापूर) येथील अशोक आनंदराव पाटील यांनी धाडसाने स्वीटकॉर्न (मधुमका) प्रक्रिया उद्योग उभारला. मका उत्पादकांसोबत करार पद्धतीने उत्पादन घेतले. स्वतःसोबत परिसरातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत दिलाच शिवाय बचत गटांना रोजगार उपलब्ध केला.
राजेंद्र घोरपडे
कोपार्डे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी अशोक आनंदराव पाटील समाजशास्त्राचे पदवीधर. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीतून ते कुस्ती खेळायचे. या निमित्ताने पुण्याला दौरे व्हायचे. त्यातूनच पुण्यातील नाशिक रोडवरील फळप्रक्रिया, शीतगृहे, स्वीटकॉर्नवरील प्रक्रिया उद्योग पाहिला. असा उद्योग आपल्या गावाकडे फायदेशीर करायचा असे ठरवून ते अभ्यासाला लागले. अखिलेश मिश्रा 12-14 वर्षे याच उद्योगात कार्यरत असल्याने त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा फायदा घेतला.
"महालक्ष्मी ज्योर्तिलिंग'ची स्थापना
गावी सहकारी प्रक्रिया उद्योग उभारण्याचा अशोक यांचा विचार होता. मात्र शेतकऱ्यांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याने यश आले नाही. अखेर पुतण्या युवराज गोरख पाटील याला सोबत घेऊन "महालक्ष्मी ज्योर्तिलिंग ऍग्रो इंडिया' ही खासगी कंपनी सुरू केली. अशोक यांच्या पत्नी सौ. कमल याही त्यात भागीदार आहेत.
शीतगृहाची उभारणी
2009 मध्ये शीतगृह उभारले. अर्धा टन क्षमतेची ब्लास्ट रूम आणि 25 टन साठवणूक क्षमतेचे शीतगृह उभारण्यासाठी 30 लाख रुपये खर्च आला. याच्यासह मका प्रक्रियेसाठी बॉयलर, वॉटर सॉफ्टनर तसेच सर्व साधने असा एकूण एक कोटीपर्यंत खर्च आला. एवढी मोठी गुंतवणूक करण्यासाठी अनेक बॅंकांचे खेटे मारावे लागले. मात्र प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज देण्यास कोणती बॅंक तयार झाली नाही. अखेर शेतजमिनीवर फेडरल बॅंकेकडून 60 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केले.
स्वीटकॉर्न लागवडीचे आव्हान
सहकारी तत्त्वावर उद्योग उभारणीत आलेले अपयश पाहता स्वीटकॉर्न लागवडीचेही मोठे आव्हान अशोक यांच्या समोर होते. करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, कृषी विस्तार अधिकारी अमृत मडके यांनी शेतकऱ्यांशी करार करून स्वीटकॉर्नचे उत्पादन घेण्यासाठी अशोक यांना मदत केली. शेतकरी उन्हाळ्यात वैरणीसाठी उसात मका घेतात. मात्र स्वीटकॉर्नचे बियाणे प्रति किलो 2,000 रुपये किमतीचे आहे. एवढे महागडे बियाणे खरेदी करण्यास शेतकरी धजावत नव्हते. मात्र शेतकऱ्यांना करार शेतीचा फायदा समजून देण्यात कृषी विभागाचे सहकार्य झाले. त्यातूनच खुपिरे, शिंदेवाडी, साबळेवाडी, कोपार्डे, सांगरुळ, कुडित्रे, बाचणी, हसूर, पडळ, यवलूज, सातार्डे असे 20 ते 25 किलोमीटर गावपरिसरातील शंभरावर शेतकरी करारबद्ध झाले. शेतकऱ्यांना बियाणे अशोक पुरवितात. त्याची रक्कम स्वीटकॉर्न उत्पादनातून वळती करून घेण्यात येते.
महिला बचत गटास रोजगार
स्वीटकॉर्नचे दाणे नाजूक असल्याने यंत्राच्या साहाय्याने दाणे काढताना नुकसान होते. त्यामुळे 18 ते 20 लाख रुपये खर्चून मका सोलणी यंत्र बसविले. पण फारसा उपयोग झाला नाही. अखेर हाताने दाणे सोलण्यावरच भर दिला. यातून सांगरुळ, चिंचवडे, कोपार्डे, कुडित्रे या गावांतील महिला बचत गटांना अशोक यांनी रोजगार मिळवून दिला. एक महिला दिवसाला 100 किलो दाणे सोलते. किलोला दोन रुपये दराने एका महिलेला रोज दोनशे रुपये मिळतात. दाणे स्वतंत्र करून घेतल्यानंतर बॉयलरमध्ये त्याची प्रक्रिया केली जाते. शीतगृहात दाणे वर्षभर उत्तम प्रकारे राहू शकतात. दररोज एक टनापर्यंत स्वीटकॉर्न दाण्यांवर प्रक्रिया केली जाते.
एक टन दाणे उत्पादन- दररोजचा जमा-खर्च (रु.)
महिला कामगार पगार- 2000
प्रक्रिया कामगार पगार - 2000
वीज खर्च (दिवसाचा) - 1000 (महिन्याला 25 हजार रुपयांचे बिल)
पॅकिंग- - 2000
पाच हजार लिटर पाण्याचा वापर - 100 रुपये (वर्षाला 20 हजार रुपये खर्च)
लाकूड, जळण आदी - 100
अडीच ते तीन टन कणसे - 12,500 रुपये (टनास पाच हजार रुपये हमीभावाप्रमाणे)
इतर खर्च - 2300 रुपये
एक टन दाणे उत्पादनाचा दररोजचा एकूण खर्च - 20 हजार रुपये
दररोज एक टन स्वीटकॉर्नचे उत्पादन. सध्या किलोला तीस रुपये दर. एक टन विक्रीतून तीस हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता दिवसाला दहा हजार रुपये उत्पन्न मिळते. वर्षाला सुमारे 200 टन उत्पादन.
मुंबई, नाशिकमध्ये विक्री
स्वीटकॉर्न दाण्यांच्या पॅकेटची खरेदी नाशिक येथील कॅपिटल फूड्‌स कडून महिन्याला चार ते पाच टन तर मुंबईतील सेटवाला फूड्‌सकडून (महिन्याला) 10 टन मालाची खरेदी केली जाते. मागणीप्रमाणे विक्री होते. तीस व एक किलोच्या पॅकमध्ये कंपन्या मालाची खरेदी करतात. आवश्‍यक पॅकिंगचे साहित्यही कंपन्या पुरवितात.
स्वतःच्या ब्रॅंडसाठी प्रयत्न
उत्पादित मालाची स्वतः विक्री करण्याचा परवाना अशोक यांना अद्याप मिळायचा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तो घ्यावा लागतो. त्यानंतर स्वतःचा ब्रॅंड त्यांना बाजारात विक्रीसाठी आणता येईल. स्थानिक बाजारपेठेत तसेच मुंबई, हैदराबाद, दिल्ली येथे विक्री शक्‍य होईल. शेतकऱ्याला उद्योग करण्यात येणाऱ्या अडचणी सरकारने विचारात घेऊन विक्रीचा परवानाही त्वरित दिल्यास अनेक शेतकरी त्याकडे वळतील, असे मत अशोक यांनी व्यक्त केले.
मका उत्पादकही फायद्यात
पाच हजार रुपये टन हमीभावाने अशोक शेतकऱ्यांकडून मक्‍याची कणसे विकत घेतात. ऑगस्टपासून शेतकऱ्यांशी करार करून त्यांना बियाणे वाटण्यात येते. यंदा बियाण्यासाठी 50 टक्के रक्कम आगाऊ वसूल केली जाणार आहे. पन्नास टक्के रक्कम कणसांची खरेदी केल्यानंतर त्यातून वजा करण्यात येईल. उसात स्वीटकॉर्न घेऊन अनेकांनी तीन महिन्यांत 50 ते 70 हजार रुपयांची कमाई केली आहे.
पाच एकरातील दीड एकर उसात यंदा स्वीटकॉर्नचे आंतरपीक घेतले. दीड टन उत्पादन मिळाले. पावणे दोन किलो बियाणे लागले. त्याचा खर्च 3600 रुपये झाला. कणसांच्या विक्रीतून 50 हजार रुपये उत्पन्न मिळाले. शिवाय उन्हाळ्यात 20 हजारांचा हिरवा सकस आहार उपलब्ध झाल्याने जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ झाली. तीन ते चार फॅटचे दूध देणाऱ्या जनावरांनी ऐन उन्हाळ्यात पाच फॅटपर्यंत दूध दिले.
- विजय पाटील, शेतकरी, खुपिरे
यंदा अडीच एकर उसात स्वीटकॉर्न घेतला. दहा टन उत्पादन मिळाले. अडीच फुटांची सरी असल्याने पिकाची वाढ योग्य झाली नाही. यामुळे उत्पादनात घट झाली. दोन किलो बियाणे लागले. खर्च वजा जाता 40 हजार रुपये मिळाले.
- कुमार कापडे, शेतकरी, सांगरुळ
सीताफळ पल्पचेही उत्पादन
स्वीटकॉर्नचे उत्पादन नोव्हेंबर-जून कालावधीत घेतले जाते. ऑगस्ट-ऑक्‍टोबर काळात सीताफळ पल्पचे उत्पादन अशोक घेतात. तीन महिन्यांत सुमारे दहा टन उत्पादन होऊन किलोला 110 रुपयांपर्यंत दर मिळतो.
अशोक आनंदराव पाटील, 7588261666
कोपार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर

Sunday, May 27, 2012

शेतीत हवी फक्‍त जिद्द, मग सर्व काही होते साध्य

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पीकविविधतेतून केले प्रयोग
शेती थोडी काय नी अधिक काय? तुम्ही आवडीने त्यात समरस होऊन काम कराल तर ती तुम्हाला फायदा दिल्याशिवाय राहणार नाही? कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील विश्‍वनाथ सावर्डेकर यांनी केळी, हळद, गहू अशी विविध पिकांची विविधता जपत आपली शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरीतील निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीत झोकून दिले आहे.
राजेंद्र घोरपडे
शेतीची आवड असणारी व्यक्ती अगदी प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती करतेच. अगदी माळरान जरी असले तरी ते बागायती करून त्यातून भरघोस उत्पादन घेण्याचे सामर्थ्य दाखवणे त्यातून शक्‍य होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील विश्‍वनाथ धोंडिराम सावर्डेकर हे यापैकीच आहेत. सन 2003 मध्ये नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर ते शेतीकडे वळले. स्वतः शेतात राबून सात एकराच्या माळरानावर केळी, हळद, गहू, ऊस आदी नगदी पिके घेऊन इतरांसमोर व्यावसायिक वा नगदी शेतीचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
विश्‍वनाथ हे पेठवडगाव येथे राहण्यास आहेत. मात्र त्यांची वडिलोपार्जित सात एकर शेती पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत अंबप फाटा येथे आहे. वडील धोंडिराम हे शेती करायचे तेव्हा शेती ही कोरडवाहू होती. भुईमूग, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घेतली जात. माळरान असल्याने पाण्याची सोय नव्हती. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यामध्ये हिशेबनीस म्हणून विश्‍वनाथ यांनी 1969 ते 2003 या कालावधीत नोकरी केली. त्या काळात ते शेतीकडेही लक्ष देत. शेतीत प्रगती करायची ही त्यांची मनोमन इच्छा होतीच. यातूनच त्यांनी सन 2000 मध्ये विहीर खोदली. वडिलोपार्जित सात एकर शेती आता त्यांनी बागायती केली आहे.
गाळमातीतून सुधारणा
विश्‍वनाथ अविवाहित आहेत. त्यांचा लहान भाऊ दिलीप हा नोकरी करतो. त्यामुळे शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देणे त्यांना शक्‍य होत नाही. यामुळे विश्‍वनाथच सर्व शेती पाहतात. निवृत्तीनंतर त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. पेठवडगाव येथे पुरातन तळे आहे. जवळपास 70 वर्षांनंतर हे तळे 2003 मध्ये आटले. या वेळी या तळ्यातील गाळ काढण्यात आला. ही गाळमाती विश्‍वनाथ यांनी विकत घेतली. जवळपास एक हजार ट्रॉली काळी गाळमाती त्यांनी शेतात टाकली. दोन लाख रुपये यासाठी खर्च केले. निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाच्या पैशातून त्यांनी ही सुधारणा केली.
केळी लागवडीचा विचार
बारमाही पाण्याची सुविधा असल्याने वेगवेगळी नगदी पिके घेण्याकडे विश्‍वनाथ यांचा कल वाढला. त्याप्रमाणे उतिसंवर्धित रोपे लावून केळी लागवड सुरू केली. सन 2004 पासून अर्धा ते एक एकरावर केळीची लागवड विश्‍वनाथ करत आहेत.
पूर्वमशागत आणि लावण
दोन उभी- आडवी नांगरट करून पाच ते सात ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. सहा x सहा फुटांवर लागवड करण्यात येते. दीड महिन्यानंतर हिरवळीच्या खतासाठी ताग लावला जातो. सुमारे 50 दिवसांनंतर झाडाच्या बुंध्यात ताग मुजविण्यात येतो.
पाण्याचे व्यवस्थापन
ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची बचत होते. वेळेवर पाणी देता येते. योग्य वेळी पाणी देता असल्याने पिकांची वाढ चांगली होते. कामाचा ताण पडत नाही. पावसाळ्यात पाण्याची फारशी गरज भासत नाही. त्या वेळी मोजकेच पाणी द्यावे लागते. पाण्याची गरज पाहून साधारणपणे 15 मिनिटे ठिबक सुरू ठेवले जाते. ऑक्‍टोबरनंतर दररोज ठिबक सिंचनाने दीड तास पाणी द्यावे लागते. जानेवारी ते मे या कालावधीत दररोज तीन ते चार तास पाणी द्यावे लागते.
खताचे व्यवस्थापन
बेसल डोस म्हणून निंबोळी पेंड, डीएपी, मुख्य अन्नद्रव्यांबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात. खतांमध्ये युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, मॅग्नेशिअम सल्फेट, डीएपी, पोटॅश आदींचा वापर केला जातो.
केळी लागवडीचा खर्च (अर्धा एकरासाठी रुपयांत)
पाच ट्रॉली शेणखत - 7500
पूर्वमशागत - 4000
उतिसंवर्धित रोपांचा खर्च - 8250
खताचा एकूण खर्च - 10,000
आंतरमशागत - 6000
पाण्यासाठीचा खर्च - 2000
अन्य खर्च- 2500
काढणी - 2000 रुपये
एकूण - 42,250 रुपये
केळीतून मिळणारे उत्पन्न ः
दरवर्षी एकरी सुमारे 30 टन उत्पादन मिळते. यंदा अर्ध्या एकरात साधारणपणे 18 टन उत्पादन मिळण्याची आशा विश्‍वनाथ यांना वाटत आहे. स्थानिक बाजारपेठेतच ते केळींची विक्री करतात. सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति टन दर मिळतो. यातून एक लाख आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता 65 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.
घडांचे संरक्षण
उन्हाळ्यात घड येत असल्याने चांगली प्रत ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते. दोन ते तीन महिने केळीचा घड केळीच्या पानाने किंवा पोत्याने झाकण्यात येतो. यामुळे घडाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होऊन गुणवत्ताही टिकून राहते. मेच्या शेवटच्या आठवड्यात तोडणी येत असल्याने संरक्षणाची गरज भासतेच.
गव्हाचीही चांगली शेती
गेले सहा वर्षे विश्‍वनाथ ठिबक सिंचनावर गव्हाचे उत्पादन घेत आहेत. एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन त्यांना मिळते. यंदा त्यांनी पंधरा गुंठ्यावर गहू घेतला आहे. घरगुती वापरासाठीच त्याचा वापर होतो.
हळदीचेही नियोजन
गेली दोन वर्षे विश्‍वनाथ हळदीची लागवड करत आहेत. हळदीच्या सेलम वाणाचे एकरी 30 क्विंटल उत्पादन ते घेतात. हळदीसाठी त्यांना एकरी 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. गेल्या वर्षी त्यांनी 20 गुंठ्यांत 15 क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले. क्विंटलला त्यांना 14 हजार रुपये दर मिळाला. उत्पादन खर्च वजा जाता दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच हळदीचे बेणेही त्यांनी यातूनच राखून ठेवले. यंदा 30 गुंठ्यावर हळदीची लागवड केली आहे. साधारण क्विंटलला पाच हजार दर मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
हवे फक्त एक एकर शेत
विश्‍वनाथ म्हणतात शेतीवर तुम्ही नियमित हजर राहाल, शेतीची कामे वेळेवर कराल तर शेतीत फायदाच फायदा आहे. फक्त एक एकर बागायती शेत, दोन जनावरे आणि एक लाखाची भांडवल गुंतवणूक असेल तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर सहज चालवणे शक्‍य आहे. नोकरीची गरज भासणार नाही. फक्त कष्ट करण्याची, शेतात राबण्याची तयारी हवी. जिद्दीने शेती करण्याची मानसिकता हवी.
विश्‍वनाथ धोंडिराम सावर्डेकर, 9923116680 पेठवडगाव, जि. कोल्हापूर

Saturday, May 26, 2012

गांडूळ खत प्रकल्प एक जोड व्यवसाय

डोंगर उताराच्या मुरमाड जमिनीत ऊस शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्याचा उद्देश पाली ( ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथील अरविंद श्रीधर नानिवडेकर यांनी ठेवला आहे. यासाठी गेल्या सात-आठ वर्षात त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. यातूनच त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. स्वतःच्या जमिनीचा पोत टिकवत गांडूळ खताची विक्री करून जोड व्यवसायाचा एक वेगळा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी तालुक्‍यातील पश्‍चिम घाटाच्या रांगेत कासारी नदीकाठी पाली हे गाव वसले आहे. करंजफेन या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये या गावाचा समावेश होतो. या गावात अरविंद नानिवडेकर यांची वडीलोपार्जित 14 एकर शेती आहे. 1983 साली अरविंद एम. ए. झाले. उच्चशिक्षीत होऊनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडीलोपार्जित शेतीचा व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. अरविंद यांचे वडील श्रीधर यांना जनावरे पाळण्याचा शौक होता. वडीलांच्या काळात गोठ्यात जवळपास 60 जनावरे असत. आजही अरविंद यांच्या गोठ्यात 10 संकरित गायी, दोन संकरित म्हैशी आहेत. येथील हवामान जनावरांच्या संगोपनासाठी पोषक आहे. तसेच येथे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाईही भासत नाही. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न पशुपालनाच्या व्यवसायातून मिळविणे सहज शक्‍य आहे.
डोंगर उतारावर ऊस शेती
अरविंद यांची शेती ही डोंगरमाथ्यावर आहे. बरेचसे शेत हे उतारावर असल्याने ते पडीकच ठेवणे भाग होते. पण अरविंद यांनी या पडीक जमिनीत ऊस शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. येथील बरेचसे शेतकरी डोंगर उतारावर शेती करताना डोझरच्या सहाय्याने जमिन समपातळीत करून घेतात. यासाठी लाखो रुपये खर्च करतात. कर्ज काढून इतका खर्च करणे अरविंद यांना मान्य नव्हते. त्यांनी डोंगर उतारातच ऊस शेतीचा निर्णय घेतला. दरवर्षी करण्यात येत असलेल्या नांगरटीमधून हळूहळू ही जमिन समपातळीत करण्याकडे त्यांचा कल आहे.
अरविंद यांचे उसाचे एकूण क्षेत्र 14 एकर आहे. यातील डोंगर उतारात दोन एकर क्षेत्र आहे. यातून एकरी 25 टन उसाचे उत्पादन ते घेतात. तर इतर क्षेत्रातून एकरी 40 टन उत्पादन त्यांना मिळते. खोडव्याचे उत्पादन 30 ते 35 टनापर्यंत मिळते.
गांडूळ खत निर्मितीकडे...
डोंगर उतारात नांगरट केल्यानंतर अरविंद यांच्या शेतात माती ऐवजी मुरुमच अधिक होता. या शेतात पिके कसे उगविणार आणि यातून उत्पन्न तरी किती मिळणार? या प्रश्‍न अरविंद यांना सतावत होता. यावर कृषी मदतनीस शिवाजी ढवळे आणि तालुका कृषी अधिकारी डी. डी. धुमाळ यांनी अरविंद यांना गांडूळ खताचा पर्याय सुचविला. 2005 मध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी कृषी विभागामार्फत अनुदानही वाटप केले जात होते. गांडूळमुळे जमिनीची मशागतही होईल व सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोतही सुधारला जाईल. यासाठी अरविंद यांनी गांडूळ खत निर्मितीचा निर्णय घेतला.
शेड उभारणीसाठी शासनाचे अनुदान
अरविंद यांनी गांडूळ खताच्या निर्मितीसाठी शेडची उभारणी केली. या शेडमध्ये 20 फुट लांब, 3 फुट रुंद आणि अडीच फुट उंचीचे हौद बनविले. या हौदात गांडूळ खत निर्मितीसाठी त्यात सुरवातीला वाळलेला काडीकचरा त्यावर शेण, परत ओला काडीकचरा, त्यावर शेणकाला असे करत हौद संपूर्णपणे भरला. त्यात सतत ओलसरपणा राहील इतके पुरेसे पाणी टाकले. त्यात 25 किलो गांडुळ कल्चर टाकली. शेड उभारण्यासाठी आणि हौदांच्या निर्मितीसाठी अरविंद यांना 60 हजार रुपये खर्च आला. यात कृषी विभागाने शेड उभारणीसाठी 15 हजार रुपयांचे अनुदान दिले. तसेच दहा हजार रुपयांचे जयसिंगपूर येथील गांडूळ प्रकल्पातून गांडूळ कल्चरही उपलब्ध करून (गांडूळ बीज) दिले. चांगल्या प्रतिचे गांडूळ खत तयार होण्यासाठी साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी लागतो. दोन महिन्यानंतर हे खत काढून त्यामध्ये पुन्हा नव्याने खतासाठी शेण व कल्चर टाकण्यात येते. साधारणपणे एका हौदात दोन टन खत तयार होते. वर्षातून चार ते पाच टप्प्यात खत तयार केले जाते. खताच्या निर्मितीसाठी अर्धवट कुजलेलेच शेण ते वापरतात. ताजे शेण वापरल्यास उष्णतेमुळे गांडूळचे बीज मरून जाण्याचा किंवा गांडूळांची वाढ योग्य प्रकारे न होण्याचाही धोका असतो.
वीस टन खताचे उत्पादन
अरविंद दरवर्षी साधारणपणे 50 ते 60 टनापर्यंत खताचे उत्पादन घेतात. पण बायपास सर्जरीमुळे यंदा त्यांनी फक्त 20 टन खताचे उत्पादन घेतले आहे. खत उत्पादनातील 10 टन खत स्वतःच्या शेतीसाठी वापरतात तर अर्वरित खताची ते विक्री करतात. साधारणपणे साडेतीन रुपये किलो दराने खताची विक्री केली जाते. कोकणात शेणखताची टंचाई असल्याने फळबागांसाठी सेंद्रीय खताची टंचाई भासते. कोकणातील हे फळबागायतदार सेंद्रीय खत विकत घेऊन जातात.
कल्चरची निर्मिती
गांडुळ कल्चर निर्मितीसाठी तीन फुट रुंद दोन फुट उंच दहा फुट लांबीच्या खड्ड्यामध्ये करण्यात येते. पालापाचोळा, शेणखत टाकुन दोन महिन्यात गांडूळ कल्चर तयार केले जाते.
दुग्ध व्यवसायातून लाखाची कमाई
अरविंद यांनी गांडूळ खतासाठी जनावरांचे संगोपन केले आहे. 10 गायी, दोन म्हैशी यांच्या संगोपनातून दररोज 40 ते 50 लिटर दुध उत्पादन होते. तसेच गांडूळ खतासाठी आवश्‍यक असणाऱ्या शेणही मिळते. दररोज साधारणपणे 100 किलो शेण मिळते. अरविंद दररोज 35 लिटर गायीचे दुध व 6 लिटर म्हैशीचे दुध डेअरीला घालतात. यातून वर्षाला अडीच लाख रुपयांची कमाई होते. गांडूळ खत निर्मिती व जनावरांच्या संगोपणाचा खर्च वजा जाता यातून वर्षाला त्यांना दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
चारा व्यवस्थापन
जनावरांना बारमाही चारा मिळावा यासाठी एक एकरावर बाजरी व एक एकरावर यशवंत गवताची लागवड अरविंद यांनी केली आहे. या व्यतिरिक्त वाळलेले गवत, उसाचा पाला यांचाही वापर ते चारा म्हणून करतात.
अरविंद श्रीधर नानिवडेकर, पाली, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर. संपर्क ः 02329 - 233818

Sunday, May 20, 2012

नैसर्गिक जलस्त्रोत जपत सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न

कोल्हापुर जिल्ह्यातील येळवडीतील हरिजनवाडीत यशस्वी प्रयत्न
गावात विकासकामे करायची असतील तर गावातील सक्षम राजकीय नेतृत्व गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये केवळ राजकीय नेतृत्व चांगले नसल्याने विकासकामे खुंटलेली दिसतात. लहान लहान गावे, वाड्या वस्त्यात तर ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. कोल्हापूर जिल्ह्यातील येळवडी येथील हरिजनवाडी मात्र याला अपवाद ठरलेय. स्वत:च्या गरजा स्वत:च ओळखून ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या सहकार्याने पाईपलाईन करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला आहे. नैसर्गिक जलस्त्रोत जपत सायफन पद्धतीने पाणी गावात आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविलाच. पण दुभत्या जनावरांचीही परवड पाण्यासाठीची परवड थांबविली...
राजेंद्र घोरपडे
पश्‍चिम घाटाच्या डोंगरकपारीतील पावसाळ्यात मुबलक पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाईही भासतेच. त्यातच येथील लोकवस्तीस ग्रामपंचायत नसल्याने येथे शासनाच्या योजनांही राबविण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे या वाड्यावस्त्या विकासापासून नेहमीच वंचीत राहतात. याचा विचार करून कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने या वाडी वस्तींच्या विकासासाठी विशेष योजना आखली आहे. त्या अंतर्गत तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार लोकसभागातून तेथे योजना राबविण्यात येतात.
येळवडी हे गाव मरळे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येते. यामुळे या गावच्या वाड्यावस्त्यांच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी थेट निधी उपलब्ध होत नव्हता. दरवर्षी मार्चनंतर गावच्या वाड्या वस्त्यात पाणी टंचाई भासतेच. या गावची 200 लोकवस्ती असणाऱ्या हरिजनवाडीस पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पिण्याला पाणी नाही, तेथे जनावरांना पाणी कुठून आणणार? यामुळे वाडीचा विकासही रखडला होता. यावर जिल्हा कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सायफनने हरिजनवाडीस पाणी पुरवठा करून येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी विचार झाला. याकामी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, कृषी पर्यवेक्षक एस. व्ही. सानप, कृषी सहाय्यक एस. एस. गावडे, तालुका कृषी अधिकारी एच. वाय. इंगवले, मंडल कृषी अधिकारी एस. एम. नांगरे आदींनी यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले.
आजारपणाच्या समस्येतून मिळाला उपाय
पाण्यासाठी भटकंती ही या हरिजनवाडीस नित्याचीच होती. वाडीस कुपनलिका आहे. पण लोकवस्तीचा विचार करता कुपनलिकेवर पाण्यासाठी गर्दी होत असे. पाणी ओढून महिलांना अनेक आजारही जडले आहेत. मार्च-मे दरम्यान कुपनलिकेचे पाणी कमी होत असे. यामुळे इतर स्त्रोत्रांचा शोध घेण्याची गरज भासत असे. तीन चार किलोमिटरवरून पाणी महिलांना डोक्‍यावरून आणावे लागत होते. पाणी कमी झाल्यानंतर पाण्याचे प्रदुषणही वाढते. कावीळ, साथीचे आजारांनाही वाडीस धोका कायम होता. याचा विचार करून पाणी समस्येवर हरिजनवाडीने यावर मात करण्याचा विचार केला.
शासनाच्या कामात ग्रामस्थांचे श्रमदान
हरिजनवाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर लहु कांबळे यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. सायफनने वाडीत पाणी आणण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचा शोध घेतला. उन्हाळ्यातही जीवंत राहणारे जलस्त्रोत शोधून तेथून थेट पाईपलाईनने वाडीत पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पाणलोट विकास समिती मरळे अंतर्गत या योजनेसाठी एक लाख 97 हजार रुपयांना निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. साधारणपणे 6500 फुट पाईपलाईन टाकून वाडीमध्ये पाणी आणण्यात आले. यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी खुदाईकामात श्रमदान केले.
स्वखर्चातून पाईपलाईन
कृषी विभागाच्या सहकार्याने डोंगरातील नैसर्गिक जलस्त्रोतातून सायफनने वाडीत पाणी आणले, पण यंदाच्या कडक उन्हामुळे एप्रिलमध्ये हा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताचे पाणी कमी झाले. पुढील दीड महिन्याच्या काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये यासाठी हरिजनवाडीने स्वखर्चातून 200 फुट दिड इंची पाईपलाईन टाकून पूर्वीच्या सायफनच्या कुंडात दुसऱ्या ठिकाणच्या जलस्त्रोतातून पाणी सोडले व समस्येवर मात केली. यंदाच्या कडक उन्हातही मुबलक पाणी वाडीस उपलब्ध आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने वाडीमध्ये समाधान आहे. तसेच दुभत्या जनावरांनाही पाणी उपलब्ध झाल्याने वाडीची पाण्यासाठी होणारी परवड आता थांबली आहे.
वनविभागाच्या रोपवाटीकेला आधार
यंदा उन्हाचा तडाखा अधिक असल्याने नेहमीचे जलस्त्रोत आटले आहेत. याचा फटका पेंडाखळे वनविभागाच्या रोपवाटीकेसही बसला आहे. मार्चनंतर ही रोपवाटीका वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला. याचा विचार करून वाडीने या रोपवाटीकेस पाणी उपलब्ध करून दिले आहे. या रोपवाटीकेत मोरआवळा, जांभूळ, नरक्‍या, मोरवेल, सुरू, निलगिरी, सुबाभूळ, शिसव, बांबू आदी जवळपास एक हजार रोपे आहेत. या रोपांना वाडीने पाणी पुरवठा करून ही रोपे जगविली आहेत. वाडीने पाणी पुरवठा केला नसता तर ही रोपे तशीच वाळून गेली असती.
यंदा सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतानाही वाडीस पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत आहे. याच पाण्यावर पुढील काळात वाडीची पंचवीस हेक्‍टर जमीन बागायती करण्याचाही विचार सुरू आहे. आता पावसाने ओढ दिली तरी भातशेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने पिके वाळून जाण्याचा धोका आता टळला आहे.
- दिनकर लहू कांबळे, हरिजनवाडी, येळवडी
वाडीची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 10-20 लाखाच्या पाण्याच्या योजनेची गरज होती. पण वाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने इतके अनुदान उपलब्ध होत नाही. लोकवस्तीच्या प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. ग्रामपंचायतीमध्ये इतर गावांच्याही समस्या असतात. अशा वस्तीसाठी कमी खर्चात सायफनने पाणी पुरवठा करणेच अधिक हितावह होते. यासाठी वाडीने एकीने श्रमदान केल्याने त्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.
- एस. व्ही. सानप, कृषी पर्यवेक्षक

Saturday, April 28, 2012

शेळीपालनाने दिले रेंगडेंना बहुविध फायदे

कोल्हापूर जिल्ह्यात अडकूर (ता. चंदगड) येथील रेंगडे कुटुंबीयांनी शेतीला शेळीपालन व्यवसायाची जोड देऊन शेतीत स्थैर्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या शेळीपालनातून अनेक गोष्टी शेतकऱ्यांना शिकण्यासारख्या आहेत. शेळ्यांचे संगोपन करून विक्री आणि लेंडीखताचा शेतीत वापर हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य सूत्र आहे.
राजेंद्र घोरपडे
प्रयोगशील कुटुंब
चंदगड तालुक्‍यात रेंगडे कुटुंबीय प्रयोगशील म्हणूनच ओळखले जाते. कुटुंबातील कृष्णा रेंगडे हे कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे शेतकरी आहेत. तालुक्‍यातील "आत्मा' समितीवरही आहेत. त्यांची वडिलोपार्जित सुमारे 50 एकर जमीन अडकूर येथे आहे. कृष्णा यांना चार मुले. दोन इंजिनिअर मुले व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात. अनिल व सुनील ही जुळी मुले त्यांच्याजवळ असतात. सुनील यांचे शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनिल यांनी कोल्हापुरात पदवी घेतली. गेली सतरा वर्षे अडकूर येथे वडिलांसोबत ते शेती करतात. उसाव्यतिरिक्त आले, काजू, आंबा, आदी विविध पिके भागाने शेती लावून ते घेतात. पशुपालनाची अनिल यांना लहानपणापासूनच आवड आहे. शेळी हा प्राणी शेतकऱ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करतो, यावर अनिल यांचा दृढविश्‍वास आहे. घरात पूर्वीपासूनच दोन गाई व शेळ्या पाळल्या जायच्या. मात्र त्यातून शेतीसाठीच्या शेणखताची गरज भागत नाही असे अनिल यांच्या लक्षात आले. जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादकता वाढवायची या हेतूने त्यांनी 2006 नंतर लेंडीखतासाठी घरातील शेळ्यांची संख्या वाढविण्याचा विचार त्यांनी केला. कोकण कन्याळ, उस्मानाबादी या जाती येथील वातावरणात तग धरू शकतात. घरातच पूर्वीपासून त्या पाळल्या जात होत्या. त्यांचीच पैदास करून हा व्यवसाय वाढविला जात आहे. या अनुषंगाने अनिल यांनी शेळीपालनाविषयक विविध पुस्तके अभ्यासली. त्यानंतर त्यांनी शेळीपालन सुरू केले ते थोडक्‍यात असे :
चंदगड तालुक्‍यात शेळीपालनास पोषक वातावरण आहे. जून ते ऑगस्ट कालावधीत भरपूर पाऊस येथे असतो. या काळात बंदिस्त व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसामुळे शेळ्यांची कार्यक्षमता थंडावते. ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. यासाठी गोठ्यात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा लागतो. हवा, वाऱ्यापासून संरक्षणासाठी जाळीदार पडदे आदींची व्यवस्था करावी लागते.
व्यवस्थापन
शेळ्यांमध्ये 140 ते 145 दिवस हा गाभण काळ असतो. व्याल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनंतर त्या माजावर येतात. विण्यापूर्वी व विल्यानंतर प्रमाणशीर खाद्य, भरपूर चारा द्यावा लागतो. शेळीची उत्तम निगा राखावी लागते. हिरव्या चाऱ्यावर अधिक भर दिला आहे. मात्र उपलब्धतेनुसार मका, बाजरी, सुबाभूळ, हुंबर आदी खाद्यही देण्यात येते.
गोठा व्यवस्थापन
शेळीपालनासाठी 20 x 20 फूट आकाराचा बंदिस्त गोठा उभारला आहे. स्वच्छतेसाठी सिमेंटने कोबा करून घेतला आहे. हवेशीर वातावरणासाठी चारही बाजूने जाळ्या लावल्या आहेत. वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्याने जास्त जाडीच्या तारांचा वापर केला आहे. पावसाळ्यात तसेच रात्रीच्यावेळी गोठ्यामध्ये शेळ्या ठेवल्या जातात. इतर वेळी त्या चरायला मोकळ्या शेतात सोडण्यात येतात. 70 शेळ्या एकावेळी राहू शकतील अशा क्षमतेचा हा गोठा आहे. यासाठी जवळपास 55 ते 60 हजार रुपये खर्च आला. गोठ्यात सासनवीट ठेवण्यात आली आहे. ही क्षार व खनिजेयुक्त वीट असते. या विटेला शेळ्या चाटतात. यातून त्यांना क्षार व खनिजांचा पुरवठा होतो.
चारा लागवड
दोन एकरावर चारा लागवड आहे. यामध्ये शेळ्या मुक्तपणे चरण्यास सोडण्यात येतात. अर्ध बंदिस्त गोठ्याच्या या पद्धतीत चोहोबाजूंनी कुंपण केले आहे. कुंपणासाठी एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च आला. एका एकरावरील जागेत यशवंत गवताची लागवड आहे. अन्य एका एकरात चार सऱ्या मका, बाजरी व चार सऱ्या यशवंत गवत आहे. गवताच्या वाढीसाठी आठवड्याच्या अंतराने स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्यात येते. सहा महिन्यांतून एकरी दीडशे किलो युरिया खताचा वापर होतो.
लसीकरणास महत्त्व
चंदगड भागात मुख्यतः आंत्रविषार आणि घटसर्प या रोगांचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. या रोगांसाठी प्रतिबंधक लस टोचण्यात येते. घटसर्पसाठी मार्च- एप्रिलमध्ये तर आंत्रविषारसाठी मे-जूनमध्ये लसीकरण करण्यात येते.
लेंडी आणि मांसासाठीच संगोपन
अनिल यांच्या शेतात 23 शेळ्या आहेत. मुख्यतः लेंडी खत आणि मांसासाठीच शेळीचे संगोपन करतात. शेळीचे दूध काढले जात नाही. सर्व दूध पिल्लांनाच दिले जाते. अडीच ते तीन महिने शेळीच्या दुधावरच पिलांची वाढ केली जाते. उस्मानाबादी शेळी ही मुख्यतः मांसासाठीच पाळली जाते. नऊ ते दहा महिन्यांनंतर तिची विक्री करण्यात येते. विक्रीच्या वेळी पालव्याचे वजन साधारणपणे 20 ते 30 किलोपर्यंत भरते. अंदाजे 250 रुपये किलो दराने पालव्याची विक्री केली जाते. एका पालव्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये तरी हाती मिळतात. नरांचीच विक्री केली जाते. माद्यांची विक्री न करता त्यांचे संगोपन केले जाते. गेल्या वर्षभरात सहा पालव्यांची विक्री केली आहे. वर्षभरात अंदाजे दहा पालव्यांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संगोपनाचा जमा-खर्च
मशागत, औषधे, खते, पाणी, कामगारांवरील खर्च आणि अन्य असा वर्षाला सुमारे 12 हजार रुपये खर्च येतो. वर्षाला पालव्यांच्या विक्रीतून साधारणपणे 40 ते 50 हजार रुपये मिळतात. संगोपनासाठी साधारणपणे 20 ते 25 टक्के खर्च होतो. लेंडीखताचा वापर शेतीसाठी केला जातो. दररोज अंदाजे सहा ते सात किलो लेंडीखत मिळते. वर्षाला साधारणपणे अडीच ट्रॉली लेंडीखत मिळते. सध्या लेंडीखताच्या प्रति ट्रॉलीचा दर साडेतीन हजार रुपये आहे.
आंदोलक शेतकरी
कुक्‍कुटपालनाचा व्यवसायही अनिल यांनी केला. केवळ मांसासाठी दरवर्षी चार हजार पक्षी ते वाढवत. मात्र 2006 मध्ये बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर या व्यवसायातून ते बाहेर पडले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी त्यांचे आजही प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्यांनी आंदोलनेही केली. शासनाने बर्ड फ्लू संदर्भातील नुकसानग्रस्तांना मदत मंजूर झाल्याचे सांगितले आहे. पण अद्याप आश्‍वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. आता पुन्हा त्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सुनील यांचे संशोधन
अनिल यांचे भाऊ सुनील यांनी सोयाबीन, कोरफड यावर प्रकिया करून विविध उत्पादने मिळविण्यावर बरेच संशोधन केले आहे. सोयाबीनपासून वेगवेगळ्या स्वादामधील उदा. सोया दूध, सोया पीठ, सोया पनीर, सोया कुरकुरे, सोया बटर, सोया श्रीखंड, सोया गुलाबजामून, सोया बिअर ही उत्पादने तयार केली आहेत. ही उत्पादने कमी स्निग्ध पदार्थ आणि जादा प्रथिने व शून्य हानिकारक कोलेस्टेरॉल आहेत असा त्यांचा दावा आहे. कोरफडीपासून ज्यूस, बहुपयोगी जेल, साबण, केसांचे तेल, ओठांसाठीचे क्रीम, कोल्ड क्रीम आदी उत्पादने तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या उत्पादनांचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
.
अनिल कृष्णा रेंगडे, 9403106534 अडकूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर

Friday, April 27, 2012

आजऱ्यातील किमयागार

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्‍यात गणेश नार्वेकर यांनी पोल्ट्रीतील इंटिग्रेशन मॉडेल यशस्वीपणे राबविले आहे. गेल्या दहा वर्षांत दोन वेळा आलेले बर्ड फ्लूच्या धास्तीचे संकट आणि तेजी मंदीचे असंख्य चक्र झेलत पुढे आलेल्या उमद्या तरुणाची ही कथा
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्याचा पश्‍चिम घाटमाथा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. हिरण्यकेशी, चित्री या छोट्या छोट्या नद्यांच्या खोऱ्यातील आजरा हा पुरोगामी तालुका. घनसाळ, काळाजिरगा तांदळाचे कोठार येथीलच. 80 इंच पावसाचा हा प्रदेश. धबधबे, जंगलामुळे पर्यटनस्थळाचे महत्त्व लाभलेला. या भागात कुक्‍कुटपालन व्यवसाय करणे ही मोठी जोखीमच; पण गणेश नार्वेकर या तरुणाने अनेक संकटे झेलत, परिस्थितीवर मात करत आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. गणेश नार्वेकर मूळचे पोळगावाचे. वडिलोपार्जित 40 एकर शेती. वडील गुणाजी सोमाजी नार्वेकर हे शेतकरीच. पारंपरिक भात, ऊस हीच पिके मुख्यतः ते घेतात. आजही ते शेती सांभाळतात. गणेश यांचे प्राथमिक शिक्षण पोळगावातच झाले. दहावी आजरा हायस्कूलमध्ये झाली. 1994 मध्ये त्यांनी मौनी विद्यापीठाच्या "आयसीआरई'मध्ये इलेक्‍ट्रिकलमधून पदविका पूर्ण केली. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. त्या काळात व्यवसाय करावा असा विचारही त्यांच्या मनात नव्हता. चार-चौघांप्रमाणे तेही नोकरीच्या मागे लागले. मुंबईत नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. औद्योगिक मंदीचा तो काळ होता. त्यामुळे नोकरी मिळविणे हे आव्हानच होते. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1999 मध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दोन वर्षे त्यांनी नोकरी केली; पण काहीतरी वेगळे करण्याचा इरादा असणारे गणेश नोकरीत रमू शकले नाहीत. नोकरीत वेगळे करण्याची धडपड सुरूच होती. यातून स्पर्धा वाढत राहिली. कटकटी वाढल्या. नोकरीत फारसे आव्हानात्मक काहीच वाटत नव्हते. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याने मनासारखे काहीच घडत नव्हते. काही गोष्टी पटत नसूनही गप्प बसावे लागत होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा विचार केला.
गावी गणेश यांचे बंधू राजेश हे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होते. दहा ते पंधरा हजार पक्षी ते सांभाळत. त्यांच्यासोबत या व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आजऱ्यापासून जवळच मेंडोली येथे कुक्कुटपालनासाठी स्वतंत्र जागेची पाहणी केली. येथील शेती तुकड्या तुकड्यांची. एकरात चार-चार भागीदार. त्यामुळे जमिनी खरेदीसाठी सुमारे 15 जणांना एकत्र करणे गरजेचे होते. त्यातील अनेकजण मुंबईत नोकरीला. बैठकांवर बैठका झाल्या. या सर्वांची सहमती मिळविण्यातच त्यांचे चार महिने लोटले. अखेर जमीन खरेदी झाली.
अति पावसाचा प्रदेश असला तरी येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासतेच. कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला बारमाही पाण्याची गरज. टॅंकरने पाण्याची सोय करून ते परवडणारे नव्हते. अखेर कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. पण 200 फुटांपर्यंत नुसती मातीच लागली. सलग चार दिवस बोअर मारल्यानंतर सुमारे 700 फूट खोलीवर चांगले पाणी लागले. पाण्याची व्यवस्था झाली.
माळरान, जवळपास वस्ती नसल्याने कामगार कामावर येण्यास कचरत. वन्यप्राण्यांच्या भीतीने रात्रीच्यावेळी तेथे राहायलाही कोणी तयार होत नव्हते. वाहतुकीची सोयही नव्हती. अशा अडचणीमुळे गणेश यांनाच फार्मवर थांबावे लागे. हॅचरीचा विचार सतत घोळत असल्याने हा दोन-तीन महिन्यांचा अवघड कालावधी कसा लोटला हे त्यांना समजलेच नाही. सुरवातीची दोन-तीन वर्षे केवळ या व्यवसायाचा अभ्यास करण्यातच गेली. व्यवसाय करताना कामगारही माहीतगार असण्याची गरज आहे. या डोंगरी भागात माहीतगार कामगार नव्हते. पण आलेल्या कामगारांना घडविण्याची जिद्द त्यांनी बाळगली. पुण्यातील भारतीय पोल्ट्री व्यवस्थापन संस्थेमध्ये तीन कामगारांना स्व खर्चाने प्रशिक्षणासाठी त्यांनी पाठविले. कामगारांना शिक्षित केल्याने व त्यांची योग्य साथ मिळाल्याने त्यांच्या अनेक समस्या सुटल्या.
"व्यंकटेश फार्मिंग' नावाने हॅचरी सुरू केली. पण उबविण्यासाठी लागणारी अंडी विकत घेण्यासाठीच पैसे नव्हते. त्यामुळे नवेच संकट गणेश यांच्यासमोर उभे होते. बॅंकांच्या चकरा मारून पैसे गोळा केले. दोन-तीन महिने सतत बॅंकांचे उंबरे झिजविले. आज हा कागद राहिला उद्या तो कागद आणा. असे करून पैशाची जोडणी त्यांना करावी लागली. अंडी बंगळूरहून विकत घ्यावी लागत होती. पाच रुपयांना एक अंडे मिळत होते. एक पिलू तयार करण्यासाठी आठ ते नऊ रुपये खर्च होत होते. त्यातच स्थानिक स्पर्धकांनी दर पाडले. त्यांनी पिलांचा दर चार रुपयांपर्यंत खाली नेला. त्यामध्ये गणेश यांचे नुकसान झाले. तोटा सहन करूनही त्यांनी व्यवसाय सांभाळला. 2002 मध्ये हॅचरीत आठवड्याला दहा ते 20 हजार सेट घेत होते. पुढे त्यांनी ब्रीडर फार्म सुरू केला. एका पक्षाला 600 ते 700 रुपये खर्च येत होता. त्या पैशाची व्यवस्था मका, सोया व्यापाऱ्यांकडे पत ठेवून केली. या व्यापाऱ्यांनी त्यांना मोठे सहकार्य केले. त्यांच्याच आधारावर आज मोठा व्यवसाय त्यांनी उभा केला.
आव्हाने असतील तर व्यवसाय जोमात वाढतो, असे म्हणतात. गणेश यांच्याही बाबतीत तसेच घडले. आव्हानावर आव्हाने येत होती. व्यवसाय चांगला सुरू होता त्यातच बर्ड फ्लूचा दणका बसला. विकत घेण्याचे सोडा, कोंबडी फुकट घेण्यासही कोणी तयार नव्हते. शेवटी लोकप्रबोधन करण्यासाठी त्यांनी आजरा तालुक्‍यात प्रथमच चिकन महोत्सव आयोजित केला. त्यात 20 रुपयांना कोंबडी विकली गेली. परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या फडकऱ्यांना कोंबड्या स्वस्तात विकल्या. एका कोंबडीसाठी 60 रुपये खर्च असूनही 20 रुपयांना विकणे भाग पडले. काही कोंबड्या मारून पुराव्याही लागल्या. यात जवळपास 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाले. पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही. सोडून काहीच करता येणे शक्‍य नव्हते. आज ना उद्या धंदा भरभराटीला येईल या आशेनेच गणेश पावले टाकत राहिले. त्याशिवाय पर्यायही नव्हता. जानेवारीत स्टेट बॅंकेचे 80 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. पण पैसे हातात आले नव्हते. त्यातच फेब्रुवारीत बर्ड फ्लूची साथ आली होती. बॅंकेने पैसे देण्यास टोलवाटोलव सुरू केली. मे-जूनच्या दरम्यान बर्ड फ्लूचा प्रभाव कमी झाल्यानंतर बॅंकेने मंजूर रक्कम दिली. हाच एक मोठा आधार त्यांना मिळाला. त्यानंतर मात्र व्यवसाय वाढत गेला. 2005 पर्यंत दुचाकीवरूनच फिरणारे गणेश यांनी व्यवसाय वाढल्यानंतर चारचाकी घेतली. 2009 पर्यंत भावासोबत भागीदारी करून व्यवसाय केला. त्यानंतर राजीवने त्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. आता या व्यंकटेश फार्मिंगच्या व्यवसायामध्ये गणेश यांच्या सोबत त्यांची पत्नी अपर्णाही भागीदार आहेत.
आठवड्याला एक लाख पक्षी वाढविण्याची क्षमता गणेश यांनी ठेवली. पक्षांची वाढ करण्यासाठी भागातील शेतकऱ्यांनाही धंद्यात सामावून घेतले. गडहिंग्लज, चंदगड, दड्डी, बेळगाव, निपाणी आदी ठिकाणच्या जवळपास 125 शेतकऱ्यांना पक्षी संगोपनासाठी दिले जातात. पक्ष्यांच्या वाढीसाठी लागणारे खाद्य, औषधे आदींचा पुरवठा "व्यंकटेश फार्मिंग'मधून केला जातो. वाढविलेले पक्षी साडेतीन रुपये किलोने विकत घेतले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीची भीतीही राहात नाही. 2009 मध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरवातीच्या काळात कोणीही शेतकरी समोर येत नव्हते; मात्र आज अनेक शेतकरी या धंद्यात येण्यास इच्छुक आहेत. विश्‍वासर्हतेमुळेच धंदा वाढतो, हाच यातून अनुभव गणेश यांनी घेतला.
हवामानबदलाच्या परिणामांनाही गणेश यांना सामोरे जावे लागत आहे. तापमानवाढीमुळे मरतूक वाढली आहे. उन्हाळ्यात मालाला योग्य दर मिळत नाही. विक्रीवरही परिणाम होतो. पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्यातील जीवजंतूंचे प्रमाण वाढते. रोगराईचा धोकाही संभवतो. मुख्यतः आजऱ्याच्या हवामानात आर्द्रता अधिक आहे. हे हवामान पोल्ट्री उद्योगाला पोषक नाही. पण यावर कृत्रिम उपाय योजून हा व्यवसाय करता येणे शक्‍य आहे. संरक्षणासाठी पडदे लावले आहेत. गटारीतील पाण्याचा योग्य निचरा व्हावा, याची त्यांनी काळजी घेतली आहे.
व्यवसाय वाढवताना संपर्क वाढविणे गरजेचे असते. विपणनच्यादृष्टीने ते महत्त्वाचे आहे. पूर्वी फक्त गोव्यालाच माल पाठविला जात होता. आता मुंबई, पुण्यापासून कोल्हापूर, हुबळी, बेळगाव, रायबाग आदी ठिकाणीही उत्पादनाची विक्री केली जात आहे. कामगारांचे व्यवस्थापनही योग्य प्रकारे ठेवले जाते. त्याच्या कुवतीनुसारच त्याला काम दिले जाते. आजच्या घडीला 300 कामगारांमध्ये 100 महिला कामगार येथे काम करतात. कामगारांना वेळेत पगार दिला की विश्‍वास वाढतो. कामगारांच्या येण्याजाण्याची व्यवस्थाही गणेश यांनी केली आहे. खरे तर व्यवसायामध्ये कामगार हीच खरी गुंतवणूक आहे. कामगारच उत्पन्न मिळवून देतात. त्यासाठी त्यांची विशेष काळजी येथे घेतली जाते. तसे कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गणेश यांनी स्कॉडबुक ठेवले आहे. पण तो व्यवस्थापनाचा भाग आहे. शंभर चांगल्या गोष्टी करताना काही चुका त्यांच्याकडून होत असतात. त्या पोटात घालून चुका होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी भर दिला आहे. कामगारांच्या लाभलेल्या समर्थ साथीमुळेच पोळगाव येथे दुसरी हॅचरी सुरू करण्याचा गणेश यांचा प्रयत्न आहे. 2002 मध्ये आठवड्याला 10 ते 20 हजार अंड्यांचे हॅचिंग करत होते. आता एक लाखापर्यंत हॅचिंग करण्याची क्षमता ठेवली आहे. दुसरी हॅचरी सुरू करून दोन लाखांपर्यंत हॅचिंगची क्षमता वाढविण्याचे गणेश यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Thursday, April 26, 2012

ऊस उत्पादनातील "शतक'

अनेक वर्षांच्या परिश्रमाने साधले ऊस उत्पादनातील "शतक'
ऊस पीक स्पर्धेत सातत्याने पटकावला क्रमांक; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आदर्श शेती
2010 - 11 मध्ये पूर्वहंगामी उसाचे सुमारे 106 टन उत्पादन घेऊन शिरोळच्या (जि. कोल्हापूर) श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत सतीश नामदेव ढवळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेली तीन-चार वर्षे ऊस शेतीच्या पीक स्पर्धेत ते सातत्याने क्रमांक पटकावत आहेत. ऊस शेतीत सातत्याने त्यांचे प्रयोग सुरू आहेत. यामुळेच गेल्या काही वर्षांत त्यांना एकरी 50 ते 60 टन मिळणारे उत्पादन आता शंभर टनांपर्यंत पोचले आहे.
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीकाठची जमीन सुपीक आहे. पावसाळ्यात पंचगंगेला दोनदा पूर येतो. यामुळे पूरक्षेत्रात मुख्यतः उसाचीच लागवड केली जाते. या उसाला उताराही चांगला मिळतो. मळीचा ऊस गोडीला चांगला म्हणून त्याची ख्याती आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यात रुकडी येथील ढवळे कुटुंबीयांची एकूण 16 एकर शेती आहे. त्यामधील नामदेव ढवळे आपल्या सतीश व संजय या मुलांसमवेत शेतीची जबाबदारी सांभाळतात. सुरवातीच्या काळात उसाचे एकरी 50 ते 60 टन उत्पादन त्यांना मिळत होते. शेती भरपूर असल्याने त्यांनी नदीच्या पूरक्षेत्रात येणारी जमीन ऊस शेतीतील प्रयोगासाठी निवडली. त्यामध्ये त्यांचे विविध प्रयोग सुरू असतात. या प्रयोगांतूनच त्यांनी गेल्या काही वर्षांत शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत विविध पारितोषिके पटकावली आहेत. सतीश यांच्याप्रमाणेच भाऊ संजय यांनीही 2009-10 च्या खोडवा पीक स्पर्धेत फुले - 265 जातीचे एकरी 70.233 टन उत्पादन घेऊन क्रमांक पटकावला आहे. गेल्या 20-22 वर्षांच्या मेहनतीनंतर आता एकरी शंभर टन उत्पादनाच्या पल्ल्यापर्यंत सतीश पोचले आहेत. वडील आणि भावाच्या सहकार्यामुळेच ही प्रगती झाल्याचे ते म्हणतात. त्याचबरोबर श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एम. आर. कोरिया, ऊस विकास अधिकारी डी. बी. जाधव, अमर चौगुले, कृष्णात पाटील यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभले. गेल्या वर्षीच्या पीक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळालेल्या उसाचा खोडवा त्यांच्या शेतात उभा आहे. उसाची संख्या 38 ते 40 हजारांपर्यंत आहे. यंदा एकरी 70 ते 75 टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा सतीश यांचा अंदाज आहे.
त्यांच्या लागवड व्यवस्थापनाचे नियोजन असे -
...अशी केली पूर्वमशागत
उसाचा खोडवा गेल्यानंतर शिल्लक पाला जाळला नाही, तर रोटर मारून त्याची कुट्टी केली. दोन वेळा खोल नांगरट केली. दोन वेळा तव्याचा कुळव व दोन वेळा कुरी मारली. 20 एप्रिल रोजी सरी सोडून ताग पेरला. जमीन तांबडी असून पूर क्षेत्रात आहे, त्यामुळे पूर येऊन गेल्यानंतर लावण केली जाते. 24 ऑगस्टला आडसाली ऊस लावताना साडेचार फुटांवर सरी सोडली. दोन डोळ्यांचे टिपरे वापरले. सुमारे 4500 बेणे लावणीसाठी लागले. 500 बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरले. बऱ्याचदा शेतामध्ये अनेक ठिकाणी उसाची उगवण योग्यप्रकारे होत नाही. गवताळ वाढ होते किंवा काही ठिकाणी उगवणच होत नाही. अशा ठिकाणी डाली भरून घेणे गरजेचे असते. यासाठी ही रोपे तयार केली जातात. अंदाजे 300 रोपे वापरली जातात. 500 मध्ये जवळपास 100 रोपे खराब होतात.
मशागतीचे व्यवस्थापन
लावणीनंतर 14 व्या दिवशी लावण किती झाली याची पाहणी करून साधारणपणे 75 ते 80 टक्के लावण योग्य प्रकारे झाल्याचे आढळले. या वेळी एक पोते युरिया दिला. 25 व्या दिवशी उगवण न झालेल्या ठिकाणी डाली भरली. त्यानंतर 45 व्या दिवशी गवताळ वाढ झालेल्या ठिकाणी पुन्हा डाली भरली. पिकाच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर केला. 19ः19ः19 सारख्या विद्राव्य खताचा वापर केला. पुणे - मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या जिवाणूखताचा वापर केला.
पाणी व्यवस्थापन
पावसाळ्यात पाणी देण्याची गरज भासत नाही. थंडीच्या दिवसांत 15 दिवसांच्या अंतराने एकसरी आड पाणी दिले जाते. थंडीमध्ये जास्त पाणी दिल्यास वाढ खुंटण्याची शक्‍यता असते. जवळपास पंधरा फेब्रुवारीपर्यंत थंडी असते. त्यानंतर 15 दिवसांनंतर कमीत कमी पण वेळेवर पाणी दिले. साधारणपणे 15 ते 17 पाण्याच्या पाळ्या होतात. जूननंतर पाणी देणे बंदच करतो. त्यानंतर तोडणीपर्यंत पाण्याची गरज भासत नाही. 20 नोव्हेंबरला तोडणी झाली. तोडणीवेळी एका उसाचे सरासरी वजन तीन किलो होते.
उत्पादनवाढीला हे घटक पूरक ठरले
पाला न जाळणे, रोटरने पाला कुट्टी करून जमिनीत गाडल्याने पिकास खत होते
तागाचे पीक घेतल्याने हिरवळीचे खत पिकास मिळते
रासायनिक खत आणि जिवाणू खतांचा योग्य समतोल साधल्यानेही पिकाची वाढ जोमदार होते
पाणी कमीत कमी (अर्थात गरजेनुसार) पण वेळेवर दिल्यास पिकाची वाढ उत्तम होते
जमिनीची एक ते दीड फुटापर्यंत खोल नांगरट केल्याचाही पिकास फायदा होतो.
एकरी खर्चाचा तपशील (रुपये)
दोन भांगलण्या..... 2000
ताग मोडणे (दोन वेळा).... 1000
रासायनिक खत मजुरी..... 1200
पाणी देण्याची मजुरी..... 1500
डाली सांधणे (दोन वेळा).... 400
लावणीसाठीचा खर्च.... 2000
फवारणीचा खर्च....... 6505
खताचा खर्च...... 9050
पाणी पट्टी.... 5000
उन्हाळी औत...... 9000
भरणी..... 2000
बियाणे..... 3500
एकूण खर्च 43,155 रुपये
मिळालेले उत्पादन ः एकरी - 106.158 मे. टन
मिळालेला भाव ः 2300 रुपये प्रति क्विंटल
एकूण उत्पन्न ः दोन लाख 44 हजार 163 रुपये
खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा ः सुमारे दोन लाख रु.
क्रमांकाने मिळवले यश
(श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पीक स्पर्धेत ढवळे यांचे यश)
2007-08 - पूर्व हंगामी लागवड ऊस पीक स्पर्धेत को - 86032 जातीचे एकरी 95.981 मे. टन उत्पादन - प्रथम क्रमांक
2008-09 - उसाच्या खोडवा स्पर्धेत को - 86032 या जातीचे एकरी 64.160 मे. टन उत्पादन - प्रथम क्रमांक
2010-11 - पूर्व हंगामी लागवड ऊस पीक स्पर्धेत फुले 265 या जातीचे 106.158 मे. टन उत्पादन - तृतीय क्रमांक
फिनिक्‍स भरारी
2005 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात सोयाबीनचे पीक गेले. यामुळे जवळपास 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीने सतीश निराश झाले; पण मनाचा धीर सोडला नाही. खंबीर मनाने त्याच शेतात त्यांनी ओलीवरच मिरचीची लागवड तीन हजार रुपयांचे तरू आणून केली. यात त्यांना 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अति पावसामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले तरी त्याच शेतात मिरचीची लागवड करून झालेले नुकसान भरून काढले. सतीश म्हणाले, की शेतकऱ्यांनी नुकसानीच्या काळात मनाचा समतोल ढळू न देता खंबीरपणे योग्य वेळ साधणे गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य पिकाची निवड करून वेळ साधल्यास झालेले नुकसानही भरून काढता येते.
सतीश नामदेव ढवळे - 9657113012
रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

Sunday, April 22, 2012

शेती विकासासाठी हवेय "एएमसी' मॉडेल

कृषी पदवीधारकांनाही रोजगार शक्‍य; कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फरांदे यांची संकल्पना
राजेंद्र घोरपडे
सध्या पदवी घेऊन बाहेर पडणारे कृषी पदवीधर त्यांच्या ज्ञानाचा वापर शेती विकासासाठी फारच कमी करतात. राज्यातील एकूण कृषी पदवीधरांमध्ये शेती किंवा शेतीशी निगडित क्षेत्रात काम करण्याऱ्या कृषी पदवीधरांचे प्रमाण अंदाजे 10 टक्केच आहे. त्यामुळेच शेतीच्या विकासाला फारशी चालना मिळत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी कृषी पदवीधरांना रोजगाराची संधी देणारी "वार्षिक देखभाल व निगा राखणारे कंत्राटदार' (एएमसी) ही नवी संकल्पना येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांनी मांडली आहे.
सध्या कृषी क्षेत्रातही पदवीधरांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे; पण या क्षेत्रातील पदवीधरांना स्वयंरोजगार देणारे तंत्र शिकवले तर त्यांना त्याचा निश्‍चितच उपयोग होईल. या दृष्टीने ही नवी संकल्पना डॉ. फरांदे यांनी मांडली आहे. याविषयी अधिक तपशील सांगताना प्राचार्य फरांदे म्हणतात, ""वार्षिक देखभाल आणि निगा राखणारे कंत्राटदार (एएमसी) हा तीन ते चार कृषी पदवीधरांचा गट असेल. तो गट गावच्या शेती विकासासाठी नियुक्त केला जाईल. गावातील शेतीचे नियोजन हा गट करेल. गावातील शेतकऱ्यांना फवारणी, खतांचे नियोजन, सुधारित तंत्रज्ञान आदीची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देईल. शेतकऱ्यांना शेती करताना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची सोडवणूक करेल. शेतमालाच्या विक्रीचेही नियोजन करेल.''
प्राचार्य फरांदे यांच्या म्हणण्यानुसार पिकावर मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव होतो तेव्हा कीड आटोक्‍यात आणणे कठीण जाते. अशा वेळी "एकात्मिक कीड व्यवस्थापना'ची गरज असते. नुसते एका शेतावर कीडनाशकाची फवारणी करून कीड आटोक्‍यात येत नाही. या पद्धतीत एएमसीचा गट त्या किडीची पाहणी करून योग्य ते कीडनाशक सुचवेल. यामुळे कृषी सेवा केंद्राकडून त्यांच्याकडील साठा संपविण्यासाठी विकली जाणारी कीडनाशके यावर आळा बसेल. चुकीच्या उत्पादनांच्या होणाऱ्या खरेदीवर प्रतिबंध बसेल. कीडनाशकांच्या एकत्रित फवारणीने गावातील संपूर्ण कीड आटोक्‍यात आणणे शक्‍य होईल. यामुळे उत्पादनावर निश्‍चितच परिणाम झालेला दिसेल.
सध्या ग्रामीण भागात सेंद्रिय खतासाठी खोदले जाणारे खड्डे हे शास्त्रोक्त नसतात. एएमसीचा गट शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांना देऊन योग्य नियोजनाबाबत मार्गदर्शन करीत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सेंद्रिय खताचे खड्डे कसे खोदावेत? सेंद्रिय खत कसे तयार करायचे? याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन जागेवरच मिळाल्याने होणाऱ्या चुका टाळता येतील, असेही श्री. फरांदे यांनी सांगितले.
एएमसीचे संभाव्य फायदे
कृषी पदवीधरांना रोजगाराची नवी संधी
शेतकऱ्यांना बांधावरच नवे तंत्रज्ञान उपलब्ध
>
शेतीतील चुका कमी होऊन उत्पादनात वाढ
खत, पाणी, कीडनाशके यांचा योग्य वापर
शेतीसाठी आवश्‍यक खत, पाणी आदीचे नियोजन सुलभ
शेतीतील खर्च कमी करण्यास मदत
पडीक जमिनींच्या विकासास चालना
नियोजनामुळे शेतमालाला योग्य भाव देणे शक्‍य
कृषी सेवा केंद्रांकडून होणारी फसवणूक थांबविणे शक्‍य
गटशेतीस प्रोत्साहन

प्रोफेशनल शेतीकडे...

शेतीचे बदलते रूप यामुळे ग्रामीण भागाचे चित्र पालटत आहे. पण झपाट्याने वाढणाऱ्या इतर क्षेत्रामुळे वाढत्या महागाईचा सामना करण्याची ताकद शेतीमध्ये निर्माण व्हायला हवी. तरच शेती भावी काळात तग धरू शकेल. यासाठी नवनव्या पद्धतींचा विकास व्हायला हवा. पण पर्यावरणाचेही संवर्धन गरजेचे आहे.
- राजेंद्र घोरपडे
जवळपास इसवी सन पूर्व 8000 मध्ये शेतीचा उदय झाला. पण गेल्या सुमारे पाच हजार वर्षांमध्ये शेतीचा विकास झाला आहे. पिकांना पाणी देण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्यानंतर शेतीत मोठा बदल झाला. पण अशा या बदलांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येक मिनिटाला 50 टन सुपीक जमिनीची धूप होत आहे; तर 51 एकरावरील जंगल नष्ट होत आहे. प्रत्येक तासाला 1692 एकर सुपीक जमीन नापीक होत आहे. याबरोबरच लोकसंख्यावाढीचा वेगही वाढत आहे. प्रत्येक दिवसाला दोन लाख 30 हजार नवबालकांचा जन्म होत आहे. हा वाढीचा दर जर असाच राहिला तर 2050 पर्यंत अन्नधान्याचे उत्पादन दुप्पट करावे लागणार आहे. नाहीतर भूकबळींची संख्या वाढणार आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक तासाला 1800 मुले कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. असे आव्हान आजच्या शेतीसमोर उभे राहिले आहे. यातूनच उत्पादनवाढीसाठी नवनव्या पद्धती विकसित केल्या जात आहेत.
रासायनिककडून पुन्हा सेंद्रिय शेतीकडे
सतराव्या शतकाच्या सुरवातीला जमिनीशिवाय शेती ही संकल्पना उदयास आली होती. पाण्यावरच पिकांची लागवड केली जात होती. पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारे सेंद्रिय घटक पाण्यातूनच पिकांना मिळत असत. सध्याच्या रासायनिक शेतीला हा मोठा पर्याय ठरू शकेल, असा विचार आता पुढे येत आहे. कारण यामध्ये जैवविविधतेचे, पर्यावरणाचे मोठे संरक्षण होते. भारतामध्येही सध्या सेंद्रिय शेती या पारंपरिक शेती पद्धतीचा पुन्हा नव्याने विचार केला जात आहे. 1960 नंतरच्या हरित क्रांतीच्या संकल्पनेपूर्वी भारतात सेंद्रिय शेती केली जात होती. रासायनिक खतांचा वापर नव्हताच. रासायनिक खतामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते असे लक्षात आल्याने खतांचा वापर वाट्टेल तसा होऊ लागला. यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट झाली. पाण्याच्या आणि खताच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड होऊ लागल्या. अशा कारणामुळेच आता सेंद्रिय शेती, गांडूळ शेती या पारंपरिक शेतीकडे पुन्हा शेतकरी वळू लागला आहे.
बदलत्या पीक पद्धतीचा परिणाम
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुख्यतः नगदी पिकात झालेल्या नुकसानीमुळे झाल्या आहेत. बदलत्या ट्रेंडचा हा परिणाम म्हणावा लागेल. पाण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी आदी तृणधान्याकडे पाठ फिरविली व नगदी पिकावर भर दिला. पण शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्वारीची परंपरागत शेती करणारा शेतकरी मात्र सुखी राहिला. खराब हवामान किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे अन्न उत्पादनात घट झाली, पण मोठे नुकसान झाले नाही. ज्वारीचा धाटांचा चारा म्हणूनही वापर होत असल्याने जनावरांपासून मिळणारे उत्पादन सुरूच राहिले. यामुळे तृणधान्याचे उत्पादन घेणारे शेतकरी हे फायद्यातच राहिले. बदललेल्या ट्रेंडमध्ये ज्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला, त्यांचे दिवस फुलले; पण जे त्या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत, ते मात्र नुकसानीत गेले. यासाठी शेतकरी, अन्न सुरक्षा आणि शेत जमिनीची प्रत टिकविण्याच्या दृष्टीने मात्र तृणधान्यांचे उत्पादन हे महत्त्वाचे आहे.
वाढत्या तापमानामुळेही बदल
1901 पासून नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीत 2009 हे सर्वात उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंदविण्यात आले. गेल्या काही वर्षांत होणारी तापमान वाढ ही शेतीतील बदलास कारणीभूत ठरत आहे. तापमानवाढीचा थेट उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाण्याची कमतरता, कार्बंन डायऑक्‍साईड व तापमानवाढीमुळे तृणधान्याच्या उत्पादनात घट होत आहे. सन 2100 पर्यंत 10 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत पीक उत्पादन घट होण्याचे अनुमान आहे. तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले तर 3 ते 7 टक्के घट होते. रब्बी हंगामात उत्पादन घट मोठी होते. तापमानातील सततच्या चढउतारामुळे हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात मोठी तफावत जाणवत आहे. बदलत्या तापमानात तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करणे हे आता कृषी संशोधकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हरितगृहामुळे फूलशेतीचा विकास
हरितगृहामुळे फूल आणि फळभाज्यांच्या शेतीचे उत्पादन वाढले आहे. अद्यापही या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत जवळपास 30 हजार 924 हेक्‍टरवर फूलशेती केली जाते. तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये यामध्ये आघाडीवर आहेत. 1992-93 मध्ये भारताने 149.1 दशलक्ष रुपयांच्या फुलांची निर्यात केली होती. जगाच्या निर्यातीच्या तुलनेत हा आकडा केवळ 0.2 टक्केच आहे.
प्रक्रिया उद्योगांची गरज
फळ उत्पादनात भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्राक्षे, आंबा, संत्रा, केळी, सफरचंद आदी फळांची निर्यात भारतातून केली जात आहे. महाराष्ट्रातून अरब देशात द्राक्षाची मोठी निर्यात केली जात आहे. असे असूनही भारतातील शेतकऱ्यांना योग्य नफा या पिकांतून मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अद्यापही भारतात प्रक्रिया उद्योग म्हणावे तितक्‍या प्रमाणात विकसित झालेले नाहीत. जगात ब्राझील आणि अमेरिकेच्या खालोखाल भारतात फळाचे उत्पादन होते. पण एकूण उत्पादनाच्या केवळ 0.5 टक्केच फळावर प्रक्रिया होते. ब्राझीलमध्ये उत्पादित होणाऱ्या 70 टक्के फळावर प्रक्रिया केली जाते.
मासेपालन हा जोडधंदा
कुक्‍कुटपालन, पशुपालन हे जोडधंदे शेतीसोबत केले जात होते. पण आता मासेपालन हा जोडधंदा शेतीसोबत केला जात आहे. शासनाच्या शेततळ्यांच्या योजनेमुळे मासेपालन व्यवसायास मोठी चालना मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवा जोडधंदाही मिळाला असून ग्रामीण जनतेला पोषक आहारही मिळू शकत आहे. सद्य:स्थितीत देशाच्या एकूण उत्पन्नात 0.8 टक्के उत्पन्न मत्स्यव्यवसायाचे आहे. तसेच 90 ते 95 लाख व्यक्तींना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. शासनाने 422 मत्स्य शेतकरी विकास संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थेमुळे 1995-96 पर्यंत 3.87 लाख हेक्‍टर मत्स्य शेतीखाली आणण्यात आले असून 5.04 लाख शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
देशातील मत्स्य उत्पादन
वर्ष......मत्स्य उत्पादन
1950-51..... 7.5लाख टन
1990-91..... 33 लाख टन
1999-2000..... 56.56 लाख टन

Saturday, April 21, 2012

दानप्रसाद

येथ म्हणें श्री विश्‍वेश्‍वरावो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।
सद्‌गुरू फक्त तुमचे लक्ष मागतात. तुमचे ध्यान मागतात. अवधान मागतात. तुमचे स्थिर मन मागतात. दृढ निष्ठा मागतात. भक्ती मागतात. हे दान सद्‌गुरूं मागतात. भक्ताच्या याच दानाचे ते भुकेलेले असतात. यातूनच त्यांना तृप्ती प्राप्त होते. हे दान जो भक्त देतो त्याला सद्‌गुरूंचा आर्शिवाद निश्‍चित लाभतो. याच दानाचा स्वीकार सद्‌गुरू करतात. हे दान देण्यासाठी स्पर्धा करावी. लाखो, कोटी रुपयांचे दान देणारे भक्त आज गल्लोगल्ली भेटतात. पण असे दान देणारा भक्त भेटत नाही. संपत्ती देऊन सद्‌गुरूंचा आर्शिवाद भेटत नाही. तो एका क्षणाचा सद्‌गुरू स्मरणानेही भक्ताला सहज भेटू शकतो. तशी भक्ती, श्रद्धा मात्र सद्‌गुरूंच्यावर असावी लागते. सद्‌गुरूंना आवश्‍यक असणारे दानच भक्ताने द्यावे. सद्‌गुरू हे प्रसाद वाटायला बसले आहेत. हा प्रसाद घेण्यासाठी भक्ताने धडपड करायला हवी. सद्‌गुरूंच्या प्रेमातून सुख, आनंद ओसंडून वाहत आहे. याचा आस्वाद घेता यायला हवा. सद्‌गुरूंचा हा प्रसाद मिळविणारा भक्त नेहमी तृप्त राहातो. यासाठी ही तृप्ती टिकविण्यासाठी प्रयत्न भक्ताने करायला हवा. देवधर्माचा विचार आता कमी होत चालला आहे. लोकांचा यावर आता विश्‍वास राहीलेला नाही. मानवाला देवस्थानाचा मान देणेही अनेकांना पटत नाही. सद्‌गुरूंना देव म्हणणे हा विचारही आता मागे पडत आहे. पाद्यपुजा या गोष्टीतर आता लांबच राहील्या आहेत. ही बदलती संस्कृती गुरूंना पैशाच्या हिशोबात मोजत आहे. वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्याकाळाची परिस्थिती ठरवेल पण गुरू शिष्यांची ही परंपरा कायम राहील. हे विसरता कामा नये. कारण हे नाते पैशाने तोलता येत नाही. ते प्रेमानेच टिकते.
राजेंद्र घोरपडे,