Friday, October 21, 2011

आत्महत्या

येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावें घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।।

धकाधकीच्या जीवनात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जीवनात नैराश्‍य आल्याने, कर्जबाजारीपणाला कंटाळून, अपयश आल्याने आत्महत्या केल्या जात आहेत. त्रासाला कंटाळूनही काहीजण आत्महत्या करतात. नव्या पिढीत माणूसकी कमी होत आहे. यातूनच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. माणसाला आधार देणारा माणूसच राहीलेला नाही. कौटूंबिक जीवनातही वादाचे प्रसंग वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीमुळे तर मैत्रीची व्याख्याच बदलली आहे. अशा या युगात मानवता याच धर्माची गरज आहे. त्याचा प्रसार होण्याची गरज आहे. अशी परिस्थिती पूर्वीच्या काळीही होती. पण त्या काळात संतांच्या महान कार्यामुळे यावर प्रतिबंध बसला. सध्याही अशा मानवतेच्या संतांची गरज आहे. सध्या भगवीवस्त्रे घालून धर्माचा प्रसार करणारे अनेकजण दिसतात. पण मानवतेचा गंधही त्यात नसतो. नुसती प्रवचने, सल्ले देऊन हे कार्य होत नाही. यासाठी स्वतः आत्मज्ञानी होण्याची गरज आहे. आत्मज्ञानी संतंच हा मानवतेचा धर्म टिकवू शकतात. असा संत प्रत्येकजण होऊ शकतो. जगातील सर्व धर्म हे मानवतेचीच शिकवण देतात. तरीही जगात अशांतता आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण केली जाते. स्पर्धा लावली जाते. सत्तेच्या हव्यासापायी तंटे लावले जातात. अशा या स्वार्थानेच धर्म बदनाम होत आहे. हुकुमशहांच्या हव्यासाने अनेकांचे बळी घेतले जातात. पण या हुकुमशहांचा शेवट खूपच वाईट असतो पण याची चर्चा होत नाही. हे हुकुमशहा मरताना दयेची याचना करतात. पण त्यांना कोणीही दया दाखवत नाही. काही हुकुमशहांनी तर आत्महत्याच केल्या आहेत. मग त्यांनी अत्याचार तरी केले कशासाठी? दिनदुबळ्यांना दया दाखविली नाही त्यांना कोण दया दाखविणार. हत्या करणारेच आत्महत्या करतात. हाच इतिहास आहे. यातून बोध घ्यायला हवा. यासाठीच तर मानवता धर्माची गरज आहे. देशात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गंभीर रुप धारण केले आहे. नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मानवतेच्या धर्माचा प्रसार करायला हवा.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

1 comment:

  1. आत्महत्त्या सर्वसाधारणपणे आपला अहंकार जपण्यासाठी केल्या जातात. हुकूमशहा आत्महत्त्या करतो तेव्हा आपल्याला शिक्षा करणाऱ्या विरोधकांचा शिक्षा करण्याचा अधिकार अमान्य करत असतो.

    ReplyDelete