Sunday, May 24, 2015

ब्रॅंडनेम

कोल्हापूर शहरापासून 10 किलोमीटवरवर रामूचा गाव. पंचगंगा नदीच्याकाठी असल्याने बागायती शेतीने सधन. ऊस आणि भाजीपाला अमाप, पण गेल्या काही वर्षात शेतमालाला दर नसल्याने येथील शेतीचे चित्र पालटलेले होते. दहा वर्षापूर्वी गावच्या रस्त्यावर बघाल तिकडे गुऱ्हाळ होती. पण आता एखादेच गुऱ्हाळ सुरू आहे. रस्त्यावर वाहनांपेक्षा जनावरेच दिसायची. पण आता एखादे जनावरं जरी आडव आलं तरी वाहनांच्या रांगा लागतात. इतकी परिस्थिती बदलली आहे. विकास झाला, पण कुणाचा? हे सांगणेच आता कठीण आहे. कच्चे रस्ते होते. ते पक्के झाले. पाण्याची सुविधा नव्हती. आता तर बघेल तिकडे पाणीच पाणी आहे. हाफ चड्डीवर फिरणारा शेतकरी आता फुलपॅंडमध्ये दिसतो आहे. बाहेरगावचा पाहुणा कधी भेटला तर जेवल्याशिवाय गावातून सोडत नव्हते. पण आता स्मार्टफोनवर जेवलास काय हे विचारायलाही वेळ नाही. इतकी परिस्थिती बदलली आहे. शेतमालाला दर मिळत नसल्यापासून शेतकरी काही समाधानी दिसत नव्हता. गुळाला दर मिळत नाही. भाजीला दर नाही. यामुळे नुकसानात पडलेला शेतकरी गुऱ्हाळ बंद करून बसला आहे. शेतात पिकतयं म्हणून कुटुंब तरी खाऊन पिऊन सुखी आहेत. मुलांना शिकवायचे नोकरीत धाडायचं शेतात मात्र आणायचं नायं हाच विचार आता शेतकऱ्यांच्या डोक्‍यात घुमु लागलाय.
गावची पोरं आता पुण्या-मुंबईत शिकायला आहेत. तसे रामूचाही मुलगा पुण्याला शिकायला होता. त्याला भेटायला म्हणून रामू पुण्याला गेला. घरच्यांनी जाताना सांगितले, येताना बाकरवडी आणायला विसरू नका. चितळ्यांची बाकरवडी खूप प्रसिद्ध आहे. मुलाला भेटून घरी जाण्यासाठी रामू निघाला. जाताना बाकरवडी घ्यायचे हे त्याच्या डोक्‍यात पक्क होत. बाकरवडी खरेदीसाठी रामू चितळ्यांच्या दुकानात गेला. पाहतो तर काय? पावकिलो बाकरवडीसाठी भलीमोठी रांग. बाकरवडी प्रसिद्ध आहे. हे माहित होते, पण खरेदीसाठी इतकी मोठी रांग पाहून रामू हबकलाच. अर्धा तास रांगेत थांबून बाकरवडी रामूने खरेदी केली. रांगेत थांबून रामू थकला होता. रेशनला सुद्धा आजकाल इतकी गर्दी नसते. बाकरवडीसाठी येथे रांगा लागतात. याचेच आश्‍चर्य त्याला वाटत होते. बाकरवडी खरेदी करून रामू बाहेर आला. पाहतो तर काय? वडापाव खरेदीसाठीही गर्दी. येथे काही पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड लागते. हे पाहून रामुला खूप आश्‍चर्य वाटले. चहा प्यायचा, तर अमृततुल्य मध्येच. पण त्या चहाची चवच न्यारी असते. हे ही खरे. रामू कोल्हापूरला परतताना एसटीत हाच विचार त्याचा मनात घोळत होता. पदार्थाची प्रत चांगली असेल तर त्याला मागणी असते. लोक रांगाकरून तो पदार्थ खरेदी करतात. खरेदीसाठी चढाओढ असते. यातून त्या पदार्थाचे बॅंडनेम तयार होते. कोठेही जा? तशी प्रत, ती चव मिळतच नाही. मालाला मागणी हवी असेल तर प्रत उत्तम असावी लागते. प्रत उत्तम राखली, तर मालाला बाजारपेठही मिळते आणि प्रसिद्धीही मिळते. बेळगावचा कुंदा, नृसिंहवाडीचे कवठाची बर्फी, लोणावळ्याची चिक्की हे जसे प्रसिद्ध आहे. तसे आपण आपला गूळ का प्रसिद्ध करू नये. शेतमालासाठी असा दर्जा निर्माण केला तर....रामूच्या मनात वीज चमकली.
रामू घरी परतला. पण वेगळा विचार घेऊन आला. या विचाराने रामूचे जीवनच बदलले. बाजारात पत फक्त कर्ज घेण्यासाठी नको, तर मालाच्या प्रतीचीही पत हवी. माल फक्त नावावर जायला हवा. असे उत्तम प्रतीचे उत्पादन व्हायला हवे. मार्केटिंगचा हाच तर नियम आहे. चांगले उत्पादन असेल, तर ग्राहक किंमतीचाही विचार करत नाही. शेतमालही असाच तयार करायचा. गुळाची प्रतही अशीच ठेवायची. कोणीही विचारले गूळ कुणाचा? तर "रामूचा गूळ' असा सहज उच्चार व्हायला हवा. नावावर भाजी खरेदी व्हायला हवी. तशी प्रत आपण राखायला हवी. तसे उत्पादन करायला हवे.
विचारात आले ते कृतीत आणण्यात रामू पटाईत होता. रामूने यावर अभ्यास सुरू केला. गुळाची प्रत राखण्यासाठी त्याने सर्व तांत्रिकबाबी अभ्यासल्या. त्यानुसार त्याने योग्य ते बदल केले. सेंद्रिय गुळाचे उत्पादन तो घेऊ लागला. विषमुक्त अन्ननिर्मितीचा त्याने ध्यासच घेतला. रासायनिक खतांचा वापर बंद करून त्याने सेंद्रिय पद्धतीने उसाची लागवड सुरू केली. गुळामध्येही रसायनांचा वापर त्याने थांबवला. स्वतःचा गूळ उत्तम प्रतीचा, खराब होणार नाही याची हमी देणारा, पौष्टिकता जपणारा हा वेगळाच ब्रॅंड रामूने विकसित केला. यामध्ये विविध प्रकारही त्याने तयार केले. मोदकाचा आकार, गुळाच्या स्लेट असे विविध प्रकारही त्याने तयार केले. रामुच्या गुळाचा ब्रॅंड अल्पावधीत परिचित झाला. भाजीपालाही सेंद्रिय पद्धतीने करून त्यांने भाजीपाल्याचीही प्रत सुधारली. सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय गूळ आदी सेंद्रिय उत्पादने घेणारा शेतकरी म्हणून आता रामू परिचित झाला. वाशीच्या मार्केटमधून भाजीला मागणी होऊ लागली. अल्पावधीतच त्याच्या उत्पादनांना देशभरातून मागणी होऊ लागली. थेट विक्रीही होऊ लागल्याने रामूच्या नफ्यात भर पडली. त्याचा हा व्यवसाय पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी येऊ लागले. फक्त एका बॅंडने हे सर्व घडवले. उत्पादन असे घ्या, त्याचा ठसा उमटायला हवा. त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी. शेती उत्पादनातही आपण वेगळा बॅंड करू शकतो. हेच रामूने करून दाखवले. 

No comments:

Post a Comment