Sunday, April 1, 2018

आता सायकल वापरा चळवळ...

कोल्हापूर हे लहान शहर आहे. साधारण दहा किलोमीटरचा व्यासाचा शहराचा विस्तार असू शकेल. दहा किलोमीटर म्हणजे चालत म्हणाल तर एका टोकाहून दुसऱ्या टोकाला दीड तासात सहज जाता येणे शक्‍य आहे. हेच अंतर सायकलवरून म्हणाल तर चाळीस मिनीटात गाठता येणे शक्‍य आहे. त्यामुळे सायकलचा वापर या शहरात जास्त असायला हवा होता. पण सध्यातरी तसे चित्र दिसत नाही. वाढत्या सुविधा आणि सहज उपलब्धतेमुळे नागरिक इंधनाची वाहने येथे अधिक वापरतात. प्रत्येकाच्या घरी सायकल नाही, पण दुचाकी जरूर आहे. अगदी सर्वसामान्याच्या घरीही दुचाकी पाहायला मिळते. कोणी कोणते वाहन वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण या शहरात सायकल प्रेमीही अधिक पाहायला मिळतात. हे सुद्धा तितकेच खरे आहे. इथे सायकल चालवण्याचा छंद अनेकांना आहे. लहान मुलांपासून थोरापर्यंत अनेकजण सायकल आवडीने चालवतात.

पर्वाच मला रस्त्यामध्ये सत्तरीच्या वाटेवर असणारे सतिश सोनटक्के काका भेटले. त्यांनाही सायकल चालवण्याचा छंद आहे. स्वतःची मुले परदेशात नोकरी करतात. तरीही त्यांनी स्वतःचा स्टेशनरीचा व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यातून ते सायकल चालवण्याचाही छंद जोपासतात. त्यांच्याच भेटीमुळे मला कोल्हापूरातील सायकल चालवण्याचा छंद जोपासणाऱ्या गटाची ओळख झाली. या गटामध्ये डॉक्‍टर, इंजिनिअर, व्यावसायिकही आहेत. हा गट दरवर्षी उत्तर भारतातील विविध ठिकाणी सायकलची ट्रिप काढतो. पण सायकलचे ट्रेक करण्यासाठी नेहमी सायकल चालवण्याचा सराव असावा लागतो. तरच उत्तर भारतातील ट्रेक करणे शक्‍य होते. नियमित सरावासाठी हा गट दररोज कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी सायकलने जातो. सराव हवा तरच असे मोठे ट्रेक करणे शक्‍य होते. त्यांची ठिकाणे व वारही ठरलेले आहेत. पन्हाळा, जोतिबा, निपाणी अशी विविध ठिकाणे विविध वारी करत असतात. रोज एक ठिकाण त्यांनी निश्‍चित केलेले असते. रविवारी इस्पुर्लीपर्यंत सायकलचा मार्ग त्यांनी निश्‍चित केला आहे. त्यानुसार आज मी त्यांच्या गटामध्ये सहभागी झालो. सकाळी साडेपाच वाजता हॉकी स्टेडियमजवळ जमायचे. कोणास उशीर झाला तर त्यांने मागावून यायचे. पण साडेपाच वाजता तेथून निघायचे. उशीर झाला म्हणून थांबायचे नाही. सायकल चालवत पूढे मार्गस्थ व्हायचे. असा हा नित्यक्रम असतो. विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये महिलाही सहभागी होतात. आज आम्ही या गटात कळंबा जेलच्या जवळ सहभागी झालो. जवळपास 12 जणांचा हा गट रोज सायकल चालवतो. दररोज अंदाजे 40 ते 50 किलोमीटर सायकलींग केले जाते. दैनंदिन कामाबरोबरच त्यांचा हा नित्यक्रम आहे. मी ही आता या गटामध्ये सहभागी झालो आहे. दररोज नाही जमले तरी साप्ताहिक सुट्टी व रविवारी या गटात सहभागी होणे मला शक्‍य आहे त्यामुळे मी ही आता या गटाचा सदस्य झालो आहे. 

ट्रेक करण्यासाठी सायकलींगचा सराव करणे, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कोल्हापूरात अनेकजणांना असे छंद आहेत. 30 ते 75 हजार रुपयांपर्यंतच्या महागड्या सायकली खरेदी करून हा सराव करणे हा तर एक व्यायामाचा भाग आहे. मग त्यात वेगळे असे वैशिष्ट्य काय आहे? असाच प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. पण या गटामध्ये डॉ. प्रदिप कुलकर्णी हे सर्वाहून वेगळे आहेत. सायकलचा नित्यक्रम तर ते करतातच पण त्याबरोबर दररोज ते दवाखान्यामध्येही सायकल घेऊन जातात. किंवा अन्य कोठे जायचे झाले तर गाडी ऐवजी ते सायकललाच प्राधान्य देतात. वयाची साठी ओलांडली असली, तरी शिवाजी पार्क ते दुधाळी येथील त्यांचा दवाखाना ते सायकलवरूनच जातात. तरूणांना लाजवेल असा त्यांचा नित्यक्रम आहे. सायकल चालवून ऑपरेशन करण्यासाठी व रुग्णाची सेवा करण्यासाठीही तितक्‍याच ताजेतवानेपणे ते हजर असतात. त्यांचा हा गुण मला खूप आवडला. विशेष म्हणजे आपल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणीही सायकलचा वापर करणारे कोणीतरी आहे, याचे मला खूप समाधान वाटले. 2003 पासून ते सायकल वापरतात. त्यांचा सायकल वापरण्याचा नित्यक्रम तेव्हापासून सुरू आहे. त्यांनी आत्तापर्यंत उत्तर भारतातील महत्त्वाचे असे समजले जाणारे सर्व सायकल ट्रेक केले आहेत.

सायकलचे काय फायदे आहेत, हे या गटाच्या समजून घ्यायला सर्वांनाच आवडेल. त्यांचे अनुभव तर आहेतच, पण त्यापेक्षा उतारवयातही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह निश्‍चितच प्रोत्साहन देणारा आहे. या गटात साठी पार केलेले गृहस्थ आहेत आणि ते दररोज 50 किलोमीटर सायकल चालवतात. तरीही त्यांना कधीही थकवा जाणवला नाही. असे नाही की ते यापूर्वी सायकल चालवत होते. घाटगे काका हे 2015 पासून सायकलिंग करतात. 2015 ला ते नोकरीतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी हा नित्यक्रम सुरू केला. तंदुरूस्त राहण्याचा अनुभव त्यांच्याकडून जरूर शिकायला हवा. सायकलमुळे शरीराच्या सर्व भागाचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरूस्त राहाते. मनात आलेला राग सायकलिंगमुळे कमी होतो. मन एका कामात गुतल्यासारखे राहाते. त्यामुळे मनाचाही व्यायाम होतो. तग धरून राहण्याची, टिकाव धरण्याची क्षमता सायकल चालवण्याने वाढते. हृदय आणि फुफुस उत्तम राहाते. हात, गुडघे, कंबर, पाठीचा उत्तम व्यायाम होतो. असे हे फायदे ऐकल्यावर सायकल चालवण्याचा मोह कोणाला होणार नाही. म्हणूनच म्हणतो आता सायकल वापरा चळवळीमध्ये आपणही सहभागी व्हा. प्रदुषण कमी करण्यासाठी, इंधनाची बचत करण्यासाठी, स्वतः तंदुरूस्त राहण्यासाठी सायकल चालवा आणि सायकल वापरा चळवळीला बळ द्या.


No comments:

Post a Comment