Sunday, June 23, 2019

अमरत्वाचे सिंहासन

अहिंसेचा मार्ग स्वीकारून मनाची शांती टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सत्याचा आग्रह धरायला हवा. सद्‌गुरू शिष्याला सत्य काय आहे, याची अनुभूती देतात. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसवितात. अमरत्वाचे हे सिंहासन ते देतात.
- राजेंद्र घोरपडे


जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानी भुवन । अमरावती ।। 320 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - ज्या स्वर्गात न मरणें हेंच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखें वाहन आहे व अमरावतीनगर ही राजधानी आहे.

सद्‌गुरू कृपेनंतर नराचा नारायण होतो. अज्ञानाच्या अंधकारातून तो बाहेर पडतो. आत्मज्ञानाच्या सिंहासनावर तो विराजमान होतो. त्याला अमरत्व प्राप्त होते. मुळात तो अमरच असतो, पण अज्ञानामुळे तो भरकटतो. सध्या देशात नवनवीन तंत्रज्ञानाने बराच विकास झाला आहे. तसेच त्यात प्रगतीही होत आहे. आपला देश आता महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे सांगितले जाते; पण दुसरीकडे दारिद्य्ररेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे, असेही स्पष्ट केले जाते. मग नेमके आपण आहोत कोठे? जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशाने नेका कोणता विकास साधला, हेही एक गूढच आहे. जनतेचे अज्ञान दूर करून जो राज्यकर्ता प्रगती साधतो, तोच खरा समाजसेवक असतो. त्याचे नाव अमर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात असे राज्यकर्ते होते म्हणूनच आपण स्वतंत्र झालो. स्वार्थ त्यांच्यामध्ये नव्हता. निःस्वार्थी वृत्तीने त्यांनी देशासाठी स्वतःचा त्याग केला. देशाचे स्वातंत्र, देशातील जनतेला स्वातंत्र हेच त्यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यांनी कधीही राजकारण केले नाही. दुसऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इतरांना दुखावलेही नाही. त्यांच्या मनात अहिंसा नांदत होती. अहिंसेच्या मार्गाने ते लढले. सत्याचा आग्रह मात्र त्यांनी सोडला नाही. म्हणूनच ते महात्मा झाले. अमर झाले. अमरत्वाच्या सिंहासनावर ते विराजमान झाले. अशा राज्यकर्त्यांची सध्या देशाला गरज आहे. जनतेला ज्ञानी करणारे राज्यकर्ते हवेत. अध्यात्मातही तसेच आहे. स्वार्थ सोडायला हवा. त्यागाचा मार्ग अवलंबला पाहिजे. अहिंसेचा मार्ग स्वीकारून मनाची शांती टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सत्याचा आग्रह धरायला हवा. सद्‌गुरू शिष्याला सत्य काय आहे, याची अनुभूती देतात. शिष्याचे अज्ञान दूर करून त्याला त्यांच्या पदी बसवितात. अमरत्वाचे हे सिंहासन ते देतात. तेच खरे सद्‌गुरू असतात. त्यांची परंपरा पुढे चालते. आदिनाथापासून सुरू झालेली संत परंपरा आजही तशीच पुढे सुरू आहे. ती अमर आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment