Sunday, May 17, 2015

कातळाला फुटला पाझर

कोकणातील खेड्यात राहणारा रामु आयएएस झाला. त्याचे स्वप्न आता सत्यात उतरले होते. गावच्या लोकांनाही त्याच्याबद्दल आदर होता. त्याचा सत्कार गावकऱ्यांनी केला. वाटलं होत तो आता गावचा विकास करेल पण आता ते शासकीय अधिकारी झाला होता. रामूला ग्राम विकासाने झपाटले होते. आता त्याचे ध्येय होते ग्रामीण विकास योजना राबविण्याचे. बिहारमधील एका भागात तो नोकरीत रुजू झाला. सुरवातीची एक-दोन वर्षे काम समजून घेण्यातच गेली. वरिष्ठ अधिकारी असल्याने रामूला अनेक अधिकार होते. पण अद्याप त्याने याचा वापर कधी केला नव्हता. आता त्याला त्याची गरज वाटू लागली. ग्राम विकासाच्या योजना सत्यात उतरविण्यासाठी तो नियोजन करू लागला. बिहारमधील गाव विकासाचे आराखडे त्याने तयार केले. शहराकडे येणारे लोंढे कमी व्हावेत या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. गावातील लोकांना गावातच रोजगाराच्या संधी देण्याच्या योजना त्याने आखल्या. त्याची अंमलबजावणी रामूने सुरू केली. रोजगारासाठी मधमाशापालन, कुकुटपालन आदी शेतीवर आधारित जोडधंद्यांना चालना देण्यास सुरवात झाली. शासनाच्या अनुदानाच्या योजना गावात राबविण्याचे प्रयत्न सुरू झाले. याची खबर गावच्या ठाकुरांना लागली. कामगारांअभावी त्यांचे उद्योग बंद पडण्याची भीती त्यांना वाटली. त्यांनी रामूला दम दिला. गावात याल तर याद राखा मुडदे पाडू अशी धमकीही दिली. सर्वगावातील ठाकुरांची एकी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर रोज मोर्चे येऊ लागले. रामू विरोधात वातावरण निर्माण झाले. पाटणा, दिल्लीपर्यंत रामूच्या तक्रारी गेल्या. प्रत्यक्षात रामूने कोणतीही कारवाई केली नव्हती तरी त्याच्या विरोधात रान उठले. दिल्लीतील नेत्यांनी रामूला बोलावून घेतले. रामूच्या योजनांची वरिष्ठापर्यंत माहिती होती. त्यांच्या कामाबद्दल ज्येष्ठ नेत्यांनाही आदर होता. धडाडीचा अधिकारी म्हणूनही त्याची ख्याती होती. विकासपुरूष म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जायचे. पण दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांकडे रामूच्या आलेल्या तक्रारींनी तेही चक्रावून गेले. राजकारणातील मुरब्बी नेते शेवटी त्यांनी रामुलाच खडसावले. सर्व राजकीय नेते एकाच माळेचे मणी. सरकार कोणाचेही असो खाद्य खाण्यासाठी ते एकत्रच जमतात. खाद्य मिळाले की त्यांचे विचार बदलतात. पांढऱ्याच काळे करण्याचा त्यांच्या तर हातखंडाच आहे. रामूच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. कामापेक्षा दिल्लीच्या सरकारी कागदपत्रांचीच उठाठेव वाढली. रामूने आवाज उठवला तर साथ देणारे कोणी नव्हते. शेवटी तो तेथे परका माणूस. ज्येष्ठ नेत्यांनीही रामूला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. पण रामूच तरुण रक्त ते मान्य करायला तयार नव्हते. तसे या प्रकरणाने रामू दिल्ली दरबारी चांगलाच परिचित झाला होता. माणूस चांगला, काम चांगले, विकासाचे स्वप्न पण साथ नसेल तर काय उपयोग? एका हाताने टाळी वाचत नाही. रामू या राजकीय पद्धतीला वैतागला. अखेर त्याने राजीनामा ठोकला आणि तडक कोकणातला गाव गाठला. 
रामूने आता स्वतःच्या गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. रामू आता माजी अधिकारी असला तरी गावात त्याला मान होता. कोकणाला त्याचा चांगला परिचय होता. त्याच्यावर विश्‍वास होता. गावाने रामुला सरपंचपदी निवडले. बिनविरोध निवडून दिल्याने त्याला कामात उत्साह वाढला. पदाचा फायदा घेत त्याने गावाच्या विकासाच्या आराखडा तयार केला. कोकणात पाऊस जरी अधिक पडत असला तरी जानेवारीनंतर पाण्याची टंचाई भासतेच. मार्च ते मे महिन्यात याची तीव्रता वाढते. गावच्या विकासासातील हा सर्वांत मोठा अडसर होता. पाऊस असूनही नित्याची पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्याने विविध उपाय योजले. शासनाच्या योजनांचा फायदा घेत वनराई बंधारे, डोंगर उतारात पाणी अडवा पाणी जिरवा, छोटे छोटे बांध बांधून पाण्याचा साठा केला. या बांधबदिस्तीमुळे गावात असणाऱ्या आडाच्या पाण्यातही वाढ झाली. विहिरींना पाणी वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याची समस्या मिटली. पण आता आव्हान उभे राहिले ते पाणी पुरवठा योजनेचे. बाराही महिने पाणी पुरवठा करावा लागल्याने आता विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले. हे बिल भरणार कसे. याचा बोजा ग्रामपंचायतीवर पडला. साहजिकच याचा बोजा करावर पडला. ग्रामपंचायतीचे विविध कर वाढविणे भाग पडले. पाणी पट्टी वाढली. विकास केला तर हे तोटे वाढले. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सुर उमटू लागला. रामू या समस्येने वैतागला. विकास केला तर इतरही अनेक समस्या वाढतात हे त्याच्या लक्षातच आले नाही. विकासाने प्रगती व्हायला हवी अशा योजना राबविण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. गावच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी गावातीलच साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल याचा विचार तो करू लागला.
कोकणातील गावे ही डोंगर कपारीत आहेत. या डोंगर कपारीत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. उन्हाळ्यातही ते आटत नाहीत. गावात पाणी टंचाई भासू लागल्यावर याच स्रोतांतून पाणी आणले जायचे. गावापासून तीन चार किलोमीटर उंच भागात असणाऱ्या या स्रोतांचा अभ्यास रामूने केला. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत हे पाणी नेता आले तर गावाला बाराही महिने पाणी मिळेल उलट सायफनने पाणी पुरवठा झाल्याने विजेचे बिलही येणार नाही. महिलांना कूपनलिकेचे पाणी खेचावे लागणार नाही. दारात चौविस तास पाण्याचा पुरवठा होईल. अनेक समस्या मिटतील. हा विचार त्याने गावकऱ्यांनाही सांगितला गावानेही या योजनेला पाठिंबा दिला. पण डोंगरातील या स्रोतांतून पाणी आणण्यासाठी पाइपचा खर्च कोण करणार. इतका पैसा येणार कोठून? तो कसा उभा करायचा. पाणी पट्टी द्यायला ग्रामस्थ तयार नाहीत तेथे लाखाची योजना राबविण्यासाठी कसे पैसे येणार. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता होती. पण मुख्य प्रश्‍न होता तो पैशाचा? शेवटी शासनाकडे ग्रामसभेतून प्रस्ताव गेला. शासनाने एकात्मिक गाव विकास योजनेतून निधी मंजूर केला. यातून आवश्‍यक ते साहित्य खरेदी करण्यात आले. पण ते बसविण्यासाठी लागणारी मजूरी देण्यासाठी पैसा नव्हता. गावकऱ्यांची बैठक झाली. श्रमदानातून पाइप लाइन टाकायचे असे ठरले. गावातच पाइप लाइन करणारे कामगार होते. त्यांनी श्रमदानातून पाइप जोडून देण्याचे निश्‍चित केले. खड्डेही श्रमदानातून खोदण्यात आले. गावाच्या टाकीत अखेर पाणी पडले. उन्हाळा असो वा पावसाळा आता गावात बाराही महिने चोवीस तास पाणी मिळते. या पाण्याने गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. पाणी पट्टीही आकारली जात नाही. शून्य पाणी पट्टी आकारणार गाव म्हणून गावाचा राज्यभर लौकिकही झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच आता गावच्या जमिनीही बागायती झाल्या आहेत. कातळ पडीक जमीनीत आता हिरव्यागार झाल्या आहेत. बाराही महिने त्यावर पिके दिसत आहेत. गावात एसटी शिवाय वाहन येत नव्हते आता प्रत्येकाच्या दारात मोटार गाड्या दिसत आहेत. एका पाणी प्रश्‍नाच्या सोडवणूकीने इतका विकास झाला आहे. या विकासाची चर्चा आता देशभरात होत आहे. बिहारमध्येही याची चर्चा झाली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आता रामूच्या विकासाचे आराखडे पुन्हा मागवले आहेत. रामूला विकासाच्या योजना राबविण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याचे मार्गदर्शन आता तेथे घेतले जात आहे. दिल्लीवारीवर पाठविणारे ठाकूर आता रामूच्या विचारांनी गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिद्द असेल, ध्यास असेल तर कातळालाही पाझर फुटू शकतो. फक्त विचार विकासाचा हवा, ध्यास विकासाचा हवा. रामूनेही करून दाखवले आहे. शून्य पाणी पट्टी भरणारा मराठी गाव आता देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर नोंदविला गेला आहे.

No comments:

Post a Comment