Sunday, December 18, 2016

बाटली सोडली नांगर हाती

बीड जिल्ह्यातील हा गाव. गावात सर्व लमाणीच होते. काहीजण मोलमजूरीकरुन पोट भरायचे. तर काही जण दसऱ्यानंतर ऊस तोडणीची कामे करायचे. काहीजण गुऱ्हाळावर काम करायचे. कष्टकरी गाव. पण या गावाला व्यसनाची दृष्ट लागली. कष्ट करुन थकलेल्या माणसाला गरीबी खायला उटते. गरीबी असली की पैसा देणारा कोणताही व्यवसाय चांगलाच वाटतो. तो व्यवसाय वाईट जरी असला तरी तो चांगलाच वाटतो. 
गावातील एकाने दारु भट्टी सुरु केली. गुऱ्हाळघरावर काम करुन राबणारा हा कामगार आता खराब गुळापासून दारु तयार करु लागला. अवघ्या काही दिवसातच त्याच्या हाती पैसा खेळू लागला. कमी कष्टात जास्त कमाई होऊ लागली. त्याची ही करामत पाहून गावातील आणखी चारपाच तरुण त्याच्याप्रमाणे दारुचा व्यवसाय करु लागले. हळूहळू अख्खा गावच दारुच्या आहारी गेला. गावातील सर्व लमाणी कुटूंबे दारुच्या व्यवसायात गुंतली. 
हाती पैसा आला पण त्याबरोबर गावात समस्या वाढल्या. गावाला दारुचे व्यसन लागले. आरोग्य खालावले. माणसांची बुद्धी काम देईना. महिलांनाही दारुचे व्यसन जडले. दारुचा हा धंदा जोमात होता. पैसा मिळत होता. पण समाधान नव्हते. दारुच्या संगतीने इतरही व्यसने तेथे जोर धरु लागली. तशा समस्याही वाढत गेल्या. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले. 
दारुच्या निर्मितीसाठी पाणी भरपूर लागते. बीड जिल्ह्यातील हा दुष्काळी पट्टा. येथे पाण्याची कायमचीच समस्या. त्यात दारुसाठी पाण्याचा वापर वाढल्याने पाण्याची समस्या बिकट झाली. यावर मात कशी करायची हाच प्रश्‍न पुढे होता. दारु व्यवसाय करणाऱ्या गावास मदत तरी कोण करणार. सरकारचेही धाडस होईना. टॅंकर पाठवला तर विरोधक ओरडतील. दारुसाठी पाण्याचा वापर होतोय म्हणून सत्तेतून पाय उतार व्हावे लागेल. या भीतीने लोकप्रतिनिधींनीही या गावाकडे पाठच फिरवली होती. व्यसनी माणसांना कोण मदत करणार हाच प्रश्‍न भेडसावत होता. पण गावाला पाण्याने उद्दल घडवली. पाणी नसेल तर काय होऊ शकते याची कल्पनाही करणे कठीण होते. व्यवसाय ठप्प झाला. तसा पाण्यासाठी जीवही तडफडू लागला. काहीजणांनी शहराचा रस्ता धरला. 
व्याकुळ झालेल्या या गावाला प्रसाद नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता भेटला. गावची व्यसनाधिनता पाहून त्याचे मन भरुन आले. त्याला या लोकांची काळजी वाटू लागली. पण ही समस्या सोडवण्यासाठी गाव साथ देईल का याचीही त्याला चिंता होती. तरीही त्याने गावाला मदत करण्याचे ठरवले. गावाला पाणी दिले तर गाव व्यसनापासून दूर जाईल असे त्याला वाटू लागले. पाणी देतो दारु सोडा असा अट्टाहास त्याने त्यांच्यासमोर धरला. प्रसादने दारुचा व्यवसाय बंद करुन शेती करण्याची अट घातली. ही अट गावातील कोणालाच मान्य नव्हती. कारण उत्पन्नाचा स्त्रोत सोडून दुसरा व्यवसाय करणे या लमाणी समाजास पटणे अशक्‍य होते. दारुच्या आहारी गेलेल्यांना समजावणेही कठीण होते. पण प्रसादने जिद्द सोडली नाही. प्रसादने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दारुत बक्कळ पैसा मिळतो. पण हाती कायच राहात नाही. पाण्याची समस्या सोडविण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. मग तुम्ही जलसंधारणाची कामे कशी करणार आणि गावचा पाण्याचा प्रश्‍न कसा सोडविणार हे प्रसादने त्यांना पटवून दिले. दारुच्या व्यसनाचे दुष्परिणामही त्याने त्यांना समजावून सांगितले. त्याने त्या समाजात जनजागृती केली. व्यसनापासून दुर राहण्याचा सल्ला दिला. पाण्याच्या समस्येमुळे गाव थोडा ताळ्यावर आला होता. याचाच फायदा घेत प्रसादने गावाची समजूत काढली. जलसंधारणाची कामे करुन पाणी प्रश्‍न कसा सोडवायचा ते सांगितले. पण त्यासाठी पैसा कोठून आणणार हा प्रश्‍न होता. 
प्रसादने एक शक्कल लढवली. दारु व्यवसाय सोडणाऱ्यास दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे त्याने ठरविले. तसा प्रस्ताव त्याने गावापुढे मांडला. पण यावर गावाचा विश्‍वास नव्हता. अखेर एक तरुण दारु व्यवसायीक उठला. त्याने दारु व्यवसाय सोडण्याची ग्वाही दिली. प्रसादने त्याला लगेच दहा हजार रुपये बक्षीस दिले. हे पाहताच गावातील आणखी चार-पाच तरुण पुढे आले. त्यांनीही व्यवसाय सोडण्याची ग्वाही दिली. पाण्याने त्रासलेल्या गावाला पाण्याशिवाय आता काहीच दिसत नव्हते. दहा तरुणांनी हा दारुचा व्यवसाय सोडून शेती करण्याचा निर्धार केला होता. त्यांना प्रसादने एक लाख रुपये बक्षिस दिले. पण या सर्वानी हे पैसे जलसंधारणाच्या कामात खर्च करण्याचा निर्णय घेतला. एका पाण्याच्या थेबासाठी आसूसलेला हा गाव पाहता पाहता जलसंधारणाच्या कामात गुंतला. 
गाळ साठल्याने गावच्या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. पाण्याची साठवणूक वाढावी यासाठी गावकऱ्यांनी गावच्या तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. टॅंक्‍टर मालकांनी गाळ मोफत उचलून न्हावा अशी योजना आखण्यात आली. तसे गावातील दहा-बारा टॅक्‍टर मालक या कामात गुंतले. त्यांनी गाळ उपसण्यास सुरवात केली. गाळ उपसला. तलावाची साठवण क्षमता वाढली. गावातील विहिरींचे पुर्नभरण करण्याचाही निर्णय झाला. जलसंधारणाची कामेही झाली. ओढे, नाल्यावर बांध बाधण्यात आले. पाणी अडवा पाणी जिरवा हाच संदेश गावात गेला. तशी झपाट्याने कामेही झाली. एका बक्षीसाने हा बदल घडवला. 
पावसाळा आला. तलावात पाणी साठले. विहिरींना पाणी वाढले. ओढे, नाल्यात बंधारे बांधल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले. गावाचा परिसर हिरवा करण्याचा निर्धार आता गावाने घेतला होता. पाण्याच्या संवर्धनासाठी आता वृक्षांची गरजही त्यांना वाटू लागली. पाहता पाहता गावाचे बांध वृक्षांनी सजले. रस्ते, नाल्याचे काठही वृक्षांनी बहरले गेले. 
इतर वेळी केवळ खरीपात ज्वारी घेणारा हा गाव आता पाण्याच्या मुबलकतेने अन्य भाजीपाला पिके घेण्याकडे वळला. भाजीचे उत्पादन करुन त्याची विक्री करण्यासाठी गावाने पुढाकार घेतला. खरीपासह उन्हाळ्यातही गाव हिरवा दिसू लागला. दारुची विक्री करणारा गाव आता भाजीपाल्याची विक्री करु लागला आहे. दारुच्या व्यसनाने जे गमावले ते आता हातात नांगर धरुन गावाने कमावले. गेलेली पत गावाने पुन्हा मिळविली. गावची प्रगती झाली. लोक शिक्षित झाले. गावाची प्रतिष्ठा वाढली. 

No comments:

Post a Comment