Sunday, October 27, 2019

मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।




स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत. 

- राजेेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।। 18 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - मग मी त्या योगाने सांवरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणें करून ती संतांना घालीन.

साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर साधनेत लागले तर दूरचे आवाजही स्पष्ट ऐकू येतात. साधनुेळे श्रवणशक्तीत सुधारणा होते. असे साधनेचे अनेक फायदे आहेत. यातील हा एक फायदा आहे, पण दूरच्या या आवाजांनी मन विचलित होऊ देऊ नये. मनाला सोहम्‌च्या ठिकाणीच स्थिर करणे गरजेचे आहे. हळूहळू प्रगती होत राहते. एकदम झटकी पट सर्वच मिळते, असे नाही. सध्याच्या युगात झटपट गोष्टी मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना अशाच गोष्टीत अधिक रस वाटू लागला आहे. जुन्या पिढीत असे नव्हते. जुन्या पिढीत सहनशीलता खूप होती. वृत्तपत्रात आपणास नेहमीच असे वाचायला मिळते कीे कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीतून पिकाचे नुकसान झाले. शेतमाल उत्पादकांमध्ये नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले. मालाला दर नाही आणि निसर्गामुळे नुकसान यातूनच काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण युवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी असल्याचेही काही ठिकाणी पाहायला मिळाले. ते म्हणाले की, सध्याच्या पिढीला झटपट यश मिळविण्याची हाव लागली आहे. 1985 मध्ये त्यांनी एक एकर द्राक्षबागेच्या उत्पन्नातून दीड एकर शेती विकत घेतली होती. असे यश मुलाला कमवायचे होते, पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. यात असे यश झटपट मिळणार नाही. थोडी सहनशीलता ठेवायला हवी. धीर धरायला हवा. हा विचार आताच्या पिढीत नाही. एक - दोन वर्षाच्या नुकसानीतून इतके निराश होण्याची काहीच गरज नाही. निराशा त्याने बोलूनही दाखवली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली. झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. अध्यात्माचेही तसेच आहे. काय मिळते या साधनेतून...असे म्हणून काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. तर कित्येक वर्षे काहीच मिळाले नाही म्हणून देवाला नावे ठेवतात. साधनेतून काय मिळते हा प्रश्‍न सर्वांचाच असतो. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे, हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment