Wednesday, February 6, 2019

व्यवहाराचा नियम


अध्यात्मात योग्य शिष्यांचीच प्रगती होताना दिसते. निरुपयोगी शिष्य आपोआपच या मार्गातून बाहेर पडतात. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. सद्‌गुरू शिष्याचे अवधान पाहूनच त्याला मार्गदर्शन करत असतात.

घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।
तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ।। 51 ।। अध्याय 10 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे घगरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त भरावे त्याप्रमाणे तू ऐकावे असेच वाटू लागले.

सद्‌गुरू शिष्याचे अवधान पाहतात. वेळोवेळी ते शिष्याला उपदेश करत असतात. त्याचे पालन शिष्य करतो का नाही याचे निरीक्षण ते करतात. त्या उपदेशांनी त्याच्यामध्ये कोणता फरक पडला याचाही विचार ते करतात. मातीचे नवीन मडके आणल्यानंतर त्या मडक्‍यात प्रथम थोडे पाणी घालून पाहावे लागते. ते मडके गळके आहे का? याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना? सद्‌गुरूही हेच पाहतात. शिष्याला केलेल्या उपदेशाचा उपयोग होत नसेल तर त्याला आणखी उपदेश करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामध्ये काहीच फरक पडणार नसेल तर त्यावर वेळ तरी का खर्च करायचा? मोठ्या कंपन्यामध्ये एका कामगारांवर वर्षाला किती खर्च केला जातो. याचा ताळेबंद मांडला जाते. त्यानुसार तो त्या कामास पात्र आहे की नाही हे ठरविले जाते. खर्चाच्या प्रमाणात तो काम देत नसेल तर तो कामगार कंपनीसाठी निरुपयोगी ठरतो. त्याला काढून टाकण्याशिवाय कंपनीला दुसरा पर्याय नसतो. अशा कामगारांना पोसून कंपनीची प्रगती कशी होणार? शेवटी उत्पन्नावरच कंपनीची प्रगती ठरत असते. उत्पन्न कसे वाढवता येईल हा मुख्य उद्देश असतो. निरुपयोगी कामगारांना काढून त्यांच्या जागी त्यांच्यापेक्षा कमी पगाराची व उत्तम काम देणारी माणसे निवडण्यावर कोणत्याही कंपनीचा भर असतो. हा व्यवहाराचा नियम आहे. अध्यात्मात योग्य शिष्यांचीच त्यामुळे प्रगती होताना दिसते. निरुपयोगी शिष्य आपोआपच या मार्गातून बाहेर पडतात. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. सद्‌गुरू शिष्याचे अवधान पाहूनच त्याला मार्गदर्शन करत असतात. कंपनीमध्येही कामगारांवर लक्ष ठेवणारा स्वतंत्र विभाग असतो. कामगाराचे कामांमध्ये लक्ष नसेल तर, कंपनी त्याला निरुपयोगी ठरवते. सद्‌गुरूही शिष्यावर लक्ष ठेवतात. प्रगती करणाऱ्या शिष्यांना प्रोत्साहन देतात. दुर्लक्ष करणाऱ्यांना मात्र वगळले जाते. यासाठी आपणही व्यवहाराचे हे नियम पाळून आपली प्रगती साधायला हवी. जीवनाचे हे नियम अध्यात्म असो व दैनंदिन व्यवहार असो सर्वाठिकाणी सारखेच आहेत. त्याचे पालन हे व्हायलाच हवे.


No comments:

Post a Comment