Tuesday, February 5, 2019

लवणकण


नाथ संप्रदायामध्ये सर्व जातीधर्माचे संत झाले. व्यक्ती कोणत्या जातीची आहे. यापेक्षा त्याची भक्ती किती आहे? त्याचा भाव कोणता आहे? यानुसार येथे ज्ञानदान होते. हे ज्ञान मिळवण्याची त्याची ओढ किती आहे? हेच पाहिले जाते. येथे सर्वांना ज्ञानाचा हक्क आहे.


जातिव्यक्ती पडे बिंदुले । जेव्हा भाव होती मज मीनले ।
जैसे लवणकण घातले । समुद्रामाजीं ।। 461 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - जैसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररुप होऊन, त्यांचा कणपणा नाहीसा होतो त्याप्रमांणे जेंव्हा सर्व वृत्ति मद्रुप होतात, तेंव्हा त्या जाति व व्यक्ति यांच्या नांवाने शून्य पडतें.

चव खारट आहे. पण जेवणात मीठ नसेल, तर जेवणाला चवच येत नाही. तुरट, आंबट पदार्थावर मीठ टाकले, तर त्याची गोडी वाढते. स्वतःचा अंगभूत गुणधर्म खारट आहे, पण तो इतरांची गोडी वाढवतो. अनेक मोठ्या व्यक्तींच्या यशामागे एखादा सर्वसामान्य नोकर मागदर्शक असतो मोठमोठे उद्योगपतीही अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घेत असतात. मग येथे महान कोण? कधीकधी एखादी न शिकलेली आजी सुद्धा महान तज्ज्ञांची मार्गदर्शक असते. तिने सांगितलेले सल्ले ही व्यक्ती जीवनात कधीही विसरत नाही. मग येथे हुशार कोण? प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सहाय्यकाने मोठे शोध लावल्याची उदाहरणेही आहेत. मग येथे शास्त्रज्ञ कोण? शाळेचा गंधही नसणारा कीर्तनकार उच्च पदवीधारकांना ज्ञानेश्‍वरीवर उत्तम निरूपण देताना पाहायला मिळतो. मग येथे वक्ता कोण? चौथी शिकलेली व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होऊन उत्तम प्रशासन करू शकतो. देशाच्या विकासासाठी आवश्‍यक असणारे अनेक महत्त्वाची धोरणे तो ठरवतो. देशाचा, राज्याचा विकासासाठी मोठ मोठे उद्योग उभारू शकतो. मग येथे प्रशासक कोण? सांगण्याचा हेतू इतकाच की, बाह्यरुपावरून त्या व्यक्तीचे सामर्थ कधी दिसत नसते. अंतरंगात त्यांचे कार्य काय आहे. यावर त्या व्यक्तीचे सामर्थ ठरते. तो कोणत्या जातीचा आहे? तो किती श्रीमंत आहे? या सर्व गोष्टी आत्मज्ञानी व्यक्तीच्या समोर गौण आहेत. त्यांना येथे काहीच महत्त्व नाही. यामुळेच तर चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, बाळूमामा, नामदेव अशा अनेक जातीतील व्यक्ती येथे महान संत झाले. त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. वारकरी संप्रदायाची पताका त्यांच्या कार्यामुळेच आजही ताठमानेने फडफडत आहे. यासाठी आत्मज्ञानी कोणत्या जातीचा आहे. याला महत्त्व नाही. येथे अंतरंगातील भावाला महत्त्व आहे. त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञानाला महत्त्व आहे. त्याच्या भक्तीला महत्त्व आहे. नाथ संप्रदायामध्ये सर्व जातीधर्माचे संत झाले. व्यक्ती कोणत्या जातीची आहे. यापेक्षा त्याची भक्ती किती आहे? त्याचा भाव कोणता आहे? यानुसार येथे ज्ञानदान होते. हे ज्ञान मिळवण्याची त्याची ओढ किती आहे? हेच पाहिले जाते. येथे सर्वांना ज्ञानाचा हक्क आहे. पण पैशाने आज हे ज्ञान तोलले जात आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी या पैशाचीही गरज नाही. मीठ पाण्यात विरघळल्यानंतर ते जसे पाणीरुप होते. तसे नराचा नारायण झाल्यानंतर तो नारायण स्वरूप होतो. जसे मीठ खारट आहे. पण ते पाणी रुप होते. तसे नर कोणत्याही जातीचा असो तो नारायण झाल्यावर नारायणच स्वरूपच होतो. त्याची जात येथे शुन्य ठरते.


No comments:

Post a Comment