Monday, October 14, 2019

संस्कार


एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत, असे अनेक प्रश्‍न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल, तर कुटुंब व्यवस्था ही टिकायलाच हवी. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

चित्त आराधीं स्त्रियेचें । स्त्रियेचेनि छंदे नाचे ।
गारुडियाचे । जैसे होय ।। 792 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणें गारूड्याचे माकड गारूड्याच्या छंदाप्रमाणे वागणारें असतें, तसा जो स्त्रीच्या चित्तानें आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो.

सध्या सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष असा भेदभावही संपला आहे. पुरुषप्रधान संस्कृती आता मागे पडत आहे. आर्थिक संपन्नतुेळे सामाजिक बदलही झाला आहे. चंगळवादी संस्कृती सध्या पाय रोवू लागली आहे. याचा कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका पोहोचू शकतो. संपन्नतेने शांती येतेच, असे नाही. उलट शांती कमी होताना दिसते. एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत, असे अनेक प्रश्‍न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल, तर कुटुंब व्यवस्था ही टिकायलाच हवी. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्री-पुरुष नातेसंबंधात बदलत होत आहे. किरकोळ कारणांनी मोठे वाद होतात, लगेचच घटस्फोट. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. तू नाही तर लगेच दुसरा किंवा दुसरी, अशी अवस्था आज संसाराची झाली आहे. चंगळवादाने अशा समस्या उद्‌भवत आहेत. तसे पाहता पूर्वीच्या काळीही असे प्रश्‍न होते, पण त्यांचे प्रमाण कमी होते. समाजाच्या चौकटीत अशांना मान नव्हता. त्यामुळे असे प्रकार कमी घडत असत. स्त्रियांच्या प्रश्‍नांवर चर्चाही केली जाते, पण स्त्री-स्वातंत्र्यामुळे उलट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्‍न मोठा झाला आहे. बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक प्रकार डोके वर काढत आहेत. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा तरच हे प्रश्‍न सुटतील. सामाजिक संस्कारांचे महत्त्व जनतेला पटवून द्यायला हवे. धर्माध्ये स्त्रियांवर टीका केली आहे म्हणून तो सोडून देणे योग्य नाही. टीका ही का केली आहे, याचा प्रथम विचार करायला हवा. टीकेमागचा हेतू जाणून घ्यायला हवा. भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. स्त्री-पुरुषांनी समाजात वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत, हे त्यामध्ये सांगितले आहे. हे शांती, समृद्धीसाठी सांगितले आहे. चंगळवादी संस्कृतीवर मात करण्याचे सामर्थ्य या विचारात आहे. यासाठी याचा अभ्यास करायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment