Monday, February 4, 2019

म्यां हालविल्या


ही शक्ती म्हणजे प्राण आहे. जीव आहे. तो देहात कसा आला आणि कसा गेला हे विज्ञान सिद्ध करू शकत नाही. तो देहात आणण्याचे सामर्थ्यही विज्ञान करू शकत नाही. ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल.

म्यां बोलविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।
म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळितां ।। 283।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - मी बोलविल्याने वेद बोलतो, मी चालविल्याने सूर्य चालतो, मी हालविल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो.

विज्ञानाचे विचार जिथे संपतात, तेथून अध्यात्माला सुरवात होते. अवकाशाच्या पोकळीला अंत नाही. विज्ञानही हा अंत शोधू शकलेले नाही. येथे विज्ञानाची मर्यादा संपते. तेथून या विश्‍वाच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्यासाठी अध्यात्म शास्त्राचा विचार सुरू होतो. पूर्वीच्या काळात मृत्यूला सुद्धा रोखण्याचे सामर्थ मनुष्यामध्ये होते असे सांगितले जाते. आपण या घटनांना सध्या दंतकथा म्हणून सोडून देतो. संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदविले ही सुद्धा आपण दंतकथा समजतो. पण बारकाईने विचार केला तर यातही तथ्य आहे. संगीताच्या तालावर गायीचे दूध देण्याची क्षमता वाढते, काही पिकांचे उत्पादन वाढते. हे सिद्ध झाले आहे. ज्ञानेश्‍वरीचे सामुदायिक पारायण सुरू असलेल्या ठिकाणी वातावरणात फरक जाणवतो. तेथे गेल्यानंतर विचार बदलतात. वृत्तीमध्ये फरक पडतो. ते शब्द फक्त कानी पडल्यानंतर हा फरक जाणवतो. मग प्राण्यांचे हंबरणे का बदलणार नाही? तितके सामर्थ्य त्या काळातील योगी पुरषांमध्ये निश्‍चितच असू शकेल. विज्ञानाने हा चमत्कारही सिद्ध करता येऊ शकेल. पावसाची दिशा बदलण्याचे सामर्थ्यही योगी पुरूषांमध्ये होते, असे सांगितले जाते पण सध्या सिद्धता असेल तरच त्यावर भाष्य करणे योग्य आहे. शक्‍यतेच्या गोष्टी सध्या पटत नाहीत. त्याला अंधश्रद्धाही म्हटले जाते. सध्या हे आपण सिद्ध करू शकत नाही त्यामुळे या दंतकथा समजल्या जातात. रेड्या ऐवजी रेडे नावाची व्यक्ती असेल असेही सांगितले जाते. पूर्वीच्याकाळी वेद पठणाचा अधिकार फक्त काही समाजासच होता त्यामुळे रेडे नावाच्या व्यक्तीने वेद म्हटले तर ते आश्‍चर्य होऊ शकते. पण यामुळे मुळ विचाराला बगल दिली जाते. ही अद्‌भुत शक्ती, सामर्थ्य याला बगल मिळते. पण ही शक्ती म्हणजे प्राण आहे. जीव आहे. तो देहात कसा आला आणि कसा गेला हे विज्ञान सिद्ध करू शकत नाही. तो देहात आणण्याचे सामर्थ्यही विज्ञान करू शकत नाही. ही शक्ती सर्वांना मान्य करावीच लागेल. कारण हा प्राण प्रत्येक सजिवात आहे. तोच सर्वत्र व्यापलेला आहे. सर्वांचा ठायी असणारा प्राण हा एकच आहे. सर्वत्र जाणवणारी शक्ती ही तीच आहे. या शक्तीच्यामुळेच जगातील व्यवहार सुरू आहेत. अगदी सूर्यही या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. तेथे असणारी शक्तीही तीच आहे. हे जग त्यामुळेच अस्तित्वात आहे. या शक्तीचे अस्तित्व हे स्वीकारायलाच हवे. भले त्याला देवत्व मानले नाही तरी चालेल पण ती शक्ती मान्य करायलाच हवी.

No comments:

Post a Comment