Saturday, August 13, 2016

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...

‘श्रमिक सहयोग’ राबवितेय प्रयोगशील उपक्रम 

चिपळूण तालुक्‍यात रुजताहेत विकासाची बीजे 


चिपळूण तालुक्‍यामधील (जि. रत्नागिरी) विविध गावांमध्ये श्रमिक सहयोग ही संस्था निसर्ग शेती, वनसंवर्धन, सूक्ष्म जलविद्युत केंद्र, वंचित समाजासाठी वाडी-वस्त्यांवर अनौपचारिक शाळा असे विविध उपक्रम राबवीत आहे. सन २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथे ‘प्रयोगभूमी’ हे प्रयोगशील शिक्षण केंद्र सुरू केले. विविध उपक्रमांतून ही संस्था शाश्वत विकासाचे धडे परिसरातील लोकांना देत आहे. 

- राजेंद्र घोरपडे 

कोकणच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील काही ध्येयवादी व्यक्तींनी १९८४ मध्ये चिपळूण तालुक्‍यात श्रमिक सहयोग या संस्थेची स्थापना केली. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासगट, चिंतन शिबिरे, व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी प्रबोधनात्मक उपक्रम संस्थेने सुरू केले. आदिवासी समाजामध्ये एका पिढीने दुसऱ्या पिढीस शिक्षित करण्याची पद्धती आहे, त्यामुळे या मुलांना शिक्षण देताना अनेक अडचणी उभ्या राहतात. या मुलांना आपला अभ्यासक्रम बोजड वाटतो. हे लक्षात घेऊन त्यांना रुचेल, पटेल अशा भाषेत शिकविण्याची गरज असते. यासाठी श्रमिक सहयोगने मुलांच्या कार्यक्षमता शोधून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्रामीण स्त्रिया-युवकांचे प्रबोधन व संघटन, कोकणातील पर्यावरणविषयक तसेच विकासपद्धती विषयक मुद्द्यांची हाताळणी, समाजातील कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनधारांच्या अधिकाराच्या मुद्द्यांची हाताळणी, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणपद्धतीची मांडणी यावर संस्थेचे कार्य सुरू झाले. चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्‍यांतील सुमारे १५० गावांत संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेने पहिली १२ वर्षे कातकरी- आदिवासी समाजाच्या दुर्गम भागातील २६ वाड्यांवर अनौपचारिक शाळा चालविल्या, त्यातून सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

प्रयोगशील निवासी शाळा 
वंचित मुलांच्या विकासासाठी २००४ मध्ये संस्थेने कोळकेवाडी येथे १६ एकर जमीन खरेदी करून प्रयोगशील निवासी शाळा सुरू केली. या शाळेत सध्या ४० मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना औपचारिक अभ्यास, व्यवसाय शिक्षण, कला-कौशल्य असे शिक्षण देण्यात येते. या शाळेच्या संचालनासाठी पुणे येथील नवमहाराष्ट्र कम्युनिटी फाउंडेशन (नवम) या संस्थेचे सहकार्य मिळाले होते. प्रयोगभूमीतील मुलांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थानमार्फत शालेय शिक्षण व्यवस्थेत सामील करून घेण्यात येते. ‘प्रयोगभूमी’चे संचालन समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, गट यांच्या साहाय्याने चालते. त्यासाठी ‘पालकत्व योजना’ चालविली जाते. नवम (पुणे), एस.पी.ए. एज्युकेशन फाउंडेशन (मुंबई), सकाळ रिलीफ फंड इत्यादी संस्थांचा यात सहभाग आहे.

‘संडे स्कूल’मधून मार्गदर्शन 
डोंगरी भागातील कातकरी समाजात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण न करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाची इच्छा असूनही त्यांना शिकता येत नाही. अशा तरुणांसाठी प्रयोगभूमीमध्ये ‘संडे स्कूल’ ही संकल्पना राबविली जाते. दर रविवारी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येतो. सध्या यामध्ये १२ तरुण सहभागी झाले असून, दहावी परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.

स्वयंसहायता गटातून महिला विकास 
चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यातील ६५ गावांमध्ये संस्थेने २५० स्वयंसहायता गट स्थापन केले आहेत. यातून सुमारे ३७०० स्त्रिया संघटित झाल्या असून त्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. श्रमिक सहयोग परिसरातील सहयोगी गटांना सातत्याने प्रशिक्षण, संशोधन इत्यादी स्वरूपात मदत करते. कोकण संघर्ष समिती, सह्याद्री वाचवा अभियान, कोंकण नारी मंच, आम्ही चिपळूणकर, कृषी वसंत शेतकरी संस्था, आदिम कातकरी आदिवासी संघटना इत्यादी संस्थांना सहकार्य केले जाते.

पुरस्कारांनी गौरव ः 
संस्थेला वीजनिर्मिती व पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन व पर्यावरण शिक्षण संस्थेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा समाजकार्य गौरव पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी समाजशिक्षक पुरस्कार
आणि सामाजिक कार्यासाठीचा अस्मि प्रतिष्ठानचा पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे.

शेकरू महोत्सवाचे आयोजन 
कोयनानगर प्रकल्पाच्या चौथ्या टप्पा परिसरात असणाऱ्या वनांमध्ये पर्यावरणप्रेमींना शेकरू फिरताना आढळले. या निसर्गरम्य परिसरात वन खात्याने शेकरूचा अधिवास असल्याची शासकीय नोंद केल्यानंतर वनसंवर्धनासाठी प्रयोगभूमीने पाऊल उचलले. संपूर्ण परिसरात वृक्षतोडीस बंदी घातली. याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने संस्थेने आम्ही चिपळूणकर, वन खाते, डी.बी.जे. महाविद्यालय यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी प्रयोगभूमीमध्ये शेकरू महोत्सव आयोजित केला होता. या वेळी परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित करण्यात आली. महोत्सवासाठी उपस्थित निसर्गप्रेमींनी वन परिसरात फिरून, जंगलातील विविध वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग, प्राण्यांच्या पायाचे ठसे, पक्ष्यांचे आवाज, फुलपाखरांचा अधिवास याबाबत माहिती संकलित केली.

सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प 
कोयना वीज प्रकल्पाच्या परिसरात असणाऱ्या अनेक वाड्या-वस्त्या, तसेच प्रयोगभूमीतही वीज नव्हती. अशा या परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने श्रमिक सहयोगचा अभ्यास सुरू झाला. नागालॅंडमध्येही डोंगरी भागात ही समस्या आहे. तेथे सरकारने झरे-ओढे, धबधब्याच्या वाहत्या पाण्यावर छोटी जलविद्युत केंद्रे उभारली आहेत. हे पाहून तसाच प्रयोग प्रयोगभूमीत करण्यात आला. प्रयोगभूमीच्या परिसरात वाहणाऱ्या झऱ्यावर २००७ पासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. नागालॅंड सरकारच्या सहकार्याने वीजनिर्मितीचे यंत्र येथे बसविले अाहे. वाहत्या झऱ्याचे पाणी १५ मीटर उंचीवर अडवून तेथून पाइपने हे पाणी जल विद्युत निर्मिती यंत्रापर्यंत आणले आहे. या यंत्रात ठराविक दाबाने पाणी सोडून वीजनिर्मिती करण्यात येते. चार-पाच महिने दररोज तीन किलोवाॅट विजेची निर्मिती या यंत्रातून होते.
प्रयोगभूमीने यंदा ‘चला वीजनिर्मिती करूया’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. पर्यटन, प्रबोधन, मनोरंजन, शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव असे उद्देश ठेवून आयोजित या कार्यशाळेमध्ये राज्यभरातून अनेकांनी सहभाग घेतला. सहभागी व्यक्तींना या यंत्राची सर्व तांत्रिक माहिती देऊन स्वतः हे यंत्र जोडणी करून वीज तयार करण्याचे प्रात्यक्षिक करण्यास सांगण्यात आले होते.

भाताच्या पारंपरिक जातींचे संवर्धन 
चिपळूण तालुक्‍याच्या डोंगरी भागात खामडी ही पारंपरिक भाताची जात आढळते. सध्याच्या काळात ही जात दुर्मिळ होऊ लागली आहे. प्रयोगभूमीमध्ये दीड एकरावर खामडी (लाल तांदूळ) या भाताच्या पारंपरिक जातीचे संवर्धन करण्यात येत आहे. एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली असून, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी भात लागवडीबाबत कार्यशाळा घेण्यात येतात.

संपर्क ः
राजन इंदुलकर ः ९४२३०४७६२०, ८४०८०११२३१

No comments:

Post a Comment