Tuesday, May 12, 2015

समर्थांचा धर्मवीरास बहुमोल सल्ला

इतिहास ही काही कथा नाही. कादंबरीकारांनी इतिहासाचे कथानक केले. यातून खरा इतिहासही झाकला गेला. याबरोबरच अनेक वादाचे प्रसंग उभे राहिले. अशा वादात न पडता. इतिहासातून आपण चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात. इतिहासातील थोर पुरुषांकडून आपण आदर्श घ्यायला हवा. त्यांचे व्यक्तीमत्व अभ्यासायला हवे. त्यांनी दिलेले सल्ले अभ्यासायला हवेत. आपण सल्ला कोणाला देतो ? जो आपला लाडका आहे. आपला जवळचा आहे. ज्याच्याबद्दल आपणाला आपुलकी वाटते. अशा व्यक्तीलाच आपण सल्ला देतो. समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजे यांना त्याच तळमळीने सल्ला दिला. समर्थांनी संभाजीराजे यांना पाठवलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श संभाजीराजांनी पाळावा. त्यानुसार त्यांनीही तडाखेबाज राज्य करावे. नावलौकीक मिळवावा, हीच तळमळ व्यक्त केली आहे. शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत राज्यकारभार करावा, यासाठी समर्थांनी केलेला हा प्रयत्न निश्‍चितच मार्गदर्शक आहे. आजच्या काळातही आजचा राजकर्त्यांसाठी तो मार्गदर्शक असाच सल्ला आहे.
संभाजीराजे हे धार्मिकवृत्तीचे होते. पण त्यांच्या ताठर आणि रागीट स्वभावामुळे अनेक माणसे दुखावली गेली. शिवरायांच्यानंतर राज्य सांभाळताना त्यांना या स्वभावाचा तोटा झाला. राजाचे व्यक्तीमत्व कसे असावे? त्याने कसे वागावे? कसा कारभार करावा? कोणत्या चुका होत आहेत? त्यावर कशी मात करायला हवी. याबाबत समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजांना सल्ला दिला होता. हा सल्ला आजच्या काळातही राज्यकारभार करणाऱ्यासाठी उपयुक्त आहे. इतिहासात काय घडले, यापेक्षा इतिहासातून आपण काय शिकलो. हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तीमत्त्वातून हेच शिकायला हवे. त्यांचे घेण्यासारखे विचार आपण आत्मसात करायला हवेत. रामदास स्वामी शिवरायांना भेटले होते का? यापेक्षा त्यांनी शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वातील कोणते पैलू मांडले आहेत. त्यांचा कोणता आदर्श त्यांनी सांगितला आहे? हे इतिहासातून शिकायला हवे. यावर अधिक विचार व्हायला हवा. शिवरायांचा पराक्रम जरी आठवला तरी खचलेल्या मनाला संजिवनी मिळते. मराठी भाषेचे हेच तर सामर्थ्य आहे. रांगडी भाषा असा लौकिक इतर कोणत्या भाषेत आहे सांगा ना? दगडालाही पाझर फोडण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे. समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी यातून बहुमोल सल्ला घ्यायला हवा. राज्यकारभार करताना राग, द्वेष बाजूला ठेऊन राज्य कारभार करावा. हा आदर्श जरी घेतला, तर आज आंदोलनात होणारे सर्वसामान्यांचे, शासनाच्या वास्तूंचे, बस-गाड्यांचे नुकसान टळू शकेल. दहशत माजवली म्हणजे राज्य हस्तगत होते हा गैरसमज आहे. दहशतीने प्रश्‍न सुटत नाहीत उलट बिघडतात. मिळालेले राज्यही जाऊ शकते. यासाठी राज्य कारभार करताना सावधान असावे लागते. चिंतन, मननासाठी एकांताची आवश्‍यकता आहे. दुरदृष्टीचा विचार अंमलात आणण्यासाठी साधनेची गरज आहे. क्षमा, शांतीने कारभार करायला हवा. जनतेच्या भावना ओळखायला हव्यात. जनतेच्या गरजा समजून घ्यायला हव्यात. त्यांचे प्रश्‍न अभ्यासायला हवेत. जनतेचे संघटन महत्त्वाचे आहे. एकीमध्ये ताकद आहे, हे ओळखून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आदर्श जोपासायला हवा. ही जनसेवा आहे. सेवेचा धर्म जोपासायला हवा. सेवा सोडली, तर तो व्यापार होतो. झोकून देऊन काम करायला हवे. वेळप्रसंगी त्यागासही सामोरे जायला हवे. ही शिकवण, हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व्यक्तीमत्व आपण इतिहासातून शिकायला हवा. राजे राज्यकारभार करताना कसे बोलायचे, कसे वागायचे, कसा व्यवहार करायचे हे आजच्या पिढीसाठी निश्‍चितच आदर्श आहे. त्यांचे हे व्यवस्थापन निश्‍चितच मार्गदर्शक आहे. 

No comments:

Post a Comment