Tuesday, December 22, 2009

डॉ. बोरलॉग यांचे अपुरे कार्य पूर्ण करायला हवे

डॉ. बोरलॉग यांचे अपुरे कार्य पूर्ण करायला हवे
.....................
अमेरिकेतील टेक्‍सास येथे नुकताच डॉ. नॉर्मन बोरलॉग स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये भारतातील हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी केलेले भाषण
.....................
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना जाणून घेण्याचा आणि त्यांच्यासमवेत काम करण्याचा विशेषाधिकार मला होता. बोरलॉग यांनी जगातील भुकेलेल्यांचा प्रश्‍न सोडविला, यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 1953मध्ये गव्हावरील तांबेरा रोगावर त्यांचे संशोधन सुरू असताना मी त्यांच्याबद्दल प्रथम ऐकले.
1963च्या मार्चमध्ये डॉ. बोरलॉग यांनी गव्हाचे पीक पाहण्यासाठी भारतास भेट दिली, तेव्हा मोटारीतून प्रवास करताना ते बऱ्याचदा गाडी थांबवत आणि शेतकऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत; तसेच पीकपाण्याची पाहणी करत. पिके आणि शेतकरी यांच्याशी त्यांचे दृढ नाते होते. गव्हावरील तांबेऱ्याचे समूळ उच्चाटन करणे हे त्यांचे ध्येय होते.
मेक्‍सिकोमध्ये डॉ. बोरलॉग यांनी शेतीवरील संशोधनाचे कार्य सुरू केले तेव्हा जगात अन्नधान्याच्या टंचाईची बिकट समस्या उभी होती. 1942-43मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळात दोन दशलक्ष लोक भुकेस बळी पडले. 1950च्या कालावधीत चीनलाही दुष्काळाचा मोठा तडाखा बसला. आफ्रिकेतील इथिओपियामध्ये दुष्काळ हा नेहमीचाच झाला होता. दुष्काळाच्या या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय बोरलॉग यांनी घेतला होता. गव्हाची निमबुटकी आणि तांबेरा रोगप्रतिकारक जात त्यांनी 1950च्या दशकात मेक्‍सिकोत शोधून काढली. याचा फायदा मुख्यतः भारत, पाकिस्तान आणि इतर देशांना झाला. या विकसनशील देशांत शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास जागृत झाला.
डॉ. बोरलॉग यांनी त्यांच्या जीवनात पाच तत्त्वांचे पालन काटेकोरपणे केले. ती तत्त्वे अशी ः तुमच्याकडे चांगले काही आहे ते दुसऱ्यास द्या, स्वतःच्या यशस्वितेवर विश्‍वास ठेवा, संकटांना थेट सामोरे जा, प्रश्‍नावर तोडगा निघेल याबाबत विश्‍वास बाळगत राहा, यासाठी स्पर्धेत उतरा आणि जिंका. या तत्त्वांचा वापर त्यांनी शास्त्र आणि कृषी विकासात केला. त्यांनी अनेक देशांतील कृषी विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. 1985मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर विशेष लक्ष केंद्रित केले.
नॉर्मन बोरलॉग या असामान्य व्यक्तिमत्त्वाला त्यांची पत्नी मार्गारेट, मुलगा विल्यम आणि मुलगी जिनी यांची मोलाची साथ मिळाली. माझ्या मते मार्गारेट यांचा बोरलॉग यांच्या हरितक्रांतीमध्ये मोलाचा वाटा आहे, पण त्यांच्या या कार्याचे गुणगान झाले नाही. त्यांच्या साथीमुळेच बोरलॉग यांना इतका लांबचा टप्पा गाठता आला.
डॉ. बोरलॉग हे एक महान संशोधकच नव्हते तर तो एक प्रेमाचा जिवंत झरा होता. त्यांच्या माणुसकीच्या कार्यात स्पर्धा, धर्म, भेदभाव किंवा राजकीय मते यांचा विचार कधीच आला नाही. 12 सप्टेंबर 2009 रोजी रात्री त्यांच्याशी झालेल्या शेवटच्या चर्चेतून ते स्पष्ट होते. या दिवशी सकाळी शास्त्रज्ञांनी त्यांना जमिनीची उत्पादकता मापण्यासाठी विकसित करण्यात आलेला नायट्रोजन आराखडा दाखविला. या वेळी ते म्हणाले, हा आराखडा शेतकऱ्यांपर्यंत न्या. यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना असणारी आपुलकी, त्यांच्यासाठी त्यांनी केलेला त्याग दिसून येतो. त्यांचे संशोधन हे केवळ शेतकऱ्यांसाठी होते. डॉ. बोरलॉग यांच्यासारखे शोध अनेक इतर कृषी संशोधकांनी लावले, पण डॉ. बोरलॉग हे त्यांच्याहून खूप वेगळे आहेत.
2007मध्ये डॉ. बोरलॉग यांना कॉंग्रेसनल गोल्ड मेडल देण्यात आले होते. या समारंभास मी उपस्थित होतो. या वेळी त्यांनी 1960 ते 2000 या कालावधीत भुकेलेल्यांची संख्या 60 टक्‍क्‍यांवरून 14 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली होती असे सांगितले, पण नंतर मात्र ही संख्या स्थिर झाल्याकडे लक्ष वेधले. अद्यापही 850 दशलक्ष जनतेला पुरेसे अन्न मिळत नाही. आरोग्यासाठी आवश्‍यक असणारी प्रथिने, ऊर्जा यापासून ते वंचित आहेत. ते पुढे म्हणाले, कोट्यवधी गरीब जनतेसाठीचा अन्नसुरक्षेचा लढा अद्यापही आपण जिंकलेला नाही.
जगभरातील शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते यांच्यासाठी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी हे कार्य अर्धवट ठेवले आहे. आता भूक मुक्तीच्या चळवळीचा झेंडा आंतरराष्ट्रीय कृषी नॉर्मन बोरलॉग संस्थेने हाती घ्यावा.
(शब्दांकन ः राजेंद्र घोरपडे)

No comments:

Post a Comment