Saturday, May 16, 2015

शेततळे

डोंगराच्या पायथ्याशीच रामूचे शेत होते. नदीपासून शेत दूर असल्याने फक्त कोरडवाहूच पिके होत. पावसाच्या पाण्यावर येणारे भात आणि हरभरा यावरच रामूचा चरितार्थ चालायचा. वाढत्या महागाईत इतक्‍या कमी उत्पन्नात घर कसे चालवायचे, हाच मोठा प्रश्‍न रामूला होता. पाच एकर डोंगर उतारात शेत असूनही मोठी अडचण होती. पाण्याची सोय झाली असती तर बागायती पिके घेऊन उत्पन्न वाढवता येणे शक्‍य होते. विहीर खोदून किंवा कूपनलिका मारून पाणी लागेलच याची शाश्‍वती नाही. कर्ज काढून विहीर खोदायची आणि पाणी लागलेच नाही तर काय? कर्जात बुडायचे. यामुळे रामू अस्वस्थ होता.
रामूने पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास घेतला. वारंवार तो पंचायतीमध्ये चकरा मारू लागला. पण फारसे यश त्याला येत नव्हते. काही पर्यायही सुचत नव्हते. विचारात डुंबलेला रामू चावडीवर हताश होऊन बसला होता. तेवढ्यात त्याचे समोर लावलेल्या जाहिरातीकडे लक्ष गेले. शेततळ्याच्या योजनेची जाहिरात होती. कृषी विभागाच्यावतीने ही योजना होती. विहिरी ऐवजी अनुदानावर शेततळे खोदले तर...रामूच्या डोक्‍यात प्रकाश पडला. शेततळे खोदण्याचे त्याने मनावर घेतले. शेततळ्याला फारशी जागाही लागत नाही. अर्ध्या एकरात शेततळे होऊ शकते. खर्चही फारसा नाही. ठराविक आकाराचा खड्डा खोदायचा. त्यावर प्लास्टिक शीट अंथरायचं. त्यात पाणी साठवायचे. पावसाळ्यात पाणी साठवायचे असल्याने पाणी लागले नाही. त्यामुळे श्रम वाया गेले ही भीतीही नाही. हिवाळ्यातले एक पीक जरी पाण्यावर आले तरी उत्पन्नात भर पडेल या उद्देशाने रामूने शेततळ्याचा निर्णय घेतला. डोंगराच्या पायथ्याशी शेत असल्याने रामूने वरच्या भागात तळे खोदायचा निर्णय घेतला. आश्‍चर्य म्हणजे तळाच्या दहा फुटावरच पाण्याचे झरे त्याला लागले. उन्हाळ्यात पाण्याचे उमाळे पाहून रामूलाही हायसे वाटले. पावसाळ्यात पाणी साठवायचीही गरज नाही. उन्हाळ्यात झरे फुटले होते. शेततळ्याच्या पाहणीसाठी येणारे अधिकारीही उमाळे लागलेले पाहून खूष झाले. त्यांनी प्लास्टिक शीटही न अंथरण्याचा सल्ला दिला. रामूचा तोही खर्च वाचला. अनुदानावरच त्याचे शेततळे झाले. पाण्याची सोयही झाली. पावसाळ्यात शेततळे भरले. भाता बरोबरच तो आता जनावरांच्या चाऱ्याची पिके घेऊ लागला. उसाचीही लागवड त्याने केली. बारमाही पिके शेतात डोलू लागल्याने उन्हाळ्यात ओसाड असणारा परिसर हिरवाईने फुलला होता. अनेक प्रकारची फळझाडेही आता बांधावर डोलू लागली होती. बारमाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. एका शेततळ्याने रामूला आर्थिक संपन्नता दिली होती.
पाण्याची सोय झाल्याने विविध प्रकारची पिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा खटाटोप रामूने सुरू केला. कृषी महाविद्यालयातील शेतकरी शास्त्रज्ञ मंच्यामध्येही तो सहभागी झाला. तेथे त्याला शेतीतील नवनवे तंत्रज्ञान समजू लागले.
एका एकरात 100 पिके ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेता येऊ शकतात. असे तंत्रज्ञान करणारे शेतकरीही त्याला शास्त्रज्ञ मंच्यात भेटले. घरात लागणारे सर्व धान्य शेतातच पिकवायचे. विकत काहीही आणायचे नाही. विषमुक्त अन्न निर्मिताचा हा विचार रामूलाही पटला. त्यानेही एका एकरात सेंद्रिय पद्धतीने 100 वर पिके घेण्याचा निर्णय घेतला. ही पिके कशी पिकवली जातात याचे तंत्र त्याने आत्मसात केले. यासाठी त्याने चार देशी गायीही पाळल्या. शेततळ्याच्या शेजारीच त्याने गोठा बांधला. शास्त्रोक्त पद्धतीने पिकांचे नियोजन केले. वाऱ्याची दिशा पाहून पिकांचे नियोजन केले. उंच पिके पश्‍चिमेकडे लहान उंचीची पिके पूर्वेकडे असे नियोजन त्याने केले. शेतात उत्तम सूर्यप्रकाश राहील अशा पद्धतीने त्याने आखणी केली. शेतातील विजेच्या खांबाशेजारीही वाया जाणाऱ्या जागेत त्याने पिके घेण्याचे नियोजन केले. विजेच्या खांबाभोवती उंच मातीचा ढिगारा रचून त्यावर कंदवर्गीय रताळी आदी पिके त्याने घेतली. भाजीपाल्याचेही नियोजन त्याने केले. एका एकरात भात, गहू, तूर, भाजीपाला, अशी जवळपास 100 वर पिके त्याने घेतली. घरात दररोज ताजा भाजीपालाही मिळू लागला. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्याने रासायनिक खतांचा खर्च वाचला. कीडनाशकासाठी फवारण्याही सेंद्रिय पद्धतीनेच होऊ लागल्याने विषमुक्त अन्न निर्मितीही होऊ लागली. घराच्या आरोग्या बरोबरच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांचेही आरोग्य जोपासले जात असल्याने त्याचेही पुण्य त्याचा पदरी पडले. विविध पिकांचा त्याचा अभ्यास झाला. बियाणे संवर्धनाचाही उपक्रम त्याने राबविला. देशी उत्तम प्रकारचे बियाणे त्याने साठविले. शेतात लागणारे सर्व बियाणे तो स्वतः उत्पादित करू लागला. यामुळे देशी बियाण्यांचे संवर्धनही त्याच्याकडून होऊ लागले. एका एकरात पाच माणसांचे कुटुंब चालवता येऊ शकते हा विचार त्याने प्रत्यक्षात करून दाखवला होता.
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा खटाटोप मात्र त्याचा सुरूच होता. शेतात असणाऱ्या शेततळ्यात त्याने मत्स्यसंवर्धन केले. पावसाळ्यात ऑगस्टमध्ये शेततळ्यात मासे सोडून एप्रिल मे मध्ये त्यांचे उत्पन्नही त्याला मिळू लागले. अवघ्या नऊ महिन्यात त्याला मत्स्यसंवर्धनातून काहीही न करता लाखोंची कमाई होऊ लागली. माशांना लागणारे खाद्यही शेतातच पिकत होते. त्याचाही खर्च नव्हता. केवळ उत्पन्नच उत्पन्न मिळू लागले. पाच वर्षात त्याने शेततळ्याच्या जोरावर केलेली भरभराट पाहण्यासाठी आता आसपासचे शेतकरीही येऊ लागले. राज्यभरात त्याच्या या प्रगतीची चर्चा सुरू होती. अवघ्या एका शेततळ्याने त्याला इतके संपन्न केले होते.

No comments:

Post a Comment