Tuesday, December 22, 2009

कर्नाटक, आंध्रात पिकांवर परतीच्या पावसाचा घाला

कर्नाटक, आंध्रात पिकांवर परतीच्या पावसाचा घाला

परतीच्या प्रवासाला लागलेल्या मोसमी पावसाने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण केली. तीन दिवसांत जवळपास 400 मिलिमीटर पाऊस झाला. यापूर्वी असा पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामान विभागाकडे (आयएमडी) नाही, असे मत केंद्रीय जल मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी एस. पी. काकरन यांनी व्यक्त केले आहे. आयएमडीकडे 1901 पासून झालेल्या पावसाची गणती आहे. सरासरीपेक्षा 600 टक्‍क्‍यांनी अधिक पाऊस झाला, तर काही जिल्ह्यांत तो 800 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाला आहे, असे गृहखात्याच्या राष्ट्रीय आपत्कालीन निवारण व्यवस्थापन संस्थेचे डॉ. संतोष कुमार यांनी कबूल केले आहे. ही मते पाहता हवामानातील बदलाच्या परिणामांवर पुन्हा एकदा नव्याने चर्चा होण्याची गरज आहे, असे दिसते.
पूर, दुष्काळ या समस्या आपल्या देशात काही नव्या नाहीत, पण यामध्ये होणारे नुकसान कमी करता येणे शक्‍य आहे. पुरावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय करता येणे शक्‍य आहे. नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाही, पण वेळीच उपाय केल्यास त्याची तीव्रता कमी करता येणे शक्‍य आहे.
कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. काहींच्या मते हा पाऊस रब्बीसाठी फायदेशीर ठरला. काही ठिकाणी मात्र रब्बीच्या पेरण्याही वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणही आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कर्नाटकात 25 लाख हेक्‍टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तूरडाळीचे पीक 50 हजार हेक्‍टरवर होते, त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या तुरीचे भाव भडकले आहेत, त्यातच अशा नुकसानीमुळे पुन्हा भाव भडकणे व साठेबाजीसारख्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. अशा समस्यांवर वेळीच उपाय योजण्याची आवश्‍यकता आहे.
आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भाताचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम तांदळाच्या किमतीवर झाला असून, तांदळाच्या किमती भडकल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तांदळाचा भाव क्विंटलमागे 400 रुपयांनी वाढला आहे. किरकोळ विक्रीतही 36 रुपये किलोने असणारा तांदूळ आता 40 रुपये झाला आहे. खरिपात भाताचे उत्पादन 30 लाख टनांनी घटण्याची शक्‍यता निर्माण झाल्यानंतर आता धान्य कोठारांत तांदूळ शिल्लकच नाही, तसेच भाताचे मिल मालक आणि घाऊक व्यापारी यांच्यात कृत्रिम टंचाईसाठी हातमिळवणी झाली आहे.
कर्नुल हे सोना मसुरी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात खरिपात 79 हजार 340 हेक्‍टरवर मसुरी तांदळाची लागवड झाली होती. याचा विचार करता 14 लाख क्विंटल तांदळाचे उत्पादन अपेक्षित आहे; पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांना आलेल्या पुरात 50 हजार हेक्‍टरवरील भाताचे पीक नष्ट झाले. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी हेक्‍टरी 35 क्विंटल भाताची अपेक्षा ठेवली होती; पण यामध्ये आता घट होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे भाताच्या लोंब्यांना काही ठिकाणी फुटवे आले आहेत, तर काही ठिकाणी तो पडला आहे. कर्नुलमधील भाताचे नुकसान झाल्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. मुख्यतः सोना मसुरीवर याचा परिणाम जाणवत आहे. बाजारपेठेत या जातीचा पुरवठाच बंद झाला आहे. कुंदनहोलू गावात सोना मसुरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या गावातील शेतकरी पी. गौड म्हणाले, ""तुंगभद्रा नदीला आलेल्या पुरात भाताचा एक दाणाही शिल्लक राहिला नाही.'' यामुळे बाजारातील साठेबाजांना ऊत आला आहे. काही साठेबाजांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचे दिसते. अशा साठेबाजांवर त्वरित कारवाई होण्याची गरज आहे.
-------------
आंध्र आणि कर्नाटकातील नुकसानीचा तपशील ः
आंध्र प्रदेश कर्नाटक
अतिवृष्टीचा फटका बसलेले जिल्हे पाच जिल्हे ः कर्नुल, कृष्णा, गंटूर, नालगौंडा आणि मेहबूबनगर 16 जिल्हे ः बेळगाव, गुलबर्गा, विजापूर, रायचूर, धारवाड, बागलकोट, बेल्लारी, कोप्पल, हवेरी, बिदर, गदग, दावणगिरी, कारवार, कन्नडा, चिकबल्लारपूर, चित्रदुर्ग
नुकसानग्रस्त गावांची संख्या 571 4292
अतिवृष्टीमुळे दगावलेल्यांची संख्या 73 227
मृत जनावरांची संख्या 27 हजार 340 7 हजार 882
पडझड झालेल्या घरांची संख्या एक लाख 77 हजार 883 5.26 लाख
अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्र 11.34 लाख हेक्‍टर
-----------
राजेंद्र घोरपडे
............

No comments:

Post a Comment