Monday, December 16, 2019

भक्तीचा महिमा





देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले, तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे, पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. 
- राजेंद्र घोरपडे


भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये ।
तो मी तुझे जाहालो आहें । खेळणें आजि ।। 284 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - भक्त ज्या भावनेनें जेथें पाहील, त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातों, असा तो मी, तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे.

इतिहासातील अनेक गोष्टी आपणास पटत नाहीत. त्यावर विश्‍वास ठेवण्याऐवजी अविश्‍वास व वादग्रस्तपणाच अधिक वाढविला जात आहे. अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान कृष्ण होते. गोरा कुंभाराची मडकी स्वतः विठ्ठलाने वळली, तर बहिणाबाईंना जात्यावर पीठ दळायलाही त्याने मदत केली. भक्ताची भक्ती इतकी महान आहे, की येथे चक्क भगवंत त्याच्या मदतीला धावून येतो. भक्ताला त्याच्या प्रत्येक कामात सहकार्य करतो, पण सध्याच्या युगाला या गोष्टी पटणाऱ्या नाहीत.हे कसे शक्‍य आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. इतिहासात एक गोष्ट मात्र चांगली आहे. रचनाशास्त्रात मात्र या नव्या पिढीचा पराभव होतो. जगातील अनेक मंदिरे, वास्तू अशा आहेत की त्या बांधल्याच गेल्या कशा, यावर विश्‍वास बसत नाही. आहे ना गंत! होतो ना येथे पराभव! नव्या पिढीला उच्च तंत्रज्ञानाचा अहंकार चढला आहे, पण त्या काळात यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते, हे मात्र मान्य करावेच लागते. थोडा विचार केला तर या भक्तीच्या गोष्टीही मनाला पटू शकतील. शास्त्राच्या आधारावर बोट ठेवून चालणारी नवी पिढी सिद्धांतावर विश्‍वास ठेवते. त्यांना तो सिद्धांत सिद्ध करून दाखविला तरच त्यावर विश्‍वास बसतो. अध्यात्मही अनुभूतीवर चालते. अनुभूती आल्यावरच अध्यात्मावर विश्‍वास बसतो. अन्यथा देवाचे अस्तित्वच नाही, अशा भ्रामक कल्पनेत तो वावरतो. देवाचे अस्तित्व आता नव्या पिढीला कसे पटणार? आणि नवी पिढी पटले तरच स्वीकारणार. प्रल्हादासाठी देव खांबात प्रकटला. त्याने नृसिंह अवतार घेतला. आता नव्या पिढीला असा नृसिंह अवतार झाला तरच तो पटणार आहे, इतकी ही पिढी पुढे गेली आहे. देवाने नृसिंह अवतार प्रल्हादासाठी घेतला. मग यासाठी भक्त प्रल्हाद असावा लागतो. यासाठी प्रल्हाद व्हायला हवे. सर्वच जण हिरण्यकश्‍यपू झाले, तर सर्वत्र राक्षसांचेच राज्य येईल. या राज्यात प्रल्हादाची कमतरता जाणवते आहे, पण प्रत्यक्षात प्रल्हाद हा प्रत्येकात आहे. हिरण्यकश्‍यपूच्या अहंकाराने त्याचे अस्तित्व झाकले जात आहे. प्रत्येकाच्या मनातच प्रल्हाद दडला आहे. त्याचे अस्तित्व नित्य आहे. फक्त त्याची जागृती जाणवायला हवी. मनातच त्याचे अस्तित्व जागृत करायला हवे. यासाठी त्याची अनुभूती यायला हवी. मग आपोआपच विश्‍वास बसेल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



No comments:

Post a Comment