Tuesday, June 18, 2019

होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।।



लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रूपांतरण करता येत नाही किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे, याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही
- राजेंद्र घोरपडे

तैसा संसारु तया गांवा । गेला साता पांडवा ।
होऊनी ठाके आघवा । मोक्षाचाचि ।। 198 ।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, त्याप्रमाणें ज्या परमात्मस्वरूपीं मुक्कामाला हा ( दुःखरूप देहबुद्धयादिसंघातरूपी) संसार पोंचला असतां, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच ( दुःखशून्य व सुखरूप असा) होऊन राहातो.

जन्माला आलो म्हटल्यानंतर जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी या कराव्याच लागतात. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग तो सर्वसामान्य असो की मोठा असो किंवा साधुसंत असो. त्याला या गोष्टींची गरज भासतेच; पण माणसाला जगण्यासाठी याची किती आवश्‍यकता आहे, याचा विचारही प्रत्येकाने करायला हवा. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगामी काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार, हे निश्‍चित आहे. वस्त्राच्या बाबतीतही हीच स्थिती निर्माण होणार आहे आणि निवाराही मिळणे कठीण होणार आहे. सध्या लोक शहराकडे धाव घेत आहेत, पण काही कालावधीनंतर हेच लोक शहरातील धकाधकीला कंटाळून खेड्याकडे वळतील. गावातील शांतता त्यांना आकर्षित करेल. त्यांना जर शांत गावांची ओढ लागली, तर पुन्हा धकाधकीच्या शहरात ते येणारही नाहीत. शहराचा ते सहजच त्याग करतील. परमार्थासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी काही जण संसाराचा त्याग करतात. संसार हा होत असतो. परमार्थ मात्र करावा लागतो. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सर्व गोष्टी स्वतःहून आपल्याकडून करवून घेतल्या जात असतात. त्या करताना त्यात कंटाळा करून चालत नाही, पण परमार्थ हा करावा लागतो. माऊली येथे आयता मोक्ष सांगत आहेत. संसार न त्यागताही मोक्ष कसा मिळवायचा, हे सांगत आहेत. लोखंडापासून सोने वेगळे केल्यानंतर पुन्हा त्याचे लोखंडात रूपांतरण करता येत नाही किंवा उसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा त्यापासून ऊस तयार होत नाही. तसे देह आणि आत्मा हा वेगळा आहे, याची अनुभूती आल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा अडकणार नाही. आत्मा हा अमर आहे. देहाचा मृत्यू होतो. आत्माचा नाही. तो आत्मा आता पुन्हा देहात अडकणार नाही, ही अनुभूती आल्यानंतर तो जन्म-मरणाच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईल. यासाठी मनातील विचार महत्त्वाचे आहेत. मनात कोणते विचार चालतात, हे महत्त्वाचे आहे. ते शांत कसे करता येतील, याचाही विचार मनात डोकावायला हवा. यासाठी मी कोण आहे? याचा विचार करायला हवा. यातूनच सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळतात.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


No comments:

Post a Comment