Sunday, February 17, 2019

तयाचें आम्हां व्यसन


मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावावी लागते. वाईट गोष्टींची सवय केव्हा लागली याची कल्पनाही येत नाही. पण चांगल्या गोष्टी लागण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. तसे वातावरण निर्माण करावे लागते. सर्वसंपन्नता असणाऱ्यांनाही अनेक वाईट व्यसने असतात. चांगल्या संस्कारित वातावरणात वाढलेलेही अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय हा एकमेव त्यावरील उपाय आहे.

तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान ।
किंबहुना समाधान । तो मिळे तैं ।। 188 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे त्याची जेव्हा आम्हांस भेट होते तेव्हांच आम्हाला समाधान वाटते.

व्यसन हे वाईट गोष्टींचेच असते असे नाही. काही चांगल्या गोष्टींचेही व्यसन असू शकते. कोणाला कलेचे व्यसन असते, कोणाला सतत गाणी ऐकण्याचे, टीव्ही पाहण्याचे व्यसन असते. कोणाला तंबाखू, मद्य, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थांचे सेवन आदीचे व्यसन असू शकते. व्यसनी मनुष्यास आवश्‍यक गोष्ट मिळाली नाही, तर त्यांचे मन अस्थिर होते. जीव कासावीस होतो. तो पदार्थच त्याची तहान-भूक होते. त्या पदार्थाच्या सेवनाशिवाय त्याला चैन पडत नाही. कोणत्याही कामात त्याला रस वाटत नाही. अशावेळी त्याच्याजवळ अमृत जरी आणून ठेवले तरी त्याने त्याची तृप्ती होत नाही. मनाला केवळ आणि केवळ तोच पदार्थच तृप्त करू शकतो. अशी अवस्था त्याची असते. व्यसन हे लवकर सुटतही नाही. वाईट गोष्टींच्या व्यसनाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तंबाखू खाणे आरोग्यास धोकादायक आहे. त्याचा शरीरावर वाईट परिणाम होते. या गोष्टी माहीत असूनही तंबाखू खाणे काही सुटत नाही. मद्याचेही असेच आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उधवस्थ झाले. अनेक घराणी नष्ट झाली. वाईट व्यसनाने शरीराची चिरफाड होऊनही ही व्यसने सोडण्यास त्या व्यक्ती तयार नसतात. मरण समोर दिसत असले, तरी व्यसन काही सुटत नाही. इतकी घातक व्यसने सोडण्यासाठी मनाची तयारीच करावी लागते. मनात आणले तर हे व्यसन एका क्षणात सुटू शकते. व्यसन सुटण्यासाठी मनपरिवर्तन हाच एकमेव उपाय आहे. वाईट व्यसन सुटण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी. चांगल्या गोष्टीत मन रमवायला हवे. चांगल्या गोष्टींचे व्यसन लावून घ्यायला हवे. मनात वाईटाचा विचारच येणार नाही, असा बदल घडवायला हवा. चांगल्या गोष्टींचे व्यसन लागण्यासाठी मनावर तसे संस्कार करावे लागतात. मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावावी लागते. वाईट गोष्टींची सवय केव्हा लागली याची कल्पनाही येत नाही. पण चांगल्या गोष्टी लागण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. तसे वातावरण निर्माण करावे लागते. सर्वसंपन्नता असणाऱ्यांनाही अनेक वाईट व्यसने असतात. चांगल्या संस्कारित वातावरणात वाढलेलेही अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय हा एकमेव त्यावरील उपाय आहे. आत्मज्ञानप्राप्तीचे व्यसन भक्ताला असायला हवे. त्याच्या प्राप्तीसाठी जीव कासावीस व्हायला हवा. त्यासाठी मन सद्‌गुरूंच्या अनुभूतीत रमायला हवे.


No comments:

Post a Comment