Friday, October 28, 2011

गुरुकृपा

मग आलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।।

गुरुकृपा म्हणजे काय? ती कशी होते? याबद्दल प्रत्येकाला उत्सूकता असते. मला एक गृहस्थ म्हणाला. गुरूकृपेने मला सगळे मिळाले. गुरुंचा शब्द मी पाळला आणि अमाप पैसा मिळाला. माझा अध्यात्मावर विश्‍वासही नव्हता. तसे या युगात अध्यात्मावर विश्‍वास तरी कोण ठेवणार? पण मला गुरूकृपेचा अनुभव आला. गुरुंच्या शब्दाला महत्त्व असते. मला दैनंदिन जीवनात अनेक कटकटी वाटत होत्या. घरगुती समस्यांनी मी त्रस्त झालो होतो. समस्यांच्या गर्तेत अडकल्यानंतरच जनतेला देव आठवतो. तसा मलाही देव आठवला. देवळात जायला लागलो. तेथे नेहमी प्रवचन चालायचे. प्रवचनकार सांगत होते. माऊलीने संसार करत परामर्थ करा असे सांगितले आहे. संसार सोडण्याचा विचार माझ्या मनात घोळत होता. यासाठीच मी सन्यस्थाचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करत होतो. पण येथे तर उलटेच सांगितले जात आहे. संसार न सोडता परमार्थ करा असे सांगितले जाते. हे कसे शक्‍य आहे. मी विचार केला. ठिक आहे. हा ज्ञानेश्‍वरांचा आदेश, गुरूंचा आदेश असे समजून प्रयत्न तरी करून पाहू. संसार होत राहतो. परमार्थ करावा लागतो. संसारात राहायचे पण त्यात गुरफटायचे नाही. काय हरकत आहे. असे करून पाहायला. असे समजून मी प्रयत्न सुरू ठेवले. घरगुती समस्यांपासून मी दूर राहीलो. रोजच्या कटकटींचा विचारच सोडून दिला. त्यामुळे झाले काय? संसार सुरू होता. पण त्या संसाराचा त्रास मला होत नव्हता. माझ्या कामावर, व्यवसायावर या कटकटींचा परिणाम होत नव्हता. घरच्या नेहमीच्या कटकटी त्याच असतात. त्याकडे कानाडोळा केला. संसार होतच राहीला. पण त्या कटकटींपासून मी दूर राहीलो. माझा विकास झाला. हातात अमाप पैसा खेळू लागला. आपोआपच संसारात शांती नांदू लागली. पण परमार्थांचा अर्थ अद्याप समजलेला नाही. मोक्ष म्हणजे काय हेही माहित नाही. पण तरीही संसारात शांती नांदते. याचे समाधान आहे. गुरूंचा आर्शिवाद पाठीशी आहे. असे वाटते. ही गुरूकृपाच आहे. आता आत्मज्ञानाचा अभ्यास करत आहे. सांगण्याचा ताप्तर्य हेच की सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरुंचा आर्शिवाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरुंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.



राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

No comments:

Post a Comment